Tuesday, August 18, 2020
परंपरा व ऐतिहासिक नागपूर नगरीचा ठेवा - मारबत !!
संवाद..
Saturday, August 15, 2020
योगी श्रीअरविंद !!
श्री. अरविंदांचे जीवन चरित्र म्हणजे या पृथ्वीतलावरील एका महर्षीचा एक अलौकिक असा जीवन प्रवास आहे. १८७२ ते १९५० असा एकूणातला ७८ वर्षांचा महायोगी श्री अरविंदांचा या भारत वर्षातील अस्तित्वाचा कालखंड म्हणजे सर्वोच्च ईश्वरी शक्तीची एक निर्णायक कृती होती. जीवनाच्या सर्वस्पर्शी अनुभवांना सामोरे जात परमेश्वरी चैतन्याच्या अत्युच्च अशा बिंदूपर्यंत महायोगी श्री अरविंद स्वसाधनेच्या माध्यमातून पोहोचले होते.
क्रांतिकारक ते योगी या अतिशय विलक्षण अशा जीवन प्रवासात योगी श्री. अरविंद पावलापावलावर नुसतेच एक महामानव म्हणून पुढे आले नाहीत तर अखिल जगतासाठी एक विलक्षण असे अवतारी व्यक्तिमत्त्व म्हणून दृग्गोचर होऊन बसले आहे.भारताच्या तत्कालीन स्वातंत्र्य चळवळीला अध्यात्माचे अधिष्ठान देऊन भगवंत साधनेबरोबरच राष्ट्रतेजाची उपासना करण्याचा संदेश त्यांनी भारतवासीयांच्या पुढ्यात मांडला.त्याच बरोबर माणसामधील दिव्यत्वाला जागृत करून मानव प्रकृतीचे समग्र दिव्यतेमध्ये रूपांतर करणे व सर्वसामान्य माणसात सुप्तावस्थेत असलेल्या असीम अशा परमेश्वरी चेतनेला साधनेद्वारे पृथ्वीतलावर आणून सगळीकडे दिव्यत्व प्रस्थापित करणे हा उद्देश श्री.अरविंदांनी बाळगला होता.
डॉ.कृष्णधन घोष आणि स्वर्णलता देवी यांच्या पोटी जन्माला आलेले तिसरे अपत्य म्हणजे योगी श्रीअरविंद . त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटे या ब्राह्म मुहूर्तावर कलकत्ता येथे झाला . त्यांना तीन भाऊ- विनयभूषण,मनमोहन,व बारींद्र आणि एक बहीण - सरोजिनी असे हे सारे कुटुंब होते. श्रीअरविंदांना वयाच्या ५ व्या वर्षी दार्जिलिंग येथील लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या ७ व्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. श्रीअरविंद कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले असे होते. १४ वर्ष इंग्लंड मध्ये वास्तव्य करून ६ फेब्रुवारी १८९२ रोजी श्रीअरविंदांनी भारतीय भूमीवर,मुंबईच्या अपोलो बंदरावर पाऊल टाकताक्षणी एका प्रगाढ शांतीने त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला.हा अनुभव त्यांच्या जीवन कार्याला कलाटणी देणारा ठरला.
श्रीअरविंदांचे तत्वज्ञान समन्वयवादी आहे. ते जगाला मिथ्या , असार मानत नाहीत. त्यामुळे त्यातील भौतिकता,विज्ञानाची प्रगती ते नाकारत नाहीत. मुक्तीची अवस्था प्राप्त केल्यानंतर मग योगी दिव्य कर्म करीत राहून प्रकृतीला साहाय्य करू शकतो असे ते म्हणतात. या साठी त्यांनी जो मार्ग सांगितला त्याला "पूर्णयोग"असे नाव आहे. ज्ञान,कर्म, भक्ती यांचा समन्वय त्यात अभिप्रेत आहे . ईश्वराला संपूर्ण समर्पित होणे आणि आपण स्वतः त्या ईश्वराचे परिपूर्ण माध्यम होणे यावर त्यांचा भर आहे .
श्रीअरविंदांचे "सावित्री "हे महाकाव्य अजरामर आणि वाचनीय असे आहे . लोकशाही, स्वातंत्र्य आणि अध्यात्माचा विकास यांचे रक्षण करण्यासाठी श्रीअरविंदांनी इंग्लंड,अमेरिका,फ़्रान्स या मित्र राष्ट्रांच्या प्रयत्नांना यौगिक सक्रिय पाठिंबा दिला . श्री.योगी अरविंदांनी भारताविषयी केलेले भाकित आज खरे होताना दिसत आहेत. ते भारताविषयी लिहितात,
“ India of the ages is not dead..has to do something for herself and for the world ”
प्राचीन युगांचा हा भारत मृत झालेला नाही. स्वतः करिता व विश्वाकरिता तो काहीतरी ( भले ) करणार आहे.
The sun of India would rise..overflow the World.(speeches of Shri Aurobindo)
भारताचा सूर्य उगवेल व सर्व जगाला प्रकाशाने भारुन टाकेल हे त्यांचे उद्गार महत्त्वाचे वाटतात.
आज पहिल्यांदा ७३ वर्षात लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतांना पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी ह्यांनी आपल्या उद्बोधनाच्या सुरुवातीला योगी अरविंद ह्यांचा उल्लेख केला आणि त्याचवेळी कुठेतरी वाटलं की योगी अरविंद यांनी केलेलं भाकीत खरं होण्याची हीच तर वेळ नसेल..आज राष्ट्रीय नेतृत्वाची जी वर्धिष्णू वाटचाल सुरू आहे त्याने विश्वास आहेच की भारताचा सूर्य आपल्या प्रकाशाने संपूर्ण जगाला व्यापून टाकेल आणि तो दिवस आता जास्त दूर नक्कीच नाही.
✍️ सर्वेश फडणवीस
#१५ऑगस्ट #स्वातंत्र्य_दिन #योगी_अरविंद_जन्मदिवस
Thursday, August 13, 2020
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर
Wednesday, August 12, 2020
आधुनिक भारताचे शिलेदार - डॉ. विक्रम अंबालाल साराभाई
आधुनिक भारताचे शिलेदार
विक्रम अंबालाल साराभाई
१२ ऑगस्ट १९१९ - ३० डिसेंबर १९७१
जन्मस्थान-अहमदाबाद (गुजरात)
भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार
विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ ला अहमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात झाला. त्यांचे वडील हे एक उद्योगपती होते. त्यांचे बर्याच राजकीय व्यक्तींशी संबध असल्याने रवींद्रनाथ टागोर,जवाहरलाल नेहरू,महात्मा गांधी ह्यांसारखी मातब्बर मंडळी त्यांच्या घरी येत असे आणि पुढे शिक्षण घेत असताना डॉ.विक्रम साराभाईं ह्यांना रवींद्रनाथ टागोरांनी तर अगदी जवळून मदत केली,सूचना दिल्या,मार्गदर्शन केलं आहे.
विक्रम साराभाई यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची मॉन्टेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच विक्रम साराभाईंचे शिक्षण युरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे झाले. विक्रम साराभाई ह्यांना लहानपणापासुनच गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांची त्यांना आवड होती.आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटोपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी बंगलोर मधील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही.रामन ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. १९४७ साली दुसरं महायुद्ध संपलं आणि ते पुन्हा ब्रिटनमध्ये गेले. तिथे त्यांनी कॉस्मिक रे इनव्हेस्टिगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली.
ब्रिटनमधून परतल्यानंतर डॉ.विक्रम साराभाई यांनी ११ नोव्हेंबर १९४७ रोजी फिझिकल रिसर्च लॅबची स्थापना केली. इथूनच त्यांनी खगोलशास्त्र, भौतिकशास्त्रातील संशोधनाची पायाभरणी करण्यास सुरुवात केली. आज अवकाश क्षेत्रात भारत उंच भरारी घेत असताना,ज्या संस्था हे यश मिळवत आहेत त्यातील अग्रगण्य भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राची पायाभरणी करण्यास डॉ. विक्रम साराभाई यांनी १९५० च्या दशकातच सुरुवात केली होती.
२१ नोव्हेंबर १९६५ हा दिवस भारताच्या अवकाश संशोधनातील अत्यंत सुवर्ण दिवस आहे कारण याच दिवशी डॉ.विक्रम साराभाई यांच्या अथक प्रयत्नातून भारताने पहिलं रॉकेट लाँच केलं. केरळ मधील थुंबा येथे लाँचपॅड निश्चित करण्यात आलं होतं. तिथेही अनेक लहान-मोठ्या अडथळ्यांना डॉ. साराभाईंना सामोरं जावं लागलं. मात्र या सगळ्यावर मात करत रॉकेटचं प्रक्षेपण करण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की, संयुक्त राष्ट्र संघाने पुढे या केंद्राला आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. पुढे भारताने या केंद्राला डॉ. विक्रम साराभाई यांचंच नाव दिलं. आज हे केंद्र 'डॉ.विक्रम साराभाई स्पेस सेंटर' म्हणून ओळखलं जातं. तिथे त्यांच्या पुतळ्याखाली त्यांचा एक विचार कोरण्यात आला आहे -
"आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण माणूस आणि समाजाचे खरे प्रश्न सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत."
