Sunday, May 31, 2020
" मन में है विश्वास " सांगणारे- विश्वास नांगरे पाटील
Friday, May 29, 2020
स्वप्न बांधणीचे शिल्पकार "अभ्युदयाचे" चे अभियंते - श्री.सचिन देशपांडे - सौ.भाग्यश्री देशपांडे
श्री सचिन देशपांडे व सौ.भाग्यश्री देशपांडे !! व्यवसायाच्या वेगळ्या वाटा शोधत चाकोरी बाहेर जाऊन समाजात प्रतिष्ठा प्राप्त केलेल्या व्यक्तिमत्वाची स्पंदनं ही कशी असतील तर त्यासाठी आपण एकदा अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल येथे भेट देऊन ह्या दाम्पत्याची नक्की भेट घ्यावी. आज खरंतर सर्व क्षेत्रात वेगळ्या वाटेवर असणारी ही शाळा भविष्यात आदर्श शाळेचे मॉडेल होईल ह्यात शंकाच नाही.
अभ्युदय !! नावात च एक वेगळं आकर्षण आहे. अभ्युदय म्हणजे उत्कर्ष व भरभराट आणि ही शाळा बघितल्यावर जाणवतं की याचा उत्कर्ष होतोच आहे. शाळा बघताना खेड्यातील गरीब मुलांसाठी शाळा काढून ज्ञान दानाचे काम करत आहेत आणि कुठेही प्रसिध्दीच्या मागे न लागता आदर्श शाळा कशी असू शकते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शाळा आहे. ह्यांचे कार्य किती वेगळे आहे याचा अंदाज इथे गेल्यावरच समजेल .
नागपूरच्या जवळ खापरखेडा येथून पुढे खापा गाव तेथून बावणगाव येथे सचित्तानंद धाम येथे अभ्युदय ग्लोबल व्हिलेज स्कूल २०१० पासून सुरू आहे. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून २०१० साली शेतातच ही शाळा सुरू झाली. डॉ.प्रकाश गांधी यांनी शाळा सुरू केली आणि पुढे त्यांची कन्या सौ.भाग्यश्री देशपांडे व श्री सचिन देशपांडे यां अभियंता असलेल्याला दाम्पत्याने २०१३ साली या शाळेला वेगळे आणि नवे रूप दिले. नवनवीन प्रयोग हे या शाळेचे वेगळेपण आजही टिकून आहे. आज शाळा वेगळ्या उंचीवर आहे. ही शाळा आणि या शाळेच्या माध्यमातून चालणारे अभिनव प्रकल्प बघण्यासारखे आहेत. शाळा म्हंटलं की वर्ग आला,ब्लॅक बोर्ड, डेस्क बेंच आले,पण इथे याच्या जोडीला ४० गायी आणि बैल आहेतच पण त्यांचा मोठा गोठा आहे,नैसर्गिक शेती आहे जी स्वतः विद्यार्थी करतात म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच माणूस आणि त्याच्या गरजा लक्षात घेऊन ते घडवण्याचे महत्कार्य हे दाम्पत्य मागील ८ वर्षांपासून करतात आहे. २८ विद्यार्थी यांना घेऊन २०१० साली सुरू झालेले कार्य आज ३५० हुन अधिक विद्यार्थी पर्यंत येऊन पोहोचले आहे. आज शाळेचा आलेख सतत वर्धिष्णू होतो आहे.
पुस्तकी शिक्षणाबरोबरच नैसर्गिक शेती व आपल्या मातीची ओळख होण्यासाठी विद्यार्थ्यांना घडणाऱ्या ह्या शाळेची वेगळी बाजू नक्कीच कौतुक करावी अशीच आहे. विद्यार्थी स्वतः पालक,मेथी,मिरची,वांगे,टमाटे याची लागवड करून त्याचे संवर्धन करताना आणि ते संवर्धन करताना त्याची काळजी घेण्यासाठी कुठली उपाययोजना करावी ह्याचे वर्णन विद्यार्थ्यांच्या कडून ऐकताना आणि ते बघताना अतिशय आनंद होतो. मी स्वतः २०१८ मध्ये या शाळेत जाऊन आलो आहे. डिसेंबर महिन्यात शनिवारी सकाळी इथं गेल्यावर शाळा बघता आलीच पण तेथील विद्यार्थी, त्यांचा वर्ग शिकवण्याची पद्धत सारे जवळून बघता आले. त्यानंतर तिथेच लागवड केलेल्या नैसर्गिक भाज्यांचा वापर करत जेवण म्हणजे तर शब्दच नाही आहेत.
