Tuesday, April 1, 2025

कैकेयी

रामायणातील इतर स्त्री-पात्रांच्या तुलनेत कैकेयी ही व्यक्तिरेखा काहीशी वेगळी आहे. थोडी अनाकलनीय देखील आणि म्हणूनच प्रतिभावान कवि-लेखकांच्या कल्पनाशक्तीला या व्यक्तिरेखेने भरपूर खाद्यही पुरविलेले आहे. संपूर्ण भारतात राम प्रत्येकाला आपलासा वाटतो. म्हणूनच वाल्मीकि रामायणाच्या व्यतिरिक्त अध्यात्मरामायण (संस्कृत), भावार्थरामायण (मराठी), रामचरितमानस (हिंदी), कृतिबासरामायण (बंगाली), रंगनाथरामायण (तेलुगू), कंबरामायण (तामिळ), गिरधरकृत रामायण (गुजराथी), जगमोहनरामायण (उडिया) अशा विविध भाषांतील विविध प्रतिभावंतांनी मूळ कथेत आपापल्या कल्पनेनुसार काही भाग जोडून तर काही भाग वगळून रामकथा अधिक रोचक बनविण्याचा प्रयत्न केला. अर्थातच रामकथेतील कैकेयीचेही चित्रण प्रत्येकाने आपापल्या धारणेनुसार केले.

सर्वांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या रामाच्या राज्याभिषेकात विघ्न, त्याला भोगावा लागणारा वनवास आणि दशरथाचा विकल अवस्थेत झालेला मृत्यू ह्या सर्व अप्रिय घटनांना कैकेयीच कारणीभूत झाली हे प्रथमदर्शनी वाटते, हे खरेच आहे. त्यामुळेच सामान्य माणसाला ती तिरस्करणीय वाटते- इतकी की, 'प्रतिवाल्मीकि' म्हणून गाजलेल्या ग. दि. माडगूळकरांनी देखील भरताच्या मुखातून 'माता न तू वैरिणी' अशी तिची कठोर निर्भर्त्सना केली आहे.

पण रामाबद्दल कैकेयीच्या मनात खरोखरच इतका धगधगता
सापत्न भाव होता का ? राम राजा झाल्यास कौसल्या
'राजमाता' म्हणून तोरा मिरवील आणि आपण नगण्य ठरू
असे वाटण्याइतपत कैकेयी इतकी कोत्या मनाची आणि आत्मकेंद्रित होती का ? की ती फक्त सत्तेसाठी हपापलेली होती आणि कैकेयी नेमकी कशी होती यासाठी वाल्मीकी रामायणात डोकावल्यावर कैकेयी अधिक लक्षात येते. ज्यावेळी मंथरा तिला सावध करण्यासाठी धावतपळत येऊन रामाचा उद्या राज्याभिषेक होणार ही सूचना देते, तेव्हा ही शुभ वार्ता ऐकून कैकेयी आनंदाने स्वतःच्या गळ्यातला कंठा तिला बक्षीस देते आणि ही तिची उत्स्फूर्त प्रतिक्रिया कारण जी वार्ता ऐकून कैकेयी संतप्त होईल असे मंथरेला वाटले होते, तेथे हे भलतेच झालेले पाहून मंथरा तिला डिवचण्यासाठी पुन्हा म्हणते की, 'अभिषेक भरताचा नाही, रामाचा आहे, तेव्हाही तिचे मनापासूनचे निरागस उद्गार आहेत की,'रामे वा भरते वाऽहं विशेषं नोपलक्षये।' अर्थात मला तर रामात किंवा भरतात काही वेगळेपणा जाणवतच नाही.येथे कैकेयीच्या मनात सापत्नभावाचा लवलेशही दिसत नाही. अध्यात्मरामायणातही थोड्याफार फरकाने असेच वर्णन आढळते. 

