Saturday, December 25, 2021

भारत जमीन का टुकडा नहीं,जीता जागता राष्ट्रपुरुष है।


हे शब्द मनाला कायमच भुरळ घालणारे आहेत. ही कविता,त्या कवितेतील शब्दांची उंची,त्याची व्यापकता यासाठी श्रद्धेय भारतरत्न अटलजी कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहेत. निव्वळ सत्तेसाठीच राजकारण चाललेल्या देशातले राजकारणी कधी आवडले नाहीत.. पण कळत्या वयात मन जिंकलं ते म्हणजे अटलजी यांनीच. नेता,पुढारी,विचार,तरुणाईवरचा प्रभाव,आदर्श, राजकारण कसं असावं याची प्रचीती यांच्यासारख्या व्यक्तीमत्वांकडे पाहिल्यावर यायची. आजतागायत अनेक भाषणंही ऐकली ती फ़क्त यांचीच. जरा कधी उमेद कमी झाली की आजही संसदेतल्या हळव्या कवीह्र्दय मनाच्या अटलजींच्या जुन्या भाषणांचे व्हिडीयो शोधुन शोधुन पाहतो त्यांच्या त्या ठहराव असल्या आवाजात हार नहीं मानूँगा, रार नहीं ठानूँगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ.. गीत नया गाता हूँ किंवा मग लोकसभेतील बहुमत सिद्ध करतांना केलेलं भाषण असो,ऐकताना आजही तितकाच सरसरून जिवंत काटा येतो...

काही माणसांचं ’फ़क्त’ असणंच फ़ार असतं कारण तिथं प्रचंड विश्वास असतो. मग हरलो तरी त्याचं काही वाटत नाही तसं माझ्यासाठी अनेक वर्ष राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या अटलजींचं असणं होतं. आज विद्यमान भारतीय जनता पार्टी चे भव्य स्वरूप बघून त्यांना नक्कीच अत्यानंदच झाला असता.. संसदेत एका भाषणात त्यांनी छान संबोधन केले  "सत्ता का खेल तो चलता रहेगा, सरकारे आयेंगी .. सरकारे  जायेंगी.. ..पार्टीया बनेंगी बिखरेगी..मगर ये देश रेहना चाहिये.. इस देश का लोकतंत्र रेहना चाहिये"  खडे बोल आणि प्रसंगी हळवं मार्गदर्शन करतील ते अटलजी आजही यु ट्युबवर बघतांना जवळचे वाटतात…गेल्या शतकाने बरेच महाने नेते पाहिले असतील पण देशाला देव मानना-या.. विरोधकांनांही वंदनीय अशा या शतकातला एकमेव अखेरच्या अजातशत्रू भारतरत्न अटलजी यांना बघण्याचे भाग्य आपल्या पिढीला लाभले आहेत. त्या महान व्यक्तीमत्वाला शत: शत: वंदन !! शेवटी माणूस देह रूपाने नसला तरी त्याचे शब्द हे कायम सोबत करत असतात आणि त्यातच आज त्यांचे अजरामर काव्यापैकी एक..

भारत जमीन का टुकडा नहीं,जीता जागता राष्ट्रपुरुष है।
हिमालय इसका मस्तक है, गौरीशंकर शिखा है।
कश्मीर किरीट है,पंजाब और बंगाल दो विशाल दो कंधे है।
विन्धाचल कटि है,नर्मदा करधनी है।
पूर्वी और पश्चिमी घाट,दो विशाल जंघाएँ है।
कन्याकुमारी इसके चरण है,सागर इसके पग पखारता है।
पावस के काले-काले मेघ,इसके कुंतल केश हैं।
चाँद और सूरज इसकी आरती उतारते हैं।
यह वंदन की भूमि है,अभिनंदन की भूमि है।
यह तर्पण की भूमि है,यह अर्पण की भूमि है।
इसका कंकर-कंकर शंकर है,इसका बिंदु-बिंदु गंगाजल है।
हम जिएँगे तो इसके लिए,मरेंगे तो इसके लिए।
मरने के बाद भी गंगाजल में बहती हुई
हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सूनेगा तो
एक ही आवाज आयेंगी- भारतमाता की जय

 -अटल बिहारी वाजपेयी

✍️ सर्वेश फडणवीस 

#SadaivAtal #AtalBihariVajpayee #ataljayanti

Tuesday, December 14, 2021

संगीतम् परमानंददायकम्..


