येणे वाग्यज्ञे !!
Friday, May 2, 2025
सहवासाच्या चांदण्यात .
Sunday, April 6, 2025
रामो विग्रहवान् धर्मः !! 🚩
भगवान् श्रीराम आणि श्रीरामचंद्रांची ही कथा आपल्या भारतीय संस्कृतीची प्राणधारा आहे. प्रभु श्रीरामचंद्रांबद्दल जोपर्यंत काहीतरी गुणगानात्मक म्हटलं जात नाही तोपर्यंत या देशातील कुणीही आचार्य, कुणीही ऋषी, कुणीही संत इतकेच नव्हे तर कुणीही साहित्यिक आपल्या वाणीची अथवा लेखणीची पूर्तता अथवा तृप्ती मानीत नाही.
खरंतर भगवान् रामचंद्रांचे चिंतन हे केवळ वैयक्तिक दृष्टीनं, पारिवारिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनंच नव्हे तर सर्वच दृष्टींनी मनुष्याच्या जीवनाचा सर्व प्रकारचा विकास करण्यास समर्थ आहे. प्रभू श्रीराम अवतीभवतीच्या वक्तींच्या वलयातून घडले आणि ते घडतांना त्यांनी अनेकांना कसे आपलेसे केले यासाठी मूळ वाल्मीकी रामायण मुळातून वाचतांना जो आनंद मिळतो तो शब्दातीत आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या कौटुंबिक जीवनात, आपल्या संस्थात्मक अथवा सामाजिक जीवनात आपण केव्हा कसाकसा निर्णय घ्यावा हे ठरवायचे असल्यास किंवा कुठला निर्णय योग्य आणि कुठला निर्णय अयोग्य याबद्दल धर्माचे मत जाणून घ्यावयाचे असल्यास रामाचे चरित्र पहायला हवे. सगळे धर्मग्रंथ वाचण्याची अथवा सगळे वेद, पुराणं, कथा आणि शास्त्रं बघण्याची आवश्यकता नाही. महर्षि वसिष्ठांनी म्हटलं आहे, “रामो विग्रहवान् धर्मः' मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचं साक्षात् साकार दर्शन म्हणजे भगवान् श्रीराम आहेत.
गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या रामनवरात्रात श्रीराम शक्तीचा जागर करताना श्रीरामांचे गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न करूया. प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानवी जीवन सुखकर होण्यासाठी जे जे करावे लागते ते सर्व केले आणि आदर्श माणूस पण घालून दिले. आज या उत्सवाची पूर्णाहुती. प्रभू श्रीरामाच्या अवतीभवती असणाऱ्या विविध व्यक्तिचित्रणाचा रामजन्मोत्सव निमित्ताने नव जागर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. ‘स्वानतः सुखाय’ भावनेने हे लेखन झाले. ही लेखनसेवा श्रीरामरायाचरणी रुजू व्हावी हीच प्रार्थना. जय श्रीराम🚩🙏
सर्वेश फडणवीस
#ramnavmi25 #Day9 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏
Saturday, April 5, 2025
वानरराज सुग्रीव
प्रत्यक्ष भरताने ज्याचें वर्णन करताना असें म्हटलें आहे की :-
त्वमस्माकं चतुर्णां वै भ्राता सुग्रीव पञ्चमः ।
सौहृदाज्जायते मित्रमपकारोऽरिलक्षणम् ॥।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२७
