Monday, September 29, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : इंद्रसेना

'इंद्रसेना' ही यज्ञयाग करणाऱ्या पुरोहिताची मुलगी. योग्यवेळी तिचे उपनयन झाले आणि ती शिकण्यासाठी गुरूगृही गेली. प्राथमिक शिक्षण पूर्ण होताच, तिने 'चारविद्या' म्हणजे हेरगिरीचे शास्त्र आणि शस्त्रकौशल्य अभ्यासण्याची इच्छा प्रदर्शित केली. गुरूला थोडे आश्चर्य वाटले. 'चारविद्या' शिकणारी ती पहिलीच स्त्री असावी कदाचीत. हेरगिरीचे काम, अत्यंत जिकीरीचे आणि जीवावरचेही. मजबूत शरीर, अविचल धैर्य, विलक्षण धडाडी, सूक्ष्म तर्क आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता, हे गुण हेरगिरीसाठी अत्यंत आवश्यक होते. इंद्रसेनेने ह्या सर्व गुणांचा प्रत्यय गुरूला आणून दिला आणि ती 'चारविद्येत' निपुण झाली. द्वंद्वयुद्ध आणि शस्त्रात्र चालविण्याची विद्यादेखील, इंद्रसेनेने सहजगत्या आत्मसात केली.

शिक्षण संपल्यावर तिने आपल्या पसंतीचा वर निवडला. तो मुद्गल नावाचा एक शेतकरी होता. उत्तम शेती करून, त्याने बरेच गोधन जमविले होते, वेदविद्यापारंगत मुद्गलानं, शेतीचा व्यवसाय स्वीकारला होता, कारण त्याला त्याची आवड होती आणि "अन्नम बहु कुर्वीत" हे उपदेशवाक्य केवळ पाठ करायचे आणि तशी कृती मात्र टाळायची, हे बरे नव्हे, म्हणूनही असेल पण तो शेतीकडे वळला होता. इंद्रसेना, लवकरच कृषिकर्मातही निपुण झाली. गोधनाची उत्तम निगा राखण्याचे कौशल्य तिने आत्मसात केले. रथ हाकण्याची कला आणि बैलांना वेगाने पळविण्याचे तंत्र, तिने अभ्यासाने अंगळवणी पाडले. अडीअडचणीच्या वेळी जंगलातून रथ चपळाईने हाकण्यात तर तिचा हातखंडा होता. गोधनावर तिचे अपार प्रेम होते. गोधनदेखील तिच्यावाचून चारापाणी खाईना.

एकदा 'सुभर्वा' नावाच्या एका कुख्यात दरोडेखोरानं त्यांच्या गायी पळविल्या. एक वयस्कर बैल तेवढा उरला होता. मुद्गल आणि इंद्रसेना चिंतित झाले. गायी, कुणी पळविल्या असाव्यात ? इंद्रसेना गोठ्यासभोवती बारकाईने निरीक्षण करीत होती, गायींच्या खुरांचे ठसे मातीत उमटलेले दिसत होते, पण सगळे ठसे मोठालेच कसे ? वासरांच्या पायांचे ठसे कसे दिसत नाहीत ? वासरांना खांद्यावर टाकून चोर पळाले असावेत. मग गायी, वासरामागे निमुटपणे धावत येतातच, हे तंत्र त्यांनी अवलंबिलेले जाणवले. ह्या तंत्रामुळे, गायींना जबरदस्तीनं ओढून किंवा मारून पळवावे लागत नाही. त्याकाळी चोरी करणे सोपे आणि बिनबोभाट होते. इंद्रसेनेने हे तात्काळ ताडले आणि असे तंत्र अवलंबिणारा, धडधाकट दरोडेखोर म्हणजे 'सुभर्वा' च असावा, असा तिने निष्कर्ष काढला.

कालांतराने मुद्गलाने सुभर्वा राहत होता त्या पहाडातल्या दऱ्याखोऱ्यातून वेध घेतला पण त्याचे गोधन कुठे दिसेना. सुभर्वा देखील, त्याच्या गावातील घरी नसल्याचे त्याला कळले. मग सुभर्वा यावेळी गोधन घेऊन कुठे पळाला असावा? इंद्रसेना आणि मुद्गल शोधायला लागले. गायींच्या खुरांचे ठसे सगळेच सारखे आणि सगळ्याच दिशांना आढळणारे. मग कोणत्या ठशांची दिशा स्वीकारायची ? तिला लगेच तिच्या कपिला गायीची आठवण झाली. तिची ती आवडती गाय. तिचा मागचा पाय दुखावला होता. तो पाय तिला टेकवता येत नव्हता. ती, तो पाय फरपटत पुढे घ्यायची. मातीत खुरांच्या ठशांच्या मध्ये, असे फरफटलेले चिन्ह कुठे आढळते कां ? ते तिने शोधले आणि 'सुभर्व्यानं' आपलं गोधन कोणत्या दिशेला पळविलं ते शोधून काढले. मुद्गलाने त्या दिशेला शोध घेतला आणि दूरवर, बिकट वाट असलेल्या घनदाट जंगलातील पहाडाच्या एका विशाल कपारीत त्याचे गोधन आणि तिथेच सुभर्वा आणि त्याचे साथीदार त्याला आढळले. मुद्गलाने, सुभर्व्याला आव्हान दिले. सुभर्वा आणि त्याचे चारपाच साथीदार यांच्याशी एकटा मुद्गल यशस्वीपणे लढू शकला नाही. घायाळ मुद्गल घरी परतला. मुद्गल घायाळ अवस्थेत परतलेला पहाताच इंद्रसेनेला संताप आला. त्या सुभर्व्याला अद्दल घडविलीच पाहिजे आणि गोधन परत मिळविलेच पाहिजे असा तिने निर्धार व्यक्त केला. 

दोन-चार दिवसात मुद्गलालाही थोडी हिंमत आली. कारण आता अंगावरचे घाव बरेच सुकले होते. मग इंद्रसेनेने रथ काढला; त्याला चोरांनी मागे सोडून दिलेला वयस्कर बैल जुंपला आणि ते दोघेही सुभर्व्यावर चालून गेले. इंद्रसेना आणि मुद्गल ह्यांच्याशी लढताना सुभर्वा आणि त्याचे साथीदार हरले आणि त्यांनी घोड्यांवरून पळ काढायला सुरुवात केली. सुभर्वा हरला आणि पळू लागला पण गोधन कुठे दिसेना आणि सुभर्वाने ते आणखी इतरत्र कुठेतरी लपविले होते. आता सुभर्व्याला पकडल्याशिवाय, गोधनाचा पत्ता लागणे शक्य नव्हते, पण सुभर्व्याला पकडणार कसे ? तो घोड्यावर निघालाय.

इंद्रसेनेने लगेच आपला बैलाचा रथ त्याच्या मागे लावला. घोडा आणि रथ ह्यांची शर्यतच लागली. इंद्रसेना, रथ वेगाने हाकलीत होती, अडीअडचणीतून, उंच खोल जागेतून आणि खळखळ वहात्या नद्यानाल्यातून, रथ, सुखरूपपणे बाहेर काढताना इंद्रसेनेचे सारथ्यकौशल्य पणाला लागत होते.सुभर्वा ह्या कपारीतच कुठेतरी दडला आहे,' इद्रसेनेनं मुद्गलाला हळूच सांगितलं. पण आत कपारीत एकदम शिरायचे कसे आणि कुणीकडून ? सुभर्वा सर्वत्र नजर फेकीत असेलच. त्याला, दिसल्याशिवाय रहाणार नाही आणि त्याने आडून आपल्यावर घात केला तर ? आपण पकडले जाऊ. तेव्हा झाडाआडून सुभर्व्याचा ठाव घेतला पाहिजे.

आता इंद्रसेनेला कपारीत त्वरीत उतरण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सुभर्वा कपारीतून पळून जाण्यापूर्वी, त्याला गाठणे आवश्यक होते, पण सुभर्व्याला तोंड द्यायचं ते, शस्त्राशिवाय जमायचे कसे ? आणि शस्त्र तर, वर, दूरवर रथात राहीली होती. हातात होता तो फक्त रथाच्या आधारभूत एक लाकडी जाड ओंडका. पण वेळ घालविण्यात अर्थच नव्हता. इंद्रसेना मुद्गलासहीत भरभर कपारीत शिरली. पळत सुटलेल्या सुभर्व्याचा त्यांनी पाठलाग केला. मुद्गलावर तो वार करणार तोच इंद्रसेनेनं त्याच्या डोक्यात हातातील ओंडका हाणला. सुभर्वा गोंधळला. त्याला भोवळ आली. तोच इंद्रसेनेनं पुनः दुसरा मारा केला आणि सुभर्वा बेशुद्ध पडला. त्याचे खड्ग मुद्गलाने घेतले. मग दोघांनी उचलून त्याला पाणी पाजले, शुद्धीवर आणले आणि खड्गाचा धाक दाखवीत चोरलेल्या गायींचा ठावठिकाणा दाखवायची आज्ञा केली. माझा जीव घेऊ नका. गायी परत करतो.  सुभर्वा, काकुळतीने प्रार्थना करू लागला. इंद्रसेनेनं 'तथास्तु' म्हटले. सुभर्वाने गायी परत केल्या. इंद्रसेना आणि गायी सुखरूप घरी परत आल्या.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवसनववा

Sunday, September 28, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : गार्गी

भारतीय तत्त्वज्ञान हे जगातले एक श्रेष्ठ तत्त्वज्ञान मानले जाते. शाश्वत सत्याचा शोध घेण्यात ते एकमेव यशस्वी झाले. या बहुरूपी विश्वात एकत्व शोधून त्याने वैश्विक कल्याणाचा मौल्यवान मार्ग दाखविला.  "एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति ।" आत्मा सर्वत्र एकच आहे, नव्हे तो एकमेव आहे. ह्या एकात्मवादामुळे माणसां माणसांतील द्वैतभाव संपला, कलहाचे बीजच जळाले. प्रेम आणि सामंजस्य ह्यापायी विश्वशांती बळकट बनली. “विश्वेस्मिन् शान्तिरस्तु मानवाः सन्तु निर्भयाः ।" ही ग्वाही ह्या तत्त्वज्ञानाने दिली. अशा ह्या श्रेष्ठ तत्त्वज्ञानात भर घालणारी, वेदकालीन विदुषी म्हणून, गार्गी ओळखली जाते. वेदान्तचर्चा करून त्यातील मौलिक तत्त्वे उघड करण्याचे तत्कालीन कौशल्य ह्या गार्गीमध्येही पहावयास मिळते. .

गार्गी ही गर्ग कुलोत्पन्ना कन्या आणि वचक्नु ऋषी हिचे वडील होते. म्हणून तिला वाचक्नवी गार्गी असे म्हणत. वेदकाळच्या पद्धतीनुसार तिचे उपनयन झाले. ती गुरूगृही शिकायला गेली. याज्ञवल्क्य वगैरे बुद्धिमान विद्यार्थ्यांबरोबर तिचे शिक्षण झाले. गार्गी देखील अत्यंत बुद्धिमान होती. विश्वाची उत्पत्ती, विश्वाचे स्वरूप आणि विश्वकल्याणाचा चिरंतन मार्ग शोधणाऱ्या ऋषींपैकी एक गणली गेली. सर्वव्यापी, आनंदरूपी आणि एकमेवाद्वितीय ब्रह्म जाणणारी वेदविद्यापारंगत गार्गी, ब्रह्मवादिनी म्हणून लौकिक मिळवती झाली. सृष्टीचे ज्ञान आणि विज्ञान, निसर्ग आणि अवकाश ह्यांचा शोध आणि बोध घेण्याचे तिचे प्रयत्न प्रशंसनीय ठरले. अनेक मान्यवर विद्वानांत तिचा वरचा क्रम लावला जाई. राजसभेत अनेक विद्वान पंडितांबरोबर ती वादविवादात भाग घेई, आपली छाप पाडत होती. 

एकदा जनक नावाच्या राजाने मोठा यज्ञ केला. त्यात खूप दक्षिणा वाटली. कुरू आणि पांचाल देशातील अनेक ब्राह्मण तिथे एकत्रित झालेले होते. गार्गीही त्या सभेला आलेली होती. वेदकाळी स्त्रिया जागरूक होत्या. समाजही समंजस होता. स्त्री-पुरुषसमप्राधान्य, त्यांच्या मनात आणि कृतीत सहजतेने मुरलेले होते. स्त्रीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व तिच्या इच्छेनुसार आणि शक्तीनुसार ती स्वतः घडवीत असे. संसार, त्यातील चूल आणि मूल ह्यांचे कर्तृत्व गोठविणारे त्याकाळी स्त्रीच्या मानेवर लादलेले कल्पनेतही दिसत नाही. त्यामुळेच जीवनाच्या अनेक क्षेत्रात, स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व गाजवताना उठून दिसते. म्हणूनच मध्वभाष्यानुसार, विवाह होऊनही, गार्गीच्या जीवनक्रमात कुठलाही बदल झाला नाही. तिचा वेदाभ्यास, ब्रह्मज्ञानाचा व्यासंग आणि पंडीतसभेत संचार सतत चालू राहीला. 

राजा जनकाच्या त्या सभेत गार्गी आमंत्रित होती. ती पंडितसभा यज्ञाच्या निमित्ताने भरविलेली असली, तरी जनकराजाच्या मनात विद्वत्चर्चा घडावी असे होते, पण त्याने तसे उघड सांगितले नाही. कारण ह्या सर्व पंडीतांत, सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता कोण आहे हेच, खरे तर जाणून घेण्याची त्याला जिज्ञासा होती. त्याने एक हजार गाई आणून बांधल्या. त्या प्रत्येकीच्या शिंगांना दहा दहा सुवर्णमुद्रा बांधलेल्या होत्या. जनक राजा त्या पंडितवरांना म्हणाला, "जो कुणी सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता असेल त्याने ह्या गायी न्याव्यात." तिथे जमलेल्या ब्राह्मणांना, मी आहे सर्वश्रेष्ठ, असे म्हणण्याचे धारिष्ट्य करवले नाही. याज्ञवल्क्य मात्र उठला आणि काही न बोलता आपल्या शिष्यांना म्हणाला, "हाकला रे त्या गायी आपल्या आश्रमाकडे". तो ज्ञानी होता. इतरही ज्ञानी होते. पण याज्ञवल्क्याला आपल्या ज्ञानाचा आत्मविश्वास होता तसा इतरांना नव्हता. पण त्याला गायी सुखासुखी नेता आल्या नाहीत. सर्वश्रेष्ठ ब्रह्मवेत्ता म्हणवितोस तर आमच्या प्रश्नांची उत्तरे दे म्हणून इतरांनी त्याला सतत प्रश्न विचारूनच सोडले. 

पूर्वीच्या काळी राजसभेत पांडित्याचे प्रशस्तीपत्र मिळवायचे, तर राजाने बोलावले असेल त्या सर्व विद्वानांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत होती. तुम्ही तुमचे विचार मांडायचे आणि त्यावर जमलेल्या विद्वानांनी प्रश्न विचारायचे. तुम्हांला त्या प्रश्नांची उत्तरे भराभर देता आली तर तुम्ही पंडित ठरले जात. राजा मग तुम्हांला मानाची शालजोडी देई. आणि राजा जनकाच्या त्या सभेत याज्ञवल्क्याला प्रतिप्रश्न करून, त्याचे ज्ञान कमी असल्याचे प्रयत्न करणारे, पंडितपुरुष बरेच निघाले. पंडितस्त्री मात्र एकमेव होती आणि ती होती गार्गी. गार्गीने याज्ञवल्क्याला भंडावून सोडले, ते तिच्या विशिष्ठ शैलीने. तिने लहानलहान प्रश्नांचा याज्ञवल्क्यावर सतत मारा केला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं न येतं तोच दुसरा, लगेच तिसरा असे तिने बारा प्रश्न विचारले. ह्या तिच्या शैलीने याज्ञवल्क्य चिडला. बाराव्या प्रश्नाला काही उत्तर देण्याऐवजी तो म्हणाला, "पुरे कर. यानंतर एकही प्रश्न विचारू नकोस. आणखीन विचारशील तर तुझं मस्तक पृथ्वीवर पडेल.’

गार्गीने एकापाठी एक विचारलेले प्रश्न होते तरी कोणते ? ते होते सृष्टी संबंधीचे, अवकाशा संबंधीचे. त्या विद्वत्सभेतील गार्गीचे वर्चस्व जाणवले ते तिच्या आत्मविश्वासपूर्ण उद्गारांवरून. ती इतर पंडितांना म्हणाली, "आता मी शेवटचे दोन प्रश्न विचारते आणि त्याची उत्तरे जर ह्या याज्ञवल्क्याने मला दिली, तर तुमच्यापैकी कुणीही ह्या ब्रह्मवेत्यावर विजय मिळवू शकणार नाही, असे ठरेल आणि इतर सर्व पंडितांनी त्या गोष्टीला मान्यता दिली. ज्ञानाची परीक्षा घ्यायला, हवे असलेले चौफेर ज्ञान आणि सूक्ष्म दृष्टी गार्गीजवळ होती आणि त्या तिच्या सामर्थ्यांला राजसभेत मान्यता होती.

ज्ञानाचे व विज्ञानाचे एवढे प्रचंड सामर्थ्य, जवळ असूनही गार्गी विनम्र होती. ज्ञानाचा अहंकार असू नये अशी उक्ती आहे. आजकाल मात्र अज्ञानाचाही माज चढलेला जाणवतो आणि अशावेळी गार्गीच्या विनम्रतेची आठवण मनाला स्पर्शून जाते. गार्गीने, याज्ञवल्क्याची उत्तरे ऐकली आणि स्वतःचे समाधान होताच ती परीक्षा घेणारी म्हणाली, याज्ञवल्क्याने "माझा प्रणाम स्वीकार. हे पंडितांनो, याज्ञवल्क्याला बहुमान द्या, नमस्कार करा त्याला आणि सोडा पाणी त्या सहस्त्र गायींवर व सुवर्णमुद्रांवर." गार्गीच्या निर्णयाने सभा प्रसन्न झाली. जनक राजा संतुष्ट झाला. विद्वत्ससभेत गार्गीची प्रतिष्ठा वाढली. एका पंडिताने, त्यातही स्त्रीने, दुसऱ्या पंडिताच्या ज्ञानाची प्रशंसा करावी, हा खरा ज्ञानवंतांचा आदर्श, गार्गीने घालून दिला म्हणून गार्गीचे अनन्य साधारण महत्त्व आजही जाणवते. 

गार्गीसारख्या अनेक स्त्रियांच्या चरित्रावरून जाणवते की वेदकालीन समाजात, स्त्रीला समान संधी, सर्वच क्षेत्रात उपलब्ध होती. तिची इच्छा आणि महत्त्वाकांक्षा, ह्यांना पुरुषी अहंकाराची झुल त्याकाळच्या समाजाने कधीच निर्माण होऊ दिली नाही. पुरुषप्रधान संकल्पनेतून निर्माण होणारी स्त्रियांबद्दलची कुठलीही स्वार्थी, मतलबी, किंवा द्वेष रूढी लादण्याचे वेदकालीन समाजाने कधी कल्पनेतही आणले नाही. सर्व प्रकारचे शिक्षण, वेदविद्या आणि विज्ञानाचे प्रयोग करायला स्त्रियांनाही प्रोत्साहन दिले जाई आणि महत्त्वाची तशीच अनुकरणाची बाब म्हणजे वेदकालीन स्त्रिया या सर्व सोयीसवलतींचा योग्य आणि पुरेपूर उपयोग करून घेत असत. वैदिक काळात ही अशी सगळी समाजरचना आजही अनुकरणीय अशीच आहे. 

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसआठवा

Saturday, September 27, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : मैत्रेयी

'मैत्रेयी' ही 'मित्र' नावाच्या प्रधानाची मुलगी. 'मित्र' हा जनकराजाचा राजप्रधान होता. ह्या संसारात राहूनही, लोकमंगलाची पवित्र कर्तव्ये निस्वार्थपणे करणाऱ्या जनकराजाचे चरित्र आणि चारित्र्य अगदी जवळून पहाण्याचा आणि अनुभवण्याचा दुर्लभ लाभ मैत्रेयीला झाला. वेदकाळात 'गार्गी' एक ब्रम्हवादिनी, आध्यात्माच्या मार्गातील दीपस्तंभ अशी विदुषी, तिची मावशी होती. आध्यात्माचे बाळकडू ह्या मावशीने तिला पाजले. कोणतीही व्यक्ती घडते ती संस्कारांमुळेच. वैदिक काळात आणि भारतीय संस्कृती परंपरेत, सहज संस्कारही चांगले व्हावेत ह्याकडे सातत्याने लक्ष पुरविले जाई. घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे, जेणेकरून मन शांत आणि प्रसन्न राहील असे वातावरण निर्माण करणे, इतरांना न दुखावणारे बोल आपल्या आचरणाने, केवळ स्वतःचे क्षणिक सुख साधण्यासाठी दुखवणे,अशा अनेक बाबींकडे लक्ष दिले जाई.

मैत्रेयी अशाच वातावरणात आणि संगतीत वाढली, तिची बुद्धी तल्लख आणि मर्मग्राही होती. मैत्रेयीने, एका स्त्रीने त्याकाळी पुरुषी अहंकाराला सौम्य प्रवृत्तीने आणि अप्रत्यक्ष रीतीने प्रत्युत्तर देऊन निरूत्तर करण्याचे कसब दाखविले आहे. याज्ञवल्क्य हा तिचा पती, याज्ञवल्क्य जनकाचा गुरू, जनकाला अध्यात्माचे धडे त्याने दिले. दोघेही संसारी, गृहस्थाश्रमी, जनकाला संसार सोडून, संन्यास घेण्याची गरज वाटली नाही. याज्ञवल्क्य मात्र मुक्तीसाठी संन्यास घ्यायला निघाला आणि त्यावेळी त्यानं मैत्रेयीला, 'मी आता संन्यास घेतोय, पण तू काळजी करू नकोस, माझ्या धनसंपत्तीतला वाटा तुला मिळेल. तुला जीवनाची ददात रहाणार नाही," असं सांगितलं. मैत्रेयी यावर नुसती हसली होती, ती म्हणाली, "तुम्हाला असं का वाटावं की मला जीवन जगण्यासाठी धनसंपत्ती हवी ? त्यानं का मला मुक्ती मिळणार आहे? मला कुठलीही इच्छा उरलेली नाही. संसारातल्या कुठल्याही लाभासाठी मनात आसक्ती नाही. इच्छा किंवा अनिच्छा ह्यांचा माझ्या मनाला उपसर्गच पोहोचत नाही, पण तुम्ही संन्यास घेणार आहात आणि ह्या संन्यासिनीला त्यावेळी काही देण्याचे योजत असाल, तर मुक्तीच्या या प्रवासात शिदोरी म्हणून उपयोगी पडेल असं काही सांगा."

