Wednesday, November 15, 2023

✨ वाद्यमेळ : मृदंग


मृदंग हे नाव ऐकूनच मानवी मन एका वेगळ्याच विश्वात रममाण होते. याच्या नादाने सारा आसमंत आनंदून जातो. आवडीच्या वाद्याने वाद्य मेळाचा शेवट करावा अशी इच्छा निर्माण झाली. मृदंग हा शब्द ढोल शब्दाप्रमाणेच वेगवेगळ्या आडव्या ढोलांना उद्देशून सामान्य अर्थाने वापरला जातो. दक्षिणेत मृदंग एक विशिष्ट वाद्य आहे. त्यालाच तमिळ व तेलुगू भाषांत मद्दळम् व कानडीत मद्दळे म्हणतात. उत्तरेत मात्र पखवाज, खोल व पुंग ह्या वेगळ्या वाद्यांनाही मृदंगच म्हणतात.

मृदंगाचा सर्वांत प्राचीन उल्लेख आणव व काठक गृह्यसूत्रात (इसवी पूर्व ८०० ते ४००) सापडतो. शिवाय रामायण, महाभारत, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध त्रिपिटक, आदी ग्रंथांत या वाद्याचे उल्लेख आहे. भरताने प्रमुख वाद्यत्रयींत मृदंगाचा समावेश केला. शाङ्गदेवाच्या काळातही मृदंगाला वाद्यांत प्रमुख स्थान होते; त्याच्या पुष्कर त्रयींत मृदंग, मर्दल व मुरज हे तीन ढोल होते. आजही देशात मृदंग एक प्रमुख तालवाद्य आहे. मृदंगाविषयी तपशीलवार विवेचन नाट्यशास्त्रात आले आहे. हरीतकी, यव व गोपुच्छ असे त्याचे तीन प्रकार सांगून ते धरण्याच्या ऊर्ध्वक, आंक्य व आलिंग्य अशा तीन पद्धती वर्णन केल्या आहेत. ज्याचे अंग मातीचे आहे तो मृदंग (मृत+अंग) अशी व्याख्याही याबद्दल प्रचलित आहे. यावरून असे दिसते की पूर्वी मृदंग मातीचे बनवलेले असत व सध्याचे लाकडी मृदंग नंतर अस्तित्वात आले. या व्याख्येबाबत काही लोकांचे मत असे आहे की मातीचे अंग म्हणजे खोड नसून पुडीला मातीचा लेप देतात या अर्थी आहे. मतमतांतरे असले तरी मृदंग हे वाद्य आजही लोकप्रिय आहे.

दक्षिणेत ज्या विशिष्ट वाद्याला मृदंग म्हणतात त्याचे खोड फणसाच्या, निंबाच्या किंवा शिसवी लाकडाचे असते. स्वराच्या उंचीनुसार खोडाची लांबी ५५ ते ६० सेंटीमीटरच्या दरम्यान कमीअधिक असते. मधल्या फुगाऱ्याचा व्यास २५ ते ३० सेंटीमीटर असतो, पण फुगारा खोडाच्या मधोमध नसून डाव्या बाजूकडे असतो. अर्थातच डावी पुडी मोठी व उजवी लहान होते. डाव्या पुडीचा व्यास १८ ते १९·५ सेंटीमीटर असतो व तिला तोप्पी म्हणतात. उजव्या पुडीचा व्यास १५·५ ते १७ सेंटीमीटर असतो व तिला वलन्तलै म्हणतात. वलन्तलैमध्ये चामड्याचे तीन पापुद्रे असतात; त्यांपैकी मधल्या थरातील चामडे सबंध पुडीभर असते आणि उरलेली दोन चामडी म्हणजे गोल पट्ट्या असतात. सर्वांत खालची पट्टी बाहेर दिसत नाही; कारण तिच्यावर आणखी दोन पापुद्रे असतात. मधल्या चांदव्याला तामीळमध्ये कोट्टू तट्टू व तेलुगूत पाट म्हणतात. बाहेरच्या गोल पट्टीला तामीळमध्ये वेट्टू तट्टू किंवा मिट्टू व तेलगूत रेप्पा म्हणतात. 

मृदंगासारखेच बनवलेले व तितकेच प्रतिष्ठित दुसरे वाद्य म्हणजे पखवाज. ध्रुपद गायकीत व वीणावादनात पखवाजाची साथ अपरिहार्य होती. पण त्यांच्याबरोबर पखवाजही आता मागे पडला आहे व ख्यालगायकीबरोबर तबला पुढे आला आहे. आजही ध्रुपदगायनात, वीणावादनात व कथ्थक नृत्यात पखवाजाची साथ घेतात, पखवाजाचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न होत आहेत. कारण पखवाजात नादाचे व वादन तंत्राचे सात्त्विक गांभीर्य इतके भरले आहे की तबल्यातून ते कधीही निर्माण होऊ शकणार नाही. पखवाजाला मृदंगही म्हणतात; पण काही ठिकाणी दोघांत भेद करतात : मृदंग मातीचा असतो तर पखवाज लाकडाचा. पखवाज शब्द पक्ष-वाद्य म्हणजे बाजूने वाजवले जाणारे वाद्य शब्दाचा अपभ्रंश असावा असे काही अभ्यासकांचे मत आहे. पखवाज
दक्षिणी मृदंगापेक्षा लांबीत थोडा अधिक असतो व त्यात फुगाऱ्याच्या दोन्ही बाजूंचे उतार मृदंगापेक्षा अधिक विषम असतात. 

आज भारतात प्रसिद्ध मृदंग वादकांचे नाव आदराने घेतले जाते त्यात पंडित मदन मोहन, पंडित भोलानाथ पाठक , पंडित अमरनाथ मिश्र अशा काही नावांचा उल्लेख आवर्जून करता येईल. आजही हे वाद्य अनेक ठिकाणी साथीला असते. कानाला नादाचा आनंद देण्याचे काम हे वाद्य लीलया करते. आज दिवाळीचा पाचवा दिवस भाऊबीज. बीजेला साक्षी ठेवत मृदंग वाद्याच्या नादाने आनंद उत्साह कायम राहावा हीच सदिच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day5

Monday, November 13, 2023

✨ वाद्यमेळ : व्हायोलिन

 

व्हायोलिन हे वाद्य आकाराने तसे लहान आहे. पण ज्यावेळी त्यातून सूर उमटत जातात ते वाद्य अधिकाधिक आनंद आणि उत्साह देणारे आहे. व्हायोलिन कर्नाटकी संगीतात महत्त्वाचे वाद्य झाले आहे. उत्तरेत जो मान सारंगीला तोच दक्षिणेत व्हायोलिनला आहे; आता हळूहळू उत्तरेतही त्याचा प्रचार वाढत आहे. इतर वाद्यांच्या साथी इतकेच स्वतंत्र वादनातही व्हायोलिन आघाडीवर आहे. व्हायोलिन हे वाद्य मुळात भारतीय नसल्यास, मध्य आशियातून आले असावे. युरोपात ते बाल्कन देशातून गेले असा समज आहे. व्हायोलिन सारख्या दिसणाऱ्या वाद्याचे पहिले चित्रण नवव्या शतकाइतके जुने आहे. 

भारतात व्हायोलिनचा प्रचार प्रसार म्हणजे संगीतविश्वातील देवाणघेवाणीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. भारतात गजाची वाद्ये सुमारे एक हजार वर्षे होती. व्हायोलिनशी साम्य असलेल्या वाद्यांची शिल्पे विजयवाडा येथील मल्लिकार्जुन मंदिरात (दहावे शतक) व चिदंबरम् येथील नटराज मंदिरात (बारावे शतक) आढळतात. सध्याचे व्हायोलिन भारतात पोर्तुगीज, फ्रेंच व विशेषतः इंग्रज लोकांबरोबर आले. आधुनिक पाश्चिमात्य संगीताची भारताला ही एक उत्तम देणगी म्हणता येईल. व्हायोलिन वाद्य नादगुणात समृद्ध व बहुढंगी असल्यामुळे भारतीय संगीतात ते सहज मिसळून गेले.

व्हायोलिन वाद्याला अभिजात संगीतात प्रवेश देण्याचे श्रेय बालुस्वामी दीक्षितर (इ.स. १७८६ - १८५८) यांच्याकडे जाते. कर्नाटकी संगीताच्या अमर नायकत्रयीपैकी एक मुत्तुस्वामी यांचे बालुस्वामी धाकटे बंधू होते. त्यांचे वडील रामस्वामी मद्रासजवळ मनालीच्या व्यंकटकृष्ण मुदलियारांकडे गायक म्हणून सेवेला
होते. मुदलियार मद्रासला ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीला होते, त्यामुळे त्यांना पाश्चिमात्य संगीत ऐकायला मिळत असे. मुदलियार आपल्याबरोबर दीक्षितर बंधूंनाही नेत असत. मुदलियारांनी बालुस्वामीला व्हायोलिन शिकवण्यासाठी एक गोरा संगीत शिक्षक ठेवला होता. बालुस्वामी लवकरच व्हायोलिन वादनात तरबेज झाले. त्यांच्या वडील बंधूंचे एक शिष्य वडिवेलू हे त्रावणकोर दरबारात होते. ते व्हायोलिन शिकले व दरबारातही वाजवू लागले. त्रावणकोरचे महाराज स्वाती तिरुनाल स्वतः नामवंत संगीतकार होते. वडिवेलूंचे व्हायोलिन ऐकून ते इतके खूष झाले की त्यांनी वडिवेलूच्या कलेचा सन्मान करण्यासाठी हस्तिदंती व्हायोलिन वडिवेलूंना बहाल केले. तेव्हापासून कर्नाटकी संगीतात व्हायोलिनचा प्रचार वाढत वाढत ते आज प्रमुख वाद्य होऊन बसले आहे. 

उत्तर हिंदुस्थानी संगीतात त्याचा प्रवेश गेल्या ५०–६० वर्षांत
झाला. व्हायोलिन दोन्ही बाजूंनी चपटे व दांड्याच्या मानाने बरेच लांब असते. खालचा भाग म्हणून दोन लाकडी फळ्या जरा अंतर ठेवून एकमेकास जोडतात. त्यांचा आकार कटिमध्य असलेल्या लंबवर्तुळासारखा असतो. वरच्या भागामध्ये फुगीर व बाजूंना उतरती असते. तिच्यावर दोन्ही बाजूंना अवग्रहाच्या आकाराच्या खाचा असतात. निरुंद लाकडी पट्टी काठांना जोडून ह्या दोन एकमेकींशी जोडल्या जातात. म्हणजे दोन भागामध्ये पोटासारखी पोकळी तयार होते. ह्या खालच्या मागच्या बाजूस तारा बांधण्यासाठी एक लाकडी पुच्छाकार दांडी पोटावर येईल अशा रीतीने बसवतात. दांडीवर चार तारा फिरकीच्या खिळ्यांनी बांधतात. या दांडीच्या पुढे पोटावर पातळ व वरून वक्राकार घोडी बसवतात. पोटाच्या दुसऱ्या अंगाला आखूड दांडा असतो व तो टोकाला गोल मुरडलेला असतो. त्या ठिकाणी चार खुंट्यांचा कोनाडा असतो. पुच्छाला बांधलेल्या तारा घोडीवरून खुंट्यांना गुंडाळतात. त्या सुरात लावण्यासाठी खुंट्या पिळतात व बारीक सूर साधण्यासाठी पुच्छावरील फिरकीचे खिळे फिरवतात.

काही भागात या वाद्याला बेला हे नाव आहे. चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे व्हायोलिन हे एकमेव वाद्य आहे, असे विख्यात व्हायोलिनवादक सांगतात. व्हायोलिन अजरामर करणारे प्रसिद्ध व्हायोलिन वादक प्रभाकर जोग होते. त्यांचे गाणारे व्हायोलिन आजही ऐकले जाते. पुण्यातील विदुषी स्वप्ना दातार यांच्या स्वर स्वप्न च्या माध्यमातून व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम होत असतात. लहान मुलांना व्हायोलिनचे शिक्षण देत त्या सर्वोत्तम वादक तयार करत आहेत. श्रुती भावे ही सुद्धा प्रतिथयश व्हायोलिन वादक कलाकार आहे. आज व्हायोलिन हे वाद्य अनेक कलाकारांच्या कृतीतुन यशस्वीपणे वाटचाल करते आहे. आज पाडव्याच्या मुहूर्तावर अशीच याची भरभराट व्हावी हीच सदिच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस 

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day4

Saturday, November 11, 2023

✨ वाद्यमेळ : रुद्रवीणा


वीणा खरंतर भारतीय संगीतातील एक प्राचीन आणि प्रमुख तंतुवाद्य आहे. प्राचीन काळी वीणा हे नाव साधारणतः घनवाद्ये वगळता, इतर प्रकारांना उद्देशून वापरले जात होते. त्यातीलच रुद्रवीणा हे वाद्य पहिल्यांदा पाहताक्षणीच मोहात पाडणारे असे वाद्य आहे. सुंदर नक्षीकाम आणि त्याचा एकंदर बाज बघता दिसायला जरा कठीण वाटत असलं तरी वाजवल्यावर नादमधुर आणि आल्हाददायक आनंद देणारे असे हे वाद्य आहे. वीणा या वाद्याचे अनेक प्रकार आपल्याला अलीकडे बघायला मिळतात. नागस्वरम्‌, सनई यांसारख्या वाद्यांनाही ‘मुखवीणा’ हेच नाव होते. वैदिक मंत्रांच्या स्वरगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या वीणेला ‘हस्तवीणा’ किंवा ‘गात्रवीणा’ म्हणत होते. हिंदीमध्ये ‘बीन’ हे नाव वीणा या प्रकारातील वाद्याला वापरल्या जाते. अलीकडे मात्र वीणा ही सामान्यतः दांड्यावर स्वरांचे पडदे असलेल्या तंतु वाद्याला वापरली जाते.

वीणेचे अनेक प्रकार प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. धनुष्याक वक्रवीणा हे अतिप्राचीन तंतुवाद्य असून ईजिप्तमध्ये इ.स.पू.सु. चार हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारचे वाद्य प्रचारात असल्याचे उल्लेख आढळतात. हॉर्टेन्स पानुम या लेखिकेने स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्‌स ऑफ द मिडल्‌ एजिस, देअर ईव्हलूशन अँड डेव्हलपमेंट या ग्रंथात, वक्राकार वीणा सर्व वीणा प्रकारांतील मूळ प्रकार असून बाकीच्या वीणा नंतर निर्माण झाल्या,असे म्हटले आहे. वैदिक संगीतातही वीणावादन प्रचलित होते. यज्ञप्रसंगी उद्‌गाते गात असताना, यजमानपत्नी निरनिराळ्या वीणा वाजवत असल्याचे उल्लेख आहेत. वीणेचे विविध प्रकार प्राचीन काळी रूढ होते.

