Saturday, July 8, 2023

🔹 सप्तसुरांची *देवता 📖

शीर्षक वाचूनच हा स्मृतिग्रंथ वाचनाची ओढ लागली. एका बैठकीत वाचून हा ग्रंथ अलगद बाजूला झाला आणि लता दीदींना पुन्हा ऐकण्याची इच्छा झाली. सप्तसुरांची देवता लता मंगेशकर नावासोबत मुलायम आवाजातील सुंदर गीतांचं अस्तित्व आणि जनतेच्या मनातील त्यांच्याप्रती असलेला नितांत आदरभाव सामावला आहे. सप्तसुरांची देवता या स्मृतिग्रंथाच्या नावाचे मोठेपणच उत्तुंग आहे. भारतातील प्रत्येक व्यक्ती, मग तो वृद्ध असो वा बालक, गरीब असो वा श्रीमंत, शहरी भागातील असो वा ग्रामीण, सर्वांना हे नाव परिचित आहे. नुसते परिचितच नाही, तर त्या नावाबद्दल विलक्षण आपलेपणा, प्रचंड जिव्हाळा, आणि अतिशय प्रेम आहे. कुठल्याही प्रहरी हा सूर ऐकण्याची इच्छाच होते. 

प्रत्येक भारतीयाच्या मनात दिदींबद्दल आजही आदर असेल याची खात्री आहे. केवळ भारतीयांच्याच नव्हे, तर परदेशातील जनतेच्यासुद्धा मनात 'लता मंगेशकर' या नावाबद्दल विलक्षण आपुलकी आणि आदरभाव आहे. हा स्मृतिग्रंथ वाचून ती आपुलकी आणि आदर अधिक वाढत जातो कारण यात ज्या लेखांचे संकलन केले आहे ते लतादीदी गेल्यानंतर त्यांच्यावर लिहिलेल्या ३० मान्यवर लेखकांनी जसे ए. आर रहमान, गुलजार, आशुतोष शेवाळकर, सतीश पाकणीकर, श्रुती सडोलीकर, अरुणा ढेरे, राज ठाकरे, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, राहुल देशपांडे, विष्णू मनोहर अशा अनेक मान्यवरांचे लेख यात आहेत आणि विविध मराठी वृत्तपत्रात लिहिलेल्या १९ विशेष संपादकीय लेखांचे संकलन यात आहे. 

मा. दीनानाथांच्या आधारवेलीवर लता मंगेशकर हे नाव बहरलेच नाही तर त्याचा वेलू गगनावरी गेला. कंठातील देवदत्त गंधार घेऊनच जन्माला आलेल्या ल-ता- मं-गे-श-क-र ह्या सप्तरंगी सुरांनी अभिजात अमृतस्वरांची नादमधुर बरसात भूतलावर करून संगीतकलेला अतिशय ऐश्वर्यसंपन्न करून सर्वोच्च उंची प्रदान केली. मधुर आणि मुलायम आवाज, स्पष्ट, अर्थपूर्ण शब्दोच्चार यांमुळे लता दिदींचे गाणे ऐकणारा कायम भारावून जातो. दुःख, क्लेश, यातना यांना विसरायला लावण्याचे विलक्षण सामर्थ्य लतादिदींच्या स्वर्गीय गळ्यात होते. जवळजवळ सर्व भारतीय भाषांत गाणी गाऊन त्यांनी आपले स्वर काश्मीर ते कन्याकुमारी अजरामर केले आहे. 

आपल्या लेखात रेखा चवरे जैन छान लिहितात, दीदी प्रत्यक्ष या भूतलावर नसल्या तरी सुरांच्या रूपाने अमर आहेत. त्यांच्या गाण्यांनी करोडो रसिकांना उच्च - निर्मळ आनंद दिला. आमच्या सुखदुःखात दीदींचा सूर तन्मय झाला. प्रत्येक सुखाची भावना त्यांच्या सुरांमुळे गडद झाली तर दुःखी भावना हलकी झाली. आनंद, तृप्ती अशा विलक्षण भावनांची अद्भुत अनुभूती घेत त्यांची गाणी आपण मनात साठविली. दीदींच्या अलौकिक - अमृतमय सुरांच्या साथसंगतीने आपले आयुष्य चैतन्यमय झाले. जगण्याच्या प्रत्येक क्षणी साथ देणारा दीदींचा सूर आणि दीदीही  आपल्याच वाटू लागल्या. दीदींच्या कारकिर्दीत गीतकारांच्या पिढ्या बदलल्या, संगीतकारांच्या पिढ्या बदलल्या, नायिकांच्याही पिढ्या बदलल्या, पण दीदी मात्र दीपस्तंभासारख्या टिकून दुसऱ्यांना मार्ग दाखवित राहिल्या. सर्व गीतकार, संगीतकार, सहगायक, नायिका या सर्वांचा ध्यास एकच होता तो म्हणजे दीदींबरोबर काम करणं. गेली सात दशकं रसिकांच्या चार पिढ्या दीदींची गाणी ऐकत मोठ्या झाल्या आणि पुढील कितीतरी पिढ्यांना हे सुवर्णसंचित लाभणार आहे आणि हे शब्दशः सत्य आहे. 

