Monday, March 31, 2025

महर्षि वसिष्ठ

वसिष्ठ अर्थात् प्रकाशमान, सर्वांत उत्कृष्ट, सर्वांमध्ये श्रेष्ठ महर्षि वसिष्ठ हे ब्रह्मदेवाच्या दहा मानस पुत्रांपैकी एक आहेत. अध्यात्मात जेवढ्या काही पायर्‍या किंवा पदे आहेत, त्या सर्वांच्या शिखरावर गुरु वसिष्ठ विद्यमान आहेत. महर्षि वसिष्ठ हे ऋषींचे ऋषि आणि महर्षींचे महर्षि आहेत. ऋषि परंपरेचे सर्वाेच्च पद असलेल्या ‘ब्रह्मर्षि’ रूपात ते प्रतिष्ठित आहेत. वसिष्ठ महर्षि, महातेजस्वी, त्रिकालदर्शी, पूर्णज्ञानी, महातपस्वी आणि योगी आहेत. ब्रह्मशक्तीचे मूर्तीमंत स्वरूप आहेत. मंत्र, तसेच यज्ञ विद्या यांचे जाणकार आहेत. ऋग्वेदाच्या सातव्या मंडलाचे अधिष्ठाता वसिष्ठ आहेत. 

ब्रह्मदेवांनी वसिष्ठांना उत्पन्न केल्यानंतर त्यांना मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वीलोकात जाऊन सृष्टीचा विस्तार करणे, तसेच सूर्यवंशाचे पौरोहित्य कर्म करणे याची आज्ञा दिली. त्या वेळी ब्रह्मदेवाने वसिष्ठांना सांगितले होते, ‘‘याच सूर्यवंशात पुढे जाऊन श्रीविष्णूचा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम अवतार होणार आहे. हे पौरोहित्य कर्मच तुमच्या मुक्तीचा मार्ग होणार आहे.’’ वैवस्वताचा पुत्र इक्ष्वाकूच्या हाती मनूने सर्वांत प्रथम या पृथ्वीचे समृद्धशाली राज्य सोपवले होते. इक्ष्वाकू अयोध्येचा पहिला राजा आहे. इक्ष्वाकूने वसिष्ठांच्या उपदेशाने आपले वेगळे राज्य बनवले आणि अयोध्यापुरीला त्या राज्याची राजधानी केली. महर्षि वसिष्ठ हे इक्ष्वाकु वंशाच्या या सर्व राजांचे कुलपुरोहित होते.

राजा दशरथाच्या महालात भगवंताचे प्रागट्य झाले. त्यानंतर भगवंताच्या या दिव्य मनोहर रूपाचे नामकरण करायचे होते. अखिल जगाचा पालक जेव्हा पृथ्वीतलावर अवतरला, तेव्हा त्याची कीर्ती कोणत्या नावाने करायची ? ते नावही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. श्रीविष्णूच्या दिव्य अवताराच्या नामकरण संस्काराच्या वेळी भगवंताच्या या बालरूपाचे नामकरण करणारे महर्षि वसिष्ठच होते. पुत्रांच्या नामकरण संस्काराच्या वेळी महर्षि वसिष्ठ म्हणतात, ‘‘कौसल्यानंदनाचे नाव केवळ दोन अक्षरांचे आहे; परंतु त्या नावातच एवढे सामर्थ्य आहे की, अनंत ब्रह्मांडे त्यात सामावून जातील. अखिल विश्वाला आनंद देणार्‍या या सुखधामाचे नाव आहे ‘राम’ ’’ आणि महर्षीनी हे दिव्य रामनाम मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम याना प्रदान केले.

भगवान श्रीरामचंद्रांचे आणि त्यांच्या भावंडांचे उपनयन झाले. त्यांना वेदांचे अध्ययन करण्याकरता आणि राजपुत्रास योग्य ते इतरही शिक्षण मिळावे म्हणून वसिष्ठांच्या आश्रमात पाठविण्यात आले. राजपुत्रांनी वेदाध्ययन केलं. धनुर्वेद, आयुर्वेद, वास्तुनिर्मिति यांचंही शिक्षण घेतले. शिल्पकला, सारथ्य, पशु-परीक्षा, राज्यशास्त्र, व्यवस्थापन, न्याय इत्यादि ज्ञानशाखांचेही अध्ययन झाले आणि त्यानंतर त्यांना सांगण्यात आलं, 'तुम्ही तीर्थयात्राकरावी !' तीर्थाटनाचा हेतु आपला देश पाहावा, समाज जीवन जवळून पाहाव लोकसंस्कृतीचं निरीक्षण करावं, सहज जाता जाता काही पंडितांशी गप्पा व्हाव्यात, वेगवेगळ्या हवापाण्याची, अन्नाची शरीराला सवय व्हावी आणि ते कणखर बनावे, हा असतो. 

