Monday, September 28, 2020
भिक्षेकऱ्यांना सन्मान मिळवून देणारे - डॉ.अभिजित सोनावणे
Saturday, September 26, 2020
टेलीफोनचे आत्मकथन … ☎️
नमस्कार मंडळी. हल्ली कोरोनामुळे आपण सगळेजण घरातच आहोत. तसा मी तर कायमच घरात असतो. पण ह्या लॉकडाऊन मुळे माझा वापर ही वाढला आणि अनेक दिवसांपासून आपल्याशी मनातलं काही बोलायची इच्छा होती. आज शनिवार आणि सुट्टीचा दिवस. आज माझ्या प्रवासाबद्दल खरंतर काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित आवडेल ही कारण आता मी हळूहळू कालबाह्य होतो आहे. माझं अस्तित्व संपण्यातच जमा झाले आहे. पण तरीही अनेकांच्या दिवाणखान्यात आजही माझ्यासाठी एक कोपरा,कुणाकडे टेबलवर कुणाकडे भिंतीवर,फ्रिजवर माझ्यासाठी जागा आहेच. आधी माझा जन्म झाला माझ्यानंतर कॉडलेस फोन आला त्यानंतर पेजर आला त्यानंतर मोबाईल आला आणि आता स्मार्टफोन आहे. माझी जडणघडण ही तुमच्यामुळे झाली. तुम्ही नवनवीन प्रयोग करत गेलात आणि मी घडत गेलो. तसं म्हंटल तर आज माझी चौथी पिढी आता तुमच्याजवळ आली आहे.
Mr. Watson! Come here, I want to see you.’’ १८ मार्च १८७६ रोजी उच्चारलेले हे वाक्य जगाच्या इतिहासात अमर झाले, कारण ते वाक्य बोलणारे शास्त्रज्ञ होते- अॅलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि ऐकणारे शास्त्रज्ञ होते- बेलचे सहकारी थॉमस वॅटसन. दोघेही बाजूबाजूच्या खोलीत बसले होते. पण हा संवाद झाला तो बेल यांनी तयार केलेल्या दूरध्वनी यंत्रावर. दूरध्वनी यंत्राची चाचणी घेण्यासाठी बोललेले आणि पलीकडे ऐकू गेलेले हे पहिले वाक्य होते. पत्र्याच्या दोन डब्यांना तारेने जोडून एका डबीतून बोललेले पलीकडे ऐकण्याचा खेळ आपण लहानपणी खेळला आहे आणि विज्ञानाच्या पुस्तकांतही वाचला आहे.
सामान्यत: ध्वनिलहरी हवेतून प्रवास करतात. ऐकणाऱ्याच्या कानावर आपटतात. कानातील पडदा त्या लहरींमुळे थरथरतो. त्यामुळे आतील यंत्रणा कार्यान्वित होते. मेंदूला योग्य तो संदेश जातो आणि ऐकणारा ध्वनी ऐकतो. जर ध्वनीचे उगमस्थान ऐकू येण्याच्या कक्षेत असेल तरच ही प्रक्रिया पूर्ण होते. पण जेव्हा हे अंतर काही मीटर किंवा दोन पूर्ण वेगळ्या भौगोलिक स्थानापर्यंत वाढते तेव्हा तयार होणाऱ्या ध्वनिलहरी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता असते.
माझा शोध लागण्यापूर्वी १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासून तारायंत्रे (Telegraph) वापरात आली. आदिम काळापासून धूर अथवा अग्नीच्या साहाय्याने सांकेतिक संदेश देण्याची परंपराच नवीन विद्युत् तंत्रज्ञानाच्या आधारे दूर संदेशवहनाच्या कामी येऊ लागली. इ. स. १७६८ पासून या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. प्रत्येक अक्षरासाठी एक तार वापरण्यापासून ते काही संकेत तयार करून, ते विद्युत् तारांमार्फत पाठवले जाऊ लागले. यातूनच १८३७ मध्ये सॅम्युअल मोर्सने एक सांकेतिक लिपी तयार केली; जी तारायंत्राच्या ‘डा’ आणि ‘डिट’ या दोन आवाजांत बांधली गेली होती. त्या भाषेला ‘मोर्स कोड’ म्हणतात. अगदी आत्तापर्यंत जलद संदेशवहनाकरता तारा पाठवण्याची पद्धत चालू होती.
पूर्वीच्या काळातील फोनच्या तबकडीवरील हवे ते आकडे फिरवून तयार होणारे स्पंद दूरध्वनी केंद्राकडे पोहोचत असत. (या पद्धतीला pulse dialing म्हणतात.) आधुनिक दूरध्वनी संचामध्ये आपण आकडे लिहिलेली बटणे दाबून हवा तो आकडा केंद्राकडे पोहोचवतो. बटन दाबल्यावर तयार होणारा आवाज केंद्राकडे पोहोचतो आणि आपल्याला हवा तो आकडा केंद्राला कळतो. (या पद्धतीला DTMF-dual-tone multi-frequency म्हणतात.)
हा आकडा कळल्यावर पूर्वी केंद्रात असलेले कर्मचारी त्या आकडय़ाच्या दूरध्वनी संचाशी संपर्क जोडून देत असत. आता हीच प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक तंत्र वापरून स्वयंचलित केलेली आहे. संपर्क साधल्यावर दोन्ही दूरध्वनी संच एकमेकांशी जोडले जातात आणि संवाद सुरू होतो. हळूहळू माझ्यात ही बदल होत गेले आणि संपर्क यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आता धातूच्या तारेऐवजी काचेचे तंतू असलेल्या तारा (Fibre Optics) वापरतात. तसेच विद्युत् चुंबकीय लहरी उपयोगात आल्यापासून दोन संचांमध्ये थेट तारेमार्फत संपर्क न होता तो ‘संच-केंद्र-उपग्रह-केंद्र-संच’ अशा साखळीतून होतो.
खरं तर आता मोबाईल अर्थात भ्रमणध्वनी संच हा जणू आपला एक नवीन अवयवच असल्यासारखा वापरला जातोय आणि नुसते बोलणे आणि ऐकणे या मूळ क्रियांबरोबरच इतर बरेच नवनवीन प्रयोग करत आहात. सध्या ह्याची मागणी खूप असल्याने मी थोडा दुर्लक्षित झालो असेल पण अनेकांच्या घरी आजही मी आहे आणि ते प्रसंगी माझा वापर करतात. सर्वेशकडे सुद्धा मी १९९९-२००० च्या दरम्यान आलो आणि जवळपास २० हुन अधिक वर्ष झाली आणि त्यांच्यातला एक झालो आहे. दोन-तीनदा त्यांनी सुद्धा मला परत पाठवण्याची व्यवस्था केली होती पण इतकी वर्षांची सोबत असल्याने आमचे ऋणानुबंध टिकून आहेत आणि गुण्या-गोविंदाने आम्ही एकमेकांच्या सोबत आहे.
चला येतो मी. निघण्याची वेळ झाली. भेटू पुन्हा कधीतरी..
सर्वेश
#telephone
Thursday, September 24, 2020
हत्तीच्या संवेदना जाणणारे - आनंद शिंदे !!
Monday, September 21, 2020
व्यसनमुक्तीच्या मुक्तांगणातील - मुक्ता पुणतांबेकर !!
आज ज्यांच्या बद्दल लिहायला घेतोय त्या आहेत मुक्ता पुणतांबेकर. त्यांची ह्या माध्यमातील प्रत्येक पोस्ट सकारात्मकता देणारी असते. मुक्तांगण सारख्या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करणारे डॉ.अनिल अवचट आणि डॉ.अनिता अवचट. साहित्यिक म्हणून परिचित असलेले अनिल अवचट असंख्य व्यसनी लोकांना नवजीवन देणारे त्यांचे 'बाबा' म्हणूनही आज परिचित आहेत. चौतीस वर्षांपूर्वी त्यांनी लावलेला मुक्तांगणचा वटवृक्ष चांगलाच बहरला आहे आणि आज मुक्ता पुणतांबेकर ही डॉ. अनिल व अनिता अवचट ह्यांची कन्या त्याच आत्मीयतेने मुक्तांगणचा सांभाळ करते आहे.
