Saturday, November 11, 2023

✨ वाद्यमेळ : रुद्रवीणा


वीणा खरंतर भारतीय संगीतातील एक प्राचीन आणि प्रमुख तंतुवाद्य आहे. प्राचीन काळी वीणा हे नाव साधारणतः घनवाद्ये वगळता, इतर प्रकारांना उद्देशून वापरले जात होते. त्यातीलच रुद्रवीणा हे वाद्य पहिल्यांदा पाहताक्षणीच मोहात पाडणारे असे वाद्य आहे. सुंदर नक्षीकाम आणि त्याचा एकंदर बाज बघता दिसायला जरा कठीण वाटत असलं तरी वाजवल्यावर नादमधुर आणि आल्हाददायक आनंद देणारे असे हे वाद्य आहे. वीणा या वाद्याचे अनेक प्रकार आपल्याला अलीकडे बघायला मिळतात. नागस्वरम्‌, सनई यांसारख्या वाद्यांनाही ‘मुखवीणा’ हेच नाव होते. वैदिक मंत्रांच्या स्वरगणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या वीणेला ‘हस्तवीणा’ किंवा ‘गात्रवीणा’ म्हणत होते. हिंदीमध्ये ‘बीन’ हे नाव वीणा या प्रकारातील वाद्याला वापरल्या जाते. अलीकडे मात्र वीणा ही सामान्यतः दांड्यावर स्वरांचे पडदे असलेल्या तंतु वाद्याला वापरली जाते.

वीणेचे अनेक प्रकार प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. धनुष्याक वक्रवीणा हे अतिप्राचीन तंतुवाद्य असून ईजिप्तमध्ये इ.स.पू.सु. चार हजार वर्षांपूर्वी अशा प्रकारचे वाद्य प्रचारात असल्याचे उल्लेख आढळतात. हॉर्टेन्स पानुम या लेखिकेने स्ट्रिंग्ड इन्स्ट्रुमेंट्‌स ऑफ द मिडल्‌ एजिस, देअर ईव्हलूशन अँड डेव्हलपमेंट या ग्रंथात, वक्राकार वीणा सर्व वीणा प्रकारांतील मूळ प्रकार असून बाकीच्या वीणा नंतर निर्माण झाल्या,असे म्हटले आहे. वैदिक संगीतातही वीणावादन प्रचलित होते. यज्ञप्रसंगी उद्‌गाते गात असताना, यजमानपत्नी निरनिराळ्या वीणा वाजवत असल्याचे उल्लेख आहेत. वीणेचे विविध प्रकार प्राचीन काळी रूढ होते.

रूद्रवीणा या वाद्याचे अनेक प्रकारभेद आणि वेगवेगळी वर्णने आढळतात. याचे साम्य रबाब या वाद्याशी असल्याचे काही तज्ञ मानतात, तर काही दाक्षिणात्य वीणेशी याचा संबंध लावतात. 
रुद्रवीणा आता एक दुर्मिळ वाद्य बनले आहे जे जवळजवळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ते बनवणारे कारागीर तसेच त्याचे वादक दोघेही आता क्वचितच सापडतात. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सुरबहार, सतार आणि सरोद इत्यादी वाद्यांच्या विकासामुळे या वाद्याचे महत्त्व कमी झाले. 

रुद्रवीणा ही लाकडापासून बनलेली एक लांब ट्यूबलर रचना आहे. यात दोन मोठे गोल रेझोनेटर्स असतात, जे नळीच्या तळाशी, केंद्रापासून समान अंतरावर बसवले जातात आणि चांगल्या प्रतीच्या भोपळ्यापासून बनवलेले असतात. चार वाजवणाऱ्या तंतूंचा यात समावेश आहे, एक स्टीलचा आणि तीन तांब्याचा, खालच्या टोकाच्या हुकला बांधलेला आणि ट्यूबला समांतर ताणलेला आणि सजवलेल्या ट्यूनिंग पेगकडे नेणारा अशी या वाद्याची एकंदर रचना आहे. नळीच्या दोन्ही बाजूंच्या हुकवर दोन ड्रोन वायर आहेत ज्या आपापल्या वरच्या भागात ताणलेल्या असून त्या बांधलेल्या आहेत.