रूद्रवीणा या वाद्याचे अनेक प्रकारभेद आणि वेगवेगळी वर्णने आढळतात. याचे साम्य रबाब या वाद्याशी असल्याचे काही तज्ञ मानतात, तर काही दाक्षिणात्य वीणेशी याचा संबंध लावतात. 
रुद्रवीणा आता एक दुर्मिळ वाद्य बनले आहे जे जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ते बनवणारे कारागीर तसेच त्याचे वादक दोघेही आता क्वचितच सापडतात. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरबहार, सतार आणि सरोद इत्यादी वाद्यांच्या विकासामुळे या वाद्याचे महत्त्व कमी झाले. 

रुद्रवीणा ही लाकडापासून बनलेली एक लांब ट्यूबलर रचना आहे. यात दोन मोठे गोल रेझोनेटर्स असतात, जे नळीच्या तळाशी, केंद्रापासून समान अंतरावर बसवले जातात आणि चांगल्या प्रतीच्या भोपळ्यापासून बनवलेले असतात. चार वाजवणाऱ्या तंतूंचा यात समावेश आहे, एक स्टीलचा आणि तीन तांब्याचा, खालच्या टोकाच्या हुकला बांधलेला आणि ट्यूबला समांतर ताणलेला आणि सजवलेल्या ट्यूनिंग पेगकडे नेणारा अशी या वाद्याची एकंदर रचना आहे. नळीच्या दोन्ही बाजूंच्या हुकवर दोन ड्रोन वायर आहेत ज्या आपापल्या वरच्या भागात ताणलेल्या असून त्या बांधलेल्या आहेत.

रुद्रवीणेचा विकास दक्षिण भारतात झाला असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तंजावर येथे कर्नाटक पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचा उदय झाला पुढे त्यास प्रतिष्ठा प्राप्त झाली ती तंजावरच्या भोसले घराण्याच्या राजाश्रयामुळे आणि त्यांच्यामुळेच काही रुद्रवीणा वादक आपल्याला बघायला मिळतात. अलीकडच्या काळात विदुषी ज्योती हेगडे, सत्यवाणी पारंकुशम कुशल रुद्रवीणा आणि खंडारबणी घराण्यातील सितार कलाकार आहेत. त्या सर्वोत्तम रुद्रवीणा वादक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. आता रुद्रवीणा हे युनेस्कोने संरक्षित केलेले आणि प्रमोट केलेले जागतिक वारसा साधन आहे. आज लक्ष्मीपूजन या रुद्रावीणेच्या स्वरांसारखेच आपल्याही आयुष्यात ऐश्वर्य, धन-धान्य, समृद्धी आणि मांगलिकतेचा वर्षाव व्हावा हीच श्री लक्ष्मीमाते चरणी प्रार्थना आहे. दिवाळी निमित्त शुभचिंतन..

सर्वेश फडणवीस 

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day3







Friday, November 10, 2023

वाद्यमेळ : जलतरंग

जलतरंग या नावातच एक गूढ आणि आत्मिक अशी अनुभूती येते. तसंच हे वाद्य आहे. हे फारसे प्रचलित नसलेले एक भारतीय नादवाद्य आहे. जलतरंग या वाद्यामध्ये कुठलाही ताण नाही. त्यामुळे हे वाद्य ऐकून ऐकणाऱ्याचा ताण नाहीसा होतो. नादातली नजाकत आणि प्रसन्नता हे जलतरंग या वाद्याचं वैशिष्ट्य आहे. अर्धगोलात ठेवलेले लहानमोठ्या आकाराचे चिनी मातीचे बाउल, त्यात कमी अधिक प्रमाणात असलेलं पाणी आणि दोन नायलॉनच्या स्टिक्स एवढी सामग्री तुम्हाला जग विसरायला लावू शकते आणि असंच हे दुर्मिळ जलतरंग वाद्य आहे. 

जलतरंग हे अस्सल भारतीय वाद्य आहे. पूर्वी धातूच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून वाजवलं जाणारं हे वाद्य आता चिनी मातीचे बाउल वापरून वाजवलं जातं. दिसायला जरी सहज - सोपं असलं तरीही वाजवायला तितकंच अवघड आहे. जलतरंग वाजवायला अवघड आहे कारण त्यात महत्त्वाचे आहे ट्यूनिंग. जलतरंग ट्यून कसं करतात ? बाऊलचा आकार आणि त्यात असलेलं पाण्याचं प्रमाण यावर त्यातून येणारा स्वर अवलंबून असतो. मुळात बाऊलला स्वतःचा एक स्वर असतो. पाणी नसताना बाऊलमधून जो स्वर येतो त्यापेक्षा त्या बाऊलमध्ये पाणी घालून ३ ते ४ स्वर अधिक मिळवता येतात. बाऊलचा आकार जितका मोठा तितका त्यातून येणारा स्वर खालच्या सप्तकातला. बाऊलमध्ये जितकं पाणी कमी तितका त्याचा स्वर वरचा लागतो. त्यामुळे इतर वाद्यांसारखं ट्यूनिंग करताना स्वर चढवणं हे जलतरंगाच्या बाबतीत शक्य नसतं. म्हणूनच जलतरंग हे स्वर उतरवून ट्यून केलं जातं. 

या वाद्यातील ट्यूनिंगमधला दुसरा महत्वाचा मुद्दा तापमानाचा आहे. जलतरंगासाठी वापरलं जाणारं पाणी एकदम थंड असेल तर जलतरंग वाजत नाही. गरम पाणी वापरलं तर एरवीपेक्षा कमी पाण्यात जलतरंग ट्यून करता येतं पण वाजवता वाजवता पाणी पुन्हा नेहमीच्या तापमानावर येतं तेव्हा ट्यूनिंग बिघडतं. पाण्यापेक्षा घनतेने हलक्या द्रवपदार्थानेही ते ट्यून करता येऊ शकते पण बऱ्याचदा अशा द्रव पदार्थांचं बाष्पीभवन लगेच होत असल्याने ते वापरणे व्यावहारिक नाही. जलतरंग हे वाद्य शास्त्रीय राग वाजवण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नाही असा एक विचारप्रवाह आज आहे. 

जलतरंगाचा सर्वात जुना उल्लेख वात्स्यायनाच्या कामसूत्र ग्रंथात पाहायला मिळतो. पाण्याने भरलेल्या विविध पेल्यांत संगीताचे जल-तरंग निर्माण करून सूरनिर्मिती केली जात असे. तसेच याचा उल्लेख मध्ययुगीन "संगीत पारिजात" या ग्रंथामध्येही करण्यात आला होता, ज्यामध्ये या वाद्याला घन-वाद्य असे म्हंटले आहे. जल - तरंगला मध्ययुगीन काळात जल - यंत्र, जल तंत्री वीणा देखील म्हटले जात असे चित्रपट संगीतामधे देखील या वाद्याचा भरपूर वापर केला गेलेला आहे. पंख होते तो उड आती रे.. मधु बन मे राधिका नाचे रे… . अशी अनेक गाण्यांचे उदाहरणे देता येतील. तसेच कृष्णावर कविता लिहिणाऱ्या कवींनीदेखील या साधनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केला आहे. जल या तत्त्वाचा उपयोग करून घेऊन जलतरंग हे पारंपरिक वाद्य वाजवलं जातं. ऐकतांना लहानमोठ्यांना त्यातून निघणाऱ्या मोहक नादाची भुरळ पडते.

भारतात आज जलतरंगवादनाचे पूर्णवेळ कार्यक्रम करणारे खूपच मोजके लोक आहेत. त्यात पुण्यातील  पं.मिलिंद तुळाणकर हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. G20 च्या वेळी जे वाद्य वादक होते त्यात जलतरंग साठी पं. मिलिंद तुळाणकर यांचा समावेश होता. असे हे जलतरंग वाद्य तरंगाच्या नादातून आनंद देणारे आहे. कायम वाटतं की खरोखरच संगीतामध्ये ही जादू आहे की आपण सर्व जग विसरून जातो. असंच हे जलतरंग वाद्य आहे. 

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day2

Thursday, November 9, 2023

वाद्यमेळ : सुरबहार


सुरबहार हे नाव ऐकूनच या वाद्याबद्दल प्रसन्नता जाणवते. आपल्याकडे काही वाद्यांची नावं पण इतकी छान आहेत की ते नाव वाचून सुद्धा मनात आल्हाददायक भावना सहज निर्माण होतात. असेच वाद्य म्हणजे सुरबहार आहे. सुरबहार हे वाद्य लाकूड, तुमडी आणि रेशीमपासून बनवलेले तार वाद्य आहे. हे एक पारंपारिक वाद्य आहे जे उत्तर भारतातील विविध भागात आजही प्रचलित आहे. आज सुरबहार हे प्रामुख्याने उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत मैफिलींमध्ये शास्त्रीय संगीतकारांकडून एकल वाद्य म्हणून वापरले जाते. या वाद्याच्या एकल वादनाने सुद्धा अनेक मैफिली अजरामर झाल्या आहेत. हे वाद्य सतारीच्या जवळपास जाणारे आहे. हे वाद्य सतारीहुन थोडे मोठे असते त्याच्या खालचा गोलाकार भागही सतारीपेक्षा बराच मोठा असतो व दांड्यावरील पडदे मात्र धारदार आणि पातळ असतात. हे वाद्य विलंबित आलापीला योग्य आहे. परंतु याचा स्वर कमी आहे. अत्यंत सुंदर दिसणारे हे वाद्य पहिल्यांदा बघतांना सतारीसारखे वाटते पण त्याहूनही थोड्या वेगळ्या धाटणीचे हे वाद्य आहे.

सुरबहार हे वाद्य साधारण १३० सेमी पेक्षा जास्त मोठे आहे. यात रेझोनेटर म्हणून वाळलेल्या करवंदाचा वापर केल्या जातो आणि त्याच्याकडे खूप रुंद फ्रेट असतात. या फ्रेट मान टूना किंवा महोगनी लाकडापासून बनविली जाते. यात साधारणपणे ३-४ मी ताल तार ( चिकारी ), चार वाजवणाऱ्या तार (सर्वात रुंद १ मिमी), आणि १०-१२ सहानुभूती स्ट्रिंग आहेत. या वाद्याला दोन पूल आहेत; वाजवता येण्याजोग्या तार मोठ्या पुलावरून जातात, जे तबलीला लहान पायांनी जोडलेले असतात, आणि जागोजागी चिकटलेले असतात. यातील सहानुभूतीच्या तारा थेट तबलीवर चिकटलेल्या छोट्या पुलावरून जातात. पुलांना स्ट्रिंगच्या समांतर वरच्या पृष्ठभागावर थोडासा वक्र असतो ज्यात कंपन होताना स्ट्रिंग स्पर्श करतात, या वाद्याचा मुख्य भाग सतारी सारखाच आहे, ज्यामध्ये ते एका बाजूला कोरलेल्या लाकडाच्या मुखासह मोठ्या वाळलेल्या करवंदाचे बनलेले आहे आणि कोरीव लाकडी गळ्याला जोडलेले आहे. बहुतेक सुरबहारांमध्ये खालचा भाग मोठा असतो आणि काही प्रमाणात झुकलेली असते आणि तळ वाद्याच्या मागील बाजूस असतो.

सुरबहार वादक वाकलेल्या स्टीलच्या ताराच्या प्लेक्ट्रमचा वापर करून ती तार वाजवतो, मिझरब , जो वादकाच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर स्थिर असतो. सुरबहारवर आलाप , जोर आणि झाला या धृपद शैलीत वाजवण्यासाठी पहिल्या तीन बोटांवर तीन प्लेक्ट्रम वापरतात. याची खासियत म्हणजे धृपद शैलीत, सितारखानी आणि मासितखानी गाण्यांऐवजी, वादक पखावाजांच्या साथीने धृपद रचना वाजवतात आणि हे ऐकताना ऐकणारा आनंदून जातो.

काही संशोधकांचा असा विश्वास आहे की सुरबहारचा शोध १८२५ च्या आसपास लागला आहे. त्यावेळी, देवी सरस्वतीशी संबंधित एक पवित्र वाद्य मानली जाणारी वीणा फक्त वीणा वादकांच्या वंशजांनाच शिकवली जात होती. त्यानंतरच्या काळात सुरबहारचा विकास काही प्रमाणात वीणाप्रमाणेच झाला आहे. सुरबहारचा शोध ओमराव खान बीनकर यांनी लावला होता आणि गुलाम मोहम्मद हे त्यांचे शिष्य होते. ओमराव खान बीनकर हे रामपूरच्या वजीर खान यांचे आजोबा होते. या आविष्काराचे श्रेय उस्ताद साहेबदाद खान यांनाही जाते.

खरंतर सतारीपेक्षा जड असलेले आणि वाजविण्यास अवघड असलेले सूरबहार हे वाद्य अलीकडच्या काळात लीलया वाजवून रसिकांची मने जिंकणाऱ्या अन्नपूर्णादेवी एक प्रतिभावंत कलाकार होत्या. अन्नपूर्णादेवी गेली काही वर्षे एकांतवासात होत्या आणि त्यांचे नाव आजही सुरबहार या वाद्याशी जोडले जाणे, यातच त्यांची महानता दिसते. २००४साली 'संगीत नाटक अकादमी'ने त्यांना 'रत्न' म्हणून नावाजले. अन्नपूर्णा देवी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, त्यांनी जास्त जाहीर कार्यक्रम केले नाहीत, रेकॉर्डही काढल्या नाहीत, तरीही भारतीय शास्त्रीय संगीतातील सुरबहार उत्कृष्ट वादक कलाकार म्हणून कायम नावाजल्या गेल्या आहेत. असे हे सुरबहार वाद्य आजही प्रसिद्धीच्या झोतात नसले तरी एक दुर्मिळ वाद्य म्हणून संगीत क्षेत्रांत नावाजलेले आहे. आता देशात केवळ तीन ते चारच सूरबहार वादक आहेत. आज धनत्रयोदशी या सुरबहार सारखे आपल्याही आयुष्यात धन धान्य ऐश्वर्य आणि निरामय आरोग्य सदैव राहावे हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना आहे.

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day1

Wednesday, November 8, 2023

भारत वाद्य दर्शनम् ..

आवाज कोणाचा? म्हणजे फटाक्यांचा असतोच पण त्या गलक्यात जरा या वाद्यांचा आवाज ही ऐकुया. सप्टेंबर महिन्यात जी20 बैठकी निमित्ताने आलेल्या सगळ्या राष्ट्र प्रमुखांसमोर तब्बल ७८ विविध भारतीय वाद्यांचे सादरीकरण झाले. त्यातूनच ही संकल्पना सुचली आणि त्यातील पाच वाद्य यानिमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोंत.

