Monday, June 15, 2020

न्यायधुरीण मीरा खडक्कार !!

श्रीमती मीरा खडक्कार !! आज हे नाव नागपूरात परिचित आहेच पण आज अनेक समाजसेवी संस्थेच्या कार्यकारणी मंडळामध्ये आदराने ह्या नावाचा उल्लेख केला जातो. या देशात आपण जन्माला आलो,या देशाचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना सध्या कमी झाली,नाहीशी झाली हे कळण्याच्या पलीकडे गेलं आहे. पण मीराताई आजही अनेक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी ह्या भावनेतूनच आजही कार्यरत आहे. 

मीरा खडक्कार हे नाव निवृत्त न्यायाधीश म्हणून पुरेसे नाही तर ह्यांनी निवृत्तीनंतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरू असल्याने अधिक परिचित आहे. B.A फायनल ला असतांना लग्न झाले व त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. १९७१ मध्ये वकिलीची सुरुवात केली. पुढे १९९२ मध्ये मुंबई कुटुंब न्यायालयात न्यायदानाचे काम त्यांनी सुरू केले, १९९६ मध्ये नागपूरात बदली झाली आणि १९९७ मध्ये नागपूरच्या कुटुंब न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून नवी सुरुवात झाली.जवळपास १७ वर्ष न्यायदानाचे काम केल्यानंतर जुलै २००९ मध्ये निवृत्त झाल्या आहे. कुटुंब न्यायालयात असल्याने कुटुंब हा जिव्हाळ्याचा विषय बनत गेला. अनेक विभक्त होणाऱ्या कुटूंबाची बाजू समजून घेत योग्य तो न्याय देत एकत्र कुटुंब आणण्यासाठी प्रयत्न केले. 

सहज मध्यंतरी भेट झाली असता, कुटूंब व्यवस्थेवर बरीच चर्चा झाली. मुंबई आणि नागपूर या महानगरात काम केल्याने महानगरातील कौटुंबिक समस्या जवळून बघितल्या आहेत. त्या म्हणतात,आजच्या तुलनेत कुटुंब व्यवस्था त्याकाळी बरीच चांगली होती,वातावरण चांगले होते,सदस्यांमध्ये प्रेम,जिव्हाळा होता. नात्यात आत्मीयता होती. एकमेकांना आधार देणे,मदत करणे ह्या गोष्टी सहजतेने होत होत्या. पैसा भावनेपेक्षा दुय्यम होता आणि कुटुंब विघटित करणं मनाला क्लेश कारक होते. हळूहळू परिस्थिती बदलत गेली विवाह,व्यवहार जास्त आणि प्रेम,भावना कमी झाली. व्यक्ती स्वातंत्र्य,आत्मकेंद्रित विचार,कुटुंबातील सदस्यांकरिता त्याग करण्याची वृत्ती,हळूहळू आज कमी होते आहे,आज परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे,पण तितक्याच प्रमाणात कुटूंब वाचवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्ती करत आहे ह्याबद्दल आत्मीय समाधान त्यांनी व्यक्त केले होते. 

जोपर्यंत माणसाचे विचार आणि मानसिकतेत बदल होत नाही, तोपर्यंत प्रश्नं सुटणार नाहीत. तरुण पिढी ही शिक्षित आहे, पण जर ती सुजाणतेने वागली तर अनेक समस्या सोडवू शकते. आपण या देशाचे काही तरी देणे लागतो या विचाराने आपण आपली जबादारी पार पाडली पाहिजे आणि ह्याच जाणिवेतून अर्थार्जनासाठी काम करायचे नाही हे मीरा ताईंनी ठरवले. आपला अनुभव,आपले शिक्षण आणि ज्ञान याचा समाजाकरिता उपयोग व्हावा म्हणून निवृत्तीनंतर लगेच अनेक संस्थेच्या माध्यमातून कार्य सुरू केले. सुरुवातीला अध्यक्ष ग्राहक तक्रार निवारण केंद्र ,श्रद्धानंद अनाथालय उपाध्यक्ष,गृहिणी समाज,भारतीय स्त्री शक्ती येथे स्थानिक पातळीवर काम सुरू झाले. 

नंतर हळूहळू कार्याचा विस्तार होत गेला मग पुढे अधिवक्ता परिषद विदर्भ प्रांत,जम्मू काश्मीर अध्ययन केंद्र नागपूर विभाग अध्यक्ष, वृंदावन येथील विधवांच्या परिस्थितीच्या वास्तविकतेचा अभ्यास करणाऱ्या समूहाचे नेतृत्व त्यांनी केले, अधिवक्ता परिषद राष्ट्रीय उपाध्यक्ष ह्या दायित्वाने प्रवास सुरु झाला. काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीर मधील कठूवा प्रकरण झाले होते. त्यातील नवी दिल्ली येथील वास्तव शोधन समितीत (All India Intellectuals Association) मध्ये काम करत असतानाच जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीला त्यांना जवळून बघता आले. ज्या क्षेत्रात कायद्याचा अभ्यास,परीक्षण ह्या गोष्टी आवश्यक असतील त्यावर मीरा ताईंनी कार्य केले आहे. नुकतेच २०१९ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या सल्लागार समितीच्या सदस्य पदी त्यांची निवड झाली आहे. 

आज इतक्या दायित्वाच्या वलयाभोवती असतांना या वयातील उत्साह बघतांना त्यांचे हेच सांगणे आहे,आपले पारिवारिक दायित्व पार पडल्यानंतरचा आपला वेळ समाजासाठी आणि आपल्या देशासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत घालवावा त्यानेच आपले मन ताजेतवाने आणि उत्साही राहते. जीवनात चढउतार येतातच पण आज वयाच्या ह्या टप्प्यावर आनंदी व मानसिक शांतता आणि समाधान त्यांच्याजवळ आहे. शालेय जीवनापासून  The Miller of The Dee ही कविता त्यांच्या जीवनाचे सूत्र आहे. त्यातली “I envy nobody no, not I And nobody envies me !" ही ओळ म्हणजेच त्यांची ओळख यथार्थ ठरेल कारण त्यांनी कधी कुणाचा हेवा केला नाही,कुणाशी स्पर्धा केली नाही. कायमच प्रसिद्ध परांगमुख राहत कार्य केले आहे. 

आज प्रत्येक सुबुद्ध ,जाणकार,सद्सद्विवेकबुद्धी शाबूत असलेल्या बुद्धीप्रामाण्यावर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेनं न जाता त्या वाऱ्याचा रोख बदलवून नव्या दिशेला जाणं अत्यंत गरजेचे आहे आणि आज ह्यासाठी मीराताई सतत कार्यमग्न आहे. सकारात्मकता जवळ असल्याने ती इतरांना सदैव सुहास्याने देणाऱ्या मीरा ताईंना परमेश्वराने निरामय आरोग्य प्रदान करावे हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

#आयुष्य_जगणारी_माणसं 

No comments:

Post a Comment