Friday, December 25, 2020

भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।। 🚩🚩


वेदांच्या अखेरच्या रचनेतील भगवद्गीता हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला गेला आहे. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, यांचे मार्गदर्शन करतो. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हटले गेले आहे आणि आजच्या एकादशीला 'मोक्षदा एकादशी' म्हंटले आहे.  महाभारतातल्या भीष्म पर्वा मध्ये गीतेचा उल्लेख आढळतो. गीतेत एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. हा एक पवित्र धर्मग्रंथ आहे आणि जगात एकमेवाद्वितीय ग्रंथ असावा ज्याची जयंती साजरी केली जाते. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती 'गायिली' जाते. लिहिण्याची साधने उपलब्ध नव्हती तेव्हापासून हिंदू धर्मातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला देण्याची प्रथा आहे आणि म्हणून संथा रुपात गीता सांगितली जाते. जगातील विविध देशांतले व विविध धर्मातले असंख्य तत्त्ववेत्ते,शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत. आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे. गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे म्हणून गीता ही शाश्वत आहे. 

श्रीवेदव्यासांनी महाभारतात गीतेचे वर्णन करून झाल्यावर म्हटले आहे -

गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः।
या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद् विनिःसृता ॥

गीता सुगीता करण्याजोगी आहे. म्हणजेच गीता उत्तम प्रकारे वाचून
तिचा अर्थ आणि भाव अंत:करणात साठवणे हे मुख्य कर्तव्य आहे. कारण ती स्वतः पद्मनाभ भगवान् श्रीविष्णूंच्या मुखकमलातून प्रगट झाली आहे.

कोणत्याही वर्णाच्या व आश्रमाच्या प्रत्येक माणसाला गीताशास्त्र
अभ्यासण्याचा अधिकार आहे. मात्र त्याची भगवंतांच्या ठिकाणी भक्ती व श्रद्धा अवश्य असली पाहिजे. कारण स्वतः भगवंतांनी आपल्या भक्तांमध्येच याचा प्रचार-प्रसार करण्याची आज्ञा दिली आहे. बहुदा ह्याच भावनेतून गीता परिवार पुणे ह्यांचा श्रीमदभगवद्गीता संथा वर्ग गेली अनेक महिने सुरू आहे. पहिल्या भागात १२ वा आणि १५ वा अध्याय आणि मग पुढे १६ वा अध्याय अशी गीता संथा वर्ग सुरू आहेत. कोरोनाकाळात सुरू झालेला हा गीता वर्ग अनेकांना गीतेची गोडी लावणारा आहे. लाखो साधक गीता संथा करत आहेत. इतिहासात ह्याची सुवर्णाक्षरांनी नोंद होईल ज्यावेळी संपूर्ण जग कोरोनाग्रस्त होते त्यावेळी भारतात गीतेची संथा साधकांना प्राप्त होत होती. गीतेबद्दल कायमच वेगळेपण जाणवते. सध्या गीता संथा वर्ग सुरू असल्याने ह्या निमित्ताने त्याची गोडी अधिक काकणभर जास्त जाणवते आहे. आणि आज मोक्षदा एकादशी निमित्ताने ह्यावर लिहिताना वेगळ्याच भावना आहे.खरंतर भक्ती योगात भगवंताने वेगळं काय सांगितलं आहे. 

यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि...
तत्कुरुष्व मदर्पणम्।।

म्हणजेच तू जे काही काम करशील.  ते तू मला अर्पण करून टाक. म्हणजेच थोडक्यात त्याचं कर्तृत्व सोडून दे... कुणीतरी पाठिशी आहे म्हणून तू पुढे आहेस,हे लक्षात ठेव आणि ह्याच गीता तत्त्वावर प्रत्येकाची वाटचाल दृढ व्हावी हीच गीता जयंती निमित्ताने श्री भगवंताचरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#गीता_जयंती  #मोक्षदा_एकादशी #गीता_परिवार

Thursday, December 24, 2020

स्मरण एका अक्षर योग्याचे !!


अक्षर योगी नाना लाभे !! हे नाव नागपूरात सर्वदूर परिचित आहेच. आज नानांचा स्मृती दिवस. Sanjeev Labhe  ह्यांच्या फेसबुक
टाईमलाईनवर पोस्ट बघितली आणि क्षणात मन काहीकाळ भूतकाळात रमले. नानांचा आणि आमच्या कुटुंबाचा ऋणानुबंध शब्दांत व्यक्त करणे तसे शक्य नाहीच पण नानांचा परिचय आणि कार्याची ओळख व्हावी ह्या हेतूने हे लेखन आहे. 

कवी ग्रेस पासून ते आजवर जे अनेक विद्यार्थी नानांच्या सहवासातून घडत गेले त्यांच्या मनात नाना लाभे म्हणजे "अक्षर सुधारणारे नाना" हेच आहेत. "अक्षरसुधार" हा एकच ध्यास नानांचा शेवटच्या श्वासापर्यंत होता. विद्यार्थी ते वृद्ध या वयोगटातील कुणीही आणि कुठल्याही पातळीवर अक्षर सुधारू शकतो आणि त्याचे अक्षर सुंदर होऊ शकते हा नानांचा विश्वास होता. अक्षर सुधार प्रकल्प हाती घेऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचले. अक्षर सुधार ह्या हेतूने संपूर्ण भारतभ्रमण केले. हजारो नव्हे लाखो विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कार्यशाळा घेतल्या. अक्षरातील उभी रेषा सरळ असावी यावर त्यांचा जेवढा भर होता त्यापेक्षाही जीवनाची उभी रेषा सरळ असली पाहिजे ह्यावर अधिक भर होता. अक्षर सुधारणेसाठी त्यांनी विविध प्रयोग केले. विद्या भारतीच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ उत्तर भारतातील अनेक शाळांना,संस्थांना त्यांनी करून दिला होता. 

नानांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते.  नवयुग विद्यालय महाल येथे ते शिक्षक होते. सुंदर अक्षरांची श्रीमंती त्यांना लाभली होतीच. शिकवणी वर्ग ही घेत असत पण मुळात तो फक्त शिकवणी वर्ग नव्हता तर व्यक्ती निर्माण करण्याचे वर्ग होते. बाबा,काका आणि आत्या हे सर्वजण त्यांच्याकडेच शिकले आणि ह्या साऱ्यांचे अक्षर अक्षर योगी मुळेच सुंदर आहे. नानांच्या अनेक आठवणी गप्पांच्या ओघात आजही सहज निघतात. नानांचा पिंड आध्यात्मिक होता. ते कायम सांगायचे भगवंताचे अधिष्ठानाशिवाय कार्यात यश मिळणार नाही आणि ते स्वतः आन्हिक आटोपल्याशिवाय घरातून बाहेर पडत नसत. एकदा मी त्यांच्याकडे संध्याकाळी गेलो असतांना ते नुकतंच गुरुचरित्र वाचून उठले होते. मला म्हणाले,तीर्थ घे. सप्ताह काळात एकदिवसीय गुरुचरित्र पारायण ते करत असत म्हणजे सात दिवसांत सात पारायणे करत असत. पहाटे ३ वाजेपासून दुपारी ३ पर्यन्त त्यांचे वाचन चालत असे. जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा आश्चर्य वाटलं आणि नतमस्तक झालो त्यावेळी खरंतर हे सारे न कळण्याच्या पलीकडचे असेच होते. नानांना पत्रलेखनाचा छंद होता. मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांचा पत्रव्यवहार सहज चालायचा. अनेकांकडे त्यांची पत्रे आजही सांभाळून ठेवली असतील इतकी सुंदर अक्षरांची पत्रे ते स्वतः लिहीत असत. त्यांचे अनेक पैलूं असावेत पण मी अनुभवलेले नाना असेच आहे. अक्षरांचा  ध्यास घेतलेले नाना नेहमी म्हणत,

रेषा सरळ उंची समान ।अक्षराचा यातच प्राण ।।
रेषा सरळ द्यावे ध्यान । रेषाच मोठी सारे अर्धे लहान ।।
रेषा सरळ देवासमान।करूया सारे तिला प्रणाम ।।

लिखाणाचा वेग सांभाळताना ते एकटाकी येणे हाच नानांचा आग्रह असे. आज नाना देहरुपाने नसले तरी आयुष्यभर अक्षर सुधारणेसाठी झटणारे नानांचे स्मरण होणे हे क्रमप्राप्त आहे.  प्रत्येकाला मार्गदर्शक आणि दिशादर्शनासाठी हे नक्कीच प्रेरक असेल ह्यात शंकाच नाही. 

✍️ सर्वेश फडणवीस

Tuesday, December 22, 2020

‘लॅाकडाउनमधला माझा सोबती’


पुस्तकाचे शीर्षक वाचूनच हे पुस्तक एका बैठकीत वाचुन संपवले. सोशल मीडिया तज्ञ अजित पारसे ह्यांनी फक्त ४२ पानांत लॅाकडाउनमध्ये सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरावर प्रकाश टाकणारं पुस्तक लिहिले आहे. बहुदा अशाप्रकारचे हे पहिलेच पुस्तक असावे. साधारणपणे २०-२५ मिनिटांत सहज वाचून संपेल असे छोटेसे पण मार्गदर्शक आणि ह्याच माध्यमाची नव्याने ओळख व्हावी ह्या शुध्द हेतूने त्यांनी लिहिले आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जग हादरून गेलं आहे. या महामारीच्या वेदना असह्य होत्या आणि काही प्रमाणात आजही आहेत. या वेदना कमी करण्यासाठी शक्य त्या परीने अनेकांनी प्रयत्न केलेत. या संकटात लॅाकडाउनमध्ये घरी एकटे पडलेल्या नागरिकांना सोशल मीडियाची मोठी साथ मिळाली. खरंतर सोशल मीडिया हे मानवी मनाला आनंद देणारे प्रभावी माध्यम म्हणून एक अविभाज्य घटक बनले आहे. 

मुळात माणूस हा समाजशील प्राणी आहे, असं आपण जेव्हा म्हणतो. तेव्हा प्रत्येक काळामध्ये किंवा संस्कृतीमध्ये त्याच्या या समाजशीलतेचं प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला हमखास दिसून येतं. अर्थात काळानुरूप जे काही सामाजिक, आर्थिक बदल होत गेले, त्यानुसार माणसाच्या संस्कृतीही बदलत गेल्या आहेत आणि आज कोरोनामुळे टाळेबंदीच्या काळात सोशल मीडिया मुळे जगाच्या या टोकावरील व्यक्ती दुसर्‍या टोकावरील व्यक्तीशी क्षणात सवांद साधू शकत होती. सर्वात वेगवान प्रसिद्धीसाठी अथवा अभीव्यक्तीसाठी इतकं अप्रतिम व्यासपीठ यापूर्वी कधीच उपलब्ध नव्हतं आणि आम्ही ह्या माध्यमाची सकारात्मकता ही टाळेबंदीच्या काळात टिकवून ठेवली होती त्यामुळे जेव्हा जेव्हा कोरोनाची चर्चा होईल तेव्हा सोशल मीडिया ची सकारात्मकता ही चर्चेत येईलच.  

सध्याच्या काळात संवाद आणि भावनांचं आदान प्रदान करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे मोठ्या आशेनं बघितलं जातं. त्याचा आपण जसा वापर करू, तशाचप्रकारे त्याची फळे आपल्याला मिळणार आहे. जगभरात कोरोनाची महामारी आणि लॉकडाउनचा काळ, सर्वांसाठीच असह्य होता. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात सोशल मीडियाचा सकारात्मक वापर कसा झाला? त्याचा समाजाला कसा फायदा झाला आणि भविष्यात अशा मोठ्या संकटांना सामोरे जाताना, या सोशल मीडियाचा वैयक्तिक आणि सरकारी पातळीवर धोरण म्हणून कसा वापर करता येईल ? याचा विचार होणे गरजेचे होते. जगाने अनुभवलेल्या या महामारीत सोशल मीडियाची सकारात्मक बाजू वाचकांसमोर मांडण्याचा उत्तम प्रयत्न लेखकाने केला आहे. ह्या पुस्तकाची अनुक्रमणिका वाचूनच पुस्तक कसे प्रभावी आहे ह्याची कल्पना येते. प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करत एका बैठकीत वाचून संपेल अशीच पुस्तकाची मांडणी लेखकाने केलेली जाणवते आहे. 

आज हे पुस्तक निःशुल्क उपलब्ध झाले आहे. संवादक्षेत्रात क्रांती करणाऱ्या समाज माध्यमाची सकारात्मक बाजू लोकांपर्यंत पोहोचावी आणि पर्यायी त्याचा फायदा समाजाला आणि लोकांना व्हावा ह्या शुद्ध हेतूने लेखकाने हे पुस्तक निःशुल्क उपलब्ध केले आहे. आपल्याला हे पुस्तक हवे असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये मेल आयडी द्यावा. लेखक स्वतः ई बुक आपल्या मेल आयडीवर पाठवतील.

✍️ सर्वेश फडणवीस 




Monday, December 14, 2020

लायब्ररी ऑन व्हील्स !! 🚗📚📖


शीर्षक वाचून जरा वेगळं वाटेल. पण खरंच हे वेगळं कार्य नागपूरात  सुरू आहे. मध्यंतरी Ankita Deshkar ह्यांच्या टाईमलाईनवर ह्या संदर्भातील कव्हर स्टोरी वाचनात आली. त्यानंतर अधिक जाणून घेतल्यावर आनंद झाला की नागपूरची तरुणाई आज वेगळ्या वाटेवरून जात चांगले कार्य करत आहेत. लिखित अग्रवाल आणि त्यांची मैत्रीण अलिशा नथानी हे दोघेही जण वाचकांना नवनवीन पुस्तकं उपलब्ध करत वाचण्याचा आनंद देत आहेत. 

खरंतर पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. प्रत्येक घरात देवघर असते, त्याप्रमाणे एक कोपरा तरी ग्रंथाने - पुस्तकाने भरला तर अनेक मने विचारांनी - ज्ञानांनी भरली जातील. सध्या पुस्तकेच येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साह प्रदान करत आहे. सध्याच्या परिस्थितीत निवांत क्षणी माणसाचा एकटेपणा घालवण्याचा सगळ्यात चांगला सोबती म्हणजे अशी ही पुस्तके आहेत. 

असाच पुस्तक वाचनाचा आनंद देण्यासाठी नवी सुरुवात नागपूरात झाली आहे. ह्यात तुम्हाला घर बसल्याच पुस्तक वाचनाचा आनंद मिळणार आहे आणि त्यांनी ह्या उपक्रमाचे नाव ही "लायब्ररी ऑन व्हील्स" असेच ठेवले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात जात वाचकांना ते पुस्तक उपलब्ध करून देण्याची जबाबदारी "लायब्ररी ऑन व्हील्स" च्या माध्यमातून होते आहे. कोविड मुळे ग्रंथालय बरीच महिने बंद होते आणि घरी जी पुस्तके होती ती अनेकांची वाचून झाली होती. नवीन पुस्तक वाचण्याची इच्छा असून सुद्धा पुस्तकं उपलब्ध होत नव्हती. मग ती उपलब्ध करून देण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा आणि वाचकांना ती पुस्तके आपणच उपलब्ध करून द्यावी ह्या भावनेतून त्यांनी लायब्ररी सुरू केली आहे. जवळची काही पुस्तकं आणि मित्रमंडळीकडून काही पुस्तकं एकत्र करत लायब्ररी सुरू झाली आहे. सुरुवातीला १४० पुस्तकांच्या मदतीने लायब्ररी सुरू झाली आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस नागपूर शहराच्या विविध भागातील वाचकांपर्यंत पोहोचण्याचा ते प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला गाडीच्या डिक्कीतील पुस्तकं अनेकांना दाखवण्यात येतात आणि आपल्या आवडीचे पुस्तकं घेऊन जाण्याची मुभा असते पण ज्यावेळी पुस्तकं देण्याची वेळ आली त्यावेळी त्यांना भीती होती की वाचक पुस्तकं वापस करणार की नाही पण हळूहळू भीती दूर होवून आज वाचक स्वतःहून त्यांच्याकडे पुस्तक बदलण्यासाठी येत आहेत. पुस्तक वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी नव्या दमाच्या तरुणांनी नवी संकल्पना शहरात राबवली आहे आणि अनेक वाचकांची त्याला पसंती मिळते आहे ही आनंददायक आणि उत्साहवर्धक बातमी आहे. 

