आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.अभिजित सोनावणे. पुण्यातील हे डॉक्टर खरंतर कुठल्या चकचकीत दवाखान्यात भेटणार नाही तर ते भेटतात मंदिराच्या बाहेर कारण त्यांचे रुग्ण तिथे बाहेर बसलेले असतात. आश्चर्य वाटेल पण मंदिर,गुरुद्वारा,चर्च, मशीदीच्या बाहेर बसलेल्या भिक्षेकरी असलेल्या अनेकांसाठी आज ते देवदूत बनलेले आहेत. आज सोहम ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. समाजानं टाकून दिलेल्या माणसांना आपलंसं करून आत्मसन्मान प्राप्त करून देणं, हेच डॉ. अभिजीत सोनावणे ह्यांचे ध्येय आहे.
डॉ.अभिजित ह्यांच्यामधली मानवता बघून त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. आयुष्य कसं जगावं आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिलाय. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं, तर आपल्या असण्याची जाणीव एखाद्याला असणं म्हणजे आयुष्य आणि आपल्या नसण्याची उणीव भासणं म्हणजे आयुष्य! डॉक्टर फॉर बेगर्स अशीच डॉ.अभिजित सोनवणे यांची ओळख आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाद्वारे गेल्या चार वर्षांत अनेक आजी-आजोबा आणि दहा युवकांच्या जीवनामध्ये स्वावलंबनाची पहाट उगवली आहे. आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा ‘अभिजात’ मार्ग डॉ. सोनवणे यांनी निवडला असून अनेकांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ते स्वत:च जीवन संपविण्याच्या विचारात होते. पण, अनेकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम करीत त्यांना श्रमाचे मोल जाणवून देण्यामध्ये आज त्यांना समाधान लाभत आहे.
आयुर्वेदातलं शिक्षण घेऊन डॉक्टर झालेल्या डॉ.अभिजित ह्यांनी समविचारी तरुणीशी लग्न केलं आणि समोर एक ध्येय ठेवून एका छोट्या गावात प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आपण आपल्या कर्तृत्वावर जगायचं असं अभिजीत ह्यांनी ठरवलं; पण त्या गावात अभिजीतची प्रॅक्टिस काही केल्या चालेना. काय करावं कळत नव्हतं. त्या वेळी गावचे सरपंच अभिजितला म्हणाले,' बाळा, तू अजून तरुण आहेस. कष्ट करण्याची ताकद तुझ्यात आहे. तुझ्याकडे लोक येत नाहीत, तर तू लोकांकडे जा.’सरपंचाचं म्हणणं ऐकून डॉ. अभिजित ह्यांनी रोज गावातल्या लोकांकडे जायला सुरुवात केली. तपासणी फी फक्त पाच रुपये होती. असं असतानाही लोक पैसे तर देणं सोडाच, पण त्यांच्याकडून तपासून घ्यायलाही तयार होत नसत. काय करावं, या गोष्टीचा विचार करून डॉ.अभिजित ह्यांना वेड लागायची वेळ आली. ते गावातल्या एका मंदिराजवळ जाऊन तिथल्याच पायरीवर बसून आकाशाकडे एकटक नजर लावून बघू लागले. मनात सगळे नकारात्मक विचार सुरू झालेले होते. पुढे सगळा काळाकुट्ट अंधार दिसायचा. आपण आपल्या शिक्षणासाठी सात वर्षं घातली. आता निदान पोटापुरतं तरी मिळावं असं वाटत असताना तेवढंही मिळू नये या विचारानं अभिजित नैराश्येच्या गर्तेत जात होते. तासनतास तिथे बसलेल्या डॉ.अभिजित ह्यांना त्या मंदिराजवळ ७०-८० वर्षांचे आजी-आजोबा बसलेले दिसायचे. ते तिथे बसून भिक्षा मागत असायचे. हळूहळू डॉ.अभिजित आणि त्यांची मैत्री झाली. डॉ.अभिजित ह्यांचे दुःख त्यांना न बोलता समजलं. त्या आजोबांनी अनेक अनुभव सांगून आयुष्याला कसं तोंड द्यायचं याचे जणू काही धडेच दिले. त्या काळात त्या आजी-आजोबांनी डॉ.अभिजीत ह्यांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. ‘आम्ही तुझे आहोत’ हा आधार दिला आणि त्यांना भिक्षेपोटी मिळालेलं चांगलं अन्न ते डॉ.अभिजित ह्यांना खायला घालू लागले. स्वतः मात्र शिळे खाऊ लागले. डॉ.अभिजित ह्यांच्यासाठी ते चांगले पदार्थ वेगळे काढून देऊ लागले. इतकंच नाही, तर लोकांनी समोर टाकलेले पैसेही ते नकळत डॉ.अभिजीतच्या सॅकमध्ये टाकत होते. त्या पैशांवर डॉ.अभिजित ह्यांचे दिवस कसेबसे निघत होते.