रुद्रवीणेचा विकास दक्षिण भारतात झाला असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. तंजावर येथे कर्नाटक पद्धतीच्या शास्त्रीय संगीताचा उदय झाला पुढे त्यास प्रतिष्ठा प्राप्त झाली ती तंजावरच्या भोसले घराण्याच्या राजाश्रयामुळे आणि त्यांच्यामुळेच काही रुद्रवीणा वादक आपल्याला बघायला मिळतात. अलीकडच्या काळात विदुषी ज्योती हेगडे, सत्यवाणी पारंकुशम कुशल रुद्रवीणा आणि खंडारबणी घराण्यातील सितार कलाकार आहेत. त्या सर्वोत्तम रुद्रवीणा वादक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. आता रुद्रवीणा हे युनेस्कोने संरक्षित केलेले आणि प्रमोट केलेले जागतिक वारसा साधन आहे. आज लक्ष्मीपूजन या रुद्रावीणेच्या स्वरांसारखेच आपल्याही आयुष्यात ऐश्वर्य, धन-धान्य, समृद्धी आणि मांगलिकतेचा वर्षाव व्हावा हीच श्री लक्ष्मीमाते चरणी प्रार्थना आहे. दिवाळी निमित्त शुभचिंतन..

सर्वेश फडणवीस 

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day3







Friday, November 10, 2023

वाद्यमेळ : जलतरंग

जलतरंग या नावातच एक गूढ आणि आत्मिक अशी अनुभूती येते. तसंच हे वाद्य आहे. हे फारसे प्रचलित नसलेले एक भारतीय नादवाद्य आहे. जलतरंग या वाद्यामध्ये कुठलाही ताण नाही. त्यामुळे हे वाद्य ऐकून ऐकणाऱ्याचा ताण नाहीसा होतो. नादातली नजाकत आणि प्रसन्नता हे जलतरंग या वाद्याचं वैशिष्ट्य आहे. अर्धगोलात ठेवलेले लहानमोठ्या आकाराचे चिनी मातीचे बाउल, त्यात कमी अधिक प्रमाणात असलेलं पाणी आणि दोन नायलॉनच्या स्टिक्स एवढी सामग्री तुम्हाला जग विसरायला लावू शकते आणि असंच हे दुर्मिळ जलतरंग वाद्य आहे. 

जलतरंग हे अस्सल भारतीय वाद्य आहे. पूर्वी धातूच्या भांड्यांमध्ये पाणी ठेवून वाजवलं जाणारं हे वाद्य आता चिनी मातीचे बाउल वापरून वाजवलं जातं. दिसायला जरी सहज - सोपं असलं तरीही वाजवायला तितकंच अवघड आहे. जलतरंग वाजवायला अवघड आहे कारण त्यात महत्त्वाचे आहे ट्यूनिंग. जलतरंग ट्यून कसं करतात ? बाऊलचा आकार आणि त्यात असलेलं पाण्याचं प्रमाण यावर त्यातून येणारा स्वर अवलंबून असतो. मुळात बाऊलला स्वतःचा एक स्वर असतो. पाणी नसताना बाऊलमधून जो स्वर येतो त्यापेक्षा त्या बाऊलमध्ये पाणी घालून ३ ते ४ स्वर अधिक मिळवता येतात. बाऊलचा आकार जितका मोठा तितका त्यातून येणारा स्वर खालच्या सप्तकातला. बाऊलमध्ये जितकं पाणी कमी तितका त्याचा स्वर वरचा लागतो. त्यामुळे इतर वाद्यांसारखं ट्यूनिंग करताना स्वर चढवणं हे जलतरंगाच्या बाबतीत शक्य नसतं. म्हणूनच जलतरंग हे स्वर उतरवून ट्यून केलं जातं. 

या वाद्यातील ट्यूनिंगमधला दुसरा महत्वाचा मुद्दा तापमानाचा आहे. जलतरंगासाठी वापरलं जाणारं पाणी एकदम थंड असेल तर जलतरंग वाजत नाही. गरम पाणी वापरलं तर एरवीपेक्षा कमी पाण्यात जलतरंग ट्यून करता येतं पण वाजवता वाजवता पाणी पुन्हा नेहमीच्या तापमानावर येतं तेव्हा ट्यूनिंग बिघडतं. पाण्यापेक्षा घनतेने हलक्या द्रवपदार्थानेही ते ट्यून करता येऊ शकते पण बऱ्याचदा अशा द्रव पदार्थांचं बाष्पीभवन लगेच होत असल्याने ते वापरणे व्यावहारिक नाही. जलतरंग हे वाद्य शास्त्रीय राग वाजवण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नाही असा एक विचारप्रवाह आज आहे. 

