Tuesday, June 29, 2021
शाळेच्या सुखद आठवणी !!
Wednesday, June 23, 2021
जाणता राजा !! 🚩🚩
Saturday, June 19, 2021
तरलतरतरंगे देवि गंगे प्रसीद..
Monday, June 14, 2021
गगन भरारी घेणारे - श्री.अमित वाईकर..
आज 'पुढे पडलेले मराठी पाऊल' या लेखमालेत ज्यांच्याबद्दल लिहायला घेतो आहे ते आहेत श्री.अमित वाईकर. शब्दशः खऱ्या अर्थाने हे पुढे पडलेले मराठी पाऊल आहे असे म्हणावेसे वाटते. आज मराठी माणसाने जगभरात आपला झेंडा फडकवला आहे. २३ एप्रिल २०२१ हा दिवस आजही कायम स्मरणात आहे. machinmaker मधील त्यांच्या कार्यावरील लेख वाचनात आला आणि क्षणात भारावून गेलो. मग गूगल गुरू ची मदत घेत त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली. यु ट्यूबवरील मुलाखत बघितल्या आणि श्री.अमित वाईकर या नावाने मनावर गारुड निर्माण केले. आज गगन भरारी घेणारे श्री.अमित वाईकर हे मूळ नागपूरचे आहेत हे सांगायला आनंद होतो.
श्री.अमित वाईकर आज सोशल मीडियावर नाही. पण त्यांच्या पत्नी सौ.अपर्णा वाईकर यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या मदतीने सहज संवाद घडला तो थेट नागपूर आणि शांघाय. खरंतर हे अंतर म्हणावे तसे सोपे नाही पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा लक्षात आलं पृथ्वी गोल आहे आणि जग जवळ आहे. कारण संवाद साधत असतांना अनेक गोष्टी जुळत गेल्या आणि पुढे सव्वा तास जो संवाद घडला त्यातून त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतांना प्रचंड भारावून गेलो. आपणांस ही नक्कीच अभिमान वाटेल असे हे व्यक्तिमत्त्व आहे.
श्री.अमित वाईकर आज डोहलर ग्रुप या बलाढ्य जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून शांघायमधून कार्यरत आहे. नागपूर- मुंबई-पुणे-दिल्ली-जर्मनी-शांघाय आणि आता काही दिवसांत थायलंड हे नवे मुक्कामाचे ठिकाण त्यांचे असणार आहे. २०१९ सालचा ‘प्रवासी भारतीय सन्मान’ हा पुरस्कार त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चीनमधील पहिला प्रवासी भारतीय,तो ही उद्योग क्षेत्रात आणि एका मराठी नागपूरकर व्यक्तीला मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रात अर्थात वाराणसी येथे मिळणे म्हणजे भाग्योदयच म्हणावे लागेल. काशी विश्वनाथाच्या नगरीत या सन्मानाने गौरविण्यात येणारे ते पहिले मराठी व्यक्ती आहे. खरंतर अनेकांचे स्वप्न असते एकदा तरी प्रत्यक्ष पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींना जवळून बघावे, त्यांना भेटावे पण श्री.अमित वाईकर प्रत्यक्ष भेटले आणि त्यांच्या सोबत पंगतीला जेवायला सुद्धा बसले. त्यावेळेच्या विदेश मंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या बाजूला भोजनाचा आस्वाद घेणे म्हणजे स्वर्ग ही ठेंगणे झाले असावे हीच अनुभूती त्यांची झाली असावी. खरंतर हे सगळं वर्णन ऐकतांना सुद्धा भारावून गेलो होतो. आज जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षात भारत आणि उर्वरित जग यांची एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे आणि या बदलत्या चित्राचा एक भाग म्हणजे अनिवासी भारतीयांच्या संघटित शक्तीचा उदय आहे असेच म्हणता येईल. २०१४ नंतर यात जो बदल घडत आहे त्याचे साक्षीदार आपण आहोंत.
