Friday, May 3, 2024

सहवासाच्या चांदण्यात 🌠

चांदण्याचा सहवास कुणालाही हवाहवासा वाटतो. पण साहित्याच्या सहवासात हे चांदणं अधिक आशादायक, दिलासादायक, आनंदी आणि स्वच्छंदी असतं यात शंकाच नाही. मध्यंतरी एका छान पुस्तकाच्या प्रवासाचा भाग होता आले ही नक्कीच पूर्वपुण्याई असावी असे वाटते. विजयाताई राम शेवाळकर यांच्याशी रेखा चवरे यांनी साधलेला हा संवाद नुकताच २ मार्चला शेवाळकरांच्या अंगणात दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांच्या हस्ते प्रकाशित झाला. अनेक दिवसांपासून यावर लिहायचे मनात होते. पण आजचा दिवस राखून ठेवला होता. पुस्तक प्रकाशनापूर्वी रेखा ताईंनी वाचायला पाठवले आणि एका बैठकीत पुस्तक वाचून पूर्ण झाले. ८४ पानांच्या या पुस्तकातून विद्यावाचस्पती वक्तादशसहस्त्रेशु राम शेवाळकर यांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे पुस्तक. राम आणि विजया शेवाळकर यांच्या आठवणींची वाक्गंगा म्हणजे हे पुस्तक आहे. रेखा चवरे यांच्या इच्छेला त्वरित होकार देणाऱ्या विजयाताई आणि या सुवर्णसंधीचा फायदा घेत आता अजरामर झालेली ही कलाकृती जन्माला आली.

काही योगायोग हे नियतीने लिहिलेले असतात कारण आज ३ मे नानासाहेबांचा स्मृतिदिवस आणि बरोबर त्याच्याच एक दिवस आधी अर्थात काल २ मे ला विजयाताई शेवाळकर यांनी या जगाचा निरोप घेतला. नानासाहेबांबरोबर प्रत्येक क्षण अनुभवलेल्या, सुखदुःखात नव्हे तर प्रत्येक क्षणी सावली सारखी साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी असणाऱ्या विजयाताई साहित्याच्या सहवासाच्या चांदण्यात विलीन झाल्या असल्या तरी या पुस्तकातून आणि आठवणीच्या चांदण्यात कायमच स्मरणात राहणाऱ्या आहेत.

अत्यंत देखणे मुखपृष्ठ हे देखील या पुस्तकाचे वेगळेपण आहे. राम शेवाळकर आणि विजया शेवाळकर यांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्यावेळी काढलेले हे छायाचित्र आहे. single picture speaks more than a thousand words. This one picture tells its own story. असं म्हंटल तर प्रत्येकाने अनुभवलेले आणि प्रत्येकाला भावलेले असे हे दोघे मुखपृष्ठ बघितल्याक्षणी जाणवतील. खरंतर विजयाताईंना बोलतं करण्याचे फार मोठे काम रेखा चवरे यांनी केले आहे. साहित्याच्या हिमालयात राहणाऱ्या विजयाताई पण त्यांनी सावलीसारखी साथ राम शेवाळकर यांना दिली आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळली. यांच्या संपर्कातील अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. मुलाखत संग्रहातून विजयाताईंनी मोकळेपणाने आणि आपुलकीने आपल्या संसारातील अनेक चांगल्या गोष्टींचा खजिना वाचकांसाठी यानिमित्ताने रिता केला आहे.

पुस्तक वाचतांना तुमच्या माझ्या अनेकांच्या घरातीलच हे प्रसंग असतील इतके ते सजीव आणि सुंदर आहे पण साहित्याच्या वटवृक्षात त्या कशा बहरत गेल्या आणि अधिक समृद्ध होत गेल्या यासाठी हे पुस्तक वाचनीय आहे. आदरातिथ्य करण्यात या दांपत्याचा हात कुणीही धरू शकणार नाही. जे मिळेल ते स्वीकारण्याची यांची वृत्ती प्रत्येकाला अनुकरणीय आहे. पुस्तकातून नानासाहेबांचे जसे विविध पैलू वाचायला मिळतात तसे विजयाताईंचे पाककलेच्या गुणाबद्दलही वाचायला मिळते.

मुलाखतीच्या शेवटी मुलाखतकार रेखा चवरे-जैन विजयाताईंच्या एकूण प्रवासाबद्दल खूप छान व्यक्त होतात.'सखी, पत्नी, मैत्रीण, शिक्षक, मदतनीस, लेखनिक आणि प्रसंगी आईचीही भूमिका पार पाडत नानासाहेबांना शारीरिक, भावनिक, मानसिक आधार देणाऱ्या, नानासाहेबांशी एकरूप होऊन देखील स्वतंत्र अस्तित्व राखणाऱ्या विजयाताई नानासाहेबांबद्दल भरभरून व्यक्त होतात हे वाचतांना जाणवते. बहुआयामी अशा नानासाहेबांचे विविध पैलू उलगडून कलावंत म्हणून आणि माणूस म्हणून त्याचे जे दर्शन विजयाताईंनी घडविलं ते स्तिमित करणारं आहे. प्रत्येक प्रसंगात मुलगा, सून, नात यांच्यासोबत राम शेवाळकर आणि विजयाताईंचे संबंध किती मोकळे, संकोच विरहित होते याचीही कल्पना येते आणि एकंदरीत शेवाळकर घराण्यातील हे चांदणे त्यांच्या आयुष्यात  येणाऱ्या प्रत्येकाला आनंदी, समृद्ध करणारे आहेत.

वैशाखात जसा मोगरा मानवी मनाला शांतता, शीतलता आणि सुगंधी दरवळ देणारा असतो तसंच काही नानासाहेब आणि विजयाताईंनी शेवाळकर कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला सुगंधी अत्तर दरवळणारे क्षण प्रदान केले. वाचकांच्या जवळ आवर्जून संग्रही असावा असा संग्रह म्हणजे सहवासाच्या चांदण्यात.