आज जवळपास आजूबाजूच्या १८ गावांमधून विद्यार्थी इथे येतात आहे. ३ किमी ते २० किमी अंतरावरुन इथे विद्यार्थी रोज येतात. दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात 'आनंद जत्रा' म्हणून शाळेचा वार्षिकोत्सव होतो ज्यात विद्यार्थ्यांनी केलेलं कार्य त्यांच्या कल्पनेची मांडणी बघायला मिळते. नागपूरहुन अनेक कुटुंब ह्या आनंदजत्रेत सहभागी होतात. आनंद जत्रेचा उद्देशच असा आहे की विद्यार्थ्यांच्या कल्पनेला चालना मिळावी आणि जाणकारांनी त्यांना अधिक माहिती देत एक चांगला नागरिक घडावा. श्रमदान, आरोग्य,सेवा या क्षेत्रातील अनेक मान्यवर शाळेत येऊन विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी तत्पर आहेतच.
मी जे काही काम करणार आहे ते प्रेमाने करेल आणि निःस्वार्थ भावनेतून करेल आणि याच भावनेतून ह्यांचे कार्य सुरू आहे. आज स्वप्न बांधणीचे शिल्पकार या ज्ञानदानाच्या माध्यमातून माणूस घडविणाऱ्या श्री सचिन देशपांडे आणि सौ भाग्यश्री देशपांडे ह्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
Thursday, May 28, 2020
सावरकरांच्या समर्पित जीवनाचा कालक्रम !!
Wednesday, May 27, 2020
वैदिक परंपरेचे रक्षणकर्ते - वे.शा.सं विनायकशास्त्री व सौ.ललितशास्त्री आर्वीकर
Monday, May 25, 2020
मनोरुग्णांचे आश्रयदाते - श्री.प्रमोद राऊत- डॉ.सौ.प्रज्ञा राऊत !!
Friday, May 22, 2020
पुरातत्व वैभवाचे अभ्यासक - श्री. श्रीपाद चितळे
श्री.श्रीपाद चितळे !! प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्व वैभवाचे अभ्यासक म्हणून त्यांची ही ओळख आहेच पण श्री. श्रीपाद चितळे हे एका सळसळत्या चैतन्याचे नाव हीच ओळख सार्थ ठरेल कारण त्यांना थकू नये हे वरदान आहे आज त्यांच्या वयाकडे आणि शरीराकडे न पाहता त्यांच्या उत्साहाकडे बघायला हवे कारण ते आजही तरुणांना लाजवतील इतके उत्साही आहेत.
वेड लागल्याशिवाय इतिहास घडू शकत नाही,आणि वेड लागलेली माणसचं इतिहास घडवतात. हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वाक्य शब्दशः खरे आहेत याचा अनुभव भारतातील थोर प्राचीन इतिहास व संस्कृती संशोधक श्री श्रीपाद चितळे यांना भेटल्यावर म्हणता येईल. पुरातत्व संशोधन हा काकांचा आवडता विषय आहे. त्यांचे ज्ञान आणि माहिती संग्रह बघितले की अचाट व्हायला होतं.
मध्यंतरी कपूर बावडी येथे गेलो असताना ती पुरातन वास्तू बघितली. त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी श्रीपाद काकांना भेटायला गेलो. त्यांचे कार्य बघून अतिशय भारावून गेलो. कपूर बावडी बद्दल ऐकतांना आश्चर्य वाटलं काका बोलत गेले आणि मी रेकॉर्ड करत गेलो. त्यांच्या अफाट माहितीने ऐकतांना आपण ही भारावून जातो एवढा खजिना आपल्यासमोर ते सहज रिकामा करतात.
विदर्भातील ज्या ठिकाणी पुरातत्व अवशेष आहेत त्या ठिकाणी श्रीपाद चितळे गेले आहेत. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संशोधन केले आहे आणि जवळपास ३८ पुस्तकं त्यांच्या नावाने आहेत. त्यांनी लिहिलेल्या लेखाची संख्या तर सांगता येणार नाही इतके आहे. अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार आणि अनेक पुरस्कार सन्मानित असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीपाद चितळे. पुरस्कारांची श्रीमंती असून सुद्धा प्रसिद्धीच्या मागे नसणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीपाद चितळे आहे.
