Sunday, May 12, 2024
◆ आचार्य शंकर !! 🚩
Friday, May 3, 2024
सहवासाच्या चांदण्यात 🌠
चांदण्याचा सहवास कुणालाही हवाहवासा वाटतो. पण साहित्याच्या सहवासात हे चांदणं अधिक आशादायक, दिलासादायक, आनंदी आणि स्वच्छंदी असतं यात शंकाच नाही. मध्यंतरी एका छान पुस्तकाच्या प्रवासाचा भाग होता आले ही नक्कीच पूर्वपुण्याई असावी असे वाटते. विजयाताई राम शेवाळकर यांच्याशी रेखा चवरे यांनी साधलेला हा संवाद नुकताच २ मार्चला शेवाळकरांच्या अंगणात दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अनेक दिवसांपासून यावर लिहायचे मनात होते. पण आजचा दिवस राखून ठेवला होता. पुस्तक प्रकाशनापूर्वी रेखा ताईंनी वाचायला पाठवले आणि एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण झाले. ८४ पानांच्या या पुस्तकातून विद्यावाचस्पती वक्तादशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे पुस्तक. राम आणि विजया शेवाळकर यांच्या आठवणींची वाक्गंगा म्हणजे हे पुस्तक आहे. रेखा चवरे यांच्या इच्छेला त्वरित होकार देणाऱ्या विजयाताई आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत आता अजरामर झालेली ही कलाकृती जन्माला आली.
काही योगायोग हे नियतीने लिहिलेले असतात कारण आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिवस आणि बरोबर त्याच्याच एक दिवस आधी अर्थात काल २ मे ला विजयाताई शेवाळकर यांनी या जगाचा निरोप घेतला. नानासाहेबांबरोबर प्रत्येक क्षण अनुभवलेल्या, सुखदुःखात नव्हे तर प्रत्येक क्षणी सावली सारखी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी असणाऱ्या विजयाताई साहित्याच्या सहवासाच्या चांदण्यात विलीन झाल्या असल्या तरी या पुस्तकातून आणि आठवणीच्या चांदण्यात कायमच स्मरणात राहणाऱ्या आहेत.
अत्यंत देखणे मुखपृष्ठ हे देखील या पुस्तकाचे वेगळेपण आहे. राम शेवाळकर आणि विजया शेवाळकर यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्यावेळी काढलेले हे छायाचित्र आहे. single picture speaks more than a thousand words. This one picture tells its own story. असं म्हंटल तर प्रत्येकाने अनुभवलेले आणि प्रत्येकाला भावलेले असे हे दोघे मुखपृष्ठ बघितल्याक्षणी जाणवतील. खरंतर विजयाताईंना बोलतं करण्याचे फार मोठे काम रेखा चवरे यांनी केले आहे. साहित्याच्या हिमालयात राहणाऱ्या विजयाताई पण त्यांनी सावलीसारखी साथ राम शेवाळकर यांना दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली. यांच्या संपर्कातील अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. मुलाखत संग्रहातून विजयाताईंनी मोकळेपणाने आणि आपुलकीने आपल्या संसारातील अनेक चांगल्या गोष्टींचा खजिना वाचकांसाठी यानिमित्ताने रिता केला आहे.
पुस्तक वाचतांना तुमच्या माझ्या अनेकांच्या घरातीलच हे प्रसंग असतील इतके ते सजीव आणि सुंदर आहे पण साहित्याच्या वटवृक्षात त्या कशा बहरत गेल्या आणि अधिक समृद्ध होत गेल्या यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे. आदरातिथ्य करण्यात या दांपत्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. जे मिळेल ते स्वीकारण्याची यांची वृत्ती प्रत्येकाला अनुकरणीय आहे. पुस्तकातून नानासाहेबांचे जसे विविध पैलू वाचायला मिळतात तसे विजयाताईंचे पाककलेच्या गुणाबद्दलही वाचायला मिळते.
मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकार रेखा चवरे-जैन विजयाताईंच्या एकूण प्रवासाबद्दल खूप छान व्यक्त होतात.'सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून व्यक्त होतात हे वाचतांना जाणवते. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे. प्रत्येक प्रसंगात मुलगा, सून, नात यांच्यासोबत राम शेवाळकर आणि विजयाताईंचे संबंध किती मोकळे, संकोच विरहित होते याचीही कल्पना येते आणि एकंदरीत शेवाळकर घराण्यातील हे चांदणे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी, समृद्ध करणारे आहेत.
वैशाखात जसा मोगरा मानवी मनाला शांतता, शीतलता आणि सुगंधी दरवळ देणारा असतो तसंच काही नानासाहेब आणि विजयाताईंनी शेवाळकर कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधी अत्तर दरवळणारे क्षण प्रदान केले. वाचकांच्या जवळ आवर्जून संग्रही असावा असा संग्रह म्हणजे सहवासाच्या चांदण्यात.
सहवासाच्या चांदण्यात
मुलाखतकार: रेखा चवरे-जैन
प्रकाशक: विजय प्रकाशन, नागपूर
सर्वेश फडणवीस
Thursday, May 2, 2024
स्वरगंधर्व सुधीर फडके
बायौपीकची सुरुवात गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर जोग यांच्या इन्स्ट्रुमेंटल मेडलीने होते. तब्बल २६ मूळ बाबूजींनी गायलेली गाणी या चित्रपटाची वेगळी बाजू आहे. एवढी गाणी असून सुद्धा जाणवत नाही इतकी ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याशी समरस झालेली आहेत हे चित्रपट बघतांना जाणवतं. दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात अशोक रानडे यांनी बाबूंजींच्या घेतलेल्या मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट उलगडत जातो. लहान वयातच कोल्हापूरमधील बाबूजींची संगीताबद्दलची आवड दाखवणारे प्रसंग छान जमले आहेत.
प्रतिकूल परिस्थितीशी, जीवाची घालमेल प्रसंगी आत्महत्येचा विचार आणि खिशात पैसे नसतांना होरपळलेले बाबूजी बघितल्यावर अंगावर काटा आला. देशभर अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी झालेले प्रयत्न आणि एका वेळचे जेवणही मिळवताना झालेले कष्ट आणि रडकुंडीला आलेले बाबूजीं, असं काही बघितले की वाटतं आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचं प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले आयुष्य, मिळणारी वाहवा दिसते पण त्यामागची खडतर तपस्या आणि संघर्ष दिसत नाही. पोटात अन्नाचा कणही नसतांना गाणे गाण्याची जिद्द बघून डोळे पाणावतात.
चित्रपटाबद्दल अनेकजण लिहितील पण मला भावलेला आणि आवडलेले बाबूजींचे पैलू यानिमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता आणि इतर प्रांतातील संगीताचा अभ्यास या सर्व गोष्टींचा वापर करून एक वेगळंच युग सुधीर फडके यांनी निर्माण केलं. ज्याचा परिणाम आजही जाणवतो आणि पुढेही जाणवत राहील. प्रख्यात संगीतकार, मनस्वी गायक, प्रखर राष्ट्रभक्त, सावरकरनिष्ठा अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे महाराष्ट्राचे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्यांच्या बायोपिक मधून जाणवतं की कोणतेही काम एकदा स्वीकारलं की, ते अत्यंत मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीनेच करायचं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडोत, वेळ लागो अथवा पैसे खर्च होवोत; पण चांगलंच करायचं हा त्यांचा स्वभाव होता.
प्रत्येक मराठी माणूस बाबूजींच्या सुरांचा चाहता आहे. त्यांचे सुर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरून उरले आहेत त्याचा प्रत्येक गायकाने आदर्श ठेवावा आणि प्रत्येक कानसेनाने तृप्ततेची अनुभूती घ्यावी, असं हे सह्याद्रीच्या कुशीतलं हिमालयाची उंची गाठलेलं व्यक्तिमत्त्व होतं. सुरांच्या माध्यमातून ते आपल्यात सामावले असले तरी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ते कसे होते यासाठी आवर्जून हा बायोपिक बघायला हवा.
सुधीर फडकेंच्या मनात प्रखर देशप्रेम होतं. संगीतकार, गायक म्हणून त्यांना कीर्ती, बहुमान, पैसा मिळाला होता. त्यांच्याजागी दुसरा कोणी असता, तर सुखासीन आयुष्य व्यतीत करण्यात धन्यता मानली असती. पण फडकेसाहेबांची तशी वृत्ती नव्हती. देशाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल, याचा तेसतत विचार करीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादरा नगर हवेली सशस्त्र क्रांतीचा उठाव कसा झाला यासाठी हा बायोपिक बघायला हवा.
बायोपिक बघतांना जाणवतं की, बाबूजी या नावाभोवती आजही जे वलय आहे, ते सहज मिळालं नाही. त्यामागे प्रचंड साधना आहे. कष्ट आहेत. जिद्द तर आहेच आहे. शब्दाला सुगम संगीतात किती वजन असतं, ते नेमकं कुठं जाणवू द्यायचे, त्याशिवाय त्यांची एक खासियत अशी होती की, प्रत्येक अंतरा वेगळा त्यात वेगळी, हरकत याची लयलूट असे. गदिमा यांच्या सारख्या असामान्य कवीचे शब्द पुढ्यात आले की भाषाप्रभूला ज्या वेगानं शब्द सुचत, त्याच वेगात बाबूजींच्या चाली लगेच होत असत. ती चालही अशी की, गीताचा आशय अधिक भावपूर्ण असे. सुगम संगीताचा सम्राट म्हणून बाबूजी जगन्मान्य झाले पण रसिक मनाची नाडी सापडलेल्या सुधीर फडके यांनी आयुष्यभर सूर, ताल आणि लय यातच हयात व्यतीत केली असती, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा आणि आदर्श स्वयंसेवकत्व कसे असायला हवे यासाठीं हा बायोपिक आवर्जून बघायला हवा.