सहवासाच्या चांदण्यात
मुलाखतकार: रेखा चवरे-जैन
प्रकाशक: विजय प्रकाशन, नागपूर

सर्वेश फडणवीस

Thursday, May 2, 2024

स्वरगंधर्व सुधीर फडके


स्वरगंधर्व सुधीर फडके. १ मे महाराष्ट्र दिन आणि त्याच दिवशी महाराष्ट्रात घडलेले आणि मराठी गीतविश्वाला आपल्या संगीताने जागतिक पटलावर घेऊन जाणारे स्वरतीर्थ सुधीर फडके यांचा बायोपिक बघण्याचा अमृतयोग आला. सुधीर फडके उर्फ बाबूजी तमाम मराठी रसिकांना जीवापेक्षा प्रिय होते. त्यांच्याविषयी सर्व जाणून घेण्याची ओढ आजही मराठी माणसात भरभरून आहे. बाबूजींची संगीतमय कारकीर्द प्रचंड आहे आणि या प्रवासात अनेक किस्से, गोष्टी, प्रसंग असे आहेत, जे सर्वसामान्यांना माहिती नाहीत. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपट १७० मिनिटे पण पहिला मध्यांतर होईपर्यंत वेळ कसा जातो कळतच नाही. बाबूजींचा प्रवास हा अनेकांना ऐकून माहिती आहे कुणी तो वाचला आहे पण प्रत्यक्ष पडद्यावर बघतांना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक दुपटीने वाढणारा आहे. 

बायौपीकची सुरुवात गाणारे व्हायोलिन म्हणून ओळखले जाणारे प्रभाकर जोग यांच्या इन्स्ट्रुमेंटल मेडलीने होते. तब्बल २६ मूळ बाबूजींनी गायलेली गाणी या चित्रपटाची वेगळी बाजू आहे. एवढी गाणी असून सुद्धा जाणवत नाही इतकी ती त्यांच्या संपूर्ण आयुष्याशी समरस झालेली आहेत हे चित्रपट बघतांना जाणवतं. दूरदर्शनच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात अशोक रानडे यांनी बाबूंजींच्या घेतलेल्या मुलाखतीतून बाबूजींचा जीवनपट उलगडत जातो. लहान वयातच कोल्हापूरमधील बाबूजींची संगीताबद्दलची आवड दाखवणारे प्रसंग छान जमले आहेत. 

प्रतिकूल परिस्थितीशी, जीवाची घालमेल प्रसंगी आत्महत्येचा विचार आणि खिशात पैसे नसतांना होरपळलेले बाबूजी बघितल्यावर अंगावर काटा आला. देशभर अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम मिळवण्यासाठी झालेले प्रयत्न आणि एका वेळचे जेवणही मिळवताना झालेले कष्ट आणि रडकुंडीला आलेले बाबूजीं, असं काही बघितले की वाटतं आपल्याला प्रसिद्ध व्यक्तींचं प्रसिद्धीच्या यशोशिखरावर असलेले आयुष्य, मिळणारी वाहवा दिसते पण त्यामागची खडतर तपस्या आणि संघर्ष  दिसत नाही. पोटात अन्नाचा कणही नसतांना गाणे गाण्याची जिद्द बघून डोळे पाणावतात. 

चित्रपटाबद्दल अनेकजण लिहितील पण मला भावलेला आणि आवडलेले बाबूजींचे पैलू यानिमित्ताने मांडण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धिमत्ता, प्रतिभा, कल्पकता आणि इतर प्रांतातील संगीताचा अभ्यास या सर्व गोष्टींचा वापर करून एक वेगळंच युग सुधीर फडके यांनी निर्माण केलं. ज्याचा परिणाम आजही जाणवतो आणि पुढेही जाणवत राहील. प्रख्यात संगीतकार, मनस्वी गायक, प्रखर राष्ट्रभक्त, सावरकरनिष्ठा अशा गुणवैशिष्ट्यांनी युक्त असणारे महाराष्ट्राचे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके. त्यांच्या बायोपिक मधून जाणवतं की कोणतेही काम एकदा स्वीकारलं की, ते अत्यंत मनापासून आणि अतिशय चांगल्या रीतीनेच करायचं, मग त्यासाठी कितीही कष्ट पडोत, वेळ लागो अथवा पैसे खर्च होवोत; पण चांगलंच करायचं हा त्यांचा स्वभाव होता.

प्रत्येक मराठी माणूस बाबूजींच्या सुरांचा चाहता आहे. त्यांचे सुर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भरून उरले आहेत त्याचा प्रत्येक गायकाने आदर्श ठेवावा आणि प्रत्येक कानसेनाने तृप्ततेची अनुभूती घ्यावी, असं हे सह्याद्रीच्या कुशीतलं हिमालयाची उंची गाठलेलं व्यक्तिमत्त्व होतं. सुरांच्या माध्यमातून ते आपल्यात सामावले असले तरी व्यक्ती म्हणून, कलाकार म्हणून ते कसे होते यासाठी आवर्जून हा बायोपिक बघायला हवा.

सुधीर फडकेंच्या मनात प्रखर देशप्रेम होतं. संगीतकार, गायक म्हणून त्यांना कीर्ती, बहुमान, पैसा मिळाला होता. त्यांच्याजागी दुसरा कोणी असता, तर सुखासीन आयुष्य व्यतीत करण्यात धन्यता मानली असती. पण फडकेसाहेबांची तशी वृत्ती नव्हती. देशाच्या उन्नतीसाठी आपल्याला काय करता येईल, याचा तेसतत विचार करीत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादरा नगर हवेली सशस्त्र क्रांतीचा उठाव कसा झाला यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

बायोपिक बघतांना जाणवतं की, बाबूजी या नावाभोवती आजही जे वलय आहे, ते सहज मिळालं नाही. त्यामागे प्रचंड साधना आहे. कष्ट आहेत. जिद्द तर आहेच आहे. शब्दाला सुगम संगीतात किती वजन असतं, ते नेमकं कुठं जाणवू द्यायचे, त्याशिवाय त्यांची एक खासियत अशी होती की, प्रत्येक अंतरा वेगळा त्यात वेगळी, हरकत याची लयलूट असे. गदिमा यांच्या सारख्या असामान्य कवीचे शब्द पुढ्यात आले की भाषाप्रभूला ज्या वेगानं शब्द सुचत, त्याच वेगात बाबूजींच्या चाली लगेच होत असत. ती चालही अशी की, गीताचा आशय अधिक भावपूर्ण असे. सुगम संगीताचा सम्राट म्हणून बाबूजी जगन्मान्य झाले पण रसिक मनाची नाडी सापडलेल्या सुधीर फडके यांनी आयुष्यभर सूर, ताल आणि लय यातच हयात व्यतीत केली असती, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निष्ठा आणि आदर्श स्वयंसेवकत्व कसे असायला हवे यासाठीं हा बायोपिक आवर्जून बघायला हवा. 

