Tuesday, April 16, 2024

तद् वनं भविता राष्ट्रम्

प्रतिभावान कवींच्या कल्पनाशक्तीला 'कैकेयी' ह्या एकाच पात्राने भरपूर खाद्य पुरविले आहे. गीतरामायणकारांनी भरताच्या तोंडून 'माता न तू वैरिणी' असे वदविले तर भासासारख्या श्रेष्ठ नाटककाराने तिला त्यागाचा आणि मातृत्वाचा आदर्श बनविले आहे. पुत्रविरहाने मृत्यू होण्याचा शाप दशरथाला होता. तेव्हा रामाच्या मृत्यूमुळे तसे न होता फक्त 'विरहाने' व्हावे म्हणूनव सिष्ठांच्या सल्ल्याने कैकेयीने रामाला वनवासाला पाठविले आणि सर्वांचा रोष ओढवून घेऊनही रामाचे प्राण वाचविले असे भासाने रंगविले.

कैकेयी 'त्यागमूर्ती' होती की 'वैरिणी' ? वाल्मीकिरामायणातली कैकेयी मात्र या दोन्ही टोकांना स्पर्श करत नाही. ती मुळात निष्पापच आहे. रामावर तिचे मनापासून प्रेम आहे आणि रामाचा राज्याभिषेक तिला अपेक्षितच होता. म्हणून तर ती बातमी मिळताच ती आनंदली. पुढे मंथरा म्हणाली की “अगं, आनंदित काय होतेस ? राज्याभिषेक भरताचा नाही, रामाचा आहे!” तेव्हाही तिचे उत्तर आहे की 'रामे वा भरते वाऽहं विशेषं नोपलक्षये।' शिवाय रामाच्या सद्गुणांवर तिचा पूर्ण विश्वास आहे. तिच्या मनात विष कालवले ते मंथरेने. तिनेच तिला दशरथाकडे 'उधार' असलेल्या वरांबद्दल भरीस घातले. राम राजा झाल्यावर तुझी दुर्दशा होईल असे भयंकर भडक चित्र तिच्यासमोर रेखाटले. त्यांच्या अस्तित्वात नसलेल्या सवतीमत्सराचे काल्पनिक वर्णन करून, राजमाता झाल्यावर कौसल्या तुझा सूड उगवेल ही भीती घातली आणि जुन्या वरांची आठवण करून दिली - मग मात्र कैकेयी बिथरली. 

आपले बोट चाकाच्या आसात घालून ते सावरले अशी कथा सांगितली जाते. त्यातले सार हेच की ती सारथ्यकर्मकुशल होती आणि मोडलेले चाक दुरुस्त करण्याचेही ज्ञान तिला होते, म्हणून ऐन रणधुमाळीतही स्वतःचे प्राण धोक्यात घालून तिने दशरथाचा रथ ताब्यात घेतला आणि त्याला सुखरूप छावणीत पोचवले. पतीचे प्राण वाचविणे हा मुळी धर्मच आहे अशी तिची धारणा. त्यात आपण विशेष काही केले असे तिला वाटतच नाही. म्हणून, दशरथाने तिला देऊ केलेले वरही तिने हसून नाकारले. आधीच रूपवती, त्यात प्राणदायिनी म्हणून ती दशरथाला अधिकच प्रिय झाली. कैकेयी मात्र दशरथाच्या व चारही मुलांच्या प्रेमातच मग्न होती. तृप्त, संतुष्ट होती. अशी वाल्मीकीने रंगविलेली कैकेयी थोडी अल्लड आहे, पण राक्षसी महत्त्वाकांक्षा तिच्यात नाही. मंथरेने आठवण करून दिली तोपर्यंत त्या दोन वरांचीही गोष्ट ती विसरून गेली होती. पण तरीही रामाच्या वनवासगमनाला आणि दशरथाच्या मृत्यूला मात्र तीच कारणीभूत ठरली. मंथरेने केलेल्या बुद्धिभेदामुळे. 

वनवासाची सूचना ऐकूनही राम अविचलच राहिला आहे. उलट, वनात राहून मुनिजनांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने कैकेयीचे उपकारच मानले. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता जोपासण्याची आणि त्यातून मार्ग काढून कर्तव्यांना नवे आयाम देण्याची ही रामाची वृत्ती नुसती मननीयच नाही तर अनुकरणीयही आहे. 'राजा हा प्रजेचा उपभोगशून्य रक्षक असतो' हीच प्रभु रामाची धारणा. भरतही माझ्याप्रमाणेच प्रजेला सुखात ठेवील ही खात्रीही रामाला होती. त्यामुळे सिंहासनावर कुणी का बसेना, रामाला काहीच फरक वाटला नाही. अनासक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समदृष्टी ह्यांचे इतके वेधक रसायन इतरत्र कुठे दिसणार? भरताबद्दल रामाला वाटणारी खात्री त्याने पुढे चित्रकूटावर लक्ष्मणापाशी बोलूनही दाखविली आहे आणि रामाच्या वनवासकालात राज्याची भरभराट करून, रामाला वाटणारा भरवसा अनाठायी नव्हता हे भरतानेही सिद्ध केले आहे. अहर्निश राष्ट्राचीच चिंता करणारे शासक असले,तर रामराज्य कलियुगातही अवतरू शकेल.

अयोध्येला शोकसागरात लोटून राम निघाला. आता अयोध्याच विस्तारणार होती. सर्व राष्ट्रच आता 'अ'योध्य होणार होते, कारण राक्षसी आतंक संपणार होता. राजप्रासादातील अन्य कोणतीही वस्तू न घेता फक्त आपले परमप्रतापी कोदंड घेऊन राम निघाला. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीरामजन्मभूमीवर झालेले भव्य श्रीराम मंदिर आणि श्रीरामललाचा कोदण्डधारी विग्रह हे याचेच द्योतक तर नव्हे. आता - तद् वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day8 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

No comments:

Post a Comment