Wednesday, December 8, 2021

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

कालच्या घटनेने मनात विचारांची कालवाकालव निर्माण केली आहे. जी घटना घडून गेली त्याबद्दल सारखे वेगवेगळे विचार येत होते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अनाम वीरा या कवितेच्या ओळीं ओठावर येत होत्या. लताबाईंनी आपल्या स्वरांनी अजरामर केलेलं हे शब्द आहेत. अशा शब्दांना खरंतर विविध वाद्यांची गरज नसतेच. व्हायोलिन, बासरी आणि संथ तबला असला तरी लताबाईंनी कवितेला पूर्ण न्याय दिला आहे. १९६३ मध्ये रेकॉर्ड केलेली कविता आजही डोळ्यात पाणी आणते. काल यु ट्यूबवर सतत लुपवर हेच ऐकत होतो. मनात रुंजी घालणारी ही कविता प्रत्येकाच्या ओठावर नव्हे तर श्लोक किंवा मंत्र असल्यासारखी मुखोद्गत असायला हवी तेव्हा आपले सैनिक आणि त्यांचे राष्ट्रासाठी असलेले बलिदान येणाऱ्या पिढीला कळणार आहे. 

भारतीय सैनिक म्हणजे शौर्य, निर्धार,अन निष्ठा यांचं मूर्तिमंत प्रतीक आहे. असीम आकाशापासून अथांग सागरापर्यंत आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवणारा भारतीय सैनिक आहे . देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून त्याचा सदैव जागता पहारा असतो असा आमचा भारतीय सैनिक आहे म्हणून आम्ही आपल्या घरात सुखाची झोप घेऊ शकतो. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारा कर्तव्यकठोर,निश्चयातही माणूसपणाची कोवळीक जपणारा असा आमचा भारतीय सैनिक आहे. भारतीय सैनिकाकडे दुर्दम्य आशावाद, प्रखर राष्ट्रनिष्ठा,असामान्य कर्तृत्व,उच्च मनोबल,अदम्य साहस हे गुण उपजतच आहेत. आपल्या उद्यासाठी आज देणारा हाच आमचा भारतीय सैनिक आहे.

खरंतर सैनिक ही एक वृत्ती आहे. त्यामागे शिस्त,निष्ठा,समर्पण आणि त्यागाचं अधिष्ठान आहे. म्हणूनच बर्फातील ४० डिग्री तापमान असो किंवा वाळवंटातील ५० डिग्री आमचा भारतीय सैनिक हा कार्यतत्परच आहे . दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर असो,शत्रूच्या समोर जाणं असो अथवा निसर्गाच्या तांडवात सर्वसामान्य जनतेचा देवदूत बनून मदतीला धावून जाणं असो आमचा सैनिक देशाच्या प्रत्येक संकटाला धाडसाने समोर जातो. प्रसिद्धी,आणि पैसा या प्रलोभनापासून दुर राहून सैनिक आपलं काम निस्पृह, निरपेक्षतेन, एकदिलाने आणि एकसुराने करत असतो. सैनिकाला मृत्यू प्रत्यक्ष दिसत असतानाही पुढे पाउल टाकणं यासारखं धैर्य नाही आणि या धैर्याला तो हसतमुखाने समोर जातो. ही त्यागाची परिसीमा गाठण्याचे प्रशिक्षण त्याला इथं येण्याआधीच मिळत असते.

सैनिक हा आपल्याच समाजातून सैन्यदलात प्रवेश करतो आणि या सैनिकांचे आपण देणं लागतो की नाही हा प्रश्न स्वतःला विचारण्याची आज नितांत आवश्यकता आहे. सर्व सीमांवर वादळवाऱ्यात, बर्फात,पावसात,सैनिक चोवीस तास कडक पहारा देत असतो. तुम्ही निश्चित रहा ,मी जागा आहे असे तो छातीठोकपणे सांगतो. सीमेपासून दूर असलेल्या शहरातील माणसं -आपल्या ठिकाणी आपलं घर,आपली गाडी,मुलं हाच भारत आणि हेच जग मानणारी माणसं आज बघायला मिळत आहेत. आज आपण कुणाच्या जीवावर स्वातंत्र्य उपभोगतो आहे ह्याचा विचार प्रत्येकाने करायचा आहे. आणि हीच वेळ आहे आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सैनिक हाच राष्ट्राचा आत्मा आहे हे सांगताना अभिमानच वाटला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने कार्यतत्पर राहण्याची अधिक गरज आहे.

सैन्यदलाबद्दल नितांत आदर,अभिमान,श्रद्धा,विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा,ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही,आपलं कर्तव्य आहे. आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. मातृभूमीचा ऋण फेडणारा सैनिक हाच खरा आयकॉन व्हावा हीच काळाची गरज आहे.  सैनिकांचा सन्मान करणे,त्याच्या कर्तृत्वाचा गौरव करणे आणि आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहे हा विश्वास त्यांच्याप्रति पोहोचविण्यासाठी आम्ही तत्पर आहे ही आपली जबाबदारी आहे आणि काल कविता ऐकत असतांना हे सगळे विचार मनात आले. भारतीय सैन्यातील हुतात्म्यांना, सैन्यदलातील आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या सर्व वीरपुत्र अन् वीरकन्यांना आणि त्यांच्या तलवारी आपल्या मानसिक आधारानं धारदार ठेवणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांना सादर नमन आहे. कमेन्ट बॉक्स मध्ये लिंक देतोय नक्की ऐका.. अनाम वीरा..

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !

✍️ सर्वेश फडणवीस

2 comments:

  1. खरोखर "तो" तिथे जागा असतो म्हणून आपण इथे निश्चिन्त होऊन निजतो..... वंदे मातरम।

    ReplyDelete
  2. देशासाठी मनात काय भाव, भावना असायला हव्या हे कळण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना काही किमान सैनिकी प्रशिक्षण सक्तीचे केले तर देशापुढे उभे ठाकणारे अनेक अनेक प्रश्न हे उपस्थितच होणार नाहीत. आपले मनोगत वाचल्यानंतर मनात डोकावलेला हा विचार ! खूप सुंदर शब्दांकन !

    ReplyDelete