नुकतीच रामनवमी झाली. मराठी  रसिकांना गीत रामायणाच्या भक्तिरसात चिंब भिजवणाऱ्या अनेक सुंदर रचना बाबूजीं आणि गदिमा यांनी अजरामर करून ठेवल्या आहेत. ५६ गीतांच्या गीतरामायणाने ६० वर्षांहूनही  अधिक काळ सर्व रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवले आहे. गीत रामायणाची जादू आजही रसिकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. त्याचा प्रवास आणि आठवणी यासाठी हा बायोपिक बघायला हवा. 

आधीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांना भुरळ घालणारी गीत संगीताची निर्मिती करणाऱ्या या मंडळींच्या कामातला सच्चेपणा प्रसंगी सर्वोत्तमाकरिता घेतलेला ध्यास हे सारंच वंदनीय आहे. अनेक  पिढ्यांवर त्यांचं गारुड आहे ते पुढेही चिरंतन राहील. कारण जे अस्सल आहे ते विरत नाही मुरत जातं. एक रसिक आणि संगीत क्षेत्रातला वारकरी म्हणून मी त्यासमोर सदैव नतमस्तक राहीन. आणि याचसाठी 'जगाच्या पाठीवर' असणाऱ्या  प्रत्येक मराठी माणसाने हा बायोपिक आवर्जून बघायला पाहिजे. ग. दि. माडगूळकरांनी सुधीर फडके यांच्यासाठी लिहिलेल्या गाण्यातला केवळ एक शब्द बदलला आणि आयुष्य संगीताला वाहिलेले बाबूजी डोळ्यासमोर उभे रहातात आणि यानेच या बायोपिकचा शेवट होईल. 


या सुरांनो या विरहांतीचा एकांत व्हा, अधिर व्हा, आलिंगने

गाली, ओठी, व्हा सुरांनो भाववेडी चुंबने... होऊनी स्वर वेळूचे

वाऱ्यासवे दिनरात या गात या... या सुरांनो या!


सर्वेश फडणवीस 

Wednesday, April 17, 2024

राम- जीवनाची समग्रता !

श्रीरामाने उभारलेल्या सेतूला वाल्मीकींनी 'अभूतपूर्व' म्हटले आहे.'अभूतपूर्वं रामेण सागरे सेतुबन्धनम्।' हे विशेषण समुद्रातल्या सेतूला जितके लागू पडते तितकेच रामाने जोडलेल्या मानवी सेतूलाही. श्रीरामाने नरांना वानरांशी, आर्यांना अनार्य म्हणविल्या जाणाऱ्यांशी जोडले. खरदूषणांचा नाश करून आर्यावर्त किष्किंधेशी जोडला. रावणाशी लढताना समुद्रातील सेतूइतकाच हा मानवी सेतूही उपयोगी पडला आहे. नर, वानर, राक्षस, ऋक्ष (जांबुवान),लंकेहून आलेले रावणाचे चार मंत्री, हे सर्वजण रामाच्या बाजूने रावणाशी लढलेत. खरे तर रामरावणयुद्ध हे 'विषमयुद्ध' म्हणावे लागेल. रावणाचे सैन्य आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज होते, प्रशिक्षित होते आणि संख्येनेही जास्त होते.

रामाकडे शस्त्रांची कमतरता होती. ८७ दिवस चाललेल्या ह्या युद्धात पहिले ८० दिवस रामाकडे साधा रथही नव्हता. शौर्य आणि धैर्य ह्या दोन चाकांवर चालणारा त्याचा 'धर्मरथ' मात्र मजबूत होता. बल, विवेक, दम आणि परोपकार हे त्याच्या रथाचे घोडे होते आणि सत्याची पताका त्या रथावर डौलाने फडकत होती. सद्गुरुकृपेचे अभेद्य चिलखत घालून राम लढत होता. रावणाची सेना 'शिस्त'बद्ध होती तर रामाची सेना रामप्रेमाच्या तंतूंनी 'बद्ध' होती. म्हणून तर युद्धाच्या शेवटच्या दिवशी स्वतः महर्षी अगस्ती रामाच्या राहुटीत आले आणि त्यांनीच दिलेल्या बाणाने रावणरूपी राष्ट्रीय संकटाचा अंत झाला. त्याही प्रसंगी प्रभु रामाचे संस्कारशील आचरण आपल्याला अन्तर्मुख करते.

मरणान्तानि वैराणि ! निवृत्तं नः प्रयोजनम् ।
क्रियतामस्य संस्कारो, ममाप्येष यथा तव ॥

मृत्यूनंतर वैर शिल्लक ठेवू नये हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र. उदारता आणि उदात्तता शिकविणारे 'मरणान्तानि वैराणि' हे वाक्य सुभाषिताचा दर्जा लेवून सर्वतोमुखी झाले आहे. 'हा जसा तुझा, तसाच माझाही भाऊ आहे असे समजून याची उत्तरक्रिया कर' असे शब्द फक्त प्रभु रामाच्याच तोंडून निघू शकतात. रामाचा वनवास संपला आणि सीतेची अशोकवनातून, सर्व देवांची रावणाच्या बंदिवासातून आणि समस्त जंबुद्वीपीयांची दहशतीतून सुटका झाली. रामाचे ध्येय साकारले. ऋषींची स्वप्ने पुरी झाली. पण नुसती दहशत मिटवून भागत नसते. नव्या मनूची नवी घडी बसवायची तर आदर्शांचीही स्थापना करावी लागते. तिचा प्रारंभ इथूनच झाला. सीतेच्या पावित्र्याची पूर्ण खात्री असूनही, तिच्या शुद्ध चारित्र्याचा आदर्श लोकांसमोर असावा ह्या हेतूने रामाने तिला अग्निदिव्य करायला सांगितले आणि तिनेही ते अगदी हसत केले. इक्ष्वाकूंच्या सिंहासनाला पुसटसाही डाग लागू नये ह्या बाबतीत रामाइतकीच तीही जागरूक होती. राम-सीता वेगळे होतेच कुठे ? एकाच चित्शक्तीची ती दोन रूपे होती.