एके ठिकाणी छान वाचनात आले की, हिंदु तत्त्वज्ञानाने सर्व ध्वनिद्रव्याचा आरंभ एका शब्दातून केला आहे. त्या एका शब्दाला नादब्रह्म, ॐ किंवा प्रणव म्हणतात. ॐ हाच ध्वनीचा आदिस्फोट. म्हणूनच वेणू (कृष्ण), वीणा (सरस्वती) व डमरू (शिव) या वाद्यांना दैवी संकेत प्राप्त झाले आहेत. ही संगीताची गर्भावस्था आदिम वाद्यांत दिसून येते. संगीतमय म्हणता येईल असा निश्चित नाद या वाद्यांतून निघत नाही.

कमरेला बांधलेली वाळलेल्या फळांची माळ, ही प्राथमिक अवस्थेतील संगीताची साधने होती. नंतरच्या अवस्थेत काठ्या चिरलेली लाकडे, तबकड्या, दांड्या, ढोल, वीणा व वेणू यांचा हळूहळू प्रादुर्भाव झाला. पण आदिम वाद्यांचा उपयोग केवळ संगीतासाठीच होत होता असे म्हणता येत नाही. शंख जसा
रणवाद्य होता तसाच अभिषेकपात्रही होता. त्यात तीर्थ ठेवले जात होते. नगारा व धुम्सा ही सुद्धा रणवाद्ये होती. चर्मजडित वाद्ये खुणांच्या बोलीसाठी वापरली जात होती.

खरंतर संगीत वाद्य म्हणजे संगीतोपयोगी नाद निर्माण करण्यासाठी वापरलेले कोणतेही साधन. या अर्थी, मानवी देह, विशेषतः मानवी आवाज, हेच सर्वांत प्राचीन संगीत वाद्य म्हणता येईल. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्यालाच ‘गात्रवीणा' म्हटले आहे. टाळ्या वाजवणे, मांड्या व कुल्ले थोपटणे. जमिनीवर पाय
आपटणे, ह्या क्रिया आदिम वाद्यक्रियाच होत्या. वेदमंत्र गाताना, हातावर आवाज न करता बोटांनी विशिष्ट पद्धतीने जी लयगणना केली जात असे तिला हस्तवीणा म्हणत असत. अशा दैहिक क्रियांचेच रूपांतर हळूहळू स्वतंत्र वाद्ये घडवण्यात झाले. हातोडी किंवा पेचकससारखी अवजारे जशी उद्योगी हाताची कार्यक्षमता वाढवणारी यांत्रिक क्लृप्ती म्हणून निर्माण झाली तशीच टिपरी व कोलाट्टम् कट्टेसारख्या काठ्या किंवा करताल व चिपळ्यांसारखी टाळ्या देणारी वाद्ये मानवी हाताने आपली क्षमता वाढवण्यासाठी तयार केली.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ वाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. इथले नामवंत कारागीर मजीद सतार मेकर यांना अलिकडेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मागील मन की बात मध्ये अनेक देशांमधील भारतीय संगीताच्या लोकप्रियतेमुळं देशातून संगीत वाद्यांची निर्यात वाढल्याचा उल्लेख केला होता. मिरजेमध्ये निर्मित तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविणा, सुरबहार, यांसारख्या वाद्यांना देशविदेशातीतल नामांकीत कलाकारांकडून मागणी आहे. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या या वाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे आज अनेक कारागिर यामध्ये कार्यरत आहेत.

आता वाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची एक पेठच इथं वसली आहे. २५ हून अधिक दुकानांमधून १०० हून अधिक कारागीर हे काम करीत आहेत. वाद्य दुरुस्तीमध्ये देखील हे कारागीर इतके तयार आहेत की पिढ्या न् पिढ्या वाजवली जाणारी वाद्यं दुरूस्ती आणि देखभालीसाठी कलाकार केवळ मिरजेच्या कारागिरांच्याच हाती विश्वासानं देतात. फरीदसाहेब यांच्यानंतर वाद्य निर्मितीची ही परंपरा पीरसाहेब, हुसेन साहेब यांनी पुढे नेली. शाहमृगाच्या अंडय़ापासून बनविलेली सतार त्या काळात खूप गाजली होती. मोठ-मोठय़ा संगीत महोत्सवात मिरजेतील वाद्यांना कलाकार पहिली पसंती देतात. वाद्यनिर्मितीची ही कीर्ती ऐकून मजिद सतारमेकर आणि त्यांचे पुत्र अतिक यांना जपान आणि फ्रान्समध्ये वाद्यनिर्मितीची कार्यशाळा घेण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते. अशा वाद्यांच्या पाठीमागील काही कथा,  त्या वाद्यांच्या इतिहासाचा मागोवा या निमित्ताने दिवाळीच्या पांच दिवस " वाद्यमेळा " शीर्षकांतर्गत वाद्यांची कहाणी, परंपरा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा उद्यापासून वाद्यमेळात भेटूच..

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023

Sunday, October 22, 2023

⚜️ विज्ञानवादिनी - शिवरंजनी साठे !!


शिवरंजनी साठे हे अनेकांसाठी अगदीं नवं नाव आहे. या लेखमालिकेत तिच्याबद्दल शेवटी घेण्याचे कारण म्हणजे शिवरंजनी अमेरिकेत स्थायिक झाली आहे पण तिचे लहानपण आणि जडणघडण ही नागपुरात झाली आहे. तिचा आजवरचा प्रवास हा जिद्द आणि चिकाटीने झालेला आहे. काहीतरी चांगलं करण्याच्या उदात्त हेतूने ती अमेरिकेतील बोइंग येथे कार्यरत आहे. आजची नववी विज्ञानवादिनी आहे शिवरंजनी साठे.

शशांक व शुभा साठे या दाम्पत्याची ही कन्या शिवरंजनी हिचे प्राथमिक शिक्षण कोराडी वसाहतीतील मराठी शाळेतच झाले. त्यानंतर तिला पाचवीपासून सुप्रसिद्ध अशा सोमलवार शाळेत शिक्षण घ्यायचे तिने स्वतःच ठरवले होते. अभ्यासात बऱ्यापैकी ठीक होती. त्यावेळी गणित विषय कठीण जात होता पण चांगल्या ट्युशन क्लासेसने गणितात सुधारणा झाली आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले. त्यानंतर अकरावी बारावी विज्ञान शाखेत तिने प्रवेश घेतला.

२००३ साली दूरदर्शनवर एक दुर्घटना तिने पाहिली. कल्पना चावलाच्या कोलंबियाला झालेला जीवघेणा अपघात! त्या प्रसंगाचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला. एकदा तिने घरी आईला सांगितलं, “आई, मी कल्पना चावला होणार." म्हणजे काय ? आईने विचारले. ती म्हणाली, " मी तिच्यासारखं स्पेसमध्ये जाणार." आईने या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. म्हटलं, "तुला स्पेसमध्ये जायचं असेल तर आधी गणितात चांगले गुण मिळवून दाखव. कशी जाणार स्पेसमध्ये ? " तिने हे मनावर घेतलं आणि खरंच बोर्डाच्या परीक्षेत १५० पैकी १५० गुण तिने मिळवून दाखवले. त्यानंतर ती सतत 'कल्पना चावला','सुनीता विल्यम्स' यांच्याविषयी, अंतराळ संशोधनाविषयी वाचन करत होती. खरंतर तिने या विषयाचा ध्यासच घेतला होता.

बारावी नंतर हैद्राबाद येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनीअरिंग' या महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला. जेमतेम सतराव्या वर्षी महाराष्ट्राबाहेर हॉस्टेल मध्ये राहून ध्येयाच्या
दिशेने वाटचाल सुरू झाली. घर किती सुरक्षित असतं, बाहेर सगळ्यांशी जुळवून घेऊन राहणं, अभ्यास करणं किती कठीण असतं, याची जाणीव झाली. पण स्वप्नांचा पाठलाग करण्याची तिची धडपड होती. बी. टेक. नंतर एम. एस. इन एरोस्पेससाठी अमेरिकेत जायचं. त्यासाठी जी. आर. ई. आणि टोफेलची परीक्षा द्यायची. त्यातही चांगले गुण मिळाले आणि Auburnविद्यापीठात प्रवेश मिळाला. लहानपणापासून मनात बाळगलेलं ध्येय, स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून हे सगळं केलं प्रसंगी आर्थिक आणि मानसिक ताण सहन केला.

एम. एस. पूर्ण झाल्यावर मॉर्फिंग विंग्जवर तिने संशोधन केले. एअरक्राफ्टचे विंग्ज पक्ष्याच्या पंखाच्या हालचालीसारखी हालचाल करतील तर काय फायदे होतील ? लिफ्ट आणि ड्रग असे दोन फोर्स एअरक्राफ्टवर असतात. लिफ्ट फोर्स उडायला मदत करतात आणि ड्रग फोर्स अपोज करतात. जर मॉर्फिंग विंग्जचा वापर केला तर ड्रग फोर्स कमी होतो आणि एअरक्राफ्टचं फ्युएल (इंधन) पण वाचतं, असे तिचे संशोधन आहे. आयईईई एअरोस्पेस कॉन्फरन्स मध्ये 'व्होटींसीटी अॅप्रोचेस फॉर मॉर्फिंग विंग्ज' या शीर्षकांतर्गत पेपर प्रेझेंट केला. या कॉन्फरन्ससाठी पेपर सिलेक्ट होणं हेच खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. बिग स्काय, मॉण्टाना या ठिकाणीही पेपर सादर केला.

स्वप्नांचा पाठलाग करतांना ज्या ध्येयासाठी शिवरंजनी प्रेरित झाली होती त्यासाठी तिला उत्तम असा जोडीदार मिळाला. क्रिस नेल्सन या अमेरिकन तरुणाशी तिची ओळख झाली. अनेक भेटीत, गप्पांमध्ये दोघांचे विचार आणि मनं जुळली. एकमेकांचे स्वभाव समजून घेतले. क्रिस नेल्सन अमेरिकन नेव्हीत आहे. शिवरंजनीची धडपड आणि वयाच्या तेराव्या वर्षी  अंतराळातील झेप घेण्यासाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी यश मिळेल हा विश्वासच आहे. तिच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळनववी 


Saturday, October 21, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : कल्पना के !


कल्पना के अर्थात कल्पना कालहस्ती यांची चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने ओळख झाली. चंद्रयान ३ प्रक्षेपणावेळी आपल्यापैकी अनेकांनी इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या बाजूला प्रकल्प सहयोगी संचालक म्हणून एक महिला उपस्थित होती त्या म्हणजेच आजच्या विज्ञानवादिनी कल्पना के आहेत. 

कल्पना के यांचा जन्म बंगलोर मध्ये झाला आहे. शालेय शिक्षण त्यांनी बंगलोर येथेच पूर्ण केले त्यानंतर आयआयटी खडकपूर येथून ऐरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उच्च न्यायालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. कल्पना के यांनी लहानपणापासून इसरोमध्ये काम करण्याचे स्वप्न बघितले होते. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. २००३ साली त्या इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाल्या. सर्वात आधी श्रीहरिकोटा इथे पाच वर्ष त्यांनी काम केले आणि त्यानंतर २००५ मध्ये त्यांची बदली बंगळुरूमधील उपग्रह केंद्रात झाली. त्याठिकाणी पाच उपग्रहांच्या डिझाइनमध्ये त्यांनी सहभाग घेतला.  

२०१९ मध्ये श्रीहरिकोटा येथील रॉकेट सेंटरमधून प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-२ प्रकल्पातही कल्पना के यांचा सहभाग होता. चांद्रयान-२ मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि सध्या त्या चांद्रयान-३ प्रकल्पाच्या सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ज्यावेळी चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद संपूर्ण जगाने अनुभवला आहे. कुठलेही मिशन यशस्वी झाल्यावर सर्वसामान्य भारतीयाला जितका आनंद होतो त्याहून अधिक आनंद काम करणाऱ्या वैज्ञानिकांना नक्कीच होत असेल. मिशनवर काम करतांना आलेल्या असंख्य अडचणींवर मात करत ते सतत कार्यमग्न राहत असतात आणि हेच यांचे वेगळेपण आहे. 

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर सहयोगी प्रकल्प संचालक म्हणून कल्पना के म्हणाल्या की, "माझ्या आणि माझ्या टीमसाठी हा सर्वात अविस्मरणीय क्षण आहे, आम्ही गेली अनेक वर्षे याचसाठी प्रयत्न करत होतो आणि आम्ही आमचे ध्येय साध्य केलं आहे." चांद्रयान-३ मोहिम यशस्वी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

साधारणपणे एक सॅटेलाईट तयार करण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो. आधी डिझाईन, मग बाकी सगळी प्रोसेस पार पडते. त्यानंतर हे सर्व झाल्यावर अनेक चाचण्या करून पाहिल्या जातात. त्यानंतर त्याची पुन्हा चाचणी करून रॉकेटला जोडून ट्रायल्स घेतल्या जातात आणि त्यानंतर सॅटेलाईट उड्डाण होते. चांद्रयान-३ प्रकल्पादरम्यान चंद्र लँडर प्रणाली डिझाइन आणि ऑप्टिमाइझ यातील त्यांच्या कौशल्याने अनेक आव्हानांवर मात करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या यशस्वी लँडिंगनंतर, टीमला संबोधित करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद संपूर्ण देशाने बघितला आहे. ही उत्तुंग कामगिरी केवळ जागतिक अंतराळ समुदायात भारताचे स्थान मजबूत करणारी नाही तर ज्या समर्पित व्यक्तींनी हे पराक्रम शक्य केले त्यांच्या अनुकरणीय योगदानावर प्रकाश टाकणारी आहे. कल्पना के यांनी जिद्द आणि मेहनतीने आजवरचा प्रवास यशस्वी केला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस 

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळआठवी   


Friday, October 20, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : सीता सोमसुंदरम !


सीता सोमसुंदरम इसरोमधील स्पेस इन्स्ट्रुमेंटेशन एक्सपर्ट म्हणून परिचित आहे. चंद्रयान २ ही अंतराळ मोहीम भारतासाठी गौरवाचा क्षण होता आणि याच मिशनवर कार्य करणाऱ्या आपल्या आजच्या विज्ञानवादिनी सीता सोमसुंदरम आहे. सीता सोमसुंदरम यांनी इसरोमध्ये काम करत असतांना विविध जबाबदारी अत्यंत समर्थपणे पूर्णत्वास नेली आहे.

सीता सोमसुंदरम यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून बीएससी (ऑनर्स) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रासच्या IIT मधून M.Sc पदवी मिळवली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून त्यांनी भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली आणि त्यानंतर इसरोमध्ये त्यांची निवड झाली आहे. खगोलशास्त्राची लहानपणापासून आवड असल्याने सोमसुंदरम यांना एक्स-रे आणि ऑप्टिकल बँडमधील वेरियेबल स्टार्स यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. याशिवाय, त्यांनी अनेक वर्षांपासून चाललेल्या स्पेस-आधारित खगोलशास्त्रीय प्रयोगांसाठी उपकरणे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे.

सीता सोमसुंदरम इस्रोच्या स्पेस सायन्स कार्यालयात प्रोग्राम डायरेक्टर म्हणून होत्या. त्या अशा महिला वैज्ञानिक आहेत ज्यांनी मार्स ऑर्बिटर मिशनचे (MOM) यशस्वी नेतृत्व केले, ज्याला मिशन मंगळयान म्हणून ओळखले जाते. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. सीता सोमसुंदरम त्यांच्या मुलाखतीत याबद्दल सांगतात की “मॉमच्या यशाची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.”

१९८०च्या दशकात, जेव्हा सीता सोमसुंदरम यांनी इसरोमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याठिकाणी महिलांची संख्या अगदीं बोटावर मोजण्याइतकी होती. त्यांच्या वरिष्ठांना प्रश्न पडला की या महिला अंतराळ क्षेत्रांतील बारकावे हाताळू शकतील का? त्यांना विश्वास होता की महिला मर्यादित तास काम करतील पण त्यांना घरी जाणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर त्या पुन्हा येणार नाहीत. पण अशा महिला वैज्ञानिकांनी त्यांच्या अथक परिश्रमाने वरिष्ठांची ही भावना दूर केली आणि आज आपण बघू शकतो की इसरोमधील महिलांनी मोठ्या पदावर काम करताना अनेक मिशन यशस्वी करून दाखवले आहे.

एस्ट्रोसॅटचे प्रिंसिपल इन्वेस्टीगेटर म्हणून सीता सोमसुंदरम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. एस्ट्रोसॅट भारतातील पहिली अंतराळ दुर्बीण आहे जी काही वर्षांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आली होती. ही दुर्बिणी एकाच वेळी एक्स-रे, ऑप्टिकल आणि यूव्ही स्पेक्ट्रल बँडमध्ये आकाशाचे निरीक्षण करू शकते. यावर काम करतांना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला पण हे करत असतांना त्यांना त्यांच्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला. त्यांच्या आणि टीमच्या साहाय्याने मिशन यशस्वी झाले. मंगळयानचे पेलोड कॅरेक्टरायझेशन आणि कॅलिब्रेशनमध्येही सीता सोमसुंदरम यांचा सहभाग होता.

सीता सोमसुंदरम यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध पुरस्कार मिळाले आहेत. २००३ साली त्यांना भौतिकशास्त्रातील सी व्ही रमन यंग वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना अस्ट्रोनॉटिका सोसायटी ऑफ इंडियाकडून २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कारही मिळाला आहे. महिला म्हणून त्यांनी अनेक आव्हानांचा सामना करत अत्यंत परिश्रमाने स्वतःची योग्यता सिद्ध करत यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळसातवी 


Thursday, October 19, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : मौमिता दत्ता !


मौमिता दत्ता हे नाव आपल्यापैकी अनेकांना परिचित असे नाही पण अहमदाबाद मधील इसरोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटर मध्ये भौतिकशास्त्र वैज्ञानिक म्हणून मौमिता दत्ता यांच्याबद्दल नितांत आदर आहे. आजच्या सहाव्या विज्ञानवादिनी आहेत मौमिता दत्ता. मौमिता दत्ता या प्रामुख्याने पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी आणि ग्रहांच्या मोहिमांसाठी ऑप्टिकल सेन्सरवर काम करत आहेत.

मौमिता दत्ता यांचा जन्म पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे झाला. शालेय जीवनापासून त्या हुशार आहेत. प्राथमिक शिक्षण त्यांनी बंगाली भाषेतूनच घेतले आणि त्यानंतर कोलकाता विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. अप्लाइड फिजिक्समध्ये एम टेक पदवी मिळवल्यानंतर मौमिता दत्ता यांनी ऑप्टिक्समध्ये स्पेशलायझेशन केले. शाळेत एका प्रयोगात प्रिझममधून भव्य रंग बाहेर येताना पाहून मौमिता दत्ता यांना भौतिकशास्त्र विषयांत आवड निर्माण झाली आणि त्यामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी भौतिकशास्त्र विषयातच पूर्ण केले.

मौमिता दत्ता यांनी लहानपणी अंतराळ, एलियन, ब्रह्मांड, तारे - विशेषतः एलियन्सबद्दल त्यांना विशेष आकर्षण होते  पण अंतराळ संशोधनात कार्य करण्याची संधी त्यांना मिळेल असे कधीही स्वप्नात वाटले नाही. २००४ मध्ये त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रात वाचले की भारत त्याच्या पहिल्या चंद्र मोहिमेची तयारी करत आहे. त्यावेळी त्यांनी ऑप्टिक्समध्ये विशेष प्राविण्य मिळवले होते त्यामुळे त्यांनी इसरोमध्ये अर्ज केला आणि मौमिता दत्ता यांना तब्बल दीड वर्षांनंतर इसरोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. चांद्रयान १ प्रकल्पावर उडणाऱ्या दोन सेन्सरवर त्यांनी काम पूर्ण केले. चांद्रयान १ ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती, जी २००८ मध्ये प्रक्षेपित करण्यात आली होती. यात पृथ्वीशी संपर्क तुटण्यापूर्वी पाण्याचे पुरावे देखील सापडले होते आणि बऱ्यापैकी पहिल्या प्रयत्नात काही अंशी ही मोहीम यशस्वी झाली होती.

मौमिक दत्ता २००६ मध्ये स्पेस ऍप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद येथे रुजू झाल्या आणि तेव्हापासून त्या ओशनसॅट, रिसोर्ससॅट, हायसॅट, चांद्रयान १ आणि मार्स ऑर्बिटर मिशन सारख्या अनेक प्रतिष्ठित प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या आहेत. याशिवाय, मंगळ मोहिमेत मिथेन सेन्सरसाठी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांची निवड झाली आहे. त्यांना संपूर्ण ऑप्टिकल प्रणाली, ऑप्टिमायझेशन, त्यातील वैशिष्ट्ये आणि बारकावे त्यातील सेन्सरचे कॅलिब्रेशन विकसित करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. सध्या, त्या ऑप्टिकल उपकरणांच्या स्वदेशी विकासात एका टीमचे नेतृत्व करत आहे. यासोबतच त्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला साकार करण्यासाठी काम करत आहे.

मार्स ऑर्बिटर मिशनच्या विकासात भारतीय भौतिकशास्त्रज्ञ असलेल्या मौमिता दत्ता यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या विविध प्रकल्पातील उल्लेखनीय कार्यासाठी,त्यांना 'इस्रो टीम ऑफ एक्सलन्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टेडक्स टॉक मध्येही मौमिता दत्ता याना आमंत्रित करण्यात आले आहे.अत्यंत परिश्रमाने त्यांनी आजवरचा यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळसहावी

Wednesday, October 18, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : मीनल संपत


मीनल संपत अर्थात मीनल रोहित आज हे नाव इसरोमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. भारताची मंगळ मोहीम आजपर्यंत देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्पांपैकी एक होती. ही मोहीम यशस्वी करण्यात अनेक वैज्ञानिकांचा हातभार लागला आणि यातील अग्रक्रमाने नाव घेता येईल अशा आजच्या विज्ञानवादिनी वैज्ञानिक मीनल संपत आहेत. मीनल संपत सिस्टीम इंजिनीयर आहेतच पण खिडकी नसलेल्या खोलीत सलग १८ तास काम करत ही मोहीम त्यांनी पूर्णत्वास नेली आहे. मंगळ मोहिमेच्या वेळी दोन वर्षे त्यांनी सुट्टी घेण्याचेही टाळले.

मीनल संपत यांचा जन्म गुजरातमधील राजकोट येथे सर्वसामान्य कुटुंबात  झाला. लहानपणी त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, पण टीव्हीवरील एका स्पेस कार्यक्रमाने आठव्या वर्गात असतांना त्यांचा विचार बदलला आणि त्यानंतर त्यांनी अंतराळ क्षेत्रात कार्य करण्याचे निश्चित केले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला. लहानपणापासून हुशार असलेल्या मीनल संपत यांनी १९९९ साली गुजरात युनिव्हर्सिटीच्या अहमदाबाद येथील निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्समधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही.

मीनल संपत यांनी आपल्याला कारकिर्दीला इस्रोमध्ये सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी सॅटकॉम इंजिनियर म्हणून काम केले. त्यानंतर स्पेस अप्लिकेशन सेंटरमध्ये त्यांची बदली करण्यात अली. त्यांनी स्पेस अप्लिकेशन सेंटरमधून मार्स ऑर्बिटर मिशन पेलोड विकसित आणि वितरित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मंगळ मोहिमेवर काम करणाऱ्या ५०० शास्त्रज्ञ व अभियंत्यांपैकी त्या एक होत्या आणि मिशनसाठी सिस्टम इंजिनीअर म्हणून, त्यांनी ऑर्बिटर वाहून नेत असलेले सेन्सर्स एकत्रित करण्यात आणि चाचणी करण्यात मदत केली. मिथेन सेन्सर (एमएसएम), लायमन - अल्फा फोटोमीटर (एलएपी), थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग स्पेक्ट्रोमीटर (टीआयएस), आणि मार्स कलर कॅमेरा (एमसीसी) चे घटक समाविष्ट करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांची कामाप्रति असलेली जिद्द म्हणजे त्यांनी या काळात दोन वर्षे कोणतीही सुटी घेणे टाळले. यासाठी त्यांच्या जिद्दीला प्रणाम आहे.

मीनल संपत यांना २००७ मध्ये इसरोकडून त्यांच्या टेलिमेडिसिन कार्यक्रमातील योगदानासाठी 'यंग सायंटिस्ट मेरिट' पुरस्कार आणि २०१३ मध्ये INSAT 3D हवामानशास्त्रीय पेलोड्सवरील कामासाठी 'इसरो टीम एक्सलन्स' अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंगळ मोहिमेत असतांना त्यांच्या कामाबद्दल आणि एकूणच प्रकल्पाबाबत, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या एका भाषणात मीनल संपत आणि टीमचे दिलेल्या वेळेच्या मर्यादेसह मिशन पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.

मीनल संपत यांनी चांद्रयान २ सारख्या प्रकल्पांसाठी मुख्य अभियंता आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे.  सध्या त्यांच्याकडे उपप्रकल्प संचालक म्हणून जबाबदारी आहे. नॅशनल स्पेस एजन्सीच्या प्रमुखपदी पहिल्या महिला संचालक होण्याचे त्यांचे ध्येय आहे. मीनल संपत यांचे हे स्वप्न नक्की पूर्णत्वास जाईल हा विश्वासच आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळपाचवी

Tuesday, October 17, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : मुथय्या वनिता !


मुथय्या वनिता हे नाव इसरोमधील अत्यंत आदरार्थी आणि साधेपणा कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून  प्रसिद्ध आहे. कनिष्ठ अभियंता म्हणून सुरू झालेला आणि त्यानंतर चंद्रयान २ मोहिमेच्या प्रोजेक्ट डायरेक्टर इथवरचा इसरोमधील त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. अंतराळ संशोधनात त्यांचे योगदान कौतुकास्पद आहे. मुथय्या वनिता या एम.वनिता म्हणून सुपरिचित आहेतच पण त्या प्रसिद्धी परांगमुख आहेत. महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांची सार्थ ओळख आहे. आजच्या चौथ्या विज्ञानवादिनी आहेत मुथय्या वनिता.

एम. वनिता यांचा जन्म २ ऑगस्ट १९६४ साली चेन्नईमध्ये झाला. सर्वसामान्य कुटूंबात लहानपण गेल्याने साधेपणा हा उपजत होता. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे एम वनिता आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बॉयलर प्लांट स्कूल त्रिची येथे झाले आणि कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, गिंडी येथून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. डिझाईन अभियंता विषयात त्यांनी आपले पदवी शिक्षण पूर्ण केले.

एम. वनिता या तीन दशकांहून अधिक काळ इस्रोमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी सुरुवातीला इसरोमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून काम केले, विविध हार्डवेअर सिस्टम मध्ये त्यांनी कार्ये केली. त्यानंतर त्यांनी इसरोच्या सॅटेलाइट सेंटरच्या डिजिटल सिस्टम्स ग्रुपमध्ये टेलीमेट्री आणि टेलिकमांड डिव्हिजनची देखरेख करत मॅनेजर होण्यासाठी रँकमधून त्यांना बढती मिळाली.

इसरोमध्ये काम करतांना त्यांनी प्रकल्पाच्या उपसंचालक म्हणून अनेक उपग्रहांसाठी डेटा ऑपरेशन्स हाताळल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी २०१३ च्या मंगलयान मंगळ मोहिमेत भाग घेतला, जो यशस्वी झाला. इस्रोच्या चांद्रयान-2 चंद्र मोहिमेसाठी, वनिता यांना सहयोगी संचालक ते प्रकल्प संचालक बनवण्यात आले. इस्रोकडे यापूर्वी कधीही महिला मिशन कमांडर नव्हती. एम वनिता यांनी चांद्रयान-१ मोहिमेच्या वेळी डीकोडर म्हणूनही काम केले होते. कार्टोसॅट-१, ओशनसॅट-२ आणि मेघा-ट्रॉपिक्ससह अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

प्रकल्पातील अनेक वैविध्यपूर्ण कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २००६ साली एस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाने एम वनिता यांना 'सर्वोत्कृष्ट महिला शास्त्रज्ञ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खगोलशास्त्रीय सेवांमधील त्यांच्या विशेष योगदानाबद्दल अनेक वरिष्ठांनी वेळोवेळी कौतुक केले आहे.

त्यांच्या एका मुलाखतीत त्या सांगतात की, चंद्रयान २ या चंद्र मोहिमेसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून त्या मुळीच तयार नव्हत्या पण प्रकल्प संचालक अन्नादुराई यांच्याकडून संपूर्ण मिशन समजावून घेतल्यावर आणि खात्री करून घेतल्यानंतर त्यांनी शेवटी आपला विचार बदलला. प्रकल्प संचालक म्हणून, एम.वनिता यांनी चांद्रयान-२ मोहिमेची व्यवस्थित आखणी केली आणि संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेला. चंद्रयान २ मोहीम यशस्वी झाली नाही हे आपल्याला माहिती आहेच पण अनेक प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते पूर्णत्वास नेण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळचौथी

Monday, October 16, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : टी.के.अनुराधा

टी.के.अनुराधा हे नाव इसरोमधील यशस्वी वैज्ञानिक म्हणून आजही आदराने घेतले जाते. आता त्या सेवेतून निवृत्त झाल्या तरी देशासाठी आणि अंतराळ संशोधनासाठी तत्पर असतात हे नुकतेच चंद्रयान मोहिमेच्यावेळी देशाने अनुभवले आहे. आजच्या तिसऱ्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक टी.के.अनुराधा. 