आपले कार्य आज वयाच्या या टप्प्यावर असतांना ही अतिशय निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक विद्यार्थी दशेत असल्यासारखे कार्यरत आहेत. आपल्या आजूबाजूला असलेल्या असंख्य सुंदर पुरातत्व अवशेष असतात पण आपण दुर्लक्ष करतो पण जेव्हा काका बोलण्याच्या ओघात सांगायला सुरुवात करतात तेव्हा आपण भारावून जातो. सतत भटकंती,इतिहास आणि पुरातत्वाविषयी माहिती देणे,व्याख्याने देणे हे त्यांचे छंद आहेत.
सहज बोलताना त्यांनी त्यांच्या उपक्रमा बद्दल सांगितलं “Heritage Walk”. ते म्हणतात, एक तास द्या मी तुम्हाला नागपुरातील अनेक ऐतिहासिक गोष्टी दाखवत,त्याचा इतिहास ही सांगतो. आपण इतके वर्ष राहून सुद्धा पोहोचलो नाहीत तिथे यांच्यासोबत जात जाणून घेतांना वेगळाच उत्साह असतो. त्यांची इच्छा आहे की येणाऱ्या पिढीने हा इतिहास समजून घ्यावा. एक व्यक्ती जरी असेल तरी सुद्धा ते येतात. जोशपूर्ण वाणीने इतिहासात घेऊन जातात. नागपूर मध्ये श्रीपाद चितळे यांच्या सारखे इतिहास संशोधक अभ्यासक आपल्या सोबत आहे हे आपले भाग्य आहे असेच म्हणता येईल.
इतिहास कोळून प्यालेले व त्यासाठी झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणजे श्रीपाद चितळे आहेत. कट्टर स्वयंसेवक असलेले श्रीपादजी स्वतःला हेडगेवार कुळातील मानतात. डॉक्टर हेडगेवार यांच्या घराबद्दल व त्यांचा इतिहास हा श्रीपाद काका यांच्याकडून ऐकणे म्हणजे पर्वणी असते. मी स्वतः वयक्तिक अनुभव घेतला आहे. खरंतर सातत्याने एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करायचा ते श्रीपाद चितळे यांच्याकडूनच शिकायला हवे. चरैवेति चरैवेति असं हे व्यक्तिमत्व आहे. त्यांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच भगवंताचरणी प्रार्थना आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं
Wednesday, May 20, 2020
अन्नपूर्णेचे उपासक बल्लवाचार्य विष्णू मनोहर !!
Tuesday, May 19, 2020
ATM चे आत्मकथन !!
नमस्कार मंडळी, कसे आहात.. सध्या लॉकडाऊन मुळे घरीच असाल ही खात्री आहे मला. खरंतर आज सहज मी आपल्याशी गप्पा मारायला आले आहे. खूप दिवसांपासून मनात होतं पण मग आज ठरवलं.. आज मी माझ्याबद्दलच तुमच्याशी हितगुज करणार,मनातलं बोलणार आहे..
मी ATM.. अॅटोमॅटिक टेलर मशीन कुणी मला All Time Money तर कुणी Any Time Money म्हणून हाका मारत असता. मला आवडतं खरंतर तुम्ही कुठल्याही नावाने हाका मारत मला भेटायला येऊ शकले यातच माझा आनंद आहे. आता माझ्या जन्माबद्दल आणि माझ्या कुटुंबीयांबद्दल थोडंस..
इ.स. १९३९ मध्ये न्यूयॉर्क शहरात सिटी बॅंक ऑफ न्यूयॉर्क मध्ये माझा जन्म झाला. ल्यूथर जॉर्ज सिम्जियन ह्याच्यामुळे मी पृथ्वीवर येऊ शकली .परंतु, व्यवस्थित पालनपोषण न झाल्यामुळे मला परत जावं लागलं..त्यानंतर पुढील २५ वर्षे मला येताच आलं नाही. थेट २७ जून १९६७ रोजी बर्क्लेज बॅंकेने एन्फील्ड गांवी एक मला पुन्हा पृथ्वीच्या दुसऱ्या भागावर आणलं गेलं. दलारू यांच्यामुळे मला पुन्हा हे जग बघता आले आणि जॉन शेफर्ड बंरन यांची इच्छा होती की पुन्हा जन्म घ्यावा. पुढे मी वाढत गेले खरे आणि माझे कुटुंब ही विस्तरल्या गेले. आज माझे नातेवाईक साऱ्या जगात आहेत… कुठे ही जा,मला हाक मारा मी तुमच्या आजूबाजूला आहेच..