श्रीराम केवळ पंधरा वर्षांचेच होते. सारे राजपुत्र देशाटन करीत हिंडले. रामाचे मन उदासीन झाले तीर्थाटनावरून श्रीराम परत आले; पण त्यानंतर कमालीचे उदासीन झाले. तीर्थाटनात जी दृश्यं पाहिली, जे समाज-दर्शन घडलं वा जाता-येता ज्या सहज चर्चा झाल्या त्या सर्वांचा एकंदरीत परिणाम असा झाला. त्यांचं मन उदास बनले. कुठल्याच कार्यात त्यांना उत्साह राहिला नाही. कुणाशी मनमोकळेपणी बोलेनात. आपल्याच चिंतनात मग्न असत. कुठंतरी आकाशात टक लावून बसत. भोजन घेत. पेय पीत. पण 'हे छान झालं !' 'हे आवडलं !' 'हे नको !' अस काही नाही. समोर आलं जेवून घेतले. कुणा सेवकाला कसलीही आज्ञा नसत. हवंच असेल तर स्वत: उठून घेत. मुखावरचं हास्य मावळलं. कुणाशी फारसं बोलणं नाही. हास्यविनोद नाही. श्रीरामांच्या जवळ दोघे बंधू असत. लक्ष्मण आणि शत्रुघ्न. भरत तर आजोळी गेला होता. पण या दोघा बंधूंनाही श्रीरामाची ही उदासीनता जाणवत होती. त्यांनी विचारलं तर ठरलेलं उत्तर मिळे - 'तसं' काही नाही हे ' 'उगीच!' - 'नाही मन कशात रमत. इतकंच' श्रीरामाच्या बंधूंनी, सेवकांनी दशरथाच्या कानावर ही गोष्ट घातली. तिन्ही मातांनाही सांगितलं. त्यांनी चौकशी केली. खोदून खोदून चौकशी केली. 'श्रीराम, अरे, झालंय काय ? का असा उदासीन ?' त्यांनतरची पुढची कथा सर्वश्रुत आहे. काही काळाने श्रीरामाला वासिष्ठांनी बोलावले. ज्ञानाची खरी जिज्ञासा जागृत झाली आणि रामाच्या निमित्ताने महर्षींनी योगवासिष्ठाच्या बत्तीस सहस्त्र श्लोकातून सर्वांना जीवनाचे रहस्य उलगडुन सांगितले. 

राजा दशरथाच्या मृत्यूनंतर आणि श्रीराम वनवासात गेल्यावर भरतासह संपूर्ण प्रजेला आधार देणारे एकमात्र महर्षि वसिष्ठ होते महर्षि वसिष्ठांनी इतिहासातील अनेक प्रसंग सर्वांना सांगितले. त्या अपार ज्ञानाच्या तेजाने सर्वांचा शोक नाहीसा केला. सर्वांना धीर दिला. राजदरबारात भरताला धर्ममय उपदेश केला, ‘‘भरता, जीवनात लाभ-हानी, जीवन-मरण आणि यश-अपयश या गोष्टी केवळ विधात्याच्याच हाती असतात. त्यामुळे या गोष्टींसाठी कुणालाही दोष देणे व्यर्थ असते.’’ या निमित्ताने महर्षि वसिष्ठांनी अखिल मानवजातीलाच जीवनाचे शाश्वत सूत्र दिले आहे. भरताच्या काळातही १४ वर्षे जनतेने रामराज्यच अनुभवले. त्यामागे महर्षि वसिष्ठांचे मोठे योगदान आहे. महर्षि वसिष्ठ म्हणजे रामराज्याचा प्रमुख आधार स्तंभच होते. साक्षात् श्रीरामांचे गुरु आणि रघुवंशाचे कुलगुरु, राजगुरु बनून पिढ्यान्‌पिढ्या दिशादर्शन करणारे वसिष्ठ हे ऋषिश्रेष्ठ आहेत.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi25 #Day3 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