असेच दिवस जात असताना डॉ.अभिजित ह्यांच्यासमोर एक संधी आली. स्वप्नवत असावे अशीच ती घटना होती कारण आता त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली होती. त्यांना चार लाख रुपये पगार मिळणार होता. चमत्कार व्हावा तशी सगळी परिस्थिती पालटली होती. पुढे डॉ.अभिजित ह्यांची रोजची खाण्याची भ्रांत संपली आणि त्याचं राहणीमान सुधारलं.
पण डॉ. अभिजितच्या डोळ्यांसमोर ते वृद्ध आजी-आजोबा कायमच यायचे. त्यांचं प्रेम आठवायचं. ‘ते नसते तर...’ असे अनेक प्रश्न त्यांना येत होते. आता त्यांच्या प्रेमाची परतफेड कशी करायची, या प्रश्नानं त्याचं मनात सारखा विचार येत असे आणि मनाचा निर्धार पक्का करून डॉ.अभिजित ह्यांनी १५ ऑगस्ट २०१५ या दिवशी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते रस्त्यावर आले. पुढे काय करायचं ठाऊक नव्हते; पण मनात एक मात्र नक्की होतं. ज्या आजी-आजोबांनी आपल्या घासातला घास काढून दिला,त्यांचं ऋण चुकतं करायचं होतं आणि डॉ.अभिजित ह्यांनी भिक्षेकऱ्यांना मदत करण्याचे,त्यांना सन्मानाने वागवण्याचे महत्कार्य सुरू झाले. ते म्हणतात,' भिक्षेकऱ्यांना भिक्षा देऊ नका. त्यांच्याशी फक्त प्रेमानं वागा. त्यांना सन्मानानं वागवा आणि मला एकच आशीर्वाद द्या, माझं हे काम एक दिवस संपलं पाहिजे. या भिक्षेकऱ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे.’ ज्या व्यक्तींना समाजानं टाकून दिलंय, त्यांना आपलंसं करणं, त्यांना सन्मान प्राप्त करून देणं हेच आता डॉ.अभिजित सोनावणे ह्यांचे ध्येय बनलं आहे.
डॉ.अभिजित सोनावणे ह्यांनी ‘सोहम ट्रस्ट’ नावाची एक संस्थाही स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या भिक्षेकऱ्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम ते करत आहेत. या संस्थेला आर्थिक मदत करायची असल्यास Social Health And Medicine Trust (SOHAM TRUST) या नावे चेक काढून अगदी एक रुपयापासून जमेल तेवढी मदत करू शकता. त्याची पत्नी डॉ.मनीषा सोनावणे ट्रस्टची अध्यक्षा असून,त्या त्यांना त्यांच्या या सगळ्या कामात मदत करतात. आजवर चाळीस हुन दररोज अधिक भिक्षेकऱ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे महत्कार्य ते करत आहे. डॉ.अभिजित ह्यांचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडून मिळतो.
✍️ सर्वेश फडणवीस
#अलौकिक_नोहावे
No comments:
Post a Comment