Wednesday, March 15, 2023

◆ कॅप्टन गुरबचन सिंग सलारिया -१९६२


भारतीय सैन्यातील एक पराक्रमी सैनिक आणि परमवीर चक्राचे ते सहावे मानकरी आहेत. कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९३५ रोजी शकगड जिल्ह्यातील जनवल या गावी झाला. त्यांचे वडील ब्रिटिशकालीन भारतीय सेनेत कार्यरत होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या गावी घेतल्यानंतर १९४६ रोजी ते बेंगलोर येथे किंग जॉर्ज रॉयल मिलिटरी कॉलेज येथे दाखल झाले. या कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) येथे त्यांनी प्रवेश घेतला.

५ डिसेंबर १९६१ रोजी दुपारी एक वाजून बारा मिनिटांच्या सुमारास कॅप्टन सलारिआ आपल्या छोट्या फौजेनिशी रस्त्यावरच्या अडथळ्यापासून काही अंतरावर पोहोचले आणि त्यांच्या उजवीकडून होणाऱ्या शत्रूच्या मोठ्या तोफा आणि बंदुकीच्या गोळीबारात सापडले. या ठिकाणी शत्रूने न दिसणाऱ्या खड्डयात तळ ठोकला होता. कॅप्टन सलारिया यांच्या छोट्या तुकडीसमोर, शत्रूच्या दोन शस्त्रसज्ज गाड्या आणि सैनिक होते. कॅप्टन सलारिया यांना एका गोष्टीचे समाधान वाटले की, त्यांची टक्कर छोट्या फौजेशी होतेय. हीच फौज शत्रूच्या मुख्य अडथळ्याला जर जाऊन मिळाली, तर मुख्य अडथळा जास्त मजबूत झाला असता आणि त्यांचे मुख्य उद्दिष्ट संकटात आले असते. त्यांनी ग्रेनेडच्या साहाय्याने शत्रूशी लढत दिली. त्यांना प्रसंगी रॉकेट लाँचर सहकार्यही मिळाले. या शौर्यपूर्ण कामगिरीमध्ये कॅप्टन सलारिया यांनी शत्रुसैन्यातील काहींना ठार केले. शस्त्रांनी सज्ज असलेल्या दोन गाड्या उलथवल्या. या अनपेक्षित शौर्यपूर्ण हल्ल्याने शत्रूचे मनोधैर्य खचले आणि ते संरक्षित जागी असून आणि त्यांचे संख्याबल अधिक असूनही, त्यांनी हल्ला केला. 

शत्रूच्या तोफांमधून आलेल्या गोळ्याने, कॅप्टन सलारिया यांच्या मानेला दुखापत झाली. त्यातून रक्तस्त्राव होत होता. पण अगदी शेवटपर्यंत ते लढत होते. कॅप्टन सलारिया यांच्या धीरोदात्त कामगिरीमुळे लढाईच्या मुख्य ठिकाणाकडे, शत्रूची ही फौज जाऊन मिळण्यास प्रतिबंध झाला. त्यामुळे त्या आडवळणावर शत्रूविरुद्ध लढणाऱ्या त्यांच्या मुख्य सेनेला यश प्राप्त झाले. 

कॅप्टन सलारिया यांना झालेल्या जखमांमुळे, नंतर त्यांचा मृत्यू झाला. स्वतःच्या सुरक्षिततेची जराही पर्वा न करता, निर्भीड नेतृत्वामुळे, कॅप्टन सलारिया यांनी आपल्या छोट्या गुरखा चमूला खूप प्रोत्साहित केले. शत्रूकडे संख्याबळ अधिक होते आणि त्यांनी त्या जागेवर भरभक्कमपणे पाय रोवले होते. तरीही ह्या छोट्या चमूने निधड्या छातीने, ती जागा लढवली. शत्रुसैन्याचे अनेक सैनिक मारले आणि शत्रूचा बीमोड केला. आपल्याकडे शत्रूच्या तुलनेत मनुष्यबळ कमी असतांना, कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता, कर्तव्य बजावताना, भारत मातेचे संरक्षण करताना धैर्य आणि शौर्य दाखवण्यासाठी कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांना १९६२ रोजी मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. भारत मातेच्या या वीराला, त्यांच्या कार्याला मनापासून प्रणाम.

सर्वेश फडणवीस 

#rashtrankur #राष्ट्रांकुर #Day6 #paramvirchakra

No comments:

Post a Comment