Monday, June 14, 2021

गगन भरारी घेणारे - श्री.अमित वाईकर..

आज 'पुढे पडलेले मराठी पाऊल' या लेखमालेत ज्यांच्याबद्दल लिहायला घेतो आहे ते आहेत श्री.अमित वाईकर. शब्दशः खऱ्या अर्थाने हे पुढे पडलेले मराठी पाऊल आहे असे म्हणावेसे वाटते. आज मराठी माणसाने जगभरात आपला झेंडा फडकवला आहे. २३ एप्रिल २०२१ हा दिवस आजही कायम स्मरणात आहे. machinmaker मधील त्यांच्या कार्यावरील लेख वाचनात आला आणि क्षणात भारावून गेलो. मग गूगल गुरू ची मदत घेत त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली. यु ट्यूबवरील मुलाखत बघितल्या आणि श्री.अमित वाईकर या नावाने मनावर गारुड निर्माण केले. आज गगन भरारी घेणारे श्री.अमित वाईकर हे मूळ नागपूरचे आहेत हे सांगायला आनंद होतो.

श्री.अमित वाईकर आज सोशल मीडियावर नाही. पण त्यांच्या पत्नी सौ.अपर्णा वाईकर यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांच्या मदतीने सहज संवाद घडला तो थेट नागपूर आणि शांघाय. खरंतर हे अंतर म्हणावे तसे सोपे नाही पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा लक्षात आलं पृथ्वी गोल आहे आणि जग जवळ आहे. कारण संवाद साधत असतांना अनेक गोष्टी जुळत गेल्या आणि पुढे सव्वा तास जो संवाद घडला त्यातून त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेतांना प्रचंड भारावून गेलो. आपणांस ही नक्कीच अभिमान वाटेल असे हे व्यक्तिमत्त्व आहे.

श्री.अमित वाईकर आज डोहलर ग्रुप या बलाढ्य जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीचे उपाध्यक्ष म्हणून शांघायमधून कार्यरत आहे. नागपूर- मुंबई-पुणे-दिल्ली-जर्मनी-शांघाय आणि आता काही दिवसांत थायलंड हे नवे मुक्कामाचे ठिकाण त्यांचे असणार आहे. २०१९ सालचा  ‘प्रवासी भारतीय सन्मान’ हा पुरस्कार त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. चीनमधील पहिला प्रवासी भारतीय,तो ही उद्योग क्षेत्रात आणि एका मराठी नागपूरकर व्यक्तीला मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रात अर्थात वाराणसी येथे मिळणे म्हणजे भाग्योदयच म्हणावे लागेल. काशी विश्वनाथाच्या नगरीत या सन्मानाने गौरविण्यात येणारे ते पहिले मराठी व्यक्ती आहे. खरंतर अनेकांचे स्वप्न असते एकदा तरी प्रत्यक्ष पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदींना जवळून बघावे, त्यांना भेटावे पण श्री.अमित वाईकर प्रत्यक्ष भेटले आणि त्यांच्या सोबत पंगतीला जेवायला सुद्धा बसले. त्यावेळेच्या विदेश मंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या बाजूला भोजनाचा आस्वाद घेणे म्हणजे स्वर्ग ही ठेंगणे झाले असावे हीच अनुभूती त्यांची झाली असावी. खरंतर हे सगळं वर्णन ऐकतांना सुद्धा भारावून गेलो होतो. आज जागतिकीकरणानंतरच्या गेल्या पंचवीस वर्षात भारत आणि उर्वरित जग यांची एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदलत आहे आणि  या बदलत्या चित्राचा एक भाग म्हणजे अनिवासी भारतीयांच्या संघटित शक्तीचा उदय आहे असेच म्हणता येईल. २०१४ नंतर यात जो बदल घडत आहे त्याचे साक्षीदार आपण आहोंत.

श्री.अमित वाईकर यांच्याशी संवाद साधत असतांना त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान याच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. खरंतर हे क्षेत्र माझ्यासाठी नवे होते. त्यांच्याकडून  जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटलं. ते म्हणाले,"भारताकडे पाहण्याची जगाची दृष्टी मुख्यत: बदलली, ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात. या बदलाचे ते शिल्पकार आहेत. अनिवासी भारतीय जगाच्या वेगवेगळ्या भागात स्थायिक आहेत; त्यांच्या अनुभवाचा,ज्ञानाचा,संपर्काचा आपल्या देशासाठी कसा वापर करून घेता येईल,याचा विचार पहिल्यांदा केला तो वाजपेयी यांनी. अनिवासी भारतीयांची संघटित शक्ती देशाच्या प्रगतीला मोठा हातभार लावू शकते. ही दूरदृष्टी आणि व्यापक विचार अटलजींचा होता हे सहज लक्षात येईल आणि यातून प्रवासी भारतीय सन्मान ही संकल्पना सत्यात उतरली."