नुकताच मागच्या वर्षी चंद्रयान २ मोहीम झाली. भारताच्या 'चांद्रयान-२' मोहिमेत 'विक्रम' या मून लँडरशी इस्रोचा अगदी शेवटच्या क्षणी संपर्क तुटला. या लँडरला 'विक्रम' हे नाव भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावरून देण्यात आले होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ची मुहूर्तमेढ डॉ. विक्रम साराभाई यांनी रोवली होती म्हणूनच त्यांना 'भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार' असंही म्हटलं जातं. ATIRA ची स्थापना करून भारतातील वस्त्रोद्योगाचा पाया डॉ. साराभाईंनी रचला ECIL,UCIL यांसारख्या संस्थांसह IIM-अहमदाबादची स्थापना सुद्धा डॉ. विक्रम साराभाई यांनीच केली. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आज डॉ. विक्रम साराभाई ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होते आहे. डॉ.विक्रम साराभाईंचा प्रवास हा आम्हाला प्रेरणा देणारा असाच आहे. येणाऱ्या १५ ऑगस्ट पर्यन्त असेच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व जे आधुनिक भारताचे शिलेदार आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊया. डॉ. विक्रम साराभाई छान लिहितात," He who can listen to music in the midst of noise can achieve great thing."
✍️ सर्वेश फडणवीस
#Builderes #ModernIndia
Tuesday, August 11, 2020
युगंधर !!
Tuesday, August 4, 2020
भारतीयांच्या अस्मितेचा सुवर्णक्षण - श्रीरामजन्मभूमी 🚩🚩
Monday, August 3, 2020
बखर अयोध्येची !!
बखर अयोध्येची !!
राम मंदिर - भारताच्या इतिहासातील सातवे सोनेरी पान..
काही पुस्तकं अशी असतात की एकदा हातात घेतली की पूर्ण संपवल्याशिवाय बाजूला ठेवताच येत नाही. असंच एक पुस्तक नुकतंच वाचून काढले भारतीय विचार साधना पुणे प्रकाशित डॉ. गिरीश आफळे लिखित " बखर अयोध्येची " !! ह्या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतच स्वातंत्र्यवीर सावरकर हयात असते तर त्यांनी इतिहासातील सातवे सोनेरी पान असाच उल्लेख केला असता अशी नोंद आहे.
आज इतिहासात सर्वात दीर्घ दिलेल्या लढ्याचे नाव सांगायचे झाले तर ते आहे रामजन्मभूमी आंदोलन आहे. आज राम जन्मभूमी आंदोलन यशस्वी झाले आहे त्यासाठी हजारो राम भक्तांचे बलिदान सार्थकी लागले. ५०० वर्षाच्या ऐतिहासिक लढ्यानंतर आता ५ ऑगस्टला मंदिराचे भूमिपूजन होऊन बांधकाम सुरू होईल येणाऱ्या काही वर्षात भव्य मंदिर पूर्णही होईल पण त्याचा इतिहास आणि त्या आंदोलनास समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचून संग्रही ठेवले पाहिजे कारण ह्याचा इतिहास येणाऱ्या पिढीला माहीत करून देण्याचे दायित्व आपल्यावर आहे आणि आपणच हा ऐतिहासिक इतिहास जतन करून ठेवलाच पाहिजे कारण आपण खरतरं भाग्यवान आहोत की हे आपल्याला 'याची देही याची डोळा' हे अनुभवता येणार आहे.
ह्या पुस्तकातील जो घटनाक्रम वाचला तो सर्वश्रुत आहेच ६ डिसेंबर १९९२ ला ती वादग्रस्त वास्तू पाडून कार सेवकांनी ओट्यावर रामलला विराजमान केले आणि तब्बल २८ वर्षांनी मा.सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय देऊन भव्य राम मंदिराचा मार्ग मोकळा केला आहे. या आंदोलन संदर्भातील संपूर्ण माहिती बखर अयोध्येची या पुस्तकात दिली आहे. ह्यातील माहितीचा खजिना शब्दातीत आहे. पुरातत्व खात्याने या ठिकाणी केलेले सर्व फोटो या पुस्तकात आहेत. वैदिक परंपरेपासून सुरू झालेल्या अयोध्येचे वर्णन ह्या पुस्तकात संदर्भासहित मांडले आहे. येणाऱ्या नव्या पिढीला रामजन्मभूमी आंदोलनाचा इतिहास समजून घेण्यासाठी सर्वात योग्य व संग्रही असावे असे हे पुस्तक आहे. बाबर सेनापती मिर बाकी याने रामजन्म भूमी मंदिर पडले तिथपासून ते ६ डिसेंबर १९९२ व त्यापुढील इतिहास ह्यात मांडलेला आहे.