पु. ल. देशपांडे एके ठिकाणी छान सांगून जातात, " पुस्तकं माणसाला प्रगल्भ करण्याचे काम करत असते." आणि आज तीच पुस्तकं सहज उपलब्ध करण्याचे काम "लायब्ररी ऑन व्हील्स" करत आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#libraryonwheels

बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ॥


आज कार्तिकी वद्य त्रयोदशी, सकल संतश्रेष्ठ माउली ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची परममंगल अशी तिथी. त्यानिमित्ताने

पंढरीची कार्तिकी एकादशी आटोपून आळंदीस येऊ लागण्यापूर्वीच श्री ज्ञानदेवांनी संजीवन समाधीचा निश्चय केला होता, हे श्री नामदेवांच्या ‘कलियुगी जन आत्याती करिती। साहवेना की यासी कांही केल्या॥’ या कथनात स्पष्टपणे उमटले आहे. पुढे यात्रेनंतर काळाची चाहूल लागून माउलींचा जीव गलबलला व त्यांनी श्री विठ्ठलापाशी समाधीची आळ म्हणजे हट्ट धरला. त्यांनी ती पुरविण्याचे मान्य केले. हे मूर्तिमंत लडिवाळ कैवल्य सम्राट चक्रवर्ती सर्वांस अंतरणार हा विचार सहन न होऊन रुक्मिणीच्या अश्रूंचा बांध फुटला. पांडुरंगांनी तिला समजावीत म्हटले, “रुक्मिणी, या ज्ञानोबासारखा भक्त, योगिश्रेष्ठ, परोपकारी अखिल ब्रह्मांड फिरलो तरी सापडणार नाही. भारतवर्षात नारद, सनतकुमार, अंबरीश, पराशर, भगीरथ, व्यासादी भक्त होऊन गेले. मात्र, अवघ्या जनसागराला आत्मोद्धाराचा मार्ग त्रैलोक्याची ज्ञानसंजीवनी असलेल्या ज्ञानोबाने दाखविला. या महात्म्याचा केवळ स्पर्श अथवा नुसते दर्शन अथवा नामस्मरण जन्ममृत्यूही टाळते, याच्या चरणांचे वंदन मलाही पावन करते, जो सकल तीर्थांना तीर्थरूप आहे, अशा या भक्तश्रेष्ठाच्या नामाचा प्रेमपूर्वक उच्चार सकल पापे भस्म करणारा आहे, हे निश्चित आहे असे तू जाण! देवी, या विभूतीमत्त्वाला समाधिस्थ करण्याचे धैर्य खरे तर मजपाशीही नाही. परंतु, याला काही उपायसुद्धा नाही.”
 
प्रत्यक्ष पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने आपल्या आत्मवत अशा भक्तश्रेष्ठाला स्वहस्ते दिलेल्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रेममय श्रीमंतीचे वर्णन संत नामदेव, संत निळोबाराय, संत एकनाथ यांनी यथायोग्य आणि विस्ताराने करून ठेवले आहे. ‘अमृतानुभव’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘चांगदेव पासष्टी’, ‘अभंग’, ‘हरिपाठ’ अशा ग्रंथनिर्मितीने कैवल्यरसात चिंब न्हाऊन निघणार्‍या अमृताला जिंकण्याचे सामर्थ्य ठेवून असलेल्या माउलींच्या रसाळ वाणीवर आतापर्यंत महाराष्ट्रीय आध्यात्मिक गाथा वर्धिष्णू होते आहे. या ग्रंथांच्या अभ्यासाने कित्येक लोक कृतार्थ झाले आहेत, दुर्जन सन्मार्गाला लागले आहेत, कित्येकांचा उद्धार झाला आहे.
 
एकविसाव्या वर्षी आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांना त्यांनी समाधीची अनुमती मागितली होती. कार्तिकी वारीनंतर पंढरीपासून ते अर्धबाह्य स्थितीत राहू लागले होते. आळंदी हे अनेक सिद्धांनी समाधी घेतलेले स्थळ. म्हणून त्याचे नाव ‘सिद्धबेट.’
 
इंद्रायणी, मणिकर्णिका, भागीरथी इ. नद्यांनी बनलेले हे बेट होते. श्री नाथ म्हणतात, ‘चौर्‍यांशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा’ म्हणजे नाथपरंपरेच्या स्थळीच जीवंत समाधीचा निर्धार श्रीज्ञानदेवांनी केला. संतमंडळी या त्यांच्या निर्धाराने ओसंडून जावे इतका शोक करू लागली. पण, ‘ज्ञानेश्वरापाशी आनंदी आनंद’ असे होते. श्री विठ्ठलाने भावंडांना एकीकडे नेऊन व गुह्यार्थ सांगून सांत्वन केले. समाधीची सर्व सामग्री तयार झाल्यावर श्रीज्ञानदेवांनी सिद्धेश्वराचे स्थळ परमेश्वरास मागितले.
 
 क्षेत्र प्रदक्षिणा होऊन एकादशीस हरिजागरण झाले व द्वादशीस पारणे झाले. द्वादशीच्या रात्री कान्होपात्रा यांचे कीर्तन झाले. विश्वकर्म्याने अतिशय सुंदर कलाकुसर केलेला मंडप तेथे उभारला. समाधीच्या समोर अजानवृक्षाचा दंड स्थापन करण्यात आला. (सन्मुखपुढे अजानवृक्ष-श्रीनाथ) या कोरड्या काष्ठाला पालवी फुटल्यावर श्रीज्ञानदेवांनी सर्वांच्या पायी नमस्कार केला. अखेर त्रयोदशीचा दिवस उजाडला. सर्वांनी इंद्रायणीत स्नान करून ज्ञानेश्वरांची आदरपूर्वक पूजा केली. यानंतर प्रेमाने ज्ञानेश्वरांना सिंहासनावर बसवून विठ्ठल आणि रुक्मिणीने त्यांची षोड्शोपचारे पूजा केली, कपाळावर गंध लावला, गळ्यात दिव्य सुगंधी माळा घातल्या. विठ्ठल ज्ञानेश्वरांकडे वळले, त्यांना घट्ट मिठी मारली. त्यांच्या मस्तकावर अश्रूंचा अभिषेक केला. शंकर प्रभृती देव, कश्यप आदी ऋषींनी ज्ञानेश्वरांना आलिंगन दिले. याज्ञवल्क्य मुनी, आदिगुरू अवधूत दत्तात्रेयांसह मत्स्येंद्रादी नाथ परंपरा इ. सर्व ब्रह्मनिष्ठ; समाधीचे वृत्त ऐकताच त्वरेने आळंदीस आले. ज्ञानेश्वरांनी सर्वांना आदरपूर्वक नमस्कार केला, सर्वांचे पूजन केले. सर्व सोहळे पार पडल्यानंतर माउली सावकाश उभे राहिले आणि सभोवार उभ्या असलेल्या भक्तांच्या अश्रूंचे बांध फुटले. सारा आसमंत हुंदक्यांनी भरून गेला.
 
 सर्वांना वंदन करून माउली अखेरची निरवानिरव करू लागले, “माझ्याकडून आजवर कुणास काही अधिक उत्तर गेले असेल तर मला क्षमा करा, कधी मर्यादा ओलांडली असेल, तर संतमहात्म्यांनी मला करुणापूर्वक पदरात घ्यावे, आपण माझे मायबाप आहात. मी, तुमचे अजाण लेकरू आहे, माझ्यावर कृपा असू द्यावी.”
 
ज्ञानोबाच्या या निर्वाणीच्या बोलांनी सर्वांच्या हृदयाचा ठाव घेतला. दु:ख सहन न होऊन कित्येक लोक मूर्च्छित होऊन धरणीवर पडले. मोठ्यामोठ्याने आक्रोश करून भक्त ऊर बडवू लागले. निवृत्तीनाथादी भावंडांनी हंबरडा फोडला. त्यांचे निष्पाप प्रेम पाहून उपस्थितांचे काळीज हेलावले. गळ्याशी आलेला आवंढा गिळत लोक उसासे सोडू लागले. माउलींनी समाधीस्थळाला प्रदक्षिणा घातली आणि श्री विठ्ठलाने व श्री निवृत्तीनाथांनी त्यांचे हात धरल्यावर समाधीस बसण्यास आत प्रवेश केला, दाही दिशा धुंद झाल्या, गगन कालवले गेले.
 
 श्री नामदेवांनी गळ्यात हार घातलेले श्री ज्ञानदेव तुळसी, बेल, दुर्वा, दर्भ, फुले इ. अंथरलेल्या धुवट वस्त्राच्या घडीवर बसले. श्री ज्ञानदेवी पुढे ठेवली होती. “मला तुम्ही सुखी केले, आता पादपद्मी मला निरंतर ठेवा” अशी श्री विठ्ठलास प्रार्थना करून तीन वेळा नमस्कार केला आणि भीममुद्रेने डोळे झाकले. श्री नामदेव स्फुदत म्हणतात, ‘नामा म्हणे आता लोपला दिनकर। बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ॥’ श्री तुकारामांनी संतशिरोमणींबद्दल गौरव केलाच आहे की, ते ‘अभंग प्रसंगी धैर्यवंत.’ श्री ज्ञानदेव मात्र ध्येयधुंदीने अविचल व निर्मोह होते. संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय असले उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. श्री निवृत्तीनाथांनी पहिल्या पायरीवर उभे असलेल्या श्री विठ्ठलाला भुयारातून बाहेर आणले आणि शिळा लावून ते बंद केले. आकाशीच्या देवांनी अपार पुष्पवर्षाव सुरू केला. आसमंत दिव्य सुगंधाने घनदाट भरून गेला. दुदुंभीचा नाद करून, देव उच्चरवाने ‘ज्ञानदेव जयति’ असा जयघोष करू लागले. हा अनुपम्य सोहळा पाहण्यासाठी आकाशात विमानांची दाटी झाली. सर्वत्र हाहा:कार, सर्वांनी फुले वाहिली. पुढे इंद्रायणीत सर्वांनी आचमन केले व पाच वाटांनी संत बाहेर निघाले. श्री ज्ञानदेव अजूनही तिथेच आहेत, संजीवन समाधीत आहेत! प्रत्येक भक्ताला ते जवळ घेण्यासाठी, आलिंगन देण्यासाठी ते तिथेच विराजमान आहेत. संत मुक्ताई यांच्या ताटीचे अभंग प्रसिद्ध आहेतच. त्या म्हणतात,
 
 योगी पावन मनाचा।
साही अपराध जनाचा॥
विश्व रागें झाले वन्ही।
संती सुखें व्हावें पाणी॥
शब्द शस्त्रें झालें क्लेश।
संती मानावा उपदेश॥
विश्वपट ब्रह्म दोरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥
 
 खरंतर या पावन मनाच्या योग्याचे दर्शन घेण्यासाठी एकदा तरी इंद्रायणीच्या तीरावरील आळंदी येथे जायला हवेच. आयुष्य कृतकृत्य झाल्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाहीच.
 
- सर्वेश फडणवीस

महा MTB #मुंबई_तरुणभारत

Monday, December 7, 2020

सशस्त्र सेना झेंडा दिवस..🇮🇳


लहानपणी शाळेत असताना दर वर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हे स्टिकर शाळेत यायचे. याची किंमत १ रुपया असायची आणि हे स्टिकर घेणं बंधनकारक असायचं आणि आम्हाला असं सांगितलं जायचं की यातून जमा होणारी रक्कम आपल्या आर्मी ला आणखीन सशक्त करण्यासाठी जाणार आहे तेव्हा मग आम्ही ४-५ स्टिकर घ्यायचो. ते स्टिकर मग स्टीलच्या कंपासपेटीला आणि exam board ला लावून ठेवायचो आणि मग काहीकाळ एकदम देशभक्त झाल्याचा फील यायचा. खरंतर जास्त काही त्यावेळी कळत नव्हतं पण भारी वाटायचं. 

शाळा सुटली नंतर बऱ्याच गोष्टी मागे पडल्या. आजकाल अशी स्टिकर्स शाळेत येतात का ते माहिती नाही पण आज my Gov पोर्टलवर गेल्यावर पुन्हा सगळं आठवलं. आज पुन्हा ह्यासाठी contribute करतांना अभिमान वाटला. " मेरा देश, मेरी पहचान " ह्या अनुराधा प्रभुदेसाई ह्यांच्या कार्यक्रमातून ऑगस्टमध्ये कारगिल ला जायचे होते पण कोरोना आणि लॉकडाऊन मुळे ते खरंतर राहून गेले. पण आज पुन्हा सैनिकांकरता काही करता आले ह्याबद्दल अधिक आनंद वाटतो. सैन्यदलाबद्दल नितांत आदर, अभिमान, श्रद्धा, विश्वास हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात उजागर व्हायला हवा, ही ज्योत सतत पेटती राहायला हवी. ही सैन्यदलांची गरज नाही, आपलं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याप्रति प्रत्येकाने अधिक सजग आणि जागरूक होऊन देशभक्तीची ज्योत प्रत्येकाच्या मनात जागवण्यासाठी मी तत्पर राहील हाच संकल्प घेण्याची आवश्यकता आहे. चला आपणही ह्या माध्यमातून काहीतरी सैनिकांसाठी देण्याचा प्रयत्न करूया. कारण आपल्या उद्यासाठी त्यांनी आपला आज दिला आहे. आज हे स्टिकर मिळण्याचा पुन्हा योग आला आणि आता नक्कीच जपून ठेवणार आहे. 

Saluting all those Brave Hearts who Sacrificed their lives to protect us . 🇮🇳 

ध्वज दिनाच्या सर्वाना शुभेच्छा
जय हिंद जय भारत

#ArmedForcesFlagDay

#ArmedForcesFlagDay2020

खाली लिंक देतोय नक्की जमलं तर contribute करा.. 

https://www.mygov.in/armed-forces-flag-day

Friday, December 4, 2020

योगी श्रीअरविंद !!


 ५ डिसेंबर. योगी श्रीअरविंदांचा महानिर्वाण दिन.आजच्या दिवसाचे औचित्य साधत श्री अरविंदांचे जीवन  व त्यांचे कार्य यांचा थोडक्यात आढावा घेणे उचित ठरेल . 

डॉ.कृष्णधन घोष आणि स्वर्णलता देवी यांच्या पोटी जन्माला आलेले तिसरे अपत्य म्हणजे योगी श्रीअरविंद . त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटे या ब्राह्म मुहूर्तावर कलकत्ता येथे झाला . त्यांना तीन भाऊ- विनयभूषण,मनमोहन,व बारींद्र आणि एक बहीण - सरोजिनी असे हे सारे कुटुंब होते . 

श्रीअरविंदांना वयाच्या ५ व्या वर्षी दार्जिलिंग येथील लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या ७ व्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. श्रीअरविंद कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले असे होते . 

१४ वर्ष इंग्लंड मध्ये वास्तव्य करून ६ फेब्रुवारी १८९२ रोजी श्रीअरविंदांनी भारतीय भूमीवर,मुंबईच्या अपोलो बंदरावर पाऊल टाकताक्षणी एका प्रगाढ शांतीने त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला.हा अनुभव त्यांच्या जीवन कार्याला कलाटणी देणारा ठरला. श्रीअरविंदांचे तत्वज्ञान समन्वयवादी आहे . ते जगाला मिथ्या , असार मानत नाहीत त्यामुळे त्यातील भौतिकता,विज्ञानाची प्रगती ते नाकारत नाहीत. मुक्तीची अवस्था प्राप्त केल्यानंतर मग योगी दिव्य कर्म करीत राहून प्रकृतीला साहाय्य करू शकतो असे ते म्हणतात . या साठी त्यांनी जो मार्ग सांगितला त्याला "पूर्णयोग"असे नाव आहे. ज्ञान,कर्म, भक्ती यांचा समन्वय त्यात अभिप्रेत आहे . ईश्वराला संपूर्ण समर्पित होणे आणि आपण स्वतः त्या ईश्वराचे परिपूर्ण माध्यम होणे यावर त्यांचा भर आहे . 

श्रीअरविंदांचे "सावित्री "हे महाकाव्य अजरामर आणि वाचनीय असे आहे . लोकशाही, स्वातंत्र्य आणि अध्यात्माचा विकास यांचे रक्षण करण्यासाठी श्रीअरविंदांनी इंग्लंड,अमेरिका,फ़्रान्स या दोस्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना यौगिक सक्रिय पाठिंबा दिला . 

५ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंदानी आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला . मृत्यूचे कोणतेही चिन्ह नसलेला त्यांचा पार्थिव देह पाच दिवस जसाच्या तसा चैतन्यपूर्ण राहिला होता . अखेर ९ डिसेंबर १९५० रोजी आश्रमातील सेवा वृक्षाखाली या महायोग्याला चिरसमाधी देण्यात आली .

सर्वेश फडणवीस

#shriarbindo  #योगी_श्रीअरविंद 

Sunday, November 29, 2020

विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी !! 🌿


दरवर्षी तुळशीची आरती म्हणतांना ही ओळ विशेष आनंद देऊन जाते. सहज परवा संध्याकाळी गार्डन मध्ये फिरत असतांना गार्डन शेजारी घरात तुळशीचे लग्न लागले आणि मग फिरत असतांना हे शब्द पुन्हा मनात रुंजी घालू लागले. कार्तिक महिना आणि तुळशीचे लग्न हे समीकरण आनंद आणि उत्साह प्रदान करणारे आहे. 

कार्तिक महिना मग कार्तिक स्नान,दिवाळीची चाहूल,गुलाबी थंडी आणि त्यातच हे तुळशीचे लग्न म्हणजे उत्सवाचा उत्साह हा मनस्वी आनंद देणारा आहे. खरंतर उत्सव आणि उत्साह हे जरी भिन्न असले तरी त्याचा आनंद हा बऱ्यापैकी प्रत्येकजण आपण अनुभवत असतो. 

खरंतर आपण ज्या संस्कृतीचे पाईक आहोत त्याबद्दल आपण स्वतःला नशीबवानच समजायला हवं. कारण प्रत्येक सणांच्या मागे सातत्य आणि परंपरा आहे आणि हे संचित पूर्वजांकडून आपल्याला मिळाले आहे. आपल्याला निसर्ग,वृक्ष, वेली,नद्या,हवा,पाणी ह्यांचे रक्षण करण्याचे संस्कार नकळतपणे ह्या उत्सवाच्या माध्यमातून मिळत असतात. देव आणि धर्म ह्याच्याशी संबंध जुळवत हे कार्यही श्रद्धेने आणि अंतःकरणपूर्वक घरोघरी केले जाते. सध्याच्या  पार्श्वभूमीवर ह्याचा उत्साह अधिक आहे असेही वाटते. कारण बऱ्यापैकी बाहेर जाणे कमी म्हणून मग ह्या उत्सवाच्या निमित्ताने उत्साह अधिक आहे. 

प्रत्येक हिंदूंच्या घरी तुळस ही पवित्र मानली जाते. जवळपास प्रत्येकाच्या घरात ती दिसतेच. तुळशीचे महत्व जसे अध्यात्मिक आहे तसेच औषधीयुक्त ही आहे. तुळशीचे विविध गुणधर्म आयुर्वेदात सांगितले गेले आहे. तुळस ही वनस्पती वातावरणातील सात्विकता खेचत ती प्रभावीपणे जिवाकडे प्रक्षेपित करत असते. अखिल सृष्टीतून कृष्ण तत्व खेचून आणण्याची क्षमता तुळशीत अधिक आहे. अशी ही बहुगुणी, औषधीयुक्त तुळशीचे प्रतिकात्मक पूजन,अर्चन म्हणजे हे तुळशीचे लग्न आहे. शास्त्राने देवपूजेत सुद्धा तुळस आवश्यक सांगितली आहे. वारकरी संप्रदायात गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे व सदाचाराचे प्रतीक मानले गेले आहे. अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे.श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे. तुळशीच्या आरतीत ही त्याचा उल्लेख आढळतो. तुळशीचे पान वाहिल्याने तो जितका प्रसन्न होतो, तो अन्य कशाने होत नाही. तुळशीदला शिवाय नित्य पूजा पूर्ण होत नाही. तुळशी दुषित वायू शोषून घेत प्राणवायू सोडते, हे शास्त्रानेही सिद्ध झाले आहे. म्हणून दारोदारी तुळशी वृंदावन असतेच. आज शहरी भागात खिडकीतल्या कुंडीत तुळशीचे रोप लावले जाते. दारात तुळशी असणे, हे शुभलक्षण मानले आहे. द्वादशीपासून- पौर्णिमेपर्यन्त पाच दिवस जमेल तसे प्रत्येक कुटुंब उत्साहात हे लग्न साजरे करत असते. 

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी । मंजिरिची बहु आवड कमलारमणासी । सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी।

✍️ सर्वेश फडणवीस 

#तुळस #तुळशीचे_लग्न #त्रिपुरी_पौर्णिमा

Friday, November 6, 2020

भारताच्या इतिहासातील गौरवशाली सुवर्णकाळ - टाटायन

नुकतेच ‘ टाटायन -एक पोलादी उद्यम गाथा‘  हे श्री गिरीश कुबेर यांचे पुस्तक वाचनात आले. स्पृहा जोशी हिचा व्हिडिओ ब्लॉग बघितला आणि लगेच रावजी लुटे ह्यांच्या ज्ञानसाधना मधून पुस्तक मागवले. भारतीय माणसाचा प्रत्येक दिवस टाटांपासून सुरू होतो आणि टाटांपाशी संपतो असं म्हंटल तर वेगळं वाटणार नाही म्हणजेच सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भारतीय माणसाच्या आयुष्यात लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू असतात, त्या टाटांनी बनवलेल्या असतात. त्यातूनच टाटा म्हणजे दर्जा, टाटा म्हणजे विश्वास असं समीकरणच भारतीय माणसांच्या मनात तयार झालेलं आहे. खाजगी क्षेत्रातील सरकारी म्हणजे टाटा असं म्हणतात खरे पण शिस्तबद्ध आणि चाकोरीबद्ध जगणे म्हणजे टाटा. 

टाटायन नावावरून वाटत तसे हे कुणा एका टाटांचे चरित्र नाही तर संपूर्ण टाटा उद्योग समूहाचा दीडशे-पावणे दोनशे वर्षांचा प्रवास आहे. प्रस्तावनेत श्री गिरीश कुबेर लिहितात, मराठी माणूस नेहमी ‘ साधी  रहाणी उच्चं विचारसरणी ‘ याचा पुरस्कार करतो आणि नकळत आपण साधी रहाणी ही गरिबीशी जोडतो. हे काही अर्थाने खरेही आहे आणि म्हणूनच टाटांची ही चरित्र  गाथा महत्त्वाची आहे. उद्योग व्यवसाय करून,नफा मिळवून देशाच्या अर्थव्यवस्थेला भरभराटीचे दिवस आणण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणताना रहाणी साधी असू शकते हे या पुस्तकातून आपल्याला जाणवते आणि आज जमशेदजी टाटा ह्यांच्यापासून दोराबजी -आरडी टाटा पुढे जेआरडी टाटा आणि विद्यमान रतन टाटा ह्यांच्यापर्यंत हा साधेपणा आपल्याला अनुभवता येतोय आणि आज रतन टाटा ह्यांच्याकडे बघतांना तो दिसतोय.

देशात इतकी मोठी उद्योगघराणी असताना सगळ्या देशवासीयांना टाटा या नावाबद्दल एक ओतप्रोत जिव्हाळा आहे तो टाटांच्या या वेगळेपणामुळे, त्यांच्या टाटापणामुळे. जमशेदजींपासून ते रतन टाटांपर्यंतच्या टाटा समूहाच्या वाटचालीचा इतका वाचनीय प्रवास मराठीत पहिल्यांदाच मांडला गेला आहे. खरंतर हा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. महिनोन्महिने बोटीने प्रवास करत जग फिरणारे, जगात काय चाललंय ते समजून घेणारे, सतत नव्याच्या शोधात असणारे, स्वप्नं बघणारे, ती प्रत्यक्षात उतरवायला धडपडणारे जमशेदजी, त्यांची अपुरी स्वप्नं पूर्णत्वाला नेण्यासाठी धडपडणारी त्यांची पुढची पिढी, लोभस पण कणखर जेआरडी टाटा आणि रतन टाटांचं ऋजू, पण पोलादी व्यक्तिमत्त्व टाटायनच्या माध्यमातून समजून घेणं निखळ आनंद देणारे आहे. काही पुस्तकं हातात घेतल्यावर सोडवत नाही त्यातीलच एक छानसे पुस्तक म्हणजे टाटायन. टाटांनी देशाला,समाजाला एवढं दिलं आहे की त्याची परतफेड फक्त प्रेमातूनच होऊ शकते. 

जमशेटजींनी पोलाद तयार करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्याचा पाठपुरावा केला. दुसरीकडे भविष्य निर्वाह निधी,नागपूरातील प्रतिष्ठित एम्प्रेस मिल, ताज हॉटेल हे सुद्धा त्यांच्याच काळातले. इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स ,जमशेटपूरचा पोलाद कारखाना आणि जलविद्युत प्रकल्प त्यांच्या डोळ्यांदेखत पूर्ण होऊ शकले नाहीत. पण ते पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली त्यांचा मोठा मुलगा दोराबजी टाटा आणि चुलत भाऊ आरडी टाटा यांनी. टाटा स्टील म्हणजे तेव्हाची टिस्को,याबरोबरच या दोघांचे अजून एक वेगळे कार्यक्षेत्र होते ते म्हणजे कापड व्यवसाय आणि अफू. 

जमशेटजी टाटा जसे पोलाद उद्योगाचे जनक तसे जेआरडी टाटा भारतीय हवाई वाहतुकीचे प्रवर्तक. एअर इंडिया ची स्थापना ते १९५३ मध्ये राष्ट्रीयकरण ही स्थित्यंतरे त्यांनी पहिली आणि अनुभवली आहे.  याच काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देश उभारणीचे कार्य जोमाने चालू झाले. देशाच्या विकासासाठी स्थानिक उद्योग असायला हवेत या जाणिवेतून टेल्को ,टाटा ऑइल मिल्स , टाटा केमिकल्स अशा विविध   क्षेत्रातील उद्योगांची स्थापना झाली. टाटा उद्योग समूहाचा आलेख जेआरडी यांच्या काळात उत्तरोत्तर चढतच गेला. १९५२ साली जेआरडी यांचे नाव जगातल्या पहिल्या १०० उद्योगपतींमध्ये होते. दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्योत्तर समाजवादी सरकारी धोरणे आणि उद्योगपती यांच्यात सतत संघर्ष होता. पं. नेहरू आणि जेआरडी यांचे जवळचे वैयक्तिक संबंध पण त्यांच्यातल्या विविध प्रसंगांमधील पत्रव्यवहारामधून हा संघर्ष वाचतांना ठळकपणे जाणवतो. जेआरडी ना फक्त नेहरूच नाही तर त्यानंतर जनता दल - इंदिरा गांधी यांच्या राजकीय काळालाही तोंड द्यावे लागले. तरीही टाटांचा प्रवास सुरूच  राहिला. उद्योगधंद्यांबरोबरच त्यांनी गुणी  माणसांमधेही गुंतवणूक केली आणि त्यामुळेच त्यांच्या काळात टेल्कोचे सुमंत मुळगावकर ,टाटा केमिकल्स चे दरबारी सेठ ,टिस्कोचे रुसी मोदी,इंडियन सिमेंटचे नानी पालखीवाला,इंडियन हॉटेलचे अजित केरकर हे सर्वजण आपापल्या उद्योगांबरोबरच मोठे झाले. जमशेदपूरच्या कारखान्याची उभारणी असो,जमशेदपूर -टेल्कोत झालेले कामगारांचे संप असो कि नॅनोच्या संपूर्ण कारखान्याचे प.बंगालमधल्या सिंगूरमधून उच्चाटन करून गुजरातमध्ये आनंद येथे स्थलांतर असो. या तपशिलांमधून आपल्याला या घटनांमागची टाटांची भूमिका कळते.

इंडिकापर्व, जग्वार,टीसीएस हे सगळं मुळातूनच वाचण्यासारखं आहे. ७५ व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेऊन समूहातल्या बुजुर्गाना घरचा रस्ता दाखवणारे रतन टाटा स्वत:ही ७५ व्या वर्षी पायउतार झाले आणि त्यांनी सायरस मिस्त्री यांच्याकडे सूत्रं सोपवली.
जमशेदजींपासून सुरू झालेला टाटा समूहाचा प्रवास अशा रीतीने सायरस मिस्त्री यांच्यापर्यंत येऊन पोहोचतो. या सगळ्या प्रवासात संघर्ष आहे, आव्हानं आहेत, अडचणी आहेत, त्याच्या जोडीला जिद्द आहे, साहस आहे, नवी क्षितिजं धुंडाळण्याची उमेद आहे, पैसा आहे आणि त्याचा सुसंस्कृत व्यय आहे. हे आहे टाटापण. ही आहे टाटा संस्कृती. समाजातून मिळवलेला पैसा परत समाजासाठी खर्च करणं आणि त्याचा कोणताही बडेजाव न मिरवणं ही टाटा संस्कृती 'उदास विचारे वेच करी' या प्रकरणात तपशीलवार मांडली आहे. टाटांनी समाजासाठी दिलेलं योगदान विलक्षण आहे. ‘टाटायन’मधून भरपूर माहितीसह अतिशय सहजसोप्या भाषेत, त्याला पुरेपूर न्याय दिला गेला आहे.

शेवटच्या पानावर लिहिलेले अधिक मनाला स्पर्शून जाणारे आहे. टाटा,भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन! येणाऱ्या दिवाळीत भेट म्हणून देण्यासाठी सर्वोत्तम असं पुस्तक म्हणजे टाटायन. 

टाटायन
लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
किंमत : रु. ४००/-
पृष्ठ : ४१९

✍️ सर्वेश फडणवीस

Saturday, October 31, 2020

" स्टॅच्यू ऑफ युनिटी " चे शिल्पकार ..


‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारणारे हात मराठी माणसाचे आहेत. लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांचा पुतळा साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार आहेत राम सुतार. आम्ही भारतीयांनी मनाशी पक्के ठरवले तर आम्ही जगही जिंकू शकतो ह्याची प्रचिती आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघतांना सहज येईल. भव्यदिव्य आणि विराट असा पुतळा साकारण्यात आमचे कारागीर नक्कीच कौतुकास पात्र आहे.

गुजरातच्या नर्मदा नदीकिनारी सरदार सरोवर प्रकल्पाजवळ बांधण्यात आलेला १८२ मीटर उंचीचा हा पुतळा चीनमधील बुद्ध प्रतिमेपेक्षाही उंच आहे. या महाकाय पुतळ्याला साकारण्यामागची मेहनत आहे, ती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांची. नोएडामध्ये असलेल्या विशाल स्टुडिओत वयाच्या ९५ व्या वर्षीही ते कलेशी आजही एकरूप आहेत. इतिहासातील, पुराणातील विविध व्यक्तिमत्वांच्या प्रतिमा साकारण्यासाठी ते ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज,झाशीची राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी,नेहरू,पं.दीनदयाल उपाध्याय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या आणि अशा अनेक प्रतिमा साकारणार्‍या राम सुतार यांच्या नावे जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्याचा विक्रमही वयाच्या ह्या टप्प्यावर नोंदवला गेला आहे. ते मराठी असल्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच त्यांचे कार्य आणि कर्तृत्व आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या कामाची सुरुवात २०१३ मध्ये सुरू झाली होती. यावेळी त्यांच्यासह १०० जणांचे पथक काम करत होते. १८२ मीटर उंच इतक्या प्रचंड मूर्तीची घडवणूक करताना त्यातील बारकाव्यांकडे राम सुतार यांचे बारीक लक्ष असे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळा बघतांना सुद्धा ते दिसून येते. शिल्पातील डोळे, खांदे, पाय आदींतून मनुष्याच्या प्रतिमेची ठेवण यांची हुबेहूब प्रतिमा साकारण्याची कला सुतार यांनी जोपासल्यामुळेच शिल्पांमध्ये जीवंतपणा आलेला दिसतो. सरदार पटेल यांच्या शिल्पाचा चेहरा ७० फूट उंच, डोळ्यांची बुबुळे दीड मीटर रूंद,१४० फूट रूंद खांदे आणि ८० फूट रूंद असलेली पादत्राणे ही दुरुनही स्पष्ट दिसतात. शिल्प साकारताना त्यात जीव ओतणार्‍या या कलेच्या महापुरुषाचा गौरव आज सातासमुद्रापार पोहोचला आहे. केंद्र सरकारने २०१६ साली पद्मभूषण किताब  देवून गौरविले आहे आणि दरवर्षी ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सरदार पटेलांचे स्मरण करतांना हे ऐतिहासिक शिल्प प्रत्यक्ष कृतीतून  साकार करणाऱ्या राम सुतार ह्यांना स्मरणात ठेवावं लागणार आहेच.