श्री.अमित वाईकर हे उर्दूचे गाढे अभ्यासक स्व.डॉ.विनय वाईकर यांचे पुत्र असून त्यांनी काही काळ शांघाय येथील इंडियन असोसिएशनचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे त्यांना अध्यक्षपदाच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शांघायमध्ये स्वागत करण्याचा मानही मिळाला होता. डोहलर ही १८० वर्षे वयाची जर्मन कंपनी आहे. दीड अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या कंपनीचे ते एक मुख्य घटक आहे. आज इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपुलकी,ममत्व आणि कायम सकारात्मक वलय निर्माण करणारे  प्रेरणादायी व्यक्ती म्हणून श्री.अमित वाईकर यांची ओळख सार्थकी ठरेल.संवादातून सुद्धा विलक्षण प्रतिभासंपन्न कायम सकारात्मक आणि उत्साही उर्जावान असलेले जाणवत होते.'जे जे उत्तम उदात्त,उन्नत' या सावरकर उक्तीचा ध्यास घेतलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री.अमित वाईकर.

त्यांच्या एका मुलाखतीत श्री.अमित वाईकर छान सांगतात, "भारतीयांची मल्टिटास्किंग अ‍ॅबिलिटी,मल्टिडायमेन्शनल थिंकिंग आणि कुटुंबातून मिळालेल्या संस्कारांनी आणि जीवनमूल्यांनी दिलेलं एक स्थैर्य यामुळे व्यावसायिक संदर्भात कोणतंही आव्हान असो, त्याचा यशस्वी सामना करण्यासाठी आपण एकाच वेळी अनेक पर्यायांचा विचार करू शकतो आणि अशी अनेक आव्हानं एकाचवेळी पेलू शकतो. हे असं चौफेर विचारांचं भान आणि निर्णयक्षमतेचा आवाका आपली व्यवस्थाच आपल्याला देते. भारतीयांकडे असलेलं हे कौशल्य फार दुर्मीळ आहे आणि म्हणूनच ते कळीचं ठरतं आणि त्या जोरावरच आपण भारतीय यशस्वी होतो." हीच यशस्वीतेची व्याख्या ते गेली अनेक वर्षे सत्यात उतरवत आहेत.

आज गेली १२ वर्ष झाली चीनमध्ये काम करत असताना भारतातून इकडे येऊन या देशाशी व्यापारी किंवा अन्य संबंध जोडू इच्छिणाऱ्या देशबांधवांसाठी ते दुवा ठरले आहेत. दोन्ही देशांमधल्या परस्परसंबंधांमध्ये शांतता आणि सौहार्दपूर्ण संबंध राहावे यासाठी ते सतत प्रयत्नरत आहे. आज चीन शत्रू राष्ट्र आहे अशी ओरड असतांना ते म्हणतात,चीनमधल्या लोकांनी गेली कित्येक दशकं जगभरात जाऊन,यश मिळवून आपल्या संपर्कातून चीनला महासत्ता बनवण्याच्या प्रक्रियेत विशेष योगदान दिले आहे. बदलत्या काळाने देशसेवा आणि मायभूमीशी निष्ठा या संकल्पनांना कितीतरी वेगळे आयाम दिले आहेत आणि आज त्यांना ते अधिक महत्त्वाचे वाटतात. विदेशात असले तरी भारताशी,नागपूरशी त्यांची नाळ जुळलेली आहे आणि त्यांच्या मुलाखतीत ते नागपूरचा कायम उल्लेख करतात. नागपूरात दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ सांगीतिक कार्यक्रम ते आयोजित करतात.

समाजाचे देण आपण लागतो या भावनेतून कायमच सामाजिक सेवेसाठी सदैव तत्पर असणारे श्री.अमित वाईकर आज दीपस्तंभ फाऊंडेशन सारख्या सामाजिक संस्थेशी जुळून आहेत. दीपस्तंभ फाऊंडेशन संचालित मनोबल निर्माण अभियान या देशातील ३०० दिव्यांग,अनाथ,वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण,उच्च शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्र म्हणून कार्यरत आहे. आम्रपाली ,गर्जे मराठी,प्रहार यासारख्या संस्थांना सतत मदत करत आहेत. या टप्प्यावर मागे वळून बघतांना कृतज्ञतेची भावना त्यांच्या ठायी सहज जाणवते.

नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।। प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या याच विचारांवर ते सतत पुढें मार्गस्थ होत आहेत. श्री.अमित वाईकर यांची वाटचाल अशीच उत्तरोत्तर गगन भरारी घेणारी दिग्विजयी व्हावी हीच सदिच्छा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#पुढे_पडलेले_मराठी_पाऊल #लेखमाला #लेख१०

1 comment:

  1. अमितला मी त्याच्या बालपणापासून ओळखतो म्हणू तो असा कर्तृत्ववान झाला याचं आश्चर्य नाही तर कौतुक आहे , अभिमान तर आहेच आहे .
    विनय वाईकर म्हणजे आमचे राजाभाऊ , यांचा उल्लेख केला तसा त्याची डॉ. वीणा वहिणींचाही उल्लेख आवश्यक होता कारण प्रत्येकावर पहिला चांगला (आणि वाईटही !) संस्कार आईचा होत असतो . मूळ मातृसंस्कार जेव्हा अभिजात असतो तेव्हा त्याला अमितच्या कर्तृत्वासारखे बहर येतात कारण राजाभाऊ यांचे सुसंस्कृत ,बहूभाषक आणि बहू सांस्कृतिक संस्कार अमितवर झालेले आहेत .
    असो.
    -प्रब

    ReplyDelete