खरंतर मुक्तांगणची प्रवास म्हणावा तसा सोपा नव्हता. जवळ पैसे नव्हते. खूप अडचणींना सामोरे जात मुक्तांगण उभे राहिले आणि आज एक रोल मॉडेल म्हणून ही वास्तू उभी आहे. हा प्रवास खरंतर शून्यातून सुरू झाला आहे. त्याच्या स्थापनेचा इतिहासही रंजक आहे. मुंबईत केईएम रुग्णालयात डॉ.आनंद नाडकर्णी व्यसनमुक्ती प्रकाराचा प्रयोग करत होते, आणखी एक दोन हॉस्पिटलमध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरु होती, मात्र केईएम वगळता बाकीची केंद्रे बंद पडली होती. पुढे डॉ.आनंद नाडकर्णी ह्यांच्याशी चर्चा करून,त्यांच्या कामाचे प्रत्यक्ष स्वरूप बघून डॉ.अनिल अवचट आणि मानसोपचार तज्ञ असलेल्या त्यांच्या पत्नी डॉ.अनिता अवचट ह्यांनी २९ ऑगस्ट १९८६ रोजी सर्व तयारीनिशी मुक्तांगणची स्थापना केली. खुद्द पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाई उद्घाटनाला आले आणि पु.ल. ह्यांनी शुभेच्छा देतांना हे केंद्र लवकर बंद व्हावे हीच अपेक्षा ठेवली.
आज मुक्तांगणात समाजातील सर्व स्तरातील, तसेच गुन्हेगारी क्षेत्रातले रुग्ण आहेत. त्या सर्वांना एकसारखी वागणूक दिली जाते. स्वावलंबित्व शिकवले जाते. त्यांच्याकडून सर्व प्रकारची कामे करून घेतली जातात. काम करायला कर्मचारी मिळतोय म्हणून नाही, तर व्यसनी रुग्णाला कामात सतत गुंतवून ठेवणे, हा त्यामागील शुद्ध हेतू असतो. रिकाम्या डोक्याने वावरणाऱ्या व्यसनी माणसाला वारंवार व्यसन करण्याची इच्छा होऊ शकते म्हणून त्याच्या हाताला आणि मेंदूला काम देण्याचा मुक्तांगणचा अट्टहास असतो.सुरुवातीला काही दिवस रुग्णाची खूप चिडचिड होते, पण ते नंतर एवढे तयार होतात की आपणहून प्रत्येक कामासाठी पुढाकार घेतात. मुक्ता ताईंच्या एका मुलाखतीत एका रुग्णाचा अनुभव ऐकला त्यात ते सांगतात की आज व्यसनमुक्ती मुळे हाताला मिळेल ते काम करतो, मग तो विचारही मनात येत नाही.
आज मुक्तांगणात आलेल्या रुग्णांना दारू न पिताही एकत्र बसता येते, ह्याचे कारण म्हणजे तेथील घरगुती वातावरण आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये जसे खेळीमेळीचे वातावरण असते,तसेच मुक्तांगण येथे आहे. इथे येणारे रुग्ण खरंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले असतात, कोणी कलाकार तर कोणी कवी,कोणी गायक तर कोणी वकील. जे त्यांच्या व्यसनापायी घरच्यांच्या आणि समाजाच्या नजरेतून उतरलेले असतात असा प्रत्येकजण इथे येत असतो. मुक्तांगणमध्ये मात्र त्यांना त्यांचा मान परत मिळवून दिला जातो. त्यांचीच ओळख त्यांना नव्याने करून दिली जाते,जगण्याची उमेद जागवली जाते. त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. त्यामुळे इथून व्यसनमुक्त झालेले रुग्ण नवीन आयुष्याची पुन्हा नव्याने त्याच जिद्दीने सुरुवात करतात. काही जण बरे झाल्यावरही इतर पीडित रुग्णांना त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मित्रत्वाच्या नात्याने मदत करतात आणि ते तेथून जातच नाही. तिथे आलेल्या प्रत्येक रुग्णाला भूतकाळ विसरून वर्तमानकाळात जगण्याचे प्रशिक्षण दिले जाते, नव्हे तशी सवयच लावली जाते.
ह्याच व्यसनमुक्तीच्या अवतीभवती असलेली सगळी बाजू जी दुर्लक्षित होणार नाही ह्याची ही काळजी मुक्तांगण मध्ये घेतली जाते. आज व्यसनांपायी उध्वस्त झालेल्या संसाराची घडी बसावी म्हणून सहजीवन सभा भरतात. बायकांना त्यांच्या अडचणी मोकळेपणाने सांगता याव्यात म्हणून सहचारी गट चालवतात. अंकुर सारख्या उपक्रमातून व्यसनी बापाच्या वागणुकीने कंटाळून झालेल्या मुलांना एकत्रित करत मनोरंजनातून सुखाचे क्षण मिळवून देत आहे.