मैत्रेयी राजसभेत याज्ञवल्क्याचं पांडित्य पाहून प्रभावित झाली होती, त्याच्यावर मोहित झाली होती. त्या पांडित्याबद्दलची आत्मीयता आणि त्या पांडित्याची सर्वकष प्राप्ती, हे दोन हेतू तिच्या ठायी होते आणि याज्ञवल्क्याकडे आकृष्ट व्हायला पुरेसे ठरले. तिच्या पित्याने, मित्र नावाच्या राजप्रधानाने हे जाणले आणि मैत्रेयीच्या इच्छेनुसार तिचे याज्ञवल्क्याशी लग्न लावून दिले. याज्ञवल्क्य, संसारात रमणारा नव्हता. मैत्रेयी हे जाणून होती. तिने संसारसुखाची अपेक्षाही मनात बाळगलेली नव्हती. 'काम' हा पुरुषार्थ असला तरी मुक्तीच्या मार्गात तो अनर्थ ठरू नये इतपत आवरलाच पाहिजे, प्रसंगी त्याचा संपूर्ण त्याग करण्याची पाळी आली, तरी त्यासाठी मन तयार ठेवलंच पाहिजे, हे मैत्रेयी जाणून होती. तशी विरागी वृत्ती तिच्या अंगी बाणलेलीच होती. त्यामुळेच याज्ञवल्क्याच्या असंसारी वृत्तीचा तिला उपसर्ग पोहोचला नाही. जाणून बुजून स्वीकारलेल्या या संसारी खडतर व्रताबद्दल मैत्रेयीची कुठलीही तक्रार नव्हती. नव्हे, याज्ञवल्क्याशी, त्याच्या आध्यात्मिक मनाशी मिळून मिसळून, अगदी एकरूप होऊन वागण्यानेच ती खरी सहचारिणी, अर्धांगिनी, धर्मपली म्हणून वेदकाळात आदर्श ठरली. 

वेदकाळी हे स्पष्ट दिसतं की, 'स्त्री' कुठल्याही क्षेत्रात पुरुषाशी स्पर्धा करीत नसली तरी मागे नव्हती. 'स्पर्धा' हा तिचा उद्देशच नव्हता. स्पर्धेची प्रवृत्ती काहीशा न्यूनगंडातूनच निर्माण होत असते. स्पर्धेच्या मूळाशी, नाही म्हटले तरी असूया आणि दुसऱ्यावर मात करण्याची उन्मादी भावना मनात असते, पण त्याकाळच्या समाजात, स्त्रीच्या मनाला स्पर्धेची कल्पनाच शिवली नाही. समाजाने ती तशी निर्माण होऊच दिली नाही. 'स्त्रीपुरुषसमप्राधान्य', वृत्तीत बाणल्यामुळे, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोण देखील वेगळाच जाणवतो. कुठल्याही कारणाने स्त्रीला तुच्छ लेखणे समाजाच्या मनातच आले नाही. तिचे स्वतंत्र आणि सन्मान्य स्थान समाज कधी विसरला नाही. स्त्रीवर पुरुषाचे स्वामित्व असते, ती त्याच्या मालमत्तेचा एक घटक असते, असल्या फाजील आणि अवास्तव कल्पना त्या समाजाच्या मनाला कधी शिवल्याच नाहीत आणि असे सगळे कधी घडूच दिले नाही.

मैत्रेयीने संसारात राहूनच, त्या दुःखदायक, तापदायक शरीरधर्माला बाजूला लोटणे हाच संन्यास आहे. संसारी राहूनच, खरे संन्यासी होता येते, हे आपल्या चरित्राने दाखवून दिले आहे. संन्यस्त वृत्ती ही विश्वाच्या समृद्धीसाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी नितांत आवश्यक आहे. पण ही सन्यस्तवृत्ती म्हणजे संसार सोडून पळणे नव्हे, उदासीन वृत्ती आणि निष्क्रीय प्रवृत्ती नव्हे, हे मैत्रेयीने, एका वेदकालीन ब्रह्मवादिनीने, मानवाला दिलेले अमोल वैचारिक धन आहे. भारतीय तत्त्वज्ञानातील तो मोठा ठेवा आहे. भारतीय तत्त्वज्ञान आणि भारत, म्हणूनच जगाला आदर्श ठरतो आहे आणि ही ब्रह्मवादिनी वेदकाळापासून कर्तृत्वशालिनी आहे. 

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवससातवा

Friday, September 26, 2025

⚜️ ब्रह्मवेत्त्याची माता : इतरा

वैदिक वाङ्मयात ब्रह्मवादिनी होत्या पण काही ब्रह्मवेत्त्याची माता म्हणूनही त्यांच्या कार्यातून स्मरणात राहतात अशीच इतरा ही एका ऋषीची पत्नी होती. ऋषीची ही दुसरी किंवा तिसरी पत्नी आणि इतरेपासून त्याला महीदास नावाचा पुत्र झाला. आधीच्या पत्नीपासून झालेली इतर संतती देखील होतीच. 'इतरा' ही तरुण व लावण्यवती पण अशिक्षित होती. ऋषी, विद्वान होता आणि समाजात त्याला प्रतिष्ठा होती. अनेक सम्मान मिळत, पण त्या सन्मानाच्या कुठल्याही समारंभात, तो आपल्या पत्नीला इतरेला बरोबर नेत नसे. पत्नीसह आमंत्रण असले तरी ऋषी एकटा जाई. इतरेला ह्याबाबत मनात सतत खंत वाटत असे. आपण अशिक्षित आहोत म्हणून काय झालं ? ती अनेकदा पतीला विचारी, "सभेत मी तुमच्या बाजूला बसले तर काय तुमची अप्रतिष्ठा होईल ?"

माझे रूप, माझे तेज आणि माझे तुमच्या जीवनातले पत्नी म्हणून स्थान ह्याची तुम्हांला लाज वाटते ? माझ्या सवतीची मुले मी सांभाळते, गृहस्थाश्रमाचा सगळा भार मी उचलते. तुमच्याइतकेच माझेही स्थान मोलाचे आहे आपल्या संसारात, मी शिकलेली नसेन पण सभेत काही चर्चा थोडीच करायची असते प्रत्येक वेळी ? तुमचा सन्मान होतो त्याप्रसंगी मी केवळ बाजूला बसले तर काय बिघडते ? - निमंत्रणं असतात मला देखील-" यावर ऋषी उत्तर देईना पण तिला समारंभालाही नेईना. पुढे मुले मोठी झाली तेव्हा तो मुलांना बरोबर नेई पण इतरेला मात्र नाही. इतरेचा पुत्र महीदास मात्र वडिलांबरोबर सभांना जाई. इतरा त्यातच समाधान मानू लागली. पण पती आपल्याला सभेला नेत नाही याचे शल्य मनातून जात नव्हते. दिवसांमागून दिवस कंठीत होते. एके दिवशी इतर सावत्र भावांबरोबर वडिलांसोबत सभेला गेलेला महीदास रडत घरी आला. आता त्याला समज आली होती. सभेत घडलं ते तो सहन करू शकला नाही. रडत आलेल्या आपल्या पुत्राला पोटाशी धरून इतरेनं मोठ्या ममतेनं विचारलं,

"काय झालं रे महीदासा ? आज तू एकटाच का परत आलास सभेतून ? आणि रडायला काय झालं ?" महीदास आणखीच स्फुंदून रडू लागला. "आता मला समजायला लागलं आहे आई आणि त्यामुळे नाही सहन होत हा प्रकार." तो कसाबसा बोलला. 'कुठला प्रकार बाळा ? " इतरा काकुळतीनं विचारती झाली. महीदासाला हुंदके आवरत नव्हते. तो रडू लागला. इतरेच्याही डोळ्यांतून अश्रूप्रवाह वाहू लागला, "काय झालं माझ्या राजा? रडू नकोस रे, सांग कुठला प्रकार घडला तो ?" भावनांचा आवेग अश्रू द्वारा वाहून गेला. मग महीदास हुंदके आवरत सांगू लागला. "बाबांना मी आवडत नाही. ते माझ्याकडं सभेत रागाने पहातात. मला खूप भीती वाटते. आज त्यांचा सन्मान होत होता तेव्हा त्यांनी माझ्या बाकी सगळ्या भावांना जवळ आसनावर बसविले, त्यांचं कौतुक केलं आणि मला मात्र दूर लोटलं, आणि तुला देखील बोलले. म्हणाले, "अडाणी आईचा गावंढळ पुत्र", आणि महीदासाच्या डोळ्यांतून पुनः अश्रूंचा पूर वाहू लागला. इतरेनं महीदासाचे अश्रू पुसले. तिचे नेत्र वेगळ्याच तेजाने चमकू लागले.

