Wednesday, November 15, 2023
✨ वाद्यमेळ : मृदंग
Monday, November 13, 2023
✨ वाद्यमेळ : व्हायोलिन
Saturday, November 11, 2023
✨ वाद्यमेळ : रुद्रवीणा
Friday, November 10, 2023
वाद्यमेळ : जलतरंग
#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day2
Thursday, November 9, 2023
वाद्यमेळ : सुरबहार
सुरबहार हे नाव ऐकूनच या वाद्याबद्दल प्रसन्नता जाणवते. आपल्याकडे काही वाद्यांची नावं पण इतकी छान आहेत की ते नाव वाचून सुद्धा मनात आल्हाददायक भावना सहज निर्माण होतात. असेच वाद्य म्हणजे सुरबहार आहे. सुरबहार हे वाद्य लाकूड, तुमडी आणि रेशीमपासून बनवलेले तार वाद्य आहे. हे एक पारंपारिक वाद्य आहे जे उत्तर भारतातील विविध भागात आजही प्रचलित आहे. आज सुरबहार हे प्रामुख्याने उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत मैफिलींमध्ये शास्त्रीय संगीतकारांकडून एकल वाद्य म्हणून वापरले जाते. या वाद्याच्या एकल वादनाने सुद्धा अनेक मैफिली अजरामर झाल्या आहेत. हे वाद्य सतारीच्या जवळपास जाणारे आहे. हे वाद्य सतारीहुन थोडे मोठे असते त्याच्या खालचा गोलाकार भागही सतारीपेक्षा बराच मोठा असतो व दांड्यावरील पडदे मात्र धारदार आणि पातळ असतात. हे वाद्य विलंबित आलापीला योग्य आहे. परंतु याचा स्वर कमी आहे. अत्यंत सुंदर दिसणारे हे वाद्य पहिल्यांदा बघतांना सतारीसारखे वाटते पण त्याहूनही थोड्या वेगळ्या धाटणीचे हे वाद्य आहे.
सुरबहार हे वाद्य साधारण १३० सेमी पेक्षा जास्त मोठे आहे. यात रेझोनेटर म्हणून वाळलेल्या करवंदाचा वापर केल्या जातो आणि त्याच्याकडे खूप रुंद फ्रेट असतात. या फ्रेट मान टूना किंवा महोगनी लाकडापासून बनविली जाते. यात साधारणपणे ३-४ मी ताल तार ( चिकारी ), चार वाजवणाऱ्या तार (सर्वात रुंद १ मिमी), आणि १०-१२ सहानुभूती स्ट्रिंग आहेत. या वाद्याला दोन पूल आहेत; वाजवता येण्याजोग्या तार मोठ्या पुलावरून जातात, जे तबलीला लहान पायांनी जोडलेले असतात, आणि जागोजागी चिकटलेले असतात. यातील सहानुभूतीच्या तारा थेट तबलीवर चिकटलेल्या छोट्या पुलावरून जातात. पुलांना स्ट्रिंगच्या समांतर वरच्या पृष्ठभागावर थोडासा वक्र असतो ज्यात कंपन होताना स्ट्रिंग स्पर्श करतात, या वाद्याचा मुख्य भाग सतारी सारखाच आहे, ज्यामध्ये ते एका बाजूला कोरलेल्या लाकडाच्या मुखासह मोठ्या वाळलेल्या करवंदाचे बनलेले आहे आणि कोरीव लाकडी गळ्याला जोडलेले आहे. बहुतेक सुरबहारांमध्ये खालचा भाग मोठा असतो आणि काही प्रमाणात झुकलेली असते आणि तळ वाद्याच्या मागील बाजूस असतो.
सुरबहार वादक वाकलेल्या स्टीलच्या ताराच्या प्लेक्ट्रमचा वापर करून ती तार वाजवतो, मिझरब , जो वादकाच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर स्थिर असतो. सुरबहारवर आलाप , जोर आणि झाला या धृपद शैलीत वाजवण्यासाठी पहिल्या तीन बोटांवर तीन प्लेक्ट्रम वापरतात. याची खासियत म्हणजे धृपद शैलीत, सितारखानी आणि मासितखानी गाण्यांऐवजी, वादक पखावाजांच्या साथीने धृपद रचना वाजवतात आणि हे ऐकताना ऐकणारा आनंदून जातो.
काही संशोधकांचा असा विश्वास आहे की सुरबहारचा शोध १८२५ च्या आसपास लागला आहे. त्यावेळी, देवी सरस्वतीशी संबंधित एक पवित्र वाद्य मानली जाणारी वीणा फक्त वीणा वादकांच्या वंशजांनाच शिकवली जात होती. त्यानंतरच्या काळात सुरबहारचा विकास काही प्रमाणात वीणाप्रमाणेच झाला आहे. सुरबहारचा शोध ओमराव खान बीनकर यांनी लावला होता आणि गुलाम मोहम्मद हे त्यांचे शिष्य होते. ओमराव खान बीनकर हे रामपूरच्या वजीर खान यांचे आजोबा होते. या आविष्काराचे श्रेय उस्ताद साहेबदाद खान यांनाही जाते.
खरंतर सतारीपेक्षा जड असलेले आणि वाजविण्यास अवघड असलेले सूरबहार हे वाद्य अलीकडच्या काळात लीलया वाजवून रसिकांची मने जिंकणाऱ्या अन्नपूर्णादेवी एक प्रतिभावंत कलाकार होत्या. अन्नपूर्णादेवी गेली काही वर्षे एकांतवासात होत्या आणि त्यांचे नाव आजही सुरबहार या वाद्याशी जोडले जाणे, यातच त्यांची महानता दिसते. २००४साली 'संगीत नाटक अकादमी'ने त्यांना 'रत्न' म्हणून नावाजले. अन्नपूर्णा देवी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, त्यांनी जास्त जाहीर कार्यक्रम केले नाहीत, रेकॉर्डही काढल्या नाहीत, तरीही भारतीय शास्त्रीय संगीतातील सुरबहार उत्कृष्ट वादक कलाकार म्हणून कायम नावाजल्या गेल्या आहेत. असे हे सुरबहार वाद्य आजही प्रसिद्धीच्या झोतात नसले तरी एक दुर्मिळ वाद्य म्हणून संगीत क्षेत्रांत नावाजलेले आहे. आता देशात केवळ तीन ते चारच सूरबहार वादक आहेत. आज धनत्रयोदशी या सुरबहार सारखे आपल्याही आयुष्यात धन धान्य ऐश्वर्य आणि निरामय आरोग्य सदैव राहावे हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना आहे.
सर्वेश फडणवीस
#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day1
Wednesday, November 8, 2023
भारत वाद्य दर्शनम् ..
आवाज कोणाचा? म्हणजे फटाक्यांचा असतोच पण त्या गलक्यात जरा या वाद्यांचा आवाज ही ऐकुया. सप्टेंबर महिन्यात जी20 बैठकी निमित्ताने आलेल्या सगळ्या राष्ट्र प्रमुखांसमोर तब्बल ७८ विविध भारतीय वाद्यांचे सादरीकरण झाले. त्यातूनच ही संकल्पना सुचली आणि त्यातील पाच वाद्य यानिमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोंत.
एके ठिकाणी छान वाचनात आले की, हिंदु तत्त्वज्ञानाने सर्व ध्वनिद्रव्याचा आरंभ एका शब्दातून केला आहे. त्या एका शब्दाला नादब्रह्म, ॐ किंवा प्रणव म्हणतात. ॐ हाच ध्वनीचा आदिस्फोट. म्हणूनच वेणू (कृष्ण), वीणा (सरस्वती) व डमरू (शिव) या वाद्यांना दैवी संकेत प्राप्त झाले आहेत. ही संगीताची गर्भावस्था आदिम वाद्यांत दिसून येते. संगीतमय म्हणता येईल असा निश्चित नाद या वाद्यांतून निघत नाही.
कमरेला बांधलेली वाळलेल्या फळांची माळ, ही प्राथमिक अवस्थेतील संगीताची साधने होती. नंतरच्या अवस्थेत काठ्या चिरलेली लाकडे, तबकड्या, दांड्या, ढोल, वीणा व वेणू यांचा हळूहळू प्रादुर्भाव झाला. पण आदिम वाद्यांचा उपयोग केवळ संगीतासाठीच होत होता असे म्हणता येत नाही. शंख जसा
रणवाद्य होता तसाच अभिषेकपात्रही होता. त्यात तीर्थ ठेवले जात होते. नगारा व धुम्सा ही सुद्धा रणवाद्ये होती. चर्मजडित वाद्ये खुणांच्या बोलीसाठी वापरली जात होती.
खरंतर संगीत वाद्य म्हणजे संगीतोपयोगी नाद निर्माण करण्यासाठी वापरलेले कोणतेही साधन. या अर्थी, मानवी देह, विशेषतः मानवी आवाज, हेच सर्वांत प्राचीन संगीत वाद्य म्हणता येईल. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्यालाच ‘गात्रवीणा' म्हटले आहे. टाळ्या वाजवणे, मांड्या व कुल्ले थोपटणे. जमिनीवर पाय
आपटणे, ह्या क्रिया आदिम वाद्यक्रियाच होत्या. वेदमंत्र गाताना, हातावर आवाज न करता बोटांनी विशिष्ट पद्धतीने जी लयगणना केली जात असे तिला हस्तवीणा म्हणत असत. अशा दैहिक क्रियांचेच रूपांतर हळूहळू स्वतंत्र वाद्ये घडवण्यात झाले. हातोडी किंवा पेचकससारखी अवजारे जशी उद्योगी हाताची कार्यक्षमता वाढवणारी यांत्रिक क्लृप्ती म्हणून निर्माण झाली तशीच टिपरी व कोलाट्टम् कट्टेसारख्या काठ्या किंवा करताल व चिपळ्यांसारखी टाळ्या देणारी वाद्ये मानवी हाताने आपली क्षमता वाढवण्यासाठी तयार केली.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ वाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. इथले नामवंत कारागीर मजीद सतार मेकर यांना अलिकडेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मागील मन की बात मध्ये अनेक देशांमधील भारतीय संगीताच्या लोकप्रियतेमुळं देशातून संगीत वाद्यांची निर्यात वाढल्याचा उल्लेख केला होता. मिरजेमध्ये निर्मित तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविणा, सुरबहार, यांसारख्या वाद्यांना देशविदेशातीतल नामांकीत कलाकारांकडून मागणी आहे. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या या वाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे आज अनेक कारागिर यामध्ये कार्यरत आहेत.
आता वाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची एक पेठच इथं वसली आहे. २५ हून अधिक दुकानांमधून १०० हून अधिक कारागीर हे काम करीत आहेत. वाद्य दुरुस्तीमध्ये देखील हे कारागीर इतके तयार आहेत की पिढ्या न् पिढ्या वाजवली जाणारी वाद्यं दुरूस्ती आणि देखभालीसाठी कलाकार केवळ मिरजेच्या कारागिरांच्याच हाती विश्वासानं देतात. फरीदसाहेब यांच्यानंतर वाद्य निर्मितीची ही परंपरा पीरसाहेब, हुसेन साहेब यांनी पुढे नेली. शाहमृगाच्या अंडय़ापासून बनविलेली सतार त्या काळात खूप गाजली होती. मोठ-मोठय़ा संगीत महोत्सवात मिरजेतील वाद्यांना कलाकार पहिली पसंती देतात. वाद्यनिर्मितीची ही कीर्ती ऐकून मजिद सतारमेकर आणि त्यांचे पुत्र अतिक यांना जपान आणि फ्रान्समध्ये वाद्यनिर्मितीची कार्यशाळा घेण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते. अशा वाद्यांच्या पाठीमागील काही कथा, त्या वाद्यांच्या इतिहासाचा मागोवा या निमित्ताने दिवाळीच्या पांच दिवस " वाद्यमेळा " शीर्षकांतर्गत वाद्यांची कहाणी, परंपरा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा उद्यापासून वाद्यमेळात भेटूच..
सर्वेश फडणवीस
#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023
Sunday, October 22, 2023
⚜️ विज्ञानवादिनी - शिवरंजनी साठे !!
शिवरंजनी साठे हे अनेकांसाठी अगदीं नवं नाव आहे. या लेखमालिकेत तिच्याबद्दल शेवटी घेण्याचे कारण म्हणजे शिवरंजनी अमेरिकेत स्थायिक झाली आहे पण तिचे लहानपण आणि जडणघडण ही नागपुरात झाली आहे. तिचा आजवरचा प्रवास हा जिद्द आणि चिकाटीने झालेला आहे. काहीतरी चांगलं करण्याच्या उदात्त हेतूने ती अमेरिकेतील बोइंग येथे कार्यरत आहे. आजची नववी विज्ञानवादिनी आहे शिवरंजनी साठे.
शशांक व शुभा साठे या दाम्पत्याची ही कन्या शिवरंजनी हिचे प्राथमिक शिक्षण कोराडी वसाहतीतील मराठी शाळेतच झाले. त्यानंतर तिला पाचवीपासून सुप्रसिद्ध अशा सोमलवार शाळेत शिक्षण घ्यायचे तिने स्वतःच ठरवले होते. अभ्यासात बऱ्यापैकी ठीक होती. त्यावेळी गणित विषय कठीण जात होता पण चांगल्या ट्युशन क्लासेसने गणितात सुधारणा झाली आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले. त्यानंतर अकरावी बारावी विज्ञान शाखेत तिने प्रवेश घेतला.
२००३ साली दूरदर्शनवर एक दुर्घटना तिने पाहिली. कल्पना चावलाच्या कोलंबियाला झालेला जीवघेणा अपघात! त्या प्रसंगाचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला. एकदा तिने घरी आईला सांगितलं, “आई, मी कल्पना चावला होणार." म्हणजे काय ? आईने विचारले. ती म्हणाली, " मी तिच्यासारखं स्पेसमध्ये जाणार." आईने या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. म्हटलं, "तुला स्पेसमध्ये जायचं असेल तर आधी गणितात चांगले गुण मिळवून दाखव. कशी जाणार स्पेसमध्ये ? " तिने हे मनावर घेतलं आणि खरंच बोर्डाच्या परीक्षेत १५० पैकी १५० गुण तिने मिळवून दाखवले. त्यानंतर ती सतत 'कल्पना चावला','सुनीता विल्यम्स' यांच्याविषयी, अंतराळ संशोधनाविषयी वाचन करत होती. खरंतर तिने या विषयाचा ध्यासच घेतला होता.
बारावी नंतर हैद्राबाद येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनीअरिंग' या महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला. जेमतेम सतराव्या वर्षी महाराष्ट्राबाहेर हॉस्टेल मध्ये राहून ध्येयाच्या
दिशेने वाटचाल सुरू झाली. घर किती सुरक्षित असतं, बाहेर सगळ्यांशी जुळवून घेऊन राहणं, अभ्यास करणं किती कठीण असतं, याची जाणीव झाली. पण स्वप्नांचा पाठलाग करण्याची तिची धडपड होती. बी. टेक. नंतर एम. एस. इन एरोस्पेससाठी अमेरिकेत जायचं. त्यासाठी जी. आर. ई. आणि टोफेलची परीक्षा द्यायची. त्यातही चांगले गुण मिळाले आणि Auburnविद्यापीठात प्रवेश मिळाला. लहानपणापासून मनात बाळगलेलं ध्येय, स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून हे सगळं केलं प्रसंगी आर्थिक आणि मानसिक ताण सहन केला.
एम. एस. पूर्ण झाल्यावर मॉर्फिंग विंग्जवर तिने संशोधन केले. एअरक्राफ्टचे विंग्ज पक्ष्याच्या पंखाच्या हालचालीसारखी हालचाल करतील तर काय फायदे होतील ? लिफ्ट आणि ड्रग असे दोन फोर्स एअरक्राफ्टवर असतात. लिफ्ट फोर्स उडायला मदत करतात आणि ड्रग फोर्स अपोज करतात. जर मॉर्फिंग विंग्जचा वापर केला तर ड्रग फोर्स कमी होतो आणि एअरक्राफ्टचं फ्युएल (इंधन) पण वाचतं, असे तिचे संशोधन आहे. आयईईई एअरोस्पेस कॉन्फरन्स मध्ये 'व्होटींसीटी अॅप्रोचेस फॉर मॉर्फिंग विंग्ज' या शीर्षकांतर्गत पेपर प्रेझेंट केला. या कॉन्फरन्ससाठी पेपर सिलेक्ट होणं हेच खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. बिग स्काय, मॉण्टाना या ठिकाणीही पेपर सादर केला.
स्वप्नांचा पाठलाग करतांना ज्या ध्येयासाठी शिवरंजनी प्रेरित झाली होती त्यासाठी तिला उत्तम असा जोडीदार मिळाला. क्रिस नेल्सन या अमेरिकन तरुणाशी तिची ओळख झाली. अनेक भेटीत, गप्पांमध्ये दोघांचे विचार आणि मनं जुळली. एकमेकांचे स्वभाव समजून घेतले. क्रिस नेल्सन अमेरिकन नेव्हीत आहे. शिवरंजनीची धडपड आणि वयाच्या तेराव्या वर्षी अंतराळातील झेप घेण्यासाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी यश मिळेल हा विश्वासच आहे. तिच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळनववी
Saturday, October 21, 2023
⚜️ विज्ञानवादिनी : कल्पना के !
Friday, October 20, 2023
⚜️ विज्ञानवादिनी : सीता सोमसुंदरम !
सीता सोमसुंदरम इसरोमधील स्पेस इन्स्ट्रुमेंटेशन एक्सपर्ट म्हणून परिचित आहे. चंद्रयान २ ही अंतराळ मोहीम भारतासाठी गौरवाचा क्षण होता आणि याच मिशनवर कार्य करणाऱ्या आपल्या आजच्या विज्ञानवादिनी सीता सोमसुंदरम आहे. सीता सोमसुंदरम यांनी इसरोमध्ये काम करत असतांना विविध जबाबदारी अत्यंत समर्थपणे पूर्णत्वास नेली आहे.
सीता सोमसुंदरम यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून बीएससी (ऑनर्स) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रासच्या IIT मधून M.Sc पदवी मिळवली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून त्यांनी भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली आणि त्यानंतर इसरोमध्ये त्यांची निवड झाली आहे. खगोलशास्त्राची लहानपणापासून आवड असल्याने सोमसुंदरम यांना एक्स-रे आणि ऑप्टिकल बँडमधील वेरियेबल स्टार्स यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. याशिवाय, त्यांनी अनेक वर्षांपासून चाललेल्या स्पेस-आधारित खगोलशास्त्रीय प्रयोगांसाठी उपकरणे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे.
सीता सोमसुंदरम इस्रोच्या स्पेस सायन्स कार्यालयात प्रोग्राम डायरेक्टर म्हणून होत्या. त्या अशा महिला वैज्ञानिक आहेत ज्यांनी मार्स ऑर्बिटर मिशनचे (MOM) यशस्वी नेतृत्व केले, ज्याला मिशन मंगळयान म्हणून ओळखले जाते. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. सीता सोमसुंदरम त्यांच्या मुलाखतीत याबद्दल सांगतात की “मॉमच्या यशाची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.”
१९८०च्या दशकात, जेव्हा सीता सोमसुंदरम यांनी इसरोमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याठिकाणी महिलांची संख्या अगदीं बोटावर मोजण्याइतकी होती. त्यांच्या वरिष्ठांना प्रश्न पडला की या महिला अंतराळ क्षेत्रांतील बारकावे हाताळू शकतील का? त्यांना विश्वास होता की महिला मर्यादित तास काम करतील पण त्यांना घरी जाणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर त्या पुन्हा येणार नाहीत. पण अशा महिला वैज्ञानिकांनी त्यांच्या अथक परिश्रमाने वरिष्ठांची ही भावना दूर केली आणि आज आपण बघू शकतो की इसरोमधील महिलांनी मोठ्या पदावर काम करताना अनेक मिशन यशस्वी करून दाखवले आहे.
एस्ट्रोसॅटचे प्रिंसिपल इन्वेस्टीगेटर म्हणून सीता सोमसुंदरम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. एस्ट्रोसॅट भारतातील पहिली अंतराळ दुर्बीण आहे जी काही वर्षांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आली होती. ही दुर्बिणी एकाच वेळी एक्स-रे, ऑप्टिकल आणि यूव्ही स्पेक्ट्रल बँडमध्ये आकाशाचे निरीक्षण करू शकते. यावर काम करतांना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला पण हे करत असतांना त्यांना त्यांच्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला. त्यांच्या आणि टीमच्या साहाय्याने मिशन यशस्वी झाले. मंगळयानचे पेलोड कॅरेक्टरायझेशन आणि कॅलिब्रेशनमध्येही सीता सोमसुंदरम यांचा सहभाग होता.
सीता सोमसुंदरम यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध पुरस्कार मिळाले आहेत. २००३ साली त्यांना भौतिकशास्त्रातील सी व्ही रमन यंग वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना अस्ट्रोनॉटिका सोसायटी ऑफ इंडियाकडून २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कारही मिळाला आहे. महिला म्हणून त्यांनी अनेक आव्हानांचा सामना करत अत्यंत परिश्रमाने स्वतःची योग्यता सिद्ध करत यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळसातवी
Thursday, October 19, 2023
⚜️ विज्ञानवादिनी : मौमिता दत्ता !
मौमिता दत्ता हे नाव आपल्यापैकी अनेकांना परिचित असे नाही पण अहमदाबाद मधील इसरोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटर मध्ये भौतिकशास्त्र वैज्ञानिक म्हणून मौमिता दत्ता यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आजच्या सहाव्या विज्ञानवादिनी आहेत मौमिता दत्ता. मौमिता दत्ता या प्रामुख्याने पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आणि ग्रहांच्या मोहिमांसाठी ऑप्टिकल सेन्सरवर काम करत आहेत.
मौमिता दत्ता यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला. शालेय जीवनापासून त्या हुशार आहेत. प्राथमिक शिक्षण त्यांनी बंगाली भाषेतूनच घेतले आणि त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. अप्लाइड फिजिक्समध्ये एम टेक पदवी मिळवल्यानंतर मौमिता दत्ता यांनी ऑप्टिक्समध्ये स्पेशलायझेशन केले. शाळेत एका प्रयोगात प्रिझममधून भव्य रंग बाहेर येताना पाहून मौमिता दत्ता यांना भौतिकशास्त्र विषयांत आवड निर्माण झाली आणि त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी भौतिकशास्त्र विषयातच पूर्ण केले.
मौमिता दत्ता यांनी लहानपणी अंतराळ, एलियन, ब्रह्मांड, तारे - विशेषतः एलियन्सबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते पण अंतराळ संशोधनात कार्य करण्याची संधी त्यांना मिळेल असे कधीही स्वप्नात वाटले नाही. २००४ मध्ये त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रात वाचले की भारत त्याच्या पहिल्या चंद्र मोहिमेची तयारी करत आहे. त्यावेळी त्यांनी ऑप्टिक्समध्ये विशेष प्राविण्य मिळवले होते त्यामुळे त्यांनी इसरोमध्ये अर्ज केला आणि मौमिता दत्ता यांना तब्बल दीड वर्षांनंतर इसरोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. चांद्रयान १ प्रकल्पावर उडणाऱ्या दोन सेन्सरवर त्यांनी काम पूर्ण केले. चांद्रयान १ ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती, जी २००८ मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. यात पृथ्वीशी संपर्क तुटण्यापूर्वी पाण्याचे पुरावे देखील सापडले होते आणि बऱ्यापैकी पहिल्या प्रयत्नात काही अंशी ही मोहीम यशस्वी झाली होती.
मौमिक दत्ता २००६ मध्ये स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद येथे रुजू झाल्या आणि तेव्हापासून त्या ओशनसॅट, रिसोर्ससॅट, हायसॅट, चांद्रयान १ आणि मार्स ऑर्बिटर मिशन सारख्या अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या आहेत. याशिवाय, मंगळ मोहिमेत मिथेन सेन्सरसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांना संपूर्ण ऑप्टिकल प्रणाली, ऑप्टिमायझेशन, त्यातील वैशिष्ट्ये आणि बारकावे त्यातील सेन्सरचे कॅलिब्रेशन विकसित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या, त्या ऑप्टिकल उपकरणांच्या स्वदेशी विकासात एका टीमचे नेतृत्व करत आहे. यासोबतच त्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला साकार करण्यासाठी काम करत आहे.
मार्स ऑर्बिटर मिशनच्या विकासात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या मौमिता दत्ता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या विविध प्रकल्पातील उल्लेखनीय कार्यासाठी,त्यांना 'इस्रो टीम ऑफ एक्सलन्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टेडक्स टॉक मध्येही मौमिता दत्ता याना आमंत्रित करण्यात आले आहे.अत्यंत परिश्रमाने त्यांनी आजवरचा यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळसहावी
Wednesday, October 18, 2023
⚜️ विज्ञानवादिनी : मीनल संपत
मीनल संपत अर्थात मीनल रोहित आज हे नाव इसरोमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. भारताची मंगळ मोहीम आजपर्यंत देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्पांपैकी एक होती. ही मोहीम यशस्वी करण्यात अनेक वैज्ञानिकांचा हातभार लागला आणि यातील अग्रक्रमाने नाव घेता येईल अशा आजच्या विज्ञानवादिनी वैज्ञानिक मीनल संपत आहेत. मीनल संपत सिस्टीम इंजिनीयर आहेतच पण खिडकी नसलेल्या खोलीत सलग १८ तास काम करत ही मोहीम त्यांनी पूर्णत्वास नेली आहे. मंगळ मोहिमेच्या वेळी दोन वर्षे त्यांनी सुट्टी घेण्याचेही टाळले.
मीनल संपत यांचा जन्म गुजरातमधील राजकोट येथे सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहानपणी त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, पण टीव्हीवरील एका स्पेस कार्यक्रमाने आठव्या वर्गात असतांना त्यांचा विचार बदलला आणि त्यानंतर त्यांनी अंतराळ क्षेत्रात कार्य करण्याचे निश्चित केले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला. लहानपणापासून हुशार असलेल्या मीनल संपत यांनी १९९९ साली गुजरात युनिव्हर्सिटीच्या अहमदाबाद येथील निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही.
मीनल संपत यांनी आपल्याला कारकिर्दीला इस्रोमध्ये सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी सॅटकॉम इंजिनियर म्हणून काम केले. त्यानंतर स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये त्यांची बदली करण्यात अली. त्यांनी स्पेस अप्लिकेशन सेंटरमधून मार्स ऑर्बिटर मिशन पेलोड विकसित आणि वितरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मंगळ मोहिमेवर काम करणाऱ्या ५०० शास्त्रज्ञ व अभियंत्यांपैकी त्या एक होत्या आणि मिशनसाठी सिस्टम इंजिनीअर म्हणून, त्यांनी ऑर्बिटर वाहून नेत असलेले सेन्सर्स एकत्रित करण्यात आणि चाचणी करण्यात मदत केली. मिथेन सेन्सर (एमएसएम), लायमन - अल्फा फोटोमीटर (एलएपी), थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर (टीआयएस), आणि मार्स कलर कॅमेरा (एमसीसी) चे घटक समाविष्ट करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांची कामाप्रति असलेली जिद्द म्हणजे त्यांनी या काळात दोन वर्षे कोणतीही सुटी घेणे टाळले. यासाठी त्यांच्या जिद्दीला प्रणाम आहे.
मीनल संपत यांना २००७ मध्ये इसरोकडून त्यांच्या टेलिमेडिसिन कार्यक्रमातील योगदानासाठी 'यंग सायंटिस्ट मेरिट' पुरस्कार आणि २०१३ मध्ये INSAT 3D हवामानशास्त्रीय पेलोड्सवरील कामासाठी 'इसरो टीम एक्सलन्स' अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळ मोहिमेत असतांना त्यांच्या कामाबद्दल आणि एकूणच प्रकल्पाबाबत, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या एका भाषणात मीनल संपत आणि टीमचे दिलेल्या वेळेच्या मर्यादेसह मिशन पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.
मीनल संपत यांनी चांद्रयान २ सारख्या प्रकल्पांसाठी मुख्य अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. सध्या त्यांच्याकडे उपप्रकल्प संचालक म्हणून जबाबदारी आहे. नॅशनल स्पेस एजन्सीच्या प्रमुखपदी पहिल्या महिला संचालक होण्याचे त्यांचे ध्येय आहे. मीनल संपत यांचे हे स्वप्न नक्की पूर्णत्वास जाईल हा विश्वासच आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळपाचवी
Tuesday, October 17, 2023
⚜️ विज्ञानवादिनी : मुथय्या वनिता !
मुथय्या वनिता हे नाव इसरोमधील अत्यंत आदरार्थी आणि साधेपणा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून प्रसिद्ध आहे. कनिष्ठ अभियंता म्हणून सुरू झालेला आणि त्यानंतर चंद्रयान २ मोहिमेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर इथवरचा इसरोमधील त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. अंतराळ संशोधनात त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. मुथय्या वनिता या एम.वनिता म्हणून सुपरिचित आहेतच पण त्या प्रसिद्धी परांगमुख आहेत. महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांची सार्थ ओळख आहे. आजच्या चौथ्या विज्ञानवादिनी आहेत मुथय्या वनिता.
एम. वनिता यांचा जन्म २ ऑगस्ट १९६४ साली चेन्नईमध्ये झाला. सर्वसामान्य कुटूंबात लहानपण गेल्याने साधेपणा हा उपजत होता. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एम वनिता आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बॉयलर प्लांट स्कूल त्रिची येथे झाले आणि कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, गिंडी येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. डिझाईन अभियंता विषयात त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.
एम. वनिता या तीन दशकांहून अधिक काळ इस्रोमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीला इसरोमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम केले, विविध हार्डवेअर सिस्टम मध्ये त्यांनी कार्ये केली. त्यानंतर त्यांनी इसरोच्या सॅटेलाइट सेंटरच्या डिजिटल सिस्टम्स ग्रुपमध्ये टेलीमेट्री आणि टेलिकमांड डिव्हिजनची देखरेख करत मॅनेजर होण्यासाठी रँकमधून त्यांना बढती मिळाली.
इसरोमध्ये काम करतांना त्यांनी प्रकल्पाच्या उपसंचालक म्हणून अनेक उपग्रहांसाठी डेटा ऑपरेशन्स हाताळल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी २०१३ च्या मंगलयान मंगळ मोहिमेत भाग घेतला, जो यशस्वी झाला. इस्रोच्या चांद्रयान-2 चंद्र मोहिमेसाठी, वनिता यांना सहयोगी संचालक ते प्रकल्प संचालक बनवण्यात आले. इस्रोकडे यापूर्वी कधीही महिला मिशन कमांडर नव्हती. एम वनिता यांनी चांद्रयान-१ मोहिमेच्या वेळी डीकोडर म्हणूनही काम केले होते. कार्टोसॅट-१, ओशनसॅट-२ आणि मेघा-ट्रॉपिक्ससह अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रकल्पातील अनेक वैविध्यपूर्ण कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २००६ साली एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने एम वनिता यांना 'सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खगोलशास्त्रीय सेवांमधील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल अनेक वरिष्ठांनी वेळोवेळी कौतुक केले आहे.
त्यांच्या एका मुलाखतीत त्या सांगतात की, चंद्रयान २ या चंद्र मोहिमेसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्या मुळीच तयार नव्हत्या पण प्रकल्प संचालक अन्नादुराई यांच्याकडून संपूर्ण मिशन समजावून घेतल्यावर आणि खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी शेवटी आपला विचार बदलला. प्रकल्प संचालक म्हणून, एम.वनिता यांनी चांद्रयान-२ मोहिमेची व्यवस्थित आखणी केली आणि संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेला. चंद्रयान २ मोहीम यशस्वी झाली नाही हे आपल्याला माहिती आहेच पण अनेक प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते पूर्णत्वास नेण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळचौथी
Monday, October 16, 2023
⚜️ विज्ञानवादिनी : टी.के.अनुराधा
Sunday, October 15, 2023
⚜️ विज्ञानवादिनी : नंदिनी हरिनाथ
नंदिनी हरिनाथ हे नाव मिशन मंगळ मोहीम यशस्वी झाली त्यानंतर घराघरात पोहोचले. आपल्या कर्तृत्ववाने इसरोबरोबर देशाचे नाव उंचावर घेऊन जाणाऱ्या आणि मिशन मंगळ मोहीम यशस्वी करणाऱ्या आजच्या दुसऱ्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ.
यशस्वी अशा मंगळ मोहिमेसाठी काम केलेल्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांनी, आपण कधी इस्रोमध्ये काम करू, असा विचारही केला नव्हता. लहानपणी बघितलेला 'स्टार ट्रेक' या टीव्हीवरील कार्यक्रमामुळे त्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. मंगळयान यशस्वीपणे अवकाशात पाठवल्यानंतर त्यांना स्वतःबद्दल अभिमान वाटतो. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी त्यांच्या स्वभावात सहज जाणवते आणि अंतराळ क्षेत्रांत महिलांनी आवर्जून यावे यासाठी तत्पर असणाऱ्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आजही जगात कुठेही मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून जातात.
नंदिनी हरिनाथ यांचा जन्म तामिळनाडू येथे झाला. कुटुंबात सर्वजण बहुतांश शिक्षक आणि इंजिनिअर असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी स्वाभाविक लहानपणापासून त्यांना आवड निर्माण झाली. आई गणिताची शिक्षिका आणि वडील इंजिनिअर असल्याने घरातील वातावरण शिक्षित होते. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तामिळनाडू येथेच पूर्ण केले.
कालांतराने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इसरोमध्ये प्रवेश केला. पहिल्याच नोकरीची संधी त्यांना इसरो येथे मिळाली. वीस वर्षे झाली त्या इसरो येथे कार्यरत आहे. जवळपास १४ मिशन मध्ये त्यांनी काम केले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांचा अभ्यास घेऊन काही काळ १२-१४ तास त्यांनी अथक काम केलं आहे. त्यांच्या एका मुलाखतीत त्या म्हणतात, "आज जेव्हा वैज्ञानिक म्हणून आम्हाला ओळखलं जातं, तेव्हा त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता इसरोमध्ये २० वर्षे झाली आहेत आणि आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही." मंगळ मोहिमेचा भाग होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता." खरंतर मिशन मंगळ मोहीम ही फक्त इस्रोसाठीच नाही तर भारतासाठी खूप महत्वाची मोहीम होती. ही मोहीम यशस्वी झाल्यावर जगाने भारताच्या वैज्ञानिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि आज आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या वैज्ञानिकांच्या मदतीची अपेक्षा करत आहे.
खरंतर मिशन मंगळवेळी इस्रोने पहिल्यांदाच लोकांना आत काय घडत आहे ते पाहण्याची परवानगी दिली होती. आज अनेक शास्त्रज्ञ सोशल मीडियावर आहेत. अशा कामगिरीमुळे आज तरुणांचे रोल मॉडेल म्हणून यांच्याकडे बघितल्या जाते आणि वैज्ञानिक असलेल्या नंदिनी हरिनाथ यांना याबद्दल अभिमान वाटतो आणि त्याचा त्या आनंदही घेतात. परिश्रम आणि प्रयत्नाने इथवर आल्याचे त्या आवर्जून सांगतात. वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ ज्यावेळी मिशन मंगळसाठी कार्य करत होत्या त्यावेळी नंदिनी यांची आई आंध्रप्रदेश येथून बंगलोरला येत असत. कारण त्यावेळी नंदिनी हरिनाथ यांची मुलगी बारावीत शिकत होती. मुलींना वेळ देता यावा म्हणून त्या पहाटे ४ वाजता उठत असत आणि दोघीजणी एकत्रित अभ्यास करत असत.