मुंबईतील 'प्रभकुंज' ही ऐतिहासिक वास्तू म्हणजे साक्षात स्वरसरस्वतीचं निवासस्थान. ही पवित्र वास्तू म्हणजे रसिकांसाठी जणू मंदिरच आहे. या मंदिराकडे नेणारा पेडर रोड हाही आपल्या आत्मीयतेचाच विषय आहे म्हणून जेव्हा येथून हसऱ्या फोटोसह दीदींचा रथ निघाला, ते दृश्य आपण बघूच शकलो नाही आणि उरात उसळणाऱ्या कालवाकालवीने हलून गेलो. ज्या मार्गावरून दीदींनी कितीदा तरी जाणं-येणं केलं, ज्या मार्गाने सदैव चैतन्यमय दीदी बघितल्या, त्या मार्गाचंही काळीज तेव्हा नक्कीच फाटलं असणार. अंतिम क्षणी दीदींच्याच स्वरात वाजत असणारं 'ए मेरे वतन के लोगो' ऐकून अजूनच गहिवरून आले. हे ही विलक्षण होते की दीदींना अखेरची मानवंदना त्यांच्याच गीताने देण्यात आली. आज दीदी प्रत्यक्ष या भूतलावर नसल्या तरी सुरांच्या रूपाने अमर आहेत. मानवाच्या मर्यादा आहेत पण लतादीदी मात्र अपार्थिव आहे. आणि याचसाठी दीदी देहरूपाने नसतांना हा स्मृतिग्रंथ वाचतांना वाचक म्हणून आपण समृद्ध होतोच पण दीदी किती मोठ्या असतील याची भावना नकळत मनात येते. हा स्मृतिग्रंथ संग्रही असावा असाच आहे. कारण येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हे सांगण्याचे उत्तरदायित्व आपल्यावरच आहे. 

सप्तसुरांची देवता 
संपादन - रेखा चवरे जैन 
प्रकाशक - परचुरे प्रकाशन मंदिर
मूल्य - ₹ ३००
संपर्क क्रमांक - 9869928646 / 020-24473372

Sunday, June 25, 2023

'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती'

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित 'द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड' या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद 'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती' हे भारतीय विचार साधना पुणे यांनी प्रकाशित केले आहे. मूळ इंग्रजी पुस्तक वाचले होते पण याचा अनुवादही वाचनीय झाला आहे. नुकतंच एक चांगले पुस्तक वाचून पूर्ण झाले याबद्दल सकारात्मक वाटतं आहे. देशाचे धोरण आणि रणनीती यांच्यावर अत्यंत बारकाईने विचार करायला लावणारे हे पुस्तक आहे. 

खरंतर द इंडिया वे अर्थात 'भारत मार्ग' म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणातील काम करणाऱ्या एका व्यक्तीचा असा दृष्टीकोन आहे, जो जाणीवपूर्वक प्रत्यक्ष वास्तवाशी जोडलेला आहे. हे पुस्तक अनेक प्रकारच्या समूहांना डोळ्यासमोर ठेवून लिहिले गेले आहे. जगातील लोकांसाठी हे पुस्तक म्हणजे भारताच्या वैचारिक भूमिकेची एक सुव्यवस्थित मांडणी आहे. त्यातून जगाला याबाबत अधिक स्पष्टता येणे आणि त्यांची याबाबतीतील स्वीकारार्हता वाढणे अपेक्षित आहे. शेवटी जगात आपला प्रभाव वाढत जाताना जगाला आपला अधिक चांगला परिचय होणे आवश्यक आहे. या अंतरंग ओळखीमुळे सहकार्याच्या शक्यता वाढतील आणि गैरसमज होण्याच्या संभावनाही कमी होत जातील; पण हे पुस्तक त्या भारतीयांसाठीसुद्धा आहे, जे
परराष्ट्र धोरणाच्या प्रत्यक्ष संबंधात नाहीत. हे लक्षात घेतले पाहिजे, की आंतरराष्ट्रीय घटनांकडे ते लक्ष देत असोत वा नसोत, या घटनांच्या परिणामांपासून कुणाची सुटका नाही. 'एक बदल आणि चार हादरे' हा याचा ठोस पुरावाच आहे. याहीपलीकडे धोरण ठरवताना त्यांच्या स्वतःच्या हिताशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या क्षेत्रांत जे निर्णय घेतले जातील त्याच्या परिणामाचे ते भागीदार आहेत आणि कायम राहतील. 