इतरा ६-७ वर्षाच्या महीदासाला हाती धरून घराबाहेर पडली. ऋषी पहातच राहीला. क्षणभर त्याला कळेचना की हे काय होतय . ती तिथून निघाली ती सरळ पृथ्वीकडे गेली आणि तिला म्हणाली, "तू आई आहेस सगळ्या विश्वाची. तुला सगळेच समान. तुझं प्रेम सगळ्यांवरच सारखं. तुझ्याजवळ कुठल्याच प्रकारचा पक्षपात नाही. पृथ्वी मनाशीच हसली. तिला सगळं समजलं होतं. तिनं महीदासाला पोटाशी धरलं. इतरेच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाली, “मी समजले आहे तुझं दुःख.. पण हिंमत सोडून कसं चालेल ? तू इथंच रहा माझ्याकडं. शिक्षण घे. महीदासावर, तो चांगला मुलगा होईल, सद्गुणी होईल, सगळ्यांशी प्रेमानं वागेल, असे संस्कार कर, "पण मी, ह्या वयात शिकणार कशी ? शिकायला, वय कधीच आड येत नाही. इंद्र बृहस्पतीकडे शिकायला गेला तेव्हा काय लहान बाळ होता ? पण महीदासाला शिकवायचंय मला. वेदविद्यापारंगत होऊन सभा जिंकायला पाहिजेत त्याने. तेही होईल. त्यालाही आश्रमात पाठवू आपण. इतरा सुखावली. पृथ्वीचे तिने पाय धरले. पृथ्वीने तिला उचलले. हा काय वेडेपणा ! तू माझी मुलगी, आईचे कर्तव्य मी करतेय, पाय कसले धरतेस माझे ?"

इतराने महीदासाला चांगले वळण लावले. इतरा स्वतः शिकली आणि महीदास एकाग्रतेनं गुरूगृही शिकू लागला. तो मोठा वेदविद्यापारंगत पंडित झाला. त्याने ऋग्वेदावर भाष्य लिहायला घेतले आणि काही अवधीतच संपूर्ण भाष्य लिहून पूर्ण केले. गुरू संतुष्ट झाले. सर्वत्र महीदासाची कीर्ती पसरली. ऋग्वेदावर भाष्य लिहीणारा हा कोण नवावतार ? त्याकाळी वेदातील, विशाल विश्वमंगलाची संकल्पना, व्यक्त करणारा, महान् मंगल ब्रह्म जाणणारा, ब्रह्मवेत्ता म्हणविला जाई आणि वेदोक्त ब्रह्मसंकल्पना सुस्पष्ट करणारे भाष्य ब्राह्मण म्हणविले जाई. महीदासाच्या भाष्याला ब्राह्मणग्रंथ म्हणून प्रतिष्ठा लाभली. इतरा सुखावली. स्वतः सुशिक्षित झाली होतीच. तिला पुत्राचे भाष्य करण्याचे पांडित्य समजले. गुरूने महीदासाला विचारले, महीदासकृतब्राह्मण ग्रंथ उद्यापासून महीदासब्राह्मण म्हणून ओळखला जावो. महीदास म्हणाला, "नाही, गुरूदेव, एका ऋषीचा पुत्र मागेच संपला. आता मी केवळ माझ्या आईचा पुत्र उरलो आहे. आईचं नाव इतरा आहे. माझं नाव 'ऐतरेय' आहे. म्हणूनच ह्या ग्रंथाचं नाव देखील ऐतरेय ब्राह्मण असेल. "  इतरेच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. पृथ्वीने समाधानाने निश्वास सोडला. उपस्थित विद्वजनानीं आसमंत दणाणून सोडला. ऐतरेयाचा जयजयकार असो.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवससहावा

Thursday, September 25, 2025

⚜️ ब्रह्मवेत्त्याची माता : जबाला

वेदवाङ्मयात अशी घायाळ पक्षिणी आहे, एक शूद्र स्त्री, जबाला तिचं नाव. दिसायला सुंदर. तारुण्य ओसंडून वाहत होते. त्यातच पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार हिंडणे क्रमप्राप्त होते , आणि घराबाहेर, एक नव्हे तर अनेक लांडगे फिरत असतात, असहाय आणि अबल सौंदर्यावर तुटून पडणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतातच. त्यांच्या वासना प्रबळ बनतात आणि त्यात सौंदर्याची, दुर्बल यौवनाची आहुती पडते. जबाला ही अशीच एक तरुणी. अनेक वासनांना बळी पडलेली होती. नाईलाजानं, इच्छेविरुद्ध, केवळ अगतिक बनून, लाचार होऊन दिवस कंठीत होती. त्यातच प्राप्त झालेले निरपराध मातृत्व यात मातृत्व तसे निष्पापच. पापी आणि बदनामी प्रवृत्तीपासून जन्मलेला माणसाचा नवा निरपराध जीव सन्मानानं मान वर करून जगलाच पाहिजे हाच अट्टहास जबालाचा होता. जबालानं त्याला जिव्हाळ्याने वाढवलं, ओठातला अर्धा घास त्याच्या पोटात घालत पोसलं. तो जबाला पुत्र दिनमानानुसार वाढत होता.

आता तो शिकायला योग्य झाला, पण कोण शिकवणार त्याला ? कुठल्या आश्रमात पाठवायचं त्याला? कोण ऋषी त्याच्या आश्रमशाळेत त्याला प्रवेश देईल ? जबालाच्या मनात आलं की, माझा पुत्र सत्शील आहे. मी त्याच्यावर चांगले संस्कार केलेत. त्याचा, त्याच्या मनावर ताबा आहे. त्याने त्याच्या इंद्रियांना वाटेल तसे भरकटू दिलेले नाही. इंद्रियांचे नसते लाड पुरवायला आहे तरी कुठे बळ आमच्यात ? पण बिघडायला कुठं वेळ लागतो लहान मुलांना? उलट, दारिद्र्य असले, सभोवारचे वातावरण गलिच्छ असले की मुले संगतीनं बिघडतातच ना ? पण जबाला, ती माता, तिनं असं बिघडू दिलं नाही आपल्या पुत्राला.

 'सत्यकाम', असं नाव ठेवलं, सत्याची इच्छा करणारा. सत्याचाच पाठपुरावा करणारा असावा तो पुत्र, अशीच तिची मनीषा. तेव्हा सत्यकाम, अनुकूल वयाचा होताच तिनं त्याला गुरूगृही पाठवायचं ठरविले. मग तिने उपनयन, मौंज करायला पाहिजे असं ठरविले. पण ती कुठून करणार ? कोण करणार तिच्यासाठी पौरोहित्य? तिला ज्ञान तरी कुठं आहे अशा विधीचं ? जबालेनं सत्यकामला सरळ एका आश्रमाकडे धाडलं. तो आश्रम हारित ऋषींचा होता. हारितऋषी एक ब्राह्मण. उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आश्रमात प्रवेश घ्यायला गर्दी होई. श्रीमंत, राजे आणि शासक यांची मुले मोठ्या संख्येनं त्या आश्रमात होते. सत्यकाम त्या आश्रमात येताच गोंधळला. सत्यकाम एकटाच बाजूला उभा होता. दुपारचे उन्हं कलले, गर्दी ओसरली , घामानं थबथबलेला सत्यकाम अजूनही बाजूलाच उभा होता, हारितऋषींचं त्यांच्याकडं लक्ष गेलं.
"कोण बाळ तूं ?"
"मी सत्यकाम. "
"काय काम तुझं माझ्याकडं ?"
"मला शिकायचंय. "
"मग दूर का उभा राहिलास. ये." हरितांनी त्याला जवळ घेतलं. “एकटाच आलास, असू दे. उपनयन झालं तुझं ?" सत्यकाम गोंधळला. स्तब्ध राहिला. "असू दे. तुला मी शिकवेन.

