प्रत्यक्ष भरताने ज्याचें वर्णन करताना असें म्हटलें आहे की :-
त्वमस्माकं चतुर्णां वै भ्राता सुग्रीव पञ्चमः ।
सौहृदाज्जायते मित्रमपकारोऽरिलक्षणम् ॥।
- वाल्मीकि रामायण, युद्धकाण्ड, सर्ग १२७
आम्हा चार भावांचा तू पांचवा भाऊ आहेस. सौहार्दानेच मित्रत्व व अपकाराने शत्रुत्व व्यक्त होत असतें. तो वानरराज सुग्रीव हा रामचंद्रांचा त्यांनी स्वतःच्या बरोबरीचें स्थान दिलेला मित्र असून रामायणातील व्यक्तिचित्रात त्याचें एक विशिष्ट असें स्वतंत्र स्थान आहे. खरंतर बघताक्षणी तो एक भ्याड, लंपट, स्वकर्तव्यपराङ्मुख असावा असें वाटतें. पण वस्तुस्थिति तशी नाही. रामचंद्रांनी सुग्रीवाशी अग्निसाक्षीने मैत्री करून त्याला स्वतःच्या बरोबरीचें स्थान दिले होते. महर्षि वाल्मीकि म्हणतात :-
ततोऽग्नि दीप्यमानं तौ चक्रतुश्च प्रदक्षिणम् ।।
सुग्रीवो राघवश्चैव वयस्यत्वमुपागतौ ।
ततः सुप्रीतमनसौ तावुभौ हरिराघवौ ।।
अन्योन्यमभिवीक्षन्तौ न तृप्तिमभिजग्मतुः ।
त्वं वयस्योऽसि हृद्यो मे ह्येकं दुःखं सुखं च नौ ।।
- वाल्मीकि रामायण, किष्किन्धाकाण्ड, सर्ग ५
नंतर प्रज्वलित केलेल्या अग्नीला राम व सुग्रीव या दोघांनीही प्रदक्षिणा केल्यानंतर ते एकमेकांचे मित्र बनले. प्रेमाने एकमेकांकडे पहात असता त्यांना तृप्ति म्हणून वाटेना. ते एकमेकांना म्हणाले, आता आपण परस्परांचे खरे मित्र झालो आहोत. आपले सुख व दुःख एक आहे. प्रत्यक्ष रामचंद्रांच्या उद्गारावरून सुग्रीवाच्या मैत्रीची त्यांना किती आवश्यकता वाटत होती व तिला ते किती किंमत देत होते हे स्पष्ट होतें. ते म्हणतात :
दुर्लभो हीदृशो बंधुरस्मिन्काले विशेषतः ।।
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड,
असा मित्र या काळात मिळणे फारच कठीण आहे. सुग्रीवाने रामाला जें साहाय्य केलें तें मनापासून,आपल्या सर्व सामर्थ्यानिशी केलेले आहे. एकटे मारुतीच नव्हेत तर नल, मंद, द्विविध, अंगद, जाम्बुवान इत्यादि अनेक कसलेले योद्धे, बुद्धिमान् व श्रेष्ठ शिल्पज्ञ असे पुरुष त्याच्या संग्रही होते. त्या सर्वांचें रामचंद्रांना अतिशय साहाय्य झालेलें आहे. लक्ष्मणाच्या रागावण्यावरून त्याने सीतेचा शोध चालविला हेंही खोटें आहे. उलट लक्ष्मण येण्याच्या कितीतरी पूर्वीच त्याने रामचंद्रांच्या साहाय्यासाठी सिद्धता चालविली होती. रामचंद्र जरी सुग्रीवाला स्वतःचा बरोबरीचा मित्र समजत असले तरी सुग्रीव स्वतःला त्यांचा दास समजत होता. यातच त्याच्या स्वभावाचें औदार्य प्रकट होते.
यदिन्द्रो वर्षते वर्षं न तच्चित्रं भविष्यति ।
आदित्योऽसो सहस्रांशुः कुर्याद्वितिमिरं नभः॥
चन्द्रमा रजनी कुर्यात्प्रभया सौम्य निर्मलाम् ।
त्वद्विधो वापि मित्राणां प्रीतिं कुर्यात्परंतप ॥
- वाल्मीकि रामायण, किष्किंधाकाण्ड, सर्ग ३९
इंद्राने वर्षाव करणें, सूर्याने अंधार नाहीसा करणें आणि चंद्राने आपल्या ज्योत्स्नेने रात्र उजळणें हें जितकें स्वाभाविक तितकेंच
तुझ्यासारख्या मित्रांनी आपल्या मित्राचें प्रेम संपादन करण्यासाठी
जिवाचें रान करणें हें स्वाभाविक आहे. आणि अखेरीस रामचंद्रांच्या बरोबरच राजा सुग्रीवाने सुद्धा शरयूप्रवेश करून आपल्या प्रगाढ मैत्रीचा अमर शिलालेख जगाच्या इतिहासात कोरलेला आहे. या रामनिर्याणाच्या प्रसंगी या दोन अभूतपूर्व मित्रांच्या मित्रत्वाचें शब्दचित्र रेखाटताना महर्षि वाल्मीकि म्हणतात:--
एतस्मिन्नन्तरे रामं सुग्रीवोऽपि महाबलः ।
प्रणम्य विधिवद्वीरं विज्ञापयितुमुद्यतः ।।
अभिषिच्याङगदं वीरमागतोऽस्मि नरेश्वर ।
तवानुगमने राजन् विद्धि मां कृतनिश्चयम् ।।
तस्य तद्वचनं श्रुत्वा रामो रमयतां वरः ।
वानरेन्द्रमथोवाच मैत्रं तस्यानुचिन्तयन् ।।
सखे शृणुष्व सुग्रीव न त्वयाहं विनाकृतः ।
गच्छेयं देवलोकं वा परमं वा पदं महत् ।।
वाल्मीकि रामायण, उत्तरकाण्ड,
याच वेळी सुग्रीवाने रामचंद्रांना वंदन करून सांगितलें की, अंगदाला राज्याभिषेक करून मी आलो आहे. तुमच्याच मागोमाग देवगतीला येण्याचा मी निश्चय केलेला आहे. त्याचे ते उद्गार ऐकताच त्याचें मित्रत्व आठवून राम म्हणाले, " मित्रा, सुग्रीवा! आपला आजवर कधीच वियोग झालेला नाही. देवलोकाला अथवा परमदालाही आपण बरोबर कसें जाणार नाही ?” राजद्वारापासून स्वर्गद्वारापर्यंत ज्यांच्या सहजीवनात कधीच खंड पडलेला नाही असें हें सुग्रीव व श्रीराम यांचें सौहार्द मानवतेच्या इतिहासात अनन्वय अलंकाराचे उदाहरणच गणलें जाईल. म्हणूनच म्हणतात सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला.
सर्वेश फडणवीस
#ramnavmi25 #Day8 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏
No comments:
Post a Comment