५ डिसेंबर. योगी श्रीअरविंदांचा महानिर्वाण दिन.आजच्या दिवसाचे औचित्य साधत श्री अरविंदांचे जीवन व त्यांचे कार्य यांचा थोडक्यात आढावा घेणे उचित ठरेल .
डॉ.कृष्णधन घोष आणि स्वर्णलता देवी यांच्या पोटी जन्माला आलेले तिसरे अपत्य म्हणजे योगी श्रीअरविंद . त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी पहाटे ४ वाजून ५२ मिनिटे या ब्राह्म मुहूर्तावर कलकत्ता येथे झाला . त्यांना तीन भाऊ- विनयभूषण,मनमोहन,व बारींद्र आणि एक बहीण - सरोजिनी असे हे सारे कुटुंब होते .
श्रीअरविंदांना वयाच्या ५ व्या वर्षी दार्जिलिंग येथील लॉरेटो कॉन्व्हेंट स्कूल मध्ये दाखल करण्यात आले. वयाच्या ७ व्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला रवाना झाले. श्रीअरविंद कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले असे होते .
१४ वर्ष इंग्लंड मध्ये वास्तव्य करून ६ फेब्रुवारी १८९२ रोजी श्रीअरविंदांनी भारतीय भूमीवर,मुंबईच्या अपोलो बंदरावर पाऊल टाकताक्षणी एका प्रगाढ शांतीने त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला.हा अनुभव त्यांच्या जीवन कार्याला कलाटणी देणारा ठरला. श्रीअरविंदांचे तत्वज्ञान समन्वयवादी आहे . ते जगाला मिथ्या , असार मानत नाहीत त्यामुळे त्यातील भौतिकता,विज्ञानाची प्रगती ते नाकारत नाहीत. मुक्तीची अवस्था प्राप्त केल्यानंतर मग योगी दिव्य कर्म करीत राहून प्रकृतीला साहाय्य करू शकतो असे ते म्हणतात . या साठी त्यांनी जो मार्ग सांगितला त्याला "पूर्णयोग"असे नाव आहे. ज्ञान,कर्म, भक्ती यांचा समन्वय त्यात अभिप्रेत आहे . ईश्वराला संपूर्ण समर्पित होणे आणि आपण स्वतः त्या ईश्वराचे परिपूर्ण माध्यम होणे यावर त्यांचा भर आहे .
श्रीअरविंदांचे "सावित्री "हे महाकाव्य अजरामर आणि वाचनीय असे आहे . लोकशाही, स्वातंत्र्य आणि अध्यात्माचा विकास यांचे रक्षण करण्यासाठी श्रीअरविंदांनी इंग्लंड,अमेरिका,फ़्रान्स या दोस्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना यौगिक सक्रिय पाठिंबा दिला .
५ डिसेंबर १९५० रोजी श्रीअरविंदानी आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला . मृत्यूचे कोणतेही चिन्ह नसलेला त्यांचा पार्थिव देह पाच दिवस जसाच्या तसा चैतन्यपूर्ण राहिला होता . अखेर ९ डिसेंबर १९५० रोजी आश्रमातील सेवा वृक्षाखाली या महायोग्याला चिरसमाधी देण्यात आली .
सर्वेश फडणवीस
#shriarbindo #योगी_श्रीअरविंद
No comments:
Post a Comment