जलतरंगाचा सर्वात जुना उल्लेख वात्स्यायनाच्या कामसूत्र ग्रंथात पाहायला मिळतो. पाण्याने भरलेल्या विविध पेल्यांत संगीताचे जल-तरंग निर्माण करून सूरनिर्मिती केली जात असे. तसेच याचा उल्लेख मध्ययुगीन "संगीत पारिजात" या ग्रंथामध्येही करण्यात आला होता, ज्यामध्ये या वाद्याला घन-वाद्य असे म्हंटले आहे. जल - तरंगला मध्ययुगीन काळात जल - यंत्र, जल तंत्री वीणा देखील म्हटले जात असे चित्रपट संगीतामधे देखील या वाद्याचा भरपूर वापर केला गेलेला आहे. पंख होते तो उड आती रे.. मधु बन मे राधिका नाचे रे… . अशी अनेक गाण्यांचे उदाहरणे देता येतील. तसेच कृष्णावर कविता लिहिणाऱ्या कवींनीदेखील या साधनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केला आहे. जल या तत्त्वाचा उपयोग करून घेऊन जलतरंग हे पारंपरिक वाद्य वाजवलं जातं. ऐकतांना लहानमोठ्यांना त्यातून निघणाऱ्या मोहक नादाची भुरळ पडते.

भारतात आज जलतरंगवादनाचे पूर्णवेळ कार्यक्रम करणारे खूपच मोजके लोक आहेत. त्यात पुण्यातील  पं.मिलिंद तुळाणकर हे नाव अग्रक्रमाने घेता येईल. G20 च्या वेळी जे वाद्य वादक होते त्यात जलतरंग साठी पं. मिलिंद तुळाणकर यांचा समावेश होता. असे हे जलतरंग वाद्य तरंगाच्या नादातून आनंद देणारे आहे. कायम वाटतं की खरोखरच संगीतामध्ये ही जादू आहे की आपण सर्व जग विसरून जातो. असंच हे जलतरंग वाद्य आहे. 

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day2

Thursday, November 9, 2023

वाद्यमेळ : सुरबहार


सुरबहार हे नाव ऐकूनच या वाद्याबद्दल प्रसन्नता जाणवते. आपल्याकडे काही वाद्यांची नावं पण इतकी छान आहेत की ते नाव वाचून सुद्धा मनात आल्हाददायक भावना सहज निर्माण होतात. असेच वाद्य म्हणजे सुरबहार आहे. सुरबहार हे वाद्य लाकूड, तुमडी आणि रेशीमपासून बनवलेले तार वाद्य आहे. हे एक पारंपारिक वाद्य आहे जे उत्तर भारतातील विविध भागात आजही प्रचलित आहे. आज सुरबहार हे प्रामुख्याने उत्तर भारतीय शास्त्रीय संगीत मैफिलींमध्ये शास्त्रीय संगीतकारांकडून एकल वाद्य म्हणून वापरले जाते. या वाद्याच्या एकल वादनाने सुद्धा अनेक मैफिली अजरामर झाल्या आहेत. हे वाद्य सतारीच्या जवळपास जाणारे आहे. हे वाद्य सतारीहुन थोडे मोठे असते त्याच्या खालचा गोलाकार भागही सतारीपेक्षा बराच मोठा असतो व दांड्यावरील पडदे मात्र धारदार आणि पातळ असतात. हे वाद्य विलंबित आलापीला योग्य आहे. परंतु याचा स्वर कमी आहे. अत्यंत सुंदर दिसणारे हे वाद्य पहिल्यांदा बघतांना सतारीसारखे वाटते पण त्याहूनही थोड्या वेगळ्या धाटणीचे हे वाद्य आहे.

सुरबहार हे वाद्य साधारण १३० सेमी पेक्षा जास्त मोठे आहे. यात रेझोनेटर म्हणून वाळलेल्या करवंदाचा वापर केल्या जातो आणि त्याच्याकडे खूप रुंद फ्रेट असतात. या फ्रेट मान टूना किंवा महोगनी लाकडापासून बनविली जाते. यात साधारणपणे ३-४ मी ताल तार ( चिकारी ), चार वाजवणाऱ्या तार (सर्वात रुंद १ मिमी), आणि १०-१२ सहानुभूती स्ट्रिंग आहेत. या वाद्याला दोन पूल आहेत; वाजवता येण्याजोग्या तार मोठ्या पुलावरून जातात, जे तबलीला लहान पायांनी जोडलेले असतात, आणि जागोजागी चिकटलेले असतात. यातील सहानुभूतीच्या तारा थेट तबलीवर चिकटलेल्या छोट्या पुलावरून जातात. पुलांना स्ट्रिंगच्या समांतर वरच्या पृष्ठभागावर थोडासा वक्र असतो ज्यात कंपन होताना स्ट्रिंग स्पर्श करतात, या वाद्याचा मुख्य भाग सतारी सारखाच आहे, ज्यामध्ये ते एका बाजूला कोरलेल्या लाकडाच्या मुखासह मोठ्या वाळलेल्या करवंदाचे बनलेले आहे आणि कोरीव लाकडी गळ्याला जोडलेले आहे. बहुतेक सुरबहारांमध्ये खालचा भाग मोठा असतो आणि काही प्रमाणात झुकलेली असते आणि तळ वाद्याच्या मागील बाजूस असतो.