या पुस्तकातून आपल्याला परराष्ट्र धोरणाने प्राप्त केलेली शक्ती लक्षात येते. कोविडच्या काळातही अमेरिकेने केवळ भारतासाठी आपले धोरण बदलून भारताला आवश्यक ती कच्ची सामुग्री दिली. यावरून भारताने मिळवलेले यश लक्षात येते. आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या परराष्ट्र मंत्री म्हणून डॉ. जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे हीच पर्वणी आहे.

भारत मार्ग या पुस्तकात परराष्ट्र धोरणावरील तीन पैलूंवर अधिक प्रकाश टाकलेला आहे. पहिले फाळणीचे, दुसरे उशिरा सुरू करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचे आणि तिसरे आण्विकदृष्टया आपण सक्षम असतानाही त्याला पुढे नेण्यात आपण गमावलेला काळ या तीन पैलूंवर विशेष भर देण्यात आला आहे. आणि त्याचा परराष्ट्र धोरणावर परिणाम झाल्याचे पुस्तकात मुद्देसूद मांडण्यात आले आहे. त्यासोबत चीनने रशिया आणि अमेरिकेच्या मदतीने प्रगती साधली असताना आपण का मागे पडलो याचा उल्लेखही माहितीपूर्ण आहे. आत्ताची राजकीय परिस्थिती, तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा देशावर काय परिणाम होणार आहे याची माहिती पुस्तकात वाचायला मिळते. 

जागतिकीकरण ही आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. पुरवठा साखळी आणि डेटा व्यवस्थापन हे जगात मोठे आव्हान आहे. उद्योगाला प्रोत्साहन देऊन देशात तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारत मार्ग जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. प्रगती, क्षमता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विचार अनुसरणारा आणि विकसनशील देशांचा आवाज बनणारा भारत मार्ग देशासाठी उपयुक्त ठरणार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल हा विश्वास वाटतो. 

परराष्ट्र धोरणासाठी सहा महत्वाची सूत्रे डॉ. जयशंकर यांनी या पुस्तकातून सांगितली आहेत. स्वावलंबन, आत्मविश्वास, विषयानुसार सहकार्य, राष्ट्रीय सुरक्षा, जागतिक अजेंडा, इतर देशातील भारतीयांचा विचार ही परराष्ट्र धोरणाची सहा प्रमुख सूत्रे आहेत. ‘मेक इन इंडिया’ हे देशाच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे. देशांतर्गत पुरवठा साखळीही मजबूत करून जागतिक बाजाराशी जोडले जायला हवे. त्यासाठी सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन द्यावे लागेल. आव्हानात्मक परिस्थितीत देशाच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील. युक्रेन युद्धाच्या परिस्थितीत भारताने हेच केले. विविध क्षेत्रात सामंजस्य प्रस्थापित करताना आपल्या आणि जगाच्या हिताचा विचार करणे आवश्यक आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारानुसार जगाच्या कल्याणाचा विचार योग्य ठरतो, हा विचार या पुस्तकातून अधिक व्यापकता दर्शवतो.

सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार करणारे परराष्ट्र धोरण हवे. चांगले परराष्ट्र धोरणासाठी देशातील राज्यांचाही सहभाग आणि सर्व राज्यांच्या कल्याणाचा विचार असायला हवा. परराष्ट्र धोरण ठरवतानाही सामान्य जनांच्या भावनादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. इतिहासापासून आपल्याला शिकायला हवे, लक्षात ठेवायला हवे, त्याची समीक्षा व्हायला हवी. भविष्यात जगाच्या बाबतीत जागरूक रहायला हवे. जग आज आपल्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. जगात होणाऱ्या घटनांचे परिणाम आपल्या देशावरही होतात. जग बदलत असताना आपल्यालाही त्या वेगाने बदलावे लागेल आणि या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीला जगाच्या बाबतीत अधिक माहिती असणे आवश्यक आहे. याबद्दल हे पुस्तक अधिक वाचतांना विचार देणारे पुस्तक आहे. 

डॉ. जयशंकर यात लिहितात," चीन जागतिक शक्ती असून भविष्यात महाशक्ती बनण्याची शक्यता लक्षात घेता त्या देशासंबंधातील रणनिती तयार करावी लागेल. जपानचे तंत्रज्ञान आणि सुरक्षा व संरक्षण तंत्रज्ञानाचा लाभही घ्यायला हवा. भारताचा प्रभाव आज हिंद महासागराच्या पुढे जावून प्रशांत महासागरापर्यंत पोहोचला आहे. या सर्व बाबींचा विचार करता भारताला आपल्या विचारांवर आधारीत धोरण ठरवावे लागेल." हे त्यांनी अनेक उदाहरणातून स्पष्ट केले आहे. 

