Sunday, September 26, 2021

रुपनाथ


प्राचीन शिलालेखाचा तसा अभ्यास नाही. पण शिलालेख बघणं म्हणजे वेगळाच अनुभव असतो. रुपनाथ या ठिकाणी असाच प्राचीन शिलालेख बघण्याचा योग आला. रूपनाथ हे मध्य प्रदेशातील जबलपूरच्या कैमूर पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले एक रमणीय ठिकाण आहे. स्वच्छ आणि चकचकीत रस्ते आणि अवतीभवती जंगलाच्या वाटेतून जातांना हे स्थळ फारच सुंदर आहे. खरंतर निसर्गाने मध्य प्रदेशाला प्राकृतिक वनसंपदा भरपूर प्रमाणात दिलेली आहे. भगवान शिव यांचे एक प्राचीन मंदिर देखील रुपनाथ येथे आहे. रूपनाथ हे हिंदूंसाठी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. 

येथील शिलालेख ब्राह्मी भाषेत आहे. २३२ वर्ष झाली हा शिलालेख ऊन-वारा पाऊस याची तमा न बाळगता इतिहासाची साक्ष देतो आहे. बघितल्याक्षणी असे दिसते की सम्राट अशोकाच्या काळात हे स्थान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले गेले असावे. मौर्य शासक अशोकचा मुख्य शिलालेख येथे एका खडकावर कोरलेला आहे, त्याचा हा संस्कृत अनुवाद मिळाला. मराठीत कुणी अनुवाद करू शकले तर अधिक माहिती मिळू शकेल. 

"देवानां प्रिय: एवं आह सातिरेकाणि सार्धद्वयानि वर्षाणि अस्मि अहं श्रावकः न तु वाढ़ं प्रकांतः, सातिरेकः तु संवत्सरः यत् अस्मि संघ उपेतः वाढ़ं तु प्रकांतः। ये अमुस्मैकालाय जूंबद्वीपे अमृषादेवाः अभूवन् ते इदानी मृषाः कृता:। प्रक्रमस्य हि इदं फलम्। न तु इदं महत्तया प्राप्तव्यम्। क्षुद्रकेण हि केनापि प्रक्रमाणेन शक्यः विपुलोस्पि स्वर्गः आराधयितुम, एतस्मै अर्थाय च श्रावणं कृतं क्षुद्रकाः च उदाराः च प्रक्रमन्तां इति। अंता: अपि च जानन्तु अयं प्रक्रम: किमति चिरस्थिकः स्यात्। अयं हि अर्थः वर्धिष्यते। इमं च अर्थ पर्वतेषु लेखयत परत्र इह च। सति शिलास्तंभे लेखितव्यः सर्वत्रविवसितव्यमिति। व्युष्टेन श्रावणं कृत 256 सत्रविवासात्।"

✍️ सर्वेश फडणवीस 

#IncredibleIndia #AmrutMahotsav

Thursday, September 23, 2021

अपार पराक्रमी,शौर्यवान,आणि सुव्यवस्था ठेवणारी वीरांगना - राणी दुर्गावती ..

प्रवासात आडवाटेने जातांना एखाद्या स्मृतिस्थळाला बघतांना ज्या गौरवशाली इतिहासाची परंपरा आपल्याला लाभलेली आहे त्याबद्दल अधिक जाणून घेतल्यावर आश्चर्य वाटतं,असाच अनुभव काल नर्रई या ठिकाणी राणी दुर्गावती स्मृतिस्थळ बघतांना आला.
जबलपूर येथील बरगी डॅम च्या जवळच हे स्थान आहे."राणी दुर्गावती" हे नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवावे असे आहे. इतिहास हा ऐतिहासिक असतो. हा ऐतिहासिक ठेवा पिढी दर पिढी हस्तांतरित करतांना तो मुळात आपल्याला माहिती असायला हवा. असे कायमच वाटते. मुघल शासकांना हादरवणारी एक शूरवीर वीरांगना म्हणून राणी दुर्गावती हिचे कार्य आहे. 

मध्यप्रदेश हे राज्य स्त्री राज्यकर्त्यांनी आपल्या पराक्रमाने गाजवले नव्हे तर आजही त्यांच्या पराक्रमाचा ठेवा नित्यनूतन आणि वर्धिष्णू आहे. अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि राणी दुर्गावती. या सर्व स्त्री शक्तीच्या पराक्रमाने,नेतृत्व व युद्ध कौशल्याने मुघल शासकांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. 

राणी दुर्गावती हिचा जन्म राजपूत चंदेल राजा किरत राय यांच्या कुटुंबात झाला. राणी दुर्गावतीचे वडील हे सुध्दा शूरवीर योद्धे होते ज्यांनी महमूद गजनी ह्या क्रूर लुटकर्त्याचा पराभव केला होता त्यामुळे स्वाभाविकच राज्यशासन आणि युध्द कौशल्य राणी दुर्गावती यांना लहानपणापासून घरातूनच मिळाले होते. तलवारबाजी,घोडेस्वारी,नेमबाजी यातही राणी निपुण होती. ५ ऑक्टोबर १५२४ साली दुर्गाष्टमी या तिथीला जन्म झाल्यामुळे "दुर्गावती" असे तिचे नामकरण करण्यात आले. 

कालांतराने राणी दुर्गावतीचा विवाह गोंड वंशातील राजा दलपत शाह यांच्याबरोबर झाला. राजा दलपत शाह यांच्याकडे गोंडवाना राज्याची जबाबदारी त्यांचे वडील राणा संग्राम सिंह यांनी दिली होती, परंतु विवाहाच्या नेमक्या आठ वर्षानंतर राजा दलपत शाह यांचा मृत्यू झाल्याने राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी राणीच्या पदरी एक मुलगा होता. राज्याची जबाबदारी राणीला खुणावत होती आणि त्यामुळे सगळे राज्य सुस्थितीत आणण्यासाठी राणी दुर्गावतीने जबाबदारी स्वीकारली आणि शेवटच्या श्वासापर्यंत राज्याचा सांभाळ केला.

मुघल शेर शाह सुरी ह्या शक्तिशाली शासकाचे राजा दलपत शहाच्या काळात निधन झाल्यानंतर त्याचे राज्य माळवा या प्रदेशावर सुजात खान याने आपले वर्चस्व प्रस्थापित करून तो जिंकून घेतला. त्यावेळी गोंडवाना राज्यावर राणी दुर्गावती ही एक महिला राज्यकर्ती आहे याची सुजात खान याला माहिती होती व त्याने दुर्गावतीला सामान्य स्त्री समजून गोंडवाना वर आक्रमण करण्याची योजना आखली पण पुढे त्यात त्याचा दारूण पराभव झाला. या ऐतिहासिक विजयामुळे राणीने नावलौकिक मिळवला. 

अकबराच्या दरबारात राणी दुर्गावतीच्या शौर्य व साहसा सोबतच  तिच्या रूप सौंदर्याची वार्ता पसरली. आजही राणीच्या स्मृतीस्थळाला भेट दिल्यावर तिचा पूर्णाकृती पुतळा बघतांना राणीचे सौंदर्य आपण अनुभवू शकतो. गोंडवाना हा आर्थिकदृष्ट्या समृध्द प्रांत असल्याची माहितीसुध्दा मुघल शासनाला होती, अकबराने आपला सेनापती आसिफ खां याला गोंडवाना प्रदेशावर आक्रमण करण्यास नियुक्त केले व सोबतच राणी दुर्गावतीला जिवंत मुघल दरबारात हजर करण्याचा आदेश दिला. वासनांध अकबराची दृष्टी गोंडवानाच्या संपन्नेतेसोबतच राणी दुर्गावतीच्या रूपावर सुध्दा होती. पुढे आसिफ खां याने गोंडवाना प्रदेशावर सलग तीनदा आक्रमण केले तरी सुध्दा कमी सैन्यबळाच्या जोरावर राणी दुर्गावतीने त्याचे आक्रमण परतवून लावले आणि त्याचा पराभव केला.

झालेल्या घटनने आसिफ खां पेटून उठला आणि त्याने पुन्हा गोंडवाना प्रांतावर आक्रमण केले. राणी दुर्गावातीने शर्थीने लढा दिला परंतु राणी अत्यंत गंभीर जखमी झाली. तिच्या सैन्याने युध्द भूमीतून सुरक्षित जागी जावून थांबण्याचा तिला सल्ला दिला परंतु राणीने कुणाचेही न ऐकता लढा चालूच ठेवला. राणीच्या एका डोळ्याला शत्रूचा बाण सुध्दा लागला होता परंतु अखेरच्या श्वासापर्यंत ती लढत राहिली शेवटी शत्रूच्या हातून मरण्याऐवजी राणीने स्वतः ला शस्त्राघात करवून मरण स्वीकारले.

स्वाभिमानी, शूर आणि साहसी राणी दुर्गावतीला वीरमरण आले. ज्या जागी ही वीरांगना वीरमरणास प्राप्त झाली होती तेच हे स्थान आहे. आज तिथे राणीच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मारक बांधण्यात आलेले आहे आणि तिच्या स्मृती निरंतर अनेकांना प्रेरणा देणारी आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात असतांना असेच नवनवे ऐतिहासिक स्थळाना भेट देण्याची इच्छा आहे. जमेल तसे ते बघण्याचा आणि त्याबद्दल लिहिण्याचा मानस आहे. तूर्तास इतकेच..

✍️ सर्वेश फडणवीस 

माहिती स्त्रोत - आलेख इंटेक,जबलपूर आणि गुगल

Wednesday, September 8, 2021

आतुरता तुझ्या आगमनाची !!


पोळा झाला की प्रतिपदेपासून गणपतीच्या आगमनाचे वेध लागतात. सणासुदीला उत्साहाचे वातावरण असतांना सगळीकडे गणपती आणि गौरीची लगबग बघायला मिळते आहे. यंदाही कोरोनाचे सावट असल्याने आपल्याला जिथे आणि जसे आहोत त्या परिस्थितीत सण साजरा करायचा आहे. पण त्याही परिस्थितीशी जुळवत आपण आपला उत्साह ढासळू दिलेला नाहीच. गणपतीचे आणि आपले नाते मुळातच वेगळं आहे. बुद्धीची देवता अर्थात गणपती आणि ह्या गणपतीची गणेश चतुर्थीपासून आपण सर्वजण भक्तिभावाने पूजा-अर्चा करणार आहोत. श्रावणापासून त्याच्या येण्याची चाहूल लागतेच घराची थोडी स्वच्छता,पितळेची आणि चांदीची भांडी स्वच्छ करण्यात वेगळाच उत्साह दरवर्षी बघायला मिळतो. 

इतक्या वर्षात त्याचं आणि आपलं नातं खूप छान जमलंय. त्याची आणि आपली भेट दर वर्षातून एकदा होते. या भेटीत उर्वरित वर्षासाठी तो आपल्याला खूप काही देऊन जातो.घरी येण्याआधी आणि आल्या नंतरची लगबग याने तर सगळं घर आनंदून जातं. प्रत्येकाचा उत्साह हा शब्दातीत असतो सगळेजण आपली आपली कामे चोख पार पाडत असतात. त्याच्या येण्याने उत्साहाने वातावरण खरंतर भारावून गेलेले असते. 

देवघरातील त्याच्या मुकुटावर लावलेल्या बल्ब च्या प्रकाशात झगझगीत दिसणारा त्याचा उन्नत माथा आणि कोपऱ्यात उभा असलेला मी. कित्येक तास शांततेत आमचा संवाद चालू असतो.. सोंडेतूनही तो इतकं प्रसन्न कसं काय हसतो, हे मला अजूनही कळलं नाहीये. त्याच्या मूर्तीचे विलक्षण तेज हे चतुर्थी पासून चतुर्दशीपर्यन्त कलेकलेने वाढत जाते आणि सहज नकळत त्याला रोज बघणे हे आनंद आणि उत्साह देणारे ठरते. 

गेली कित्येक वर्ष आम्ही एकाच प्रकारची, एकाच रंगसंगतीची मूर्ती आणतो. इतक्या वर्षातलं माझं-त्याचं प्रेम त्या मूर्तीत शतपटीने दुणावलेल्याचा अनुभव त्याला पाहिल्यावर येतो. खरं सांगायचं तर गणपती ही काही चॉइस करण्याची गोष्ट असू शकत नाही पण तरीही..त्याला घरी आणतांना आपण नाकेडोळे रंगसंगती हे सहज बघतोच. 

लहान असताना त्याला अलगद आणता यावं म्हणून रिक्षा किंवा मग ऑटोमधून आणत असतं..मग कालांतराने दुचाकीवर आणतांना ही उत्साहाला उधाण येत असे. आता मात्र त्याच्याच कृपेने चारचाकी मध्ये एका पाटावर गुळगुळीत रस्त्यावरून प्रवास करताना तो मोठ्या विश्वासाने जो सोबत येईल त्याच्या मांडीवर ऐटीत विसावतो. त्याला ती व्यक्ती मुद्दाम स्वतःच्या हृदयाशी घट्ट आवळून ठेवते. मग गाडीतून उतरल्यावर आईकडून तुकडा पाण्याची ओवाळणी स्विकारून तो घरी एका ठिकाणी स्थानापन्न होतो.

रोज त्याच्या पूजेला सकाळी उठून पांढरी स्वस्तिकाची फुलं, जास्वंद, सोनचाफा,कन्हेर आणि त्यांचा गुंफलेला सुरेख हार, त्याच्या अंगठीत किंवा मुकुटावर अडकवायला त्याच्या विशेष आवडीचं एखादं छानसं जास्वंदीचं फुल, दुर्वांची जुडी, शमीपत्र आणि त्याच्या पुढ्यातील केळीचा घड, सफरचंद, डाळिंब, मोसंबी,कणस आणि बाजूला आसमंत सुगंधाने दरवळून टाकणारी धुपकांडी, चंदन, मोगरा, गुलाब, केवडा नाना प्रकारच्या उदबत्त्या आणि त्याच्या उजव्या बाजूला शांतपणे तेवणारी समई,आणि दुसऱ्या बाजुला तुपाचा दिवा पुढ्यात आरतीचे तबक त्यात फुले,निरंजन हे सगळे सोपस्कार त्याला प्रचंड आवडतात. 

चांदीच्या वाटीत ठेवलेला पेढा आणि खास त्याच्यासाठी बनवलेला मोदक म्हणजे पहिल्या दिवशीचा प्रसाद. खिरापतीचा, पंचखाद्याचा,शिऱ्याचा स्वादिष्ट प्रसाद तर कधी खीर,आणि श्रीखंड तर कधी बासुंदी आणि रसगुल्ले पुढे शंखाचा नाद ध्वनी ,झिनझिनणारे टाळ आणि सकाळ-संध्याकाळ होणारी त्याची आरती याने वातावरणात वेगळीच प्रसन्नता जाणवते. 

मनाला शांती, सुख देणारा विघ्नहर्ता गणपती, अर्थात आपला बाप्पा. जन्मोजन्मी तुझा सहवास असाच लाभू दे. तुझ्या सेवेत आम्हाला रममाण होऊ दे..माझं तुझ्याकडे काहीच मागणं नाही...  आजवर जसा माझ्याशी गुजगोष्टी करत राहिलास.. तसाच यापुढेही करत रहा. 

खरंतर यंदाही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि सरकारचे सगळे नियम पाळून हा सण आपण साजरा करणार आहोत. गणेशोत्सवामध्ये सर्व लोकांनी सोशल डिस्टनसिंग आणि नियमांचे पालन करायचे आहे. थोडक्यात यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना उत्सवाच्या धामधुमीत कोरोना पासून बचाव करण्यासाठी सामाजिक जबाबदारीचे भान सर्व गणेश भक्तानी ठेवणे आवश्यक आहे. 

हे आनंदी दहा दिवस आपल्याला त्याच्या प्रेमाचं सुख घेता यावं इतकंच तुझ्याकडे मागणं आहे आणि हे आलेलं कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे आणि ते दूर करणारा आहेस कारण तू विघ्नहर्ता आहेस. ह्या जगावर आलेले हे विघ्न दूर कर आणि पुन्हा सगळं आनंदी वातावरण कर,मनाची मरगळ दूर करत प्रसन्नतेची पहाट अखिल विश्वावर होऊ दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे बाप्पा..

वाट पाहतोय तुझी...

✍️सर्वेश फडणवीस

#गणपती #गणेशोत्सव