सीतेवरील उत्कट प्रेम हे श्रीरामाच्या एकपत्नीव्रतामागचे कारण होते हे तर खरेच, पण कदाचित त्याला दुसराही एक आयाम असू शकतो. त्या काळी विशेषतः राजघराण्यात - बहुभार्यापद्धत सर्रास प्रचलित होती. त्यामुळे स्त्रियांच्या मनाची घुसमट तर होतच असे, शिवाय राजघराण्यातील अंतःस्थ कारवायांनाही खतपाणी मिळत असे. बहुपत्नीप्रथा नसती तर मंथरा कैकेयीच्या मनात सापत्नभावाचे बीज पेरू शकली नसती कदाचित ह्यामुळेही प्रभु रामचंद्राने सर्व नृपतींना एकपत्नीव्रताचा सर्वस्वी नवा असा एक आदर्श घालून दिला असावा. कारण रामाच्या प्रत्येक कृतीमागे राष्ट्राच्या उन्नतीचाच विचार असतो.

श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी बिभीषण, सुग्रीव, अंगद, जांबुवान, हनुमान हे सर्वजण उपस्थित होते. राज्याभिषेकाचा सोहळा उत्साहात, आनंदात पार पडला. पण बिभीषण आणि सुग्रीव ह्यांना प्रभुचरण सोडून जावेसे वाटत नव्हते. वस्तुतः दोघेही समृद्ध राज्याचे अभिषिक्त राजे पण प्रभुरामाच्या सहवासापुढे त्यांना ती सत्ता आणि वैभवही तुच्छ वाटत होते.रामाची सेवा करत अयोध्येतच रहावे अशी मनीषा त्यांनी लक्ष्मणापाशी बोलून दाखवली. रामाची महती जाणत असल्यामुळे लक्ष्मणालाही त्यात काही वावगे वाटले नाही. रामाला त्याने तसे सुचवले देखील. रामाने त्यांचा मानसन्मान केला आणि गोड शब्दात निरोप दिला, पण ठेवून मात्र घेतले नाही कारण अयोध्येत त्याला परकी संस्कृती रुजू द्यायची नव्हती शिवाय लंकेत पुन्हा राक्षसी संस्कृती फोफावू नये म्हणूनही बिभीषणासारखा परमभागवत तेथेच असावा हाही विचार त्यामागे होता. तसेच किष्किंधेतही राक्षस धार्जिण्या वानरांवर वचक ठेवण्यासाठी सुग्रीवाचे तेथे असणे गरजेचे होते. हेच प्रभु रामाचे द्रष्टेपण होते. अयोध्येचे 'अ'योध्यपण त्याने भंगू दिले नाही. मातृभूमीचे स्वत्व जपणे हेच तर देवत्वाचे लक्षण. 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी' ही भावना जपणारा राम जन्मभूमीच्या सीमासुरक्षेसाठी असा तत्पर होता.

सर्व देवदेवतांच्या मूर्ती पूर्वाभिमुख असतात, पण रामाचा लाडका हनुमान मात्र दक्षिणमुखी असतो, त्याचेही कारण रामाचे द्रष्टेपण असावे असे वाटते. - लंका भारताच्या दक्षिणेला आहे. भगवद्भक्त बिभीषण तेथे होता हे खरे, पण तो मुळातच संन्यस्त वृत्तीचा. भविष्यात त्याने राज्य कुणा दुसऱ्या राक्षसवंशीयाला सोपवून वनाचा मार्ग धरला तर ?सीमासंरक्षणासाठी दक्षिणेवर सतत नजर ठेवण्याची कामगिरी प्रभुरामाने चिरंजीवित्व लाभलेल्या हनुमंतावर सोपविली असेल. प्रभु रामाचे चरित्र म्हणजे जीवनाची समग्रता आहे. नराचा नारायण बनण्याची गुरुकिल्ली आहे. त्याच्या चरित्राचे मनन करता करता, कथेचे पारायण करता करता 'रामपरायण' व्हावे आणि शेवटला 'राम' म्हणण्यापूर्वी, याचि देही याचि 'डोळा 'राममय' व्हावे ह्यातच 'राम' आहे ! नाही का ?

॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day9 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Tuesday, April 16, 2024

तद् वनं भविता राष्ट्रम्

प्रतिभावान कवींच्या कल्पनाशक्तीला 'कैकेयी' ह्या एकाच पात्राने भरपूर खाद्य पुरविले आहे. गीतरामायणकारांनी भरताच्या तोंडून 'माता न तू वैरिणी' असे वदविले तर भासासारख्या श्रेष्ठ नाटककाराने तिला त्यागाचा आणि मातृत्वाचा आदर्श बनविले आहे. पुत्रविरहाने मृत्यू होण्याचा शाप दशरथाला होता. तेव्हा रामाच्या मृत्यूमुळे तसे न होता फक्त 'विरहाने' व्हावे म्हणूनव सिष्ठांच्या सल्ल्याने कैकेयीने रामाला वनवासाला पाठविले आणि सर्वांचा रोष ओढवून घेऊनही रामाचे प्राण वाचविले असे भासाने रंगविले.

कैकेयी 'त्यागमूर्ती' होती की 'वैरिणी' ? वाल्मीकिरामायणातली कैकेयी मात्र या दोन्ही टोकांना स्पर्श करत नाही. ती मुळात निष्पापच आहे. रामावर तिचे मनापासून प्रेम आहे आणि रामाचा राज्याभिषेक तिला अपेक्षितच होता. म्हणून तर ती बातमी मिळताच ती आनंदली. पुढे मंथरा म्हणाली की “अगं, आनंदित काय होतेस ? राज्याभिषेक भरताचा नाही, रामाचा आहे!” तेव्हाही तिचे उत्तर आहे की 'रामे वा भरते वाऽहं विशेषं नोपलक्षये।' शिवाय रामाच्या सद्गुणांवर तिचा पूर्ण विश्वास आहे. तिच्या मनात विष कालवले ते मंथरेने. तिनेच तिला दशरथाकडे 'उधार' असलेल्या वरांबद्दल भरीस घातले. राम राजा झाल्यावर तुझी दुर्दशा होईल असे भयंकर भडक चित्र तिच्यासमोर रेखाटले. त्यांच्या अस्तित्वात नसलेल्या सवतीमत्सराचे काल्पनिक वर्णन करून, राजमाता झाल्यावर कौसल्या तुझा सूड उगवेल ही भीती घातली आणि जुन्या वरांची आठवण करून दिली - मग मात्र कैकेयी बिथरली. 

आपले बोट चाकाच्या आसात घालून ते सावरले अशी कथा सांगितली जाते. त्यातले सार हेच की ती सारथ्यकर्मकुशल होती आणि मोडलेले चाक दुरुस्त करण्याचेही ज्ञान तिला होते, म्हणून ऐन रणधुमाळीतही स्वतःचे प्राण धोक्यात घालून तिने दशरथाचा रथ ताब्यात घेतला आणि त्याला सुखरूप छावणीत पोचवले. पतीचे प्राण वाचविणे हा मुळी धर्मच आहे अशी तिची धारणा. त्यात आपण विशेष काही केले असे तिला वाटतच नाही. म्हणून, दशरथाने तिला देऊ केलेले वरही तिने हसून नाकारले. आधीच रूपवती, त्यात प्राणदायिनी म्हणून ती दशरथाला अधिकच प्रिय झाली. कैकेयी मात्र दशरथाच्या व चारही मुलांच्या प्रेमातच मग्न होती. तृप्त, संतुष्ट होती. अशी वाल्मीकीने रंगविलेली कैकेयी थोडी अल्लड आहे, पण राक्षसी महत्त्वाकांक्षा तिच्यात नाही. मंथरेने आठवण करून दिली तोपर्यंत त्या दोन वरांचीही गोष्ट ती विसरून गेली होती. पण तरीही रामाच्या वनवासगमनाला आणि दशरथाच्या मृत्यूला मात्र तीच कारणीभूत ठरली. मंथरेने केलेल्या बुद्धिभेदामुळे. 

वनवासाची सूचना ऐकूनही राम अविचलच राहिला आहे. उलट, वनात राहून मुनिजनांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्याने कैकेयीचे उपकारच मानले. प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता जोपासण्याची आणि त्यातून मार्ग काढून कर्तव्यांना नवे आयाम देण्याची ही रामाची वृत्ती नुसती मननीयच नाही तर अनुकरणीयही आहे. 'राजा हा प्रजेचा उपभोगशून्य रक्षक असतो' हीच प्रभु रामाची धारणा. भरतही माझ्याप्रमाणेच प्रजेला सुखात ठेवील ही खात्रीही रामाला होती. त्यामुळे सिंहासनावर कुणी का बसेना, रामाला काहीच फरक वाटला नाही. अनासक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समदृष्टी ह्यांचे इतके वेधक रसायन इतरत्र कुठे दिसणार? भरताबद्दल रामाला वाटणारी खात्री त्याने पुढे चित्रकूटावर लक्ष्मणापाशी बोलूनही दाखविली आहे आणि रामाच्या वनवासकालात राज्याची भरभराट करून, रामाला वाटणारा भरवसा अनाठायी नव्हता हे भरतानेही सिद्ध केले आहे. अहर्निश राष्ट्राचीच चिंता करणारे शासक असले,तर रामराज्य कलियुगातही अवतरू शकेल.

अयोध्येला शोकसागरात लोटून राम निघाला. आता अयोध्याच विस्तारणार होती. सर्व राष्ट्रच आता 'अ'योध्य होणार होते, कारण राक्षसी आतंक संपणार होता. राजप्रासादातील अन्य कोणतीही वस्तू न घेता फक्त आपले परमप्रतापी कोदंड घेऊन राम निघाला. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर श्रीरामजन्मभूमीवर झालेले भव्य श्रीराम मंदिर आणि श्रीरामललाचा कोदण्डधारी विग्रह हे याचेच द्योतक तर नव्हे. आता - तद् वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day8 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Monday, April 15, 2024

युगांतर

कथांच्या ओघात प्रवास कसा संपला हे कळलेच नाही. विश्वामित्र
रामलक्ष्मणांसह मिथिलेला पोचले. शिवधनुष्य पाहण्यासाठी दोघेही उत्सुक होते कारण त्या धनुष्याला प्रत्यंचा चढवणे अत्यंत कठीण आहे असे विश्वामित्रांनी सांगितले होते. जनक' हे विशेषनाम नाही. ते मिथिलेच्या अधिपतीचे पद आहे. त्या वेळी सीरध्वज नामक जनक राजपदी आरूढ होते. त्यांच्याकडे वंशपरंपरेने शिवधनुष्याची पूजा होत असे. 'त्या अलौकिक धनुष्याला प्रत्यंचा लावणाऱ्यालाच माझी कन्या सीता देईन' अशी प्रतिज्ञा जनकाने केली होती. विश्वामित्रांच्या आगमनाची वार्ता कळताच जनकराजा आपल्या शतानंद नामक राजपुरोहिताला पुढे करून स्वतः सामोरा गेला. त्यांच्यासोबत
असणाऱ्या राजपुत्रांना पाहून जनकाने कुतूहलाने त्यांचा परिचय विचारला. विश्वामित्राने कौतुकाने त्यांचे सिद्धाश्रमातले वास्तव्य, राक्षसांचा त्यांनी केलेला वध, अहल्योद्धार हे सर्व सांगून 'महाधनुषि जिज्ञासां कर्तुमागमनं तथा ।' असे नमूद केले. त्यांचा पराक्रम ऐकून प्रभावित झालेल्या जनकाने लगेच धनुष्य तेथे आणविले. ते विशाल धनुष्य एका आठ चाकी गाडीवरून स्वयंवरस्थानी आणले गेले. जनकाने धनुष्याचा महिमा आणि स्वयंवराची अट सांगितली.