आजवर कोणत्याही परराष्ट्र मंत्र्याला कार्यरत असताना परराष्ट्र धोरणावर पुस्तक लिहिण्यासाठी वेळ आणि इच्छा असल्याचे अभावानेच आढळून आले; पण राजनीतीत मुरलेले मुत्सद्दी डॉ. एस. जयशंकरांसारखे विद्वान जेव्हा सूत्रे हातात घेतात, तेव्हा सखोल विचारमंथनातून एखादे विस्तृत पुस्तक समोर येणे स्वाभाविक आहे. 'द इंडिया वे' अर्थात भारत मार्ग हे एका डोळस निरीक्षकाचे आत्मनिवेदनही आहे आणि भारत ऐतिहासिक बदलांशी कशा प्रकारे जुळवून घेत आहे, हे जगाला सांगण्याचे एक साधनही आहे. हे पुस्तक एका महत्त्वाकांक्षी देशाचे भवितव्य काय आहे याविषयी बरेच शिकवतो. भारताला आता व्यावहारिक राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचे प्रखर आवाहन आहे आणि यात भारत मार्ग अग्रेसर असेल हाच विश्वास आहे. अत्यंत वाचनीय आणि संग्रही असावे असेच हे पुस्तक आहे. 

'भारत मार्ग: जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती'
लेखक डॉ.एस.जयशंकर - अनुवादिका - सारिका आठवले
प्रकाशक : भारतीय विचार साधना - पुणे 
मूल्य - ₹ ३०० 

सर्वेश फडणवीस 

Sunday, June 11, 2023

श्री संत कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान निमित्ताने..

अवघा झाला आनंदू  !! 🚩🚩

"रामकृष्ण हरी". वारकरी संप्रदायाचा महामंत्र आहे. गेली साडेसातशेहून जास्त वर्षे  ' वारी ' अव्याहतपणे सुरू आहे. भक्तांसाठी दिंडी, भजन, कीर्तन, रिंगण, खेळ याचसोबत विविध संतांच्या पालख्यांचे दर्शन घेणे हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

ज्येष्ठ कृ.अष्टमी या तिथीला अर्थात आज आळंदीहून प्रस्थान ठेवलेली ज्ञानेश्वर माउलींची  पालखी आळंदी ते पंढरपूर या अखिल विश्वाची उत्पत्ती करण्याऱ्या दयाघन पांडुरंगाच्या दर्शनार्थ निघाली आहे. आज आपण ही सगळे या पालखी सोहळ्यात सामाविष्ट होतो आहे. आपण प्रत्येकाने अशी भावना करायची की जणू माउलींची पालखी माझ्या खांद्यावर आहे आणि रामकृष्णाचा गजर करत आपल्या जागेवरून व्हाया आळंदी ते पंढरपूरला जात आहोत. कारण या परंपरचे महाराष्ट्र साडेसातशे वर्षापासून अत्यंत निष्ठापूर्वक आणि संपूर्ण समर्पण भावनेने आचरण करत आहे. लाखो वारकरी, हजारो मृदुंग, हजारो विणे आणि लक्षावधी टाळ घेतलेली पाऊले जेव्हा पंढरीच्या वाटेनी चालतात तेव्हा संपूर्ण विश्व आनंदानी कोंदून जाते. मैलोनगणिक तो नामध्वनी पुढे आपल्या कानावर पडत असतो आणि लक्षावधी वारकरी ऊन, तहान, पाऊस, वारा, वादळ याची पर्वा न करता चालत असतात.

कायम वाटतं वारी म्हणजे मानवा-मानवांमध्ये सलोख्याचे, प्रेमाचे संबंध निर्माण होऊन अखिल जग सुखी व्हावे, समाधानी व्हावे यासाठी एका उदात्त ध्येयाच्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणजे वारी आणि या उच्चतम ध्येयाचा अंगीकार करण्यासाठी व्रतस्थ वृत्तीने झटणारी व्यक्ती म्हणजे वारकरी आहे. 

खरंतर एखादी प्रवाही नदी जशी स्वयंशिस्तीने आपले काठ निर्माण करत जाते तसाच हा वारकऱ्यांचा प्रवाह पंढरीच्या दिशेने वाहताना दिसून येतो. अगदी शिस्तीत चाललेले वारकरी कुठल्याही मर्यादांचे उल्लंघन न करता स्वयंप्रेरणेने चालत असतात. वाटेत रंजल्या-गांजल्यांना मदत करत असतात.  

वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणे नव्हे तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं, वारी म्हणजे देव-भक्त भेटीतील आतुरता, वारी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास, वारी म्हणजे जीवशिवाच्या मिलनाची प्रक्रिया, वारी म्हणजे मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने चाललेला अखंड प्रवास, वारी म्हणजे देव शोधता-शोधता स्वत:च देव होऊन जाणं, वारी म्हणजे वारकऱ्यांचे एकमेकांप्रति जिव्हाळा आणि नातं जे फक्त युगे अठ्ठावीस उभ्या असणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या लाडक्या दैवताचे अर्थात पांडुरंगाच्या दर्शनार्थ आहे. "वारी" हा भगवद्भक्तीचा नुसता आविष्कार नसून, भक्तिप्रेमाची अनुभूती घेण्याची ती सहज स्थिती आहे. परब्रह्माला साठवून विवेकाच्या दिशेने होणारी उन्मत्त वाटचाल म्हणजे पंढरीची वारी. मानवी जीवनात परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी आहे. 

