Monday, June 3, 2024

यतो धर्मस्ततो जयः ।।


अर्थात जहाँ धर्म है, वहाँ विजय होगी. बस्स..अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा. भारतमातेचे संस्कार, भरतभूमीची आदर्श संस्कृती, त्यातून घडलेले असे तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे नरेंद्र मोदी आणि या पंचाक्षरी विकासाच्या मंत्राने साधारणपणे ५ एप्रिल ते ३० मे या काळात संपूर्ण देश पुन्हा एका नव्या विजयासाठी जागृत आणि सज्ज होता. ७३ वर्षीय नरेंद्र मोदींनी कडक उन्हात २०८ सभा घेतल्या. ८० मुलाखती दिल्या आणि देशाला नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीने स्वतःच्या प्रेमाने जिंकून घेतलं. मला वाटतं मरगळलेल्या देशाला या व्यक्तीच्या येण्याने २०१४ मध्ये नवसंजीवनी मिळाली आणि प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती असल्यासारखी भावना निर्माण झाली. एका शीर्षस्थ नेत्यासाठी असा भाव असणे हे फक्त भारतासारख्या विविध संस्कृती, भाषा, वेषभूषा आणि प्रांत असलेल्याला देशातच बघता येईल. 'वसुधैव कुटुंबकम्' ह्या संस्कृतीचे आपण पाईक असताना या लोकनेत्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने आपले योगदान दिले. भाव हाच होता की ही व्यक्ती देशासाठी काहीतरी चांगले करते आहे. 

या व्यक्तीच्या येण्याने लहानांपासून - वृद्धांपर्यँत सारे जण मोदी मोदी करता करता दहा वर्ष कशी गेली समजलेच नाही. आदर्श व्यक्तित्वाकडून घडलेलं सेवा कार्य आणि त्यांच्याप्रती असलेला सर्व भारतीयांचा प्रामाणिक भाव यातून यांनी दिग्विजयाची नांदी आधीच दिली होती. अनेकांना यांच्या माध्यमातून अनेक तीर्थक्षेत्रांचे घरबसल्या दर्शन झाले, या मीडियाच्या माध्यमातून आणि याची ताकद ओळखून विविध घटनाही अनुभवता आल्या आणि मग प्रत्येकाच्या ओठातून सहज भाव आले..वाह मोदीजी वाह!! 

पण जगाने नरेंद्र मोदी वलयाचे वेगळेपण आणि आदरातिथ्य अनुभवले ते सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या G20 समिटच्यावेळी ज्या आदरातिथ्याने यांनी जगाला आणि जागतिक नेत्यांना जिंकून घेतले त्यातून त्यांच्याप्रती आदराची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली. दहा वर्षांच्या कालखंडात काही घटना आणि काही प्रसंग चिरकाळ स्मरणात राहणारे अनुभवले. २२ जानेवारी २०२४ हा ऐतिहासिक दिवस अर्थात अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य मंदिरात श्रीरामलला विराजमान झाले. तो सोहळा प्रत्येकाने आपल्या घरातीलच मंगलकार्य असल्यासारखा जल्लोष आणि उत्साहात साजरा केला. 

खरंतर धर्माला ग्लानी आली की अवतार कार्यासाठी भगवंत ही येण्यासाठी उत्सुक असतात आणि अनेकांच्या मनात हीच भावना कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. शीर्षस्थ नेतृत्व बलशाली असावे म्हणून अनेकांनी २०१४ पासून व्रत, अनुष्ठान, मंत्रजप, नामस्मरण हे चालूच ठेवले होते. माझ्याही पाहण्यात असे अनेक आहेत ज्यांनी या विकासाच्या मंत्रासाठी धार्मिक अनुष्ठान केलं भाव हाच होता की फक्त ही व्यक्ती शीर्षस्थ पदावर राहावी आणि त्याला त्या त्या देवतेचे कवच मिळावे. ह्या सहजपणातून आणि सहज भावनेतून अनेकांनी ते कार्य संकल्पासह पूर्णही केले आणि आनंद हाच वाटतो की हे फक्त या आपल्या देशात बघायला मिळू शकतं. ज्यावेळी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा माझ्या आजीने देवांना पेढ्याचा नैवेद्य दाखवत शपथ घेताना तरळलेले आनंदाश्रू अजूनही आठवतात. संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही भावना आणि असाच भाव यावेळी ही बघायला मिळाला. खरंतर श्रद्धेला मोल नसतंच तिथे असते फक्त निष्ठा आणि संपूर्ण समर्पण भाव आणि या भावनेतून आजचा सूर्यास्त उद्याच्या सूर्योदयाच्या नव्या विजयाची नांदी घेऊन येण्यासाठी सज्ज आहे. 

चला आपण ही काही क्षणांची प्रतीक्षा करत हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नरत राहूया.. मान्यवर विजयोस्तु..

सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment