Tuesday, July 16, 2024

श्रीज्ञानेश्वरकन्या - प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज

ईशानस्य सुता, मुकुन्ददयिताज्ञानेशमुद्रांकिता
या माधुर्यरसान्विता, सुललिता, कात्यायनीकीर्तिता ।
ख्याता पच्चलताभिधानमहता श्रद्धावतां देवता
सा मच्चिन्तनवेद्यतामवतरेत् सश्रद्धमाराधिता ।।

आपला भारतदेश 'संतांची भूमि' म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा आरंभबिंदू म्हणजे ज्ञानेश्वर माऊली, आणि त्याच परंपरेला अधिक पुष्ट करणारा एक समर्थ दुवा म्हणजे श्रीगुलाबराव महाराज. भारताचा सांस्कृतिक इतिहास गौरवशाली आहे. हा गौरव मुख्यत्वे करून या भूमीतील संतांच्या शिकवणीतून प्राप्त झाला आहे. अनेक आघात सोसूनसुद्धा अजून आपली संस्कृती वर्धिष्णू आहे. धर्माला ग्लानी आली असता आणि दुष्टांचे वर्चस्व वाढले असता धर्म रक्षणासाठी व दुष्टांचे निर्दालनासाठी योगेश्वर श्रीकृष्ण ज्याप्रमाणे नवा जन्म घेतात त्याप्रमाणेच भारतीय संस्कृतीला परकीयांचे घाव बसू लागले की संस्कृती रक्षणासाठी आपल्या भूमीमध्ये संतांचे अवतार झालेले आहेत म्हणूनच भारतामध्ये संत हे भगवान स्वरूप मानले आहेत.

विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात चांदुरबाजार तालुक्यातलं 'माधान' हे एक छोटंसं गाव. मोहोड घराण्याकडे त्या गावाची पाटीलकी होती. घराणं राजस्थानचं. महाराजांचे पूर्वज तिथून प्रथम उत्तर प्रदेशात. नंतर हे मुळात मराठवाड्यात आणि शेवटी विदर्भात आले आणि माधानमध्ये स्थिरावले. या मोहोड घराण्यात 'राणोजीराव' हे एक कट्टर शिवभक्त होऊन गेले. शिवरात्रीचं त्यांचं व्रत एकवीस दिवसांचे असे - फक्त भस्म ग्रहण करूनच ते हा उपवास करीत असत. एके दिवशी प्रत्यक्ष महादेवानं त्यांना वृत्तांत दिला की तुझ्या कुळात एका थोर महात्म्याचा जन्म होईल. या राणोजीरावांना चार मुलं होती. रघुजी, बकारामजी, नरसोजी आणि गोंदूजी. त्यातले नरसोजी तर अल्पायुषीच ठरले. आणि रघुजी - बकारामजी यांना अपत्यलाभ झालाच नाही. कनिष्ठ पुत्र गोंदूजीचं भाग्य मात्र फळफळलं. त्यांच्या घरी या लोकोत्तर महात्म्यानं जन्म घेतला.

अमरावतीच्या दक्षिणेला लोणीटाकळी हे लहानसं खेडं आहे. तिथल्या अलोकाबाईशी गोंदूजींचा विवाह झाला होता. अलोका माहेरी गेली आणि आषाढ शु. दशमी अर्थात ६ जुलै १८८१ ला तिनं एका तेजस्वी गुटगुटीत बाळाला जन्म दिला. त्या दिवशी फक्त मोहोड कुटुंबालाच नाही तर अवघ्या 'आर्य धारणे'ला हर्ष झाला असेल की आता आमचा उद्धार करणारा, आमच्या वचनांची संगती लावणारा, अद्वैत - तत्त्वज्ञानाशी भक्ति धारेचा समन्वय साधणारा, आर्य अस्मिता जागवणारा कुणीतरी अवतरला.  