स्वयंवरासाठी अनेक राजे- राजपुत्र मिथिलेला आले. प्रत्येकाने शिवधनुष्य उभे करण्याचा प्रयत्न केला पण पराभूत झाले. त्या सर्वांचा पराभव होत असतानाच उद्वेगाने जनकाच्या तोंडून 'निर्वीरमुर्वीतलम्' अर्थात पृथ्वीतलावर एकही वीर उरला नाही असे शब्द निघाले. हे सर्व ऐकून विश्वामित्रांनी रामाला उठण्याची खूण केली आणि 'वत्स राम धनुः पश्य' अशी आज्ञा केली. विश्वामित्रही किती धोरणी होते पहा. श्रीरामाला आधीच पाठवले असते, त्याने प्रत्यंचा चढवला असता तर इतर राजपुत्र म्हणाले असते की ' हे तर आम्हीही करू शकत होतो, पण आम्हाला संधीच मिळाली नाही. श्रीरामाने प्रथम त्या धनुष्याला प्रणाम केला, मग शांतपणे प्रदक्षिणा घातली आणि पटकन ते उभे केले. आता प्रत्यंचा  लावणार तोच कर्णभेदी आवाज झाला.आणि ते धनुष्य भंगले.

ह्या संदर्भात स्वामी गोविन्ददेव गिरि ह्यांच्या प्रवचनातून छान कथा ऐकायला मिळाली. ते म्हणतात की इतर राजेही बलवान होते, महाप्रतापी होते. त्यांना जे जमले नाही ते किशोरवयीन श्रीरामाला साधले ह्याचे मर्मही त्यांच्या विश्वामित्रांसोबतच्या प्रवासात दडलेले आहे. त्यांनी रामाला चौपन्न दिव्यास्त्रांचे ज्ञान दिले होते. ही अस्त्रे त्यांना साक्षात् महादेवाकडून प्राप्त झाली होती. हे धनुष्यही महादेवाचेच. श्रीरामाने प्रथम प्रणाम केला. शिवाचा अनुग्रह जागवला. मग दिव्यास्त्रांचे स्मरण केले. प्रदक्षिणा घालतेवेळी चारही बाजूंनी त्या धनुष्याचे जवळून निरीक्षण केले आणि ओळखीची कळ नजरेस पडताच तिच्या साह्याने धनुष्य सर्रकन उभे केले. इतर राजांकडे ताकद होती, पण हे ज्ञान नव्हते. एकपाठी रामाने सर्व दिव्यास्त्रांचे मनोभावे ग्रहण केले होते म्हणूनच हे अघटित घडू शकले.

धनुर्भंगानंतर श्रीराम जानकीचा विवाह झाला आणि रामाच्या तिघाभावांचा सीतेच्या तिघी बहिणींशी विवाह झाला हे सर्वश्रुतच आहे. पण त्या वेळची एक बाब उल्लेखनीय आहे. जनकाचा कुलपुरोहित शतानंद हा अहल्येचा पुत्र. विश्वामित्रांशी भेट होताक्षणीच तो विचारतो, "माझ्या मातेचा उद्धार झाला ना? पिताश्रींनी तिचा स्वीकार केला ना?" त्यावर विश्वामित्र शांतपणे उत्तरतात, "हो. जसे ठरले होते तसेच सर्व घडले." गौतमही बोलले होते की, "रामा, मिथिलेत तुला शतानंद भेटेल." ह्याचाच अर्थ असा की श्रीरामाच्या बाबतीत सर्व ऋषींची पूर्वयोजना आणि परस्परप्रेरणा (telepathy) जबरदस्त होती.

श्रीरामाच्या प्रत्येक कृतीकडे त्यांचे बारीक लक्ष होते, कारण रामाच्या रूपातच त्यांना उद्याचा उज्ज्वल भविष्यकाळ दिसत होता. विवाहविधी आटोपल्यावर विश्वामित्र दशरथाला म्हणाले, "राजन्, तुमचा राम तुम्हाला सोपवला. माझे काम झाले. आता मी निघतो,' ह्या शब्दांचा फार खोल अर्थ आहे. अयोध्येहून निघतानाचा अनुभवी राम आणि आता अयोध्येला परतणारा पुरुषार्थी राम ह्यात कमालीचे अंतर आहे. हे कर्तृत्व विश्वामित्राचे. हे काम पूर्ण करून विश्वामित्र तपस्येसाठी निघून गेले आणि ते रामाला परत कधी भेटलेही नाहीत. ते निघताना राम प्रणाम करतो आणि गुरुदक्षिणेबद्दल विचारतो, तेव्हा ते उद्गारतात, "मी सांगितलेल्या ध्येयानुसार आचरण हीच माझी गुरुदक्षिणा मला हवी" कर्तव्यपूर्ततेत कसूर करायची नाही पण कुठे ममत्वभावाने अडकायचेही नाही असा 'पद्मपत्रमिवाम्भसा' वृत्तीचा वस्तुपाठ ब्रहार्षि विश्वामित्रांच्या ठायी येथे प्रत्यक्ष दिसतो. 'राम' घडतो तो अशाच संस्कारांमुळे आणि हेच पुढच्या योजनेचे युगांतर होते.

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day7 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏

Sunday, April 14, 2024

संस्कारयात्रा

एका त्राटिकेचा वध करून श्रीरामाने कितीतरी गोष्टी साधल्या. एक ओसाड प्रदेश वसतीयोग्य बनला, कारण त्राटिकरूपी दहशत दूर झाली. मुख्य म्हणजे रावणी साम्राज्याला एक हादरा बसला आणि धर्मनिष्ठांना मानसिक बळ मिळाले. त्राटिकावधानंतरच्या प्रवासात विश्वामित्रांनी रामालाच दिव्यास्त्रे दिली असा निर्देश रामायणात आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे कथांच्या माध्यमातून त्यांनी रामाला दिलेले संस्कारधन. ते अधिक मूल्यवान आहे. 

अयोध्येहून विश्वामित्र रामलक्ष्मणासमवेत षष्ठीला निघाले ते नवमीला सिद्धाश्रमात पोचले. नंतर सहा दिवस यज्ञ चालला तेव्हा विश्वामित्रांनी मौनव्रत धारण केले होते असे वाल्मीकी सांगतात. ह्या यज्ञात मारीच आणि सुबाहू ह्या राक्षसांच्या टोळीने विघ्ने आणायचा प्रयत्नही केला होता. पण श्रीरामाने सुबाहूचा आणि त्याच्या साथीदारांचा वध केला आणि मारीचाला बाणाने कैक योजने दूर फेकून दिले. यज्ञ निर्विघ्न पार पडला. त्या आश्रमाचे' सिद्धाश्रम' हे नाव यज्ञ सिद्धीस गेल्यामुळे सार्थ ठरले. 