श्री.अमित वाईकर यांच्याशी संवाद साधत असतांना त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान याच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. खरंतर हे क्षेत्र माझ्यासाठी नवे होते. त्यांच्याकडून जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,"भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी मुख्यत: बदलली, ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात. या बदलाचे ते शिल्पकार आहेत. अनिवासी भारतीय जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक आहेत; त्यांच्या अनुभवाचा,ज्ञानाचा,संपर्काचा आपल्या देशासाठी कसा वापर करून घेता येईल,याचा विचार पहिल्यांदा केला तो वाजपेयी यांनी. अनिवासी भारतीयांची संघटित शक्ती देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लावू शकते. ही दूरदृष्टी आणि व्यापक विचार अटलजींचा होता हे सहज लक्षात येईल आणि यातून प्रवासी भारतीय सन्मान ही संकल्पना सत्यात उतरली."
श्री.अमित वाईकर हे उर्दूचे गाढे अभ्यासक स्व.डॉ.विनय वाईकर यांचे पुत्र असून त्यांनी काही काळ शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे त्यांना अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शांघायमध्ये स्वागत करण्याचा मानही मिळाला होता. डोहलर ही १८० वर्षे वयाची जर्मन कंपनी आहे. दीड अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या कंपनीचे ते एक मुख्य घटक आहे. आज इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपुलकी,ममत्व आणि कायम सकारात्मक वलय निर्माण करणारे प्रेरणादायी व्यक्ती म्हणून श्री.अमित वाईकर यांची ओळख सार्थकी ठरेल.संवादातून सुद्धा विलक्षण प्रतिभासंपन्न कायम सकारात्मक आणि उत्साही उर्जावान असलेले जाणवत होते.'जे जे उत्तम उदात्त,उन्नत' या सावरकर उक्तीचा ध्यास घेतलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.अमित वाईकर.
त्यांच्या एका मुलाखतीत श्री.अमित वाईकर छान सांगतात, "भारतीयांची मल्टिटास्किंग अॅबिलिटी,मल्टिडायमेन्शनल थिंकिंग आणि कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांनी आणि जीवनमूल्यांनी दिलेलं एक स्थैर्य यामुळे व्यावसायिक संदर्भात कोणतंही आव्हान असो, त्याचा यशस्वी सामना करण्यासाठी आपण एकाच वेळी अनेक पर्यायांचा विचार करू शकतो आणि अशी अनेक आव्हानं एकाचवेळी पेलू शकतो. हे असं चौफेर विचारांचं भान आणि निर्णयक्षमतेचा आवाका आपली व्यवस्थाच आपल्याला देते. भारतीयांकडे असलेलं हे कौशल्य फार दुर्मीळ आहे आणि म्हणूनच ते कळीचं ठरतं आणि त्या जोरावरच आपण भारतीय यशस्वी होतो." हीच यशस्वीतेची व्याख्या ते गेली अनेक वर्षे सत्यात उतरवत आहेत.
आज गेली १२ वर्ष झाली चीनमध्ये काम करत असताना भारतातून इकडे येऊन या देशाशी व्यापारी किंवा अन्य संबंध जोडू इच्छिणाऱ्या देशबांधवांसाठी ते दुवा ठरले आहेत. दोन्ही देशांमधल्या परस्परसंबंधांमध्ये शांतता आणि सौहार्दपूर्ण संबंध राहावे यासाठी ते सतत प्रयत्नरत आहे. आज चीन शत्रू राष्ट्र आहे अशी ओरड असतांना ते म्हणतात,चीनमधल्या लोकांनी गेली कित्येक दशकं जगभरात जाऊन,यश मिळवून आपल्या संपर्कातून चीनला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत विशेष योगदान दिले आहे. बदलत्या काळाने देशसेवा आणि मायभूमीशी निष्ठा या संकल्पनांना कितीतरी वेगळे आयाम दिले आहेत आणि आज त्यांना ते अधिक महत्त्वाचे वाटतात. विदेशात असले तरी भारताशी,नागपूरशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि त्यांच्या मुलाखतीत ते नागपूरचा कायम उल्लेख करतात. नागपूरात दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगीतिक कार्यक्रम ते आयोजित करतात.
समाजाचे देण आपण लागतो या भावनेतून कायमच सामाजिक सेवेसाठी सदैव तत्पर असणारे श्री.अमित वाईकर आज दीपस्तंभ फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थेशी जुळून आहेत. दीपस्तंभ फाऊंडेशन संचालित मनोबल निर्माण अभियान या देशातील ३०० दिव्यांग,अनाथ,वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण,उच्च शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहे. आम्रपाली ,गर्जे मराठी,प्रहार यासारख्या संस्थांना सतत मदत करत आहेत. या टप्प्यावर मागे वळून बघतांना कृतज्ञतेची भावना त्यांच्या ठायी सहज जाणवते.