सुरबहार वादक वाकलेल्या स्टीलच्या ताराच्या प्लेक्ट्रमचा वापर करून ती तार वाजवतो, मिझरब , जो वादकाच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर स्थिर असतो. सुरबहारवर आलाप , जोर आणि झाला या धृपद शैलीत वाजवण्यासाठी पहिल्या तीन बोटांवर तीन प्लेक्ट्रम वापरतात. याची खासियत म्हणजे धृपद शैलीत, सितारखानी आणि मासितखानी गाण्यांऐवजी, वादक पखावाजांच्या साथीने धृपद रचना वाजवतात आणि हे ऐकताना ऐकणारा आनंदून जातो.

काही संशोधकांचा असा विश्वास आहे की सुरबहारचा शोध १८२५ च्या आसपास लागला आहे. त्यावेळी, देवी सरस्वतीशी संबंधित एक पवित्र वाद्य मानली जाणारी वीणा फक्त वीणा वादकांच्या वंशजांनाच शिकवली जात होती. त्यानंतरच्या काळात सुरबहारचा विकास काही प्रमाणात वीणाप्रमाणेच झाला आहे. सुरबहारचा शोध ओमराव खान बीनकर यांनी लावला होता आणि गुलाम मोहम्मद हे त्यांचे शिष्य होते. ओमराव खान बीनकर हे रामपूरच्या वजीर खान यांचे आजोबा होते. या आविष्काराचे श्रेय उस्ताद साहेबदाद खान यांनाही जाते.

खरंतर सतारीपेक्षा जड असलेले आणि वाजविण्यास अवघड असलेले सूरबहार हे वाद्य अलीकडच्या काळात लीलया वाजवून रसिकांची मने जिंकणाऱ्या अन्नपूर्णादेवी एक प्रतिभावंत कलाकार होत्या. अन्नपूर्णादेवी गेली काही वर्षे एकांतवासात होत्या आणि त्यांचे नाव आजही सुरबहार या वाद्याशी जोडले जाणे, यातच त्यांची महानता दिसते. २००४साली 'संगीत नाटक अकादमी'ने त्यांना 'रत्न' म्हणून नावाजले. अन्नपूर्णा देवी कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिल्या, त्यांनी जास्त जाहीर कार्यक्रम केले नाहीत, रेकॉर्डही काढल्या नाहीत, तरीही भारतीय शास्त्रीय संगीतातील सुरबहार उत्कृष्ट वादक कलाकार म्हणून कायम नावाजल्या गेल्या आहेत. असे हे सुरबहार वाद्य आजही प्रसिद्धीच्या झोतात नसले तरी एक दुर्मिळ वाद्य म्हणून संगीत क्षेत्रांत नावाजलेले आहे. आता देशात केवळ तीन ते चारच सूरबहार वादक आहेत. आज धनत्रयोदशी या सुरबहार सारखे आपल्याही आयुष्यात धन धान्य ऐश्वर्य आणि निरामय आरोग्य सदैव राहावे हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना आहे.

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023 #Day1

Wednesday, November 8, 2023

भारत वाद्य दर्शनम् ..

आवाज कोणाचा? म्हणजे फटाक्यांचा असतोच पण त्या गलक्यात जरा या वाद्यांचा आवाज ही ऐकुया. सप्टेंबर महिन्यात जी20 बैठकी निमित्ताने आलेल्या सगळ्या राष्ट्र प्रमुखांसमोर तब्बल ७८ विविध भारतीय वाद्यांचे सादरीकरण झाले. त्यातूनच ही संकल्पना सुचली आणि त्यातील पाच वाद्य यानिमित्ताने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोंत.

एके ठिकाणी छान वाचनात आले की, हिंदु तत्त्वज्ञानाने सर्व ध्वनिद्रव्याचा आरंभ एका शब्दातून केला आहे. त्या एका शब्दाला नादब्रह्म, ॐ किंवा प्रणव म्हणतात. ॐ हाच ध्वनीचा आदिस्फोट. म्हणूनच वेणू (कृष्ण), वीणा (सरस्वती) व डमरू (शिव) या वाद्यांना दैवी संकेत प्राप्त झाले आहेत. ही संगीताची गर्भावस्था आदिम वाद्यांत दिसून येते. संगीतमय म्हणता येईल असा निश्चित नाद या वाद्यांतून निघत नाही.