यज्ञाच्या सांगतेनंतर पंचमीला विश्वामित्र रामलक्ष्मणांना घेऊन मिथिलेला निघाले, ते अष्टमीला पोचले असा उल्लेख रामायणात आहे. ह्या दोन्ही प्रवासात (अयोध्या ते सिद्धाश्रम आणि सिद्धाश्रम -मिथिला) अनेक कथा मुनींनी दोघा रघुकुमारांना सांगितल्या आहेत. प्रवासाचा शीण जाणवू नये म्हणून ह्या कथा सांगितल्या असाव्यात असे वरवर विचार करणाऱ्याला वाटेल, पण अन्तःस्थ हेतू आहे श्रीरामलक्ष्मणांच्या मनावर विशिष्ट संस्कार करण्याचा . ती एक संस्कारयात्रा आहे.

त्राटिकावधानंतर सिद्धाश्रमाला जाताना विश्वामित्रांनीस मुद्रमंथनाची कथा सांगितली आहे. देव-दानवांच्या एकजुटीमुळेच समुद्रमंथनासारखे प्रचंड आणि अवघड कार्य सिद्धीस जाऊ शकते, पण फलप्राप्तीच्या वेळी मात्र श्रेयाचा धनी कोण असा अन्तःकलह माजला तर तो एकाला संपवूनच शांत होतो हे दोन संदेश श्रीरामाला ह्या कथेतून मिळाले आहेत.

दुसऱ्या दिवशी गंगाकिनारी पोचल्यावर रामाच्या मनात ध्येयवाद जागविण्यासाठी विश्वामित्रांनी गंगावतरणाची कथा सांगितली आहे. गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी सागर-सगरपौत्र अंशुमान-दिलीप-भगीरथ अशा तब्बल चार पिढ्या खपल्या आहेत. महत्कार्य साकारावयाचे असेल तर सातत्याने अथक प्रयत्न करावेच लागतात आणि त्यात दोन-तीन पिढ्या गारद झाल्या तरी खचायचे नसते हा संदेश ह्या कथेद्वारे दिला गेला आहे.

पुढे वनवासाच्या चौदा वर्षात कितीतरी आपत्ती श्रीरामावरको सळल्या. तरीही त्याच्या प्रयत्नात कधी खंड पडला नाही. कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेत त्याने रामराज्याची स्थापना केली, ती ह्या संस्कारांमुळेच. 'यत्न तो देव जाणावा' असे शब्द फक्त 'राम'दासाच्याच मुखातून येऊ शकतात. विश्वामित्रांनी सांगितलेल्या कथांपैकी सर्वात महत्त्वाची दूरगामी परिणाम करणारी कथा आहे बळीराजाची. राक्षसांच्या वरवरच्या आचरणाला भुलू नये आणि जिंकलेल्या प्रदेशांबद्दल लोभ बाळगू नये हे दोन महत्त्वाचे संदेश विश्वामित्रांनी रामाला ह्या कथेद्वारे दिले आहेत आणि सुज्ञ रामाने विश्वामित्रांच्या संदेशांचे पुढे तंतोतंत पालन केले आहे. 

वालीचे निर्दालन करून किष्किंधा सुग्रीवाला सोपवली आहे आणि रावणाचा बीमोड करून बिभीषणाला राज्याभिषेक केला आहे. अशाच तऱ्हेच्या इतर अनेक कथा या संस्कारयात्रेत श्रीरामाने ऐकल्या. मदनदहनाच्या कथेतून कामविकारावर नियंत्रण ठेवण्याचा, कार्तिकेयाच्या कथेतून सेनानेतृत्वाची लक्षणे जोपासण्याचा तर गौतमाने इन्द्राला दिलेल्या शापाच्या माध्यमातून 'व्यभिचाराला क्षमा नाही', ह्या तत्त्वाचा संस्कार श्रीरामाने ग्रहण केला. मूळच्या लखलखत्या हिऱ्याला आता अनेक तेजस्वी पैलू पडत होते. संस्कारयात्रा सफल होत होती.

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi24 #Day6 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏



Saturday, April 13, 2024

आपदाम् अपहर्ता राम


श्रीरामाची विमनस्कता घालवून त्यांच्यात उत्साहाचे बीज पेरण्याचे काम वसिष्ठांनी केले आणि त्या बीजाला वाढवून अंकुरविण्याचे, अंकुराला योग्य दिशेला वळविण्याचे काम महर्षी विश्वामित्रांनी केले. एक दिवस दशरथाकडे येऊन विश्वामित्र म्हणाले,“राक्षस आमच्या यज्ञात नेहमीच विघ्ने आणतात. मला येत्या नवमीला सहा दिवसांचा यज्ञ करायचा आहे. राक्षसांचा संहार करण्यासाठी तुझे राम-लक्ष्मण मला दे. "

मुळात विश्वमित्रांना रामाला बाहेर काढायचे होते. घडवायचे होते. त्याचे तन-मन कणखर बनवायचे होते. भावी उद्दिष्टांचे (जी उद्दिष्टे पुत्रकामेष्टीच्या वेळीच ठरली होती, त्यांचे) बीजारोपण करायचे होते, ज्या दिव्यास्त्रांचे ज्ञान त्यांनी प्रत्यक्ष महादेवाकडून प्राप्त करून घेतले ती दिव्यास्त्रे रामाला प्रदान करायची होती. रामलक्ष्मणांना जाऊ देण्यास दशरथ कचरतो आहे हे पाहिल्यावर गुरु वसिष्ठांनी हस्तक्षेप केला आणि विश्वामित्रासारख्या समर्थ ऋषीच्या सहवासात राजपुत्रांचे भलेच होईल ह्याची ग्वाही देऊन त्यांना विश्वामित्रासोबत पाठविण्याचा आदेश दिला आहे.

श्रीरामाचे व्यक्तित्व घडवून आणण्यात दोघांचे एकमत आहे. राष्ट्रहित साधायचे असेल तर वैयक्तिक हेवेदावे बाजूलाच ठेवायचे असतात ह्या गोष्टीचा त्यांना कधीच विसर पडत नाही. जेव्हा असे होते तेव्हाच 'राम'राज्याची पायाभरणी होत असते. गुरूच्या आज्ञेचा अधिक्षेप रघुवंशीयांनी कधीही केला नाही, म्हणूनच दशरथाची अनुज्ञा मिळाली आणि रामलक्ष्मण विश्वामित्रासह सिद्धाश्रमाकडे निघाले. दशरथाने रथ देऊ केला तोही विश्वामित्रांनी नाकारला. दोघांना मुद्दामच पायी नेले.  त्या तिघांचा पहिला पडाव पडला शरयूतीरावर. तेथे विश्वामित्रांनी 'बला' आणि 'अतिबला' ह्या विद्या शिकविल्या. ह्या विद्यांमुळे तहान, भूक आणि निद्रा ह्यांवर ताबा ठेवता येतो. निर्णयक्षमताही वाढते. या विद्या म्हणजे वस्तुतः अस्त्रेच होत. ही अस्त्रे जया आणि सुप्रभा ह्या दोन स्त्रियांनी निर्माण केली होती हे विशेष. ह्या दोघी दक्षप्रजापतीच्या कन्या आणि कश्यपांच्या भार्या होत्या.

दुसऱ्या दिवशी ते कन्दर्पऋषींच्या आश्रमाकडे निघाले. जाताना प्रत्येक प्रदेशाची माहिती विश्वामित्र देत होते. तिथल्या समस्यांचा परिचय करून देत होते. पूर्वी तीर्थाटनाच्या वेळी ज्या समस्या पाहून रामाचे मन नैराश्याने काळवंडले होते, त्याच समस्यांकडे राम आता त्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पाहात होता. 'आपदाम् अपहर्ता' तयार होत होता. तिसऱ्या दिवशी नावेत बसून तिघांनी गंगा पार केली. जो पहिला मुनी रावणाच्या पारिपत्याची प्रतिज्ञा करून दक्षिणेत उतरला होता, त्या अगस्तीचा आता उजाड नि भकास झालेला आश्रम विश्वामित्रांनी दाखविला. त्याची दहा मुले राक्षसांनी खाऊन टाकली होती आणि त्यामागे त्राटिकेचा हात होता हे सांगत असतानाच त्राटिका तेथे अवतरली.  खरे तर ही त्राटिका मुळात राक्षसी नव्हती. सुकेतु नामक एका सदाचारसंपन्न यक्षाची ती कन्या अपत्यहीन सुकेतूने अपत्यप्राप्तीसाठी मोठे तप केले. त्यामुळे संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवाच्या कृपेमुळे ही कन्या त्याला झाली. त्याच्याच वराद्वारे तिला सहस्र गजांचे बळ प्राप्त झाले. जंभपुत्र सुंदाशी तिचा विवाह झाला. पुढे अगस्ती मुनींच्या शापाने सुंद मरण पावला तेव्हापासून ती क्रुद्ध आणि बेफाम बनली आणि अगस्तींच्या प्रदेशाचा विध्वंस करत फिरत होती. तीच त्राटिका आता रामलक्ष्मणांपुढे उभी होती. श्रीरामाने त्राटिकेचा वध केला.

अहल्योद्धाराची घटनाही ह्याच प्रवासात घडली आहे. रामलक्ष्मणासह विश्वामित्र गौतमाश्रमापाशी आले आणि त्यांनी हकीकत सांगितली की 'गौतमपत्नी अहल्या ही ब्रह्मदेवाची कन्या. एक दिवस गौतम ऋषी घरी नसताना इन्द्र संधी साधून तिच्याकडे आला. मुनिवेष घेऊन. तिने त्याला ओळखले, पण तीही मोहवश झाली. नको ते घडले. इन्द्र कुटीतून निघत असताना गौतम परतले आणि तेथेच त्यांनी इन्द्राला शाप दिला. देवांचा राजा असला तरी अशा अपराधाला क्षमा नाही. अहल्येला प्रायश्चित्त सांगताना ते म्हणतात

वातभक्षा निराहारा तप्यन्ती भस्मशायिनी ।
अदृश्या सर्वभूतानामाश्रमेऽस्मिन् वसिष्यसि ।।
अर्थात् - ह्याच आश्रमात तू तप करत, अन्नपाण्याचा त्याग करून धुळीत पडून रहा. कुणाच्या संपर्कात येऊ नकोस. म्हणजेच दगडाधोंड्याप्रमाणे निश्चल, निर्विकार आणि निराहार रहा. तिला असा आदेश देऊन गौतमही तपश्चर्येसाठी निघून गेले. तेव्हापासून हा आश्रम ओसाड पडला आहे. जेव्हा ते तिघेजण आत शिरले तेव्हा एका शिळेआड तपस्यारत अहल्या त्यांना दिसली. तिच्या हातून चुकून, तेही एकदाच पाप घडले होते. पण आता ती अक्षरश: दगड झाली होती. पतीच्या आदेशाचे तिने सर्वतोपरी पालन केले होते. श्रीरामाने पुढे होऊन तिला नमस्कार केला असे वर्णन वाल्मीकीने केले आहे. ज्या क्षणी श्रीराम तिच्यापुढे नमस्कारासाठी वाकला, त्याच क्षणी सिद्ध झाले की तिची पापे धुतली गेली. तिच्या मनाचा झालेला 'दगड' वितळला. ती पुन्हा अहल्या झाली. तिचे डोळे पाझरू लागले. रामाने तिचे आतिथ्य स्वीकारले आणि सिद्ध केले की तिच्याबद्दल त्याच्या मनात कोणतेही किल्मिष नाही. त्याच वेळी गौतमही तप संपवून परतले होते. रामाने दोघांनाही प्रणाम केला. गौतमांचेही नेत्र पाणावले. या पुनर्भेटीनंतर दोघांनी जोडीने श्रीरामाची पूजा केली. त्यांच्या पुनर्मीलनाचे प्रतीक म्हणून रामाने ती स्वीकारली.

अचूक शरसंधान करून त्राटिकेला संपविणारा 'पुरुषार्थी' राम आणि अहल्योद्धार करणारा 'पतितोद्धारक' राम ही दोन्ही रूपे 'आपदाम् अपहर्ता' रामाचीच. म्हणूनच म्हणतात ना,

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम् ।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥

सर्वेश फडणवीस

#ramnavmi24 #Day5 #लोकाभिराम_श्रीराम 🚩🙏