ज्या काळात स्वत:ला सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणविणारे ज्या मार्गाने, ज्या रूपाने, ज्या पद्धतीने आपला परिचय करून देत होते, त्या काळात कमालीच्या दारिद्र्याला अंगाखांद्यावर घेत, डोक्यावर ग्रंथलेखनाच्या कार्याची पेटी घेऊन रस्ते नसलेल्या गावागावांतून हे अंध महापुरुष आपल्या बरोबर वैदर्भीय काळ्याभोर चिकण मातीच्या सुगंधाचे वाटप जेथे जाईल तेथे करीत होते. विद्वान, पंडितांना मागे टाकील अशा आशयसंपन्न शैलीने सरस्वतीची पूजा बांधित होते आणि ज्ञानदेवीच्या वैभवाचा गोपालकाला मुक्त हस्ताने देत होते. त्या काल्याचा आस्वाद घेता घेता हेही कळत होते, माहीत होते की, अरे गुलाबराव महाराज हे गुलाबराव महाराज नाहीत. ते ग्रंथकार नाहीत. ते अंधही नाहीत तर आपल्या दोन देदीप्यमान लक्षणासह या विदर्भभूमीवर आलेली ही ज्ञानेश्वर कन्या आहे, गोपगोपिकांची सखी व व्रज मंडळातील रासक्रीडेतील, राधेसह अन्य गोपींसह श्रीकृष्णाच्या व्रज जीवनातील पंचलतिक गोपी आहे. खरंतर हा सर्व प्रकारच अलौकिक आहे आणि दिव्य आहे.
 
वृंदावनातील पंचलतिका गोपी व विदर्भातील कौंडण्यपूरची रुक्मिणी या दोघीही कृष्णाशी आपले हृद्य नाते सांगताना विदर्भभूमीची निवड करतात व रुक्मिणीप्रमाणेच ज्ञानेश्वर कन्या आपल्या वृंदावनातील गोपीच्या मधुर रसपूर्ण रूपाची आठवण करून देते. आज आषाढ शुद्ध दशमी श्रीज्ञानेश्वरकन्या प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांची जयंती. त्यांच्या सुकोमल चरणी साष्टांग दंडवत.

सर्वेश फडणवीस

Saturday, July 13, 2024

स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीतून भारत : शोध व बोध


'स्वामी विवेकानंदांच्या दृष्टीतून भारत : शोध व बोध' हे पुस्तक वाचनात आले. रामकृष्ण मठ नागपूर यांनी प्रकाशित केलेलं हे १०० पृष्ठाचे छोटेखानी पण पुस्तक महत्त्वपूर्ण विषयांवरील पुस्तक आहे. स्वामी विवेकानंद १८८८ पासून परिव्राजकाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. तत्पूर्वीच आपल्याला काही कार्य करायचे आहे याची सुस्पष्ट जाणीव जरी त्यांना झाली असली तरी त्या कार्याची नेमकी रूपरेषा काय असावी ह्याचा त्यांनाच नीटसा अंदाज आलेला नव्हता. 

स्वामीजी म्हणतात, “मला फार मोठं कार्य करायचं आहे, हे कार्य मी केलं पाहिजे, अशी माझ्या सद्गुरूंची मला आज्ञा आहे. काम लहान नाही. या आपल्या मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायचं आहे. तिचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे आणि सारा समाज भुकेला आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे, आणि आपल्या आध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे” असे स्वामीजींचे त्यावेळचे उद्गार आहेत. त्यामुळे देशाटन करून समाज, समाजाची विविध अंगे आणि श्रीरामकृष्णांच्या उपदेशाच्या आणि स्वतःच्या आध्यात्मिक अनुभूतींच्या प्रकाशात पाहण्याच्या उद्देशाने स्वामीजींनी भारत भ्रमणास सुरुवात केली आणि आसेतूहिमाचल त्यांनी भ्रमण केले. 