आम्हा चार भावांचा तू पांचवा भाऊ आहेस. सौहार्दानेच मित्रत्व व अपकाराने शत्रुत्व व्यक्त होत असतें. तो वानरराज सुग्रीव हा रामचंद्रांचा त्यांनी स्वतःच्या बरोबरीचें स्थान दिलेला मित्र असून रामायणातील व्यक्तिचित्रात त्याचें एक विशिष्ट असें स्वतंत्र स्थान आहे. खरंतर बघताक्षणी तो एक भ्याड, लंपट, स्वकर्तव्यपराङ्मुख असावा असें वाटतें. पण वस्तुस्थिति तशी नाही. रामचंद्रांनी सुग्रीवाशी अग्निसाक्षीने मैत्री करून त्याला स्वतःच्या बरोबरीचें स्थान दिले होते. महर्षि वाल्मीकि म्हणतात :-
ततोऽग्नि दीप्यमानं तौ चक्रतुश्च प्रदक्षिणम् ।।
सुग्रीवो राघवश्चैव वयस्यत्वमुपागतौ ।
ततः सुप्रीतमनसौ तावुभौ हरिराघवौ ।।
अन्योन्यमभिवीक्षन्तौ न तृप्तिमभिजग्मतुः ।
त्वं वयस्योऽसि हृद्यो मे ह्येकं दुःखं सुखं च नौ ।।
- वाल्मीकि रामायण, किष्किन्धाकाण्ड, सर्ग ५
नंतर प्रज्वलित केलेल्या अग्नीला राम व सुग्रीव या दोघांनीही प्रदक्षिणा केल्यानंतर ते एकमेकांचे मित्र बनले. प्रेमाने एकमेकांकडे पहात असता त्यांना तृप्ति म्हणून वाटेना. ते एकमेकांना म्हणाले, आता आपण परस्परांचे खरे मित्र झालो आहोत. आपले सुख व दुःख एक आहे. प्रत्यक्ष रामचंद्रांच्या उद्गारावरून सुग्रीवाच्या मैत्रीची त्यांना किती आवश्यकता वाटत होती व तिला ते किती किंमत देत होते हे स्पष्ट होतें. ते म्हणतात :
दुर्लभो हीदृशो बंधुरस्मिन्काले विशेषतः ।।
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड,
असा मित्र या काळात मिळणे फारच कठीण आहे. सुग्रीवाने रामाला जें साहाय्य केलें तें मनापासून,आपल्या सर्व सामर्थ्यानिशी केलेले आहे. एकटे मारुतीच नव्हेत तर नल, मंद, द्विविध, अंगद, जाम्बुवान इत्यादि अनेक कसलेले योद्धे, बुद्धिमान् व श्रेष्ठ शिल्पज्ञ असे पुरुष त्याच्या संग्रही होते. त्या सर्वांचें रामचंद्रांना अतिशय साहाय्य झालेलें आहे. लक्ष्मणाच्या रागावण्यावरून त्याने सीतेचा शोध चालविला हेंही खोटें आहे. उलट लक्ष्मण येण्याच्या कितीतरी पूर्वीच त्याने रामचंद्रांच्या साहाय्यासाठी सिद्धता चालविली होती. रामचंद्र जरी सुग्रीवाला स्वतःचा बरोबरीचा मित्र समजत असले तरी सुग्रीव स्वतःला त्यांचा दास समजत होता. यातच त्याच्या स्वभावाचें औदार्य प्रकट होते.
यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसो सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नभः॥
चन्द्रमा रजनी कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् ।
त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप ॥
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ३९
इंद्राने वर्षाव करणें, सूर्याने अंधार नाहीसा करणें आणि चंद्राने आपल्या ज्योत्स्नेने रात्र उजळणें हें जितकें स्वाभाविक तितकेंच
तुझ्यासारख्या मित्रांनी आपल्या मित्राचें प्रेम संपादन करण्यासाठी
जिवाचें रान करणें हें स्वाभाविक आहे. आणि अखेरीस रामचंद्रांच्या बरोबरच राजा सुग्रीवाने सुद्धा शरयूप्रवेश करून आपल्या प्रगाढ मैत्रीचा अमर शिलालेख जगाच्या इतिहासात कोरलेला आहे. या रामनिर्याणाच्या प्रसंगी या दोन अभूतपूर्व मित्रांच्या मित्रत्वाचें शब्दचित्र रेखाटताना महर्षि वाल्मीकि म्हणतात:--