कमरेला बांधलेली वाळलेल्या फळांची माळ, ही प्राथमिक अवस्थेतील संगीताची साधने होती. नंतरच्या अवस्थेत काठ्या चिरलेली लाकडे, तबकड्या, दांड्या, ढोल, वीणा व वेणू यांचा हळूहळू प्रादुर्भाव झाला. पण आदिम वाद्यांचा उपयोग केवळ संगीतासाठीच होत होता असे म्हणता येत नाही. शंख जसा
रणवाद्य होता तसाच अभिषेकपात्रही होता. त्यात तीर्थ ठेवले जात होते. नगारा व धुम्सा ही सुद्धा रणवाद्ये होती. चर्मजडित वाद्ये खुणांच्या बोलीसाठी वापरली जात होती.

खरंतर संगीत वाद्य म्हणजे संगीतोपयोगी नाद निर्माण करण्यासाठी वापरलेले कोणतेही साधन. या अर्थी, मानवी देह, विशेषतः मानवी आवाज, हेच सर्वांत प्राचीन संगीत वाद्य म्हणता येईल. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्यालाच ‘गात्रवीणा' म्हटले आहे. टाळ्या वाजवणे, मांड्या व कुल्ले थोपटणे. जमिनीवर पाय
आपटणे, ह्या क्रिया आदिम वाद्यक्रियाच होत्या. वेदमंत्र गाताना, हातावर आवाज न करता बोटांनी विशिष्ट पद्धतीने जी लयगणना केली जात असे तिला हस्तवीणा म्हणत असत. अशा दैहिक क्रियांचेच रूपांतर हळूहळू स्वतंत्र वाद्ये घडवण्यात झाले. हातोडी किंवा पेचकससारखी अवजारे जशी उद्योगी हाताची कार्यक्षमता वाढवणारी यांत्रिक क्लृप्ती म्हणून निर्माण झाली तशीच टिपरी व कोलाट्टम् कट्टेसारख्या काठ्या किंवा करताल व चिपळ्यांसारखी टाळ्या देणारी वाद्ये मानवी हाताने आपली क्षमता वाढवण्यासाठी तयार केली.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे दीडशे वर्षांहून अधिक काळ वाद्य निर्मितीसाठी प्रसिध्द आहे. इथले नामवंत कारागीर मजीद सतार मेकर यांना अलिकडेच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मागील मन की बात मध्ये अनेक देशांमधील भारतीय संगीताच्या लोकप्रियतेमुळं देशातून संगीत वाद्यांची निर्यात वाढल्याचा उल्लेख केला होता. मिरजेमध्ये निर्मित तंबोरा, सतार, दिलरुबा, सारंगी, ताऊस, रुद्रविणा, सुरबहार, यांसारख्या वाद्यांना देशविदेशातीतल नामांकीत कलाकारांकडून मागणी आहे. दीडशे वर्षांपूर्वी फरीदसाहेब सतारमेकर यांनी लावलेल्या या वाद्य निर्मितीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे आज अनेक कारागिर यामध्ये कार्यरत आहेत.

आता वाद्य तयार करणाऱ्या कारागिरांची एक पेठच इथं वसली आहे. २५ हून अधिक दुकानांमधून १०० हून अधिक कारागीर हे काम करीत आहेत. वाद्य दुरुस्तीमध्ये देखील हे कारागीर इतके तयार आहेत की पिढ्या न् पिढ्या वाजवली जाणारी वाद्यं दुरूस्ती आणि देखभालीसाठी कलाकार केवळ मिरजेच्या कारागिरांच्याच हाती विश्वासानं देतात. फरीदसाहेब यांच्यानंतर वाद्य निर्मितीची ही परंपरा पीरसाहेब, हुसेन साहेब यांनी पुढे नेली. शाहमृगाच्या अंडय़ापासून बनविलेली सतार त्या काळात खूप गाजली होती. मोठ-मोठय़ा संगीत महोत्सवात मिरजेतील वाद्यांना कलाकार पहिली पसंती देतात. वाद्यनिर्मितीची ही कीर्ती ऐकून मजिद सतारमेकर आणि त्यांचे पुत्र अतिक यांना जपान आणि फ्रान्समध्ये वाद्यनिर्मितीची कार्यशाळा घेण्यासाठी खास निमंत्रण देण्यात आले होते. अशा वाद्यांच्या पाठीमागील काही कथा,  त्या वाद्यांच्या इतिहासाचा मागोवा या निमित्ताने दिवाळीच्या पांच दिवस " वाद्यमेळा " शीर्षकांतर्गत वाद्यांची कहाणी, परंपरा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा उद्यापासून वाद्यमेळात भेटूच..

सर्वेश फडणवीस

#वाद्यमेळा #लेखमाला #diwali2023

Sunday, October 22, 2023

⚜️ विज्ञानवादिनी - शिवरंजनी साठे !!


शिवरंजनी साठे हे अनेकांसाठी अगदीं नवं नाव आहे. या लेखमालिकेत तिच्याबद्दल शेवटी घेण्याचे कारण म्हणजे शिवरंजनी अमेरिकेत स्थायिक झाली आहे पण तिचे लहानपण आणि जडणघडण ही नागपुरात झाली आहे. तिचा आजवरचा प्रवास हा जिद्द आणि चिकाटीने झालेला आहे. काहीतरी चांगलं करण्याच्या उदात्त हेतूने ती अमेरिकेतील बोइंग येथे कार्यरत आहे. आजची नववी विज्ञानवादिनी आहे शिवरंजनी साठे.

शशांक व शुभा साठे या दाम्पत्याची ही कन्या शिवरंजनी हिचे प्राथमिक शिक्षण कोराडी वसाहतीतील मराठी शाळेतच झाले. त्यानंतर तिला पाचवीपासून सुप्रसिद्ध अशा सोमलवार शाळेत शिक्षण घ्यायचे तिने स्वतःच ठरवले होते. अभ्यासात बऱ्यापैकी ठीक होती. त्यावेळी गणित विषय कठीण जात होता पण चांगल्या ट्युशन क्लासेसने गणितात सुधारणा झाली आणि दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले. त्यानंतर अकरावी बारावी विज्ञान शाखेत तिने प्रवेश घेतला.

२००३ साली दूरदर्शनवर एक दुर्घटना तिने पाहिली. कल्पना चावलाच्या कोलंबियाला झालेला जीवघेणा अपघात! त्या प्रसंगाचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाला. एकदा तिने घरी आईला सांगितलं, “आई, मी कल्पना चावला होणार." म्हणजे काय ? आईने विचारले. ती म्हणाली, " मी तिच्यासारखं स्पेसमध्ये जाणार." आईने या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. म्हटलं, "तुला स्पेसमध्ये जायचं असेल तर आधी गणितात चांगले गुण मिळवून दाखव. कशी जाणार स्पेसमध्ये ? " तिने हे मनावर घेतलं आणि खरंच बोर्डाच्या परीक्षेत १५० पैकी १५० गुण तिने मिळवून दाखवले. त्यानंतर ती सतत 'कल्पना चावला','सुनीता विल्यम्स' यांच्याविषयी, अंतराळ संशोधनाविषयी वाचन करत होती. खरंतर तिने या विषयाचा ध्यासच घेतला होता.

बारावी नंतर हैद्राबाद येथील 'इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिकल इंजिनीअरिंग' या महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला. जेमतेम सतराव्या वर्षी महाराष्ट्राबाहेर हॉस्टेल मध्ये राहून ध्येयाच्या
दिशेने वाटचाल सुरू झाली. घर किती सुरक्षित असतं, बाहेर सगळ्यांशी जुळवून घेऊन राहणं, अभ्यास करणं किती कठीण असतं, याची जाणीव झाली. पण स्वप्नांचा पाठलाग करण्याची तिची धडपड होती. बी. टेक. नंतर एम. एस. इन एरोस्पेससाठी अमेरिकेत जायचं. त्यासाठी जी. आर. ई. आणि टोफेलची परीक्षा द्यायची. त्यातही चांगले गुण मिळाले आणि Auburnविद्यापीठात प्रवेश मिळाला. लहानपणापासून मनात बाळगलेलं ध्येय, स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून हे सगळं केलं प्रसंगी आर्थिक आणि मानसिक ताण सहन केला.

एम. एस. पूर्ण झाल्यावर मॉर्फिंग विंग्जवर तिने संशोधन केले. एअरक्राफ्टचे विंग्ज पक्ष्याच्या पंखाच्या हालचालीसारखी हालचाल करतील तर काय फायदे होतील ? लिफ्ट आणि ड्रग असे दोन फोर्स एअरक्राफ्टवर असतात. लिफ्ट फोर्स उडायला मदत करतात आणि ड्रग फोर्स अपोज करतात. जर मॉर्फिंग विंग्जचा वापर केला तर ड्रग फोर्स कमी होतो आणि एअरक्राफ्टचं फ्युएल (इंधन) पण वाचतं, असे तिचे संशोधन आहे. आयईईई एअरोस्पेस कॉन्फरन्स मध्ये 'व्होटींसीटी अॅप्रोचेस फॉर मॉर्फिंग विंग्ज' या शीर्षकांतर्गत पेपर प्रेझेंट केला. या कॉन्फरन्ससाठी पेपर सिलेक्ट होणं हेच खूप कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. बिग स्काय, मॉण्टाना या ठिकाणीही पेपर सादर केला.

स्वप्नांचा पाठलाग करतांना ज्या ध्येयासाठी शिवरंजनी प्रेरित झाली होती त्यासाठी तिला उत्तम असा जोडीदार मिळाला. क्रिस नेल्सन या अमेरिकन तरुणाशी तिची ओळख झाली. अनेक भेटीत, गप्पांमध्ये दोघांचे विचार आणि मनं जुळली. एकमेकांचे स्वभाव समजून घेतले. क्रिस नेल्सन अमेरिकन नेव्हीत आहे. शिवरंजनीची धडपड आणि वयाच्या तेराव्या वर्षी  अंतराळातील झेप घेण्यासाठी बघितलेलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी यश मिळेल हा विश्वासच आहे. तिच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळनववी 


Saturday, October 21, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : कल्पना के !


कल्पना के अर्थात कल्पना कालहस्ती यांची चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाल्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने ओळख झाली. चंद्रयान ३ प्रक्षेपणावेळी आपल्यापैकी अनेकांनी इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ यांच्या बाजूला प्रकल्प सहयोगी संचालक म्हणून एक महिला उपस्थित होती त्या म्हणजेच आजच्या विज्ञानवादिनी कल्पना के आहेत. 

कल्पना के यांचा जन्म बंगलोर मध्ये झाला आहे. शालेय शिक्षण त्यांनी बंगलोर येथेच पूर्ण केले त्यानंतर आयआयटी खडकपूर येथून ऐरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील उच्च न्यायालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. कल्पना के यांनी लहानपणापासून इसरोमध्ये काम करण्याचे स्वप्न बघितले होते. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले. २००३ साली त्या इस्रोमध्ये वैज्ञानिक म्हणून रुजू झाल्या. सर्वात आधी श्रीहरिकोटा इथे पाच वर्ष त्यांनी काम केले आणि त्यानंतर २००५ मध्ये त्यांची बदली बंगळुरूमधील उपग्रह केंद्रात झाली. त्याठिकाणी पाच उपग्रहांच्या डिझाइनमध्ये त्यांनी सहभाग घेतला.  

२०१९ मध्ये श्रीहरिकोटा येथील रॉकेट सेंटरमधून प्रक्षेपित झालेल्या चांद्रयान-२ प्रकल्पातही कल्पना के यांचा सहभाग होता. चांद्रयान-२ मोहिमेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आणि सध्या त्या चांद्रयान-३ प्रकल्पाच्या सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत. ज्यावेळी चंद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाले त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद संपूर्ण जगाने अनुभवला आहे. कुठलेही मिशन यशस्वी झाल्यावर सर्वसामान्य भारतीयाला जितका आनंद होतो त्याहून अधिक आनंद काम करणाऱ्या वैज्ञानिकांना नक्कीच होत असेल. मिशनवर काम करतांना आलेल्या असंख्य अडचणींवर मात करत ते सतत कार्यमग्न राहत असतात आणि हेच यांचे वेगळेपण आहे. 

चांद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर सहयोगी प्रकल्प संचालक म्हणून कल्पना के म्हणाल्या की, "माझ्या आणि माझ्या टीमसाठी हा सर्वात अविस्मरणीय क्षण आहे, आम्ही गेली अनेक वर्षे याचसाठी प्रयत्न करत होतो आणि आम्ही आमचे ध्येय साध्य केलं आहे." चांद्रयान-३ मोहिम यशस्वी होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.

साधारणपणे एक सॅटेलाईट तयार करण्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो. आधी डिझाईन, मग बाकी सगळी प्रोसेस पार पडते. त्यानंतर हे सर्व झाल्यावर अनेक चाचण्या करून पाहिल्या जातात. त्यानंतर त्याची पुन्हा चाचणी करून रॉकेटला जोडून ट्रायल्स घेतल्या जातात आणि त्यानंतर सॅटेलाईट उड्डाण होते. चांद्रयान-३ प्रकल्पादरम्यान चंद्र लँडर प्रणाली डिझाइन आणि ऑप्टिमाइझ यातील त्यांच्या कौशल्याने अनेक आव्हानांवर मात करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हरच्या यशस्वी लँडिंगनंतर, टीमला संबोधित करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद संपूर्ण देशाने बघितला आहे. ही उत्तुंग कामगिरी केवळ जागतिक अंतराळ समुदायात भारताचे स्थान मजबूत करणारी नाही तर ज्या समर्पित व्यक्तींनी हे पराक्रम शक्य केले त्यांच्या अनुकरणीय योगदानावर प्रकाश टाकणारी आहे. कल्पना के यांनी जिद्द आणि मेहनतीने आजवरचा प्रवास यशस्वी केला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे. 