मुक्तांगणाने केवळ रुग्णाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचाच नाही,तर पोलीस,न्यायव्यवस्था ह्यांचाही दृष्टिकोन बदलला आहे. व्यसनी गुन्हेगाराकडे सुधारणेच्या दृष्टीने पाहावे, त्याची शिक्षा कमीतकमी असावी, त्याला चांगले जगण्यास उत्तेजन मिळावे, यासारख्या गोष्टी कायदेतज्ञांच्या मदतीने त्यांनी कायद्यात आणल्या आहे. आपल्या स्वयं च्या मुलाखतीत मुक्ताताई सांगतात, आनंद मिळवण्याचे अनेक रस्ते आहेत, ते शोधून काढा. निसर्गात,संगीतात,वाचनात,कामात स्वत:ला अडकवून घ्या, म्हणजे व्यसनाची गरज लागणार नाही. घरी एकत्र येत एकमेकांना वेळ द्या,रात्री शक्यतोवर एकत्र जेवायला बसा, संवाद साधा,सोशल मीडियाच्या जगात असल्याने संवादाचा अभाव आज दिसतोय आणि त्यावरही त्या चिंता व्यक्त करतात. आज सर्वप्रथम आपल्या आयुष्याच्या मुक्तांगणात स्वच्छंदपणे फिरून या आणि ते शक्य झाले नाही, तर मुक्तांगणाला जरूर भेट द्या.
✍️ सर्वेश फडणवीस
#अलौकिक_नोहावे
एक टप्पा आउट..
शेक्सपीअर म्हणून गेला आहे की, 'नावात काय आहे'? मला काही हे सहजासहजी मान्य होणारं नाही. मान्य होणार नाही म्हणजे आपण काही थोरामोठय़ांविषयी सवंग किंवा उगाच वादग्रस्त विधानं करून लोकप्रियता मिळवणाऱ्यांपैकी नाही. पण ह्या माध्यमातून एका नावाबद्दल मला लिहावसं वाटतं त्यांच्या टाईमलाईन, त्यांच्या लेखसंग्रहाविषयी लिहावसं वाटतं आहे. खरंतर त्यांच्या पुस्तकातून त्यांची ओळख तर होतेच पण रोजच्या जगण्याचा मूलमंत्र लेखक तन्वीर सिद्दीकी देतात. एक टप्पा आउट भाग १ आणि एक टप्पा आउट भाग २ हे लेख संग्रह हाती आले. हा वीकेंड खऱ्या अर्थाने आनंद देणारा होता, शुक्रवारी पुस्तकं आली,पहिल्यांदा सहज चाळली आणि मग वाचायला घेतले. हृषीकेश वडके ह्याच्या ऋचित प्रकाशनाने ही पुस्तकं प्रकाशित केली आहेत. उत्कृष्ट मुखपृष्ठ आणि आतील पेपर ही उत्तम आहे. त्यामुळे बघता क्षणीच पुस्तक आवडतं. खरंतर फेसबुकच्या विश्वातील ही श्रीमंत माणसं आहेत. लेखक तन्वीर सिद्दीकी ह्यांच्या टाईमलाईन वर जरी चक्कर मारून आलो तरी आपल्याला माहितीचा खजिना तर मिळतोच पण तन्वीर ह्यांची प्रत्येक छोट्या-छोट्या घटनेकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोनाची ओळख होते. तन्वीर ह्यांनी सकारात्मकतेचे वलयच पांघरले की काय इतका भास त्यांचा लेख संग्रह वाचतांना होतो.
Friday, September 18, 2020
सतार खेडोपाडी नेण्यासाठी कटिबद्ध असलेले - विदुर महाजन !!
आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत श्री. विदुर महाजन. सतारीच्या माध्यमातून रागसंगीताचा खेडोपाडी प्रचार करण्याचे अभियान प्रसिद्ध सतारवादक आणि लेखक विदुर महाजन यांनी सुरू केले आहे. नुकताच त्यांचा स्वयं चा व्हिडिओ बघितला आणि मग फ़्रेंड लिस्ट मध्ये ते दिसले. कुणी कुणाला request पाठवली ह्याबद्दल आम्ही अनभिज्ञ असलो तरी मला त्यांच्या कार्यातून प्रचंड प्रेरणा मिळाली आहे.