एतस्मिन्नन्तरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः ।
प्रणम्य विधिवद्वीरं विज्ञापयितुमुद्यतः ।।
अभिषिच्याङगदं वीरमागतोऽस्मि नरेश्वर ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ।।
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो रमयतां वरः ।
वानरेन्द्रमथोवाच मैत्रं तस्यानुचिन्तयन् ।।
सखे शृणुष्व सुग्रीव न त्वयाहं विनाकृतः ।
गच्छेयं देवलोकं वा परमं वा पदं महत् ।।
वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड,
याच वेळी सुग्रीवाने रामचंद्रांना वंदन करून सांगितलें की, अंगदाला राज्याभिषेक करून मी आलो आहे. तुमच्याच मागोमाग देवगतीला येण्याचा मी निश्चय केलेला आहे. त्याचे ते उद्गार ऐकताच त्याचें मित्रत्व आठवून राम म्हणाले, " मित्रा, सुग्रीवा! आपला आजवर कधीच वियोग झालेला नाही. देवलोकाला अथवा परमदालाही आपण बरोबर कसें जाणार नाही ?” राजद्वारापासून स्वर्गद्वारापर्यंत ज्यांच्या सहजीवनात कधीच खंड पडलेला नाही असें हें सुग्रीव व श्रीराम यांचें सौहार्द मानवतेच्या इतिहासात अनन्वय अलंकाराचे उदाहरणच गणलें जाईल. म्हणूनच म्हणतात सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi25 #Day8 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏
Friday, April 4, 2025
शत्रुघ्न
रामकथेतील शत्रुघ्नाचे चरित्र देखील त्याच्या परीने थोडे वेगळे आहे. वाल्मीकी रामायणात शत्रुघ्न चरित्रातून हेच सिद्ध होते की तो श्रीरामांच्या दासानुदासांमध्ये अग्रक्रमावर होता. शत्रुघ्न शांतपणे काम करणारा, प्रेमळ, सदाचरणी, मितभाषी, सत्यवादी, विषयांच्या बाबतीत वैराग्यशील, सरल, तेजस्वी, गुरुजनानुयायी आणि शूर होता. वाल्मीकी रामायणात त्याच्याविषयी विशेष विवेचन दिसून येत नाही; परंतु जे काही उपलब्ध आहे, त्यावरून त्याच्या विषयी थोडा निष्कर्ष काढता येऊ शकतो.
बालपणापासूनच तो भरताच्या सहवासात अधिक राहत होता; म्हणून भरताचे आणि ह्याचे चरित्र एकाच वेळी चित्रित झालेले दिसते. ह्याच्याविषयी काही विशेष अशी गोष्ट रामायणात वेगळी
सांगितलेली नाही. ह्याच्या गुणांचे आणि चारित्र्याविषयीचे अनुमान भरताच्या वागणुकीशी करता येईल. बालकाण्डात त्याच्या प्रेमाविषयी वर्णन करताना म्हटले आहे -
अथैनं पृष्ठतोऽभ्येति सधनुः परिपालयन् ।
भरतस्यापि शत्रुघ्नो लक्ष्मणावरजो हि सः ।।
( वा० रा० १ । १८ । ३२)
ज्याप्रमाणे लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन श्रीरामचंद्रांचे रक्षण करीत त्यांच्या मागोमाग जात असे, त्याचप्रमाणे लक्ष्मणाचा धाकटा भाऊ शत्रुघ्न देखील भरताच्या मागोमाग जात असे.'
एकदा भरताला त्याचा मामा युधाजित आपल्या देशात घेऊन जात असताना शत्रुघ्न देखील त्याच्याबरोबर आजोळी गेला. त्यावेळी भरतावरील प्रेमामुळे माता-पिता, भाऊ आणि नवविवाहित पत्नीविषयी कोणत्याही प्रकारचा मोह न बाळगता आपला बंधू भरत ह्याच्याबरोबर राहणेच आपले परमकर्तव्य आहे असे त्याने मानले. अयोध्येहून बोलावणे आल्यावर भरताबरोबर तो पुन्हा परत आला. अयोध्येला पोहोचल्यानंतर कैकेयीकडून पित्याच्या मरणाचे वृत्त तसेच लक्ष्मण आणि सीतेसह श्रीरामांच्या वनवासाचे वृत्त ऐकून त्याला देखील फार दुःख झाले. बंधू लक्ष्मणाच्या शौर्याची त्याला चांगली ओळख होती, चित्रकूट पर्वतावरून पादुका घेऊन अयोध्येला परत फिरताना दोन्ही भावांनी श्रीरामांना-प्रदक्षिणा घातली व त्यांच्या चरणांना वंदन करून ते त्यांना भेटले. लक्ष्मणाप्रमाणे शत्रुघ्नाचा स्वभाव देखील कडक होता. कैकेयीच्या बाबतीत त्याच्या मनात राग होता. श्रीराम ही गोष्ट जाणत होते. म्हणूनच निरोप देताना श्रीरामांनी शत्रुघ्नाला वत्सलतेने उपदेश करीत म्हटले -
मातरं रक्ष कैकेयीं मा रोषं कुरु तां प्रति ।।
मया च सीतया चैव शप्तोऽसि रघुनन्दन ।
(वा० रा० २ । ११२ । २७-२८)
'रघुनंदन शत्रुघ्ना, तू कैकेयी मातेची सेवा कर, तिच्यावर कधी रागावु नकोस, माझी आणि सीतेची तुला अगदी शपथ आहे.' यावरून लक्षात येते की श्रीरामांवर शत्रुघ्नाचे केवढे प्रेम आणि भक्तिभाव होता. ह्यानंतर शत्रुघ्न भरताबरोबर अयोध्येला परत येऊन अगदी त्याच्या आज्ञेप्रमाणे राज्य आणि कुटुंबाची सेवा करीत राहिला. भरताजवळ राहून शत्रुघ्न त्याच्या आज्ञेची वाट पाहात असे. भरताला त्याच्याविषयी मोठा विश्वास होता. म्हणूनच अगदी छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे काम करण्यासाठी तो शत्रुघ्नालाच आज्ञा करीत असे.
ह्यानंतर श्रीराम वनवास संपवून अयोध्येला परत येईपर्यंत शत्रुघ्नाविषयी वाल्मीकि रामायणात विशेष उल्लेखनीय अशी गोष्ट आढळून येत नाही. हनुमंताकडून श्रीरामचंद्रांच्या आगमनाची बातमी समजताच भरताच्या आज्ञेनुसार शत्रुघ्नानेच श्रीरामांच्या स्वागताची व्यवस्था आणि नगर सजवण्याची तसेच राजरस्ते आणि इतर सर्व रस्ते नीटनेटके करण्याची व्यवस्था केली होती.
वाल्मीकी रामायणात कथा येते की, शत्रुघ्नाने लवणासुरावर स्वारी केली आणि लवणासुराला ठार मारून तेथेच उत्तम प्रकारची मधुरापुरी नावाची सुंदर नगरी वसवून त्याच्या राज्याची व्यवस्था करून बारा वर्षांनी श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी शत्रुघ्न तेथून अयोध्येकडे परत फिरला. येताना पुन्हा शत्रुघ्न वाल्मीकी ऋषींच्या आश्रमातच थांबला. सकाळ होताच नित्य कर्म केल्यानंतर मुनींची आज्ञा घेऊन श्रीराम दर्शनाच्या उत्कंठेने तो अयोध्येकडे निघाला. अयोध्येला पोहोचल्यानंतर तो श्रीरामांच्या महालात आला; तेथे आसनावर विराजमान झालेल्या श्रीरामांना त्याने प्रणाम केला आणि म्हणाला की, 'भगवन आपल्या आज्ञेनुसार लवणासुराला मारून मी तेथे नगर वसवून आलो आहे.'