सत्यकाम आनंदला. शिकायचं, आईचं नाव काढायचं. आईला सुखात ठेवायचं. ही सगळी स्वप्न पूर्ण होणार म्हणून तो उल्हसित झाला. हारित ऋषींनी त्याचं नाव टिपलं आणि जिव्हाळ्यानं विचारलं, "वडिलांचं नाव काय तुझ्या ?" वडिलांच नाव ? हे शब्द ऐकताच सत्यकाम गोंधळला. घरी आईखेरीज कुणी नव्हतंच. कधी कुणी पुरुष घरात पाहिला नव्हताच. आई कष्ट करायची. जेवू घालायची. आईनेच वाढविलं. स्वच्छता राखायला शिकवलं शरीराची आणि मनाची देखील, तेही आईनंच. मला कधी कुणाचं भय वाटू दिलं नाही, पूर्ण संरक्षण दिलं ते आईनंच. खरं बोलावं, ह्याचं वळण आणि खरं वागावं ह्याचं आचरण, तिनंच अंगवळणी पाडलं माझ्या. तेव्हा काय उत्तर द्यायचं ऋषींच्या प्रश्नाचं ?

"वडील नाहीत तुला ?” हरितांनी हळूच विचारलं. पण ह्याही प्रश्नाचं उत्तर सत्यकामाला ठाऊक नव्हतं; पण हा प्रश्न का विचारला ऋषींनी, हेही कळेना त्या बालमनाला, तो स्तब्धच होता. "जा आईला विचारून ये." हारितांनी सांगितलं. तो आईकडं आला. "आई, आश्रमा प्रवेश मिळतोय मला,पण वडिलांचं नाव विचारताहेत ऋषी. काय आहे माझ्या वडिलांचं नाव ?" जबाला त्या प्रश्नानं एकदम खचली. कुणाचं नाव सांगणार? अनेक लांडग्यांनी, वासनांनी पिसाळलेल्या, नराधमांनी माझ्या असहायतेचा, अगतिकतेचा गैरफायदा घेतला आहे आणि ते नामानिराळे झाले आहेत. त्या अनेकांपैकी कुणाला तरी विचारावं का की तुझं नाव सांगू का ? तो प्रत्येकजण भ्याड निघेल. स्वतःच्या सुखासाठी केलेले अधमकृत्य, माझ्या माथी पाप म्हणून मारताना तो कचरणार नाही. हा भ्याडपणा माझ्या लाडक्या सत्यकामाला, वडिलाचं नाव मिळवून देणार नाही. पण त्या नावाची गरज तरी का वाटते समाजाला ? मी जन्म दिलाय माझ्या मुलाला एवढे पुरेसे नाही ? माझं नाव पुरेसं नाही? जिनं नऊ महिने गर्भ वाढविला, जीवावरचं संकट झेलून, सगळे कष्ट सोसून जिनं पुत्राला जन्म दिला, माणसाचा वंश जिनं जीवापाड जपून वाढविला आणि एकटं जगून, कुणाच्याही मदतीविना तो सुरक्षित राखला, चांगले संस्कार करून त्याला खरं बोलणारा, खरं वागणारा बनविला, त्या मातेला काहीच मोल नाही? मातृत्व मातीमोल का मानणार हा समाज ? तिनं सत्यकामाला आपल्या लाडक्या पुत्राला पोटाशी धरलं. अश्रूंचा प्रवाह डोळ्यांतून घळघळा वहात होता. सत्यकाम त्या अश्रूंनी न्हाऊन निघाला. 

"आई ! वडिलांचं नाव विचारलं म्हणून रडतेस? वडील नाहीत मला? ऋषींनी विचारलंच होत तसं." "वडील असून नसल्यासारखेच समज. पण ऋषींना वडिलांच्या नावाचीच का गरज वाटते? त्यांना आईचं नाव सांग. म्हणावं मी सत्यकाम आहे. जबाला ही माझी आई व बाप आहे " "पण ते वडिलांचं नाव विचारून ये म्हणाले होते, तर त्याबाबत काय सांगू?" "खरं तेच सांग की, आईनं अनेकांची सेवा केली तरुणपणी आणि माझा लाभ झाला तिला. सत्यकामानं आईला नमस्कार केला आणि तो पुन्हा हारितऋषींकडे गेला.

जबाला मनात चिंतीत झाली. माझ्या मुलाला हारितऋषी आश्रमात घेतील ना? वडिलांच नाव पाहिजे, आईचं चालणार नाही असं ते म्हणतील का? पण त्यांनी तसं का म्हणावं ? पित्यापेक्षा माता श्रेष्ठ असते. माता ही आदिगुरू आहे. माता ही आदिशक्ती आहे. पुरुषसमान तिलाही प्रतिष्ठा आणि सन्मान समाजानं दिला आहे, ऋषीमुनींनी मानला आहे. मग पित्याऐवजी मातेच्या नावानं का ओळखला जाऊ नये पुत्र ? मुलाच्या नावापुढं वडिलांऐवजी आईचं नाव का लावू नये? अनेक प्रश्न तिच्या मनात उभे झाले. तिचा जीव कासावीस झाला. तिकडे सत्यकाम हारितांच्या आश्रमात पोहोचला. हारितऋषी समोरच उभे होते. त्यांनी सत्यकामाला ओळखले, लगेच विचारले, "बाळ, विचारलंस वडिलांचं नाव ?" 'होय. पण मला आश्रमात प्रवेश देण्यासाठी वडिलांच्या नावावाचून अडेल का ? तुम्ही लिहा, माझं नाव, सत्यकाम,' मी माझ्या आईचा जबालाचा पुत्र, तेव्हा माझ्या नावापुढं लिहा, माझ्या आईचं नाव, जबाला, मला ओळखा सत्यकाम जाबाल म्हणून. ऋषींनी स्मित केलं. क्षणभर कौतुकानं, त्या इवल्याश्या सत्यकामाकडं पाहिलं. धैर्यवान जबालाचं त्यांनी अभिनंदन केलं. 'मातृवान् पुरुषो ।" ते म्हणाले. 'स्त्री' ची प्रतिष्ठा, स्त्रीचा सन्मान - स्त्रीचं गुरू म्हणून प्रथम स्थान, आपल्या संस्कृतीनं मानलं आहे.  तुला मी प्रवेश दिलाय. जबाला गहिवरला. धावत आईकडं गेला. आईच्या आनंदाला पारावर उरला नाही. 

स्त्रीला पुरुषसमानच नव्हे, तर अधिकच मान आणि प्रतिष्ठा देणाऱ्या समाजाचे, संस्कृतीचे, जीवनशैलीचे जबाला हिने मनात आभारच मानले असतील. ही ब्रह्मवादिनी नसली तरी ब्राह्मवेत्त्याची माता म्हणून कर्तृत्ववान वाटते. खरंतर सत्यकाम जबाला याच्याकथेनी पुरुषी अहंकाराला, शरीरबलाच्या जोरावर प्राधान्य लादायला सरसावणाऱ्या पुरुषी प्रवृत्तीला, पायबंदच बसला असेल. 

सर्वेश फडणवीस

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसपाचवा

Wednesday, September 24, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : सरस्वती

खरंतर युगायुगातून एका विशिष्ठ सामाजिक अवस्थेचे दर्शन अटळपणे घडत असते. एक मोठा वर्ग अज्ञानी असतो. आपल्या अज्ञानापायी सतत दुःख भोगत असतो, अन्याय सहन करीत असतो, केवळ मरण जगत असतो. पण त्याला त्याची कधी खंत वाटत नसते, कारण त्याला त्याची कधी जाणीवच होत नसते. आपलं जीवन हा एक शाप आहे आणि तो भोगणे क्रमप्राप्त आहे अशी समजूत तो उराशी घट्ट बाळगून असतो. 