या भूतलावर संगीत आवडत नाही, तसेच संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. तसं पाहिलं तर आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. संगीत नसेल तर माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे असं म्हणतात आणि ते खरं ही आहे असं वाटतं. त्‍यामुळेच, की काय राजे महाराजे त्यांच्या वाड्यात सांगीतिक मेजवानी मोठ्या हर्षोल्हासात साजरे करत असावेत कारण नुकताच असा अनुभव ग्वाल्हेर येथील बैजाताल मोतीमहाल येथे अनुभवता आला.

ग्वाल्हेरच्या शिंदे राज घराण्यातील सांगीतिक मैफिली जिथं व्हायच्या त्या स्थानावर जाता आले. हे स्थान बघितले आणि मन काहीकाळ भूतकाळात रमले. ते सगळं वैभव बघतांना मनात सारखा विचार येत होता की,त्या काळात या स्थानावर किती मैफिली गाजल्या असतील,प्रत्येक मैफील अविस्मरणीय असेल. ते वातावरण,तो उत्साह शब्दांच्या पलीकडचा असेल. तिथेच तानसेन ही काही काळ गायला होते असे म्हणतात. ग्वाल्हेर महालाजवळ आजही हे स्थान दिमाखात उभे आहे. जिथे राजे-महाराजे,राण्या आणि त्यांचे मंत्रिमंडळ या सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेत होते. 'बैजाताल' मोतीमहाल हे स्थान आज ज्या पद्धतीने जतन करून ठेवले आहे ते बघून आपण काहींकाळ त्या काळात आहोंत असाच भास होतो. मला वाटतं बैजाताल हे रात्रीच बघण्यासारखे आहे. रात्री तिथं गेल्यावर दिव्यांच्या प्रकाशात तेथील सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. क्षणभर मनात विचार आला की त्या काळात इथं ज्या मैफिली गाजल्या असतील त्या नक्कीच स्वर्गीय आनंद देणाऱ्या असतील.

तिथे गेल्यावर असं ही सांगण्यात आलं की ते वैभव पुन्हा अनुभवण्यासाठी काही वर्षांपूर्वी तानसेन महोत्सव याच स्थानावर घेण्यात आला होता पण जागा कमी पडत असल्याने आता तो महोत्सव तानसेन स्मृती स्थळावर होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायक या महोत्सवात आपलीं कला सादर करतात. खरंच हे वैभव बघून वाटतं आपण ज्या चिरपुरातन संस्कृतीचे पाईक आहोत ती नक्कीच वर्षानुवर्षे मिळालेलं संचित आहे. खरंतर संस्कारांना संक्रमित करण्यात संगीताचे योगदान महत्वपूर्ण आहे. स्वतःच्या गायकीत तल्लीन झालेला गायक श्रोत्यांच्या हृदयात आपल्या स्वतःचे भावविश्व संक्रमित करत असतो आणि त्यामुळेच संस्कारांचा प्रवाह अबाधित राहिला आहे. आपल्या पूर्वजांनी संगीत हे संस्कार विकसित करणारे सक्षम साधन मानले आहे आणि त्यामुळेच की काय ही अशी स्थानें आजही दिमाखात उभी असून त्या ऐतिहासिक काळाची साक्ष देत सुस्थितीत आहेत. हेच वैभव टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्रित येत पुढच्या पिढीपर्यंत हस्तांतरित करण्याचे दायित्व आपल्याकडे आहे. जो अनुभव हे बघतांना आला तेच शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#incredibleindia #mpmarvels #gwaliordiaries