द्वादशैतानि वर्षाणि त्वां विना रघुनन्दन ।
नोत्सहेयमहं वस्तुं त्वया विरहितो नृप ।।
स मे प्रसादं काकुत्स्थ कुरुष्वामितविक्रम ।
मातृहीनो यथा वत्सो न चिरं प्रवसाम्यहम् ।।
(वा० रा० ७ । ७२ । ११-१२)
'महाराज रघुनाथा, ही बारा वर्षे आपल्या विरहात मी मोठ्या कष्टाने घालवली आहेत. म्हणून आपल्याशिवाय तेथे आता मी निवास करू इच्छित नाही. म्हणून महापराक्रमी श्रीरामा, आपण माझ्यावर अशी कृपा करा की, आपल्यापासून वेगळा होऊन कोठेच राहू नये.' शत्रुघ्नाचे हे बोलणे ऐकून श्रीरामांनी त्याला हृदयाशी धरले आणि म्हटले - 'हे वीरा , तू दुःख करू नकोस, ते क्षत्रियाच्या स्वभावाला शोभून दिसत नाही. क्षात्रधर्माप्रमाणे तुला प्रजेचे पालन केले पाहिजे. मला भेटण्यासाठी वेळोवेळी येत जा.' अशाप्रकारे भगवान श्रीरामांच्या आज्ञेने शत्रुघ्नाने दीनवाणेपणाने त्यांचे म्हणणे मान्य केले. नंतर भरत आणि लक्ष्मणाला भेटून तसेच सर्वांना वंदन करून तो मधुरापुरीला परत गेला. त्यानंतर भगवंत जेव्हा परमधामाला जायला निघाले, त्यावेळी शत्रुघ्नाला बोलवले गेले. तेव्हा आपल्या पुत्रांना राज्याभिषेक करून शत्रुघ्न अयोध्येला येऊन पोहोचला आणि श्रीरामांजवळ जाऊन त्यांना वंदन करून सद्गदित स्वरात म्हणाला
कृत्वाभिषेकं सुतयोर्द्वयो राघवनन्दन
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम्
न चान्यदद्य वक्तव्यमतो वीर न शासनम् ।
विहन्यमानमिच्छामि मद्विधेन विशेषतः ।।
(वा० रा० ७ । १०८ । १४-१५)
'महाराज रघुनाथा, आपल्या दोन्ही पुत्रांना राज्याभिषेक करून मी आपल्याबरोबर येण्याचा निश्चय करून आलेलो आहे. हे वीर, आपण आता मला दुसरी कोणतीही आज्ञा करू नये; कारण कोणाकडूनही विशेषत: माझ्यासारख्या अनुयायाकडून आपल्या आज्ञेचे उल्लंघन व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी अद्यापपर्यंत आपली आज्ञा मोडली नाही. म्हणून आता देखील तसे करावयास लागू नये, त्याचे आपणच रक्षण करावे. '
भगवान श्रीरामांनी शत्रुघ्नाची विनंती ऐकली व शत्रुघ्न सुद्धा श्रीरामांच्या बरोबरच परमधामाकडे निघून गेला. शत्रुघ्नाचे हे छोटेसे व्यक्तिचित्र केवळ वाल्मीकि रामायणाच्या आधाराने लिहिले आहे. ह्यात दुसऱ्या कोणत्याही रामायणातील किंवा इतर कोणतीही कथा नाही. त्यामुळे कदाचित त्याच्या प्रेम आणि गुणांविषयींचा इतर भाग समोर आला नाही; याची जाणीव आहे परंतु त्यासाठी क्षमायाचनेशिवाय मी दुसरे काय करू शकतो?
सर्वेश फडणवीस
#ramnavmi25 #Day7 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏
Thursday, April 3, 2025
भरत
रामकथेत भरताचे चरित्र मोठे उज्ज्वल आणि आदर्श आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही दोष दिसून येत नाही आणि वाल्मीकि- रामायणात त्याला श्रीविष्णूंचा अंशावतार म्हणून दर्शविले आहे. त्याच बरोबर भरताचे चरित्र त्याला एक सज्जन श्रेष्ठ, आदर्श स्वामिभक्त, महात्मा, नि:स्पृह आणि भक्तिप्रधान कर्मयोगी म्हणून सिद्ध करते. भरत हा धर्म आणि नीती जाणणारा, सद्गुणसंपन्न, त्यागी, संयमी, सदाचरणी, प्रेम आणि विनम्रतेची साक्षात मूर्ती, श्रद्धाळू आणि अतिशय बुद्धिमान म्हणून दर्शविली आहे. वैराग्य, सत्य, तप, क्षमा, तितिक्षा (सहन करण्याची शक्ती), दया, वात्सल्य, धैर्य, शौर्य, गांभीर्य, ऋजुता, सौम्यता, माधुर्य, निगर्वीपणा, मैत्री, इत्यादी गुणांचा त्याच्या ठिकाणी विलक्षण विकास झालेला दिसतो.