स्वामीजींचे भारत पाहणे ही एक अपूर्व आणि अद्भुत गोष्ट आहे. त्यांच्या जीवनातील हे पर्व आपल्यासाठी अतिशय उद्बोधक आहे. त्यांच्या देशभ्रमणात आलेले अनुभव आपल्याला थक्क करून सोडणारे आहे. स्वामीजींचे भारतभ्रमण हे काही केवळ परंपरागत तीर्थाटन नव्हते. सामान्य साधूंसारखी त्यांनी केवळ काशी - अयोध्या - वृंदावन अशी धार्मिक तीर्थक्षेत्रेच पाहिली नाहीत तर आग्रा-लखनौसारखी ऐतिहासिक स्थानेही आवर्जून पाहिली. गिरीकंदरांत ते जसे रमले तसेच गजबजलेल्या महानगरांतही त्यांनी निवास केला. सर्व बाजूंनी भारत बघणे हेच विवेकानंदांच्या भारतभ्रमणाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. या भ्रमणात स्वामीजींनी ठिकठिकाणचे धार्मिक आणि ऐतिहासिक स्थानमाहात्म्य तसेच राष्ट्रीय महत्त्व यथार्थपणे टिपलेले आहे. 

त्याकाळी मुस्लीम आणि ब्रिटीश राजवटीचा प्रभाव होता त्यामुळे विविध कला, शिक्षण, साहित्य, सामाजिक चालीरीती, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थापन त्यांनी गुणदोषांसहित प्रत्यक्ष पाहिला. विविध जनस्थानांचा, आपल्या देशाच्या राष्ट्रीय आदर्शांचा सर्वस्पर्शी वेध घेणे हे विवेकानंदांचे वेगळेपण आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या विवेकानंद सर्वच स्तरांतून वावरले. उच्चभ्रू, खानदानी संस्थानिकांच्या राजप्रासादांत ते जसे राहिले तसेच अठराविश्वे दारिद्र्याने गांजलेल्या झोपड्यांतही राहिले. कारण त्यांची ती सहज वृत्ती होती.

देशाचे धार्मिक-आध्यात्मिक पुनरुत्थान घडवून आणणे हाच त्यांच्या साऱ्या परिभ्रमणाचा मध्यवर्ती उद्देश होता. साधू संताशी संवाद करीत, धर्माची समाजधारणा करण्याची क्षमता व तिचे तत्कालीन रूप बघत, धर्माची स्थूल सूक्ष्म अंगे आणि बहिरंग - अंतरंग बाबी डोळसपणे न्याहाळीत स्वामीजींचे भारतभ्रमण झालेले आहे. या बाबतीत तसे ते अगदीच निराश झाले नाहीत तथापि धर्माचे जितके उज्ज्वल व आश्वासक रूप त्यांना समाजाच्या अंतःप्रवाहांमध्ये आढळले ते त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून मांडले आहे.

स्वामी विवेकानंदांनी मांडलेले शोधविचार अर्थात त्यांचा पहिला शोध विचार आहे जनसामान्यांकडे झालेले दुर्लक्ष कारण स्वामीजींच्या काळात म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात हा विचार महत्त्वाचा होता, दुसरा शोधविचार आहे धर्म हाच भारताचा कणा स्वामीजींच्या मते प्रत्येक राष्ट्राचे बलस्थान असते आणि भारतीय संस्कृतीचे बलस्थान धर्म हे आहे, मूलभूत धर्मतत्वांच्या उपाययोजनांचा प्रभाव हा पुढचा शोधविचार त्यात स्वामीजींनी वेदांताचे काही तत्व मांडले आहेत, त्यातील हिंदू धर्माचे ऐक्य आणि जगातील सर्व धर्मात सुसंवाद आणि विज्ञान आणि धर्म आणि समन्वय मुळातून वाचनीय आहे त्यानंतर स्वामीजींचा चौथा शोध विचार आहे पाश्चात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याचा कारण भारतीय संस्कृतीचे रक्षण व प्रसारासाठी देशाला भक्कम भौतिक पाया असण्याची गरज आहे याची स्वामीजींना पूर्ण जाणीव होती. त्यानंतर शिक्षणाचा शोधविचार स्वामीजी मांडताना त्यांनी भारतभर भ्रमण करत असतांना आजवर सर्वसामान्य लोकांकडे झालेले दुर्लक्ष आणि धर्म व विज्ञानाच्या तत्वांचा लोकांच्या दैनंदिन जीवनात वापर करणे हाच प्रभावी तोडगा त्यांनी शोधला होता, त्यानंतर अध्यात्माचे ज्ञान स्वामीजी मांडतात आणि हे सगळे शोधविचार वाचल्यावर वाचकाला स्वामीजींच्या जीवनकार्याचा सर्वांगीण वेध घेता येतो. कन्याकुमारीच्या वास्तव्यात भारताचे पुनरुज्जीवन व पाश्चात्य जगाला भारताने करायचे सांस्कृतिक योगदान या बाबतची आपली योजना निश्चित झाल्यानंतर भविष्यात करायच्या कार्याविषयीचे त्यांचे विचार स्पष्ट व निश्चित झाले. 

निष्कर्ष, तत्कालीन समस्या व त्यांवरील उपाययोजना यांवर स्वामी भजनानंदांनी एक प्रदीर्घ लेखमाला लिहिली होती. रामकृष्ण संघाच्या हिमालयातील मायावती स्थित 'अद्वैत आश्रमा' तून प्रकाशित होणाऱ्या 'प्रबुद्ध भारत' या इंग्रजी मुखपत्रात १९७६-७७ साली नऊ लेखांची ही मालिका Swami Vivekananda's Discoveries about India' या नावाने प्रकाशित करण्यात आलेली होती आणि त्याचा हा मराठी अनुवाद आहे. पू. भजनानंद महाराज सध्या रामकृष्ण संघाचे महाउपाध्यक्ष आहेत. स्वामी विवेकानंदांचे बृहच्चरित्र, व्याख्याने, संवाद-संभाषणे तसेच पत्रे यांचा अतिशय साकल्याने सखोल अभ्यास करून ही लेखमाला सिद्ध झालेली आहे

भारतीय समाजात स्वामीजींच्या चैतन्यशक्तीची सळसळ आजही कानी पडते आणि सखोल अंतर्दृष्टी असलेल्या महान व्यक्तीच्या नजरेतून ही बाब सुटत नाही. श्री योगी अरविंदांसारख्या महान तत्त्वज्ञानाने सुद्धा लिहून ठेवले आहे.

“विवेकानंदांचा आत्मा सिंहाप्रमाणे शक्तिशाली होता, किंबहुना ते सिंहपुरुष होते. परंतु त्यांनी जे कार्य केले, जो कार्याचा वारसा मागे ठेवला तो त्यांच्या सृजनशील शक्तीशी आणि प्रचंड ऊर्जेला साजेसा नाही. त्यांचा प्रभाव आजही फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तो कसा आणि कोठे कार्य करतो ते कळत नाही, तो कशात तरी सामावला आहे, जे अजून आकाराला आलेले नाही; मात्र तो अतिशय सामर्थ्यशाली आहे, भव्य आहे, मर्मज्ञ आहे, उंचीवर झेप घेणारा आहे - असा त्यांचा प्रभाव भारताच्या आत्म्यात सामावला आहे. आणि मग आपण नकळत उद्गारतो, 'बघा, विवेकानंदांचा आत्मा, त्याचा भाव अजूनही आपल्या मातृभूमीच्या आणि तिच्या बालकांच्या मनात वास करीत आहे. सर्वच महान व्यक्तींबाबत असेच घडते. महनीय व्यक्तींच्या कार्यापेक्षा त्यांचे व्यक्तिमत्त्व किती तरी अधिक मोठे तर असतेच, शिवाय त्यांचा व्यक्तिगत प्रभाव इतका व्यापक व निराकार असतो की त्यांनी मागे ठेवलेल्या सुपरिचित, सर्वज्ञात कार्याच्या तुलनेत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची महत्ता कितीतरी अधिक प्रमाणात चिरस्थायी व चिरस्मरणीय असते.” स्वामीजींचे विचार आजही प्रासंगिक आहेत हेच सतत जाणवते. वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. 

सर्वेश फडणवीस