भगवान् श्रीराम आणि श्रीरामचंद्रांची ही कथा आपल्या भारतीय संस्कृतीची प्राणधारा आहे. प्रभु श्रीरामचंद्रांबद्दल जोपर्यंत काहीतरी गुणगानात्मक म्हटलं जात नाही तोपर्यंत या देशातील कुणीही आचार्य, कुणीही ऋषी, कुणीही संत इतकेच नव्हे तर कुणीही साहित्यिक आपल्या वाणीची अथवा लेखणीची पूर्तता अथवा तृप्ती मानीत नाही.
खरंतर भगवान् रामचंद्रांचे चिंतन हे केवळ वैयक्तिक दृष्टीनं, पारिवारिक दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनंच नव्हे तर सर्वच दृष्टींनी मनुष्याच्या जीवनाचा सर्व प्रकारचा विकास करण्यास समर्थ आहे. प्रभू श्रीराम अवतीभवतीच्या वक्तींच्या वलयातून घडले आणि ते घडतांना त्यांनी अनेकांना कसे आपलेसे केले यासाठी मूळ वाल्मीकी रामायण मुळातून वाचतांना जो आनंद मिळतो तो शब्दातीत आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या कौटुंबिक जीवनात, आपल्या संस्थात्मक अथवा सामाजिक जीवनात आपण केव्हा कसाकसा निर्णय घ्यावा हे ठरवायचे असल्यास किंवा कुठला निर्णय योग्य आणि कुठला निर्णय अयोग्य याबद्दल धर्माचे मत जाणून घ्यावयाचे असल्यास रामाचे चरित्र पहायला हवे. सगळे धर्मग्रंथ वाचण्याची अथवा सगळे वेद, पुराणं, कथा आणि शास्त्रं बघण्याची आवश्यकता नाही. महर्षि वसिष्ठांनी म्हटलं आहे, “रामो विग्रहवान् धर्मः' मानवी जीवनातल्या सगळ्या उत्तुंग गुणांचं साक्षात् साकार दर्शन म्हणजे भगवान् श्रीराम आहेत.
गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या रामनवरात्रात श्रीराम शक्तीचा जागर करताना श्रीरामांचे गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न करूया. प्रभू श्रीरामांनी आपल्या संपूर्ण जीवनात मानवी जीवन सुखकर होण्यासाठी जे जे करावे लागते ते सर्व केले आणि आदर्श माणूस पण घालून दिले. आज या उत्सवाची पूर्णाहुती. प्रभू श्रीरामाच्या अवतीभवती असणाऱ्या विविध व्यक्तिचित्रणाचा रामजन्मोत्सव निमित्ताने नव जागर करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. ‘स्वानतः सुखाय’ भावनेने हे लेखन झाले. ही लेखनसेवा श्रीरामरायाचरणी रुजू व्हावी हीच प्रार्थना. जय श्रीराम🚩🙏
सर्वेश फडणवीस
#ramnavmi25 #Day9 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏
No comments:
Post a Comment