खरंतर सतार एक भारतीय तंतुवाद्य सितार, सेतार, सेतारा अशा विविध नावांनी हे वाद्य ओळखले जाते. सतारीवर विविध प्रकारे स्वर निर्माण करता येत असल्याने हे वाद्य अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. भारतीय रागसंगीत हे शहरी लोकांसाठी आणि लोकसंगीत, लावणी वगैरे ग्रामीण लोकांसाठी हे समीकरणं आपल्या डोक्यात अगदी फिट्ट बसलेले आहे पण विदुर महाजन या ज्येष्ठ व प्रतिथयश कलाकाराने मात्र सर्व समजुतींना छेद देत एक प्रयोग केला आणि आज महाराष्ट्राच्या अकरा जिल्ह्यातील सुमारे एक लाख ग्रामीण लोकांना सतारीच्या माध्यमातून आपलं भारतीय रागसंगीत ऐकवलं आहे. आज ह्या रागसंगीताबद्दल,ह्या वाद्याबद्दल अनेकांना माहिती देत नवीन विद्यार्थी घडवून आणत आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ही नवनवीन प्रयोग ते करत आहेत. सतारीच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील लोकांना भारतीय रागसंगीताचा परिचय करून देण्याचे खरंतर हे त्यांचे व्रतच चालू आहे आणि त्यानिमित्ताने त्यांचा सतत प्रवास सुरु आहे.
पं.रविशंकर यांच्यामुळे सतार हे वाद्य जगभर पोहोचले असले तरी देशातील ग्रामीण भागात सतार या वाद्याविषयी फारशी माहिती नाही. सतारवादन करणारे विदुर महाजन तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास आहेत. तेथेच गेली पंचवीस वर्षे त्यांची संगीत संस्था चालू आहे. ‘मैत्रबन’ नावाचे संगीत शिक्षण वर्ग आहेत. आज ग्रामीण क्षेत्रातील अनेक मुले त्यांच्याकडे शास्त्रशुद्ध सतार वादनाचे शिक्षण घेत आहेत. विदुर महाजन ह्यांच्या अमेरिका आणि युरोप दौऱ्यांसह गेल्या २८ वर्षांत सातशेहून अधिक सतारवादनाच्या मैफली झाल्या आहेत.
खेडोपाडी सतार ह्याची त्यांनी सुरुवात केली ती त्यांच्या गावापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मंगरूळ या गावापासून. गावाच्या ऊरुसामध्ये सतारवादन करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे वाद्य पाहून ग्रामस्थ अचंबित झाले आणि त्यांनी त्याबद्दल असंख्य प्रश्न विचारले. त्यातूनच ही अभिनव संकल्पना जन्माला आली आणि ‘सतारीच्या माध्यमातून रागसंगीताचा खेडोपाडी प्रचार’ या अभियानाची सुरुवात झाली. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी आणि या संगीताचा आनंद लुटण्यासाठी संगीत कळण्याची गरज नाही, परंतु हे वाद्य माहिती व्हावे हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. या अभियानाच्या माध्यमातून नगर, नाशिक, सातारा, पुणे, नंदूरबार, धुळे,जळगाव,सोलापूर,सिंधुदुर्ग आणि रायगड अशा दहा जिल्ह्याचा त्यांनी प्रवास केला. श्री.विदूर महाजन ह्यांची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री नेहा महाजन त्यांच्याबरोबर या उपक्रमात असतेच ती उत्तम सतारवादक आहे आणि ती सिनेमातदेखील कामे करते.
अनेकांना ह्याबद्दल माहिती व्हावी ह्या हेतूने त्यांनी व्हिडिओ करण्याचे ठरवले. दीपक थॉमस हा सिनेमा फोटोग्राफर आहे. दीपकने तळेगावला जाण्यायेण्याच्या केवळ खर्चात ठिकठिकाणचे कार्यक्रम शूट करून देण्याचे मान्य केले. परंतु त्याने दोन-तीन कार्यक्रमांचे स्वरूप व तेथील लोकांचा प्रतिसाद पाहिला आणि त्याने त्याच्या कंपनीमार्फत ‘टेकिंग रागसंगीत टू व्हिलेजेस’ या विषयावर ‘द व्हिलेज राग’ या नावाचा लघुपट बनवला आहे. संपूर्ण लघुपट विदूर महाजन यांच्या उपक्रमावर चित्रित करण्यात आला आहे.
विदुर महाजन हे मनस्वी कलावंत आहे. सतार व सतारीचा उपयोग जनमानसासाठी करण्याचे त्यांचे उद्दीष्ट प्रेरणादायीच आहे. आज विदूर महाजन विलक्षण समाधानात आहे, की हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या इतिहासात नमूद नाही अशी घटना घडण्यास ते कटिबद्ध आहेत. कुठलाही कलावंत कलेची आत्ममग्नता आणि कलेचे सामाजिक परिमाण जपणारा असतो आणि मनस्वीपणे जीवनाची क्षेत्रे कलास्पर्शाने तरल, हळुवार करत असतो. शास्त्रीय संगीतकला सर्वसामान्य माणसांपर्यंत नेण्याचा विदुर महाजन ह्यांचा उपक्रम अनुकरणीय तर आहे पण प्रेरणादायी सुद्धा आहे. अशीच माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. खरंतर त्यांच्याशी परिचय होणे ही देखील आपली भाग्योदयाची नांदीच म्हणता येईल. श्री.विदुर महाजन ह्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभकामना.
- सर्वेश फडणवीस
#अलौकिक_नोहावे #लेखमाला
वाग्वैभवी विवेकानंद..
Thursday, September 17, 2020
अलौकिक नोहावे !! लेखमाला
फेसबुक आणि सोशल मीडिया !! आज ह्याचा उपयोग कुणी किती आणि कसाही करु शकतो. ह्या माध्यमाची ताकद मुळातच वेगळी आहे. खरंतर विचारांचे आदान-प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे फेसबुक आहे. काही दिवस पोस्ट न करण्याचा निर्णय घेतला आणि सहज friend list मध्ये चक्कर मारली तर त्यात वेगळेपण जपणारे भेटले. ह्या माध्यमात खूप वेगवेगळी माणसं आहेत. काहींच्या कार्याला समजून घेतांना काही क्षण वाटलं खरंतर मी भाग्यवान आहे की ह्यांच्या लिस्टमध्ये मला स्थान मिळाले आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयाला हात घालून त्याला जिंकायचे आणि त्याचवेळी आपला विवेक, नैतिक भूमिका आणि आग्रह कमी होऊ द्यायचे नाहीत,अशी विलक्षण क्षमता असणारे अनेकजण लिस्ट मध्ये आढळले. ही माणसं इतक्या वेगळ्या वाटेने जात आज समाजात उत्तम कार्य करत आहेत. येणाऱ्या अधिक महिन्यात आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी,प्रसंगी त्यांच्या कार्याची अधिक ओळख व्हावी आणि त्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेता ह्यावे ह्यासाठी.. "अलौकिक नोहावे !! " ही लेखमाला घेऊन येतो आहे.
मार्गाधारे वर्तावे । विश्व हे मोहरे लावावे। अलौकिक नोहावे। लोकांप्रती ।।’ ही माउलींची तिसऱ्या अध्यायातील १८१ वी ओवी आहे.आज साधेपणानं वागण्याचं सूत्र ज्यांनी अंगी बाणले त्यांच्या कार्याची ओळख व्हावी ह्याच शुद्ध हेतूनं ही नवी लेखमाला ..
✍️ सर्वेश फडणवीस
Thursday, September 10, 2020
मन में है विश्वास !!
Tuesday, September 8, 2020
रानवाटेच्या विश्वात...
वाढदिवसाच्या दिवशी पुस्तके घेण्याची सवयच लागली आहे. सवयीचा भाग म्हणून ह्यावर्षी साहित्य प्रसार केंद्रात गेल्यावर मारुती चितमपल्ली ह्यांची पुस्तकं आणली. खरंतर कथा,कादंबरी,ललित ह्यानंतर चौथा प्रकार म्हणजे चितमपल्ली सरांची पुस्तकं आहेत. सहज,सोपी भाषा आणि अरण्याचे दर्शन,जंगलाची ओळख हा त्यांच्या लेखनशैलीचा बाज मनाला स्पर्शून जाणारा आहे. विदर्भ आणि इथली वनसंपदा येथील जंगल ह्यामुळे वाचतांना जी सहजता जाणवते ते शब्दांतीत आहे आणि चितमपल्ली ह्यांच्या पुस्तकांतील निसर्ग त्यांच्या लेखणीतून अजून वेगळा आनंद देणारा ठरतो.