नुकतीच रामनवमी झाली. मराठी रसिकांना गीत रामायणाच्या भक्तिरसात चिंब भिजवणाऱ्या अनेक सुंदर रचना बाबूजीं आणि गदिमा यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. ५६ गीतांच्या गीतरामायणाने ६० वर्षांहूनही अधिक काळ सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवले आहे. गीत रामायणाची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. त्याचा प्रवास आणि आठवणी यासाठी हा बायोपिक बघायला हवा.
आधीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालणारी गीत संगीताची निर्मिती करणाऱ्या या मंडळींच्या कामातला सच्चेपणा प्रसंगी सर्वोत्तमाकरिता घेतलेला ध्यास हे सारंच वंदनीय आहे. अनेक पिढ्यांवर त्यांचं गारुड आहे ते पुढेही चिरंतन राहील. कारण जे अस्सल आहे ते विरत नाही मुरत जातं. एक रसिक आणि संगीत क्षेत्रातला वारकरी म्हणून मी त्यासमोर सदैव नतमस्तक राहीन. आणि याचसाठी 'जगाच्या पाठीवर' असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने हा बायोपिक आवर्जून बघायला पाहिजे. ग. दि. माडगूळकरांनी सुधीर फडके यांच्यासाठी लिहिलेल्या गाण्यातला केवळ एक शब्द बदलला आणि आयुष्य संगीताला वाहिलेले बाबूजी डोळ्यासमोर उभे रहातात आणि यानेच या बायोपिकचा शेवट होईल.
या सुरांनो या विरहांतीचा एकांत व्हा, अधिर व्हा, आलिंगने
गाली, ओठी, व्हा सुरांनो भाववेडी चुंबने... होऊनी स्वर वेळूचे
वाऱ्यासवे दिनरात या गात या... या सुरांनो या!
सर्वेश फडणवीस
Wednesday, April 17, 2024
राम- जीवनाची समग्रता !
श्रीरामाने उभारलेल्या सेतूला वाल्मीकींनी 'अभूतपूर्व' म्हटले आहे.'अभूतपूर्वं रामेण सागरे सेतुबन्धनम्।' हे विशेषण समुद्रातल्या सेतूला जितके लागू पडते तितकेच रामाने जोडलेल्या मानवी सेतूलाही. श्रीरामाने नरांना वानरांशी, आर्यांना अनार्य म्हणविल्या जाणाऱ्यांशी जोडले. खरदूषणांचा नाश करून आर्यावर्त किष्किंधेशी जोडला. रावणाशी लढताना समुद्रातील सेतूइतकाच हा मानवी सेतूही उपयोगी पडला आहे. नर, वानर, राक्षस, ऋक्ष (जांबुवान),लंकेहून आलेले रावणाचे चार मंत्री, हे सर्वजण रामाच्या बाजूने रावणाशी लढलेत. खरे तर रामरावणयुद्ध हे 'विषमयुद्ध' म्हणावे लागेल. रावणाचे सैन्य आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज होते, प्रशिक्षित होते आणि संख्येनेही जास्त होते.
रामाकडे शस्त्रांची कमतरता होती. ८७ दिवस चाललेल्या ह्या युद्धात पहिले ८० दिवस रामाकडे साधा रथही नव्हता. शौर्य आणि धैर्य ह्या दोन चाकांवर चालणारा त्याचा 'धर्मरथ' मात्र मजबूत होता. बल, विवेक, दम आणि परोपकार हे त्याच्या रथाचे घोडे होते आणि सत्याची पताका त्या रथावर डौलाने फडकत होती. सद्गुरुकृपेचे अभेद्य चिलखत घालून राम लढत होता. रावणाची सेना 'शिस्त'बद्ध होती तर रामाची सेना रामप्रेमाच्या तंतूंनी 'बद्ध' होती. म्हणून तर युद्धाच्या शेवटच्या दिवशी स्वतः महर्षी अगस्ती रामाच्या राहुटीत आले आणि त्यांनीच दिलेल्या बाणाने रावणरूपी राष्ट्रीय संकटाचा अंत झाला. त्याही प्रसंगी प्रभु रामाचे संस्कारशील आचरण आपल्याला अन्तर्मुख करते.
मरणान्तानि वैराणि ! निवृत्तं नः प्रयोजनम् ।
क्रियतामस्य संस्कारो, ममाप्येष यथा तव ॥
मृत्यूनंतर वैर शिल्लक ठेवू नये हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र. उदारता आणि उदात्तता शिकविणारे 'मरणान्तानि वैराणि' हे वाक्य सुभाषिताचा दर्जा लेवून सर्वतोमुखी झाले आहे. 'हा जसा तुझा, तसाच माझाही भाऊ आहे असे समजून याची उत्तरक्रिया कर' असे शब्द फक्त प्रभु रामाच्याच तोंडून निघू शकतात. रामाचा वनवास संपला आणि सीतेची अशोकवनातून, सर्व देवांची रावणाच्या बंदिवासातून आणि समस्त जंबुद्वीपीयांची दहशतीतून सुटका झाली. रामाचे ध्येय साकारले. ऋषींची स्वप्ने पुरी झाली. पण नुसती दहशत मिटवून भागत नसते. नव्या मनूची नवी घडी बसवायची तर आदर्शांचीही स्थापना करावी लागते. तिचा प्रारंभ इथूनच झाला. सीतेच्या पावित्र्याची पूर्ण खात्री असूनही, तिच्या शुद्ध चारित्र्याचा आदर्श लोकांसमोर असावा ह्या हेतूने रामाने तिला अग्निदिव्य करायला सांगितले आणि तिनेही ते अगदी हसत केले. इक्ष्वाकूंच्या सिंहासनाला पुसटसाही डाग लागू नये ह्या बाबतीत रामाइतकीच तीही जागरूक होती. राम-सीता वेगळे होतेच कुठे ? एकाच चित्शक्तीची ती दोन रूपे होती.
सीतेवरील उत्कट प्रेम हे श्रीरामाच्या एकपत्नीव्रतामागचे कारण होते हे तर खरेच, पण कदाचित त्याला दुसराही एक आयाम असू शकतो. त्या काळी विशेषतः राजघराण्यात - बहुभार्यापद्धत सर्रास प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांच्या मनाची घुसमट तर होतच असे, शिवाय राजघराण्यातील अंतःस्थ कारवायांनाही खतपाणी मिळत असे. बहुपत्नीप्रथा नसती तर मंथरा कैकेयीच्या मनात सापत्नभावाचे बीज पेरू शकली नसती कदाचित ह्यामुळेही प्रभु रामचंद्राने सर्व नृपतींना एकपत्नीव्रताचा सर्वस्वी नवा असा एक आदर्श घालून दिला असावा. कारण रामाच्या प्रत्येक कृतीमागे राष्ट्राच्या उन्नतीचाच विचार असतो.
श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी बिभीषण, सुग्रीव, अंगद, जांबुवान, हनुमान हे सर्वजण उपस्थित होते. राज्याभिषेकाचा सोहळा उत्साहात, आनंदात पार पडला. पण बिभीषण आणि सुग्रीव ह्यांना प्रभुचरण सोडून जावेसे वाटत नव्हते. वस्तुतः दोघेही समृद्ध राज्याचे अभिषिक्त राजे पण प्रभुरामाच्या सहवासापुढे त्यांना ती सत्ता आणि वैभवही तुच्छ वाटत होते.रामाची सेवा करत अयोध्येतच रहावे अशी मनीषा त्यांनी लक्ष्मणापाशी बोलून दाखवली. रामाची महती जाणत असल्यामुळे लक्ष्मणालाही त्यात काही वावगे वाटले नाही. रामाला त्याने तसे सुचवले देखील. रामाने त्यांचा मानसन्मान केला आणि गोड शब्दात निरोप दिला, पण ठेवून मात्र घेतले नाही कारण अयोध्येत त्याला परकी संस्कृती रुजू द्यायची नव्हती शिवाय लंकेत पुन्हा राक्षसी संस्कृती फोफावू नये म्हणूनही बिभीषणासारखा परमभागवत तेथेच असावा हाही विचार त्यामागे होता. तसेच किष्किंधेतही राक्षस धार्जिण्या वानरांवर वचक ठेवण्यासाठी सुग्रीवाचे तेथे असणे गरजेचे होते. हेच प्रभु रामाचे द्रष्टेपण होते. अयोध्येचे 'अ'योध्यपण त्याने भंगू दिले नाही. मातृभूमीचे स्वत्व जपणे हेच तर देवत्वाचे लक्षण. 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' ही भावना जपणारा राम जन्मभूमीच्या सीमासुरक्षेसाठी असा तत्पर होता.