आज सर्व वारकरी आळंदीला पोहोचले आहेत काही वेळाने आळंदीहुन माउलींच्या समवेत सर्वजण निघणार आहेत विठुरायाच्या दर्शनासाठी. चला आपण ही निघूया त्या विठूरायाच्या दर्शनार्थ रामकृष्णाचा गजर करत.

सकल संतांचे लाडके असे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री माउली आज पंढरपूर च्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहेत. नगर प्रदक्षिणा करत त्यांचा आजचा मुक्काम आजोळी अर्थात गांधी वाड्यात असणार आहे आणि उद्या सकाळी माउली पुण्याच्या दिशेने  प्रस्थान ठेवेल.

'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'..

सर्वेश फडणवीस

Wednesday, May 31, 2023

नर्मदेच्या तीरावरचे 'महेश्वर'


" मुली, अहिल्या मेली आणि खंडू जिवंत आहे असे मी समजेन, पण तूं सती जाऊं नकोस. माझं ऐक. " हृदयाचे पाणी करणाऱ्या ह्या शब्दांनी मल्हारराव पुत्रनिधनानंतर आपल्या सुनेची समजूत घालीत होते. खरंतर ही गोष्ट इ. स. १७५४ मध्ये घडली. पेशव्यांचा भाऊ राघोबा ( रघुनाथ ) याने कुंभेरीचा किल्ला घेतला. या मोहिमेंत मल्हारराव त्यांच्या मदतीला गेले होते. लढाईत मल्हाररावांचा मुख्या मारला गेला. या वेळीं अहिल्याबाईही त्यांच्याबरोबर होत्या. खंडूजी हे मल्हाररावांचे एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांना पुत्रनिधनाचा फार मोठा धक्का बसला. या वेळीं अहिल्याबाईचें वय अवघें वीस वर्षांचे होते. त्या काळच्या परिपाठानुसार पतीमागोमाग सती जाण्याची त्यांनी तयारी केली. पण मल्हारराव यांना दुसरा कोणाचाच आधार नसल्यानें त्यांनी अहिल्याबाईंना सती न जाण्याची विनंती केली कारण आपल्या पराक्रमाने मल्हारराव जाणून होते की, इंदूर संस्थानच्या आधारवेल म्हणून अहिल्याबाईच योग्य आहे.  

हे वर्णन वाचून पुण्यश्लोक अहल्याबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महेश्वर या भूमीत मध्यंतरी जाण्याचा योग आला. हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावात अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार चालवला आणि आजही त्याच्या पाऊलखुणा पावलापावलावर जाणवतात. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. महेश्वरचा किल्ल्यासमोरील नर्मदा घाट समृद्ध असाच आहे. खरंतर पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे बघण्यासारखे आहे. 

महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून पुढे जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आणि स्वच्छ आहेत. पेशवा घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटांवर जास्त गर्दी दिसत नाही.  नर्मदेच्या किनाऱ्यावर दगडी बांधकाम असलेला हा किल्ला आहे. वर चढून आत गेल्यावर त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर उभा राहतो. याच किल्ल्यात एका भागात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.

महेश्वरातील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. कालेश्वर, राजराजेश्वर, विठ्ठलेश्वर व अहिल्येश्वर ही मंदिरे खासकरून पाहण्यासारखी आहेत. मंदिरावरची नक्षी, त्यामागील कल्पना या सगळ्या गोष्टी खरोखरच अत्यंत देखण्या आहेत. उत्तम प्रशासक न्याय देणाऱ्या म्हणून अहिल्याबाईंची ख्याति सर्वदूर होती. तडजोड आणि मार्दव हे गुण त्यांच्यात भरपूर असले तरी जिथे गरज असेल तेथें त्या वज्रापेक्षांहि कठोर होत असत.