साधारणपणे १९६९ सालची घटना असावी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पाऊल ठेवले आणि त्यावेळी शाळकरी पोर असणाऱ्या टी.के.अनुराधा यांनी स्वप्न बघितले की आपणही अंतराळ क्षेत्रांत काहीतरी कार्य करायचे. लहान असल्याने त्यावेळी समज नव्हती पण घरच्यांशी सतत याच विषयावर बोलत राहणे हाच त्यांचा नित्य ध्यास होता आणि काही काळाने तेच स्वप्न सत्यात उतरले आणि पुढे इसरो सारख्या संस्थेत टी.के.अनुराधा या रुजू झाल्या. 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात (ISRO) मधील GSAT-12 या उपग्रहाच्या प्रकल्प संचालक ( प्रोजेक्ट Director) म्हणून त्यांनी आपली उत्तम कामगिरी पार पाडली. टी.के अनुराधा यांनी हसनमधील नियंत्रण सुविधेतून पार पडलेल्या महत्त्वाच्या ऑपरेशन्सद्वारे GSAT-12 ला त्याच्या अंतिम कक्षेत यशस्वीपणे चालवले. त्यावेळी हसन येथे प्रथमच सर्व इसरोमधील महिला टीमने हे काम केले आणि त्याचे नेतृत्व टी.के.अनुराधा यांनी केले. 

टी.के.अनुराधा यांचे लहानपण बंगलोर शहरात गेले. कौटुंबिक वातावरणही चांगले होते. त्यांचे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते आणि आई गृहिणी होती. त्यांना चार बहिणी होत्या आणि आईने लहानपणापासून योग्य संस्कार केल्याने त्यांच्या आईकडून त्यांना कायम प्रेरणा मिळाली. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी त्यांची आई सतत प्रोत्साहन द्यायची. टी.के अनुराधा यांच्या मोठी बहिणीने वैद्यकीय क्षेत्र आणि दोन लहान बहिणी यांनी अभियांत्रिकी क्षेत्र स्वीकारले. 

टी. के अनुराधा यांचे प्राथमिक शिक्षण बंगलोर येथे झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी नागपूर येथील विश्वेश्वरय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. लहानपणापासून विज्ञान विषयाची आवड असल्याने अंतराळ क्षेत्रात कार्य करण्याचे स्वप्न असल्याने त्यांनी इलेक्ट्रॉनिक विषयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) कडून मास्टर ऑफ सायन्सचा अभ्यास करण्याची ऑफर नाकारून त्यांनी स्पेस एजन्सीमध्ये नोकरी पत्करली.

कालांतराने टी.के अनुराधा यांचे लग्न अशा कुटुंबात झाले आहे ज्यात प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक्सची आवड होती. टी.के अनुराधा यांचे यजमान भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये जनरल मॅनेजर होते. त्यांची मोठी मुलगी अमेरिकेत संगणक विज्ञान अभियंता आहे आणि दुसरी मुलगी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी शाखेतच कार्यरत आहे. टी.के.अनुराधा त्यांच्या मुलाखतीत छान सल्ला देतात त्या म्हणतात, "तुम्ही काय करू शकता याला काही मर्यादा आहे असा विचार करू नका. तुम्हाला काही करायचे असेल तर त्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यास सुरुवात करा."

टी.के.अनुराधा यांचे पहिले काम बंगलोर येथील सॅटेलाइट सेंटरमध्ये उपग्रहांची चाचणी करण्याचे होते आणि त्यावेळी त्यांचे प्रो. यू.आर. राव हे बॉस होते. त्यांच्याकडून टी.के.अनुराधा यांना यातील अनेक बारकावे समजून घेता आले. त्यानंतर १९८४ ते १९९४ पर्यंत एजन्सीचे अध्यक्ष म्हणून टी.के.अनुराधा यांनी काम केले. अनेक उपग्रहांसाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकसित केली. त्यावेळीही इस्रो हा पुरुष शास्त्रज्ञांचा बालेकिल्ला नव्हता आणि इसरोमध्ये स्त्री पुरुष भेदभाव नव्हता हे त्या आवर्जून सांगतात.

टी के. अनुराधा यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम केले आहेच त्यासोबत कम्युनिकेशन सॅटेलाइट्समध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केले. GSAT-12 आणि GSAT-10 या उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या वेळी त्यांनी त्यासाठी जवळून काम केले आणि १९८२ पासून इसरोमधील सर्वात ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञांपैकी एक म्हणून आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. टी.के. अनुराधा यांनी भारतीय अंतराळ कार्यक्रमांचे नेतृत्व केले आणि त्यांच्या कामासाठी आणि विशेष योगदानासाठी 2012 ASI- ISRO टीम पुरस्कार त्यांना मिळाला होता. अंतराळ क्षेत्रात काही तरी करण्याच्या ध्यासाने टी.के.अनुराधा यांनी केलेले इसरोमधील कार्य एकमेवाद्वितीय असेच आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस 

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळतिसरी 



Sunday, October 15, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : नंदिनी हरिनाथ

नंदिनी हरिनाथ हे नाव मिशन मंगळ मोहीम यशस्वी झाली त्यानंतर घराघरात पोहोचले. आपल्या कर्तृत्ववाने इसरोबरोबर देशाचे नाव उंचावर घेऊन जाणाऱ्या आणि मिशन मंगळ मोहीम यशस्वी करणाऱ्या आजच्या दुसऱ्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ.

यशस्वी अशा मंगळ मोहिमेसाठी काम केलेल्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांनी, आपण कधी इस्रोमध्ये काम करू, असा विचारही केला नव्हता. लहानपणी बघितलेला 'स्टार ट्रेक' या टीव्हीवरील कार्यक्रमामुळे त्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. मंगळयान यशस्वीपणे अवकाशात पाठवल्यानंतर त्यांना स्वतःबद्दल अभिमान वाटतो. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि दूरदृष्टी त्यांच्या स्वभावात सहज जाणवते आणि अंतराळ क्षेत्रांत महिलांनी आवर्जून यावे यासाठी तत्पर असणाऱ्या वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आजही जगात कुठेही मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून जातात.

नंदिनी हरिनाथ यांचा जन्म तामिळनाडू येथे झाला. कुटुंबात सर्वजण बहुतांश शिक्षक आणि इंजिनिअर असल्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयी स्वाभाविक लहानपणापासून त्यांना आवड निर्माण झाली. आई गणिताची शिक्षिका आणि वडील इंजिनिअर असल्याने घरातील वातावरण शिक्षित होते. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी तामिळनाडू येथेच पूर्ण केले.

कालांतराने शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इसरोमध्ये प्रवेश केला. पहिल्याच नोकरीची संधी त्यांना इसरो येथे मिळाली. वीस वर्षे झाली त्या इसरो येथे कार्यरत आहे. जवळपास १४ मिशन मध्ये त्यांनी काम केले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून, मुलांचा अभ्यास घेऊन काही काळ १२-१४ तास त्यांनी अथक काम केलं आहे. त्यांच्या एका मुलाखतीत त्या म्हणतात, "आज जेव्हा वैज्ञानिक म्हणून आम्हाला ओळखलं जातं, तेव्हा त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं. आता इसरोमध्ये २० वर्षे झाली आहेत आणि आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही." मंगळ मोहिमेचा भाग होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण होता." खरंतर मिशन मंगळ मोहीम ही फक्त इस्रोसाठीच नाही तर भारतासाठी खूप महत्वाची मोहीम होती. ही मोहीम यशस्वी झाल्यावर जगाने भारताच्या वैज्ञानिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि आज आंतरराष्ट्रीय संस्था आपल्या वैज्ञानिकांच्या मदतीची अपेक्षा करत आहे.

खरंतर मिशन मंगळवेळी इस्रोने पहिल्यांदाच लोकांना आत काय घडत आहे ते पाहण्याची परवानगी दिली होती. आज अनेक शास्त्रज्ञ सोशल मीडियावर आहेत. अशा कामगिरीमुळे आज तरुणांचे रोल मॉडेल म्हणून यांच्याकडे बघितल्या जाते आणि वैज्ञानिक असलेल्या नंदिनी हरिनाथ यांना याबद्दल अभिमान वाटतो आणि त्याचा त्या आनंदही घेतात. परिश्रम आणि प्रयत्नाने इथवर आल्याचे त्या आवर्जून सांगतात. वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ ज्यावेळी मिशन मंगळसाठी कार्य करत होत्या त्यावेळी नंदिनी यांची आई आंध्रप्रदेश येथून बंगलोरला येत असत. कारण त्यावेळी नंदिनी हरिनाथ यांची मुलगी बारावीत शिकत होती. मुलींना वेळ देता यावा म्हणून त्या पहाटे ४ वाजता उठत असत आणि दोघीजणी एकत्रित अभ्यास करत असत.

२००० रुपयांच्या नोटेवर झळकणारे मंगळयान मोहिमेचे चित्र पाहून नंदिनी हरिनाथ यांना खूप समाधान वाटले या मोहिमेच्या वेळी सुरुवातीला, शास्त्रज्ञांनी दिवसाचे सुमारे १० तास काम केले, परंतु प्रक्षेपणाची तारीख जवळ येत असताना काम १२ ते १४ तासांपर्यंत गेले आणि प्रत्यक्ष प्रक्षेपणाच्या वेळी ते जेमतेम कार्यालयातून बाहेर पडत असत. अत्यंत परिश्रमाने वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आणि त्यांच्या संपूर्ण टीम ने मंगळयान मोहीम यशस्वी करून दाखवली. मंगळयान प्रक्षेपणाच्या काही दिवस आधी वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ घरीदेखील जात नव्हत्या. कामाप्रती समर्पित भाव कसा असू शकतो याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ आहेत. मंगळयान अभियानाचं यश हा भूतकाळ झाला, आता भविष्याचा विचार करायचा आहे, असा निर्धार त्या व्यक्त करतात. वैज्ञानिक नंदिनी हरिनाथ यांच्या कामाच्या कटिबद्धतेला नमन आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळदुसरी

Saturday, October 14, 2023

⚜️ विज्ञानवादिनी - रितू करिधाल श्रीवास्तव !


रितू करिधाल श्रीवास्तव हे नाव खरंतर मिशन चंद्रयानमुळे संपूर्ण देशाला परिचित झाले. आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने इसरोसोबतच देशाचे नाव उंचावणाऱ्या रॉकेट वूमन म्हणून ओळख असलेल्या आजच्या पहिल्या विज्ञानवादिनी आहेत वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव. 

पत्नी, आई, सून, बहीण, मैत्रीण या प्रत्येक नात्याला योग्य न्याय देणाऱ्या वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव या दुसऱ्या मिशन चांद्रयानामुळे घराघरात पोहोचल्या. कर्तव्यनिष्ठ, यशस्वी आणि प्रतिभासंपन्न वैज्ञानिक म्हणून जबाबदारी पार पाडणे निश्चितच सोपे नाही. त्यासाठी नियोजनपूर्वक कार्यप्रणाली आखणे अन् पूर्णतः झोकून देऊन काम पूर्ण करणाऱ्या वैज्ञानिक म्हणून रितू करिधाल श्रीवास्तव यांची ओळख आज यथार्थ ठरेल. 

इसरोमधील एक महिला वैज्ञानिक म्हणून त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने भारताचे नाव उंचावले आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या रितू करिधाल श्रीवास्तव यांनी प्रथमतः स्वतःला सिद्ध केले. सर्वसामान्य घरातून आलेल्या रितू करिधाल श्रीवास्तव यांनी आपल्या बुद्धिमान कौशल्याने आणि जिद्दीने भौतिकशास्त्र विषयांत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे आचार्य पदवीसाठी लखनऊ येथे त्यांनी संशोधन सुरू केले. त्यांनतर गेट परीक्षा उत्तीर्ण करून इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर इथे एअरोस्पेस इंजिनिअरींगच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि हाच त्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला. 

अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी इसरोतील नोकरीसाठी प्रयत्न केला आणि त्यांची निवडही झाली आणि निकालानंतर रितू करिधाल श्रीवास्तव इसरोमध्ये रुजू झाल्या. बालपणापासून बघितलेल्या स्वप्नांना आता प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि एका नव्या स्वप्नाचा आणि ध्येयाचा प्रवास सुरु झाला. सुरुवातीला ज्येष्ठ वैज्ञानिकांसोबत काम करताना त्यातील आव्हानांना पेलण्याची क्षमता त्यांनी प्राप्त केली. वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांचे आज २० हुन अधिक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले असून त्यांना अनेक सन्मान आणि पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते यंग सायंटिस्ट अवॉर्ड, सोसायटी ऑफ इंडियन एरोस्पेस टेक्नॉलॉजीज अँड इंडस कडून इसरो टीम अवॉर्ड फॉर मॉम, एएसआयटीकडून वुमन अचिव्हर्स इन एअरोस्पेस अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. 

चांद्रयान- २ मिशन डायरेक्टर आणि मंगलयान मोहिमेच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली आहे.  'मिशन मंगल' या गाजलेल्या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन हिने साकारलेली भूमिका रितू करिधाल श्रीवास्तव यांच्या व्यक्तिमत्त्वावरूनच प्रेरित झाली आहे. आज प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा चांद्रयान ३ मिशनचे नेतृत्त्व वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांच्याकडेच आहे. आपल्या कुटुंबाचे सहकार्य आणि त्यातून मिळालेल्या समाधानातूनच आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून दृढतेने काम करण्याची इच्छाशक्ती आणि जबाबदारी रितू करिधाल श्रीवास्तव सहजतेने सांभाळत आहेत. आदित्य आणि अनिशा या दोन मुलांना मोठं करणे, त्यांचा शाळेचा अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे, त्यांच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणे अशी कौटुंबिक सगळी जबाबदारी त्या आनंदाने पार पाडत असतात. 

१९९७ पासून वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव इसरोत कार्यरत असून अनेक प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केले आहे. आपले पती अविनाश श्रीवास्तव आणि मुलांसोबत घालविलेले क्षण कामाची ऊर्जा देतात, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. महिला सक्षमीकरणाच्या समर्थक असणाऱ्या वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांनी महिलांनी अंतरीक्ष क्षेत्रात यावे यासाठी आग्रही आहेत आणि त्यासाठी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यास त्या नेहमीच इच्छुक असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज रॉकेट वूमन म्हणून ज्यांनी आपली ओळख सार्थ ठरवली आहे अशा आजच्या विज्ञानवादिनी वैज्ञानिक रितू करिधाल श्रीवास्तव यांचे जीवन प्रेरणादायी आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत. 