वेदकाळी एका स्त्रीने हे सगळे केले. तिने त्याकाळी अशा अजाण आणि अभागी वर्गाला नेतृत्व दिले. असा वर्ग राष्ट्रीय प्रवाहापासून दूर जातो आणि राष्ट्रापुढे संकट होऊन उभा ठाकतो. त्याला तिने समजूतदारपणे वळणावर आणले, मूळ राष्ट्रीय प्रवाहात सहज आणून सोडले, त्यांचे जीवन इतरांच्या सुखी व समृद्ध जीवनाशी एकरूप करून टाकले. ह्या वेदकालीन स्त्रीचं नाव आहे ब्रह्मवादिनी सरस्वती.

शरीर, वाणी, मन आणि बुद्धी ह्यांची चार प्रकारची ओजस्वी शक्ती, ह्या सरस्वतीनं त्या अडाण्यांना, शहाणं करून दिली. तिने त्यांना जीवन दिले. 'कुठे कुणी गेलंय का तिच्यापुढे, ती एकटीच हे कार्य करते आहे'. असं ऋग्वेद सांगतो. त्याकाळी पुढाऱ्यांनी वाणी निर्माण केली आणि आपल्यापाशीच ठेवली. सरस्वतीने सर्व प्रकारच्या प्राणिमात्रांच्या जीवन जगणाऱ्यांसाठी ती मोकळी केली. श्रीमंत, मध्यमवर्ग आणि गरीब ह्या सर्वांमध्ये ती वावरत असे. तिने ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र आणि निषाद म्हणजेच अरण्यांत रहाणारे आदिवासी ह्या पंचजनांची समृद्धी साधली. कुठेही भूक, उपासमार वा अन्नटंचाई दिसली की, सरस्वतीची आठवण झालीच समजा. ती, ही अन्नाची गरज त्वरीत दूर करी. कुणालाही भूकेपायी वा अन्न नाही, म्हणून तिने यातना सोसू दिल्या नाहीत. सर्वांचे जीवन शेतीच्या जोरावर समृद्ध करणारी ही सरस्वती त्याकाळी नदी स्वरूपच वाटली. मुक्या माणसांना तिने वाचा दिली, त्यांचं दुःख जगापुढं मांडायला वाणीचं शस्त्र दिले, चेतना आणि चैतन्य अंगी बाणवून तिनं समृद्ध केले. मग ही सरस्वती देवी त्यांना श्रेष्ठ आईच वाटली, वाग्देवी वाटली, म्हणूनच ते सरस्वतीला म्हणतात,

 'अम्बितमे, नदीतमे देवितमे सरस्वति । ज्या बिचाऱ्यांना ज्ञान नव्हते, बोलता येत नव्हते, अज्ञानी म्हणून समाजात प्रतिष्ठा नव्हती, त्यांना तिने समाजात इतरांबरोबर सुप्रतिष्ठित केले. त्यांना मान मिळवून दिला. तिने सर्व समाजार्थ उत्थान साधले. ती राष्ट्राची बनली, राष्ट्रदेवी झाली. तिने समाज व राष्ट्र यांचे उत्थान साधण्यासाठी त्या काळच्या सर्व बलवान नेत्यांचे साहाय्य घेतले, ती रुद्र, मरुत, वसू, आदित्य, आणि इतर पुढारी ह्यांच्यासोबत सर्वत्र वाऱ्यासारखी फिरत होती, जनतेच्या अडचणी दूर करीत होती. त्यांचे अज्ञान घालवून, त्यांचे जीवन सुखी व समृद्ध करीत होती. अशावेळी कुणी "ज्ञानविरोधी" आढळला तर त्याची तिने गय केली नाही. जनसामान्यांच्या कल्याणासाठीच ती लढली. सामान्यांचे कुठे अहित होत असेल, तर ती त्यांच्या बाजूने सदैव उभी ठाकली. सरस्वतीने लोकांना शब्द शिकविला, ज्ञान अर्पण केले, शहाणे करून सोडले आणि समृद्धी साधायला समर्थ बनविले. तिच्यामुळेच लोकांना अन्न मिळाले, दृष्टिसुख प्राप्त झाले, गोड वाणी कानी पडली आणि मोकळा श्वास सुखाने घेता आला.

सरस्वतीचा महिमा फार मोठा होता. श्वेतवस्त्र धारण करणारी, ती शांत व धीरगंभीर स्त्री त्या काळच्या अनेक नेत्यांना सांभाळून घेत होती. मित्र वा वरुण असो, इन्द्र वा अग्नी असो, त्वष्टा आणि पूषा असो की सोम किंवा अश्विनी असो , सरस्वतीने नेतृत्व आणि धारण पोषण करत त्यांना वाणी आणि ज्ञान देऊन परिपूर्ण केले आहे ,  सत्याचे आचरण करणारा, न्यायी, कर्तव्यतत्पर, सरळमार्गी आणि सर्वाप्रती आदराने वागणारा पुरुष, नेत्यांना आणि समाजालाही आवडतो. सरस्वती अशांचीच चाहती होती. अशांना ती नेहमी बळ देई. ज्ञानसंपन्न बनवत होती आणि ऋषीपदाला नेत होती. मग त्यांना भूतकाळाचे भान राखून भविष्याचा वेध घेण्यास ती तयार करत होती समाजाचे नेतृत्व करण्याचा मान त्यांना सहज प्राप्त होत होता. ते ब्राह्मण म्हणून गणले जात होते, ऋषी मानले जात होते, बुद्धिमंत म्हणून पूजिले जात होते.

सरस्वतीची वृत्ती राष्ट्रीय होती. तिने वाणीच्या जोरावर सर्वांना एकत्र आणले, जनांची एकात्मता व संघवृत्ती बळकट केली. एकसंघ, एकजीनसी व एकात्म समाज व राष्ट्र तिने घडविले. धनधान्याची समृद्धी साधण्याचे मार्ग तिने जाणले आणि इतरांसाठी झिजणाऱ्यात अग्रक्रम मिळविला. मग त्या काळच्या इतर नेत्यांनादेखील, तिला कुठे ठेवू नि कुठे नाही, असे झाले. तिला त्यांनी सर्वत्र प्रतिष्ठित केली. ती निरनिराळ्या रूपात लोकांत ओळखली जाऊ लागली. सरस्वती ही सृष्टीची श्रेष्ठ शक्ती ठरली. स्त्रियांना लाभलेले हे वाणीचे सामर्थ्य योग्य जागी व योग्य प्रकारे वापरले जावे, सरस्वतीचे हे वरदान सर्वथा सफल व्हावे, हीच आजदेखील अपेक्षा आहे.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला #दिवसचौथा

Tuesday, September 23, 2025

⚜️ ब्रह्मवादिनी : अदिती

आदिशक्तीच्या पर्वकाळात आपण वेदकालीन स्त्रियांबद्दल जाणून घेत आहोंत ‘अदिती' ही ब्रह्मवादिनी अर्थात वेदातील एक स्त्रीव्यक्तिरेखा. मातृत्वाचा एक सर्वोच्च आविष्कार. मातृत्वाला प्राप्त झालेला एक अर्थ. आद्य जगद्गुरू शंकराचार्य आपल्या 'देव्यापराधक्षमापन' स्तोत्रात म्हणतात, 'आई, मी तुझी कधी सेवा केली नाही, कधी तुला कवडीही दिली नाही, कदाचित् त्रासच दिला असेल, सर्वथा, तरी, माते तू, माझ्यावर केवळ प्रेमच केलंस, निरभिलाष आणि निरुपम प्रेम. - 'जगात पुत्र वाईट निघेल पण आई कधीही वाईट संभवणार नाही'. 'कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति'. 