सर्वेश फडणवीस 

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळआठवी   


Friday, October 20, 2023

⚜️ विज्ञानवादिनी : सीता सोमसुंदरम !


सीता सोमसुंदरम इसरोमधील स्पेस इन्स्ट्रुमेंटेशन एक्सपर्ट म्हणून परिचित आहे. चंद्रयान २ ही अंतराळ मोहीम भारतासाठी गौरवाचा क्षण होता आणि याच मिशनवर कार्य करणाऱ्या आपल्या आजच्या विज्ञानवादिनी सीता सोमसुंदरम आहे. सीता सोमसुंदरम यांनी इसरोमध्ये काम करत असतांना विविध जबाबदारी अत्यंत समर्थपणे पूर्णत्वास नेली आहे.

सीता सोमसुंदरम यांनी दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून बीएससी (ऑनर्स) पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रासच्या IIT मधून M.Sc पदवी मिळवली. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून त्यांनी भौतिकशास्त्रात पीएचडी मिळवली आणि त्यानंतर इसरोमध्ये त्यांची निवड झाली आहे. खगोलशास्त्राची लहानपणापासून आवड असल्याने सोमसुंदरम यांना एक्स-रे आणि ऑप्टिकल बँडमधील वेरियेबल स्टार्स यात त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. याशिवाय, त्यांनी अनेक वर्षांपासून चाललेल्या स्पेस-आधारित खगोलशास्त्रीय प्रयोगांसाठी उपकरणे विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योगदान दिले आहे.

सीता सोमसुंदरम इस्रोच्या स्पेस सायन्स कार्यालयात प्रोग्राम डायरेक्टर म्हणून होत्या. त्या अशा महिला वैज्ञानिक आहेत ज्यांनी मार्स ऑर्बिटर मिशनचे (MOM) यशस्वी नेतृत्व केले, ज्याला मिशन मंगळयान म्हणून ओळखले जाते. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) द्वारे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. सीता सोमसुंदरम त्यांच्या मुलाखतीत याबद्दल सांगतात की “मॉमच्या यशाची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला.”

१९८०च्या दशकात, जेव्हा सीता सोमसुंदरम यांनी इसरोमध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्याठिकाणी महिलांची संख्या अगदीं बोटावर मोजण्याइतकी होती. त्यांच्या वरिष्ठांना प्रश्न पडला की या महिला अंतराळ क्षेत्रांतील बारकावे हाताळू शकतील का? त्यांना विश्वास होता की महिला मर्यादित तास काम करतील पण त्यांना घरी जाणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर त्या पुन्हा येणार नाहीत. पण अशा महिला वैज्ञानिकांनी त्यांच्या अथक परिश्रमाने वरिष्ठांची ही भावना दूर केली आणि आज आपण बघू शकतो की इसरोमधील महिलांनी मोठ्या पदावर काम करताना अनेक मिशन यशस्वी करून दाखवले आहे.

एस्ट्रोसॅटचे प्रिंसिपल इन्वेस्टीगेटर म्हणून सीता सोमसुंदरम यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. एस्ट्रोसॅट भारतातील पहिली अंतराळ दुर्बीण आहे जी काही वर्षांपूर्वी प्रक्षेपित करण्यात आली होती. ही दुर्बिणी एकाच वेळी एक्स-रे, ऑप्टिकल आणि यूव्ही स्पेक्ट्रल बँडमध्ये आकाशाचे निरीक्षण करू शकते. यावर काम करतांना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला पण हे करत असतांना त्यांना त्यांच्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला. त्यांच्या आणि टीमच्या साहाय्याने मिशन यशस्वी झाले. मंगळयानचे पेलोड कॅरेक्टरायझेशन आणि कॅलिब्रेशनमध्येही सीता सोमसुंदरम यांचा सहभाग होता.

सीता सोमसुंदरम यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध पुरस्कार मिळाले आहेत. २००३ साली त्यांना भौतिकशास्त्रातील सी व्ही रमन यंग वैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना अस्ट्रोनॉटिका सोसायटी ऑफ इंडियाकडून २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट महिला वैज्ञानिक पुरस्कारही मिळाला आहे. महिला म्हणून त्यांनी अनेक आव्हानांचा सामना करत अत्यंत परिश्रमाने स्वतःची योग्यता सिद्ध करत यशस्वी टप्पा गाठला आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहे.

सर्वेश फडणवीस

#विज्ञानवादिनी #लेखमाला #नवरात्र #माळसातवी