सर्व देवदेवतांच्या मूर्ती पूर्वाभिमुख असतात, पण रामाचा लाडका हनुमान मात्र दक्षिणमुखी असतो, त्याचेही कारण रामाचे द्रष्टेपण असावे असे वाटते. - लंका भारताच्या दक्षिणेला आहे. भगवद्भक्त बिभीषण तेथे होता हे खरे, पण तो मुळातच संन्यस्त वृत्तीचा. भविष्यात त्याने राज्य कुणा दुसऱ्या राक्षसवंशीयाला सोपवून वनाचा मार्ग धरला तर ?सीमासंरक्षणासाठी दक्षिणेवर सतत नजर ठेवण्याची कामगिरी प्रभुरामाने चिरंजीवित्व लाभलेल्या हनुमंतावर सोपविली असेल. प्रभु रामाचे चरित्र म्हणजे जीवनाची समग्रता आहे. नराचा नारायण बनण्याची गुरुकिल्ली आहे. त्याच्या चरित्राचे मनन करता करता, कथेचे पारायण करता करता 'रामपरायण' व्हावे आणि शेवटला 'राम' म्हणण्यापूर्वी, याचि देही याचि 'डोळा 'राममय' व्हावे ह्यातच 'राम' आहे ! नाही का ?
॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥
सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day9 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
Tuesday, April 16, 2024
तद् वनं भविता राष्ट्रम्
कैकेयी 'त्यागमूर्ती' होती की 'वैरिणी' ? वाल्मीकिरामायणातली कैकेयी मात्र या दोन्ही टोकांना स्पर्श करत नाही. ती मुळात निष्पापच आहे. रामावर तिचे मनापासून प्रेम आहे आणि रामाचा राज्याभिषेक तिला अपेक्षितच होता. म्हणून तर ती बातमी मिळताच ती आनंदली. पुढे मंथरा म्हणाली की “अगं, आनंदित काय होतेस ? राज्याभिषेक भरताचा नाही, रामाचा आहे!” तेव्हाही तिचे उत्तर आहे की 'रामे वा भरते वाऽहं विशेषं नोपलक्षये।' शिवाय रामाच्या सद्गुणांवर तिचा पूर्ण विश्वास आहे. तिच्या मनात विष कालवले ते मंथरेने. तिनेच तिला दशरथाकडे 'उधार' असलेल्या वरांबद्दल भरीस घातले. राम राजा झाल्यावर तुझी दुर्दशा होईल असे भयंकर भडक चित्र तिच्यासमोर रेखाटले. त्यांच्या अस्तित्वात नसलेल्या सवतीमत्सराचे काल्पनिक वर्णन करून, राजमाता झाल्यावर कौसल्या तुझा सूड उगवेल ही भीती घातली आणि जुन्या वरांची आठवण करून दिली - मग मात्र कैकेयी बिथरली.
आपले बोट चाकाच्या आसात घालून ते सावरले अशी कथा सांगितली जाते. त्यातले सार हेच की ती सारथ्यकर्मकुशल होती आणि मोडलेले चाक दुरुस्त करण्याचेही ज्ञान तिला होते, म्हणून ऐन रणधुमाळीतही स्वतःचे प्राण धोक्यात घालून तिने दशरथाचा रथ ताब्यात घेतला आणि त्याला सुखरूप छावणीत पोचवले. पतीचे प्राण वाचविणे हा मुळी धर्मच आहे अशी तिची धारणा. त्यात आपण विशेष काही केले असे तिला वाटतच नाही. म्हणून, दशरथाने तिला देऊ केलेले वरही तिने हसून नाकारले. आधीच रूपवती, त्यात प्राणदायिनी म्हणून ती दशरथाला अधिकच प्रिय झाली. कैकेयी मात्र दशरथाच्या व चारही मुलांच्या प्रेमातच मग्न होती. तृप्त, संतुष्ट होती. अशी वाल्मीकीने रंगविलेली कैकेयी थोडी अल्लड आहे, पण राक्षसी महत्त्वाकांक्षा तिच्यात नाही. मंथरेने आठवण करून दिली तोपर्यंत त्या दोन वरांचीही गोष्ट ती विसरून गेली होती. पण तरीही रामाच्या वनवासगमनाला आणि दशरथाच्या मृत्यूला मात्र तीच कारणीभूत ठरली. मंथरेने केलेल्या बुद्धिभेदामुळे.
वनवासाची सूचना ऐकूनही राम अविचलच राहिला आहे. उलट, वनात राहून मुनिजनांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने कैकेयीचे उपकारच मानले. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता जोपासण्याची आणि त्यातून मार्ग काढून कर्तव्यांना नवे आयाम देण्याची ही रामाची वृत्ती नुसती मननीयच नाही तर अनुकरणीयही आहे. 'राजा हा प्रजेचा उपभोगशून्य रक्षक असतो' हीच प्रभु रामाची धारणा. भरतही माझ्याप्रमाणेच प्रजेला सुखात ठेवील ही खात्रीही रामाला होती. त्यामुळे सिंहासनावर कुणी का बसेना, रामाला काहीच फरक वाटला नाही. अनासक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समदृष्टी ह्यांचे इतके वेधक रसायन इतरत्र कुठे दिसणार? भरताबद्दल रामाला वाटणारी खात्री त्याने पुढे चित्रकूटावर लक्ष्मणापाशी बोलूनही दाखविली आहे आणि रामाच्या वनवासकालात राज्याची भरभराट करून, रामाला वाटणारा भरवसा अनाठायी नव्हता हे भरतानेही सिद्ध केले आहे. अहर्निश राष्ट्राचीच चिंता करणारे शासक असले,तर रामराज्य कलियुगातही अवतरू शकेल.
अयोध्येला शोकसागरात लोटून राम निघाला. आता अयोध्याच विस्तारणार होती. सर्व राष्ट्रच आता 'अ'योध्य होणार होते, कारण राक्षसी आतंक संपणार होता. राजप्रासादातील अन्य कोणतीही वस्तू न घेता फक्त आपले परमप्रतापी कोदंड घेऊन राम निघाला. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीरामजन्मभूमीवर झालेले भव्य श्रीराम मंदिर आणि श्रीरामललाचा कोदण्डधारी विग्रह हे याचेच द्योतक तर नव्हे. आता - तद् वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day8 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
Monday, April 15, 2024
युगांतर
कथांच्या ओघात प्रवास कसा संपला हे कळलेच नाही. विश्वामित्र
रामलक्ष्मणांसह मिथिलेला पोचले. शिवधनुष्य पाहण्यासाठी दोघेही उत्सुक होते कारण त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवणे अत्यंत कठीण आहे असे विश्वामित्रांनी सांगितले होते. जनक' हे विशेषनाम नाही. ते मिथिलेच्या अधिपतीचे पद आहे. त्या वेळी सीरध्वज नामक जनक राजपदी आरूढ होते. त्यांच्याकडे वंशपरंपरेने शिवधनुष्याची पूजा होत असे. 'त्या अलौकिक धनुष्याला प्रत्यंचा लावणाऱ्यालाच माझी कन्या सीता देईन' अशी प्रतिज्ञा जनकाने केली होती. विश्वामित्रांच्या आगमनाची वार्ता कळताच जनकराजा आपल्या शतानंद नामक राजपुरोहिताला पुढे करून स्वतः सामोरा गेला. त्यांच्यासोबत
असणाऱ्या राजपुत्रांना पाहून जनकाने कुतूहलाने त्यांचा परिचय विचारला. विश्वामित्राने कौतुकाने त्यांचे सिद्धाश्रमातले वास्तव्य, राक्षसांचा त्यांनी केलेला वध, अहल्योद्धार हे सर्व सांगून 'महाधनुषि जिज्ञासां कर्तुमागमनं तथा ।' असे नमूद केले. त्यांचा पराक्रम ऐकून प्रभावित झालेल्या जनकाने लगेच धनुष्य तेथे आणविले. ते विशाल धनुष्य एका आठ चाकी गाडीवरून स्वयंवरस्थानी आणले गेले. जनकाने धनुष्याचा महिमा आणि स्वयंवराची अट सांगितली.
स्वयंवरासाठी अनेक राजे- राजपुत्र मिथिलेला आले. प्रत्येकाने शिवधनुष्य उभे करण्याचा प्रयत्न केला पण पराभूत झाले. त्या सर्वांचा पराभव होत असतानाच उद्वेगाने जनकाच्या तोंडून 'निर्वीरमुर्वीतलम्' अर्थात पृथ्वीतलावर एकही वीर उरला नाही असे शब्द निघाले. हे सर्व ऐकून विश्वामित्रांनी रामाला उठण्याची खूण केली आणि 'वत्स राम धनुः पश्य' अशी आज्ञा केली. विश्वामित्रही किती धोरणी होते पहा. श्रीरामाला आधीच पाठवले असते, त्याने प्रत्यंचा चढवला असता तर इतर राजपुत्र म्हणाले असते की ' हे तर आम्हीही करू शकत होतो, पण आम्हाला संधीच मिळाली नाही. श्रीरामाने प्रथम त्या धनुष्याला प्रणाम केला, मग शांतपणे प्रदक्षिणा घातली आणि पटकन ते उभे केले. आता प्रत्यंचा लावणार तोच कर्णभेदी आवाज झाला.आणि ते धनुष्य भंगले.
ह्या संदर्भात स्वामी गोविन्ददेव गिरि ह्यांच्या प्रवचनातून छान कथा ऐकायला मिळाली. ते म्हणतात की इतर राजेही बलवान होते, महाप्रतापी होते. त्यांना जे जमले नाही ते किशोरवयीन श्रीरामाला साधले ह्याचे मर्मही त्यांच्या विश्वामित्रांसोबतच्या प्रवासात दडलेले आहे. त्यांनी रामाला चौपन्न दिव्यास्त्रांचे ज्ञान दिले होते. ही अस्त्रे त्यांना साक्षात् महादेवाकडून प्राप्त झाली होती. हे धनुष्यही महादेवाचेच. श्रीरामाने प्रथम प्रणाम केला. शिवाचा अनुग्रह जागवला. मग दिव्यास्त्रांचे स्मरण केले. प्रदक्षिणा घालतेवेळी चारही बाजूंनी त्या धनुष्याचे जवळून निरीक्षण केले आणि ओळखीची कळ नजरेस पडताच तिच्या साह्याने धनुष्य सर्रकन उभे केले. इतर राजांकडे ताकद होती, पण हे ज्ञान नव्हते. एकपाठी रामाने सर्व दिव्यास्त्रांचे मनोभावे ग्रहण केले होते म्हणूनच हे अघटित घडू शकले.
धनुर्भंगानंतर श्रीराम जानकीचा विवाह झाला आणि रामाच्या तिघाभावांचा सीतेच्या तिघी बहिणींशी विवाह झाला हे सर्वश्रुतच आहे. पण त्या वेळची एक बाब उल्लेखनीय आहे. जनकाचा कुलपुरोहित शतानंद हा अहल्येचा पुत्र. विश्वामित्रांशी भेट होताक्षणीच तो विचारतो, "माझ्या मातेचा उद्धार झाला ना? पिताश्रींनी तिचा स्वीकार केला ना?" त्यावर विश्वामित्र शांतपणे उत्तरतात, "हो. जसे ठरले होते तसेच सर्व घडले." गौतमही बोलले होते की, "रामा, मिथिलेत तुला शतानंद भेटेल." ह्याचाच अर्थ असा की श्रीरामाच्या बाबतीत सर्व ऋषींची पूर्वयोजना आणि परस्परप्रेरणा (telepathy) जबरदस्त होती.
श्रीरामाच्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे बारीक लक्ष होते, कारण रामाच्या रूपातच त्यांना उद्याचा उज्ज्वल भविष्यकाळ दिसत होता. विवाहविधी आटोपल्यावर विश्वामित्र दशरथाला म्हणाले, "राजन्, तुमचा राम तुम्हाला सोपवला. माझे काम झाले. आता मी निघतो,' ह्या शब्दांचा फार खोल अर्थ आहे. अयोध्येहून निघतानाचा अनुभवी राम आणि आता अयोध्येला परतणारा पुरुषार्थी राम ह्यात कमालीचे अंतर आहे. हे कर्तृत्व विश्वामित्राचे. हे काम पूर्ण करून विश्वामित्र तपस्येसाठी निघून गेले आणि ते रामाला परत कधी भेटलेही नाहीत. ते निघताना राम प्रणाम करतो आणि गुरुदक्षिणेबद्दल विचारतो, तेव्हा ते उद्गारतात, "मी सांगितलेल्या ध्येयानुसार आचरण हीच माझी गुरुदक्षिणा मला हवी" कर्तव्यपूर्ततेत कसूर करायची नाही पण कुठे ममत्वभावाने अडकायचेही नाही असा 'पद्मपत्रमिवाम्भसा' वृत्तीचा वस्तुपाठ ब्रहार्षि विश्वामित्रांच्या ठायी येथे प्रत्यक्ष दिसतो. 'राम' घडतो तो अशाच संस्कारांमुळे आणि हेच पुढच्या योजनेचे युगांतर होते.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day7 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
Sunday, April 14, 2024
संस्कारयात्रा
अयोध्येहून विश्वामित्र रामलक्ष्मणासमवेत षष्ठीला निघाले ते नवमीला सिद्धाश्रमात पोचले. नंतर सहा दिवस यज्ञ चालला तेव्हा विश्वामित्रांनी मौनव्रत धारण केले होते असे वाल्मीकी सांगतात. ह्या यज्ञात मारीच आणि सुबाहू ह्या राक्षसांच्या टोळीने विघ्ने आणायचा प्रयत्नही केला होता. पण श्रीरामाने सुबाहूचा आणि त्याच्या साथीदारांचा वध केला आणि मारीचाला बाणाने कैक योजने दूर फेकून दिले. यज्ञ निर्विघ्न पार पडला. त्या आश्रमाचे' सिद्धाश्रम' हे नाव यज्ञ सिद्धीस गेल्यामुळे सार्थ ठरले.
यज्ञाच्या सांगतेनंतर पंचमीला विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन मिथिलेला निघाले, ते अष्टमीला पोचले असा उल्लेख रामायणात आहे. ह्या दोन्ही प्रवासात (अयोध्या ते सिद्धाश्रम आणि सिद्धाश्रम -मिथिला) अनेक कथा मुनींनी दोघा रघुकुमारांना सांगितल्या आहेत. प्रवासाचा शीण जाणवू नये म्हणून ह्या कथा सांगितल्या असाव्यात असे वरवर विचार करणाऱ्याला वाटेल, पण अन्तःस्थ हेतू आहे श्रीरामलक्ष्मणांच्या मनावर विशिष्ट संस्कार करण्याचा . ती एक संस्कारयात्रा आहे.
त्राटिकावधानंतर सिद्धाश्रमाला जाताना विश्वामित्रांनीस मुद्रमंथनाची कथा सांगितली आहे. देव-दानवांच्या एकजुटीमुळेच समुद्रमंथनासारखे प्रचंड आणि अवघड कार्य सिद्धीस जाऊ शकते, पण फलप्राप्तीच्या वेळी मात्र श्रेयाचा धनी कोण असा अन्तःकलह माजला तर तो एकाला संपवूनच शांत होतो हे दोन संदेश श्रीरामाला ह्या कथेतून मिळाले आहेत.
दुसऱ्या दिवशी गंगाकिनारी पोचल्यावर रामाच्या मनात ध्येयवाद जागविण्यासाठी विश्वामित्रांनी गंगावतरणाची कथा सांगितली आहे. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी सागर-सगरपौत्र अंशुमान-दिलीप-भगीरथ अशा तब्बल चार पिढ्या खपल्या आहेत. महत्कार्य साकारावयाचे असेल तर सातत्याने अथक प्रयत्न करावेच लागतात आणि त्यात दोन-तीन पिढ्या गारद झाल्या तरी खचायचे नसते हा संदेश ह्या कथेद्वारे दिला गेला आहे.
पुढे वनवासाच्या चौदा वर्षात कितीतरी आपत्ती श्रीरामावरको सळल्या. तरीही त्याच्या प्रयत्नात कधी खंड पडला नाही. कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत त्याने रामराज्याची स्थापना केली, ती ह्या संस्कारांमुळेच. 'यत्न तो देव जाणावा' असे शब्द फक्त 'राम'दासाच्याच मुखातून येऊ शकतात. विश्वामित्रांनी सांगितलेल्या कथांपैकी सर्वात महत्त्वाची दूरगामी परिणाम करणारी कथा आहे बळीराजाची. राक्षसांच्या वरवरच्या आचरणाला भुलू नये आणि जिंकलेल्या प्रदेशांबद्दल लोभ बाळगू नये हे दोन महत्त्वाचे संदेश विश्वामित्रांनी रामाला ह्या कथेद्वारे दिले आहेत आणि सुज्ञ रामाने विश्वामित्रांच्या संदेशांचे पुढे तंतोतंत पालन केले आहे.
वालीचे निर्दालन करून किष्किंधा सुग्रीवाला सोपवली आहे आणि रावणाचा बीमोड करून बिभीषणाला राज्याभिषेक केला आहे. अशाच तऱ्हेच्या इतर अनेक कथा या संस्कारयात्रेत श्रीरामाने ऐकल्या. मदनदहनाच्या कथेतून कामविकारावर नियंत्रण ठेवण्याचा, कार्तिकेयाच्या कथेतून सेनानेतृत्वाची लक्षणे जोपासण्याचा तर गौतमाने इन्द्राला दिलेल्या शापाच्या माध्यमातून 'व्यभिचाराला क्षमा नाही', ह्या तत्त्वाचा संस्कार श्रीरामाने ग्रहण केला. मूळच्या लखलखत्या हिऱ्याला आता अनेक तेजस्वी पैलू पडत होते. संस्कारयात्रा सफल होत होती.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day6 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
Saturday, April 13, 2024
आपदाम् अपहर्ता राम
श्रीरामाची विमनस्कता घालवून त्यांच्यात उत्साहाचे बीज पेरण्याचे काम वसिष्ठांनी केले आणि त्या बीजाला वाढवून अंकुरविण्याचे, अंकुराला योग्य दिशेला वळविण्याचे काम महर्षी विश्वामित्रांनी केले. एक दिवस दशरथाकडे येऊन विश्वामित्र म्हणाले,“राक्षस आमच्या यज्ञात नेहमीच विघ्ने आणतात. मला येत्या नवमीला सहा दिवसांचा यज्ञ करायचा आहे. राक्षसांचा संहार करण्यासाठी तुझे राम-लक्ष्मण मला दे. "
मुळात विश्वमित्रांना रामाला बाहेर काढायचे होते. घडवायचे होते. त्याचे तन-मन कणखर बनवायचे होते. भावी उद्दिष्टांचे (जी उद्दिष्टे पुत्रकामेष्टीच्या वेळीच ठरली होती, त्यांचे) बीजारोपण करायचे होते, ज्या दिव्यास्त्रांचे ज्ञान त्यांनी प्रत्यक्ष महादेवाकडून प्राप्त करून घेतले ती दिव्यास्त्रे रामाला प्रदान करायची होती. रामलक्ष्मणांना जाऊ देण्यास दशरथ कचरतो आहे हे पाहिल्यावर गुरु वसिष्ठांनी हस्तक्षेप केला आणि विश्वामित्रासारख्या समर्थ ऋषीच्या सहवासात राजपुत्रांचे भलेच होईल ह्याची ग्वाही देऊन त्यांना विश्वामित्रासोबत पाठविण्याचा आदेश दिला आहे.