Sunday, March 30, 2025

ब्रह्मर्षी विश्वामित्र


भारतीय मनाला काही गोष्टींचे अत्यंत आकर्षण आहे त्यातीलच एक गोष्ट म्हणजे आपल्याला एक दिवस रामराज्यात जगायला मिळावे. महर्षी वाल्मीकी यांना सुद्धा ज्यांच्याबद्दल लिहावेसे वाटले असे प्रभू श्रीराम. याच वाल्मिकी रामायणातील काही व्यक्तीचित्रे या निमित्ताने जाणून घेऊया. त्यातील पहिले व्यक्तिचित्र म्हणजे एका सम्राटापासून ब्रम्हर्षी पदापर्यंतचा प्रवास श्रेष्ठ ऋषीवर विश्वामित्र. प्रचंड जिद्द, महत्त्वाकांक्षा, एकाग्रता, तपःसिद्धी यांचे मूर्तिमंत रूप म्हणजे ब्रम्हर्षी विश्वामित्र. एका धर्मपरायण, धर्मज्ञ, विद्वान, प्रजाहितदक्ष नृपांचे ब्राह्मतेज धारण करणाऱ्या ब्रह्मर्षित रूपांतरण म्हणजे विश्वामित्र. सगळी सुखं, ऐश्वर्य, धन, गजांतलक्ष्मी, स्वामित्व या सगळ्यांचा त्याग करून रानावनात तपसाधनेत विलीन होणं म्हणजे विश्वामित्र. 

वाल्मीकी रामायणात विश्वामित्रांचा परिचय बालकांडात होतो. महाराज दशरथाकडून आपल्या यज्ञ रक्षणाकरिता विश्वामित्र रामाची अपेक्षा करतात. खरं तर कोवळा, सुकुमार राजकुमार रामाची विश्वामित्रांसारख्या सर्व अस्त्रांचे ज्ञाते असलेल्या ब्रह्मर्षीने कामना करावी हे जरासे वेगळे आहे. ते स्वतःच स्वतःच्या यज्ञाचे रक्षण करू शकले असते पण त्या दूरदर्शी, गुणग्राही, रत्नपारखी ऋषींनी श्रीरामातील क्षात्रतेज ओळखले होते. त्या क्षात्रतेजाला झळाळी आणण्याचं महत्कर्म विश्वामित्रांनी केलं. प्रासादिक राजमहालातील वातावरणातून प्रभू श्रीरामांना बाहेर काढून त्यांच्याकडून जणू प्रात्यक्षिकच करवले.

विश्वामित्रांनी स्वत:ची आणि आपल्या कुळाची ओळख करून दिली, शतानंद आपल्या आईला आणि वडिलांना भेटून आलेल्या प्रभू रामचंद्रांना त्यांच्याबरोबर आलेल्या ऋषिसंघाच्या समोर
विश्वामित्रांची ओळख करून देताहेत. वाल्मिकी रामायणात ते पंधरा सर्ग आहेत. केवळ एका व्यक्तीच्या ओळखीसाठी रामायणात सगळ्यात जास्त सर्ग वापरलेले असतील, तर ते विश्वामित्रांच्या ओळखीचे आहेत. हे विश्वामित्र जे आपल्याबरोबर आज ऋषिरूपात उभे आहेत ते मुळात फार मोठे राजा होते. पृथ्वीचे पालन करणारा राजा म्हणून त्यांची कारकीर्द आहे. कुश कुटुंबात त्यांचा मोठा दबदबा होता. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आपली संस्कृती सगळीकडे पाळली जाते की नाही, हे पाहण्यासाठी ही राजे मंडळी राजधानीत बसून कारभार करीत असत शिवाय सगळीकडे हिंडत असत. भारतीय मनाला काही गोष्टींचे अत्यंत आकर्षण आहे त्यातीलच राजा प्रजापतींचा पुत्र नरेश कुश , कुश नरेशचा पुत्र धर्मपरायण राजा कुशनाभ. कुश नाभाचा पुत्र गाधि आणि गाधि नरेशाचा महातेजस्वी महामुनी विश्वामित्र पुत्र आहेत. ब्राह्मण आणि क्षत्रिय राजे ह्यांच्यातील सहकार्याचे हे द्योतक आहे. रामायणातील निर्देशानुसार विश्वामित्रांनी कौशिकी नदीच्या काठी आपले कायम निवासस्थान केले होते.