२००० रुपयांच्या नोटेवर झळकणारे मंगळयान मोहिमेचे चित्र पाहून नंदिनी हरिनाथ यांना खूप समाधान वाटले या मोहिमेच्या वेळी सुरुवातीला, शास्त्रज्ञांनी दिवसाचे सुमारे १० तास काम केले, परंतु प्रक्षेपणाची तारीख जवळ येत असताना काम १२ ते १४ तासांपर्यंत गेले आणि प्रत्यक्ष प्रक्षेपणाच्या वेळी ते जेमतेम कार्यालयातून बाहेर पडत असत. अत्यंत परिश्रमाने वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आणि त्यांच्या संपूर्ण टीम ने मंगळयान मोहीम यशस्वी करून दाखवली. मंगळयान प्रक्षेपणाच्या काही दिवस आधी वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ घरीदेखील जात नव्हत्या. कामाप्रती समर्पित भाव कसा असू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आहेत. मंगळयान अभियानाचं यश हा भूतकाळ झाला, आता भविष्याचा विचार करायचा आहे, असा निर्धार त्या व्यक्त करतात. वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांच्या कामाच्या कटिबद्धतेला नमन आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळदुसरी
Saturday, October 14, 2023
⚜️ विज्ञानवादिनी - रितू करिधाल श्रीवास्तव !
रितू करिधाल श्रीवास्तव हे नाव खरंतर मिशन चंद्रयानमुळे संपूर्ण देशाला परिचित झाले. आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने इसरोसोबतच देशाचे नाव उंचावणाऱ्या रॉकेट वूमन म्हणून ओळख असलेल्या आजच्या पहिल्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव.
पत्नी, आई, सून, बहीण, मैत्रीण या प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणाऱ्या वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव या दुसऱ्या मिशन चांद्रयानामुळे घराघरात पोहोचल्या. कर्तव्यनिष्ठ, यशस्वी आणि प्रतिभासंपन्न वैज्ञानिक म्हणून जबाबदारी पार पाडणे निश्चितच सोपे नाही. त्यासाठी नियोजनपूर्वक कार्यप्रणाली आखणे अन् पूर्णतः झोकून देऊन काम पूर्ण करणाऱ्या वैज्ञानिक म्हणून रितू करिधाल श्रीवास्तव यांची ओळख आज यथार्थ ठरेल.
इसरोमधील एक महिला वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने भारताचे नाव उंचावले आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या रितू करिधाल श्रीवास्तव यांनी प्रथमतः स्वतःला सिद्ध केले. सर्वसामान्य घरातून आलेल्या रितू करिधाल श्रीवास्तव यांनी आपल्या बुद्धिमान कौशल्याने आणि जिद्दीने भौतिकशास्त्र विषयांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे आचार्य पदवीसाठी लखनऊ येथे त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांनतर गेट परीक्षा उत्तीर्ण करून इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर इथे एअरोस्पेस इंजिनिअरींगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि हाच त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला.
अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी इसरोतील नोकरीसाठी प्रयत्न केला आणि त्यांची निवडही झाली आणि निकालानंतर रितू करिधाल श्रीवास्तव इसरोमध्ये रुजू झाल्या. बालपणापासून बघितलेल्या स्वप्नांना आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि एका नव्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला ज्येष्ठ वैज्ञानिकांसोबत काम करताना त्यातील आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांनी प्राप्त केली. वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांचे आज २० हुन अधिक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले असून त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते यंग सायंटिस्ट अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजीज अँड इंडस कडून इसरो टीम अवॉर्ड फॉर मॉम, एएसआयटीकडून वुमन अचिव्हर्स इन एअरोस्पेस अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
चांद्रयान- २ मिशन डायरेक्टर आणि मंगलयान मोहिमेच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. 'मिशन मंगल' या गाजलेल्या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने साकारलेली भूमिका रितू करिधाल श्रीवास्तव यांच्या व्यक्तिमत्त्वावरूनच प्रेरित झाली आहे. आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा चांद्रयान ३ मिशनचे नेतृत्त्व वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांच्याकडेच आहे. आपल्या कुटुंबाचे सहकार्य आणि त्यातून मिळालेल्या समाधानातूनच आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून दृढतेने काम करण्याची इच्छाशक्ती आणि जबाबदारी रितू करिधाल श्रीवास्तव सहजतेने सांभाळत आहेत. आदित्य आणि अनिशा या दोन मुलांना मोठं करणे, त्यांचा शाळेचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणे अशी कौटुंबिक सगळी जबाबदारी त्या आनंदाने पार पाडत असतात.
१९९७ पासून वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव इसरोत कार्यरत असून अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केले आहे. आपले पती अविनाश श्रीवास्तव आणि मुलांसोबत घालविलेले क्षण कामाची ऊर्जा देतात, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. महिला सक्षमीकरणाच्या समर्थक असणाऱ्या वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांनी महिलांनी अंतरीक्ष क्षेत्रात यावे यासाठी आग्रही आहेत आणि त्यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यास त्या नेहमीच इच्छुक असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज रॉकेट वूमन म्हणून ज्यांनी आपली ओळख सार्थ ठरवली आहे अशा आजच्या विज्ञानवादिनी वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत.
सर्वेश फडणवीस
#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळपहिली
Friday, October 13, 2023
🔸 विज्ञानवादिनी
Tuesday, August 15, 2023
।। श्रीतुकाराममहाराजांची गाथा ।।
मध्यंतरी प्रसाद देशपांडे दादाच्या घरी गेल्यावर त्याने गीताप्रेसची श्रीतुकाराममहाराजांची गाथा (पारायणप्रत) भेट म्हणून दिली. यावर्षी अधिक श्रावण महिन्यात काहीतरी नवे वाचावे असे मनात असतांना श्रीतुकाराममहाराजांची गाथेचे वाचन सुरु केले. वाचतांना अनेक अभंग परिचित होते. लताबाईंनी आपल्या अजरामर स्वरांनी या अभंगाना स्वरसाज चढवला असल्याने वाचतांना काही अभंग त्याच चालीत वाचल्या गेले. खरंतर श्रीतुकाराममहाराजांनी सामान्य माणसाच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्या अभंगांमधून सांगितलं आहे. हे तत्त्वज्ञान त्यांच्या कठोर आत्मपरीक्षणामधून आणि सदसद्विवेक बुद्धीतून तयार झाल्याने त्याला एक कालातीत अशी आंतरिक नीतिमत्ता आहे. व्यापक मानवतेची, मानवी हक्कांची आणि समतेची बैठक आहे. तीव्र संवेदनशीलता, शोषणाचा तिटकारा आणि मानवजातीविषयी प्रेम हा श्रीतुकाराममहाराजांच्या अभंगांचा आत्मा आहे. या गुणांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्रीतुकारामांचे अभंग आजही ऐकायला आणि म्हणायला लोक एकत्र येतात आणि अनेक ठिकाणी याचे नियमित पारायण होत असते.