श्रीरामाचे व्यक्तित्व घडवून आणण्यात दोघांचे एकमत आहे. राष्ट्रहित साधायचे असेल तर वैयक्तिक हेवेदावे बाजूलाच ठेवायचे असतात ह्या गोष्टीचा त्यांना कधीच विसर पडत नाही. जेव्हा असे होते तेव्हाच 'राम'राज्याची पायाभरणी होत असते. गुरूच्या आज्ञेचा अधिक्षेप रघुवंशीयांनी कधीही केला नाही, म्हणूनच दशरथाची अनुज्ञा मिळाली आणि रामलक्ष्मण विश्वामित्रासह सिद्धाश्रमाकडे निघाले. दशरथाने रथ देऊ केला तोही विश्वामित्रांनी नाकारला. दोघांना मुद्दामच पायी नेले. त्या तिघांचा पहिला पडाव पडला शरयूतीरावर. तेथे विश्वामित्रांनी 'बला' आणि 'अतिबला' ह्या विद्या शिकविल्या. ह्या विद्यांमुळे तहान, भूक आणि निद्रा ह्यांवर ताबा ठेवता येतो. निर्णयक्षमताही वाढते. या विद्या म्हणजे वस्तुतः अस्त्रेच होत. ही अस्त्रे जया आणि सुप्रभा ह्या दोन स्त्रियांनी निर्माण केली होती हे विशेष. ह्या दोघी दक्षप्रजापतीच्या कन्या आणि कश्यपांच्या भार्या होत्या.
दुसऱ्या दिवशी ते कन्दर्पऋषींच्या आश्रमाकडे निघाले. जाताना प्रत्येक प्रदेशाची माहिती विश्वामित्र देत होते. तिथल्या समस्यांचा परिचय करून देत होते. पूर्वी तीर्थाटनाच्या वेळी ज्या समस्या पाहून रामाचे मन नैराश्याने काळवंडले होते, त्याच समस्यांकडे राम आता त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पाहात होता. 'आपदाम् अपहर्ता' तयार होत होता. तिसऱ्या दिवशी नावेत बसून तिघांनी गंगा पार केली. जो पहिला मुनी रावणाच्या पारिपत्याची प्रतिज्ञा करून दक्षिणेत उतरला होता, त्या अगस्तीचा आता उजाड नि भकास झालेला आश्रम विश्वामित्रांनी दाखविला. त्याची दहा मुले राक्षसांनी खाऊन टाकली होती आणि त्यामागे त्राटिकेचा हात होता हे सांगत असतानाच त्राटिका तेथे अवतरली. खरे तर ही त्राटिका मुळात राक्षसी नव्हती. सुकेतु नामक एका सदाचारसंपन्न यक्षाची ती कन्या अपत्यहीन सुकेतूने अपत्यप्राप्तीसाठी मोठे तप केले. त्यामुळे संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाच्या कृपेमुळे ही कन्या त्याला झाली. त्याच्याच वराद्वारे तिला सहस्र गजांचे बळ प्राप्त झाले. जंभपुत्र सुंदाशी तिचा विवाह झाला. पुढे अगस्ती मुनींच्या शापाने सुंद मरण पावला तेव्हापासून ती क्रुद्ध आणि बेफाम बनली आणि अगस्तींच्या प्रदेशाचा विध्वंस करत फिरत होती. तीच त्राटिका आता रामलक्ष्मणांपुढे उभी होती. श्रीरामाने त्राटिकेचा वध केला.
अहल्योद्धाराची घटनाही ह्याच प्रवासात घडली आहे. रामलक्ष्मणासह विश्वामित्र गौतमाश्रमापाशी आले आणि त्यांनी हकीकत सांगितली की 'गौतमपत्नी अहल्या ही ब्रह्मदेवाची कन्या. एक दिवस गौतम ऋषी घरी नसताना इन्द्र संधी साधून तिच्याकडे आला. मुनिवेष घेऊन. तिने त्याला ओळखले, पण तीही मोहवश झाली. नको ते घडले. इन्द्र कुटीतून निघत असताना गौतम परतले आणि तेथेच त्यांनी इन्द्राला शाप दिला. देवांचा राजा असला तरी अशा अपराधाला क्षमा नाही. अहल्येला प्रायश्चित्त सांगताना ते म्हणतात
वातभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी ।
अदृश्या सर्वभूतानामाश्रमेऽस्मिन् वसिष्यसि ।।
अर्थात् - ह्याच आश्रमात तू तप करत, अन्नपाण्याचा त्याग करून धुळीत पडून रहा. कुणाच्या संपर्कात येऊ नकोस. म्हणजेच दगडाधोंड्याप्रमाणे निश्चल, निर्विकार आणि निराहार रहा. तिला असा आदेश देऊन गौतमही तपश्चर्येसाठी निघून गेले. तेव्हापासून हा आश्रम ओसाड पडला आहे. जेव्हा ते तिघेजण आत शिरले तेव्हा एका शिळेआड तपस्यारत अहल्या त्यांना दिसली. तिच्या हातून चुकून, तेही एकदाच पाप घडले होते. पण आता ती अक्षरश: दगड झाली होती. पतीच्या आदेशाचे तिने सर्वतोपरी पालन केले होते. श्रीरामाने पुढे होऊन तिला नमस्कार केला असे वर्णन वाल्मीकीने केले आहे. ज्या क्षणी श्रीराम तिच्यापुढे नमस्कारासाठी वाकला, त्याच क्षणी सिद्ध झाले की तिची पापे धुतली गेली. तिच्या मनाचा झालेला 'दगड' वितळला. ती पुन्हा अहल्या झाली. तिचे डोळे पाझरू लागले. रामाने तिचे आतिथ्य स्वीकारले आणि सिद्ध केले की तिच्याबद्दल त्याच्या मनात कोणतेही किल्मिष नाही. त्याच वेळी गौतमही तप संपवून परतले होते. रामाने दोघांनाही प्रणाम केला. गौतमांचेही नेत्र पाणावले. या पुनर्भेटीनंतर दोघांनी जोडीने श्रीरामाची पूजा केली. त्यांच्या पुनर्मीलनाचे प्रतीक म्हणून रामाने ती स्वीकारली.
अचूक शरसंधान करून त्राटिकेला संपविणारा 'पुरुषार्थी' राम आणि अहल्योद्धार करणारा 'पतितोद्धारक' राम ही दोन्ही रूपे 'आपदाम् अपहर्ता' रामाचीच. म्हणूनच म्हणतात ना,
आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥
सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day5 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
Friday, April 12, 2024
रामो रमयतां वरः
शब्दवेधी दशरथाचा बाण चुकून श्रावणबाळाला लागला पण दशरथ हा रघुवंशी राजा आहे. शूर आहे, पण निष्ठुर नाही. पापभीरू आहे. त्याचे मन त्याला खाऊ लागले. त्या सत्यनिष्ठ राजाने राजकुलगुरु वसिष्ठांकडे मन मोकळे केले. वसिष्ठांनी त्याला अश्वमेध यज्ञ आणि पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला. वर्षभर चालणाऱ्या ह्या यज्ञप्रसंगी आर्यावर्ताच्या कानाकोपऱ्यातले सर्व प्रमुख ऋषिवर अयोध्येत एकत्र आले होते. यज्ञकृत्ये आटोपल्यानंतरच्या वेळात त्यांचा विचारविनिमय चालत असे. तिथेच ही योजना ठरली की दशरथाला होणाऱ्या पुत्राच्या हातूनच रावणरूपी अनिष्ट दूर करायचे.
पुत्रकामेष्टी यज्ञ विभांडकपुत्र महर्षि ऋष्यशृंगाच्याच हातून व्हावा असा आग्रह वसिष्ठांनी धरला. त्याचेही खास कारण आहे. वस्तुतः स्वतः वसिष्ठांचा अधिकार कमी नव्हता. त्यातून रघुवंशाचे ते कुलगुरू होते. तरीही हा आग्रह कारण ऋष्यशृंगाचे जीवन आणि मन्त्रोच्चारही तपःपूत होते. पण तसे तर प्रत्यक्ष वसिष्ठांचेही होते पण ऋष्यशृंगाला वनौषधींचेही परिपूर्ण ज्ञान होते. दशरथाला दिव्य गुणयुक्त पुत्र व्हावा ह्याच हेतूने वसिष्ठांनी ऋष्यशृंगाबद्दलचा आग्रह धरला आहे. यज्ञ संकल्प केल्यापासून वर्षभर दशरथ आणि तिन्ही राण्या व्रतस्थ आहेत. पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करताहेत. आहारही मोजका आणि विशिष्ट आहे. त्यानंतरच दशरथाला मंत्रसिद्ध दिव्य पायसाची प्राप्ती झाली आहे. पट्टराणी म्हणून कौसल्येला आणि आवडती म्हणून कैकेयीला दशरथाने तो पायस अर्धाअर्धा दिला. पण दोघींच्याही मनाचा मोठेपणा की दोघींनीही आपापल्या पायसातला अर्धाअर्धा भाग सुमित्रेला दिला. सुमित्रेला जुळी मुले होणे आणि त्यापैकी लक्ष्मण कौसल्यानंदनाचा आणि शत्रुघ्न कैकेयीपुत्राचा अनुचर होण्यामागे हेच कारण असू शकते.