एकदा विश्वामित्र जप करणाऱ्यांत श्रेष्ठ अशा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेले. तिथे वसिष्ठ ऋषींनी त्यांचे अगत्य केले. आदर सत्कार केला. विश्वामित्र राजा प्रसन्न झाले. पण वसिष्ठांना विश्वामित्रांचे अधिक आदरातिथ्य झाले पाहिजे असे वाटले. विश्वामित्रांनी 'आम्ही तृप्त झालो आहोत ' असे म्हणूनही वसिष्ठांनी त्यांच्याकरिता आणखी आदरातिथ्याचे आयोजन केले. वनात राहणारे, कंदमुळे खाणारे वसिष्ठ आणि आपल्या सोबतच्या सैन्याचे आदरातिथ्य कसे करणार याबद्दल विश्वामित्रांना कुतूहल वाटत होते. तेव्हा वसिष्ठांनी त्यांच्या आश्रमातल्या शबला नामक कामधेनूला सगळ्यांना तृप्त करण्याचा आदेश दिला शबलेनेही हजारोच्या सैन्याला आणि राजा विश्वामित्राला वेगवेगळ्या व्यंजनांनी तृप्त केले. पण हि तृप्तीच महर्षी वसिष्ठ आणि शबलेकरिता घातक ठरली. पृथ्वीचा अधिपती असलेल्या विश्वामित्रांनी वशिष्ठांकडे शबलेची मागणी केली. बदल्यात लाखो गाई मिळत असूनही वसिष्ठांनी शबलेला देण्यास नकार दिला आणि वसिष्ठांचा आदेश मिळताच शबलेने सैन्य निर्माण करून विश्वामित्रांच्या सैन्याला निकामी केले. हा पराभव विश्वामित्रांना जिव्हारी लागला. मानी विश्वामित्र राजा दुखावला गेला आणि स्वतःच्या एका पुत्राला राजसिंहासनावर बसवून तो वनात तपश्चर्ये करिता निघून गेला. वशिष्ठांना हरवणे या उद्देशाने ही तपश्चर्या होती. तेव्हा ब्रम्हर्षी वसिष्ठांनी विश्वामित्रांना 'ब्रम्हर्षी' अशी हाक दिली आणि विश्वामित्र ब्रम्हर्षी झाले. त्यानंतरची कथा सर्वश्रुत आहे. 

आपला सगळाच भारतीय इतिहास, भारतीय वाङ्मय हे मानवाचे पतन; पण त्या पतनातून नंतर होणारे उत्थान आणि उन्नती
यांनी भरलेले आहे. सतत उन्नतीकडे, त्या वर जाण्याच्या दिशेकडे बोट दाखवणारे आणि ती प्रेरणा देणारे भारतीय वाङ्मय आहे. तेच विश्वामित्रांच्या कथेमध्ये १५ सर्गांमध्ये वाल्मीकींनी तपशिलात आपल्यासमोर ठेवलेले आहे. राम, लक्ष्मण, स्वतः विश्वामित्र, जनक, जनकाबरोबरची इतर सगळी मंडळी बसलेली असताना
त्यांना शतानंद ती कथा सांगतात. ही मंडळी जनकाने उभारलेल्या यज्ञवाटिकेमध्ये बसली होती. त्यामुळे जनकाने नंतर पुढे होऊन म्हटले, 'पावितोऽहं त्वया ब्रह्मन् दर्शनेन महामुने।' “विश्वामित्रांची सगळी कथा ऐकल्यानंतर आम्ही पवित्र झालो," असे म्हणून जनकानेही त्यांना मान दिला. संध्याकाळ झाली, सूर्य कलला; परंतु अजूनही 'तृप्तिराश्चर्यभूतानां कथानां नास्ति।' ही कथा पुन्हापुन्हा ऐकावी वाटते, मनाचे समाधान होत नाही असा आनंद
त्यांनी व्यक्त केला. आपण विश्रांतीला आपल्या आश्रमातल्या वाटिकेत जा. मीही आपल्या प्रासादात परत जातो. उद्या आपण पुन्हा भेटू असे सांगून सगळ्यांनी निरोप घेतला. 