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।। प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या याच विचारांवर ते सतत पुढें मार्गस्थ होत आहेत. श्री.अमित वाईकर यांची वाटचाल अशीच उत्तरोत्तर गगन भरारी घेणारी दिग्विजयी व्हावी हीच सदिच्छा आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख१०
Thursday, June 10, 2021
अंकुर चे बीजनिर्माते : श्री.रवी काशीकर - श्री. माधव शेंबेकर
Monday, June 7, 2021
प्रसन्न पटवर्धन - 'प्रसन्न' अनुभव देणारी 'पर्पल'
Thursday, June 3, 2021
पूर्णब्रह्मची अन्नपूर्णा जयंती कठाळे
आज महाराष्ट्रीयन विशेषतः मराठी जेवणाला जागतिक स्तरावर नेण्यात त्यांचे विशेष योगदान आहे. पिझ्झा, पास्ता,इटालियन च्या जमान्यात पुरणपोळी याला जगात सर्वोत्तम खाद्य करण्याचें धाडस २००६ साली त्यांनी केले. सुरुवातीला घरातूनच त्यांनी खाद्य पदार्थ देणे सुरू केले परंतु प्रत्यक्षात हे स्वप्न हॉटेलच्या रुपात २०१२-१३ साली सुरू झाले. खरंतर सहा वर्षे ही संकल्पना सत्यात उतरायला लागली आणि अमेरिकेत एका स्पॅनिश शेफ ने स्वतः पुरणपोळी करत पूर्णब्रह्म आज खऱ्याअर्थाने जगन्मान्य झाले आहे.
१४ वर्ष आयटीमध्ये नोकरी करणारी, चांगला पगार असलेली अनेक वर्षं परदेशातही राहिलेल्या जयंती ताई आहे. पण महाराष्ट्रीयन पुरणपोळी, थालीपीठ, वरण-भात यांसारखे घरात होणारे पदार्थ त्यांना स्वस्थ बसू देईना. बाहेर देशात किंवा हॉटेलमध्ये गेल्यावर चायनीज, पंजाबी, इटालियन असे वाटेल ते पदार्थ खाण्यापेक्षा माझ्या मातीत होणारे, घरची चव देतील असे पदार्थ माझ्या देशात आणि परदेशात का पोहोचवू नयेत या गोष्टीने त्या अस्वस्थ झाल्या. पुढे कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच एक दिवस तिने आयटीतील सुखाची नोकरी सोडण्याचे ठरवले आणि बंगलोर मध्ये ‘पूर्णब्रह्म’ उदयास आले . मराठी माणसाकडे स्वयंपाकातील इतकी चांगली कला आणि परंपरा असताना ते पदार्थ अमराठी माणसांपर्यंत आणि विशेषतः परदेशात का पोहोचू नयेत या एकाच ध्येयाने जयंती ताईंचा प्रवास सुरु झालाय. आमचा संवाद सुरू होता तो सुद्धा त्यांच्या किचनमधून. फोन स्पिकरवर आणि त्या काम करत होत्या. कारण मला मिक्सरचा,भांड्याचा आवाज येत होता आणि न राहवता मी शेवटी विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की,'तुझ्याशी बोलतांना माझा स्वयंपाकही सुरू आहे.' जिद्द,चिकाटी आणि परिश्रम हीच त्यांच्या यशस्वी जीवनाची किल्ली आहे. दीड तास बोलतांना त्यांच्या बोलण्यात करारीपणा आणि प्रसंगी सहजपणा जाणवत होता पण काहीतरी वेगळं करण्याचा ध्यास आणि जिद्द त्यांच्या बोलण्यातून मला जाणवत होती.