चैत्र शु. नवमी मंगळवार माध्याह्न वेळी पुनर्वसु नक्षत्रावर कौसल्येला पुत्रलाभ झाला. चैत्र शु. दशमी बुधवार सूर्योदयापूर्वी पुष्य नक्षत्रावर कैकेयीला पुत्रलाभ झाला आणि चैत्र शु. एकादशी गुरुवार माध्याह्न वेळी पुष्य नक्षत्रावर सुमित्रेला पुत्रद्वय झाले. कुलगुरु वसिष्ठांनी ज्येष्ठ पुत्राचे नाव ठेवले 'राम' 'रमन्ते योगिनोऽस्मिन्' असा तो राम. कैकेयीपुत्राचे नाव ठेवले 'भरत'. 'भरणात् भरतः भरणपोषण करणारा तो भरत. सुमित्रेच्या पुत्रांपैकी मोठ्याचे नाव वसिष्ठांनी 'लक्ष्मण' ठेवले. लक्ष्मीवान् स लक्ष्मणः वाल्मीकि रामायणात लक्ष्मणाला श्रीरामाचा 'बहिश्चर प्राण' म्हटले आहे. रामभक्ती हीच लक्ष्मणाची लक्ष्मी आहे. त्याच्या भावाचे नाव शत्रुघ्न. शत्रुं हन्ति इति शत्रुघ्नः संत तुलसीदास म्हणतात की तो शत्रूला मारतो म्हणून शत्रुघ्न नव्हे, तर ज्याचे नुसते नाव घेतले तरी शत्रू नामोहरम होतो म्हणून तो शत्रुघ्न. 'जाके सुमिरन ते रिपु नासा'। महर्षी वसिष्ठांनी चारी राजकुमारांची जी नावे ठेवली ती चौघांनीही सार्थ करून दाखवली. चौघेही एकाच वयाचे. पुढे चौघांचेही विद्याध्ययन वसिष्ठांच्याच आश्रमात झाले.
'सत्यं वद । धर्मं चर। स्वाध्यायात् मा प्रमदः।' या उपदेशाचे त्यांनी गुरुकुलात अक्षरश: पालन केले. चारही भावांचे अध्ययन संपले. वाल्मीकिमहर्षि म्हणतात -
सर्वे ज्ञानोपसम्पन्नाः, सर्वे समुदिता गुणैः।
सर्वे वेदविदः शूराः, सर्वे लोकहिते रताः ॥
खरे तर हे वर्णन चौघाही भावांचे आहे. चौघेही ज्ञानसम्पन्न, गुणी, सुशील आहेत. पण तेषामपि महातेजा रामः सत्यपराक्रमः असे नोंदवायला वाल्मीकि विसरले नाहीत. प्रभु राम 'आपदाम् अपहर्ता' आणि 'सर्वसम्पदां दाता' बनला तो अशा संस्कारांनी. महर्षि वसिष्ठांच्या उपदेशामुळे उत्साहाने परिपूर्ण बनलेल्या रामाच्या व्यक्तित्वाला नंतर अधिक पैलू पाडले ते ब्रह्मर्षि विश्वामित्रांनी. दशरथपुत्र राम हा खऱ्या अर्थाने 'रमयतां वरः' घडला तो ह्या दोन महर्षीमुळे.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day4 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
Thursday, April 11, 2024
रामो विग्रहवान् धर्मः
प्रभु रामचन्द्राच्या परमेशत्वाचे मर्म जाणण्यासाठी त्यांच्या जन्माआधीच्या परिस्थितीचा आढावा घेणे योग्य ठरेल. तसे केल्यास स्पष्ट दिसून येते की त्यावेळी जम्बुद्वीपाची परिस्थिती मुळीच समाधानकारक नव्हती. तसे पाहता रामाची राजधानी अयोध्या. त्या नगरीत कमालीची सुबत्ता होती असे महर्षि वाल्मीकी म्हणतात.
'अयोध्या नाम नगरी तत्रासीत् लोकविश्रुता।' असे सांगून वाल्मीकींनी म्हटले आहे की
तस्मिन् पुरवरे हृष्टा धर्मात्मानो बहुश्रुताः ।
नरास्तुष्टा धनैः स्वैः स्वैरलुब्धाः सत्यवादिनः ॥
अयोध्येच्या नागरिकांविषयीही आदिकवीचे उद्गार आहेत की
'द्रष्टुं शक्यमयोध्यायां नाविद्वान्न च नास्तिकः।'
अयोध्येत ही सुबत्ता रघुवंशीय नृपांच्या पुण्याईमुळे नांदत होती. पण इतरत्र ? अखिल जम्बुद्वीपाचा विचार केल्यास मात्र स्थिती सन्तोषजनक नव्हती असेच म्हणावे लागेल आणि जम्बुद्वीपाचे राजकीय चित्र केविलवाणेच होते.
रावणासारख्या अत्याचाऱ्यांचे फावते ते ह्यामुळेच. रावण हा काही सामान्य नव्हता. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून, शिवशंकराकडून वरदान प्राप्त करू शकणारा तो तपस्वी होता. मन्त्रवेत्ता होता. मंत्रांचा संबंध चित्तशुद्धीशी नाही, तर प्राणशक्तीच्या स्पन्दनांशी असतो. म्हणून उद्दाम असूनही रावणापाशी मंत्रांचे बळ आहे, शस्त्रांचे तर आहेच, शिवाय शास्त्रांचेही आहे. तो प्रकांड पंडित होता. वेदांचा पदपाठ त्यानेच केला असे म्हणतात. त्याचे शिवताण्डवस्तोत्र म्हणजे उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे. मात्र रावण उन्मत्त आहे. सुजन नाही. शस्त्र, शास्त्र आणि मंत्र ही तिन्ही बळे (हत्यारे, ज्ञान आणि तंत्र - technique) जेव्हा दुर्जनाकडे एकवटतात तेव्हा राक्षसी प्रवृत्तीला ऊत येतोच.'साक्षरा विपरीताश्चेत् राक्षसा एव ते मताः।
श्रीरामाच्या जन्माआधी रावणाचे प्रस्थ माजण्यामागे एक अंग होते - सांस्कृतिक भेदभावनेचे. उत्तरेकडील लोक स्वत:ला 'आर्य' म्हणवून घेत. म्हणूनच त्यांचा प्रदेश 'आर्यावर्त'. किष्किंधेतील लोकांना ते वेगळे मानत. पुत्रकामेष्टीच्या वेळी दशरथाने कितीतरी राजांना निमंत्रित केले होते, पण किष्किंधेच्या राजाला मात्र आमंत्रण नव्हते हे येथे उल्लेखनीय आहे. आर्य लोक त्यांना 'वानर' म्हणत. हे वानर म्हणजे एक मानववंशच. वानरांचा तोंडवळा, राहणीमान नागर आर्यांपेक्षा वेगळे असले तरी आर्य संस्कृतीचाच तो एक वेगळा कप्पा होता. उन्हापावसाची पर्वा न करता रानावनात हिंडणे, निवाऱ्याची आवश्यकता नसणे, शिजलेल्या अन्नाऐवजी फळांनी पोट भरणे इत्यादी वानरसदृश चेष्टितांमुळे कदाचित् त्यांना वानर म्हणत असावेत. किंवा वानरबहुल प्रदेशात वास्तव्य असल्यामुळेही त्यांना 'वानर' संज्ञा मिळाली असावी. पण काही झाले तरी ते मानवच होते. तरीही आर्यावर्तापासून तुटलेले होते. आर्य-वानरात कधीही सख्य नव्हते. रोटीबेटीव्यवहार तर दूरच पण एकूणच, उत्तर-दक्षिण जम्बुद्वीपात मानसिक दुरावा होता. अशा तऱ्हेने दुभंगलेल्या देशावर हल्ला करणे शत्रूला सोपे जातेच. मुत्सद्दी रावणाने नेमका ह्याचाच फायदा घेतला होता आणि म्हणूनच, सुशासन आणि सुबत्ता असूनही जम्बुद्वीप वासीयांना शेकडो मैल दूर असणाऱ्या रावणाची दहशत वाटत होती. थोडक्यात सांगायचे तर रामजन्माआधी संपूर्ण जम्बुद्वीप आतून पोखरलेले होते.