सर्वेश फडणवीस 

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळपहिली

Friday, October 13, 2023

🔸 विज्ञानवादिनी

आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. गेल्या चार वर्षांपासून आदिशक्तिच्या पर्वकाळात विविध विषयांवर या माध्यमातून लेखन झाले. "उत्सव आदिशक्तीचा" शीर्षकांतर्गत विदर्भातील देवी स्थानांवर, "त्वं ही दुर्गा" अंतर्गत सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रियांवर, "कर्तृत्वशालिनी" या अंतर्गत संरक्षण दलातील कार्यरत मातृशक्तीवर आणि मागच्यावर्षी "आधारवेल"  अंतर्गत गेल्या शतकातील आणि आताच्या ऐतिहासिक स्त्री चरित्रांवर लिहिण्याचा प्रयत्न केला. यावेळी विज्ञानवादिनी अर्थात वैज्ञानिक क्षेत्रांत महिलांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात होणार आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. अनेकजण या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत. वेद उपनिषद काळापासून स्त्री ही खरं तर पूजनीय, वंदनीय आहे. ती ब्रह्मवादिनी आहे. वैदिक काळापासून ती शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशीच होती आणि आजही हे संचित कायम आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र. 

आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे. हे करण्याचे धैर्य तिला इतिहासातून मिळाले आहे. संस्कारांचे बाळकडू घेऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी, नव्हे अग्रेसर असणारी स्त्री आहे. ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे इतिहासातून मिळालेल्या सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास वेद आणि उपनिषदांच्या काळापासून तिच्या पराक्रमाने उन्नत झाला आहे. आपल्या पराक्रमाच्या गाथा तिने त्रिखंडात गाजवलेल्या आहेत. प्रत्येकाला गर्व वाटेल अशीच स्त्रीची वाटचाल आहे. 

खरंतर आज विज्ञान क्षेत्रात महिलांनी अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य केले आहे. वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्या सदैव स्मरणात राहणाऱ्या आहेत अशाच विज्ञानवादिनी महिलांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय."विज्ञानवादिनी" या Dhanashree Lele  ताईंनी दिलेल्या बिरुदावलीत थोडीफार मांडणी करण्याचा प्रयत्न सलग ९ दिवस करणार आहे. 

आज जागतिकीकरणात 'ती' स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तृत्वाने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे आणि त्यातूनच हे लेखन करण्याचा प्रयत्न असणार आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

 #विज्ञानवादिनी #नवरात्र #लेखमाला

Tuesday, August 15, 2023

।। श्रीतुकाराममहाराजांची गाथा ।।

मध्यंतरी प्रसाद देशपांडे दादाच्या घरी गेल्यावर त्याने गीताप्रेसची श्रीतुकाराममहाराजांची गाथा (पारायणप्रत) भेट म्हणून दिली. यावर्षी अधिक श्रावण महिन्यात काहीतरी नवे वाचावे असे मनात असतांना श्रीतुकाराममहाराजांची गाथेचे वाचन सुरु केले. वाचतांना अनेक अभंग परिचित होते. लताबाईंनी आपल्या अजरामर स्वरांनी या अभंगाना स्वरसाज चढवला असल्याने वाचतांना काही अभंग त्याच चालीत वाचल्या गेले. खरंतर श्रीतुकाराममहाराजांनी सामान्य माणसाच्या जीवनाचं तत्त्वज्ञान आपल्या अभंगांमधून सांगितलं आहे. हे तत्त्वज्ञान त्यांच्या कठोर आत्मपरीक्षणामधून आणि सदसद्विवेक बुद्धीतून तयार झाल्याने त्याला एक कालातीत अशी आंतरिक नीतिमत्ता आहे. व्यापक मानवतेची, मानवी हक्कांची आणि समतेची बैठक आहे. तीव्र संवेदनशीलता, शोषणाचा तिटकारा आणि मानवजातीविषयी प्रेम हा श्रीतुकाराममहाराजांच्या अभंगांचा आत्मा आहे. या गुणांमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून श्रीतुकारामांचे अभंग आजही ऐकायला आणि म्हणायला लोक एकत्र येतात आणि अनेक ठिकाणी याचे नियमित पारायण होत असते. 

या अभंगरचनेविषयी एक कथा आहे. एकदा संतश्रेष्ठ नामदेवांनी
श्रीपांडुरंगाच्या पुढे प्रतिज्ञा केली की, " हे देवा! मी शतकोटी अभंग रचून तुमची कीर्ती वर्णन करीन." देव म्हणाले, "नामया! ही कसली प्रतिज्ञा करून बसलास ! अरे या कलियुगात माणसाचे आयुष्य थोडे. त्यात विघ्ने फार. अशा स्थितीत तुझी प्रतिज्ञा पूर्ण कशी व्हावी ?" नामदेव म्हणाले, "देवा! मी तुमच्या भरवशावर बोललो. आता माझी प्रतिज्ञा तडीस नेणे तुमच्या हाती. अनंत कोटी ब्रह्मांडे रचणाऱ्या तुम्हांला काय अशक्य आहे. शिवाय भक्तवत्सल, भक्ताभिमानी हे तुमचे ब्रीदच आहे. म्हणून आता जे काही करायचे, ते तुम्हीच करायचे. नामदेवांचे हे निर्वाणीचे शब्द ऐकताच देवांनी सरस्वती देवीला आज्ञा केली की, "तू नामदेवांच्या जिव्हेवर राहून त्याच्या तोंडून माझी वेदप्रणीत स्तुती मराठीत वदवावी. सरस्वती म्हणाली,आपली आज्ञा प्रमाण. पण नामदेव बोलतील, तेव्हा चपळाईने लिहून घेणारा कोणीतरी लेखक पाहिजे.

यांवर ज्यांची वेदशास्त्रे स्तुती करतात, व्यास-वाल्मीकी आदी कवींनी ज्यांचे वर्णन केले, ते भगवंत वैकुंठ, क्षीरसागर, शेषशय्या सोडून हातात लेखणी घेऊन नामदेवांचे काव्य लिहीत बसले. नामदेवांच्या तोंडून केव्हा काय निघेल, हे सांगता येणार नाही, म्हणून ते आळस, झोप सोडून अखंड नामदेवांच्या संगतीत राहिले. असे होता होता एकदा एकूण अभंग किती झाले, हे मोजून पाहाता ते चौऱ्याण्णव कोटी एकोणपन्नास लक्ष भरले. भगवंतांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी नामदेवाची पाठ थोपटली. पण नामदेवांचा प्रयाणकाळ जवळ आल्यामुळे त्यांची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी नामदेवांना तुकारामांच्या स्वप्नात नेले आणि तुकारामांना आज्ञा केली की, "या नामदेवाने शतकोटी अभंगरचना करून माझे वर्णन करण्याचा संकल्प केला होता. त्यातील पाच कोटी एकावन्न लक्ष अजून बाकी आहेत. ते तू पूर्ण कर." या आज्ञेनुसार तुकारामांनी अभंगरचनेस प्रारंभ केला आणि तो पूर्णत्वासही गेला. 

श्रीतुकाराममहाराजांच्या या सार्थ अभंगांतून व्याकूळ भक्ताची प्रेमळ विनवणी, भगवंतांशी प्रेमकलह, सत्संगमहिमा, दंभावर कोरडे, सदाचाराचे महत्त्व, दुर्जनांची निंदा इत्यादी असंख्य विषय आलेले आहेत. व्यवहारात राहूनही परमार्थ कसा करता येतो, हे त्यांचे अभंग वाचून समजते. श्रीतुकाराममहाराजांच्या भाषेवर संस्कृताचा प्रभाव नाही. अतिशय मोजक्या शब्दांत विषय स्पष्ट करण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. त्यांच्या अभंगातील ओळी सुभाषितांसारख्या व्यवहारात प्रचलित आहेत. या अभंगांत पांडुरंगाचा महिमा, वारकरी संप्रदायाची थोरवी, नामसंकीर्तनाचे महत्त्व, पंढरपूर क्षेत्राचे माहात्म्य, असे कितीतरी विषय आलेले आहेत. त्यांच्या अभंगांची भाषा खास मराठी वळणाची आहे. त्यांतील शब्द, वाक्ये, साधी, सुटसुटीत, समर्पक व मनाचा वेध घेणारी आहेत. श्रीतुकाराममहाराजांचे अभंग हे अनेकविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत.

गेली कित्येक शतके झाली हे अभंग रचलेले आहेत पण आजही प्रत्येक घटनेकडे बघण्याची दृष्टी आणि योग्य आणि शास्त्रीय शिकवण देण्याची ताकद या गाथेत पानापानावर दिसते. एका अर्थाने मानसशास्त्रीय ग्रंथ म्हणूनच याची ओळख सार्थ ठरेल. अत्यंत साध्या सरळ आणि सोप्या शब्दातील सर्वपरिचित उदाहरणे समाविष्ट असलेल्या गाथेतील अभंग म्हणजे प्रत्येक साधकाला विचार देणाऱ्या आहेत. आवर्जून संग्रही ठेवावे आणि एकदा तरी वाचावे अशीच श्रीतुकाराममहाराजांची गाथा आहे. या छानशा भेटीसाठी मनापासून धन्यवाद प्रसाद दादा.'अधिकस्य अधिकं फलं' या नात्याने वारंवार वाचन व्हावे ही श्रीभगवंताचरणी प्रार्थना आहे..

सर्वेश फडणवीस

Saturday, July 8, 2023

🔹 सप्तसुरांची *देवता 📖

शीर्षक वाचूनच हा स्मृतिग्रंथ वाचनाची ओढ लागली. एका बैठकीत वाचून हा ग्रंथ अलगद बाजूला झाला आणि लता दीदींना पुन्हा ऐकण्याची इच्छा झाली. सप्तसुरांची देवता लता मंगेशकर नावासोबत मुलायम आवाजातील सुंदर गीतांचं अस्तित्व आणि जनतेच्या मनातील त्यांच्याप्रती असलेला नितांत आदरभाव सामावला आहे. सप्तसुरांची देवता या स्मृतिग्रंथाच्या नावाचे मोठेपणच उत्तुंग आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती, मग तो वृद्ध असो वा बालक, गरीब असो वा श्रीमंत, शहरी भागातील असो वा ग्रामीण, सर्वांना हे नाव परिचित आहे. नुसते परिचितच नाही, तर त्या नावाबद्दल विलक्षण आपलेपणा, प्रचंड जिव्हाळा, आणि अतिशय प्रेम आहे. कुठल्याही प्रहरी हा सूर ऐकण्याची इच्छाच होते. 

प्रत्येक भारतीयाच्या मनात दिदींबद्दल आजही आदर असेल याची खात्री आहे. केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर परदेशातील जनतेच्यासुद्धा मनात 'लता मंगेशकर' या नावाबद्दल विलक्षण आपुलकी आणि आदरभाव आहे. हा स्मृतिग्रंथ वाचून ती आपुलकी आणि आदर अधिक वाढत जातो कारण यात ज्या लेखांचे संकलन केले आहे ते लतादीदी गेल्यानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या ३० मान्यवर लेखकांनी जसे ए. आर रहमान, गुलजार, आशुतोष शेवाळकर, सतीश पाकणीकर, श्रुती सडोलीकर, अरुणा ढेरे, राज ठाकरे, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, राहुल देशपांडे, विष्णू मनोहर अशा अनेक मान्यवरांचे लेख यात आहेत आणि विविध मराठी वृत्तपत्रात लिहिलेल्या १९ विशेष संपादकीय लेखांचे संकलन यात आहे. 

मा. दीनानाथांच्या आधारवेलीवर लता मंगेशकर हे नाव बहरलेच नाही तर त्याचा वेलू गगनावरी गेला. कंठातील देवदत्त गंधार घेऊनच जन्माला आलेल्या ल-ता- मं-गे-श-क-र ह्या सप्तरंगी सुरांनी अभिजात अमृतस्वरांची नादमधुर बरसात भूतलावर करून संगीतकलेला अतिशय ऐश्वर्यसंपन्न करून सर्वोच्च उंची प्रदान केली. मधुर आणि मुलायम आवाज, स्पष्ट, अर्थपूर्ण शब्दोच्चार यांमुळे लता दिदींचे गाणे ऐकणारा कायम भारावून जातो. दुःख, क्लेश, यातना यांना विसरायला लावण्याचे विलक्षण सामर्थ्य लतादिदींच्या स्वर्गीय गळ्यात होते. जवळजवळ सर्व भारतीय भाषांत गाणी गाऊन त्यांनी आपले स्वर काश्मीर ते कन्याकुमारी अजरामर केले आहे. 

आपल्या लेखात रेखा चवरे जैन छान लिहितात, दीदी प्रत्यक्ष या भूतलावर नसल्या तरी सुरांच्या रूपाने अमर आहेत. त्यांच्या गाण्यांनी करोडो रसिकांना उच्च - निर्मळ आनंद दिला. आमच्या सुखदुःखात दीदींचा सूर तन्मय झाला. प्रत्येक सुखाची भावना त्यांच्या सुरांमुळे गडद झाली तर दुःखी भावना हलकी झाली. आनंद, तृप्ती अशा विलक्षण भावनांची अद्भुत अनुभूती घेत त्यांची गाणी आपण मनात साठविली. दीदींच्या अलौकिक - अमृतमय सुरांच्या साथसंगतीने आपले आयुष्य चैतन्यमय झाले. जगण्याच्या प्रत्येक क्षणी साथ देणारा दीदींचा सूर आणि दीदीही  आपल्याच वाटू लागल्या. दीदींच्या कारकिर्दीत गीतकारांच्या पिढ्या बदलल्या, संगीतकारांच्या पिढ्या बदलल्या, नायिकांच्याही पिढ्या बदलल्या, पण दीदी मात्र दीपस्तंभासारख्या टिकून दुसऱ्यांना मार्ग दाखवित राहिल्या. सर्व गीतकार, संगीतकार, सहगायक, नायिका या सर्वांचा ध्यास एकच होता तो म्हणजे दीदींबरोबर काम करणं. गेली सात दशकं रसिकांच्या चार पिढ्या दीदींची गाणी ऐकत मोठ्या झाल्या आणि पुढील कितीतरी पिढ्यांना हे सुवर्णसंचित लाभणार आहे आणि हे शब्दशः सत्य आहे. 