पुस्तकात पूर्वकाळा पासून श्रीराम जन्मभूमी अयोध्येत एकूण ७९ लढायांचे दाखले दिले आहेत. आणि प्रत्येक वेळेस हिंदूंनी अतिशय कडवा संघर्ष कसा केला आहे याचे वर्णन केले आहे. १ फेब्रुवारी १९८६ रोजी प्रभू श्री रामचंद्रांची बंदिवासातून मुक्तता, राष्ट्रमंदिराचा शिलान्यास, अडवाणींनी संपूर्ण देशांत काढलेली रथयात्रा या प्रकरणांचे वर्णन खूपच मंत्रमुग्ध करणारे आहे. विश्व हिंदू परिषदेने उभारलेले देशव्यापी आंदोलन, साधू, संत महंत यांचे मोलाचे योगदान यात संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन कसे झाले ? आणि दोन्ही कारसेवा कश्या पार पडल्या यांची अगदी अचूक क्रमशः मांडणी केली आहे. मुस्लिम हवालदाराने सांगितलेला अनुभव, कोठारी बंधूंची निर्दयी हत्या असे एक ना एक प्रसंग वाचताना भावूक होत आज ज्यावेळी भव्य मंदिराचा शिलान्यास होतांना जे भावनिक समाधान होतं ते अतिशय आनंद देणारे आहे.
आपण सहजतेनं म्हणत होतो भव्य मंदिर निर्माण व्हावे पण ह्या मंदिरासाठी ज्यांचे बलिदान झाले त्यांचे स्मरण करणे हीच आपली प्राथमिकता असायला हवी. कारण हे फक्त मंदिर नाही तर अखिल भारतीय मानवाच्या परवलीचा शब्द आहे राम आणि त्याचे जन्मभूमीवर असलेले मंदीर. ह्याचा रक्तरंजित इतिहास आपण जाणून आहोतच. आजवर अनेक लढाया ह्या परकीयांशी झाल्या पण ही लढाई स्वकीयांशी झाली आणि आज त्याच ठिकाणी आता भव्य राम मंदिर निर्माण होणार आहे. ५ ऑगस्टला तो सुदिन प्रत्येकासाठी सुवर्णक्षण असणार आहे. छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या वर्णनासारखेच काहीसे हे भूमिपूजन ऐतिहासिक असणार आणि ह्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे साक्षीदार आपण होणार आहोत. श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी आजवर झालेल्या आंदोलनाची यशोगाथा येणाऱ्या पिढीला सांगण्यासाठी प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे हे पुस्तक.. " बखर अयोध्येची "
बखर अयोध्येची
प्रकाशन- भारतीय विचार साधना पुणे
मूल्य - ₹ २००
✍️ सर्वेश फडणवीस
Saturday, August 1, 2020
लोकमान्यांचा गणेशोत्सव !
संत सानिध्यातील लोकमान्य !!