Monday, December 13, 2021

भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।। 🚩🚩


वेदांच्या अखेरच्या रचनेतील भगवद्गीता हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला गेला आहे. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, यांचे मार्गदर्शन करतो. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हटले गेले आहे आणि आजच्या एकादशीला 'मोक्षदा एकादशी' म्हंटले आहे.  महाभारतातल्या भीष्म पर्वा मध्ये गीतेचा उल्लेख आढळतो. गीतेत एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे आणि जगात एकमेवाद्वितीय ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायिली' जाते. लिहिण्याची साधने उपलब्ध नव्हती तेव्हापासून हिंदू धर्मातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्याची प्रथा आहे आणि म्हणून संथा रुपात गीता सांगितली जाते. जगातील विविध देशांतले व विविध धर्मातले असंख्य तत्त्ववेत्ते,शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत. आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे म्हणून गीता ही शाश्वत आहे.

श्रीवेदव्यासांनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यावर म्हटले आहे -

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिःसृता ॥

गीता सुगीता करण्याजोगी आहे. म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून
तिचा अर्थ आणि भाव अंत:करणात साठवणे हे मुख्य कर्तव्य आहे. कारण ती स्वतः पद्मनाभ भगवान् श्रीविष्णूंच्या मुखकमलातून प्रगट झाली आहे.

कोणत्याही वर्णाच्या व आश्रमाच्या प्रत्येक माणसाला गीताशास्त्र
अभ्यासण्याचा अधिकार आहे. मात्र त्याची भगवंतांच्या ठिकाणी भक्ती व श्रद्धा अवश्य असली पाहिजे. कारण स्वतः भगवंतांनी आपल्या भक्तांमध्येच याचा प्रचार-प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे. गीतेबद्दल कायमच वेगळेपण जाणवते आणि आज मोक्षदा एकादशी निमित्ताने ह्यावर लिहिताना वेगळ्याच भावना आहे.खरंतर भक्ती योगात भगवंताने वेगळं काय सांगितलं आहे.

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि...
तत्कुरुष्व मदर्पणम्।।

म्हणजेच तू जे काही काम करशील.  ते तू मला अर्पण करून टाक. म्हणजेच थोडक्यात त्याचं कर्तृत्व सोडून दे... कुणीतरी पाठिशी आहे म्हणून तू पुढे आहेस,हे लक्षात ठेव आणि ह्याच गीता तत्त्वावर प्रत्येकाची वाटचाल दृढ व्हावी हीच गीता जयंती निमित्ताने श्री भगवंताचरणी प्रार्थना आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#गीता_जयंती  #मोक्षदा_एकादशी

Wednesday, December 8, 2021

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

कालच्या घटनेने मनात विचारांची कालवाकालव निर्माण केली आहे. जी घटना घडून गेली त्याबद्दल सारखे वेगवेगळे विचार येत होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अनाम वीरा या कवितेच्या ओळीं ओठावर येत होत्या. लताबाईंनी आपल्या स्वरांनी अजरामर केलेलं हे शब्द आहेत. अशा शब्दांना खरंतर विविध वाद्यांची गरज नसतेच. व्हायोलिन, बासरी आणि संथ तबला असला तरी लताबाईंनी कवितेला पूर्ण न्याय दिला आहे. १९६३ मध्ये रेकॉर्ड केलेली कविता आजही डोळ्यात पाणी आणते. काल यु ट्यूबवर सतत लुपवर हेच ऐकत होतो. मनात रुंजी घालणारी ही कविता प्रत्येकाच्या ओठावर नव्हे तर श्लोक किंवा मंत्र असल्यासारखी मुखोद्गत असायला हवी तेव्हा आपले सैनिक आणि त्यांचे राष्ट्रासाठी असलेले बलिदान येणाऱ्या पिढीला कळणार आहे. 