अहिल्याबाईंचे स्मारक, त्यांनी बांधलेल्या अनेक विहिरी, धर्मशाळा, पूल, रस्ते, घाट आणि देवळें या रूपांत त्यांनी केलेले कार्य आजही सुस्थितीत बघायला मिळते. कलकत्ता ते बनारस रस्ता तयार करून सौराष्ट्रांत सोमनाथाचे, गयेला विष्णूचे आणि काशीला विश्वनाथाचे, नेपाळ येथील पशुपतीनाथ अशी विविध देवालये त्यांच्या धार्मिक वृत्तीची आणि दातृत्वाची आजही साक्ष देत आहेत. अहिल्याबाईंनी त्यांच्या जीवनकाळात केलेल्या पुण्यकर्मामुळेच त्या "पुण्यश्लोक" झाल्या. इंदूर संस्थानचा  कारभार त्यांनी अत्यंत कर्तबदारीने जवळजवळ तीस वर्षे सांभाळला. मल्हाररावानंतर इंदूर संस्थानची आधारवेल आणि स्त्री पराक्रमाचे एक सुवर्णपान मराठी इतिहासात अहिल्याबाईंच्या पराक्रमाने जुळले आणि म्हणून समृद्ध अशी महेश्वरची नर्मदा आजही पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या अस्तित्वाची जाणीव करून देते आहे. एकदा तरी या स्थानाची ऊर्जा प्रत्यक्षात अनुभव घेण्यासारखी आहे. अहिल्याबाई यांच्या चरणी नमन आहे. 

✍️ सर्वेश फडणवीस

Tuesday, May 30, 2023

◆ तरलतरतरंगे देवि गंगे प्रसीद..

भगवति तव तीरे नीरमात्राशनोहं 
विगतविषयतृष्ण: कृष्णमाराधयामि  
सकलकलुषभंगेस्वर्गसोपानसंगे 
तरलतरतरंगे देवि गंगे  प्रसीद।। १।। 

श्रीमद आदि शंकराचार्य यांचे हे गंगाष्टक. हे अष्टक ऐकतांना, म्हणतांना सुद्धा आपण आपल्या स्थानाववरून गंगेच्या काठावर असल्याचा, तो गंगेचा प्रवाह अनुभवू शकतो इतकी विलक्षण रचना त्यांनी केली आहे. 

गंगा म्हणजे गंगाच आहे. तिचे मंत्रमय,काव्यमय वर्णन करणे तसे सोपें नाही. श्रीमद आदि शंकराचार्य आणि थोरले स्वामी महाराज अर्थात श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी प्रत्येक नदीवर स्तोत्र रचले. गेय आणि विशिष्ट छंदात असलेल्या रचना आजही अनेकांच्या ओठी आहेत. थोरले स्वामी महाराज वर्णन करतांना म्हणतात, 

न जाणे मी धर्मा न च विहित कर्मा अवगमा ।
न जाणे मी शर्मा न च विहित आधार महिमा ।।
कुकर्मासी कामा कुलित कृतकर्माची सुभगे ।
मला तारी गंगे सकल भय भंगे त्रिपथगे ।।

अशी ही गंगा स्वच्छ, निर्मळ,अविरल वाहते आहे. वैज्ञानिक दृष्टीनेही पाहून झाले,गंगेचे साठविलेले पाणी बिघडत नाही. काहीकाळ सगळं स्तब्ध झाल्यावर गंगेचा स्वच्छ आणि निर्मळ प्रवाह आपण बघितला आहे. गंगा म्हणजे पावित्र्याचा प्रेमळ प्रवाह आहे. प्रत्यक्ष भगवान विष्णूच्या चरणकमलातून निघालेले पावित्र्य, शंकराच्या मस्तकावर अवतरले व तेथून सेवेची दीक्षा घेऊन प्रवाह रूपात पृथ्वीवर वाहू लागले. ज्ञानाचा परिपाक म्हणजे सेवा व सेवेचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे गंगा. गंगेचा हा उसळता प्रेमप्रवाह पाहून गंगेच्या अवतीभवती असणाऱ्या प्रत्येकाच्या ओठावर सहज शब्द येतात , 'गंगा मैय्या की जय!'

स्कंद पुराणात लिहिले आहे की, ज्येष्ठ शुद्ध दशमी संवत्सरमुखी म्हटली जाते. त्या दिवशी भावयुक्त अंत:करणाने स्नान व दान करावे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने गंगा स्नान पहिल्यांदा घडले. खरंतर तो अनुभव शब्दांतही मांडता येणार नाही इतका विलक्षण आहे. प्रयागराज कुंभमेळ्याची व्यवस्था अतिशय भव्यदिव्य आणि डोळे दिपवून टाकणारी होती. प्रयागराज ला राहिल्यावर गंगेत डुबकी मारल्यावर दुसऱ्या दिवशी काशीत पोहोचलो. दशाश्वमेध घाटावर गंगेचे पुन्हा दर्शन घेतले दिवसभर काशी पालथी घातली पुन्हा सायं आरतीसाठी गंगेच्या काठावर येऊन बसलो. देव, देश, धर्माच्या सीमा ओलांडलेली शेकडो माणसं तिथं बघितली आणि मनात एक क्षण विचार आला की खरंच गंगा किंवा नदी महात्म्य हे अभ्यासनीय आहे. सूर्यास्तानंतर काही क्षणांत दिव्यांच्या झमगटात गंगेची आरती सुरू झाली. गंगेचा प्रवाह शांत असला तरी सायं आरतीच्यावेळी गंगेच्या पाण्यात वेगळेपण जाणवत होते. ते बघितले आणि मनःशांती या शब्दाची ताकद अनुभवली. 

