Saturday, September 20, 2025

ब्रह्मवादिनी

आपल्या देव देवता म्हणजे शक्ती आहेत. शक्तीला तिच्या तेजामुळे देवी हे अभिधान प्राप्त झाले. गेल्या सहा वर्षांपासून आदिशक्तिच्या पर्वकाळात विविध विषयांवर या माध्यमातून लेखन झाले. "उत्सव आदिशक्तीचा" शीर्षकांतर्गत विदर्भातील देवी स्थानांवर, "त्वं ही दुर्गा" अंतर्गत सामाजिक क्षेत्रांत कार्य करणाऱ्या स्त्रियांवर, "कर्तृत्वशालिनी" या अंतर्गत संरक्षण दलातील कार्यरत मातृशक्तीवर आणि  "आधारवेल" अंतर्गत गेल्या शतकातील आणि आताच्या ऐतिहासिक स्त्री चरित्रांवर, "विज्ञानवादिनी" अंतर्गत वैज्ञानिक क्षेत्रात महिलांनी केलेल्या कार्याचा परिचय, अहिल्याबाई यांच्या त्रिशताब्दी जन्मजयंती निमित्ताने “नवनवोन्मेषशालिनी” अंतर्गत अहिल्याबाईंच्या नऊ पैलूंना स्पर्श केला यावर्षी याच धारेत वेदकालीन स्त्री चरित्र "ब्रह्मवादिनी"अंतर्गत सलग नऊ दिवस मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सव जागर उत्सवाला सर्वत्र उत्साहात सुरुवात होणार आहे. नवरात्रात खरं तर जागर हा स्त्री शक्तीचा व्हायला हवा. अनेकजण या माध्यमातून तो करतांना दिसत आहेत.
ऋग्वेद सर्वात प्राचीन वाङ्मय समजले जाते. यात दहा मंडले असून त्यातील निरनिराळ्या सूक्तांची रचना वेगवेगळ्या ऋषींनी केली आहे. या ऋषींना आपण मंत्रद्रष्टे म्हणतो कारण त्यांच्याकडे जी दिव्य दृष्टी  आहे त्याद्वारे ते प्रत्यक्षाच्या पलीकडेही पाहू शकतात. या ऋषींमध्ये काही स्त्रियाही आहेत ज्यांनी  ऋग्वेदातील काही सूक्तांची, काही ऋचांची रचना केली आहे त्यांना ब्रह्मवादिनी म्हणत असत. वेद उपनिषद काळापासून स्त्री ही खरं तर पूजनीय, वंदनीय आहे. वैदिक काळापासून ती शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित अशीच होती आणि आजही हे संचित कायम आहे. तिचा प्रतिकात्मक नऊ दिवस आणि सदैव केलेला आदर आणि सन्मान म्हणजेच नवरात्र. 

आज सर्व क्षेत्रात ती कार्य करते आहे आणि सर्व शिखर पादाक्रांत करते आहे. हे करण्याचे धैर्य तिला इतिहासातून मिळाले आहे. संस्कारांचे बाळकडू घेऊन स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्र स्वतःच्या कर्तृत्ववाने यशोशिखरावर नेले आहे. आज प्रत्येक कार्यक्षेत्रात झोकून काम करायला सदैव तयार असणारी, नव्हे अग्रेसर असणारी स्त्री आहे. ज्या भारताला आम्ही मातेचा दर्जा देतोय त्या भारतातील स्त्री वंदनीय आहे. सर्ववेद, ब्राह्मणे, बृहददेवता, उपनिषदे, महाभारत, पुराणे स्त्री चरित्रांनी भरलेले आहेत. समाजातील विकृतीला सुद्धा प्रसंगी धैर्याने लढणारी रणरागिणी म्हणजे सुद्धा एक स्त्रीच आहे इतिहासातून मिळालेल्या सद्गुणांचा संचय करत तिची वाटचाल प्रत्येकाला प्रेरणादायी आहे. आपल्या देशाचा गौरवशाली इतिहास वेद आणि उपनिषदांच्या काळापासून तिच्या पराक्रमाने उन्नत झाला आहे. आपल्या पराक्रमाच्या गाथा तिने त्रिखंडात गाजवलेल्या आहेत. प्रत्येकाला गर्व वाटेल अशीच स्त्रीची वाटचाल आहे. 

खरंतर वेदकाळी स्त्रियांना प्रतिष्ठा होती. धर्मकारण, राजकारण, ज्ञान-विज्ञानकारण आणि समाजकारण ह्या सर्वात तिला पुरुषासारखे प्राधान्य होते. काही बाबतीत तर ती पुरुषाहुन अधिक सन्मानाने वागवली जाई, अद्भुत आणि अविस्मरणीय कार्य वेदकालीन स्त्रियांनी केले आहे. त्यांच्या योगदानाबद्दल त्या सदैव स्मरणात राहणाऱ्या आहेत अशाच वेदकालीन स्त्रियांचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतोय."ब्रह्मवादिनी" या बिरुदावलीत थोडीफार मांडणी करण्याचा प्रयत्न सलग ९ दिवस करणार आहे. आज जागतिकीकरणात 'ती' स्वतःला सिद्ध करत जी यशस्वी वाटचाल करते आहे त्या तिच्या कर्तृत्वाने अशीच उंच भरारी घेत रहावी हीच सदिच्छा आहे कारण हे संचित तिला वैदिक काळापासून मिळालेले आहे आणि त्यातूनच हे लेखन करण्याचा प्रयत्न असणार आहे. 

सर्वेश फडणवीस 

 #ब्रह्मवादिनी #नवरात्र #लेखमाला

No comments:

Post a Comment