अयोध्येत दशरथ राजा रामाच्या विरहाने दु:खी असतात. त्यांना श्रावणकुमाराच्या पित्याच्या शापाची आठवण होते. तेवढ्यात सुमंताकडून श्रीराम चित्रकुट पर्वतावर आहेत हे कळताच राम राम करत ते आपला प्राण सोडतात. अयोध्या शोकसागरात बुडते. भरत -शत्रुघ्नला आणण्यासाठी दूत पाठविण्यात येतो. भरत अयोध्येत येतो, तेव्हा त्याला अयोध्या अतिशय शांत भासते. त्याला नगरीतलं चैतन्य हरपले आहे असे वाटते. पित्यासाठी शोक करणाऱ्या भरताच्या हृदयात श्रीरामाविषयीचे प्रेम उफाळून येताना दिसते. तो म्हणू लागतो.
यो मे भ्राता पिता बन्धुर्यस्य दासोऽस्मि सम्मतः ।
तस्य मां शीघ्रमाख्याहि रामस्याक्लिष्टकर्मणः ।।
पिता हि भवति ज्येष्ठो धर्ममार्यस्य जानतः ।
तस्य पादौ ग्रहीष्यामि स हीदानीं गतिर्मम ।।
( वा० रा० २ । ७२ । ३२-३३)
जे माझा भाऊ, माझा पिता आणि माझा बंधू आहेत, ज्यांचा मी
परमप्रिय दास आहे, जे पवित्र कर्म करणारे आहेत त्या श्रीरामाला आपण माझ्या येण्याची सूचना त्वरित द्या. धर्म जाणणाऱ्या श्रेष्ठ मनुष्याच्या दृष्टीने ज्येष्ठ बंधू पित्याप्रमाणे असतो. मी त्यांच्या चरणांना वंदन करीन. आता ते माझे आश्रयस्थान आहेत.'
यावर कैकेयीने त्याला सर्व घटना सांगितल्या आणि राज्याचा स्वीकार करावयास सांगितले. कैकेयीच्या तोंडून अशाप्रकारे बंधूंच्या वनगमनाची बातमी ऐकून भरत अत्यंत दुःखाने संतापून जातो. व्याकूळ अंत:करणाने तो आईला बरेच काही अपशब्द बोलतो. श्रीरामास पुन्हा अयोध्येस आणीन, अशी शपथ घेतो. पुढे भरत आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार करतो आणि श्रीरामांना अयोध्येत परत आणण्यासाठी चित्रकुटावर जाण्याचा निश्चय करतो. तिकडे गेल्यावर श्रीराम म्हणतात,
जानामि भरतं क्षान्तं गुरुसत्कारकारिणम् ।
सर्वमेवात्र कल्याणं सत्यसन्धे महात्मनि ।।
अनेन धर्मशीलेन वनात् प्रत्यागतः पुनः ।
भ्रात्रा सह भविष्यामि पृथिव्याः पतिरुत्तमः ।।
वृतो राजा हि कैकेय्या मया तद्वचनं कृतम् ।
अनृतान्मोचयानेन पितरं तं महीपतिम् ।।
(वा० रा० २ । १११ । ३०-३२)
भरत हा मोठा क्षमाशील आणि गुरुजनांचा सन्मान करणारा आहे हे मी जाणतो. ह्या सत्यप्रतिज्ञ महापुरुषाच्या ठिकाणी कल्याणकारी असे सर्व आहेत. वनवासाचा कालावधी संपवून मी जेव्हा परत येईन, त्यावेळी मी आपल्या ह्या धार्मिक भावाबरोबर ह्या पृथ्वीचा सम्राट होईन. कैकेयीने राजाकडे वर मागितला, मी त्यांच्या आज्ञेचा स्वीकार केला. म्हणून बंधू भरता ! आता माझे म्हणणे मान्य करून त्या पृथ्वीपती राजाधिराज बाबांना असत्याच्या बंधनातून मुक्त कर.' अतुलनीय अशा त्या तेजस्वी बंधूंचा तो रोमांचकारी संवाद ऐकून आणि आपापसातील प्रेमपूर्ण वर्तन पाहून तेथे उपस्थित जनसमुदायासह सगळे महर्षी आश्चर्यचकित आणि मंत्रमुग्ध झाले. अदृश्यरूपाने अंतरिक्षात प्रकट झालेले मुनी आणि तेथे प्रत्यक्ष बसलेले महर्षी त्या दोघा बंधूंची अतिशय प्रशंसा करू लागले.