व्रतनिष्ठ, तेजोमूर्ती,चारित्र्यसंपन्न, तत्वज्ञ भीष्मांना जन्म देऊन गंगा कृतार्थ झाली. भारतीय लोकांच्या हृदयात तिने मातेचे स्थान प्राप्त केले. गंगेकडे भोगाच्या दृष्टीने पाहणाऱ्या असुरांना भोग मिळाला तर भक्तीच्या दृष्टीने पाहणाऱ्या देवांनी मोक्ष प्राप्त केला. पतीतपावनी गंगा अनेकांना भुरळ पाडणारी आहे. संत कबीर यांच्या गंगेच्या काठावरील रचना असो किंवा मग जगन्नाथ पंडित यांची गंगा लहरी म्हणजे तर गंगेचे विलोभनीय दर्शन घडवणारे आहे. आज गंगा दशहरा या निमित्ताने भगवती गंगा आम्हा सगळ्यांवर मांगल्याचा वर्षाव करो हीच तिच्या चरणी प्रार्थना.. 

हर हर गंगे !! 

✍️ सर्वेश फडणवीस 

#गंगादशहरा #Ganga

Friday, May 26, 2023

दूरदृष्टी , कल्पकता आणि अंत्योदय साकारणारे नितीन गडकरी

अखंडितलक्ष्मीअलंकृत, सकळगुणालंकरण राजर्षी राजमान्य श्रीमंत नितीनजी यांचे सेवेसी सप्रेम नमस्कार व विनंती विज्ञापना जे -

श्री नितीन जयराम गडकरी या आपल्या नावातच एक विलक्षण दूरदृष्टी ही बघायवयास मिळते. या माध्यमातून आपली रोजची दिनचर्या बघून अचंबित व्हायला होतं. आपला प्रवास आणि सतत कार्यमग्न राहण्याची सवय बघून आम्हा सर्वांना सदैव प्रेरणा मिळत असते. आज केंद्रातील मंत्री म्हणून आपण सलग ९ वर्ष झाली रस्ते विकासाच्या माध्यमातून देशात रस्त्याचे नवनवीन जाळे विणत आहात. देशाच्या कुठल्याही भागात गेलो की, नागपूर म्हंटल की आपल्या नावाचे वेगळेपण अनुभवायला येतंच. खरंतर राजकारणी नेता समाजाभिमुख तळागाळातील कार्यकर्त्यांशी ही तितक्याच आपुलकीने कार्य करणारा असावा असे वाटते आणि आपण त्यात अग्रक्रमावर आहात. सर्वांशी एक होत आपले वेगळे अस्तित्व आहे याची जाणीव करून देण्याची इच्छा आणि आकांक्षा असलेले आणि संघ संस्कार नकळतपणे लहानपणापासून भिनलेले आणि विद्यार्थी परिषदेपासून राजकारणात असलेले प्रतिभावंत मुदसद्दी राजकारणी म्हणून होत असलेली आपली जगन्मान्य ओळख आम्हाला नागपूरकर म्हणून अभिमान वाटावा अशीच आहे. 

आज भारतभर महामार्गाच्या माध्यमातून आपण आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. लोकाभिमुख कार्य करताना त्यांच्यातला एक होऊन कार्य करण्याची आपली आवड प्रत्येकाला जोडून ठेवत आहे. आज आपण नागपूरचा जो कायापालट करण्याचा ध्यास घेतला आहे त्याला शब्दात व्यक्त करणे कठीण असेच आहे. कुणीही नवा व्यक्ती नागपूरला आला की त्याच्या तोंडून आपुसक शब्द निघतात ते म्हणजे वाह.. नागपूर फारच बदलले आहे. आज नागपूर मेट्रोचे कार्य हे आपल्या कारकिर्दीत झाले याचा आम्हाला नागपूरकर म्हणून अभिमानच आहे. प्रत्येक नागपूरकरांना आपल्या कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य असल्याचा विश्वास आपण निर्माण केला आहे. कुटूंब वत्सल आहात आणि कौटुंबिक सोहळ्यात आम्ही ते कायम अनुभवत असतो. पक्ष, पार्टी याचा मान ठेवत वैयक्तिक माणूसकीचे नाते आपण टिकवून ठेवले आहे त्यामुळे विरोधक सुद्धा आपल्याशी प्रसंगी राजकारण बाजूला ठेवत मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवण्यासाठी तत्पर असतात.  

