Saturday, June 13, 2020

अवघा झाला आनंदू !! 🚩


श्री संत कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान !!

“रामकृष्ण हरी”. वारकरी संप्रदायाचा महामंत्र.

गेली साडेसातशेहून जास्त वर्षे  " वारी " अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी,भजन,कीर्तन,रिंगण,खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

ज्येष्ठ कृ.अष्टमी या तिथीला आळंदी हून प्रस्थान ठेवलेली माउलींची  पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करण्याऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे.आज आपण ही सगळे या पालखी सोहळ्यात सामाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माउलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्णाचा गजर करत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जात आहोत. कारण या परंपरचे महाराष्ट्र साडेसातशे वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आचरण करत आहेत. लाखो वारकरी,हजारो मृदुंग,हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेनी चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदानी कोंदून जाते. मैलोनगणिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो. आणि लक्षावधी वारकरी ऊन,तहान,पाऊस,वारा,वादळ याची पर्वा न करता चालत असतात.

मानवा-मानवांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी होय. 

प्रवाही नदी जशी स्वयंशिस्तीने आपले काठ निर्माण करत जाते तसाच हा वारकऱ्यांचा प्रवाह पंढरीच्या दिशेने वाहताना दिसून येतो. अगदी शिस्तीत चाललेले वारकरी नैतिक मर्यादांचे उल्लंघन न करता स्वयंप्रेरणेने  चालत असतात. वाटेत रंजल्या-गांजल्यांना मदत करत असतात.  

वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं,वारी म्हणजे देव-भक्त भेटीतील आतुरता,वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास,वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया,वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास, वारी म्हणजे देव शोधता-शोधता स्वत:च देव होऊन जाणं, वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रति जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे.

पण यावर्षी उदभवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे आपल्या काही धार्मिक व पारंपरिक घटनाप्रसंग साजऱ्या करणाऱ्या पद्धतीलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी ज्ञानदेव पालखी आळंदीहुन पंढरपूरला जाते परंतु कोरोनासंकटामुळे आपल्या समोर मोठीच गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी १७ दिवस माउलींचा मुक्काम आजोळी अर्थात गांधी वाड्यात असणार आहे. पालखी पंढरपूरला नेण्याचा उत्सव सुरू होण्यापूर्वी ज्ञानदेवांच्या पादुका झोळीत नेत असत. हैबतीबुवा,वासकर,खंडूजी,शिवथळ यांनी हा उत्सव सुरू केला होता. सकल संतांचे लाडके असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री माउली आज काही क्षणात प्रस्थान ठेवणार आहेत..आज सर्व वारकरी आळंदीला पोहोचले असते येथुन माउलींच्या समवेत सर्वजण निघाले असते एका विठुरायाच्या दर्शनासाठी. पण आलेल्या या महामारीच्या संकटामुळे आज आपल्या स्थानावरूनच चला आपण ही निघूया त्या विठूरायाच्या दर्शनार्थ रामकृष्णाचा गजर करत… जय जय रामकृष्ण हरी...

" यंदाची वारी करूया घरी, घालवू कोरोना महामारी "

✍️ सर्वेश फडणवीस

No comments:

Post a Comment