कालांतराने मी भारतात आले,भारतात येण्याचा आनंद होताच मग मी पण नवं रूप घेतलं आणि १९९६ ला लांबचा प्रवास करून भारतात आले आणि स्थिरावले. भारतीय बॅंक महासंघाने “स्वधन” ह्या नावाने नवी ओळख दिली आणि हळहळू स्वतःत बदल करत आज माझे कुटुंब भारतभर विस्तारले आहे. सध्या दोन लाख हुन अधिक संख्या आमची झाली आहे. तुमच्यापैकी अनेकजण मला भेटायला येता कुणी रोज येतं,तर कुणी आठवड्यातून एकदा येता पण सगळेजण भेटून जाता याचा आनंद आहे.
चार भिंतींत राहून, प्रत्येकाला भेटावे म्हणून मी कायमच उभी असते. मला गर्मी होऊ नये किंवा मी सतत उभी असते म्हणून माझ्यासाठी एसी सुरू असतो. मला सुरक्षित वाटावे म्हणून दार असतं आणि ते ही कायम जाता येता बंद असावे म्हणूनच आहे. खरंतर मी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला अडीअडचणी च्या काळात तुमच्या सुखदुःखात भेटायला पहिले मी येते. तुमच्यापैकी अनेकजण माझ्याकडे येता,येतांना इतके रागाने येता की सगळा राग माझ्यावर काढता, मला जोरजोराने मारता,तुमच्या मनासारखे नाही झालं तर अजून जोराने मारता,दार आपटत निघूनही जाता,तुम्ही माझ्याजवळ ठेवलेली प्रत्येक छोटी गोष्ट मी तुम्हाला दाखवते आणि ती तुम्ही तिथेच टाकून चालले जाता. तुम्ही जाता खरे,पण दुसरा कुणी आला की तो ही तसाच करतो माझ्यावरती राग काढतो प्रसंगी तोडफोड ही करतो .. मी किती सहन करणार...मग मी पण काहीदिवस रागावून तुमच्याशी कट्टी करते आणि रुसून बसते. नंतर अनेकजण येतात मला भेटून जातात पण त्यांना माहिती होतं की अजूनही राग गेलेला दिसत नाही. मग काही काळाने राग निवळतो आणि पुन्हा तुम्हाला भेटायला उत्सुकतेने येते.
पण आज मनातलं सांगायला आले आहे ,अडचणीत असतांना मी तुमच्या मदतीला कायमच असते. पण तुम्ही मला खूप त्रास देता ते ही निमूटपणे सहन करते. तुम्हाला माझी गरज तशी मला तुमची गरज आहे. दार उघडून छान हसतखेळत आनंदाने आत या. माझ्याशी बोला मग मी ही तुमच्याशी बोलतेच ना..काम संपलं की पुन्हा दार बंद करून जा.. जातांना राग आला तरी बाजूला ठेवलेल्या कुंडीतच टाका म्हणजे पुन्हा नंतर कुणी आलं तर तो ही त्या कुंडीतच टाकेल.
बघा प्रयत्न करून..माझ्या मनीचे हितगुज करण्यासाठी आज आले होते. अनेक दिवसांपासून मनात साचून ठेवलं होतं..आज व्यक्त झाले तर बरं वाटतं आहे..स्वतःत बदल करा कारण तो सहज शक्य आहे..या भेटायला मी वाट बघते आहे… येताय ना…
- सर्वेश फडणवीस
Monday, May 18, 2020
साहित्यव्रती - आशा बगे !!
Friday, May 15, 2020
शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ - डॉ.बाबा नंदनपवार
Wednesday, May 13, 2020
ग्रामविकास,आरोग्य व ग्रामोत्थानासाठी झटणाऱ्या - डाँ.उर्मिला क्षीरसागर
Tuesday, May 12, 2020
आत्मनिर्भर!! 🇮🇳 🚩
Monday, May 11, 2020
दूरदृष्टी,कल्पकता आणि अंत्योदय साकारणारे - 🌉🛣️ श्री.नितीन जयराम गडकरी
Sunday, May 10, 2020
गौरव मातृत्वाचा !! 😍🙏🙌
Friday, May 8, 2020
तत्वनिष्ठ संशोधक मधुकर जोशी !! 🖋️📄📚
डाँ. मधुकर जोशी !! संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, संशोधक,सखोल ज्ञानपरंपरेचे गौरव असा ज्यांचा उल्लेख करता येईल असे डाँ. म.रा.जोशी सर. "मूर्ती लहान कीर्ती महान" ही म्हण यथार्थपणे त्यांनाच लागू होईल असे जोशी सर वयाच्या या टप्प्यावर असतांना सुद्धा त्यांची संशोधक वृत्ती अचंबित करणारी आहे.
डाँ. म.रा. जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. सरांचे २०० हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजम कडून प्रकाशित करण्यात आले आहेत.
दत्त संप्रदाय,नाथ संप्रदाय,वारकरी संप्रदाय,प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज साहित्य यावर जोशी सरांचे अनेक लेख,पुस्तकं, संशोधनपर माहिती प्रसिद्ध आहे. सध्या तंजावर येथील साडेतीन हजार मराठी हस्तलिखितांचे संशोधन ते करत आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा प्रवास ही सुरू आहे. संतवाङ्मयातील अद्वैत तत्त्वज्ञान हेच त्यातील शाश्वत मूल्य आणि त्याची जोपासना हेच संशोधकाचे मुख्य कार्य होय असे ते सांगतात. प्रसिद्धी पराङ्गमुख ही त्यांची ओळख सार्थ ठरेल.
सात्त्विक,मितभाषी,आपुलकीने प्रत्येक गोष्टींचे निरसन करणे ही सरांची ओळख आहे. संतांचे ग्रंथ हेच उपयुक्त साधन आहे. नानाविध हस्तलिखित स्वरूपातील साहित्य शोधून, खरा पाठ, मूळ संहिता इत्यादी बारकावे तपासणे हेच संशोधनाचे पायाभूत कार्य आहे.सामाजिक जीवन आणि भाषा-व्याकरण यांचा तोल सांभाळीत,अभ्यासाच्या ओघाओघाने घडत गेलो असे ते नेहमी सांगतात.
लॉकडाऊन च्या आधी सरांचा फोन आला. प्रज्ञालोक चे लेख वाचून त्यांनी फोन केला होता. "नमस्कार फडणवीस साहेब,मी म.रा.जोशी बोलतोय असे म्हंटल्यावर मला आश्चर्य वाटले आणि भेटायला या,तुमच्या सोयीनुसार या आणि येतांना फोनकरून या म्हणाले" भेटायला गेल्यावर मला आश्चर्य वाटलं इतके पुरस्कार पाठीशी असतांना सर अतिशय आपुलकीने बोलत होते. विषयांवर बोलणे झाल्यावर निघतांना त्यांना म्हणालो की साहेब वगरे नका म्हणू तर म्हणाले,आदरयुक्त बोलल्या गेलेच पाहिजे आदर आणि मान प्रत्येकाचा ठेवावा.असं म्हंटल्यावर मी तरी निरुत्तर झालो. नमस्कार केला आणि निघालो. दोन भेटीत सरांकडून खूप शिकता आले. त्यांची विषयाची पकड आणि व्यासंग बघून तर आश्चर्य वाटतं. मराठी साहित्य क्षेत्रातील संशोधनासंदर्भात त्यांचा कुणी हात धरू शकणार नाही असं मला वाटतं. ‘रामदासी संप्रदायाचा समग्र कोश’ प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणि तो लवकरच समर्थचरणी ते समर्पित करण्यासाठी उत्सुक आहेत. 'ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व' हेच संबोधन सरांना लागू होईल.
प्रज्ञालोकचे विद्यमान प्रधान संपादक ते आहेत. अप्रबुद्धांची आणि सरांची भेट होत असे. सरांचे वडील अकोल्याला राहत असल्याने अप्रबुद्ध जोशी यांच्याकडे उतरत असत. अप्रबुद्धांमुळे सरांवर श्री अण्णासाहेब पटवर्धन ह्यांच्या विचारांचा पगडा पडला आणि पुढे त्यांनी श्रीगुरुचरित्र व स्वात्मसौख्य ह्याचा अभ्यास केला.श्रीगुरुचरित्र ग्रंथावर ते फार सुंदर व सोपे विवेचन करतात. 'जे घडते ते श्री कृपेने घडते' ह्या विचारांचा त्यांच्यावर फार खोल परिणाम झाला आहे. ह्या वयातही त्यांची कुशाग्र बुद्धी,तौलनिक अभ्यास करण्याची कला,संशोधनाची आवड व सर्वांना सोबत घेऊन चालण्याची कला ह्याने आपण अचंबित होतो. नुकताच राज्य शासनाचा प्रतिष्ठित ज्ञानोबा-तुकोबा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. सरकारने एका ऋषितुल्य व तत्वनिष्ठ उपासकाचा केलेला हा यथार्थ गौरव आहे. सरांना साष्टांग नमस्कार व भगवंताने त्यांना निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
✍️ सर्वेश फडणवीस
#आयुष्य_जगणारी_माणसं