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi25 #Day2 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏



Saturday, March 29, 2025

रामायणातील विविध व्यक्तिरेखा

आजपासून रामनवमी पर्यंत रोज एक नवा विचार ह्या माध्यमातून पोस्ट करणार आहे. सकारात्मक विचार ही आजची गरज आहे. या माध्यमातून दरवर्षी लेखन करत असतांना कायमस्वरूपी आत्मिक समाधान मिळत असते, गेली ५ वर्षे झाली दरवर्षी काहीतरी लेखन होत असताना यावर्षी कुठल्या विषयावर स्पर्श करायचा असा प्रश्न होता काहींनी विचारणा केली की यावेळी काय लिहितोय मग डॉ. लीना रस्तोगी यांना भेटल्यावर त्यांनी लगेच उत्तर दिले, ‘सर्वेश माझ्या मनात हा विषय आहे पण तू लिहायला घे आणि तो विषय आहे “रामायणातील विविध व्यक्तिरेखा”. 

५०० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर गेल्या वर्षी श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामजन्मोत्सव अत्यंत भव्यदिव्य होत असतांना त्यांचेच विचार आणि प्रभू श्रीरामाला घडविलेल्या विविध व्यक्तिरेखा यानिमित्ताने नऊ दिवस मांडतोय. स्वामी गोविंददेवगिरी एके ठिकाणी छान लिहितात, “श्रीराम प्रभूंचे चरित्र हा समस्त भारतीयांच्या विचारविश्वाचा, भावविश्वाचा केंद्रबिंदू. आबालवृद्ध, सुशिक्षित - अशिक्षित, आस्तिक- नास्तिक, सश्रद्ध - अश्रद्ध आणि सर्वांच्याच मनात रामाला काही ना काही तरी स्थान आढळतेच. अगदी पाश्चात्य विचारधारेने ज्यांचे अंत:करणच पाश्चात्यीभूत झालेले असते त्यांनाही सश्रद्ध भारतीयांच्या अंत:करणात विराजमान झालेल्या रामप्रभूंच्या मूर्तीचे भंजन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यातच मोठा पुरुषार्थ वाटतो. मग स्वतःच्या बुद्धीची परिसीमा गाठणाऱ्या चिकित्सक बुद्धिमंतांना याच प्रभुचरित्राचा पुनश्च धांडोळा घेऊन त्याचे एक नवेच रूप लोकांसमोर मांडण्यात कृतकृत्यता वाटावी यात काय नवल ?” आणि हेच सूत्र आहे. 

पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा प्रभू श्रीराम आणि त्यांचे चरित्र आदिकवी वाल्मीकीने लिहिले आहे ते 'रामायण' या नावाने प्रसिद्ध आहे. वाल्मीकीचा श्रीराम जसा थोर आहे, आदर्श आहे, तसा एक मानवही आहे. वाल्मीकीने त्याला ईश्वर बनविले नाही. 'आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्' म्हणजे 'मी स्वतःला दशरथाचा पुत्र राम समजतो', हे वचन वाल्मीकीने रामाच्या तोंडी घातलेले आहे. श्रीराम मानव असल्यामुळे त्याचे जीवन सामान्य मानवी भावभावनांनीही युक्त आहे. श्रीरामाला दुःख झालेले आहे. श्रीरामाला क्रोध आलेला आहे. सोन्याचा मृग पाहून त्याला मोहही झाला आहे आणि श्रीरामाने विनोदही केला आहे. पण या भावभावनांच्या आहारी मात्र ते गेले नाही. त्यांच्यावर मात केली म्हणून ते श्रेष्ठ आहे. म्हणून पूर्ण पुरुषोत्तम मर्यादा श्रीराम आहे आणि त्यांना घडवण्यासाठी जे त्यांच्याबरोबर सदैव होते ज्यांनी श्रीरामाला सिद्ध केले अशा काही व्यक्तिमत्त्वाच्या गावी आपण या नऊ दिवस काहीकाळ स्थिरावणार आहोंत. श्रीरामवरदायिनी हे कार्य सिद्धीस नेईल हा विश्वास आहेच. जय श्रीराम 🙏🚩

सर्वेश फडणवीस

#ramnavmi25 #Day1 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