मुंबईतील 'प्रभकुंज' ही ऐतिहासिक वास्तू म्हणजे साक्षात स्वरसरस्वतीचं निवासस्थान. ही पवित्र वास्तू म्हणजे रसिकांसाठी जणू मंदिरच आहे. या मंदिराकडे नेणारा पेडर रोड हाही आपल्या आत्मीयतेचाच विषय आहे म्हणून जेव्हा येथून हसऱ्या फोटोसह दीदींचा रथ निघाला, ते दृश्य आपण बघूच शकलो नाही आणि उरात उसळणाऱ्या कालवाकालवीने हलून गेलो. ज्या मार्गावरून दीदींनी कितीदा तरी जाणं-येणं केलं, ज्या मार्गाने सदैव चैतन्यमय दीदी बघितल्या, त्या मार्गाचंही काळीज तेव्हा नक्कीच फाटलं असणार. अंतिम क्षणी दीदींच्याच स्वरात वाजत असणारं 'ए मेरे वतन के लोगो' ऐकून अजूनच गहिवरून आले. हे ही विलक्षण होते की दीदींना अखेरची मानवंदना त्यांच्याच गीताने देण्यात आली. आज दीदी प्रत्यक्ष या भूतलावर नसल्या तरी सुरांच्या रूपाने अमर आहेत. मानवाच्या मर्यादा आहेत पण लतादीदी मात्र अपार्थिव आहे. आणि याचसाठी दीदी देहरूपाने नसतांना हा स्मृतिग्रंथ वाचतांना वाचक म्हणून आपण समृद्ध होतोच पण दीदी किती मोठ्या असतील याची भावना नकळत मनात येते. हा स्मृतिग्रंथ संग्रही असावा असाच आहे. कारण येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हे सांगण्याचे उत्तरदायित्व आपल्यावरच आहे. 

सप्तसुरांची देवता 
संपादन - रेखा चवरे जैन 
प्रकाशक - परचुरे प्रकाशन मंदिर
मूल्य - ₹ ३००
संपर्क क्रमांक - 9869928646 / 020-24473372

Sunday, June 25, 2023

'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती'

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित 'द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड' या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद 'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती' हे भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रकाशित केले आहे. मूळ इंग्रजी पुस्तक वाचले होते पण याचा अनुवादही वाचनीय झाला आहे. नुकतंच एक चांगले पुस्तक वाचून पूर्ण झाले याबद्दल सकारात्मक वाटतं आहे. देशाचे धोरण आणि रणनीती यांच्यावर अत्यंत बारकाईने विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे. 

खरंतर द इंडिया वे अर्थात 'भारत मार्ग' म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील काम करणाऱ्या एका व्यक्तीचा असा दृष्टीकोन आहे, जो जाणीवपूर्वक प्रत्यक्ष वास्तवाशी जोडलेला आहे. हे पुस्तक अनेक प्रकारच्या समूहांना डोळ्यासमोर ठेवून लिहिले गेले आहे. जगातील लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे भारताच्या वैचारिक भूमिकेची एक सुव्यवस्थित मांडणी आहे. त्यातून जगाला याबाबत अधिक स्पष्टता येणे आणि त्यांची याबाबतीतील स्वीकारार्हता वाढणे अपेक्षित आहे. शेवटी जगात आपला प्रभाव वाढत जाताना जगाला आपला अधिक चांगला परिचय होणे आवश्यक आहे. या अंतरंग ओळखीमुळे सहकार्याच्या शक्यता वाढतील आणि गैरसमज होण्याच्या संभावनाही कमी होत जातील; पण हे पुस्तक त्या भारतीयांसाठीसुद्धा आहे, जे
परराष्ट्र धोरणाच्या प्रत्यक्ष संबंधात नाहीत. हे लक्षात घेतले पाहिजे, की आंतरराष्ट्रीय घटनांकडे ते लक्ष देत असोत वा नसोत, या घटनांच्या परिणामांपासून कुणाची सुटका नाही. 'एक बदल आणि चार हादरे' हा याचा ठोस पुरावाच आहे. याहीपलीकडे धोरण ठरवताना त्यांच्या स्वतःच्या हिताशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या क्षेत्रांत जे निर्णय घेतले जातील त्याच्या परिणामाचे ते भागीदार आहेत आणि कायम राहतील. 

या पुस्तकातून आपल्याला परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक ती कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या परराष्ट्र मंत्री म्हणून डॉ. जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे हीच पर्वणी आहे.

भारत मार्ग या पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन पैलूंवर अधिक प्रकाश टाकलेला आहे. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ या तीन पैलूंवर विशेष भर देण्यात आला आहे. आणि त्याचा परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मुद्देसूद मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही माहितीपूर्ण आहे. आत्ताची राजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात वाचायला मिळते. 

जागतिकीकरण ही आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारत मार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल हा विश्वास वाटतो. 

परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे डॉ. जयशंकर यांनी या पुस्तकातून सांगितली आहेत. स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारानुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार या पुस्तकातून अधिक व्यापकता दर्शवतो.

सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे. चांगले परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे. याबद्दल हे पुस्तक अधिक वाचतांना विचार देणारे पुस्तक आहे. 

डॉ. जयशंकर यात लिहितात," चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल." हे त्यांनी अनेक उदाहरणातून स्पष्ट केले आहे. 

आजवर कोणत्याही परराष्ट्र मंत्र्याला कार्यरत असताना परराष्ट्र धोरणावर पुस्तक लिहिण्यासाठी वेळ आणि इच्छा असल्याचे अभावानेच आढळून आले; पण राजनीतीत मुरलेले मुत्सद्दी डॉ. एस. जयशंकरांसारखे विद्वान जेव्हा सूत्रे हातात घेतात, तेव्हा सखोल विचारमंथनातून एखादे विस्तृत पुस्तक समोर येणे स्वाभाविक आहे. 'द इंडिया वे' अर्थात भारत मार्ग हे एका डोळस निरीक्षकाचे आत्मनिवेदनही आहे आणि भारत ऐतिहासिक बदलांशी कशा प्रकारे जुळवून घेत आहे, हे जगाला सांगण्याचे एक साधनही आहे. हे पुस्तक एका महत्त्वाकांक्षी देशाचे भवितव्य काय आहे याविषयी बरेच शिकवतो. भारताला आता व्यावहारिक राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचे प्रखर आवाहन आहे आणि यात भारत मार्ग अग्रेसर असेल हाच विश्वास आहे. अत्यंत वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. 

'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती'
लेखक डॉ.एस.जयशंकर - अनुवादिका - सारिका आठवले
प्रकाशक : भारतीय विचार साधना - पुणे 
मूल्य - ₹ ३०० 

सर्वेश फडणवीस 

Sunday, June 11, 2023

श्री संत कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान निमित्ताने..

अवघा झाला आनंदू  !! 🚩🚩

"रामकृष्ण हरी". वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. गेली साडेसातशेहून जास्त वर्षे  ' वारी ' अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी, भजन, कीर्तन, रिंगण, खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

ज्येष्ठ कृ.अष्टमी या तिथीला अर्थात आज आळंदीहून प्रस्थान ठेवलेली ज्ञानेश्वर माउलींची  पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करण्याऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे. आज आपण ही सगळे या पालखी सोहळ्यात सामाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माउलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्णाचा गजर करत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जात आहोत. कारण या परंपरचे महाराष्ट्र साडेसातशे वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे. लाखो वारकरी, हजारो मृदुंग, हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेनी चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदानी कोंदून जाते. मैलोनगणिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन, तहान, पाऊस, वारा, वादळ याची पर्वा न करता चालत असतात.

कायम वाटतं वारी म्हणजे मानवा-मानवांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे. 

खरंतर एखादी प्रवाही नदी जशी स्वयंशिस्तीने आपले काठ निर्माण करत जाते तसाच हा वारकऱ्यांचा प्रवाह पंढरीच्या दिशेने वाहताना दिसून येतो. अगदी शिस्तीत चाललेले वारकरी कुठल्याही मर्यादांचे उल्लंघन न करता स्वयंप्रेरणेने चालत असतात. वाटेत रंजल्या-गांजल्यांना मदत करत असतात.  

वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं, वारी म्हणजे देव-भक्त भेटीतील आतुरता, वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास, वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया, वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास, वारी म्हणजे देव शोधता-शोधता स्वत:च देव होऊन जाणं, वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रति जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. "वारी" हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कार नसून, भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला साठवून विवेकाच्या दिशेने होणारी उन्मत्त वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी आहे. 

आज सर्व वारकरी आळंदीला पोहोचले आहेत काही वेळाने आळंदीहुन माउलींच्या समवेत सर्वजण निघणार आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी. चला आपण ही निघूया त्या विठूरायाच्या दर्शनार्थ रामकृष्णाचा गजर करत.

सकल संतांचे लाडके असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री माउली आज पंढरपूर च्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. नगर प्रदक्षिणा करत त्यांचा आजचा मुक्काम आजोळी अर्थात गांधी वाड्यात असणार आहे आणि उद्या सकाळी माउली पुण्याच्या दिशेने  प्रस्थान ठेवेल.

'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'..

सर्वेश फडणवीस

Wednesday, May 31, 2023

नर्मदेच्या तीरावरचे 'महेश्वर'


" मुली, अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजेन, पण तूं सती जाऊं नकोस. माझं ऐक. " हृदयाचे पाणी करणाऱ्या ह्या शब्दांनी मल्हारराव पुत्रनिधनानंतर आपल्या सुनेची समजूत घालीत होते. खरंतर ही गोष्ट इ. स. १७५४ मध्ये घडली. पेशव्यांचा भाऊ राघोबा ( रघुनाथ ) याने कुंभेरीचा किल्ला घेतला. या मोहिमेंत मल्हारराव त्यांच्या मदतीला गेले होते. लढाईत मल्हाररावांचा मुख्या मारला गेला. या वेळीं अहिल्याबाईही त्यांच्याबरोबर होत्या. खंडूजी हे मल्हाररावांचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का बसला. या वेळीं अहिल्याबाईचें वय अवघें वीस वर्षांचे होते. त्या काळच्या परिपाठानुसार पतीमागोमाग सती जाण्याची त्यांनी तयारी केली. पण मल्हारराव यांना दुसरा कोणाचाच आधार नसल्यानें त्यांनी अहिल्याबाईंना सती न जाण्याची विनंती केली कारण आपल्या पराक्रमाने मल्हारराव जाणून होते की, इंदूर संस्थानच्या आधारवेल म्हणून अहिल्याबाईच योग्य आहे.  

हे वर्णन वाचून पुण्यश्लोक अहल्याबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महेश्वर या भूमीत मध्यंतरी जाण्याचा योग आला. हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावात अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार चालवला आणि आजही त्याच्या पाऊलखुणा पावलापावलावर जाणवतात. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. महेश्वरचा किल्ल्यासमोरील नर्मदा घाट समृद्ध असाच आहे. खरंतर पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे बघण्यासारखे आहे. 

महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून पुढे जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आणि स्वच्छ आहेत. पेशवा घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटांवर जास्त गर्दी दिसत नाही.  नर्मदेच्या किनाऱ्यावर दगडी बांधकाम असलेला हा किल्ला आहे. वर चढून आत गेल्यावर त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर उभा राहतो. याच किल्ल्यात एका भागात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.

महेश्वरातील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर व अहिल्येश्वर ही मंदिरे खासकरून पाहण्यासारखी आहेत. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच अत्यंत देखण्या आहेत. उत्तम प्रशासक न्याय देणाऱ्या म्हणून अहिल्याबाईंची ख्याति सर्वदूर होती. तडजोड आणि मार्दव हे गुण त्यांच्यात भरपूर असले तरी जिथे गरज असेल तेथें त्या वज्रापेक्षांहि कठोर होत असत.

अहिल्याबाईंचे स्मारक, त्यांनी बांधलेल्या अनेक विहिरी, धर्मशाळा, पूल, रस्ते, घाट आणि देवळें या रूपांत त्यांनी केलेले कार्य आजही सुस्थितीत बघायला मिळते. कलकत्ता ते बनारस रस्ता तयार करून सौराष्ट्रांत सोमनाथाचे, गयेला विष्णूचे आणि काशीला विश्वनाथाचे, नेपाळ येथील पशुपतीनाथ अशी विविध देवालये त्यांच्या धार्मिक वृत्तीची आणि दातृत्वाची आजही साक्ष देत आहेत. अहिल्याबाईंनी त्यांच्या जीवनकाळात केलेल्या पुण्यकर्मामुळेच त्या "पुण्यश्लोक" झाल्या. इंदूर संस्थानचा  कारभार त्यांनी अत्यंत कर्तबदारीने जवळजवळ तीस वर्षे सांभाळला. मल्हाररावानंतर इंदूर संस्थानची आधारवेल आणि स्त्री पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले आणि म्हणून समृद्ध अशी महेश्वरची नर्मदा आजही पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या अस्तित्वाची जाणीव करून देते आहे. एकदा तरी या स्थानाची ऊर्जा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासारखी आहे. अहिल्याबाई यांच्या चरणी नमन आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

Tuesday, May 30, 2023

◆ तरलतरतरंगे देवि गंगे प्रसीद..

भगवति तव तीरे नीरमात्राशनोहं 
विगतविषयतृष्ण: कृष्णमाराधयामि  
सकलकलुषभंगेस्वर्गसोपानसंगे 
तरलतरतरंगे देवि गंगे  प्रसीद।। १।। 

श्रीमद आदि शंकराचार्य यांचे हे गंगाष्टक. हे अष्टक ऐकतांना, म्हणतांना सुद्धा आपण आपल्या स्थानाववरून गंगेच्या काठावर असल्याचा, तो गंगेचा प्रवाह अनुभवू शकतो इतकी विलक्षण रचना त्यांनी केली आहे. 

गंगा म्हणजे गंगाच आहे. तिचे मंत्रमय,काव्यमय वर्णन करणे तसे सोपें नाही. श्रीमद आदि शंकराचार्य आणि थोरले स्वामी महाराज अर्थात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी प्रत्येक नदीवर स्तोत्र रचले. गेय आणि विशिष्ट छंदात असलेल्या रचना आजही अनेकांच्या ओठी आहेत. थोरले स्वामी महाराज वर्णन करतांना म्हणतात, 

न जाणे मी धर्मा न च विहित कर्मा अवगमा ।
न जाणे मी शर्मा न च विहित आधार महिमा ।।
कुकर्मासी कामा कुलित कृतकर्माची सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।।

अशी ही गंगा स्वच्छ, निर्मळ,अविरल वाहते आहे. वैज्ञानिक दृष्टीनेही पाहून झाले,गंगेचे साठविलेले पाणी बिघडत नाही. काहीकाळ सगळं स्तब्ध झाल्यावर गंगेचा स्वच्छ आणि निर्मळ प्रवाह आपण बघितला आहे. गंगा म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या चरणकमलातून निघालेले पावित्र्य, शंकराच्या मस्तकावर अवतरले व तेथून सेवेची दीक्षा घेऊन प्रवाह रूपात पृथ्वीवर वाहू लागले. ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा व सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गंगा. गंगेचा हा उसळता प्रेमप्रवाह पाहून गंगेच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येकाच्या ओठावर सहज शब्द येतात , 'गंगा मैय्या की जय!'