भारतीय सैनिक म्हणजे शौर्य, निर्धार,अन निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे. असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा भारतीय सैनिक आहे . देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्याचा सदैव जागता पहारा असतो असा आमचा भारतीय सैनिक आहे म्हणून आम्ही आपल्या घरात सुखाची झोप घेऊ शकतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा कर्तव्यकठोर,निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा असा आमचा भारतीय सैनिक आहे. भारतीय सैनिकाकडे दुर्दम्य आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा,असामान्य कर्तृत्व,उच्च मनोबल,अदम्य साहस हे गुण उपजतच आहेत. आपल्या उद्यासाठी आज देणारा हाच आमचा भारतीय सैनिक आहे.

खरंतर सैनिक ही एक वृत्ती आहे. त्यामागे शिस्त,निष्ठा,समर्पण आणि त्यागाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच बर्फातील ४० डिग्री तापमान असो किंवा वाळवंटातील ५० डिग्री आमचा भारतीय सैनिक हा कार्यतत्परच आहे . दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर असो,शत्रूच्या समोर जाणं असो अथवा निसर्गाच्या तांडवात सर्वसामान्य जनतेचा देवदूत बनून मदतीला धावून जाणं असो आमचा सैनिक देशाच्या प्रत्येक संकटाला धाडसाने समोर जातो. प्रसिद्धी,आणि पैसा या प्रलोभनापासून दुर राहून सैनिक आपलं काम निस्पृह, निरपेक्षतेन, एकदिलाने आणि एकसुराने करत असतो. सैनिकाला मृत्यू प्रत्यक्ष दिसत असतानाही पुढे पाउल टाकणं यासारखं धैर्य नाही आणि या धैर्याला तो हसतमुखाने समोर जातो. ही त्यागाची परिसीमा गाठण्याचे प्रशिक्षण त्याला इथं येण्याआधीच मिळत असते.

सैनिक हा आपल्याच समाजातून सैन्यदलात प्रवेश करतो आणि या सैनिकांचे आपण देणं लागतो की नाही हा प्रश्न स्वतःला विचारण्याची आज नितांत आवश्यकता आहे. सर्व सीमांवर वादळवाऱ्यात, बर्फात,पावसात,सैनिक चोवीस तास कडक पहारा देत असतो. तुम्ही निश्चित रहा ,मी जागा आहे असे तो छातीठोकपणे सांगतो. सीमेपासून दूर असलेल्या शहरातील माणसं -आपल्या ठिकाणी आपलं घर,आपली गाडी,मुलं हाच भारत आणि हेच जग मानणारी माणसं आज बघायला मिळत आहेत. आज आपण कुणाच्या जीवावर स्वातंत्र्य उपभोगतो आहे ह्याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि हीच वेळ आहे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सैनिक हाच राष्ट्राचा आत्मा आहे हे सांगताना अभिमानच वाटला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने कार्यतत्पर राहण्याची अधिक गरज आहे.

सैन्यदलाबद्दल नितांत आदर,अभिमान,श्रद्धा,विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा,ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही,आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. मातृभूमीचा ऋण फेडणारा सैनिक हाच खरा आयकॉन व्हावा हीच काळाची गरज आहे.  सैनिकांचा सन्मान करणे,त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्याप्रति पोहोचविण्यासाठी आम्ही तत्पर आहे ही आपली जबाबदारी आहे आणि काल कविता ऐकत असतांना हे सगळे विचार मनात आले. भारतीय सैन्यातील हुतात्म्यांना, सैन्यदलातील आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या सर्व वीरपुत्र अन् वीरकन्यांना आणि त्यांच्या तलवारी आपल्या मानसिक आधारानं धारदार ठेवणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना सादर नमन आहे. कमेन्ट बॉक्स मध्ये लिंक देतोय नक्की ऐका.. अनाम वीरा..

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

✍️ सर्वेश फडणवीस