या अभंगरचनेविषयी एक कथा आहे. एकदा संतश्रेष्ठ नामदेवांनी
श्रीपांडुरंगाच्या पुढे प्रतिज्ञा केली की, " हे देवा! मी शतकोटी अभंग रचून तुमची कीर्ती वर्णन करीन." देव म्हणाले, "नामया! ही कसली प्रतिज्ञा करून बसलास ! अरे या कलियुगात माणसाचे आयुष्य थोडे. त्यात विघ्ने फार. अशा स्थितीत तुझी प्रतिज्ञा पूर्ण कशी व्हावी ?" नामदेव म्हणाले, "देवा! मी तुमच्या भरवशावर बोललो. आता माझी प्रतिज्ञा तडीस नेणे तुमच्या हाती. अनंत कोटी ब्रह्मांडे रचणाऱ्या तुम्हांला काय अशक्य आहे. शिवाय भक्तवत्सल, भक्ताभिमानी हे तुमचे ब्रीदच आहे. म्हणून आता जे काही करायचे, ते तुम्हीच करायचे. नामदेवांचे हे निर्वाणीचे शब्द ऐकताच देवांनी सरस्वती देवीला आज्ञा केली की, "तू नामदेवांच्या जिव्हेवर राहून त्याच्या तोंडून माझी वेदप्रणीत स्तुती मराठीत वदवावी. सरस्वती म्हणाली,आपली आज्ञा प्रमाण. पण नामदेव बोलतील, तेव्हा चपळाईने लिहून घेणारा कोणीतरी लेखक पाहिजे.
यांवर ज्यांची वेदशास्त्रे स्तुती करतात, व्यास-वाल्मीकी आदी कवींनी ज्यांचे वर्णन केले, ते भगवंत वैकुंठ, क्षीरसागर, शेषशय्या सोडून हातात लेखणी घेऊन नामदेवांचे काव्य लिहीत बसले. नामदेवांच्या तोंडून केव्हा काय निघेल, हे सांगता येणार नाही, म्हणून ते आळस, झोप सोडून अखंड नामदेवांच्या संगतीत राहिले. असे होता होता एकदा एकूण अभंग किती झाले, हे मोजून पाहाता ते चौऱ्याण्णव कोटी एकोणपन्नास लक्ष भरले. भगवंतांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी नामदेवाची पाठ थोपटली. पण नामदेवांचा प्रयाणकाळ जवळ आल्यामुळे त्यांची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी नामदेवांना तुकारामांच्या स्वप्नात नेले आणि तुकारामांना आज्ञा केली की, "या नामदेवाने शतकोटी अभंगरचना करून माझे वर्णन करण्याचा संकल्प केला होता. त्यातील पाच कोटी एकावन्न लक्ष अजून बाकी आहेत. ते तू पूर्ण कर." या आज्ञेनुसार तुकारामांनी अभंगरचनेस प्रारंभ केला आणि तो पूर्णत्वासही गेला.
श्रीतुकाराममहाराजांच्या या सार्थ अभंगांतून व्याकूळ भक्ताची प्रेमळ विनवणी, भगवंतांशी प्रेमकलह, सत्संगमहिमा, दंभावर कोरडे, सदाचाराचे महत्त्व, दुर्जनांची निंदा इत्यादी असंख्य विषय आलेले आहेत. व्यवहारात राहूनही परमार्थ कसा करता येतो, हे त्यांचे अभंग वाचून समजते. श्रीतुकाराममहाराजांच्या भाषेवर संस्कृताचा प्रभाव नाही. अतिशय मोजक्या शब्दांत विषय स्पष्ट करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या अभंगातील ओळी सुभाषितांसारख्या व्यवहारात प्रचलित आहेत. या अभंगांत पांडुरंगाचा महिमा, वारकरी संप्रदायाची थोरवी, नामसंकीर्तनाचे महत्त्व, पंढरपूर क्षेत्राचे माहात्म्य, असे कितीतरी विषय आलेले आहेत. त्यांच्या अभंगांची भाषा खास मराठी वळणाची आहे. त्यांतील शब्द, वाक्ये, साधी, सुटसुटीत, समर्पक व मनाचा वेध घेणारी आहेत. श्रीतुकाराममहाराजांचे अभंग हे अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत.
गेली कित्येक शतके झाली हे अभंग रचलेले आहेत पण आजही प्रत्येक घटनेकडे बघण्याची दृष्टी आणि योग्य आणि शास्त्रीय शिकवण देण्याची ताकद या गाथेत पानापानावर दिसते. एका अर्थाने मानसशास्त्रीय ग्रंथ म्हणूनच याची ओळख सार्थ ठरेल. अत्यंत साध्या सरळ आणि सोप्या शब्दातील सर्वपरिचित उदाहरणे समाविष्ट असलेल्या गाथेतील अभंग म्हणजे प्रत्येक साधकाला विचार देणाऱ्या आहेत. आवर्जून संग्रही ठेवावे आणि एकदा तरी वाचावे अशीच श्रीतुकाराममहाराजांची गाथा आहे. या छानशा भेटीसाठी मनापासून धन्यवाद प्रसाद दादा.'अधिकस्य अधिकं फलं' या नात्याने वारंवार वाचन व्हावे ही श्रीभगवंताचरणी प्रार्थना आहे..
सर्वेश फडणवीस