स्कंद पुराणात लिहिले आहे की, ज्येष्ठ शुद्ध दशमी संवत्सरमुखी म्हटली जाते. त्या दिवशी भावयुक्त अंत:करणाने स्नान व दान करावे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने गंगा स्नान पहिल्यांदा घडले. खरंतर तो अनुभव शब्दांतही मांडता येणार नाही इतका विलक्षण आहे. प्रयागराज कुंभमेळ्याची व्यवस्था अतिशय भव्यदिव्य आणि डोळे दिपवून टाकणारी होती. प्रयागराज ला राहिल्यावर गंगेत डुबकी मारल्यावर दुसऱ्या दिवशी काशीत पोहोचलो. दशाश्वमेध घाटावर गंगेचे पुन्हा दर्शन घेतले दिवसभर काशी पालथी घातली पुन्हा सायं आरतीसाठी गंगेच्या काठावर येऊन बसलो. देव, देश, धर्माच्या सीमा ओलांडलेली शेकडो माणसं तिथं बघितली आणि मनात एक क्षण विचार आला की खरंच गंगा किंवा नदी महात्म्य हे अभ्यासनीय आहे. सूर्यास्तानंतर काही क्षणांत दिव्यांच्या झमगटात गंगेची आरती सुरू झाली. गंगेचा प्रवाह शांत असला तरी सायं आरतीच्यावेळी गंगेच्या पाण्यात वेगळेपण जाणवत होते. ते बघितले आणि मनःशांती या शब्दाची ताकद अनुभवली. 

व्रतनिष्ठ, तेजोमूर्ती,चारित्र्यसंपन्न, तत्वज्ञ भीष्मांना जन्म देऊन गंगा कृतार्थ झाली. भारतीय लोकांच्या हृदयात तिने मातेचे स्थान प्राप्त केले. गंगेकडे भोगाच्या दृष्टीने पाहणाऱ्या असुरांना भोग मिळाला तर भक्तीच्या दृष्टीने पाहणाऱ्या देवांनी मोक्ष प्राप्त केला. पतीतपावनी गंगा अनेकांना भुरळ पाडणारी आहे. संत कबीर यांच्या गंगेच्या काठावरील रचना असो किंवा मग जगन्नाथ पंडित यांची गंगा लहरी म्हणजे तर गंगेचे विलोभनीय दर्शन घडवणारे आहे. आज गंगा दशहरा या निमित्ताने भगवती गंगा आम्हा सगळ्यांवर मांगल्याचा वर्षाव करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.. 

हर हर गंगे !! 

✍️ सर्वेश फडणवीस 

#गंगादशहरा #Ganga

Friday, May 26, 2023

दूरदृष्टी , कल्पकता आणि अंत्योदय साकारणारे नितीन गडकरी

अखंडितलक्ष्मीअलंकृत, सकळगुणालंकरण राजर्षी राजमान्य श्रीमंत नितीनजी यांचे सेवेसी सप्रेम नमस्कार व विनंती विज्ञापना जे -

श्री नितीन जयराम गडकरी या आपल्या नावातच एक विलक्षण दूरदृष्टी ही बघायवयास मिळते. या माध्यमातून आपली रोजची दिनचर्या बघून अचंबित व्हायला होतं. आपला प्रवास आणि सतत कार्यमग्न राहण्याची सवय बघून आम्हा सर्वांना सदैव प्रेरणा मिळत असते. आज केंद्रातील मंत्री म्हणून आपण सलग ९ वर्ष झाली रस्ते विकासाच्या माध्यमातून देशात रस्त्याचे नवनवीन जाळे विणत आहात. देशाच्या कुठल्याही भागात गेलो की, नागपूर म्हंटल की आपल्या नावाचे वेगळेपण अनुभवायला येतंच. खरंतर राजकारणी नेता समाजाभिमुख तळागाळातील कार्यकर्त्यांशी ही तितक्याच आपुलकीने कार्य करणारा असावा असे वाटते आणि आपण त्यात अग्रक्रमावर आहात. सर्वांशी एक होत आपले वेगळे अस्तित्व आहे याची जाणीव करून देण्याची इच्छा आणि आकांक्षा असलेले आणि संघ संस्कार नकळतपणे लहानपणापासून भिनलेले आणि विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात असलेले प्रतिभावंत मुदसद्दी राजकारणी म्हणून होत असलेली आपली जगन्मान्य ओळख आम्हाला नागपूरकर म्हणून अभिमान वाटावा अशीच आहे. 

आज भारतभर महामार्गाच्या माध्यमातून आपण आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. लोकाभिमुख कार्य करताना त्यांच्यातला एक होऊन कार्य करण्याची आपली आवड प्रत्येकाला जोडून ठेवत आहे. आज आपण नागपूरचा जो कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे त्याला शब्दात व्यक्त करणे कठीण असेच आहे. कुणीही नवा व्यक्ती नागपूरला आला की त्याच्या तोंडून आपुसक शब्द निघतात ते म्हणजे वाह.. नागपूर फारच बदलले आहे. आज नागपूर मेट्रोचे कार्य हे आपल्या कारकिर्दीत झाले याचा आम्हाला नागपूरकर म्हणून अभिमानच आहे. प्रत्येक नागपूरकरांना आपल्या कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य असल्याचा विश्वास आपण निर्माण केला आहे. कुटूंब वत्सल आहात आणि कौटुंबिक सोहळ्यात आम्ही ते कायम अनुभवत असतो. पक्ष, पार्टी याचा मान ठेवत वैयक्तिक माणूसकीचे नाते आपण टिकवून ठेवले आहे त्यामुळे विरोधक सुद्धा आपल्याशी प्रसंगी राजकारण बाजूला ठेवत मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवण्यासाठी तत्पर असतात.  

आपण करत असलेले कार्य विलक्षण आदरयुक्त आणि अभिमान आणि अभिनंदनीय आहे आणि आम्हा नागपूरकरांचे आपण भूषण आहात. आपल्या सारखे नेते आणि राजकारणी आज देशाला वेगळ्या उंचीवर नेतील यात शंका नाहीच. आपल्या कार्यावर लिहिण्याचा माझा अधिकार नाही. पण आपला हितचिंतक आणि आपल्या कामावर निरतिशय प्रेम करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून या प्रभावी माध्यमातून शुभेच्छा देताना आनंद आणि गौरव होतो आहे. आपणांस जन्मदिवसाचे अभिष्टचिंतन. आई रेणुका आपल्याला उदंड निरामय आरोग्य प्रदान करो हीच तिच्या चरणी प्रार्थना..💐🙏🌷🌷

बहुत काय लिहिणे ? अगत्य असू द्यावे ही विज्ञापना. 

- सर्वेश फडणवीस


Monday, May 8, 2023

प्रणवीर महाराणाप्रताप !!

प्रणवीर अर्थात मेवाडचा राजा महाराणा प्रताप. आजही ह्यांच्या गौरवशाली इतिहासाचे किस्से ऐकणे म्हणजे पर्वणीच असते. त्यात कादंबरीत कठीण विषयाला सोपे करण्याची शैली सुद्धा वेगळीच असते. पराक्रमी योद्धयाची फारशी ओळख दुर्दैवाने आपल्याकडे नाही. राजपूतांमध्ये स्वाभिमानाची आग चेतविण्याचे महत्कार्य महाराणा प्रतापांनी केले. अकबराशी प्राणपणाने झुंज घेतली, प्रचंड पराक्रम गाजवला आणि त्याच महाराणाप्रताप यांच्याविषयी मराठीत माहिती कमीच सापडते. 

भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील अत्यंत तेजस्वी आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे 'महाराणा प्रताप'. ज्या महापुरुषांच्या केवळ स्मरणानं देशभक्तांचे बाहू स्फुरण पावतात ते प्रातःस्मरणीय नाव म्हणजे 'महाराणा प्रताप'. ज्याच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या कथांवर भारतीय मनं संस्कारित होऊन त्यांत राष्ट्रीय भावना निर्माण होते ते नाव म्हणजे 'महाराणा प्रताप'. राजस्थानच्या भूमीचा कणनकण, अरवली पर्वताचे उत्तुंग शिखर, घनदाट अरण्यातल्या वृक्षांच्या पल्लवित शाखा, या पुण्यभूमीवर वाहणारे मंद वारे आणि शांत नीरव रात्री आकाशात शांतपणे चमकणारे अगणित तारे अजूनही मूकपणे या प्रणवीराची कथा सांगत असतात, शतकानुशतकं. जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची प्रदीप्त ज्योत, भारताच्या इतिहासातलं सोनेरी पान, आणि मातृभूमीसाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या परमवीराची, त्याच्या यशापयशाची प्रेरणादायी गाथा म्हणजे महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर असलेले 'प्रणवीर महाराणाप्रताप' ही कादंबरी गाथा आहे. 

राजस्थानमधील मेवाडच्या महापराक्रमी राजा प्रतापसिंह याच्या शौर्याने आजही भारतीयांचा ऊर भरून येतो. तुर्कांशी त्यांनी दिलेल्या लढ्याचे वर्णन आजही केले जाते. १५७२ ते १५९७ अशी २५ वर्षे राज्य केले. आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या या परमवीराची कथा, त्याच्या यशापयशाची प्रेरणादायी गाथा डॉ. भारती सुदामे यांनी प्रणवीर महाराणा प्रताप यातून लिहिली आहे. महाराणा प्रताप, मेवाड, त्याचा प्रिय चेतक घोडा आणि हल्दी घाटची लढाई, हाच इतिहास माहीत असणाऱ्यांना या कादंबरीतून महाराणांचे प्रामाणिक चरित्र समजते. देदीप्यमान पुरुषाची राष्ट्रप्रेमाने भारलेली ही कहाणी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

भारती ताई त्यांच्या मनोगतात लिहितात की, 'महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर कादंबरी लिहायची म्हणजे व्यक्तिपूजन नव्हे.
'प्रतिमापूजन' 'प्रतिमाभंजना'ला दिलेलं उत्तर ठरू शकत नाही.' ही समजही दिली गेली. राणा प्रतापांच्या आयुष्याचा अभ्यास करण्यात जे गवसलं ते व्यक्त करण्याच्या सहज प्रक्रियेतून 'प्रणवीरा'चा जन्म झाला. ९ मे १५७० ला महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. आज महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्यांची स्फुर्तीदायी जीवनगाथा जाणून घेण्यासाठी सौ.भारती सुदामे यांनी लिहिलेले 'प्रणवीर महाराणाप्रताप' ही कादंबरी मिळवून वाचायला हवी आणि संग्रही असावी अशीच आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#प्रणवीर #महाराणा_प्रताप_जयंती

Saturday, May 6, 2023

◆ नमो नारदाय हरिरूपाय !


आज वैशाख कृष्ण प्रतिपदा, देवर्षी श्रीनारदांची जयंती. देवर्षी नारद म्हणजे हरिभक्तीचा, गुह्यज्ञानाचा, विलक्षण प्रतिभेचा प्रसन्न आविष्कार आहेत. पुराणांव्यतिरिक्त त्यांच्या इतके परमज्ञानी, समयसूचक, हजरजबाबी, अलौकिक दूरदृष्टीचे आणि अपरंपार प्रेमभक्तीने अंतर्बाह्य दुसरे व्यक्तिमत्व शोधून सापडणार नाही. 

भगवद्गभक्तीचा प्रचार प्रसार त्रिभुवनात करणारे महर्षी नारद ज्ञानी होते तसेच राजनिती, धर्मशास्त्र, वेदपुराण, व्यवहारज्ञान यात निपूण होते. देवर्षी नारद उत्तम मार्गदर्शक आणि वक्ता म्हणून आजही प्रसिद्ध आहे. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. त्रिखंडात त्यांची सर्वदूर कीर्ती होती. 

देवर्षी नारदांची भूमिका समाजाचे हितरक्षक म्हणून देखील अत्यंत महत्वाची आहे. सर्वगुणसंपन्न देवर्षी नारद हे त्रिभुवनतारक होते. आपल्या मुक्त संचाराने त्यांनी त्रिभुवनातील अनेक समस्या सोडविल्या आणि जनसंवादाचे पुण्यकार्य केले. त्यांच्या प्रत्येक शब्दावर सर्वांचा विश्वास होता, त्यांची संवादशैली भिन्न होती. मुखातून वाईट शब्द न काढता समस्या सांगणे आणि प्रसंगी त्या समस्येच्या निराकरणात मदत करणे यासाठी ते प्रसिद्ध होते. प्रत्यक्ष ब्रम्हदेवाचे पुत्र असलेले देवर्षी नारदांनी गृहस्थाश्रम नाकारला म्हणून पित्याच्या शापाला सामोरी गेले. त्यांच्या संयमी वृत्तीचा परिचय त्यांच्या चरित्रात होतो, आपल्या शब्दावर कायम राहणारे नारदमुनी म्हणूनच तिन्ही लोकात ते वंदनीय होते. देवत्व आणि ऋषीत्व यांचा संगम नारदमुनींच्या व्यक्तिमत्वात होता म्हणून त्यांना 'देवर्षी' उपाधी प्राप्त झाली. देवांसह सामान्य माणसाचा देखील नारदवाणीवर विश्वास होता. 

त्रिखंडातील माहिती संकलित करून ती योग्य पद्धतीने आणि योग्य शब्दात मांडणे तसेच संवाद साधण्याचे काम नारदांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक केले. या कामासाठी ते त्रिखंडात आद्य पत्रकार म्हणून गौरविल्या गेले कारण तेव्हाही संवाद हे प्रभावी माध्यम होते आणि आजही याच माध्यमातून समाजात बदल घडुन येत आहेत. संवाद कौशल्य असेल पण बातमीत सत्यता नसेल तर अशा बातमीने समाज एकसंध राहत नाही. आपल्या जवळील माहितीची पूर्ण खात्री केल्याविना त्याला प्रसिद्धी न देणे सर्वोत्तम आहे. देवर्षी नारदांनी संवाद जगतात काम करणाऱ्या  प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या अनुभवांचा ठेवा ठेवलेला आहे, त्यासाठी या क्षेत्रातील प्रत्येकाने त्यांच्या चरित्राचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

काळानुसार अनेक बदल होत आहेत. आज उपग्रहाच्या माध्यमातून माहिती त्याक्षणी लगेच मिळते. पण आजच्या काळाच्या या टप्प्यावर ज्यांनी याचा पाया रचला त्यांच्याप्रती आपली समर्पण भावना व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचे पालन करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. आज नारद जयंतीच्या मुहूर्तावर सकारात्मक विचारांना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असायला हवे हाच संकल्प करत ज्यांनी जगालाही आनंदित केले त्यांना त्रिवार वंदन आहे.

- सर्वेश फडणवीस