✍️ सर्वेश फडणवीस

#StatueOfUnity #RashtriyaEktaDiwas #31october

Thursday, October 29, 2020

कोजागिरी पौर्णिमा 🌕✨


अगा विश्वैकधामा। तुझा प्रसादु चंद्रमा ।
करू मज पौर्णिमा। स्फूर्तीचि जी ।।

पौर्णिमा म्हणजे कोणत्याही पर्वाचे पूर्णत्व.अश्विन पौर्णिमा अर्थात कोजागिरी पौर्णिमा.सणांचा विचार करताना आपल्या पूर्वजांनी आरोग्याची पण किती काळजी केली आहे.शरद ऋतू.निसर्गतः पित्त वाढवण्याचा काळ आहे.  या काळात शारदीय शीतल चांदण आणि आटीव दूध या दोन्ही गोष्टी आपले पित्त कमी करण्याचे साधन आहे.

सध्याच्या वातावरणात ताण-तणाव कमी करण्यासाठी या हुन अधिक चांगला उपाय कुठला असू शकेल.हसत खेळत वातावरणात पित्ताचे शमन ही कमी होते.आपण अशा संस्कृती चे घटक आहोत की जिच्या प्रत्येक प्रथेमागे काही न काही तरी अर्थ दडलेला आहे.आपल्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासात आनंदी सुखाचे क्षण वेचत ही कोजागिरी ची रात्र नक्कीच आपल्याला वैभव प्राप्त करून देईल. पौर्णिमेचा चंद्र आणि चांदणे ही मनाला शीतलता प्रदान करतात. या रात्री पौर्णिमेच्या चंद्राचे चांदणे अनुभवण्यासाठी जागणे अनिवार्य असते.

कारण कोजागिरी पौर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव,वैभवाचा उत्सव आणि आनंदाचा उत्सव आहे. देवी पण विचारते आहे “को जागर्ती ? ”आपण सांगू या वयं जागृयामः !! कारण आपल्या परिचयातील सुख,दुःखाच्या क्षणी  मदतीसाठी सदैव तत्पर असेल यासाठी जागा आहे. राष्ट्रहित जपण्यासाठी सदैव जागा आहे. आयुष्यातील सर्व नकारात्मक गोष्टींवर मात करत सकारात्मकता देण्यासाठी  जागा आहे. हे जागं होणं म्हणजे एका रात्री नाही तर येणाऱ्या प्रत्येक रात्री मी जागा आहे. सर्वत्र सुखाची व मांगलिकतेची कामना करत आणि जागं राहून ही कोजागिरी साजरी करायची आहे.

कारण आयुष्यात आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर घालवलेल्या क्षणातून जो आनंद मिळतो तो कुठल्याही गोष्टीतुन मिळत नाही.आपली माणसं हा ही एक ठेवा आहे तो ठेवा नित्य निरंतर जपून ठेवावा . अशा या आपल्या प्रेमाच्या माणसांबरोबर चंद्राच्या शीतल छायेत व चांदण्या रात्री आटीव दुधाचा आस्वाद घेत हा आनंद अधिक दृढ करूया.

चंद्राचं शीतल चांदण आयुष्यभर सोबत राहील व त्याच्या प्रकाशाप्रमाणे आपले ही जीवन प्रकाशमय होईल हीच सदिच्छा !

सर्वेश फडणवीस

कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌕✨

#कोजागिरी

Friday, October 23, 2020

आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी..🙏🌺🙏


सणवार असले की सगळीकडे आनंदी आणि प्रसन्न वातावरण असतं. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी अशा हिंदूंच्या मुख्य धार्मिक सणांमध्ये म्हटल्या जाणा-या आरत्या या त्या-त्या सणांचं महत्त्व आणि उत्साह द्विगुणीत करतात. आरती म्हणताना सर्वानी त्यातील अर्थ समजून घेऊन ती मनोभावे म्हटली, तर ती देवापर्यंत पोहोचते असा मानवी समज आहे. खरंतर आर्ततेने देवांची स्तुती करण्यासाठी केलेलं गायन म्हणजे आरती. 

सध्या नवरात्रात पारंपरिक आरती म्हणण्याचा प्रत्येकाकडे प्रघात आहेच. देवीच्या पारंपरिक आरती म्हणतांना वातावरणात जी ऊर्जा जाणवते ती शब्दांत व्यक्त होणारी नाहीच. काही क्षण हे अनुभूती घेण्याचे असतात आणि ते तसेच घ्यावे. हार,फुलं,तुळशी,बेल,प्रसाद आणि मंद तेवत राहणारी समई,शेजारी राळ व धूप ह्याने आपल्या आजूबाजूचं वातावरण चैतन्याने भारून जाते. मग आरती सुरू होते आणि ही आरती अगदी तल्लीनतेनं, श्रद्धेनं,भक्तिभावानं म्हटली की ब्रह्मानंदी टाळी लागते. आरती हा शब्द संस्कृतमधील आराभिक, आर्तिका अशा शब्दांवरून आला आहे. काही ठिकाणी आरतीला आर्तिक्य, महानिरांजन अशीही नावं आहेत, पण सर्वसामान्यपणे आरती हेच नाव जास्त प्रचलित आहे. प्रज्वलित तुपाचे निरांजन, पणती किंवा दिवा ताम्हणात ठेवून ओवाळणं म्हणजे आरती. 

आरतीद्वारे भक्त देवाची प्रार्थना करतो की, देवा माझी सगळी संकटं, अडचणी दूर करून माझ्यासह माझ्या कुटुंबीयांचं रक्षण कर, कल्याण कर, त्यांना ऐश्वर्य व सद्बुद्धी दे कारण संकटं,अडचणी, दु:ख हे सगळे क्लेश भक्तालाच असतात. अनेकदा आरती करतांना ज्या देवतेची त्यात स्तुती केली असते तिचे रूपच साक्षात डोळ्यांसमोर येते आणि आरतीचे हे वेगळेपण अद्भुत असेच आहे. माहूरगड निवासिनीं आई रेणुकेची पारंपरिक आरती नवरात्र पर्वकाळात म्हणतांना साक्षात रेणुकेचे रूपच डोळ्यासमोर येतं आणि खरंतर ज्या संतांनी देवीचे हे वर्णन केले आहे ते अद्भुत आहे.  दरवेळी आरती म्हणतांना हा अनुभव नकळतपणे येतो. अशी ही आरती,

ओवाळू आरती भवानी । माहुरगड वासीनी
भवानी मातापूर वासिनी।जगदम्बा जमदग्नी सती तु परशुराम जननी ।। धृ ।।

वाहे चरणी वैनगंगा । पुव्योदक वाहिनी । दुमदुमतो
गड एक सारखा । उदोकारवचनी ।। १ ।। ओवाळु आरती..

पंचप्राण मम पाजळुनी हे । घेऊनी निरांजनी
भक्तीने आरती मंदीरी । आलो घेवोनी ।
मंदावती फूलवाती भवभये । हालती बावरूनी ।
ज्योत वाढवी स्नेहाची तु । धारवरी धरूनी ।। २ ।। ओवाळू आरती

माय रेणुके अंबाबाई । करीतसे विनवणी ।
दीन लेकरू तुझपावंग । झडकरी ये धावुनी ।
मूळपीठ नाईके सत्वरी। दे मज मुळ धाडुनी ।
भावनसेहा मला येथूनी ने मज तव चरणी ।। ३ ।। ओवाळू आरती

मळवट लेपन तुझेच चिंतन मूर्ती तव नयनी
आदीमाय तु तुझीच माया । पसरे या भुवनी
सत्यरूप तव मजला दावुनी, भवबाधा ना सुनी
विकास करण्या झणी मुक्ती दे। जीवन फळयोनी ।। ४।।

ओवाळु आरती भवानी माहुरगड वासीनि।भवानी मातापूर वासिनी । जगदंबा जमदग्नी सती तु परशुराम जननी ।।

✍️ सर्वेश फडणवीस 

#शारदीय_नवरात्र

Thursday, October 22, 2020

जागर स्त्री शक्तीचा 🌟 🙌🙏

आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. कल्पनांचा हळूहळू विकास होत गेला आणि शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. दिव्याती इति देवी, देवी ह्या शब्दाची उत्पत्ती आहे. दिव म्हणजे खेळणे,अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सृष्टी,स्थिती,लय रूपाची क्रीडा देवी करत असते म्हणून ती देवी आणि ह्या शक्ती पर्वात तिचा जागर करण्यासाठी नवरात्र असावे. 

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला अर्थात आदिशक्तीच्या जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात झाली आहे. ह्यावर्षी कोरोनामुळे स्थानिक मंदिर बंद आहेत पण तरी आपला परिसर उत्साहाने भारलेला आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. आज अनेकजण ह्या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत. आजची स्त्री खरं तर पूजनीय,वंदनीय आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र. 

स्त्री !! एक सुंदर ईश्वरी अविष्करण. आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे ही खरंच प्रत्येकासाठी गौरवाची बाब आहे. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. तिच्या शक्तीला,भक्तीला त्यासाठी खरंतर शब्दच नाहीत. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी,नव्हे अग्रेसर असणारी स्त्री शक्ती आहे. आज ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे. सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. 

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।।

ही मनुस्मृतिची शिकवण आम्हाला परंपरेने मिळालेलं वैभव आहे. जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे देवता सुद्धा निवास करतात आणि जिथे स्त्रियांचा सन्मान केला जात नाही तिथे केलेले सर्व कर्म निष्फळ ठरतात. खरंतर स्त्री या शब्दातच माया, ममता, आपुलकी, प्रेम,निरागसता आहे. स्त्री जन्मतःच या शब्दांच्या वलयात असते. कारण ती शक्तीचा स्रोत आहे.सर्वत्र सुखदायक आणि सर्वत्र विलक्षण उर्जा ही तिच्यात उपजतच असते. परमेश्वराची तिच्यावर अगाध श्रद्धा आहे. आज नवनिर्मितीचा मान ही तिच्याकडेच आहे. 

तिच्याकडे क्षमाशीलता हा गुण आहे. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला ती खंबीरपणे समोर जाते असते. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ती  असते आणि तो पुरुष कायम तिचे वर्णन करत असतो. आज जे जे उत्तम,उदात्त,आणि उन्नत आहे हे तिचेच देणे आहे. तिच्याकडून हे गुण घेतांना आपल्याला कधी ही कमीपणा वाटणार नाही. कारण हे देणं तिला इतिहासातून आणि अनेक युगानुयुगे मिळालेलं संचित आहे. आज या संचितावर ती यशस्वीपणे वाटचाल करते आहे. या बद्दल आपल्याला तिचा सार्थ अभिमान वाटायलाच हवा.

विनम्रता हा शब्द तिला तंतोतंत लागू पडतो. कारण त्याच साठी सारी दुनिया तुझ्यासमोर नतमस्तक होते.’मी’आणि ‘माझे’ हे शब्द ती स्वतःसाठी कधीही ठेवत नाही. विशाल गगनाप्रमाणे असलेले तिचे मन आम्हाला सदैव प्रेरणा देणारे आहेत आणि कायमच राहतील. आज जागतिकीकरणात ती स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तुत्वा ने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

(तळटीप - माझ्या ह्या माध्यमातील मित्र Himalay Patkar ह्याने रेखाटलेल्या ह्या चित्रातून हे विचार आले आहेत.)

Thursday, October 15, 2020

" रोबोटिक हात " निर्माण करणारे प्रशांत गाडे !!


आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत प्रशांत गाडे. पारंपरिक मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेले प्रशांत गाडे आज वेगळ्या वाटेवरून चालत रोबोटिक्स मध्ये संशोधन करत परदेशात मिळणाऱ्या बारा लाख रुपयांच्या कृत्रिम हात फक्त पन्नास हजार रुपयांत उपलब्ध करून देत आहेत. हा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीकडे जाणारा आहे. मध्यमवर्गीय चाकोरीबद्ध आयुष्य न जगता नवं काही तरी समाजाला देता ह्यावे ह्या भावनेतून त्यांचा इनाली फाऊंडेशन च्या माध्यमातून प्रवास सुरु आहे. 

मध्य प्रदेशातील खंडवा ह्या गावातील एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्म झालेल्या प्रशांत गाडे ह्यांनी पारंपारिक शिक्षणातून स्वतःची सुटका करून घेत 'रोबोटिक्स ' मधील संशोधनाला सुरुवात केली आणि आज प्रशांत गाडे अमेरिकेत जात तेथील विद्यापीठात शोध निबंध सादर करून आले आहेत. ही सुरुवात म्हणावी तशी सोपी नाहीं. खडतर प्रवास करत आज इनाली फाऊंडेशन च्या माध्यमातून त्यांचे कार्य प्रगतीपथावर आहे. ४ मे २०१६ ला इनाली फाऊंडेशन ची स्थापना झाली. इनाली हे नाव त्यांच्या मैत्रिणीचे आहे ज्यांनी त्यांना ह्या कार्यासाठी पूर्ण साथ दिली आणि त्यांच्यात हे कार्य करण्याचा विश्वास निर्माण केला. खरंतर एकदा हात नसलेल्या एका लहान मुलीला पाहून आयुष्याचा अर्थ सापडलेल्या प्रशांत गाडे ह्यांना या देशातील हात गमावलेल्या गरीब लोकांना ‘रोबोटिक हात’ पूर्णपणे मोफत द्यायचा आहे आणि हे स्वप्न सत्यात उतरवायचे आहेत पण आज ह्या तरुण वैज्ञानिकाचे साधे व प्रामाणिक प्रयत्न आपल्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. 

या देशात दरवर्षी हजारो लोकांचे विविध कारणांमुळे हात आणि पाय जातात. या लोकांपैकी बहुसंख्य लोक हे कनिष्ठ वर्गातील असतात. त्यामुळे त्यांच्या अशा अकाली आलेल्या अपंगत्वामुळे या लोकांच्या कुटुंबाची व पर्यायाने कुटुंबाच्या भविष्याची अक्षरशः त्रेधातिरपीट होते. अशा लोकांना जर कृत्रिम हात किंवा पाय बसवायचा असेल तर त्याला भरपूर खर्च येतो जो त्या सामान्य माणसाला परवडत नाही. अशा माणसांच्या एकूणच कौटुंबिक गरजांना अधिक प्राधान्य दिलं जातं आणि ती व्यक्ती हातांशिवाय किंवा पायाशिवाय जगायला शिकते. पण प्रशांत गाडे ह्यांनी त्या हात नसलेल्या लहान मुलीला बघितले आणि दिवस-रात्र ते एकाच गोष्टीचा विचार करत राहिले की या छोट्या मुलीचे दुःख मी कमी करू शकतो का ? याच विचारात प्रशांत गाडे ह्यांना त्यांच्या जगण्याचे ध्येय सापडले आणि त्याच ध्येयाने त्यांच्या सारख्या झपाटलेल्या तरुण संशोधकाने बदल घडवला. जिद्द,चिकाटी प्रसंगी घरच्यांचा विरोधही पत्करला.

ह्या प्रवासात प्रशांत गाडे ह्यांनी आपले संशोधनाचे काही व्हिडिओज युट्युब वर अपलोड केले आणि ते विसरूनही गेले. पण म्हणतात ना कुणीतरी आपल्या कार्याची दखल घेत असतो आणि तसेच झाले २०१६ मध्ये त्यांना अमेरिकेतील एका प्राध्यापकांचा इमेल आला. त्यात त्यांनी सर्व खर्चासहित अमेरिकेला यायचे आमंत्रण दिले. प्रशांत गाडे ह्यांनी अर्थातच ते आमंत्रण स्वीकारले आणि अमेरिकेला गेल्यावर आपण काय संशोधन करतोय याचे एक प्रेझेंटेशन देखील दिले. प्रशांत गाडे ह्यांच्या संशोधनावर अमेरिकेमधील ते प्राध्यापक इतके खुश झाले की त्यांनी विचारले आपल्याला भेट म्हणून काय देता येईल आणि प्रशांत नी न सांगताच त्यांनी भेट म्हणून १० 3D प्रिंटर्स भेट म्हणून दिले. पुढे भारतात आल्यावर जयपूर फूट ह्या नामांकित संस्थेबरोबर त्यांनी आपले संशोधन कार्य सुरू केले आहे आणि आज तब्बल १५०० हुन अधिक जणांना कृत्रिम अवयव देऊन जगण्याची नवी प्रेरणा दिली आहे. गेल्या दोन वर्षात ७०० हून अधिक कृत्रिम हात तयार केली गेली आहेत आणि ती विनामूल्य देण्यात आली आहेत, तर सुमारे ३०० हात देशभरात विकले गेले आहेत.

आज बर्‍याच संशोधन आणि चाचण्यांनंतर त्यांनी एक कृत्रिम अवयव तयार करू शकले आहेत जो खांद्यावर आणि हातवारे करून वापरकर्त्याच्या बोटांवर सहजपणे नियंत्रण ठेवू शकतो. स्नायूंच्या हालचालींशी जोडल्या गेलेल्या बहुतेक प्रोस्थेटिक्सविरूद्ध, इनाली आर्म्स मेंदूत सिग्नल शोधून ऑपरेट करतात. सध्या, प्रशांत गाडे ग्रामीण आणि शहरी भारतातील ज्या लोकांना कृत्रिम हात घेऊ शकत नाही किंवा त्याबद्दल काही माहिती नसेल त्यांना कमी किंमतीत इनाली अवयवांचे विनामूल्य वितरण करण्याच्या विचारात आहेत. खरंतर ही सुरुवात आहे. त्यांना त्यांचे कार्य पुढे व्यापक करण्याची इच्छा आहे. २०१९ चा प्रतिष्ठित इन्फोसिस फाऊंडेशन चा आरोहण सोशल इंनोवेशन अवॉर्ड प्रशांत गाडे ह्यांना सुधा मूर्ती ह्यांच्या हातून प्राप्त झाला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेतच. 

प्रशांत गाडे ह्यांना "आपण जगात कशासाठी येतो ? आपल्या असण्याचं प्रयोजन काय?" हा प्रश्न पडला. जन्मतः दोन्ही हात नसलेल्या एका मुलीसाठी एका इंपोर्टेड कृत्रिम हाताची किंमत बारा लाख ऐकल्यावर, त्याच्या डोळ्यांसमोर भारतात असे हात नसलेली आणि पैशाअभावी आयुष्यभर अपंगत्व जगणारी लाखो दुर्दैवी माणसं आली आणि अशा लोकांसाठी आपल्या रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून काहीतरी करायचं या ध्येयानं त्यांना झपाटलं आणि स्वतःच्या मेहनतीने पन्नास हजारात कृत्रिम हात बनवून यशस्विरित्या वापरता येतात हे सिद्ध करून दाखवलं. त्यांची स्वयं च्या व्यासपीठावरील यशोगाथा जरूर ऐका.. लिंक कमेन्ट बॉक्स मध्ये देतोय.. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे  https://inalifoundation.com

वाचन प्रेरणा दिवस निमित्ताने...प्रभावी वाचनाच्या सवयी !!

शीर्षक वाचून जरा वेगळं वाटेल आणि मग सहज विचार येईल की वाचण्याच्या सवयीबद्दल पण कुणी पुस्तक लिहू शकतं का. पण नुकतंच एक पुस्तक हाती आले अमृत देशमुख यांचे" उत्तम वाचक घडवणाऱ्या सात सवयी अर्थात द सेवन हॅबीट्स ऑफ हायली इफेकटिव्ह रिडर्स ". 

पुस्तकांचे विश्व मोठे अजब असते. मन मोहून टाकणारे, जीवन बदलवून टाकणारे असते. आपल्या आयुष्यावर जवळच्या आप्तमित्रांचा जसा प्रभाव पडतो, तसा पुस्तकांचाही पडतो. बुकलेट अँप च्या माध्यमातून वाचन संस्कृती अधिक वाढावी यासाठी अमृत कार्यरत आहे. अमृत देशमुख यांच्या या पुस्तकात वाचनाच्या प्रभावी सात सवयीबद्दल निव्वळ छप्पन पानात अनेक महत्वाची माहिती आपल्याला सापडते. आज पुस्तक वाचन करत नाही अशी सर्वत्र ओरड असतांना अमृत देशमुख यांनी या पुस्तकात प्रभावी आणि अतिशय छोट्या छोट्या सवयी पुस्तकात मांडल्या आहेत. सहज कुणीही या सवयी आचरणात आणून प्रभावी वाचक होऊ शकेल. स्वतः प्रकाशित केल्यामुळे सर्वप्रथम अमृत यांनी पत्राद्वारे आपल्या वाचकांशी काही हितगुज केली आहे. जवळपास १३०० हुन अधिक पुस्तकं वाचल्यामुळे सहज आणि सोप्या शब्दात पुस्तक वाचनाच्या काही सवयी त्यांनी सांगितलेल्या आहेत. 

वाचनाला जास्त गांभीर्याने घेऊ नका. बरेचदा आपण पुस्तक वाचतांना आनंदाने सुरुवात करतो पण काही काळाने आपल्याला पुस्तक वाचायला कंटाळा येतो आणि आपण पुस्तक बाजूला ठेवतो. मग काही दिवसांनी उगाच आपल्याला वाटतं आपण चांगले वाचक होऊ शकत नाही. हे सर्वसामान्य पणे प्रत्येकाला वाटत असतं पण यात अमृत यांनी उत्तर दिले आहे कुठलेही पुस्तक पूर्ण वाचून संपवल्यावरच नवे पुस्तक हाती घ्यावे. 

पुढे ते लिहितात,वेळेला महत्त्व द्या. अनेकांची तक्रार असते की लहानपणी खूप वाचन करत होते पण आता वेळच मिळत नाही पण या सवयीला बदलण्याची क्षमता ही स्वतःत असावी हाच आग्रह आहे. आपण आपले आयुष्य बदलू शकत नाही पण दिवस हा आपला आहे आणि त्याचे नियोजन करण्याचे सामर्थ्य आपल्यातच आहे. वेळेचं नियोजन योग्य पध्दतीने झाले तर वाचनाला वेळ मिळेलच. 

सहज आणि आवडेल ते वाचा. अतिशय छोटीशी सवय आपले आयुष्य आणि दिवस बदलण्याची ताकद बनू शकते. अनेकदा वेळ असून सुद्धा आपण वाचत नाही. म्हणून वाचलेच पाहिजे हा आग्रह नाही तर आवडेल आणि सहज उपलब्ध असेल असे वाचले तर दिवसाचा आनंद अधिक द्विगुणित होईल. 

यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो वाचा आणि चर्चा करा. वाचल्यावर प्रत्येक गोष्ट लक्षात राहील हा आग्रह नाहीच. पण अनेकदा वाचून त्यावर चर्चा केली तर काही प्रमाणात ती गोष्ट कायमस्वरूपी लक्षात राहते. जेव्हा पुस्तके आणि त्यातील कल्पना आपल्या मनात आणि हृदयात असतात तेव्हा त्या जिवंत असतात.आणि म्हणूनच वाचून चर्चा करणे अधिक फायदेशीर आहे. 

अतिशय महत्त्वाची सवय ती म्हणजे वाचा आणि पुढे द्या. अतिशय चांगली सवय आपण स्वतःला लावून घ्यावी. अनेकांना आपली पुस्तकं द्यायला आवडत नाही पण आपण पुस्तक देतांना ती कुणाला दिली याबद्दल नोंद ठेवली तर ते अधिक फायदेशीर ठरेल आणि आपणही कुणाचे पुस्तक वाचायला आणले तर तेही वापस करण्याचा प्रयत्न करावा. 

आपण म्हणाल तर हे पुस्तक आपल्या प्रत्येकासाठी विचार आहे कारण अनेक प्रश्नांची उत्तरं यात आपल्याला सापडतील. वाचल्यावर लक्षात न राहणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयोगी आहे. ज्याना वेळेअभावी वाचन करणे जमत नाही त्यांच्यासाठी आहे. लहानपणी बरेच पुस्तकं वाचायचे पण आता वाचन होत नाही त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून वाचन वाढवण्याचा अट्टहास अमृत देशमुख यांचा आहे हे प्रकर्षाने जाणवते. एक अत्यंत उपयोगी प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे छोटेखानी पुस्तक आहे. अनेकांना भेट म्हणून देण्यासाठी सुद्धा उपयोगी असे हे पुस्तक आहे. वाचनाने आनंदाची अनुभूती घेण्यासाठी कायम काहीतरी सतत वाचत म्हणूया वाचू आनंदे.. 

✍️ सर्वेश फडणवीस 

तळटीप :- bookletguy@gmail.com ह्या मेल आयडी वर संपर्क करून आपण नक्की मागवू शकता.

Monday, October 12, 2020

आदिवासींचे आशास्थान डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे. ह्यांच्या कार्याला जवळून बघण्याचे भाग्य लाभले आहे. आतापर्यंत ३ वेळा हेमलकसा येथे जाणे झाले. दिवाळीत सुद्धा एक दिवस तिकडे जाऊन आलो आहे त्यामुळे आता ऋणानुबंध आणि जवळीक निर्माण झाली आहे. हेमलकसाचा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. 'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्‍या बाबा आमटे ह्यांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारलं, कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं आहे. विकास आणि प्रकाश या त्यांच्या कर्तृत्ववान मुलांनी बाबा आमटे ह्यांचा हाच वारसा पुढे चालवला आहे. डॉ.प्रकाश आणि डॉ.मंदाकिनी आमटे हे गेली अनेक वर्षं भामरागडच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं, म्हणून प्रयत्नरत आहेत आणि आज डॉ.दिगंत आणि अनिकेत आमटे ह्यांच्या रूपाने पुढची पिढी ही कार्यमग्न आहे. 

डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम जंगलात १९७२ साली आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू हे काम विस्तारत गेलं. २३ डिसेंबर १९७३ साली हेमलकशाला लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला. आरोग्यासोबतच शिक्षण,आदिवासींची उपजीविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये गेली चार दशके त्यांचे काम सुरू आहे. माडिया गोंड आदिवासी भूक,रोगराई,अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलीकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. आज मात्र तिथे सुसज्ज रुग्णालय आहे,शाळा आहे. तिथली मुलं शिकून डॉक्टर,वकील होत आहेत. वैद्यकीय उपचार अभावी होणार्‍या मृत्यूंचं प्रमाण अत्यल्प आहे. या 'अंधाराकडून उजेडाकडे' झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे.

हेमलकशाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग पर्यटन म्हणून बघणार्‍यांना येणार नाही. तेव्हा तिथे नुसतं दाट जंगल होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली, की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. सगळीकडे नीरव शांतता. आवाज फक्त वन्य प्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीच्या पाण्याचे. साप आणि विंचू यांचं अस्तित्व पावलापावलांवर होतं. गाव-शहरापासून संपूर्णपणे तुटलेला आणि एखादा प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने अगदी प्रतिकूल असा हा भाग होता. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं ही गोष्ट तुलनेने खूपच सोपी वाटावी,अशी परिस्थिती तेव्हा हेमलकशात होती. एखाद्या खेड्यात जेव्हा आरोग्यसेवा देण्याचा प्रकल्प उभारला जातो तेव्हा तिथे राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा उपलब्ध असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकशात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. वीज नव्हती, पाणी नव्हतं, राहायची जागा नव्हती, माणसंही नव्हती. होतं फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी अशा परिस्थितीत राहणं हे काही दिवसांसाठी ठीक होतं पण ज्या हेतूने ते  इथे आले होते त्या आरोग्यसेवेला सुरुवात झाली.आरोग्यसेवेबरोबर हेमलकसाच्या आदिवासींमध्ये बदल घडवून आणायचा असेल तर महत्त्वाचे होते ते म्हणजे शिक्षण. आदिवासीना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हाच मूळ उद्देश होता. हा उद्देश घेऊन प्रथम १९७६ साली निवासी आश्रमशाळा सुरू झाली. आज ह्या शाळेत ६५० हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आजूबाजूच्या दुर्गम भागात ही अनेक ठिकाणी नवीन शाळा सुरू झाल्या आहेत. ह्यांच्या प्रयत्नाने आज दुर्गम भागात शिक्षणाची ज्ञानगंगा वाहते आहे. 

सुरुवातीला ज्यांच्यासाठी त्या जंगलात हे दाम्पत्य आले होते ते आदिवासी वार्‍यालाही उभे राहत नव्हते. एका अर्थानं त्यांचंही बरोबरच होतं. कारण त्यांना ही मंडळी परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार कारण त्यांची भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची म्हणजे त्यांच्याशी काहीतरी संपर्क व्हायला हवा होता; पण नेमका तोच होत नव्हता. त्यामुळे खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही. पण बर्‍याचदा प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता, आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागतात. तसंच काहीसं या बाबतीत झालं होतं. पण त्यावरही यशस्वी मात करत माडिया भाषा शिकून आज आदिवासींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला आहे. 

डॉ. प्रकाश आमटेंनी जंगली प्राण्यांच्या नात्याला आज वेगळा नवा आयाम दिला आहे. जंगली प्राण्यांना हाताळू नका, असा शासकीय अधिनियम असताना गेली चार दशकं प्राण्यांशी जिव्हाळ्याचं नातं तयार करणारे डॉ. प्रकाश आमटे आहेत. देश,काल,परिस्थितीनुसार आजही ते प्रसंगी शासनस्तरावर आपली बाजू भक्कमपणे मांडत असतात कारण हे सारे प्राणी हेमलकसाचे खरे आधारवड आहेत. 
प्राण्यांच्या या अनाथालयाला आज 'आमटेज् अनिमल आर्क' असं नाव देण्यात आलं. 'झू आऊटरिच ऑर्गनायझेशन'च्या संस्थापक सॅली वॉकर यांनी येथील प्राणी पाहून हे नाव सुचवलं आणि आज बिबट्या, कुत्रे, सिंह, हरीण, अस्वल असे अनेक प्राणी एकत्र सुखाने नांदताना दिसत आहेत. एरव्ही जंगलात हे सगळे प्राणी परस्परांचे शत्रू असतात. पण इथे सगळे गुण्यागोविंदाने एकत्र आहेत. हा प्रकल्प बघण्यासारखा आहे. प्रकाशवाट ह्या आत्मचरित्रात डॉ. प्रकाश आमटे लिहितात, आपल्यासमोर उभ्या ठाकणार्‍या प्रश्नांना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात येऊन प्रत्येक परिस्थितीत वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासाने, अडचणी एकत्र सोडवण्याने आता सगळे खूप जवळ आलो आहे. पुढे सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं..जे अजूनही एकत्र आहे. 

बंड,अदम्य साहस आणि करूणा हेच तीन गुण जग बदलायला आवश्यक असतात आणि हे तिन्ही गुण एकत्र असणारी माणसं दुर्मिळ असतात. पण हीच माणसं आपलं जग बदलतात. आज हेमलकसा जगाच्या नकाशावर ठळकपणे आपली ओळख दाखवू लागलं आहे. डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे ह्यांच्या कार्याची ओळख राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जाते आहे. अनेक पुरस्कारांचा वर्षाव त्यांच्या कार्यावर झालेला आहे. आज त्यांनी आपल्या कार्यातून नंदनवन फुलवले आहे आणि म्हणूनच ते सर्वार्थाने प्रत्येकाचे आशास्थान झालेले आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे #लोकबिरादरी #हेमलकसा #prakashamte

Thursday, October 8, 2020

चिखलगावच्या लोकसाधनेचे कल्पवृक्ष -डॉ राजा आणि रेणू दांडेकर

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.राजा आणि रेणू दांडेकर. आज दापोलीच्या चिखलगावामधील लोकसाधनेचे हे कल्पवृक्ष चिखलगाव ला सावली देणारे ठरले आहे. १९८२ साली एक दांपत्य पुण्याहून दापोलीजवळच्या चिखलगाव इथे वास्तव्यास आले आणि तेथूनच परिवर्तनाची नांदी सुरू झाली. खरंतर हा प्रवास ही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे आणि आज लोकसाधनेचे कार्य चिखलगाव आणि आजूबाजूच्या ४६ गावांमधून सुरू आहे.

लोकमान्य टिळकांचे जन्मगाव असलेल्या चिखलगावात सामाजिक जाणिवेतून एक वेगळी शैक्षणिक रचना उभी करण्याचा प्रयत्न डॉ. राजा आणि रेणू दांडेकर ह्यांनी केला आहे. कल्पक,निर्मितिक्षम विचारांच्या युवकांची आज देशाला गरज असून, त्या दृष्टीने तेथे काम सुरू आहे. याला आज लोकमान्यता मिळत आहे आणि काम अधिक दृढ होत आहे. 

डॉ. राजा दांडेकर ह्यांनी बी.ए.एम.एस.ची पदवी प्राप्त केली. परंतु समाजाचं ऋण फेडण्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षण, ग्रामविकास आणि आरोग्य या विषयांत कार्य करण्यासाठी ते पुन्हा गावाकडे आले आणि १९८२ पासून आजतागायत लोकसाधना ज्यांनी नित्यनूतन,जागृत,शाश्वत आणि वर्धिष्णू  ठेवलेलं आहे ते म्हणजे डॉ.राजा दांडेकर आणि त्यांना साथ देणाऱ्या रेणू दांडेकर आहे. रेणू दांडेकर साहित्य क्षेत्रातील एक अग्रणी नाव आहे. शिक्षण क्षेत्रात नवे क्रांतिकारी बदल घडवत, लेखन, मूल्याधिष्ठीत शिक्षण आणि संस्कार अशा अनेक विषयांवरील लेखनात त्यांचे विशेष योगदान आहे. अनेक दैनिकात लेखमाला आणि त्यांची  बरीच पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. 

लोकसाधना, लोकमान्य पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने चिखलगाव इथे शिक्षण आणि ग्रामविकासाचा एक वटवृक्ष दिमाखात उभा आहे. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर या दांपत्याने तो वसवलेला आहे, त्यांच्याच भाषेत म्हणायचं तर रुजवलेला आहे. संघटनात्मक काम न करता केवळ रचनात्मक काम करायचं, हे मनाशी पक्कं ठरवून हे दोघे चिखलगावी आले आणि १ ऑगस्ट १९८२ रोजी एका गोठ्यात त्यांची पहिली शाळा भरली. ही सुरुवात म्हणावी तितकी सोपी नव्हती. खरंतर गावकर्‍यांना शाळेचं महत्त्व पटवण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. जेम्स लेनची पाच सूत्रं ते आवर्जून नमूद करतात जी त्यांनी स्वतः आचरणात आणली - १. लोकांच्यात जा. २. लोकांसारखं राहा ३. लोकांपासून शिका. ४. तुम्हाला काय येतं हे विसरा. ५. लोकांच्या गरजांसाठी काम करा. ही सूत्रं घेऊन त्यांनी काम सुरू केलं आणि आज लोकमान्य टिळक विद्यामंदिर ही इतर कुठल्याही शाळेसारखी नसलेली शाळा असण्याचं कारण म्हणजे वेगळा विचार करायची राजा आणि रेणू दांडेकर ह्यांची आग्रही भूमिका हेच एकमेव कारण आहे. गोठ्यात सुरू झालेली शाळा आज शासनाची दाद मिळवतेय. तिच्या वेगळेपणामुळे युनायटेड नेशन्सने तिला प्रमाणित केलेलं आहे. हसत खेळत,वेगवेगळ्या पद्धती आणि नवनवीन बदल घडवत इथे आज शिक्षणाची ज्ञानगंगा वाहते आहे . शाळा म्हणून खूप अशी शिस्त नसतेच,सहजपणे प्रत्येकजण प्रत्येकाचे नेमून दिलेले कार्य करत असतात. विद्यार्थी म्हणून प्रत्येकाची जबाबदारी मात्र असते. शिक्षक म्हणूनही शाळेबद्दल आपलेपणाची भावना जपणारे इथले सगळे लोक आहेत. म्हणून आज शाळेचा आलेख वर्धिष्णू होतो आहे. 

शासन स्तरावर आणि प्रचलित शिक्षणपद्धतीत ज्या प्रकारे शाळा चालतात, त्या प्रकारे राजा आणि रेणू दांडेकर ह्यांना ही शाळा चालवायचीच नव्हती. त्यांनी वर्गात जाऊन कधीच शिकवलं नाही. 
शिक्षण हे प्रयोगशील आणि उत्पादक कसं होईल हा त्यांचा विचार होता. शिक्षणाची प्रयोगशाळा, प्रयोगशाळेची कार्यशाळा आणि कार्यशाळेची उद्योगशाळा झाली पाहिजे,असे त्यांना कायम वाटत राहिले आणि त्यातूनच त्यांनी वेगळेपण हे जपले आणि विद्यार्थ्यांसमोर सुद्धा रुजवले आहे. आज बाहेरच्या देशांसारखी मल्टि स्किल्ड वर्कर किंवा  हँडी मॅन प्रकारची मुलं आपण निर्माण करायला हवीत, म्हणून शाळेतच तांत्रिक शिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली आणि बदलाचे वारे वाहू लागले. आज शासनाने आणि अनेक संस्थांनी त्यांच्या 'डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी या कोर्सला मान्यता दिलेली आहे. अनेकांनी यशस्वीरीत्या हे शिक्षण पूर्ण करत गावातच चांगला उद्योग सुरू करून यशस्वी झाले आहेत. 

लोकमान्य टिळक विद्यामंदिरात शिक्षणाचं माध्यम मराठी आहे. मातृभाषेतून शिक्षण व्हावं हीच ह्यांची आग्रही भूमिका आहे. या शाळेत पाचवीपासूनच मुलांना कौशल्याभिमुख किंवा स्किल बेस्ड शिक्षण दिलं जातं. व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धतीचं महत्त्व आज हळूहळू वाढतंय, पण लोकमान्य टिळक विद्यामंदिरात ते गेली ३८  वर्षांपासून सुरू आहे. इथे होम सायन्स, एनर्जी अँड एन्व्हायर्न्मेंट, मेकॅनिकल इत्यादी विषयक वेगवेगळ्या प्रयोगशाळा आहेत. इथे आठवी ते दहावीच्या मुलांना आय.बी.टी. म्हणजेच इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमाचा पर्याय मिळतो. हा एसएससी बोर्डाने मान्य केलेला व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. आठवड्यातला एक दिवस ही मुलं विविध तंत्रज्ञान प्रत्यक्षात वापरण्यात घालवतात. त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन बेसिक रूरल टेक्नॉलॉजी हा अधिक प्रगत अभ्यासक्रम आहे, ज्यात शेतीपासून ते बांधकामापर्यंत सर्व तंत्रांचं शिक्षण त्यांना मिळतं आहे. आज ह्यांचे कार्य यशोशिखरावर आहे. इथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथाही तितक्याच प्रेरक आणि प्रेरणादायी आहेत. 'अशी घडली माणसं' या डॉ.राजा दांडेकरांनीच लिहिलेल्या पुस्तकात त्या संकलित केलेल्या आहेत. वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. 

आज डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर ह्यांचा प्रवास दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे. ज्यावेळी कामाला प्रत्यक्ष सुरुवात करायची होती त्यावेळी भारतरत्न नानाजी देशमुखांनी डॉ. राजा दांडेकर ह्यांना जो मंत्र दिला त्याने कार्याचा विस्तार उत्तरोत्तर बहरणारा आहे. श्रद्धेय बाबा आमटे ह्यांचे मार्गदर्शन लाभलेल्या डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर ह्यांच्या लोकसाधनेचे कार्य उत्तुंग आणि प्रेरणादायी आहे. आज त्यांचा मुलगा कैवल्य दांडेकर ही गावातच स्थायिक झाला आहे आणि लोकसाधनेच्या कार्याचा रथ ओढतो आहे आणि मुलगी मैत्रेयी सुद्धा भारतीय सैन्यामध्ये कॅप्टन या पदावर देशसेवेत आहे आणि स्नुषा धनश्री कैवल्य दांडेकर  सध्या चिखलगवच्या शाळेत अनेक शैक्षणिक प्रयोग करत आहे. अशी जगावेगळी माणसं आहेत म्हणून भारताचे वेगळेपण टिकून आहे. आपल्या कार्याला मनापासून शुभकामना आहेतच. संत तुकाराम महाराजांचे वचनच ह्यांच्या कार्यासाठी यथार्थ ठरेल,

बोले तैसा चाले । त्यांची वंदावी पाउले ॥

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे https://loksadhana.org

#loksadhana #chikhalgaon

Monday, October 5, 2020

नर्मदालयाच्या शिक्षणव्रती - भारती ठाकूर


आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय त्या आहेत भारती ठाकूर. नर्मदेच्या किनाऱ्यावरील लेपा येथे पूर्णकालीन शिक्षणव्रती म्हणून त्या आजही कार्यमग्न आहेत. मध्यंतरी  विवेक घळसासी काकांना चांगल्या पुस्तकांची सूची मागितली त्यात त्यांनी भारती ठाकूर ह्यांचे 'नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा' हे पुस्तक वाचायला सांगितले. खरंतर विलक्षण वाचनानंद देणारे हे पुस्तक आहे. लॉकडाऊनच्या काळात पुनर्वाचनाचा आनंद ही अनुभवला आहे. पुढे भारती ताईंच्या कामाबद्दल अधिक समजले ते त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून कारण त्यांनी एक छान लेखमाला ह्या कोरोनाच्या काळात वाचकांना उपलब्ध करून दिली. भारती ताईंचे काम अद्भुत आहे आणि त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. 

भारती ठाकूर. हे नाव नाशिकसाठी ओळखीचे आहे कारण त्या मूळच्या नाशिकच्या आहेत. साहसाची आवड असल्यामुळे अनेक ट्रेकिंग, सायकलिंग अशा मोहिमा त्यांनी फत्ते केल्या आहे. काही काळ विवेकानंद केंद्राचे पूर्णकालीन काम करण्यासाठी त्या आसाममध्ये गेल्या आहेत. कन्याकुमारी येथे विवेकानंद केंद्रात वास्तव्य असताना भरपूर वाचन,चिंतन,मनन,अनेक विद्वत मंडळींशी चर्चा यातून मनात वेगळेच काही तयार होत होते. अशातच त्यांना नर्मदा परिक्रमेची इच्छा झाली आणि पुढे परिक्रमा सुरू झाली.

१४ ऑक्टोबर २००५ ते १२ मार्च २००६ या कालावधीत त्यांनी परिक्रमा पूर्ण केली. ५ महिन्यांच्या या परिक्रमेत त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. केवळ निसर्गदर्शन,अध्यात्मिक अनुभव अशा गोष्टींचा विचार भारतीताईंच्या मनात नव्हता तर नर्मदेवर बांधल्या जाणाऱ्या धरणांमुळे लाखो वर्षांची प्राचीन परंपरा, नर्मदा खोऱ्यातील संस्कृती, वैविध्यपूर्ण जैविक संपदा धरणाखाली जाण्यापूर्वी डोळे भरून पहावी, त्याच्या नोंदी ठेवाव्यात या विचाराने त्यांनी परिक्रमा करण्याचे ठरवले. नर्मदा किनाऱ्यावरील लोकजीवन आणि नर्मदा माईच्या किनाऱ्यावरून मार्गक्रमण करताना स्वत:शीच संवाद साधावा हे कारण ही होतेच. त्यांनी अनुभवलेला निसर्ग,भेटलेली माणसं सारं काही टिपून ठेवले आणि तेच अनुभव पुस्तक रूपाने आपल्याला 'नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा' ह्या त्यांच्या अंतर्मनाशी झालेल्या संवादात वाचायला मिळतात.  

आपल्या परिक्रमेत त्यांना नर्मदा घाटीतल्या परिस्थितीची जाणीव झाली. नर्मदेच्या घाटात त्यांनी अनेक मुलांना शिक्षणाविना झगडताना पाहिलं. अवघी पाच-सात वर्षांची ही मुलं घाटात फिरून फुलं विकायची, पैसे गोळा करायची, नारळ जमा करायची. हे सगळं वास्तव पाहून भारती ठाकूर यांना राहवलं नाही आणि त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली. पुढे त्यांनी स्वत:ला या कामात पूर्णवेळ वाहून घेतलं. नर्मदेच्या घाटात त्यांनी या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. सुरुवातीला हातावर मोजता येतील अशी मुलं या शाळेत होती, आता या शाळेत जवळजवळ १७०० हुन अधिक मुलं आहेत.

खरं सांगायचं तर हा शून्यातून विश्वनिर्मितीचा प्रवास आहे. स्वत:च्या पेन्शनच्या पैशातून मंडलेश्वर येथे राहून रोजची दहा-बारा किलोमीटरची पायपीट करत आदिवासी मुले आणि महिलांसाठी त्यांनी कामाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनौपचारिक शिक्षण सुरू केले. सुरुवातीला त्यांनी एकटीने लढा दिला. मंडलेश्वर ते आजूबाजूच्या परिसरात, पाड्यांमध्ये जाऊन कुटुंबातील सदस्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. अत्यंत गरिबीमुळे व नैसर्गिक परिस्थितीमुळे ही मुले शेतातील कामे करणे, गुरे चरायला नेणे यासाठी कुटुंबात मदत करत असत. लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी पण या मुलांवर होतीच. त्यासाठी कुटुंबाचे मन वळवून या मुलांचा शिक्षणाकडे ओढा वाढावा यासाठी भारती ठाकूर ह्यांनी प्रयत्न केले. या सर्व निरपेक्ष भावनेतून चाललेल्या आणि नर्मदामैयाच्या आशिवार्दाने पुढे जाणाऱ्या कामातून एकेक माणूस जोडला जाऊ लागला. भारतीताई यांच्या प्रयत्नातून शाळेत आलेले विद्यार्थी त्यांना मदत करू लागले आणि या चळवळीला 'नर्मदा' या संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले. ऑक्टोबर २००२ मध्ये 'नर्मदालय' संस्थेची स्थापना झाली आणि प्राथमिक ते हायस्कूल आणि आज व्यवसाय शिक्षणाच्या माध्यमातून निमार प्रदेशातील पंधरा खेड्यांपर्यंत त्यांचे कार्य पोहोचले आहे.

आज नर्मदालयाचा प्रमुख उद्देश हा औपचारिक व अनौपचारिक शिक्षण,व्यवसायाभिमुख शिक्षण,आरोग्य आणि पर्यावरण या कामासाठी राहिला आहे. चांगल्या कामाला परमेश्वर पाठीशी असतोच इथं तर प्रत्यक्ष नर्मदा माई आहे. भारती ठाकूर ह्यांचे काम बघून एका नागा साधूने त्यांच्या आश्रमाची जागा व बाजूची जमीन नर्मदालय संस्थेला दिली. या जागेवर रामकृष्ण शारदा निकेतन सुरू आहे. औपचारिक शिक्षण व संस्कार याबरोबरच सुतारकाम, दुग्ध व्यवसाय, शेती, वेल्डिंग, माती परीक्षण याचे प्रशिक्षण देऊन हे विद्यार्थी ग्रामीण भागाशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडले गेले आहे. केवळ या भागातील वंचित कुटुंबातील मुलांना या शाळेत प्रवेश मिळतो. विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन व शिक्षण हे संपूर्णत: विनामूल्य दिले जाते. विशेष म्हणजे रामकृष्ण शारदा निकेतन लेपा पुनर्वास ही मध्य प्रदेशातील पहिली डिजिटल शाळा बनली आहे. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंग,डॉक्टर आदी पदवी प्राप्त करते झाले आहेत. या केंद्रांमध्ये शिक्षिका म्हणून अनेक ग्रामीण महिलांना रोजगार मिळाला आहे. या शिक्षकांना देण्यात येणारे ट्रेनिंग त्यांना संपूर्ण आयुष्यासाठी प्रेरक ठरत आहे. या सर्व उपक्रमांसाठी सरकारी मदतीवर अवलंबून न राहता देणगी स्वरूपात रक्कम गोळा करून हा खर्च भागवला जातो आहे. 

नर्मदा संस्थेचा आणखी एक प्रकल्प म्हणजे 'नचिकेत छात्रावास'. आजूबाजूच्या पाड्यांवरून शिक्षणासाठी येणारी मुले या छात्रावासात राहतात. लेपा पुनर्वास भागात शाळा व छात्रावासाच्या नजीकच एक गोशाळेचा उत्तम प्रकल्पही चालू आहे. नर्मदा संस्थेतर्फे या भागातील महिलांनी आत्मनिर्भर व्हावे यासाठी 'नर्मदा निर्मिती' नावाने शिलाई विभाग सुरू करण्यात आला आहे. यातील तयार वस्तूंना विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. आज भारती ठाकूर ह्यांचा कार्याचा वटवृक्ष उत्तरोत्तर बहरतोय.भारती ठाकूर ह्यांच्या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा. कवी बा.भ.बोरकर ह्यांच्या ओळींच त्यांच्या कार्यासाठी यथार्थ ठरतील...

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे।
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे ।। 
 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे  https://narmadalaya.org

Thursday, October 1, 2020

काश्मीरशी "असीम" मैत्री करणारे सारंग गोसावी !!

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत सारंग गोसावी.आपण अनेकदा म्हणतो, 'मराठी पाऊल पडते पुढे !' पण खऱ्या अर्थाने आपल्या कार्यातून प्रत्यक्षात मराठी पाऊल जे आज सीमेवर आणि बहुचर्चित असलेल्या जम्मू काश्मीरमधील अनेक दुर्गम भागात प्रसंगी प्रत्यक्ष सीमा भागात आदराने नाव घेतले जाते आणि आजही प्रसिद्धीच्या झोतात न येता शांतपणे काम करणारे सारंग गोसावी आणि "असीम फाऊंडेशन" च्या माध्यमातून काम करणारी त्यांची संपूर्ण टीम आहे. 

शतकांपासून काश्मीर चे भारताशी सांस्कृतिक,शैक्षणिक, धार्मिक , ऐतिहासिक संबंध आहेत. भारताची उज्ज्वल ज्ञानाची परंपरा काश्मीर शिवाय सुरूच होऊ शकत नाही. प्रख्यात कवी, साहित्यिक, खगोलतज्ञ ,व्याकरणतज्ञ व तत्ववेत्ता आचार्य अभिनवगुप्त यांच्या अथक अभूतपूर्व प्रयत्नांमुळे कर्तृत्वामुळे काश्मीर ची ज्ञानपीठ, शारदापीठ अशी ओळख जगभरात निर्माण झाली. केरळच्या कालडी मधून आलेले आद्य शंकराचार्य जगद्गुरू म्हणून याच भूमीतून ओळखले जाऊ लागले. अशा भव्यदिव्य ज्ञानाच्या परंपरेची गंगोत्री म्हणून काश्मीर ची ओळख आहे. 

पण हल्ली काश्मीरमध्ये सतत हल्ले होत असल्यानं तिथे खूप मोठ्या प्रमाणात लष्करी यंत्रणा कार्यरत आहे. कधी अतिरेकी, दहशतवादी हल्ले करतात, तर कधी लष्कराकडून हल्ला होतो. यात बहुतांश वेळा सर्वसामान्य माणसं भरडली जातात. विकासाची कामं होत नाहीत. दहशतवादी हल्ला करतील ही भीती इतर ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांच्या मनात बसलेली आहे. अशा वेळी पुण्यातील सारंग गोसावी काश्मीरला जायचं फक्त तिकीट घेऊन गेले आणि गेली २० वर्षं जातच आहे तेही तिथलं निसर्गसौंदर्य,हवापालट म्हणून नाही, तर तिथली परिस्थिती समजून घेण्यासाठी, तिथल्या लोकांना ‘मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझेच आहात’ हे सांगण्यासाठी, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी,त्यांच्या मनातली भीती घालवण्यासाठी, त्यांना भारत कसा आहे हे सांगण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू आहे. 

काश्मीरमधला सगळा परिसर सारंग गोसावी फिरत राहिले. तिथल्या लष्कराची मानसिकता त्यांनी समजून घेतली, तसंच तिथल्या स्थानिक लोकांचे प्रश्नही प्रत्येक भेटीत कळत गेले. जन्माला आल्यापासून ज्या मुलाला आसपास बंदुकधारी सैनिक दिसत असतील, तर त्याच्या मनावर काय परिणाम होतील याचा विचारही करायला लागले. काश्मीरमधल्या दहशतवादाचा अभ्यासही होत गेला. आपण काय करू शकतो, आपल्यात काय क्षमता आहेत याचा विचार करून सारंग गोसावी ह्यांनी तिथल्या स्थानिक युवकांना Physics हा विषय शिकवायचं ठरवलं. ठिकठिकाणी जाऊन ते क्लासेस घ्यायला लागले. सुरुवातीला तिथल्या लोकांना हा बाहेरचा तरुण येऊन असं का करतोय का प्रश्न पडला; पण सहवासानं त्यांना त्यांचा हेतू कळला. आपल्याच घरातला हा एक मुलगा आहे हेही त्यांना वाटायला लागले. मुला-मुलींच्या संपर्कातून सारंग गोसावी प्रत्येकाच्या घरात जाऊन पोहोचले आणि त्यांनी कुपवाडा इथं पहिलं केंद्र सुरू केलं. तिथली अलफैयाज नावाची शाळा शिक्षकांअभावी बंद पडली होती. सारंग गोसावी ह्यांनी ही बंद पडलेली शाळा सुरू करायचं ठरवलं. खरं तर हे सगळंच काम इतकं सोपं नव्हतं. बाहेरचा एक मुलगा येतो आणि इथं येऊन रोज काहीतरी नवीन गोष्टी सुरू करतो ही गोष्ट लक्षात आल्यावर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर नजर ठेवली आणि काही वेळा त्यांना त्रासही दिला. घरी फोन करून धमक्या द्यायलाही सुरुवात केली. सुरुवातीला घरी फोन जाताच त्यांची आई घाबरून रडायची,त्यांनी पुन्हा काश्मीरला जाऊ नये म्हणून विनवण्या करायची; पण सारंग गोसावी शांत होते, आपल्या निश्चयावर ठाम होते. त्यांनी त्या दहशतवाद्यांनाही आपण कुठल्याही अतिरेकी हेतूनं काही करायला आलो नसून,फक्त चांगलं काही तरी करू इच्छितो, जे काश्मिरी लोकांच्या कल्याणासाठी असेल, असं सांगायचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांना सारंग गोसावी ह्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास बसला आणि त्यांनी पुढे लक्ष दिले नाही. पुढे बडगाम येथे कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र सुरू केले पण ज्यावर विश्वास ठेवला त्याने परस्पर कॉम्प्युटर विकले आणि हे प्रशिक्षण केंद्र बंद पडले. तरी न खचता जिद्दीने पुन्हा बिजबेरा गावी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर घेतले. पुण्यातून १७ जणांची टीम सोबत नेली. त्यांना प्रशिक्षण दिले. आज काश्मीर मधील मुले पुण्यात शिकायला येत आहेत. तेथील पालक सुद्धा विश्वासाने आपल्या मुलांना पुण्याला पाठवतात आणि सारंग गोसावी ह्या मुलांचे पालकत्व स्वीकारतात. 

काश्मीर मध्ये अक्रोड आणि सफरचंदं ह्यांची प्रचंड लागवड होते. स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून ह्यापासून बिस्कीट करण्याची कल्पना सारंग गोसावी ह्यांना सुचली आणि ती यशस्वी झाली. आज ही बिस्किटे दिल्ली, पुणे आणि श्रीनगरमध्ये हातोहात खपायला सुरुवात झाली. पुढे त्यांनी काश्मीरमध्ये मुलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा घेतल्या अणि त्याही खूपच यशस्वी झाल्या. खेळामुळे गावागावांमध्ये चैतन्य निर्माण झालं होतं. आज काश्मीर हे सारंग गोसावी ह्यांचे किंवा ‘असीम फाउंडेशन’चं अर्थातच दुसरं घर झालं आहे. तिथल्या घराघरात सारंग गोसावी ह्यांना लोक ओळखतात. इतकंच नव्हे तर काही गोंधळाची शक्यता वाटली, तर तिथलं लष्करही सामंजस्याचं, शांतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी सारंग गोसावी ह्यांना बोलावून घेतं. 

आज सारंग गोसावी ह्यांची असीम फाउंडेशन ही पुणे येथील संस्था भारताच्या सीमावर्ती भागांत, मुख्यतः जम्मू-काश्मीरमध्ये काम करते. भारतीय समाजाला मुख्यतः तरुणांना राष्ट्रीय प्रश्नांना तोंड देण्याची उर्मी आणि जिद्द देण्याची गरज असीम फाऊंडेशनने जाणून घेतली. असीमला जाणवणार्‍या या राष्ट्रवादाची जागृती करण्याच्या गरजेला मूर्तिमंत रूप मिळाले. आज पुण्याजवळच्या चांदिवली येथे असीमच्या प्रयत्नांतून राष्ट्रीय एकात्मता उद्यान साकारण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता उद्यान हा तरुणांना एकत्र येऊन राष्ट्रीय प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी तयार केलेला एक मंच आहे. या असीमच्या प्रयत्नांना अधिक बळकटी मिळावी आणि तरुणांना असे राष्ट्रीय एकात्मतेचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून समकालीन नायकांची गरज आहे हे असीमने जाणले आणि म्हणूनच असीमने भारताच्या २१ परम वीर चक्र विजेत्यांची माहिती देणारे shaurya नावाचे अँड्रॉइड अँप विकसित केले आहे. खरंतर प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असेच सारंग गोसावी ह्यांचे कार्य आहे. अशी जगावेगळी माणसं आपल्या अवतीभवती आहेत. असीम म्हणजे अमर्याद आणि ह्या फाऊंडेशन चा प्रवास उत्तरोत्तर प्रगती पथावर असावा हीच सदिच्छा आहे. ह्यांच्या कार्यास खूप शुभेच्छा आहेतच. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे 

Monday, September 28, 2020

भिक्षेकऱ्यांना सन्मान मिळवून देणारे - डॉ.अभिजित सोनावणे

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत डॉ.अभिजित सोनावणे. पुण्यातील हे डॉक्टर खरंतर कुठल्या चकचकीत दवाखान्यात भेटणार नाही तर ते भेटतात मंदिराच्या बाहेर कारण त्यांचे रुग्ण तिथे बाहेर बसलेले असतात. आश्चर्य वाटेल पण मंदिर,गुरुद्वारा,चर्च, मशीदीच्या बाहेर बसलेल्या भिक्षेकरी असलेल्या अनेकांसाठी आज ते देवदूत बनलेले आहेत. आज सोहम ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे. समाजानं टाकून दिलेल्या माणसांना आपलंसं करून आत्मसन्मान प्राप्त करून देणं, हेच डॉ. अभिजीत सोनावणे ह्यांचे ध्येय आहे. 

डॉ.अभिजित ह्यांच्यामधली मानवता बघून त्यांच्यापुढे नतमस्तक व्हायला होतं. आयुष्य कसं जगावं आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांनी दिलाय. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं, तर आपल्या असण्याची जाणीव एखाद्याला असणं म्हणजे आयुष्य आणि आपल्या नसण्याची उणीव भासणं म्हणजे आयुष्य! डॉक्टर फॉर बेगर्स अशीच डॉ.अभिजित सोनवणे यांची ओळख आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाद्वारे गेल्या चार वर्षांत अनेक आजी-आजोबा आणि दहा युवकांच्या जीवनामध्ये स्वावलंबनाची पहाट उगवली आहे. आपल्यावर केलेल्या उपकारातून उतराई होण्याचा ‘अभिजात’ मार्ग डॉ. सोनवणे यांनी निवडला असून अनेकांना भीक मागण्यापासून परावृत्त करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. ते स्वत:च जीवन संपविण्याच्या विचारात होते. पण, अनेकांच्या जीवनात आनंद फुलविण्याचे काम करीत त्यांना श्रमाचे मोल जाणवून देण्यामध्ये आज त्यांना समाधान लाभत आहे. 

आयुर्वेदातलं शिक्षण घेऊन डॉक्टर झालेल्या डॉ.अभिजित ह्यांनी समविचारी तरुणीशी लग्न केलं आणि समोर एक ध्येय ठेवून एका छोट्या गावात प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आपण आपल्या कर्तृत्वावर जगायचं असं अभिजीत ह्यांनी ठरवलं; पण त्या गावात अभिजीतची प्रॅक्टिस काही केल्या चालेना. काय करावं कळत नव्हतं. त्या वेळी गावचे सरपंच अभिजितला म्हणाले,' बाळा, तू अजून तरुण आहेस. कष्ट करण्याची ताकद तुझ्यात आहे. तुझ्याकडे लोक येत नाहीत, तर तू लोकांकडे जा.’सरपंचाचं म्हणणं ऐकून डॉ. अभिजित ह्यांनी रोज गावातल्या लोकांकडे जायला सुरुवात केली. तपासणी फी फक्त पाच रुपये होती. असं असतानाही लोक पैसे तर देणं सोडाच, पण त्यांच्याकडून तपासून घ्यायलाही तयार होत नसत. काय करावं, या गोष्टीचा विचार करून डॉ.अभिजित ह्यांना वेड लागायची वेळ आली. ते गावातल्या एका मंदिराजवळ जाऊन तिथल्याच पायरीवर बसून आकाशाकडे एकटक नजर लावून बघू लागले. मनात सगळे नकारात्मक विचार सुरू झालेले होते. पुढे सगळा काळाकुट्ट अंधार दिसायचा. आपण आपल्या शिक्षणासाठी सात वर्षं घातली. आता निदान पोटापुरतं तरी मिळावं असं वाटत असताना तेवढंही मिळू नये या विचारानं अभिजित नैराश्येच्या गर्तेत जात होते. तासनतास तिथे बसलेल्या डॉ.अभिजित ह्यांना त्या मंदिराजवळ ७०-८० वर्षांचे आजी-आजोबा बसलेले दिसायचे. ते तिथे बसून भिक्षा मागत असायचे. हळूहळू डॉ.अभिजित आणि त्यांची मैत्री झाली. डॉ.अभिजित ह्यांचे दुःख त्यांना न बोलता समजलं. त्या आजोबांनी अनेक अनुभव सांगून आयुष्याला कसं तोंड द्यायचं याचे जणू काही धडेच दिले. त्या काळात त्या आजी-आजोबांनी डॉ.अभिजीत ह्यांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. ‘आम्ही तुझे आहोत’ हा आधार दिला आणि त्यांना भिक्षेपोटी मिळालेलं चांगलं अन्न ते डॉ.अभिजित ह्यांना खायला घालू लागले. स्वतः मात्र शिळे खाऊ लागले. डॉ.अभिजित ह्यांच्यासाठी ते चांगले पदार्थ वेगळे काढून देऊ लागले. इतकंच नाही, तर लोकांनी समोर टाकलेले पैसेही ते नकळत डॉ.अभिजीतच्या सॅकमध्ये टाकत होते. त्या पैशांवर डॉ.अभिजित ह्यांचे दिवस कसेबसे निघत होते.

असेच दिवस जात असताना डॉ.अभिजित ह्यांच्यासमोर एक संधी आली. स्वप्नवत असावे अशीच ती घटना होती कारण आता त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या एका हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली होती. त्यांना चार लाख रुपये पगार मिळणार होता. चमत्कार व्हावा तशी सगळी परिस्थिती पालटली होती. पुढे डॉ.अभिजित ह्यांची रोजची खाण्याची भ्रांत संपली आणि त्याचं राहणीमान सुधारलं. 

पण डॉ. अभिजितच्या डोळ्यांसमोर ते वृद्ध आजी-आजोबा कायमच यायचे. त्यांचं प्रेम आठवायचं. ‘ते नसते तर...’ असे अनेक प्रश्न त्यांना येत होते. आता त्यांच्या प्रेमाची परतफेड कशी करायची, या प्रश्नानं त्याचं मनात सारखा विचार येत असे आणि मनाचा निर्धार पक्का करून डॉ.अभिजित ह्यांनी १५ ऑगस्ट २०१५ या दिवशी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते रस्त्यावर आले. पुढे काय करायचं ठाऊक नव्हते; पण मनात एक मात्र नक्की होतं. ज्या आजी-आजोबांनी आपल्या घासातला घास काढून दिला,त्यांचं ऋण चुकतं करायचं होतं आणि डॉ.अभिजित ह्यांनी भिक्षेकऱ्यांना मदत करण्याचे,त्यांना सन्मानाने वागवण्याचे महत्कार्य सुरू झाले. ते म्हणतात,' भिक्षेकऱ्यांना भिक्षा देऊ नका. त्यांच्याशी फक्त प्रेमानं वागा. त्यांना सन्मानानं वागवा आणि मला एकच आशीर्वाद द्या, माझं हे काम एक दिवस संपलं पाहिजे. या भिक्षेकऱ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे.’ ज्या व्यक्तींना समाजानं टाकून दिलंय, त्यांना आपलंसं करणं, त्यांना सन्मान प्राप्त करून देणं हेच आता डॉ.अभिजित सोनावणे ह्यांचे ध्येय बनलं आहे. 

डॉ.अभिजित सोनावणे ह्यांनी ‘सोहम ट्रस्ट’ नावाची एक संस्थाही स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून या भिक्षेकऱ्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम ते करत आहेत. या संस्थेला आर्थिक मदत करायची असल्यास Social Health And Medicine Trust (SOHAM TRUST) या नावे चेक काढून अगदी एक रुपयापासून जमेल तेवढी मदत करू शकता. त्याची पत्नी डॉ.मनीषा सोनावणे ट्रस्टची अध्यक्षा असून,त्या त्यांना त्यांच्या या सगळ्या कामात मदत करतात. आजवर चाळीस हुन दररोज अधिक भिक्षेकऱ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्याचे महत्कार्य ते करत आहे. डॉ.अभिजित ह्यांचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याकडून मिळतो. 

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे 

Saturday, September 26, 2020

टेलीफोनचे आत्मकथन … ☎️


नमस्कार मंडळी. हल्ली कोरोनामुळे आपण सगळेजण घरातच आहोत. तसा मी तर कायमच घरात असतो. पण ह्या लॉकडाऊन मुळे माझा वापर ही वाढला आणि अनेक दिवसांपासून आपल्याशी मनातलं काही बोलायची इच्छा होती. आज शनिवार आणि सुट्टीचा दिवस. आज माझ्या प्रवासाबद्दल खरंतर काही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. कदाचित आवडेल ही कारण आता मी हळूहळू कालबाह्य होतो आहे. माझं अस्तित्व संपण्यातच जमा झाले आहे. पण तरीही अनेकांच्या दिवाणखान्यात आजही माझ्यासाठी एक कोपरा,कुणाकडे टेबलवर कुणाकडे भिंतीवर,फ्रिजवर माझ्यासाठी जागा आहेच. आधी माझा जन्म झाला माझ्यानंतर कॉडलेस फोन आला त्यानंतर पेजर आला त्यानंतर मोबाईल आला आणि आता स्मार्टफोन आहे. माझी जडणघडण ही तुमच्यामुळे झाली. तुम्ही नवनवीन प्रयोग करत गेलात आणि मी घडत गेलो. तसं म्हंटल तर आज माझी चौथी पिढी आता तुमच्याजवळ आली आहे. 

Mr. Watson! Come here, I want to see you.’’ १८ मार्च १८७६ रोजी उच्चारलेले हे वाक्य जगाच्या इतिहासात अमर झाले, कारण ते वाक्य बोलणारे शास्त्रज्ञ होते- अ‍ॅलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि ऐकणारे शास्त्रज्ञ होते- बेलचे सहकारी थॉमस वॅटसन. दोघेही बाजूबाजूच्या खोलीत बसले होते. पण हा संवाद झाला तो बेल यांनी तयार केलेल्या दूरध्वनी यंत्रावर. दूरध्वनी यंत्राची चाचणी घेण्यासाठी बोललेले आणि पलीकडे ऐकू गेलेले हे पहिले वाक्य होते.  पत्र्याच्या दोन डब्यांना तारेने जोडून एका डबीतून बोललेले पलीकडे ऐकण्याचा खेळ आपण लहानपणी खेळला आहे आणि विज्ञानाच्या पुस्तकांतही वाचला आहे. 

सामान्यत: ध्वनिलहरी हवेतून प्रवास करतात. ऐकणाऱ्याच्या कानावर आपटतात. कानातील पडदा त्या लहरींमुळे थरथरतो. त्यामुळे आतील यंत्रणा कार्यान्वित होते. मेंदूला योग्य तो संदेश जातो आणि ऐकणारा ध्वनी ऐकतो. जर ध्वनीचे उगमस्थान ऐकू येण्याच्या कक्षेत असेल तरच ही प्रक्रिया पूर्ण होते. पण जेव्हा हे अंतर काही मीटर किंवा दोन पूर्ण वेगळ्या भौगोलिक स्थानापर्यंत वाढते तेव्हा तयार होणाऱ्या ध्वनिलहरी दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता असते. 

माझा शोध लागण्यापूर्वी १९ व्या शतकाच्या सुरुवातीपासून तारायंत्रे (Telegraph) वापरात आली. आदिम काळापासून धूर अथवा अग्नीच्या साहाय्याने सांकेतिक संदेश देण्याची परंपराच नवीन विद्युत् तंत्रज्ञानाच्या आधारे दूर संदेशवहनाच्या कामी येऊ लागली. इ. स. १७६८ पासून या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. प्रत्येक अक्षरासाठी एक तार वापरण्यापासून ते काही संकेत तयार करून, ते विद्युत् तारांमार्फत पाठवले जाऊ लागले. यातूनच १८३७ मध्ये सॅम्युअल मोर्सने एक सांकेतिक लिपी तयार केली; जी तारायंत्राच्या ‘डा’ आणि ‘डिट’ या दोन आवाजांत बांधली गेली होती. त्या भाषेला ‘मोर्स कोड’ म्हणतात. अगदी आत्तापर्यंत जलद संदेशवहनाकरता तारा पाठवण्याची पद्धत चालू होती.

पूर्वीच्या काळातील फोनच्या तबकडीवरील हवे ते आकडे फिरवून तयार होणारे स्पंद दूरध्वनी केंद्राकडे पोहोचत असत. (या पद्धतीला pulse dialing म्हणतात.) आधुनिक दूरध्वनी संचामध्ये आपण आकडे लिहिलेली बटणे दाबून हवा तो आकडा केंद्राकडे पोहोचवतो. बटन दाबल्यावर तयार होणारा आवाज केंद्राकडे पोहोचतो आणि आपल्याला हवा तो आकडा केंद्राला कळतो. (या पद्धतीला DTMF-dual-tone multi-frequency म्हणतात.)

हा आकडा कळल्यावर पूर्वी केंद्रात असलेले कर्मचारी त्या आकडय़ाच्या दूरध्वनी संचाशी संपर्क जोडून देत असत. आता हीच प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक तंत्र वापरून स्वयंचलित केलेली आहे.  संपर्क साधल्यावर दोन्ही दूरध्वनी संच एकमेकांशी जोडले जातात आणि संवाद सुरू होतो. हळूहळू माझ्यात ही बदल होत गेले आणि संपर्क यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यासाठी आता धातूच्या तारेऐवजी काचेचे तंतू असलेल्या तारा (Fibre Optics) वापरतात. तसेच विद्युत् चुंबकीय लहरी उपयोगात आल्यापासून दोन संचांमध्ये थेट तारेमार्फत संपर्क न होता तो ‘संच-केंद्र-उपग्रह-केंद्र-संच’ अशा साखळीतून होतो.

खरं तर आता मोबाईल अर्थात भ्रमणध्वनी संच हा जणू आपला एक नवीन अवयवच असल्यासारखा वापरला जातोय आणि नुसते बोलणे आणि ऐकणे या मूळ क्रियांबरोबरच इतर बरेच नवनवीन प्रयोग करत आहात. सध्या ह्याची मागणी खूप असल्याने मी थोडा दुर्लक्षित झालो असेल पण अनेकांच्या घरी आजही मी आहे आणि ते प्रसंगी माझा वापर करतात. सर्वेशकडे सुद्धा मी १९९९-२००० च्या दरम्यान आलो आणि जवळपास २० हुन अधिक वर्ष झाली आणि त्यांच्यातला एक झालो आहे. दोन-तीनदा त्यांनी सुद्धा मला परत पाठवण्याची व्यवस्था केली होती पण इतकी वर्षांची सोबत असल्याने आमचे ऋणानुबंध टिकून आहेत आणि गुण्या-गोविंदाने आम्ही एकमेकांच्या सोबत आहे.

चला येतो मी. निघण्याची वेळ झाली. भेटू पुन्हा कधीतरी..


  • सर्वेश

#telephone 

Thursday, September 24, 2020

हत्तीच्या संवेदना जाणणारे - आनंद शिंदे !!

आज ज्यांच्याबद्दल लिहायला घेतोय ते आहेत हत्ती मित्र आनंद शिंदे. मारुती चितमपल्ली म्हणतात,प्राण्यांच्या,पक्षांच्या जितके जवळ तितके ते आपल्याला जवळ करतात आणि जीवही लावतात. आनंद शिंदे हे असे नाव आहे, की जी व्यक्ती हत्तींशी सहज संवाद साधू शकते. आश्चर्य वाटतं पण ते म्हणतात, ‘प्राण्यांना काय बोलायचंय हे पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यांत दिसतं. मी हत्तींकडून माणुसकी शिकलो,' मुळात पत्रकार असलेले आनंद शिंदे यांना फोटोग्राफीची आवड त्यामुळे ते फोटो पत्रकार झाले. ह्या निमित्ताने संपूर्ण भारतभर त्यांचा प्रवास सुरु असतो. असंच एकदा केरळमध्ये मार्शल आर्ट आणि कथकलीवर फोटो फिचर करण्यासाठी ते गेले असता तिथे त्यांना हत्ती भेटले आणि या हत्तींनी त्यांचं अख्खं जगणंच व्यापून टाकले. 

केरळमधलं प्रसिद्ध त्रिशूल नावाचं फेस्टिव्हल आनंद शिंदे ह्यांनी शूट केलं. त्या फेस्टिव्हलमध्ये असलेले हत्ती त्यांनी पहिल्यांदा शूट केले आणि रांगेत असलेले हत्ती ते बघत राहिले. हत्ती ताकदवान म्हणून त्यांना माहिती होते, पण त्याचं हृदय किती मऊ आहे हे त्यांना एका दृश्यानं दाखवलं. एका हत्तीचा माहूत त्याला पायाला सारखं टोचून पुढे चालायला भाग पाडत होता. त्यामुळे त्या हत्तीच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या. त्या हत्तीच्या पायाला जखमा होऊनही जेव्हा तीव्र उन्हाचे चटके माहुताला बसायला लागले, तेव्हा त्या हत्तीनं आपल्या चार पायांच्या मध्ये माहुताला बसायला जागा दिली. ते दृश्य पाहून आपण हत्तीला घाबरण्याची गरज नाही हे आनंद शिंदे ह्यांना सर्वप्रथम कळलं.

पुढे केरळमध्ये कृष्णा नावाच्या हत्तीच्या पिल्लाचा पाय मोडला होता. ते बघून त्यांना वाईट वाटत होतं. कृष्णा आपल्या आईशिवाय राहू शकत नव्हता. तो सारखा एका विशिष्ट पद्धतीनं आवाज काढायचा. एक हत्ती दुसर्‍या हत्तीशी संवाद साधण्यासाठी र्‍हमलिंगची भाषा वापरतो. सात किमी पर्यंत एक हत्ती दुसर्‍या हत्तीशी सहज संवाद साधू शकतो हे विशेष आणि आश्चर्यकारक आहे. हत्तीच्या पोटातून धुमारायुक्त आवाज ऐकायला येतो. आनंद शिंदे ह्यांनी भरपूर प्रयत्न केल्यावर त्यांना घशातून आवाज काढता आला. कृष्णाशी संवाद साधण्याच्या अथक प्रयत्नांनंतर कृष्णानं कान हलवून ते येण्याचा आनंद व्यक्त केला. खरंतर कृष्णा आणि आनंद शिंदे यांच्यात जवळीक निर्माण व्हायला दीड महिना गेला. सकाळ ते रात्रीपर्यंत आनंद शिंदे कृष्णाच्या पिंजर्‍याजवळ बसून राहायचे.

आनंद शिंदे ह्यांना हत्तींनी झपाटून टाकले होते. कारण त्यांना हत्तींच्या संदर्भात अनेक गोष्टी कळत होत्या. वय वाढतं तसा हत्तीमध्येही पोक्तपणा येतो. तसच ते एकमेकांची थट्टा, चेष्टा करत असतात, इतकंच काय माणसाला मित्र मानल्यावर त्याचीही ते चेष्टा करतात. ह्याबाबत त्यांच्या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. हत्तीच्या ह्याच वेडामुळे ह्यांच्या पत्नीने अर्थात श्रेया शिंदे ह्यांनी त्यांचं मन ओळखून, हत्तीशिवाय जगू शकत नाही हे कळल्यामुळे त्यांचा नोकरीचा राजीनामा पाठवून दिला आणि ‘आपण आर्थिक बाजू सांभाळू तू हे काम निर्धास्तपणे कर’ असं सांगून खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या  पुढे आनंद शिंदे ह्यांनी ‘ट्रंक कॉल वाईल्ड लाईफ फाउंडेशन’ ही विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पुढाकाराने एक संस्था स्थापन केली. हत्तींची कमी होणारी संख्या, हत्तींचं जतन, हत्तींशी संवाद, हत्तींचं नैराश्य यांच्यावर ह्या संस्थेच्या माध्यमातून आज काम केलं जातं. 

असं काही काम करत असतानाच आपल्याला नकळत मार्गदर्शक ही मिळतोच. डॉ. जेकब अ‍ॅलेक्झांडर जे त्रिवेंद्रम झोनचे व्हेर्टनरी डॉक्टर आहेत. यांनी आनंद शिंदे ह्यांना खूप मदत केली प्रसंगी मार्गदर्शन ही केले. कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत हे सांगितलं आणि ह्यातूनच आनंद शिंदे आता वाघ, बिबट्या, सिंह यावरही अभ्यास करत आहे. हत्तींप्रमाणेच इतर प्राण्यांशी संवाद साधणंही आनंद शिंदे ह्यांना जमायला लागलं आहे. डॉ.जेकब अ‍ॅलेक्झांडरच्या संधीमुळेच त्यांना अशा अनेक गोष्टी करता आल्या. खरंतर हत्तीमित्र म्हणून आनंद शिंदे आज पूर्ण हत्तीमय झाले आहेत. ‘प्राण्यांना काय बोलायचंय हे त्यांच्या डोळ्यात त्यांना पहिल्यांदा दिसतं.पसायदानात आपण नेहमी म्हणतो, "भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे" पण खऱ्या अर्थाने ही ओवी आचरणात आणणारे आहेत आनंद शिंदे. नुकतीच विदर्भातील बऱ्याच भागात पूरग्रस्त परिस्थिती होती. गडचिरोली भागामध्ये आलेल्या महापुरात ब्रम्हपुरी परिसरातील गावांसाठी आनंद शिंदे ह्यांच्या ट्रंक कॉल द वाईल्डलाईफ फाउंडेशन संस्थेमार्फत मदत म्हणून गुरांसाठी चारा पाठवण्यात आला.कारण या संस्थेचे मुख्य काम हे हत्ती संवर्धन बरोबर वन्य जीवन संदर्भात चालतं. स्थानिक वृत्तपत्रात ही बातमी झळकली नाहीच. पण पूरग्रस्तांना ट्रक भरलेले पशुखाद्य मिळाले. यापूर्वी देखील ट्रंक कॉल द वाईल्ड लाईफ फाउंडेशनने जमेल तशी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वेगवेगळ्या मदती केलेल्या आहेत. लॉकडाऊन च्या काळात सुद्धा रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न पुरवण्याचे महत्वपूर्ण काम संस्थेने केले आहे. 

आनंद शिंदे ह्यांनी हत्ती ह्या महाकाय प्राण्याकडे बघण्याची नवी दृष्टी दिलीच पण मदतीसाठी सुद्धा तत्परता दाखवण्याची दृष्टी दिली आहे. आनंद शिंदे ह्याच्यासाठी स्वतःचा प्रवास नावाप्रमाणेच आनंद देणारा असला तरी तुम्हांआम्हां साठी रोमांचित करणारा आणि प्रेरणादायी असा आहे आणि जगण्याचं एक नवं भानही देणारा आहे.

✍️ सर्वेश फडणवीस 

#अलौकिक_नोहावे