इंद्र हा अदितीचा पुत्र म्हणविला आहे. वामदेव ऋषी अदितीला आठवण करून देतात की, 'माते, तुला इंद्राने काय कमी त्रास दिला? कितीतरी काळपर्यंत तू त्याला गर्भातच वाढवले, पण तिथं असताना देखील त्याने तुला खूप त्रास दिला आहे नं?' अदिती माता त्यावर सांगते की, 'नाही रे, वामदेवा, माझा पुत्र भूतकालीन आणि भविष्यकालीन अशा सर्व देवात आणि मानवात अद्वितीय असा आहे'. आत्यंतिक त्रास सोसूनही पुत्राचे गुणगान करणाऱ्या त्या मातृत्वाचा, वत्सलतेचा, पुत्रप्रेमाचा, वामदेवावर विलक्षण प्रभाव पडला. मातेची थोरवी त्याला उत्कटत्वाने जाणवली. सहस्त्र अपराध पोटात घालून ही माता त्याचे गुण तेवढेच जगात आविष्कृत करते, हे पाहून वामदेव थक्क झाला. इंद्र गर्भात असल्यापासूनच त्याच्या उपद्रवापायी त्रस्त झालेल्या जगानं त्याला त्या अवस्थेतच मारण्याचा प्रयत्न केला, पण अदिती मातेनं त्याला अनंतकाळपर्यंत पोटाशी लपविला, जगाच्या मारक हल्ल्यातून वाचवला, हे वामदेवाने जाणले व पुत्राचे गुण तेवढे जगापुढे गाणाऱ्या ह्या अदितीचा त्या वामदेवावर पुढे असा परिणाम झाला की, आधी इंद्राची वाटेल तशी निर्भत्सना करणारा हा वामदेव त्या इंद्राची एकापाठी एक स्तुतीस्तोत्रे गाऊ लागला. पुत्रावर असे अपार प्रेम करणारी ही माता आपल्या नसत्या लाडांनी आपले पुत्र बिघडणार मात्र नाहीत ह्याची पुरेपूर काळजी घेते. तिनं इंद्राला सर्वथा बलवान केलं, त्याचं शरीर दणकट आणि मन बळकट बनविलं. त्याला स्वावलंबनाचे आणि स्वयंपूर्ण होण्याचे पाठ दिले. अन्यायाविरुद्ध लढण्याचे धडे दिले, सर्वांच्या कल्याणासाठी अत्यंत उपकारक नव्हे, दुसरे जीवनच असे 'पाणी' सगळ्या मानवांना मुबलक मिळावे म्हणून तिनं इंद्राला प्रेरणा दिली आणि प्रसंगी भयानक युद्धे करायला लावून अडलेले आणि तुंबलेले पाणी प्रवाहित करायला लावले. जगाच्या कल्याणासाठी लढणारा पुत्र घडविला तो या अदितीनेच. 

आईने मुलांचे लाड अवश्य करावेत पण त्याचबरोबर त्याला कडक शिस्तीद्वारा जीवनाला यशस्वीपणे सामोरा जायला योग्य बनवावं, असं अदितीनं जगाला शिकवलंय. तिनं आपल्या पुत्रांना सर्व क्षेत्रात आघाडीवर ठेवलं. त्यांना पुढारी बनविलं नव्हे, देवत्व बाणविलं त्यांच्या ठायी. आणि हे करताना ती कोमल माता, अतिशय कठोरही बनली. ऋग्वेद सांगतो की, तिनं लोहारासारखे घणाचे घाव घालून हे देव घडविले.

'सं कर्मार इवाधमत् देवानां पूर्व्ये युगे' । वर्णनातीत वात्सल्य, प्रचंड प्रेम आणि जन्मजात जिव्हाळा, अदितीमातेतच जाणवला, तो स्त्रीत्वाचा एक अंगभूत गुण म्हणून. म्हणूनच स्त्रीचं प्रेम केवळ पुत्रावरच असतं असं नाही, स्वतः झिजून इतरांना जिव्हाळा लावणं, त्यांचं संपूर्ण जीवन सुखी करणं, त्यांची विविध प्रकारे काळजी घेणं हे स्त्रीच्या जणू रक्तातच असतं. अदितीनं हे दाखवून दिलं आहे. म्हणूनच स्त्री ही माता म्हणून पुत्राची काळजी घेते, तशीच मुलगी ह्या नात्यानं वडिलांची आणि पत्नीची भूमिका बजावताना पतीचीही जीवापाड काळजी घेते. वडिलांना पुत्रापेक्षा अधिक जिव्हाळा आणि प्रेम लाभतं ते कन्येकडूनच, आधार आणि आसरा लाभतो तो मुलीचाच अधिक आणि अकृत्रिमही. पित्याने मुलीला जन्म द्यावा आणि मुलीने पित्याला विवंचनेपासून दूर ठेवून सतत प्रेरणा द्यावी, आपले कर्तव्य करायला. आदितीने वडिलांना तसे घडविले, म्हणूनच ऋग्वेद म्हणतो, हे दक्षा, अदिती, जी तुझी कन्या तिनं तुला जन्म दिलाय. 

शतपथ ब्राम्हणाने पिता आणि गुरू ह्यांच्यापेक्षाही माता श्रेष्ठ म्हटली आहे. 'मातृवान पितृवान आचार्यवान पुरुषो वेद" । कारण अपार मेहनतीने ती मुलांवर संस्कार करते आणि त्यांना अग्रेसर बनविते. समाजाला मार्गदर्शन करणारे सतत सुखी आणि समाधानी ठेवणारे देवपण, पुढारीपण ती पुत्रांच्या ठायी निर्माण करते. म्हणूनच अदितीला देवांची निर्मिती करणारी म्हटले आहे. तिला जगाची माता म्हटले आहे. तिचे अनेक पुत्र आहेत कारण तिनं अनेकांना घडविलं आहे. विश्वनिर्माते  आणि जगदाधार देव, देवत्वाला पावले ते तिच्यामुळेच. 

मातेच्या कर्तृत्वाला मर्यादाच नाहीत हे दर्शविणारी ही माता म्हणूनच 'अ' म्हणजे नाही, 'दिती' म्हणजे मर्यादा अशी अदिती म्हणून संबोधिली आहे. तिनं दाखवून दिलंय की, आईच्या रूपात 'स्त्री' ही आदिशक्ती आहे. जगन्माता म्हणून ती सर्ववंद्य आहे. तिच्या अपार शक्तीची, अगाध कर्तृत्वाची आणि अमाप सामर्थ्याची जाणीव मात्र स्त्रीला व्हायला पाहीजे, स्त्रीचं मातृरूपी तेज. विश्वोद्धारक आहे, तसेच ते विश्वसंहारकही आहे. अदितीच्या तेजाचा अंकूर, तिचा पुत्र तिनं असाच सामर्थ्यवान बनविला आणि तो विश्ववंद्य झाला. 

अदिती मातेने हा धर्म जगाच्या आचरणात नित्य राहील ह्याची कठोरपणे काळजी घेतली म्हणूनच तिला 'ऋताधार' म्हटले आहे. आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे करुणा, दुसऱ्याला जीवन देण्यासाठी सतत वापर करावा हा संस्कार घडविते ही माता. म्हणूनच तिच्या कर्तृत्वाचा प्रकाश अविनाशी व दिव्य ठरला आहे. अदितीचे हे ज्ञान, हे भान आणि हे कर्तृत्व म्हणजेच मातृत्व होय. आईची थोरवी म्हणूनच मोठी, म्हणूनच आई म्हणजेच एक आदिशक्ती, नित्यनूतन, निर्माणक्षमशक्ती आणि आई हे स्त्रीचेच एक रूप म्हणून 'स्त्री' ही एक आदिशक्ती आहे असे अदिती, ही वेदकालीन स्त्री सांगून जाते.

सर्वेश फडणवीस 

#ब्रह्मवादिनी #लेखमाला #नवरात्र #दिवसतिसरा