नुकतंच "रानवाटा"पुस्तक वाचून संपले. रानवाटेच्या विश्वात दोन दिवस कसे गेले समजले नाहीच. साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशनाची पुस्तक रुपात भेट होणे हा ही अनुभव छान आहे. अत्यंत सुबक मांडणी, सुटसुटीत छपाई, चांगला कागद आणि तितकंच वेळोवेळी दर्जेदार साहित्य प्रकाशित करणं ही या प्रकाशनाची वैशिष्ट्येच म्हणावी लागतील. १५० पानी पुस्तकांत १५ लेखाचे हे एकप्रकारे संकलनच आहे. विविध वृत्तपत्र, दिवाळी अंकांसाठी लिहिलेले लेखाचं एकत्रित केलेला रानफुलांचा गुच्छ असंच म्हणता येईल असे हे पुस्तक आहे. १९९१ साली महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार प्राप्त असे पुस्तक रानवाटा. अतिशय आटोपशीर प्रस्तावना स्वतः चितमपल्ली ह्यांनी लिहिलेली आहे. निसर्गाच्या भावविश्वाला शब्दांत मांडण्याची किमया ही फार कमी जणांना लाभली आहे त्यात चितमपल्ली अग्रक्रमावर म्हणता येईल इतके सहज लेखन त्यांच्या लेखणीत जाणवते.
रानवाटा पुस्तकांत महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या प्रदेशातील वन्यजीवनाचे बारकावे टिपलेले आहेत. वन विभागात असल्याने चितमपल्ली ह्यांनी जंगल पिंजून काढले आहेत. त्यांच्या आईला रानवाटांची माहेरओढ होती तिचा तो वसा घेऊनच त्यांनी तीन तप रानवाटेने भटकंती केलेली आहे. डॉ.सलीम अली ह्या जगप्रसिद्ध पक्षिशास्त्रज्ञाशी निकटचा संपर्क आल्याने "पक्षीनिरीक्षण" ह्या लेखात त्यांनी अनेक बारकावे टिपले आहेत. खरंतर सामान्यपणे जंगलात गेल्यावर वाघ दिसावा ह्या आशेनं जाणाऱ्या प्रत्येकाला चांगलाच धडा मिळणार आहे. कारण "अरण्यवाचन" ह्या नावाने स्वतंत्र लेखन चितमपल्ली ह्यांनी ह्या पुस्तकांत केले आहे. "पाडस" ह्या लेखात भामरागड आणि माडिया गोंड आदिवासींच्या विषयीं चांगली माहिती दिली आहे. १९७८ साली डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे ह्यांच्याविषयी ऐकून,प्राणिसंग्रहालयाविषयी जाणून त्यांनी घेतलेली भेट आणि त्या संपूर्ण परिसराविषयी जे वर्णन करून ठेवले आहे ते जास्त भावले कारण नुकतंच हेमलकसा येथे भेट दिल्यामुळे ही असेल पण १९७८ साली परिस्थितीचा विचार करता अंगावर काटा येतो आणि त्यावेळी ह्या पती-पत्नी ह्यांनी ज्या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य सुरू केले ते ही स्वप्नांच्या पलीकडचे आहे हे वाचतांना आपण अभिमानाने काही काळ भारावून जातो.
रानवाटा वाचून वन्यजीवन,जंगलभटकंती,पक्षीनिरीक्षण, रानातील घर,प्राणी आणि पक्षांच्या विविध प्रजाती,झाडांची माहिती ह्याची सुंदर अनुभूती वाचकाला मिळते. पुस्तकाच्या शेवटच्या पानावरील "जो माणूस वनात रमतो,चाफा त्याच्या मनात फुलतो" ही ओळ मनात घर करून जाते. साहित्य प्रसार केंद्राचे मकरंद कुलकर्णी ह्यांनी कैद केलेलं मुखपृष्ठ ही देखणे आहे. वाचनीय आणि संग्रही असे पुस्तक - "रानवाटा".
रानवाटा - मारुती चितमपल्ली
साहित्य प्रसार केंद्र
₹ २००
✍️ सर्वेश फडणवीस