लोकमान्यांची देशभक्ती, त्यांचे कार्य याविषयी सर्वांना माहिती आहेच. महाराष्ट्रातील सह्याद्रीचा आवाज,भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा कणा,भारतीय असंतोषाचा जनक,अशी कितीतरी गौरवपूर्ण बिरुदे त्यांना प्राप्त झाली आहेत. पण संतांच्या सानिध्यात असतांना संत श्री दासगणू महाराजांनी श्रीगजानन विजय ग्रंथांत लोकमान्य टिळकांचं मोठ्या प्रेमाने वर्णन केले आहे. ते लिहितात,
टिळक बाळ गंगाधर। महाराष्ट्राचा कोहिनूर।
दूरदृष्टिचा सागर। राजकारणी प्रवीण जो॥
निज स्वातंत्र्यासाठी। ज्याने केल्या अनंत खटपटी।
ज्याची धडाडी असे मोठी। काय वर्णन तिचे करू? ॥
करारी भीष्मासमान। आर्य महीचे पाहून दैन्य।
सतीचे झाला घेता वाण। भीड न सत्यात कोणाची॥
वाक्चातुर्य जयाचे। बृहस्पतीच्या समान साचे।
धाबे दणाणे इंग्रजांचे। पाहून ज्याच्या लेखाला॥
कृति करून मेळविली। ज्याने लोकमान्य ही पदवी भली।
ती न त्यांना कोणी दिली। ऐसा होता बहाद्दर॥
-श्री गजानन विजय ग्रंथ अ-१५ (१०-१४)
मुळात लोकमान्यांची वृत्ती-प्रवृत्तीही अध्यात्मनिष्ठ होती. १९४५ मध्ये श्री. महादेव धोंडो विद्वांस यांनी ‘लोकमान्यांचे आध्यात्मिक जीवन’, ही एक पुस्तिकाच लिहिली होती. ती वाचनीय आणि संस्मरणीय आहे. त्याचबरोबर लोकमान्यांनी स्वत: लिहिलेली गीतारहस्याची प्रस्तावनाही अत्यंत बोलकी आहे. लोकमान्य लिहितात- ‘‘प्रस्तावना संपली. आता ज्या विषयाच्या विचारात आजपर्यंत पुष्कळ वर्षे घालविली व ज्याच्या नित्य सहवासाने व चिंतनाने मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला, तो हा विषय…... ‘उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्य वरान्निबोधत!’ उठा, जागे व्हा आणि (भगवंतांनी दिलेले) हे वर समजून घ्या. यातच कर्म-अकर्माचे सर्व बीज आहे. या धर्माचे स्वल्पाचरणही मोठ्या संकटातून सोडविते, असे (खुद्द भगवंताचेच) निश्चयपूर्वक आश्वासन आहे.’’ लोकमान्यांच्या जीवनात अनेक प्रसंग दिसून येतात ज्यावेळी ते संतांच्या सहवासात गेलेले आहेत. यातीलच पहिला प्रसंग हा सर्वश्रुत आहेच. श्री गजानन विजयग्रंथ वाचनात असणाऱ्या प्रत्येकाला तो मुखोद्गत आहे.
टिळक आणि श्री संत गजानन महाराज ह्यांच्या भेटीचा प्रसंग.
लोकमान्य टिळकांच्या अकोल्यातल्या एका सभेला श्रीगजानन महाराज उपस्थित होते, तारीख होती ४ मे १९०८,तिथी अक्षयतृतीया निमित्त होते शिवजयंतीच्या उत्सवाचे..!
आपल्या भाषणाची सुरुवात करतांना टिळक म्हणाले....
"आजचा हा प्रचंड जनसमूह पाहून मला आनंद होत आहे. याप्रसंगी आपल्या प्रांतातील सिद्धपुरुषाचे या ठिकाणी आगमन होऊन त्यांचा अनुग्रह व्हावा हे खरोखर सुदैव होय. असा प्रसंग शिवाजी उत्सवाला यापूर्वी कधीही आला नव्हता. महाराजांना आपण आमंत्रण करून हा अपूर्व योग आपण घडवून आणला याबद्दल मी आपला फार आभारी आहे. श्रीगजाननमहाराजांची परंपरा श्रीशिवगुरु श्रीरामदासस्वामींपासून आहे हे आपणास माहीत आहेच. या उत्सव प्रसंगी यांनी हजर राहावयाचे मनात आणून व आपल्या विनंतीस मान देऊन येथे आगमन केले आहे. येथे येण्याचे त्यांनी मनात आणले,त्यामुळे आपल्या कार्याला यश येईल,अशी सद्बुद्धी माझ्या मनात उत्पन्न झाली आहे. कोणत्याही कार्यास परमेश्वराचा अनुग्रह पाहिजे व त्याचे चिन्ह आजचे महाराजांचे आगमन होय..या ठिकाणी येण्याची त्यांना बुद्धी व्हावी ,आमची वेडीवाकडी कृत्ये त्यांनी अवलोकन करावी व त्या कार्यांना त्यांचे पाठबळ मिळावे,यावरून हा दैवी योग आहे अशी माझी समजूत झाली आहे....या वेळेस माझ्या मनोवृत्ती इतक्या उचंबळल्या आहेत, विचार इतके प्रगल्भ झाले आहेत की त्यांचे स्पष्टीकरण करणे अशक्य झाले आहे. यासाठी त्यांनी आज जो अनुग्रह केला त्याबद्दल त्यांचे उपकार मानून व आमच्या चळवळीवर अशीच कृपादृष्टी ठेवावी ही त्यांस प्रार्थना करून व्याख्यानास आरंभ करतो."
यानंतर काहीच महिन्यात टिळकांना अटक झाली आणि मंडालेच्या कारागृहात पाठवले गेले, मंडलेला जाण्यापूर्वी गजानन महाराजांनी टिळकांना भाकरीचा प्रसाद पाठवला होता, महाराज म्हणाले होते,
सज्जनांसी त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना ।।
कंसाचा तो मनी आणा । इतिहास म्हणजे कळेल ।।
या भाकरीच्या बळावरी । तो करील मोठी कामगिरी ।।
जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ।।
-श्री गजानन विजय ग्रंथ - अ.१५(८७-८९)
टिळकांनी तो प्रसाद स्वानंद ग्रहण केला, पुढे मंडालेच्या कारागृहात अवघ्या चार पाच महिन्यात टिळकांनी साडेपाचशे ते सहाशे पानाचे गीतारहस्य लिहून काढले. श्रीगजानन महाराजांचे शब्द खरे ठरले.
टिळक आणि श्री साईबाबा भेट ..
स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या वेगाने देशभर पसरत होती.लोकमान्यांचे नेतृत्व देशमान्य झाले होते. गणेश श्रीकृष्ण उर्फ दादासाहेब खापर्डे हे टिळकांचे स्नेही म्हणून परिचित होते. त्यांनी टिळकांना शिर्डीत जाण्याबद्दल सुचवले होते. खापर्डेंसह टिळक अमरावतीहून संगमनेरला आले. हे खापर्डे विद्वान वकील होते. व्यासंगी,प्रखर देशभक्त होते. फर्डे वक्ते, त्यांची अनेक भाषणे इंग्लडमध्ये गाजली होती. त्यांचा परिचय साईबाबा, गजाननमहाराज यांच्या सोबत होता. दादासाहेब यांना रोजनिशी लिहिण्याची सवय होती. १८९४ ते १९३८ या कालावधीतील नोंदी आजही उपलब्ध आहेत
खापर्डे आपल्या डायरीत लिहितात की, सकाळी ८.३० वाजता वकील संत यांच्या घरी पानसुपारी झाल्यावर आम्ही निघालो. सकाळी दहा वाजता शिर्डीत पोहचलो. तेथे निवासाची व्यवस्था दीक्षित वाड्यात करण्यात आली होती. त्यावेळी तिथे माधवराव देशपांडे, बापूसाहेब बुट्टी,नारायण पंडित,बाळासाहेब भाटे, बापूसाहेब जोग व इतर नोकर उपस्थित होते. सर्वजण मशिदीत गेल्यानंतर तेथे साईबाबांना वंदन केले. बाबांना दक्षिणा दिली. सर्वांनी येवल्याला पुढील कामासाठी जाण्याची परवानगी मागितली. त्यावर बाबा म्हणाले, वाटेत उष्म्याने मरायला जावेसे वाटते का? इथे तुम्ही तुमचे जेवण करा.त्यानंतर वातावरणात गारवा वाटू लागल्यानंतर निघा. बाबांच्या आदेशानंतर माधवराव देशपांडे यांच्या घरी जेवण केले. विश्रांती घेऊन मशिदीत गेलो.
बाबा पहुडले होते. ते झोपले असे वाटले. लोकांनी लोकमान्यांना पानसुपारी दिली. मग परत मशिदीत गेलो. बाबांनी उदी दिली. निघण्याची अनुमती दिली. त्यानुसार पुढील प्रवास सुरू केल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी बाबा आणि लोकमान्य यांच्या सत्कारात उपयोगात आणलेली शाल शामा यांच्याकडे देण्यात आली. ती शाल पुढच्या पिढीने संगमनेर येथील साईबाबा मंदिराकडे प्रदान केली. संगमनेर येथे इंगळेबाबा यांनी अत्यंत श्रध्देने तिची जपणूक केली आहे. दरवर्षी गुरूपौर्णिमेला तिची अत्यंत श्रध्देने पूजा करण्यात येते.
या भेटी दरम्यान लोकमान्य आणि साईबाबा यांच्यात संवाद झाला आहे. त्या संवादाचा काही भाग खापर्डे यांनी डायरीत नमूद केला आहे. या भेटीत साईबाबा लोकमान्यांना म्हणाले की, लोक वाईट आहे, तुम्ही तुम्हाला तुमच्यासारखे ठेवा. तर येवल्याला जाण्याची परवानगी मागितली असता ती न देता जेवण करून जाण्याची आज्ञा केली. खरंतर खापर्डे हे बाबांच्या सहवासात अऩेक दिवस होते. ते लिहितात,बाबा आज या भेटीच्या वेळी जितके प्रसन्न होते तितके प्रसन्न त्यांना यापूर्वी कधीच पाहिले नाही. ही प्रसन्नता म्हणजे दोन महापुरूषांच्या तेजाचे प्रतिबिंब होते जणू.