साधारणपणे नागपुरातील महाल भागात मध्यमवर्गीय,चाकोरीबद्ध कुटुंबात जडणघडण झाली असल्याने आजी, आई, काकू, आत्या, मामी, मावशी यांच्याकडून स्वयंपाकाची उपजत असणारी आवड त्यांना काहीतरी करण्याची ऊर्जा देणारी ठरली. हे सगळं करत असतानाच महिलांनी व्यवसायात यावे,त्यांनी स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी जयंती कठाळे विशेष प्रयत्नशील आहेत. येत्या काळात ५ हजार नवीन शाखा सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. परदेशातील मराठी माणसाला आपल्या देशाची कमी भासू नये म्हणून त्याला अगदी गरम तूप,भात आणि मेतकूट मिळावे यासाठी त्या अक्षरश: दिवस रात्र एक करत आहेत.
अनेकदा हॉटेलमध्ये आल्यावर लहान मुले खाण्यासाठी त्रास देतात. त्यांच्यासाठी पौष्टीक आणि तरीही वेगळ्या पद्धतीने तयार केलेले पदार्थ पूर्णब्रह्ममध्ये उपलब्ध आहेत. एकत्र कुटुंबात असल्याने त्यांना कौटुंबिक श्रीमंती लाभली आहे. आपले हॉटेल चालविण्यापासून ते देशातील आणि परदेशातील महिलांना पूर्णब्रह्मच्या शाखा सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना सगळीकडे त्या फक्त नऊवारी नेसून फिरत आहेत. आयटीमध्ये असतांना आधी फॉर्मल शर्ट आणि पँट घालणारी महिला मागच्या काहीं वर्षांपासून अचानक सतत नऊवारीमध्ये कशी राहू शकते, तेही या काळात. असा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्या म्हणतात, हे माझ्या एकटीचे श्रेय नाही. माझ्या लहान मुलांपासून ते मला प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा या बदलामध्ये मोलाचा वाटा आहे आणि आज पूर्णब्रह्मची नऊवारी नेसलेली जयंती कठाळे विश्वविक्रमी वाटचाल करत आहेत.
आज आपल्या व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा विचार करणार्या जयंती कठाळे यांचा ‘फ्रँचायझी’ देतानाही महिलांना प्राधान्य देण्याकडे कल असतो. काही वर्षे इन्फोसिस मध्ये काम केल्याने त्यांच्या आदर्श म्हणजे ‘इन्फोसिस’च्या संस्थापिका सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती आहेत. सुधा मूर्ती यांनी जयंती कठाळे यांच्या आग्रहाखातर ‘पूर्णब्रह्म’ला भेट दिली आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. 'माझी रेणुका माऊली' हे बॅकग्राउंड असलेले गाणे आणि अनेकांना ते बघतांना कुणीतरी आपल्याघरी जेवायला आले की काय असे वाटत होते. इतका साधेपणा,सहजपणा व्हिडिओमध्ये जाणवत होता.
नवीन उद्योजकांनी उद्योग सुरू करण्याबद्दल त्या सांगतात,‘मोठे स्वप्न बघा. ते पूर्ण करण्यासाठी धडपड करा. वाटेत ठेच लागून खाली पडाल, तरीही उठून पुन्हा मार्गक्रमण करा. पुन्हा सर्व ताकदीनिशी उठा, सर्व प्रयत्न पणाला लावा.. यश नक्की तुमचेच होईल’ हा मूलमंत्र अनेक यशस्वी व्यावसायिक आणि उद्योजक देतात आणि स्वतःही त्याचे पालन करतात मी आजवर ज्यांच्याशी संवाद साधला ते याच वाटेवरून मार्गक्रमण करत आहे आणि आज सगळेजण यशोशिखरावर आहेत असेच एक मोठे स्वप्न उराशी बाळगून मराठमोळ्या अस्सल नागपूरी जयंती कठाळे या आज एक यशस्वी महिला उद्योजिका बनल्या आहेत.
'मराठी जेवण हे सगळ्या जगात पोहोचलं पाहिजे' या आपल्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी 'पूर्णब्रह्म' नावाचं मराठी रेस्टॉरंट सुरू करणाऱ्या जयंती कठाळे यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे. संवाद साधत असतांना त्यांनी त्यांची एक शायरी ऐकवली जी खूप आवडली त्या म्हणतात,
' गम ना कर जिंदगी बहुत बडी है
चाहत की महफिल तेरे लिए ही सजी है
एकबार मुस्कुराकर तो देख ,
तकदीर खुद तुझसे मिलने तेरे बाहर खडी है ।।'
✍️ सर्वेश फडणवीस
#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख७