श्रीराम प्रभूंचे चरित्र हा समस्त भारतीयांच्या विचारविश्वाचा,
भावविश्वाचा केंद्रबिंदू. आबालवृद्ध, सुशिक्षित-अशिक्षित, आस्तिक- नास्तिक, सश्रद्ध-अश्रद्ध-सर्वांच्याच मनात रामाला काही ना काही तरी स्थान आढळतेच. अगदी पाश्चात्य विचारधारेने ज्यांचे अंत:करणच पाश्चात्यीभूत झालेले असते त्यांनाही सश्रद्ध भारतीयांच्या अंत:करणात विराजमान झालेल्या रामप्रभूंच्या मूर्तीचे भंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यातच मोठा पुरुषार्थ वाटतो. मग स्वतःच्या बुद्धीची परिसीमा गाठणाऱ्या चिकित्सक बुद्धिमंतांना याच प्रभुचरित्राचा पुनश्च धांडोळा घेऊन त्याचे एक नवेच रूप लोकांसमोर मांडण्यात कृतकृत्यता वाटावी यात काय नवल ?
याच मालिकेतील एक अगदी अलीकडचा यशस्वी प्रयत्न म्हणजे
नागपूरच्या सुप्रसिद्ध संस्कृत विदुषी डॉ. लीना रस्तोगी यांचे 'मला उमजलेला राम' हा चिमुकला ग्रंथ. 'चिमुकला' असे म्हटले ते याच्या जेमतेम ७०पृष्ठव्याप्तीकडे पाहून. पण सूत्रं जशी 'अल्पाक्षर' पण 'सारगर्भ' असतात त्याप्रमाणे या लेखांमधून ही 'अनंता हरिकथा', तिचे अनंत पैलू आकळण्याचा अत्यंत प्रभावी प्रयत्न केला आहे.
पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा प्रभू श्रीराम आणि त्यांचे चरित्र आदिकवी वाल्मीकीने लिहिले आहे. ते 'रामायण' या नावाने प्रसिद्ध आहे. वाल्मीकीचा श्रीराम जसा थोर आहे, आदर्श आहे, तसा एक मानवही आहे. वाल्मीकीने त्याला ईश्वर बनविले नाही. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' म्हणजे 'मी स्वतःला दशरथाचा पुत्र राम समजतो', हे वचन वाल्मीकीने रामाच्या तोंडी घातलेले आहे. श्रीराम मानव असल्यामुळे त्याचे जीवन सामान्य मानवी भावभावनांनीही युक्त आहे. श्रीरामाला दुःख झालेले आहे. श्रीरामाला क्रोध आलेला आहे. सोन्याचा मृग पाहून त्याला मोहही झाला आहे आणि श्रीरामाने विनोदही केला आहे. पण या भावभावनांच्या आहारी मात्र ते गेले नाही. त्यांच्यावर मात केली म्हणून ते श्रेष्ठ आहे. म्हणून पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा श्रीराम आहे.
✍️ सर्वेश फडणवीस
#ramnavmi24 #Day1 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏
No comments:
Post a Comment