पं. सातवळेकरांच्या मते, 'रामायणकथा हा चार मानववंशांच्या संबंधाचा इतिहास आहे.' देव, मानव, राक्षस व वानर हे ते चार वंश. वालीशी सख्य करून रावणाने वानरांचे पाठबळ मिळविले होते आणि देव + मानव विरुद्ध राक्षस + वानर अशा ह्या संघर्षांत राक्षसांचे पारडे जड होते. वानर मुळात अत्याचारी वा आततायी नव्हते. ती एक शूर पण भाबडी जमात. योग्य वाट दाखविणारा त्यांना कुणी लाभला नव्हता, म्हणून तर वाली रावणाकडे खेचला गेला. त्याच्या शब्दव्यूहात अडकला. येथे रामाचे कर्तृत्व हे की त्या वानरांना त्याने आधी आपलेसे केले. (केवट, गुह, शबरी इत्यादिकांशीही रामाची वागणूक आपुलकीची होतीच.) समाजातली उच्च - नीचतेची दरी श्रीरामाने बुजवली, वानरांना जवळ केले आणि अत्याचारी रावणाची अर्धी शक्ती कमी केली. जे पूर्वीच्या अनेक पिढ्यांना शक्य झाले नव्हते ते 'रामराज्य' श्रीरामाने स्थापित केले! - (शेतीशिवाय इतर काहीही न जाणणाऱ्या मावळ्यांना हाताशी घेऊन, त्यांच्या मनात स्वराज्यस्थापनेचा स्फुल्लिंग चेतवून हिंदुपदपातशाही स्थापणाऱ्या शिवछत्रपतीला माता जिजाऊने ह्या रामाची कथा ऐकवूनच घडविले होते ना!) हेच श्रीरामाच्या परमेशत्वाचे मर्म.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day3 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
Wednesday, April 10, 2024
प्रभाते मनी राम चिन्तीत जावा
लोकाभिराम श्रीराम 🙌
श्रीराम प्रभूंचे चरित्र हा समस्त भारतीयांच्या विचारविश्वाचा,
भावविश्वाचा केंद्रबिंदू. आबालवृद्ध, सुशिक्षित-अशिक्षित, आस्तिक- नास्तिक, सश्रद्ध-अश्रद्ध-सर्वांच्याच मनात रामाला काही ना काही तरी स्थान आढळतेच. अगदी पाश्चात्य विचारधारेने ज्यांचे अंत:करणच पाश्चात्यीभूत झालेले असते त्यांनाही सश्रद्ध भारतीयांच्या अंत:करणात विराजमान झालेल्या रामप्रभूंच्या मूर्तीचे भंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यातच मोठा पुरुषार्थ वाटतो. मग स्वतःच्या बुद्धीची परिसीमा गाठणाऱ्या चिकित्सक बुद्धिमंतांना याच प्रभुचरित्राचा पुनश्च धांडोळा घेऊन त्याचे एक नवेच रूप लोकांसमोर मांडण्यात कृतकृत्यता वाटावी यात काय नवल ?
याच मालिकेतील एक अगदी अलीकडचा यशस्वी प्रयत्न म्हणजे
नागपूरच्या सुप्रसिद्ध संस्कृत विदुषी डॉ. लीना रस्तोगी यांचे 'मला उमजलेला राम' हा चिमुकला ग्रंथ. 'चिमुकला' असे म्हटले ते याच्या जेमतेम ७०पृष्ठव्याप्तीकडे पाहून. पण सूत्रं जशी 'अल्पाक्षर' पण 'सारगर्भ' असतात त्याप्रमाणे या लेखांमधून ही 'अनंता हरिकथा', तिचे अनंत पैलू आकळण्याचा अत्यंत प्रभावी प्रयत्न केला आहे.
पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा प्रभू श्रीराम आणि त्यांचे चरित्र आदिकवी वाल्मीकीने लिहिले आहे. ते 'रामायण' या नावाने प्रसिद्ध आहे. वाल्मीकीचा श्रीराम जसा थोर आहे, आदर्श आहे, तसा एक मानवही आहे. वाल्मीकीने त्याला ईश्वर बनविले नाही. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' म्हणजे 'मी स्वतःला दशरथाचा पुत्र राम समजतो', हे वचन वाल्मीकीने रामाच्या तोंडी घातलेले आहे. श्रीराम मानव असल्यामुळे त्याचे जीवन सामान्य मानवी भावभावनांनीही युक्त आहे. श्रीरामाला दुःख झालेले आहे. श्रीरामाला क्रोध आलेला आहे. सोन्याचा मृग पाहून त्याला मोहही झाला आहे आणि श्रीरामाने विनोदही केला आहे. पण या भावभावनांच्या आहारी मात्र ते गेले नाही. त्यांच्यावर मात केली म्हणून ते श्रेष्ठ आहे. म्हणून पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा श्रीराम आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day1 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
Monday, February 26, 2024
न पाठवलेलं पत्र : महात्रया रा
Saturday, January 20, 2024
मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श राजा
Thursday, January 18, 2024
मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श मित्र
श्रीरामचंद्रांनी ज्यांना स्वतःच्या बरोबरीचें स्थान देऊन आपले मित्र मानले होते अशा दोन व्यक्ति रामायणात आहेत. एक निषादाधिपति गुह आणि दुसरा वानरराज सुग्रीव हे होते. राजा गुहाची आणि रामचंद्रांची प्रगाढ मैत्री महर्षि वाल्मीकींनी,
तत्र राजा गुहो नाम रामस्यात्मसमः सखा ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ५०
या शब्दांनी व्यक्त केलेली आहे. राजा गुह स्वतः श्रीरामांवरील आपल्या प्रेमासंबंधी असें म्हणतो की,
न हि रामात्प्रियतमो ममास्ते भुवि कश्चन ।
ब्रवीम्येव च ते सत्यं सत्येनैव च ते शपे ॥
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ५१
या संपूर्ण विश्वात रामाइतकें मला दुसरें कोणीही प्रिय नाही.रामा, मी तुला सत्याचीच शपथ घेऊन सांगतो. रामचंद्रांचेंही गुहावर असेंच अत्यंत प्रेम आहे. वनवासातून आपण परत आल्याची पहिली वार्ता गुहालाच सांगण्याची ते हनुमंताला आज्ञा देतात. त्याच्या संबंधीचें आपलें प्रेम व्यक्त करताना ते म्हणतात :-
श्रुत्वा तु मां कुशलिनमरोगं विगतज्वरम् ।
भविष्यति गुहः प्रीतः सममात्मसमः सखा ।।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२५
मी निरोगी, तापरहित व चांगल्या स्थितीत आहे हे ऐकून गुहाला अत्यंत आनंद होईल. कारण मी माझ्यावर जितकें प्रेम करीत असेन तितकेंच गुहावर करतो. तो माझा सखा आहे.
उपकारफलं मित्रं विदितं मे महाकपे ।।
वालिनं तं वधिष्यामि तव भार्यापहारिणम् ।
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ५
मैत्रीचें फळ एकमेकांच्या उपयोगी पडणें हेंच आहे. म्हणून तुझ्या स्त्रीचें अपहरण करणाऱ्या वालीचा मी वध करीन. त्याच्या दुःखाशी श्रीराम इतके एकरूप झालेले आहेत आणि त्याच्या दुःखाचा अंत करण्याची इच्छा त्यांच्या अंत:करणात इतकी बळावलेली आहे. दोघे अशा प्रकारे बोलत असताना हनुमंताने दोघांना जरा थांबायला सांगितले. त्याने आपल्या एकदोन मित्रांना पाठवले आणि पटपट त्या ठिकाणी सामग्री आली. हनुमंताने लगेच त्या ठिकाणी एक वेदी बनवली, अग्नीची स्थापना केली आणि पुरोहित बनले. हनुमंतांना सगळ्या भूमिका पार पाडता येतात. त्याने दोघांच्या हातांत फुले दिली, पूजेची सामग्री दिली. राम आणि सुग्रीव यांनी अग्नीची पूजा केली, अग्नीभोवती परिक्रमा केली. दोघांनी अग्नीपुढे मैत्रीची प्रतिज्ञा केली 'देव ब्राह्मणअग्नि संनिधौ ।' यातून हनुमंतांना नेमके काय साधायचे होते? त्यांना मैत्रीचा करार करायचा नव्हता, तर सख्यत्वाचा संस्कार करायचा होता. करार मोडला जातो, संस्कार मोडला जात नाही. कराराला दोन्ही पक्ष तोपर्यंतच बांधील असतात जोपर्यंत एकजण नियम मोडत नाही. एकाने करार मोडला की, दुसरा मनुष्य करार मोडायला तयार असतो.
यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसो सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नभः॥
चन्द्रमा रजनी कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् ।
त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप ॥
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ३९
इंद्राने वर्षाव करणें, सूर्याने अंधार नाहीसा करणें आणि चंद्राने आपल्या ज्योत्स्नेने रात्र उजळणें हें जितकें स्वाभाविक तितकेंच
तुझ्यासारख्या मित्रांनी आपल्या मित्राचें प्रेम संपादन करण्यासाठी
जिवाचें रान करणें हें स्वाभाविकच आहे. आणि अखेरीस रामचंद्रांच्या बरोबरच राजा सुग्रीवाने सुद्धा शरयूप्रवेश करून आपल्या प्रगाढ मैत्रीचा अमर शिलालेख जगाच्या इतिहासाच्या पृष्ठभागावर टाकलेला आहे. या रामनिर्याणाच्या प्रसंगी या दोन अभूतपूर्व मित्रांच्या मित्रत्वाचें शब्दचित्र रेखाटताना महर्षि वाल्मीकि म्हणतात:--
एतस्मिन्नन्तरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः ।
प्रणम्य विधिवद्वीरं विज्ञापयितुमुद्यतः ।।
अभिषिच्याङगदं वीरमागतोऽस्मि नरेश्वर ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ।।
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो रमयतां वरः ।
वानरेन्द्रमथोवाच मैत्रं तस्यानुचिन्तयन् ।।
सखे शृणुष्व सुग्रीव न त्वयाहं विनाकृतः ।
गच्छेयं देवलोकं वा परमं वा पदं महत् ।।
वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड, सर्ग १०८
याच वेळी सुग्रीवाने रामचंद्रांना वंदन करून सांगितलें की, अंगदाला राज्याभिषेक करून मी आलो आहे. तुमच्याच मागोमाग देवगतीला येण्याचा मी निश्चय केलेला आहे. त्याचे ते उद्गार ऐकताच त्याचें मित्रत्व आठवून राम म्हणाले, " मित्रा, सुग्रीवा! आपला आजवर कधीच वियोग झालेला नाही. देवलोकाला अथवा परमदालाही आपण बरोबर कसें जाणार नाही ?” राजद्वारापासून स्वर्गद्वारापर्यंत ज्यांच्या सहजीवनात कधीच खंड पडलेला नाही असें हें सुग्रीव व राम यांचें सौहार्द मानवतेच्या इतिहासात अनन्वय अलंकाराचे उदाहरणच गणलें जाईल. म्हणूनच म्हणतात सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला.