कैकेयीच्या मनात कुठेही रामाबद्दल दुजाभाव नव्हताच पण पुढचा अनर्थ मात्र तिच्याचमुळे घडला. दशरथाच्या विनवण्यांनाही तिने कठोरपणे धुडकावून लावले आणि मग सहज प्रश्न पडतो कैकेयी असे का वागली ? तिची व्यक्तिरेखा गुंतागुंतीची भासते ती या अन्तविरोंधामुळेच. तिचे आकलन वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या प्रकारे केलेले आहे. खरंतर रामाचा राज्याभिषेक सुरळीतपणे पार पडला असता तर तो अयोध्येपुरताच पण रामाची आवश्यकता अयोध्येपेक्षाही राक्षसपीडित 'योध्य' प्रदेशाला अधिक होती. त्या राक्षसांचे शक्तिकेंद्र असणाऱ्या रावणाला संपवायचे होते, आणि म्हणूनच रामाने फक्त अयोध्येतच राहणे योग्य नव्हते. यासाठी सर्व देवगणांच्या विनंतीनुसार वाग्देवी सरस्वतीने मंथरेत प्रवेश केला असे अध्यात्म रामायणकारांनी दर्शविले आहे. सरस्वतीच्या प्रभावामुळेच कैकेयीचा बुद्धिभेद करण्यात मंथरा यशस्वी झाली असे रंगवून कैकेयीच्या स्वार्थपरायणतेचा हा प्रयत्न दिसतो आणि तुलसीदासांनी सुद्धा असेच चित्र रंगवले आहे. 

मुळात कैकेयी 'त्यागमूर्ती' होती की स्वार्थाने आंधळी झालेली एक
सत्तालोलुप स्त्री होती आणि वाल्मीकी यांना स्मरून सांगायचे तर ती या दोन्ही टोकांना स्पर्श करीत नाही. दशरथाच्या दृष्टीने ‘अर्चता तस्य कौसल्या, प्रिया केकयवंशजा’ अर्थात पट्टराणी म्हणून कौसल्या 'अर्थिता' होती, पण 'प्रिय' मात्र कैकेयीच होती. ती 'प्रिय' का होती ? त्याचे उत्तर शोधले तर ते वाल्मीकी रामायणाच्या आधारे, कारण ते एकच रामायण रामाला समकालीन असणाऱ्या महर्षी वाल्मीकीने लिहिले असल्यामुळे त्यात कल्पना नाही. तारुण्याने मुसमुसलेली ही लावण्यवती सर्वांत धाकटी राणी म्हणून दशरथाला प्रिय होतीच; पण केवळ इतकेच नाही. ती प्रिय असल्याचे दुसरे कारण याहून महत्त्वाचे आहे आणि तिने त्याचा एकदा जीव वाचविला आहे.

एकदा मोहिमेवर असताना दशरथाचा निवास कैकय नरेश अश्वपतीच्या प्रासादात होता. कैकेयी ही अश्वपतीची रूपवती कन्या. शूर दशरथाच्या स्वागत सत्काराकडे तिने जातीने लक्ष दिले. ती दशरथाच्या मनात भरती. यापूर्वी दशरथाचे दोन विवाह झाले होते. परंतु तो निपुत्रिकच होता. राजा दशरथ यांनी अश्वपतीकडे कैकेयीला मागणी घातली. अश्वपतीने कन्यादान केले, पण 'तिच्याच मुलाला अयोध्येचे राज्य मिळेल' या अटीवर,   कौसल्येला आणि सुमित्रेला पुत्र नाहीच, तेव्हा हिला पुत्र झाला तर तोच सिंहासनाचा अधिकारी ठरेल या विचाराने ती अट मान्य करून दशरथाने कैकेयीशी विवाह केला.

वस्तुतः कैकेयी मुळात भाबडीच आहे. ती अल्लड आहे, पण
तिचे मन निर्मळ आहे. रामाच्या सद्गुणावर तिचा पूर्ण विश्वास
आहे म्हणून राम जर राजा झाला तर तुझी दुर्दशा होईल, या
मंथरेच्या विधानाला ती प्रारंभी धुडकावून लावते, आपण राजमाता व्हावे आणि इतर राण्यांवर वर्चस्व गाजवावे अशी तिची राक्षसी महत्वाकांक्षा ही नाही आणि विकृत मानसिकताही नाही. कैकेयीची व्यक्तिरेखा जाणून घ्यायची, तर बाह्य मुद्द्यांवर विचार करत बसण्यापेक्षा तिच्याच अंतरंगाचा वेध घेणे श्रेयस्कर आहे आणि तसा वेध घेतल्यावर उमगते की कैकेयी शेवटी तिरस्करणीय ठरली खरी, पण फक्त मंथरेच्या विचारसरणीच्या आहारी गेल्यामुळेच आणि मुळात कैकेयी हलक्या कानाची होती आणि विवेकहीन होती हे मानावेच लागेल. 

सर्वेश फडणवीस 

#ramnavmi25 #Day4 #रामायणातील_व्यक्तिरेखा 🚩🙏

No comments:

Post a Comment