आपण करत असलेले कार्य विलक्षण आदरयुक्त आणि अभिमान आणि अभिनंदनीय आहे आणि आम्हा नागपूरकरांचे आपण भूषण आहात. आपल्या सारखे नेते आणि राजकारणी आज देशाला वेगळ्या उंचीवर नेतील यात शंका नाहीच. आपल्या कार्यावर लिहिण्याचा माझा अधिकार नाही. पण आपला हितचिंतक आणि आपल्या कामावर निरतिशय प्रेम करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून या प्रभावी माध्यमातून शुभेच्छा देताना आनंद आणि गौरव होतो आहे. आपणांस जन्मदिवसाचे अभिष्टचिंतन. आई रेणुका आपल्याला उदंड निरामय आरोग्य प्रदान करो हीच तिच्या चरणी प्रार्थना..💐🙏🌷🌷

बहुत काय लिहिणे ? अगत्य असू द्यावे ही विज्ञापना. 

- सर्वेश फडणवीस


Monday, May 8, 2023

प्रणवीर महाराणाप्रताप !!

प्रणवीर अर्थात मेवाडचा राजा महाराणा प्रताप. आजही ह्यांच्या गौरवशाली इतिहासाचे किस्से ऐकणे म्हणजे पर्वणीच असते. त्यात कादंबरीत कठीण विषयाला सोपे करण्याची शैली सुद्धा वेगळीच असते. पराक्रमी योद्धयाची फारशी ओळख दुर्दैवाने आपल्याकडे नाही. राजपूतांमध्ये स्वाभिमानाची आग चेतविण्याचे महत्कार्य महाराणा प्रतापांनी केले. अकबराशी प्राणपणाने झुंज घेतली, प्रचंड पराक्रम गाजवला आणि त्याच महाराणाप्रताप यांच्याविषयी मराठीत माहिती कमीच सापडते. 

भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील अत्यंत तेजस्वी आणि दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व म्हणजे 'महाराणा प्रताप'. ज्या महापुरुषांच्या केवळ स्मरणानं देशभक्तांचे बाहू स्फुरण पावतात ते प्रातःस्मरणीय नाव म्हणजे 'महाराणा प्रताप'. ज्याच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या कथांवर भारतीय मनं संस्कारित होऊन त्यांत राष्ट्रीय भावना निर्माण होते ते नाव म्हणजे 'महाराणा प्रताप'. राजस्थानच्या भूमीचा कणनकण, अरवली पर्वताचे उत्तुंग शिखर, घनदाट अरण्यातल्या वृक्षांच्या पल्लवित शाखा, या पुण्यभूमीवर वाहणारे मंद वारे आणि शांत नीरव रात्री आकाशात शांतपणे चमकणारे अगणित तारे अजूनही मूकपणे या प्रणवीराची कथा सांगत असतात, शतकानुशतकं. जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची प्रदीप्त ज्योत, भारताच्या इतिहासातलं सोनेरी पान, आणि मातृभूमीसाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या परमवीराची, त्याच्या यशापयशाची प्रेरणादायी गाथा म्हणजे महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर असलेले 'प्रणवीर महाराणाप्रताप' ही कादंबरी गाथा आहे. 

राजस्थानमधील मेवाडच्या महापराक्रमी राजा प्रतापसिंह याच्या शौर्याने आजही भारतीयांचा ऊर भरून येतो. तुर्कांशी त्यांनी दिलेल्या लढ्याचे वर्णन आजही केले जाते. १५७२ ते १५९७ अशी २५ वर्षे राज्य केले. आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्वाची आहुती देणाऱ्या या परमवीराची कथा, त्याच्या यशापयशाची प्रेरणादायी गाथा डॉ. भारती सुदामे यांनी प्रणवीर महाराणा प्रताप यातून लिहिली आहे. महाराणा प्रताप, मेवाड, त्याचा प्रिय चेतक घोडा आणि हल्दी घाटची लढाई, हाच इतिहास माहीत असणाऱ्यांना या कादंबरीतून महाराणांचे प्रामाणिक चरित्र समजते. देदीप्यमान पुरुषाची राष्ट्रप्रेमाने भारलेली ही कहाणी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

भारती ताई त्यांच्या मनोगतात लिहितात की, 'महाराणा प्रतापांच्या आयुष्यावर कादंबरी लिहायची म्हणजे व्यक्तिपूजन नव्हे.
'प्रतिमापूजन' 'प्रतिमाभंजना'ला दिलेलं उत्तर ठरू शकत नाही.' ही समजही दिली गेली. राणा प्रतापांच्या आयुष्याचा अभ्यास करण्यात जे गवसलं ते व्यक्त करण्याच्या सहज प्रक्रियेतून 'प्रणवीरा'चा जन्म झाला. ९ मे १५७० ला महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. आज महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्यांची स्फुर्तीदायी जीवनगाथा जाणून घेण्यासाठी सौ.भारती सुदामे यांनी लिहिलेले 'प्रणवीर महाराणाप्रताप' ही कादंबरी मिळवून वाचायला हवी आणि संग्रही असावी अशीच आहे.

✍️ सर्वेश फडणवीस

#प्रणवीर #महाराणा_प्रताप_जयंती