ह्यानंतर सर्व महर्षीनी श्रीरामांचे म्हणणे मान्य करण्यासाठी भरताची समजूत घातली. त्यामुळे श्रीरामांना अतिशय आनंद झाला, परंतु भरताचे मात्र समाधान झाले नाही. तो अडखळणाऱ्या शब्दांनी हात जोडून पुन्हा श्रीरामांना म्हणाला 'आर्य , मी ह्या राज्याचे संरक्षण करू शकणार नाही. ह्या राज्याचा स्वीकार करून आपण त्याच्या पालनाचा भार दुसऱ्या कुणावर तरी सोपवा.' असे म्हणून भरत आपल्या भावाच्या चरणांवर पडला. त्यांचा दृढनिश्चय पाहून भरताने म्हटले,
अधिरोहार्य पादाभ्यां पादुके हेमभूषिते ।
एते हि सर्वलोकस्य योगक्षेमं विधास्यतः ।
आर्य, ह्या ज्या दोन सुवर्णभूषित पादुका आहेत, ह्यांवर आपले चरण ठेवा. ह्याच संपूर्ण जगताच्या कल्याणाचा निर्वाह करतील. खरंतर धन्य आहे भरताची ही सर्वश्रेष्ठ श्रद्धा. भगवान श्रीरामचंद्रांनी त्या पादुकांवर आपले पवित्र चरणयुगल ठेवून भरताला त्या दिल्या. त्या पादुकांना नमस्कार करून भरताने श्रीरामांना म्हटले
चतुर्दश हि वर्षाणि जटाचीरधरो ह्यहम् ।।
फलमूलाशनो वीर भवेयं रघुनन्दन ।
तवागमनमाकाङ्क्षन् वसन् वै नगराद् बहिः ।।
तव पादुकयोर्न्यस्य राज्यतन्त्रं परंतप ।
चतुर्दशे हि सम्पूर्णे वर्षेऽहनि रघूत्तम ।।
न द्रक्ष्यामि यदि त्वां तु प्रवेक्ष्यामि हुताशनम् ।
( वा० रा० २ । ११२ । २३ - २६)
'वीर रघुनंदन, मी सुद्धा चौदा वर्षांपर्यंत जटा आणि वल्कले धारण करून कंदमुळे - फळे भक्षण करीन आणि आपल्या येण्याची वाट पाहत नगराच्या बाहेरच राहीन. परंतू येवढ्या दिवसांपर्यंत राज्याची संपूर्ण धुरा आपल्या या चरणपादुकांवरच राहील. रघुश्रेष्ठ चौदा वर्षे पूर्ण होताच, त्यादिवशी जर मला आपले दर्शन झाले नाही तर मी धगधगणाऱ्या अग्नीत प्रवेश करीन.'
भरताची ही प्रतिज्ञा ऐकून भगवंतांनी मोठ्या प्रसन्नतेने दुजोरा दिला. त्यानंतर दोघा बंधूंना अर्थात भरत आणि शत्रुघ्न यांना कैकेयी मातेशी चांगले वर्तन करण्याचा उपदेश करून आणि हृदयाशी धरून आलिंगन देऊन निरोप दिला. त्यावेळी बंधू भरताच्या वियोगाने श्रीरामचंद्रांचे डोळे पाण्याने भरून आले. त्यानंतर भगवंतांच्या पादुका मस्तकावर धारण करून भरत मोठ्या आनंदाने रथावर आरूढ झाला.
वास्तविक भरताची रामभक्ती जगाच्या इतिहासात अद्वितीय आहे. भरताचा त्याग, संयम, व्रत, नियम - सर्व काही स्तुत्य आणि अनुकरण करण्यास योग्य आहे. त्याच्या चरित्रातून स्वार्थ त्याग, विनय, सहिष्णुता, गांभीर्य, सरलता, क्षमा, वैराग्य आणि स्वामिभक्ती इत्यादी सर्व गुणांचा बोध घेता येतो. भक्तीसह निष्काम भावनेने गृहस्थाश्रमात राहून सुद्धा प्रजापालन करण्याचे असे सुंदर उदाहरण इतरत्र मिळणे कठीण आहे. म्हणून भरताचे वेगळेपण लगेच डोळ्यात भरणारे आहे.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi25 #Day6 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