जय श्रीराम 🚩🚩
सर्वेश फडणवीस
#मर्यादापुरुषोत्तम #श्रीराम #लेखमाला #day3
Tuesday, January 16, 2024
मर्यादा पुरुषोत्तम : आदर्श बंधु
लक्ष्मण व शत्रुघ्न हे बंधुत्वाचे सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. पण भरताचा त्याग गोस्वामी तुलसीदासांच्या प्रतिभेला तर श्रीरामापेक्षाही अधिक पूजार्ह वाटला आहे. तरीही रामचंद्रांच्या चरित्राचा जो जो विचार करू लागावें तो तो याही बाबतीत,
तेषां केतुरिव ज्येष्ठो रामः सत्यपराक्रमः
हा महर्षि वाल्मीकींचा अभिप्रायच मनावर ठसू लागतो. “ तुझ्या- ऐवजी भरताला हें राज्य द्यावें असें राजाच्या मनात आहे,” असें कैकेयीने म्हणताच रामचंद्र म्हणतात :-
अहं हि सीतां राज्यं च प्राणानिष्टान्धनानि च ।
हृष्टो भ्रात्रे स्वयं दद्यां भरताय प्रचोदितः ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग १९
भरताला हें राज्य देण्यासाठी स्वतः महाराजांनी मला आज्ञा करण्याचे काहीच कारण नाही. भरताला माझ्या अधिकार- क्षेत्रातली जी वस्तु हवी असेल ती मी त्याच्या ताब्यात देईन. मला नुसतें कळण्याचाच अवकाश आहे. राज्य, सीता, फार तर काय पण माझे प्राणही मी भरताच्या सहज स्वाधीन करीन. राज्यासाठी भरताला ठार मारण्याची इच्छा बोलून दाखविणाऱ्या लक्ष्मणाला रामचंद्रांनी जें उत्तर दिले आहे त्यात त्यांच्या बंधु- वात्सल्याचे संपूर्ण प्रतिबिंब उमटलें आहे. ते म्हणतात :-
यद् द्रव्यं बान्धवानां वा मित्राणां वा क्षये भवेत् ।
नाहं तत्प्रतिगृह्णीयां भक्ष्यान्विषकृतानिव ॥
धर्ममर्थं च कामं च पृथिवीं चापि लक्ष्मण ।
इच्छामि भवतामर्थे एतत्प्रतिशृणोमि ते ।।
भातॄणां संग्रहार्थं च सुखार्थं चापि लक्ष्मण ।
राज्यमप्यहमिच्छामि सत्येनायुधमालभे ।।
कथं न पुत्राः पितरं हन्युः कस्यांचिदापदि ।
भ्राता वा भ्रातरं हन्यात् सौमित्रे प्राणमात्मनः ।।
- वाल्मीकि रामायण, अयोध्याकाण्ड, सर्ग ९७
मित्र वा बांधव यांचा नाश करून जी संपत्ति मिळणार असेल ती मी कधीच घेणार नाही. विषमिश्रित अन्नाप्रमाणे ती सर्वस्वी त्याज्य आहे. लक्ष्मणा ! धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची माझी साधना अथवा पृथ्वी देखील मला केवळ तुमच्याचसाठी हवी आहे हें मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो. मी शस्त्रावर हात ठेवून तुला सत्य सांगतो की, बंधूंमध्ये सदैव एकता नांदावी व तुम्ही सुखी असावें एवढ्याचसाठी केवळ मी राज्याची इच्छा करीन, आपत्तीत पुत्रांनी पित्याला मारावें किंवा आपत्ति आली म्हणून आपल्या प्राणांसारख्या प्रिय बंधूंवर कोणी प्राणघातक वार करावा काय. वनवासातून परत येताना भरद्वाजाच्या आश्रमातून हनुमंताला अयोध्येला जावयास सांगताना ते म्हणतात :-
भरतस्तु त्वया वाच्यः कुशलं वचनान्मम ।
सिद्धार्थं शंस मां तस्मै सभार्यं सहलक्ष्मणम् ॥
एतच्छ्रुत्वा यमाकारं भरतो भजते ततः ।
स च ते वेदितव्यः स्यात् सर्वं यच्चापि मां प्रति ।।
ज्ञेयाश्च सर्वे वृत्तान्ता भरतस्येङ्गितानि च ।
तत्त्वेन मुखवर्णेन दृष्ट्या व्याभाषितेन च ।।
सर्वकामसमृद्धं हि हस्त्यश्वरथसंकुलम् ।
पितृपैतामहं राज्यं कस्य नावर्तयेन्मनः ।।
संगत्या भरतः श्रीमान् राज्येनार्थी स्वयं भवेत् ।
प्रशास्तु वसुधां सर्वामखिलां रघुनन्दनः ।।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२५
भरताला माझें कुशल सांगून सीता आणि लक्ष्मणासहित मी प्रतिज्ञा पार पाडत परत आल्याचे सांग. ही वार्ता कानावर पडताच भरताच्या चेहऱ्यावर काय सूक्ष्म छटा उमटतात त्या तू नीट पाहिल्या पाहिजेस. त्याच्या हालचालींवरून, मुखवर्णावरून, दृष्टीत पडणाऱ्या फरकांवरून व उद्गारांवरून त्याच्या अंतरंगातील खरे भाव तुला ओळखता आले पाहिजेत. सर्व इच्छा पुरविण्या इतकें समर्थ, हत्ती, अश्व, रथ इत्यादिकांनी गजबजलेलें पितृपितामहांचें राज्य कुणाचें मन विचलित करणार नाही. राज्य चालविण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे भरताला जर इतके दिवस स्वतः राज्यपद घेण्याची इच्छा झाली असेल तर त्याने सर्व पृथ्वीचें राज्य करावे अशीच माझी इच्छा आहे. केवळ भरताने प्राण त्यागाची सिद्धता केल्यामुळेच रामांनी राज्यपदाचा स्वीकार केला. त्यांनी स्वतः लक्ष्मणाला म्हटल्याप्रमाणे केवळ बंधुसाठीच त्यांनी राज्य स्वीकारले. स्वतःचा हक्क म्हणून ते त्यांना नको होते.
भरतांचे रामावरील प्रेमही तितकेच अलोट आहे. पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांचे प्रेम व्यक्तिनिष्ठ नाही. श्रीभरतांचा स्वभाव प्रभु रामचंद्रांसारखा आहे. ते भगवान रामचंद्रांवर प्रेम करतात याचे कारण त्यांना आपल्या बालपणापासून एक गोष्ट जाणवलेली आहे की, आपला वंश हा अत्यंत श्रेष्ठ लोकांचा वंश आहे. स्वतःच्या वंशाचा गौरव जीवनात असावा. ज्यांच्या अंत:करणामध्ये स्वत:च्या वंशाचा गौरव नांदतो त्यांचेकडून जीवनात मोठमोठी कामे होतात आणि मोठमोठ्या चुका त्यांचेकडून घडत नाहीत. वंशाचा गौरव त्यांच्या चुकांच्या आड येतो. मी कोणाच्या घराण्यात जन्माला आलो ही गोष्ट त्यांच्या डोळ्यांपुढे नेहमी असते. भगवान श्रीरामचंद्रांना आणि भरतांना आपल्या वंशाचा अत्यंत मोठा गौरव आहे. दोघांना ठाऊक आहे की, आपल्या पूर्वजांमध्ये, आपल्या वंशात जन्माला आलेल्या प्रत्येक राजामध्ये कोणत्या ना कोणत्या दोन-चार गुणांचा प्रकर्षाने आविष्कार होता. राजा हरिश्चंद्रामध्ये सत्यनिष्ठा आहे, राजा दिलीपांच्यामध्ये गुरुभक्ती आणि गोभक्ती आहे, राजा रघूंच्यामध्ये पराक्रम आणि दानशीलता आहे. अशा प्रकारे प्रत्येकाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे. आणि भरतांना हेदेखील ठाऊक आहे की, माझ्या श्रीरामांमध्ये केवळ एकदोनच नव्हे, तर माझ्या पूर्वजांचे सगळे सद्गुण आणि त्याच्याव्यतिरिक्त अनेक सद्गुण पूर्णतेला पोहोचलेले आहेत. म्हणून श्रीरामचंद्रांना 'रघुवंशाची कीर्तिपताका' असे संबोधिले आहे. आणि म्हणून भरत श्रीरामचंद्रांच्या चरणी समर्पित आहेत. बंधू प्रेमाचे हे सर्वोत्तम आदर्श आहेत.
जय श्रीराम 🚩🚩
सर्वेश फडणवीस