टिळक आणि स्वामी विवेकानंद भेटीचा प्रसंग ..
स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळक यांची भेट पुण्यातील सदाशिव पेठेत असलेल्या विंचूरकर वाड्यात झाली. ( याच वाड्यात गणेशोत्सवाच्या प्रसंगी टिळकांनी केलेले भाषण प्रसिद्ध आहे). या वाड्यात आजही भेटीसंदर्भातील फोटो बघायला मिळतात. शिकागोच्या विश्वविख्यात व्याख्यानापूर्वीच लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंदांची भेट झाली होती. एप्रिल ते सप्टेंबर १८५२ दरम्यान महाराष्ट्रात प्रवासात असलेल्या विवेकानंदानी पुण्यात टिळकांच्या घरी आठ ते दहा दिवस मुक्काम केल्याचा संदर्भ आढळून येतो. त्यांची अखेरची भेट १९०१ मध्ये कोलकाता येथे झाली होती. टिळकांनी आपल्या मित्रांसह बेलूर मठाला भेट दिली होती व स्वामी विवेकानंदांशी वार्तालाप केला होता. दरम्यानच्या काळात टिळक आणि विवेकानंद यांचा संवाद पत्रव्यवहाराने झाल्याचे संदर्भ आहेत. विवेकानंदांच्या कार्यांना ‘केसरी’मध्ये अतिशय ठळकपणे स्थान मिळत असे, कारण टिळकांना त्यांच्या कार्याविषयी नितांत आदर होता. या महात्म्यांना जोडणारा अजून महत्त्वपूर्ण दुवा होता, तो म्हणजे भगवद्गीतेतील ‘कर्मयोग’ या कालखंडातील स्वातंत्र्य चळवळ गीतेच्या तत्त्वज्ञानाने भारावलेली होती.
टिळक आणि श्री अण्णासाहेब पटवर्धन भेट..
लोकमान्य टिळक व अण्णासाहेब पटवर्धन यांचा संबंध तर लोकविश्रुतच आहे. श्री अप्रबुद्ध ब्रह्मर्षी श्री अण्णासाहबे पटवर्धन ह्यांच्या चरित्रात लिहितात, लोकमान्य हे मूळचे रानड्यांच्या तालमीतले. परंतु रानड्यांसारख्या शांतिब्रह्माच्या सहवासात त्यांच्या आंगच्या 'वीरो रस: किमयमेत्युत दर्प एवं' अशा क्षात्रवृत्तीला नीट वाव मिळेना व लौकरच रानड्यांच्याविषयी मनात अतिशय आदर असूनही त्यांना रानड्यांना सोडचिठ्ठी द्यावी लागली. मद्रासेस जाण्यापूर्वी डेक्कनस्टार व किरण यांचे रूपांतर मराठा व केसरी यांच्यात केल्यावर नामजोशी व टिळक यांचा विशेष संबंध आला. हाच अण्णासाहेब व टिळक यांच्या संबंधातील मधला दुवा आहे. अण्णासाहेब हे जवळ जवळ टिळकांच्या अखेरपर्यंत होते आणि सर्व महत्त्वाच्या बाबतीत त्यांचा सल्लाही घेतला जात असे. धैर्य, साहस, विलक्षण चिकाटी, प्रखर स्वाभिमान वगैरे दोघांच्याही आंगच्या गुणसाधर्म्यामुळे अण्णासाहेब यांचा टिळकांवर फार लोभ जडला. व उत्तरोत्तर तो वाढतच गेला. टिळकांच्या मनातही अण्णासाहेब यांच्याविषयी पराकाष्ठेचा आदर होता. किंबहुना राष्ट्रपुरुष या नात्याने अण्णासाहेब यांची योग्यता केवढी मोठी होती याची जाणीव असणारा पुण्यांत तेवढाच एक पुरुष होता. सर्व त-हेच्या अनुभवांच्या भट्टीतून बाहेर पडलेल्या अण्णासाहेब यांच्या धार्मिक सामाजिक वगैरे मतांचे व टिळकांचे पटणे अर्थातच शक्य नव्हते परंतु त्यामुळे त्यांच्या लोभात कधीच अंतर आले नाही. दोघांचा संबंध अतिशय जिव्हाळ्याचा होता व टिळकांच्या सर्व प्रयत्नांस त्यांची सहानुभूती असे. लखनौ काँग्रेसच्या वेळेस टिळकांचा जयजयकार ऐकून अण्णासाहेब यांस झालेला आनंद ज्यांनी आळंदीस पाहिला त्यांनी तर शिवरायाकरिता तुझा तू वाढवी राजा म्हणून तुळजा भवानीची करुणा भाकिल्यावर आनंदवनभुवन
पाहणाऱ्या श्रीसमर्थांची आठवण झाल्यावाचून राहिली नसेल. लोकमान्य मंडालेहून आले त्यावेळी त्यांना कसा आनंद झाला ते वर्णनाच्या पलीकडचे आहे. अण्णासाहेब पटवर्धन नेहमी लोकमान्यांविषयी वडील माणसांनी होतकरू अशा गुणी मुलाचे कौतुक करावे त्याप्रमाणे अरे तुरे असा प्रयोग करून आनंदाने बोलत असता त्यांचा लोभ व्यक्त होई आणि लोकमान्यही तशाच जिव्हाळ्याने त्यांच्याशी वागत. टिळक मंडालेहून आल्यावर प्रायश्चित्त वगैरे घेऊन देवदर्शनास गेले असता प्रथमतः श्रीगणपती आणि अण्णासाहेब यांचे दर्शन घेऊन त्यांनी आपल्या व्यवहारास सुरुवात केली हे लक्षात ठेवण्याजोगे आहे.
मुळात टिळक ही संत सहवासात आल्याने त्यांच्या वृत्तीत कमालीची सुसूत्रता जाणवते. लोकमान्य मंडालेला तुरुंगात असतांना त्यांच्यासोबत खानसामा म्हणून वासुदेव कुलकर्णी होते. वासुदेवांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते लिहितात, मंडालेत टिळकांना ठेवले होते ती खोली दोन मजली होती. मंडालेत टिळक सकाळी लवकर उठत. संस्कृत श्लोक म्हटल्यानंतर सुमारे दीड तास टिळक ध्यानस्थ बसत. त्यानंतर नित्यकर्म आटोपून जेवणानंतर ते लेखन- वाचनात गढून जात. वासुदेव कुलकर्णी आपल्या आठवणीत लिहितात, “टिळक महाराजांनी कधी एक पळही आळसात वाया घालवल्याचे मी पाहिले नाही. ते आपल्या लिहिण्या-वाचण्यात इतके गुंग होत की, त्यांच्याकडे जाऊन काही बोलू लागलो तरी त्यांचे लक्ष जात नसे.” मंडालेत संध्याकाळचे जेवण ५ वाजता होई. त्यानंतर संध्याकाळी ६ ते सकाळी ६ तुरुंगातील खोल्या बंद केल्या जात. संध्याकाळी वरच्या माडीवर टिळक कुलकर्ण्यांना तुकाराम,ज्ञानोबा, एकनाथ,रामदासस्वामी,श्रीकृष्ण,राम,शिवाजी महाराज,कौरव-पांडव यांच्या गोष्टी सांगत. कधी दासबोध समजावून सांगत. कधी पेशवाई, तर कधी इंग्रजांच्या गोष्टी सांगत. मंडालेच्या तुरुंगात जगाचा एक नकाशा टिळकांनी सोबत ठेवला होता, तोही ते कधीतरी कुलकर्ण्यांना समजावून सांगत असत.
स्वातंत्र्यासाठी लोकमान्यांनी केलेले प्रयत्न हे अतुलनीय होते हे खरेच पण तो त्यांचा लौकिक कार्याचा भाग होता. गीताशास्त्र पारलौकिकाकडे,ज्ञानमय जीवनमुक्ती किंवा मोक्षप्रत नेणारे,धर्माची आणि समाजाची विस्कळीत होणारी घडी वारंवार ठीकठाक करण्याचे कार्य निरंतर करीत राहणारे लोकमान्य असल्याने दासगणू महाराज श्री.गजानन विजय ग्रंथात म्हणतात,
यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर ।
चिरंजीव निरंतर । राहील कीर्तीरूपाने ।।
संदर्भ ग्रंथ - श्री गजानन विजय ग्रंथ - दासगणू महाराज
दादासाहेब खापर्डे रोजनिशी
ब्रह्मर्षी श्री अण्णासाहेब पटवर्धन चरित्र- अप्रबुद्ध
लोकमान्य टिळक चरित्र- धनंजय कीर
✍️ सर्वेश फडणवीस